29 Jun 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग २

आम्ही लेखक होतो...
-------------------------

आपण लेखक व्हावे, अशी खोकल्यासारखी तीव्र उबळ आमच्या मनात केव्हा आली, हे स्मरत नाही. आपणास आयुष्यातली पहिली जांभई केव्हा आली हे आठवणे जसे अशक्य तसेच हे होय. पण बहुदा मागल्या खेपेस साहित्याच्या हेडक्वार्टरी आमचा झालेला अवमान लक्षात घेता, त्याच प्रसंगी लेखक होण्याचा व्रजनिर्धार आमच्या मनी प्रकट झाला असण्याचा दाट संभव आहे. तर ते असो. लेखक व्हावयाचे तर काय काय करावे लागते, याची यादी आम्ही करू लागलो. अर्ध्या तासात फाडफाड इंग्लिश असले क्लासेस पूर्वी निघाले होते. आता ते आहेत की नाहीत, याची कल्पना नाही; पण झटपट लेखक होण्याचे क्लासेस काही कुठं दिसले नाहीत. त्यामुळं आता काय करावे, असा पेच पडला. वाचकांच्या पत्रव्यवहारात काही पत्रं पूर्वी पाठविली होती. पण केवळ त्यामुळं लेखक म्हणून सिद्ध होणं अवघड! फार तर पत्रलेखक म्हणविले जाऊ! पण लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बाबतीत 'खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख,' अशी आमची अवस्था होती. तेव्हा काय करावे, असे प्रश्नचिन्ह पुन्हा समोर ठाकले. लेखक व्हायचे तर काही तरी लिहिले पाहिजे, असे आमच्या अचानक लक्षात आले. तत्पूर्वी आम्ही वाणसामानाच्या यादीपलीकडं फार काही लिहिले नव्हते. शाळा-कॉलेजांत असताना प्रेमपत्रं आणि 'स्वच्छतागृह साहित्य' मात्र विपुल प्रसविले होते. आता त्याचा इथं उपयोग नव्हता. आता तसल्या ईई-साहित्याचा उपयोग नव्हता. पण 'ई-साहित्य' मात्र आम्ही नक्कीच जन्मास घालू शकत होतो. ई-साहित्य म्हणजे अर्थातच इंटरनेटवरचे साहित्य हा आमच्या डाव्या माऊसचा मळ होता. (बाकी आमचा माऊस बराच मळकट आहे, हे यावरून चाणाक्ष ई-रसिकांच्या लक्षात यायला हरकत नाही.) सर्वप्रथम आम्ही फेसबुकावर दीर्घ लेखवजा स्टेटस टाकावयास सुरुवात केली. बराच सखोल विचार करून, नामवंत साहित्यिकांच्या लेखनातले उतारे वगैरेही द्यायला सुरुवात केली. एकही शायर, कवी सोडला नाही. दुसऱ्यानं टाकलेला मजकूर त्वरित शेअर करण्यात आम्ही एवढे पटाईत झालो, की आम्ही स्वतःलाच 'शेअरशहा' ही पदवी बहाल करून टाकली. मात्र, एक सल कायम होती. एवढे फेबुतज्ज्ञ होऊनही हवे तसे लाइक मिळत नव्हते. मोठ्या प्रयत्नाने काही तरी वैचारिक लेख खरडावा आणि पाच तासांत अवघे सात लाइक मिळावे, या प्रकारामुळं आमच्यातल्या लेखकाची भ्रूणहत्या होतेय की काय, असे वाटू लागले. खूप विचार केला. आमच्या काही सख्या सकाळी शिंकल्या, तरी त्यांना त्यांच्या 'आक् छी' या स्टेटसला तासाभरात दोनदोनशे लाइक्स मिळत होते, हे आम्ही 'याचि देही याचि डोळा' पाहत होतो. वर पुन्हा 'टेक केअर डिअर', 'काय झालं शोना' इ. इ. प्रेमळ सल्लेही दिसत होते. फेसबुकावर अकाउंट खोलल्यापासून आम्हाला एकदाही कुणी 'टेक केअर'सुद्धा म्हटलं नव्हतं; डिअरबिअर तर लांबचीच गोष्ट राहिली. अशानं लेखक म्हणून आम्ही कसे प्रसिद्ध पावणार, हे कळेना. अचानक आरती प्रभू आठवले. आम्ही तातडीने 'भावना प्रधान' या नावाने फेबुवर एक डुप्लिकेट अकाउंट उघडले. 'तुझ्या माठाला गेलाय तडा' या फेमस अल्बममधल्या नायिकेचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवला. अन् काय आश्चर्य! धपाधप फ्रेंड रिक्वेस्टी येऊ लागल्या. 'काय हा उन्हाळा! उफ्फ...' असं म्हणून वस्त्रांविषयी अप्रीती दर्शविणारी आमची सचित्र पोस्ट तर तुफान हिट झाली. अवघ्या दीड तासात तिनं हजार लाइक्सचा टप्पा ओलांडला आणि दीडशे शेअर तर सहज झाले. आम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर भावना प्रधान (आणि भावनाप्रधान होऊनही) तरंगू लागलो. पण इथं एक नवाच उपद्रव सुरू झाला - इनबॉक्स नावाचा! पाच पाच सेकंदांनी इथं कुणी तरी पुरुष मित्र येऊन, सारखं 'हाय' 'हाय' करू आले आणि 'जेवण झाले का,' या निरुपद्रवी प्रश्नापासून सुरुवात करून पुढं, सांगता येणार नाही, अशा बऱ्याच नाजूक गोष्टींच्या चवकशा करू लागले. एकाने तर विविक्षित कामासाठी एका विविक्षित ठिकाणी येतेस का, असं विचारल्यावर मात्र आम्ही हाय खाल्ली. भावना प्रधानचा तिथंच अपमृत्यू झाला. तिच्या अकाउंटला मूठमाती देऊन आम्ही पुन्हा मूळ स्वरूपात प्रकटलो आणि पाच तासांत सात लाइक या जुन्या रेटनं स्टेटसू लागलो.
थोडक्यात, ई-साहित्याद्वारे सायबरविश्वात तरी नाव कमवावे, ही महत्त्वाकांक्षा आम्हाला अगदीच फॉरमॅट करावी लागली. 

आता काय करावं बरं, असा विचार पुन्हा मनात पिंगा घालू लागला. अचानक लक्षात आलं, थेट एखादा प्रकाशक गाठावा आणि डायरेक्ट पुस्तक काढायची मागणी घालावी. आम्ही इयत्ता नववीच्या कोवळ्या इ. वयात केलेल्या काही कविता आठवल्या. ती जुनी वही माळ्यावरून काढून झटकली. 'तू शिशिरातली कोवळी पानगळ आहेस, तू रिमझिम वर्षा आहेस, तू ग्रीष्मातला गुलमोहोर आहेस, तू शरदातील लख्ख पौर्णिमा आहेस...' इ. इ. रोम्यांटिक ऐवज असलेली ती कळकट वही काखोटीला मारून आम्ही प्रकाशकांचं हेडक्वार्टर असलेला तो सुविख्यात चौक गाठला. इथं रस्त्यावर पुस्तकं विकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनही आम्ही टरकलो, तर प्रकाशकसाहेबांसमोर आमचा काय पाड लागणार? पण याच पुण्यनगरीचं पाणी आमच्या रक्तात खेळत असल्यानं आम्ही मोठ्या धैर्यानं पुढं झालो. एका अरुंद बोळातून आत शिरल्यावर एका पेशवेकालीन इमारतीत पहिल्या मजल्यावर प्रकाशकांचं कार्यालय होतं. प्रकाशकाचं कार्यालय आणि प्रकाशकही पेशवेकालीनच (दुसरा बाजीराव कालखंड, टु बी स्पेसिफिक) होते. त्यांनी त्यांच्या पेशाच्या नियमानुसार आधी अर्धा तास आमच्याकडं पाहिलंच नाही. नंतर आमच्या हातातील कवितांची वही पाहून, आमच्याकडं अत्यंत करुण कटाक्ष टाकून ते म्हणाले, 'आम्ही कविता छापत नाही. दुसरं काही आणा. शांततेत जगण्याचे शंभर मंत्र, कम्प्युटरचे ७५ कानमंत्र, आयटीसाठी झटपट रेसिपी, शाळा प्रवेश कसा मिळवावा, अडीच दिवसांत युरोपदर्शन, मधुमेहातील तिसोत्तरी आहार, चाळिशीतले स्मार्ट कामजीवन, ऑनलाइन प्रेमाच्या ई-उप्स-टिप्स असले काही विषय असतील, तरच या. हल्ली हेच खपतं. कळतंय ना?'
आम्ही त्यांना विचारलं, 'पुस्तक कसं काढावं आणि खपवावं यावर एखादं पुस्तक नाही का?'
यावर ते कुत्सित हसत म्हणाले, 'आहे ना... पण खपलं नाही म्हणून रद्दीत घातलं.'
यावर आम्ही तडक जिना उतरून रस्त्यावर आलो. आमची वही रद्दीत जाऊ नये म्हणून बगलेत घट्ट धरली होती.
यानंतर स्वतः पैसे देऊन पुस्तक काढता येतं, अशी एक बहुमोल माहिती आमच्या एका मित्रानं दिली. त्याच्या एका कवयित्री मैत्रिणीचे असे डझनभर संग्रह निघाले होते म्हणे. म्हणजे अगदी 'ऋतुमती' ते 'ऋतुसमाप्ती'पर्यंत बाईंनी एकही विषय सोडला नव्हता. त्यांच्या कवितेचा ऋतू बारमाही टणटणीत फुललेलाच होता. तर त्यांच्या ओळखीच्या प्रकाशकाकडं गेलो. प्रकाशकानं सर्व व्यवहार नीट सांगितला. अगदी मंडईत करतात तशी घासाघीस करून शेवटी अस्मादिकांचा 'नव्हाळीच्या कविता' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. आमच्या सोसायटीजवळच्या पालिकेच्या हॉलमध्ये आमच्या भागातल्या नगरसेविकाताईंच्या हस्ते तो प्रकाशित झाला. (कारण तरच हॉल फुकट मिळणार होता...) वेफर्स आणि चहा ठेवावा लागला. एक एफडी मोडावी लागली. पण साहित्यिक म्हणून आता मिरवता येणार होतं... साहित्याच्या त्या हेडक्वार्टरी जाऊन आम्ही आता ताठ मानेनं आणि फुलून आलेल्या छातीनं सांगणार होतो - होय, आम्हीही लेखक आहोत...!

---


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जून २०१६)

---


No comments:

Post a Comment