28 Feb 2021

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक लेख २०२०

नवी दृष्टी देणारा ‘राशोमान’

---------------------------------


काही वर्षांपूर्वी मी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलं जाणारं (आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीतून चालणारं) एक आठवड्याचं रसास्वाद शिबिर अटेंड केलं होतं. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा अनुभव होता. त्यातही या शिबिरात आम्हाला दाखवला गेलेला अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहून मी थरारून गेलो. तब्बल ७० वर्षांपूर्वी निघालेला हा सिनेमा मी आठ वर्षांपूर्वी प्रथम पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. दर वेळी मला या चित्रपटानं वेगळी अनुभूती दिली आहे; माझ्या धारणा बदलल्या आहेत. ‘सत्य म्हणजे काय?’, ‘जगात एकच एक सत्य असतं का?’, ‘ज्याला जसं दिसतं तसं सत्य असतं का?’ या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालणारा हा चित्रपट म्हणूनच माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
त्यामुळंच १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमान’ (याचे उच्चार राशोमोन, राशोमन असेही केले जातात!) हा चित्रपट जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. मानवी जीवनावर, वर्तनावर मूलभूत चिंतन करणारे चित्रपट नेहमीच कलात्मक आणि वैचारिक उंची गाठताना दिसतात. ‘राशोमान’ हा याच वर्गातला चित्रपट. रायुनोसुक अकुतागावा यांच्या ‘राशोमान’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचं शीर्षक घेण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्यात ‘इन ए ग्रोव्ह’ या दुसऱ्या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या 'राशोमान' या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्यानं चित्रपटाची सुरुवात होते. दर वेळी हा सिनेमा सुरू झाला की हे दृश्य आणि त्या वेळी कोसळत असलेला भयंकर पाऊस आपलं लक्ष वेधून घेतात. आपण अगदी सावरून पुढं काय होणार ते बघू लागतो. या लाकडी प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या जागेत एक लाकूडतोड्या आणि एक तरुण धर्मगुरू बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितली आहे. प्रचंड पाऊस कोसळत असल्यामुळं आणखी एक माणूस तिथं आश्रयाला येतो. हे दोघं मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. ती घटना असते जंगलात झालेल्या एका खुनाची. त्या लाकूडतोड्यानं एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून जातो. नंतर त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा कोर्टासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी आणि सोबत चालत तिचा सैनिक (समुराई) पती जात असताना ‘ताजोमारू’ नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्याच वेळी किंचित वारा येतो आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील पडदा हलतो. तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्याचं दर्शन त्या दरोडेखोराला होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जे काही घडतं, त्याची तीन वेगवेगळी रूपं तिथल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरोडेखोराचं, त्या तरुणीचं आणि मृत सैनिकाचं... (मृत सैनिकाचं म्हणणं प्लँचेटद्वारे ऐकायला मिळतं.) हे तिघेही कोर्टासमोर आपला जबाब देत असतात. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वतःचं चौथं (आणि आधीच्या तीन कहाण्यांपेक्षा वेगळंच) म्हणणं सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडलं, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपण विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडं दिग्दर्शक याचं सकारात्मक उत्तर देतो. चित्रपट संपल्यानंतरही आपण त्या कथानकात आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाचं चिंतन करण्यात गुंग होऊन जातो, हे या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश!
मी हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्यावर असा, एवढा खोलवर परिणाम याआधी कुठल्या चित्रपटानं केला आहे, हे आठवू लागलो. ‘संत तुकाराम’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत आणि ‘पथेर पांचाली’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत अनेक चित्रपट डोळ्यांसमोरून गेले. जागतिक चित्रपट महोत्सवांत मी यापूर्वीही अनेक परकीय भाषांतले चित्रपट पाहिले होते. मात्र, एवढा खोल परिणाम अन्य कुठल्याही चित्रपटाचा माझ्यावर झालेला मला आठवत नाही. ‘राशोमान’नंतर मात्र माझी विचारांची दिशाच बदलून गेली. मानवी आयुष्याकडं, जगण्याकडं बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला या कलाकृतीनं दिला.
याबाबत अधिक विचार केल्यावर लक्षात येतं, की या विचारांचं मूळ त्या कलाकृतीतच दडलेलं आहे. कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक केली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. किंबहुना संपूर्ण चित्रपटात या पार्श्वसंगीतानं एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी 'राशोमान' गेटवर प्रचंड कोसळणारा पाऊस आणि तिथं बसलेली तीन माणसं हे दृश्य अंगावर काटा आणतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट वेधक आहे. सुरुवातीला भरून आलेलं आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळं झालेलं आकाश आणि स्वच्छ पडलेलं ऊन हे अगदीच प्रतीकात्मक आणि सहज लक्षात येण्यासारखं आहे.
या चित्रपटात तोशिरो मिफुने या प्रख्यात जपानी अभिनेत्यानं ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय तकाशी शिमुरा यांनी लाकूडतोड्याची, मिनोरू चिआकी यांनी तरुण धर्मगुरूची, तर माचिको क्यो हिनं तरुणीची भूमिका केली आहे. या सर्वांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना यापैकी कुणाही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हतं, म्हणे! त्यामुळे ते कुरोसावा यांच्याकडं चित्रपटाचा शेवट सांगण्यासाठी हट्ट करीत असत. चित्रपट तयार झाल्यानंतर कुरोसावा यांना एकच एक असं सत्य सांगायचंच नव्हतं; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का; की ती व्यक्तिपरत्वे बदलते, याच मुद्द्यावर लक्ष वेधायचं होतं, हे सर्वांच्या लक्षात आलं.
या चित्रपटाचं महत्त्व म्हणजे या चित्रपटामुळेच जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अॅकॅडमी ऑनररी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचं फार काही जोरदार स्वागत झालं नव्हतं. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचं समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्यानं तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आज तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला स्वत:ला हा चित्रपट याच कारणासाठी भावला, आवडला, पटला! हा चित्रपट पहिल्यांदा पाहणारा माणूस ‘सत्य’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात चित्रपट पाहण्यापूर्वी असलेल्या धारणा नक्कीच तपासून बघितल्याशिवाय राहणार नाही, याची मला अगदी खात्री वाटते. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं राष्ट्रीय वचन आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला नेहमी खरं बोलावं, खरं वागावं अशी शिकवण दिली जाते. पण हे खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे नक्की काय, याचा उलगडा काही होत नाही. आयुष्यात पुढं आपण मोठे झालो, टक्केटोणपे खाऊन शहाणे झालो, तरी या विचाराचा पिच्छा काही सुटत नाही. जसजसे आपण मोठे होत जातो, आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं तसतसं सत्य नावाच्या ‘साक्षात्कारा’ची वेगवेगळी ओळख पटू लागते. त्यातून संभ्रम वाढतच जातो. एकच घटना दोन वेगळ्या ठिकाणांहून बघणाऱ्या लोकांना वेगळी दिसते. त्यांना जे दिसतं, तेच त्यांच्यापुरतं सत्य असतं. असं असेल तर मग एकच एक, शाश्वत असं सत्य असतं तरी काय? आपली जडणघडण, आपल्या विचारांची बैठक, धारणांचा पाया नक्की कुठल्या गृहीतकांवर आधारित आहे? मग जर हा पायाच ठिसूळ असेल तर त्यावर आधारलेली सगळी नीतिमूल्यं झूठ ठरवायची का? की मुळात हे सगळे मनाचे खेळ आहेत? आपल्या कृत्यांचं समर्थन करण्यासाठी माणसाचा अत्यंत हुशार मेंदू तर या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत नाही ना? याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं हे सगळं ठरवलं कुणी? आदिम प्रेरणांपासूनचा हा प्रवास नक्की कुठल्या घटकांवर आधारलेला आहे? संस्कृती म्हणजे तरी नक्की काय? आदिम प्रेरणांचं नियमन करणाऱ्या या चौकटी मोडण्यासाठी तर मानवी मनाचे हे निरनिराळे खेळ सुरू नाहीत ना? आपण जे काही वागतो, बोलतो त्याला एक प्रामाणिकपणाचं, सत्याचं कथित अधिष्ठान दिलं, की मग माणूस मोकळा होतो. त्याला या कृत्यांविषयी लाज वाटत नाही, की पश्चात्ताप होत नाही. पण मग स्वत:च्या मनालाही फसवू शकेल अशी कुठली ‘सत्य’ नावाची बाब अस्तित्वात तरी असू शकते काय? एक ना दोन... अशा नाना प्रश्नांनी मन भोवंडून जातं. ‘राशोमान’मधली कथा आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन पाहून सतत हेच विचार मनात पिंगा घालायला लागतात.
मग लक्षात येतं, की दिग्दर्शकानं या सर्व कथेतून हाच मूलभूत विचार उपस्थित केला आहे. तो वाचून आपले सत्य या संकल्पनेविषयीचे सर्व पूर्वग्रह गळून पडतात आणि आपण तिचा नव्यानं विचार करायला लागतो. माझ्या मते, एखाद्या कलाकृतीचं हे यश फार मोठं मानायला हवं. कलाकृतीचा आस्वाद घेताना ती केवळ पंचेद्रियांना सुखावणारी न राहता, मेंदूपर्यंत घुसून तिथल्या विचार केंद्रांना चालना देत असेल, तर ती कलाकृती निखालस मोठी! ‘राशोमान’ ही अशीच कलाकृती आहे. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना त्यातले अर्थ नव्यानं उलगडत जातात. आपलं वय वाढतं, आपली विचारक्षमता वाढते, अनुभवविश्व वाढतं, तसं या कलाकृतीचा आवाकाही नव्यानं समजू लागतो. तब्बल ७० वर्षांपूर्वी तयार झालेला हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला अजूनही नवनवे विचार देत आहे, आपल्या धारणांना धक्का लावतो आहे. त्या अर्थानं आता ‘राशोमान’चा आयुष्यावर पडलेला कायमस्वरूपी प्रभाव हेही एक निखळ ‘सत्य’च आहे! 

----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२०)

---

4 comments:

  1. अप्रतिम रसग्रहण. पण हा चित्रपट कुठे पाहता येईल.छान लेखन.फार छान माहिती. धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद अनाम मित्रा/मैत्रिणी... हा सिनेमा बहुतेक कुठल्याही OTT platform वर नाहीय. यू-ट्यूबवर पाहावा लागेल आहे का ते!

      Delete
  2. राशोमान लवकरच पाहण्याची संधी मिळायला हवी अशी इच्छा तुमचा लेख वाचल्यावर झाली. यासाठी महत्वाचे कारण म्हणजे तुमचं स्वत:चं चिंतन. चिंतन खूप आवडलं.

    ReplyDelete