29 Jun 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १

वाचण्यापूर्वी
--------------

(नोंद - पाच वर्षांपूर्वी ‘साहित्य सूची’ या मासिकात संपादक योगेश नांदुरकर यांच्या सूचनेनुसार ‘फिरकीचा ठोंब्या’ नावाचं सदर मी लिहिलं होतं. राज्यातल्या, त्यातही पुण्यातल्या साहित्यविषयक घडामोडींची हलकीफुलकी दखल घेणं, टोप्या उडवणं, टपल्या मारणं असं त्याचं स्वरूप होतं. साधारण दीड वर्षं मी हे सदर चालवलं. मला लिहायला फारच मजा आली. वाचकांनाही तेव्हा हे सदर आवडलं होतं... तशा प्रतिक्रिया मला तेव्हा मिळत असत... या सदरासाठी रेश्मा बर्वे हिनं सुंदर व्यंगचित्रं काढली होती. तिनं ‘ठोंब्या’ फारच सुरेख साकारला होता. आता या सदरातले सर्व भाग मी ब्लॉगवर उपलब्ध करून देतोय... त्यातला हा पहिला भाग...)

----

१.

मसाप... साप... साप...
---------------------------

पुण्यनगरीच्या हृदयस्थानातून जाणाऱ्या टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू वसली आहे. त्या ऐतिहासिक वास्तूत जावयास आम्हास नेहमीच भय वाटते. अगदी 'भय इथले संपत नाही,' अशी अवस्था होऊन जाते. साहित्य आदी निरुपद्रवी गोष्टींत रमणाऱ्या लोकांपासून कसले हो भय, असे कुणी म्हणेल. पण मग त्या कुणाला या साहित्यवास्तूची खरी ओळखच नाही, असे म्हणावे लागेल. वास्तूमधल्या खजिन्याचे संरक्षण करावयास वास्तुपुरुष कसा नागाचे वा सापाचे रूप घेऊन डौलानं त्या खजिन्यावर बसलेला असतो, तसेच दृश्य येथे नजरेस पडेल, असे भय आम्हास वाटते. साहित्याच्या खजिन्याचे संरक्षण करावयास एक नव्हे, तर चांगले पंधरा-सतरा पदाधिकारी हातात साहित्यदंडुका घेऊन बसले आहेत, हे पाहून धडकी भरेल नाही तर काय!
वास्तविक स्वतःचा वेळ आणि पैसा घालवून दुसऱ्याच्या मालाचे (सॉरी, सॉरी... साहित्याचे) संरक्षण करणे हा घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याच्या धंद्याइतकाच पवित्र धंदा होय. असे काम करावयास माणसे मिळणे मुश्कील. पण पुण्यपत्तनस्थ मसाप खजिन्याचे संरक्षण करावयास लोक निवडणूक वगैरे लढवून पुढे येतात, हे पाहून आम्हाला अश्रू आवरेनासे झाले. क्वचित प्रसंगी माधवराव पटवर्धन सभागृहात भिंतीवर मुक्कामास असलेले थोर्थोर साहित्यिकही अशीच टिपे गाळत आहेत, हे दृश्यही जाता-येता दिसू लागले. एकदा आमचा अश्रुपात आवरल्यानंतर साहित्यसेवेसाठी आपणही उभे ठाकावे, ऐसे सहज मनात आले. एखादा विचार मनात आला, की तो लगेच अमलात आणायचा हे आमचे धोरण आहे. त्यानुसार, लगेच निवडणूक लढवावयास गेलो. आधी तेथील सफारी गुरुजींनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळले. आम्ही कुठल्याही अंगाने साहित्यिक, प्रकाशक सोडाच; पण चार बुके शिकलेलेदेखील वाटत नाही. चेहराच तसा आहे. आम्ही आमची मनीषा सांगितल्यावर तेथील गृहस्थ अकटोविकट हसले. इतर चार कारकून हसले. मसापच्या भिंतीही हसल्या. 'सभासद आहात काय,' असा प्रश्न मागून तीरासारखा आला. आता हे आम्हास ठाऊकच नव्हते. हे अज्ञान प्रकट करून झाल्यावर गृहस्थांशेजारच्या काकू म्हणाल्या, 'अरे बाळा, जा. पुढल्या वेळेस ये हो...' आता त्या त्यांच्या डब्यातून काढून सुंठवडी देतील, असे वाटले. त्यातला पूर्वार्ध खरा ठरला. पण उत्तरार्ध चुकला. त्यांनी सुंठवडी की आलेपाक काढला आणि स्वतःच खाल्ला. एकूणच इथं आपले खाद्य आपणच आणायचे असा प्रकार दिसतोय तर! हात हलवीत परतलो.
आम्हाला उभे राहता येणार नाही, म्हटल्यावरही आम्ही जिद्द न हरता, एका सभासद मित्राला गाठले. या मित्राच्या काकांचे पुस्तकाचे दुकान होते. काकांनी एकदा चुकून मित्राचीही पावती फाडल्यानं मित्र सदस्य झाला होता. तो सध्या डिजिटल फ्लेक्स बनवण्याच्या धंद्यात होता. त्याला अमाप बरकत होती. पण त्याला धंदा सोडून साहित्यसेवा करायची नव्हती. त्यामुळं तोही प्रश्न मिटला. पण पाहिजे तेव्हा फ्लेक्स बनवून देतो, एवढं आश्वासन या मित्रानं दिलं.
त्यानंतर आम्ही आणखी एका जाणकार मित्राकडं गेलो. हा पत्रकार होता. याची तिथं उठबस होती. त्याला विचारल्यावर तोंडातला गुटखा न थुंकता, त्यानं त्रासिक मुद्रेनं विचारलं, 'कोव्वं प्यायय'? त्याला खोबरं पाहिजे असेल असं वाटलं म्हणून धावलो, तो सन्मित्र पचकन बाजूला थुंकून विचारते जाहले - कोणते पॅनेल? हां... आत्ता कळलं त्याला काय म्हणायचंय ते. पण कार्पोरेशनच्या इलेक्शनप्रमाणं इकडंही प्यानेल वगैरे भानगड असते, हे आमच्या गावीही नव्हते. (एकूणच आमच्या गावी अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा एक भावपूर्ण निष्कर्ष इथं निघू शकतो.) असो. पण मग आता आपण कोणता झेंडा घ्यावा हाती, असा प्रश्न पडला. कालांतराने असे कळले, की आमचे आणखी एक मित्र या रिंगणात उतरले आहेत. हे गृहस्थ उत्साही होते. त्यांनी ते राहत होते, त्या गल्लीच्या तोंडावर भावी उमेदवार म्हणून फ्लेक्सही लावला होता. पण त्या वॉर्डातल्या सर्व इच्छुक पैलवानांनी तो रात्रीतच शहीद केला. पण आमच्या मित्राचा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उतरायचा कोणताही इरादा नाही, हे कळल्यावर त्यांनी पुन्हा तो उभा केला आणि मित्राला भरपूर शुभेच्छाही दिल्या.
हा मित्र फारच उत्साही निघाला. त्यानं मतदारांची यादी पैदा केली. गावात दोन-अडीच हजार मतदार आहेत, असं कळलं. मित्रानं काम-धंदा सोडला. रोज काही मतदारांना फोन करायचा, तर काहींना प्रत्यक्ष भेटायचं असा घाट त्यानं घातला. अनेक मतदारांचे फोन लागेनात, तेव्हा ते (फोन नव्हे; मतदार) स्वर्गवासी झाल्याचं कळायचं. एकदा लेखिका समजून त्यानं फोन लावला, तर तो आडते बाजारातील दलालाचा निघाला. दुसऱ्या एकाला प्रकाशक समजून फोन केला, तर त्यानं आजचा आकडा काय, असा प्रश्न विचारल्यावर याला आकडीच आली. असे सगळे चुकीचे फोन जाऊ लागल्यावर त्यानं ती मोहीम गुंडाळून ठेवली आणि प्रत्यक्ष मतदारांच्या घरीच धडक मारायची ठरवलं. एक तर पुणेकरांच्या घरी जायचं हे धाडस... त्यात हा नेमका दुपारी एक ते चार या वेळेत जायचा. अनेकांनी दारच उघडलं नाही. काहींनी दारावर दुपारी एक ते चार बेल वाजवू नये, वाजविल्यास तुमच्या कानाखाली घंटा वाजविण्यात येईल, असं स्पष्ट लिहिलं होतं. दुपारच्या वेळी झोप न येणाऱ्या काही लोकांनी दार उघडलं खरं, पण जाळीच्या दारातूनच मतदान वगैरे काही करणार नसल्याचं सांगून टाकलं. काही मूळ पुणेकर नव्हते, त्यामुळं त्यांनी दार उघडलं. पण आपण मतदार असल्याचं त्यांना माहितीच नव्हतं. तुम्हीच देऊन टाका ना आमचं मत, असं म्हणून आणि एक मारीचं बिस्कीट देऊन त्यांनी मित्राला बोळवलं. एका असहाय साहित्यिकांनी, 'आमच्या घरी चार मतं आहेत; मी एका मताचे अमुक तमुक हजार एवढे मानधन घेतो, तुम्ही किती देणार बोला,' असा रोकडा सवाल टाकून मित्रास फेफरं आणलं होतं.
असं करता करता मित्राला शेवटी डोक्यात काहीच राहिना. कोण मतदार, कोण उमेदवार काहीच लक्षात येईना. एकदा तर रात्री स्वतःच्या बायकोस झोपेत 'मलाच मत द्या बरं का, ताई,' असं म्हणाला आणि तिचा महिनाभराचा अबोला ओढवून घेतला. साहित्यसेवेचा दंडुका हाती धरण्यास कोण ही धावपळ सुरू होती. आमच्या मित्राप्रमाणेच गावातले तीस-चार लोक या कार्यी मग्न झाल्याचे कळले. करता करता निवडणुकीचा दिवस उजाडला. बारकोडवाल्या मतपत्रिका कार्यालयात येऊन पडल्या. निकालही जाहीर झाला. जुने गेले; नवे आले. ताई गेल्या; दादा आले! मॅडम गेल्या; सर आले!
आम्ही लगेच सरांना जाऊन भेटलो. सर स्वभावानं खूपच चांगले. अगदी गोड गोड! त्यांनी प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतला आणि त्यांनाच आम्ही मत दिल्याबद्दल आमचे मनभरून आभार मानले. आम्ही मतदारच नव्हतो, ही गोष्ट सर विसरले. पण सध्या ते प्रत्येकालाच मतदार समजून आलिंगन देत आहेत किंवा गालगुच्चा घेत आहेत, असे कळले. छान वाटले. आता कारभार गोडीगोडीनं, जोडीजोडीनं होणार याची खात्री पटली. 'मसाप साप' म्हणून भुई धोपटण्यात काही अर्थ नसतो, हे कळले... आम्ही शांतपणे पायऱ्या उतरून बाहेर पडलो आणि शेजारच्या मिसळीकडं वळलो...

---


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

2 comments:

  1. मस्त व खुसखुशीत ..खूप छान खाद्य पाठवलंय ..नक्कीच सगळे भाग वाचणार 👌👍😊

    ReplyDelete