29 Jun 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ३

सुळावरची पोळी
--------------------

लेखक होणे म्हणजे महाकठीण काम असते, हे एव्हाना आम्हास समजले होते. साहित्याच्या त्या हेडक्वार्टरी गेलेल्या कोणाही इसमास ते कळतेच म्हणा. त्यानंतर आमच्या 'नव्हाळीच्या कविता' छापवून आणताना आणि एकदाचे लेखक म्हणून धन्य होताना आम्ही कितीक कळा सोसल्या होत्या, ते आमचे आम्हालाच माहिती! लेखक व्हायचे म्हणजे खायचे (वा प्यायचे) काम नाही, हे आम्हास नीटच उमजले होते. पण लेखक होणे म्हणजे सुळावरची पोळी होणे हा अनुभव यायचा होता. आपणास मनात येईल ते आपण लिहिले, ज्याला ते आवडले त्याने ते छापले आणि ज्याला वाचायचे त्याने ते वाचले, कुणाला आवडले, तर कुणाला नाही आवडले एवढ्या सरळ रीतीनं हा प्रकार संपत नाही. एक तर आपल्या मनात येईल ते लिहिणं हेच मुळी अवघड. आमच्या मनात काय काय येतं, ते सगळंच सांगण्यासारखं नसतं. त्यामुळं ते लिहिणं शक्यच नाही. मग पुढचे प्रकार तर दूरच राहिले. लिहिताना हल्ली फार धोरणीपणा करून लिहावे लागते. यांना काय आवडेल, तिला काय पटेल, तो काय म्हणेल, त्यांचं कुठे दुखेल या सगळ्याचा विचार करून लिहावं लागतं. टीआरपीचा विचार करावा लागतो. मनात येईल ते ठोकून द्यायचं हा काळ केव्हाच सरला. आता उरला फक्त मार्केटचा काळ! पण आम्हास त्याबद्दल तक्रार नव्हती. किंबहुना आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य फारच जपलं जात होतं. थोडक्यात, आम्ही काय लिहितो ते कुणीच वाचत नव्हतं. त्यामुळं कुणी आक्षेप वगैरे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि बाजारात तर कुणाची ना कुणाची चर्चा झाल्याशिवाय माल खपतच नाही. मग आम्ही एक युक्ती केली. टीआरपी खेचण्यासाठी म्हणून असं काही तरी करणं भागच होतं. पण कुणा तरी मोठ्या माणसावर काही तरी टीका करायची आणि मग प्रसिद्धी मिळवायची हे धोरण काही आम्हाला मान्य नव्हतं. असं असलं, तरी एका कविमित्राच्या घरी सायंकाळचे 'ग्रंथवाचन' (तात्यासाहेबांना वंदन असो!) करावयास बसलो असता, मित्रानं एक 'क्लू' दिला. साहित्य संमेलनाचे चालू अध्यक्ष... अर्रर्र... क्रम चुकला... चालू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष याबाबतीत (म्हणजे टीआरपी मिळविण्याबाबतीत) खूप श्रेष्ठ दर्जा गाठून आहेत, असं त्यानं आम्हाला 'एकच प्याला' देताना सांगितलं. (सध्या आम्ही गडकऱ्यांच्या साहित्याचा अभ्यास करतो आहोत. उगाच नसत्या शंका नकोत.) मग आम्ही तडक सा. सं. अध्यक्षांच्या घरी गेलो. सकाळची वेळ असल्यानं आम्ही नुसतेच चर्चेला 'बसलो'. अध्यक्षांसोबत चर्चा म्हणजे त्यांनी बोलायचं आणि आपण ऐकायचं. या बदल्यात 'दोन कप चहा टाक गं' हे वाक्य कानी गेल्यामुळं आम्ही निश्चिंत होतो. एक कप चहावर आम्ही दीड तासाचं व्याख्यान ऐकू शकतो. त्यानंतर दुसरा कप लागतो. अध्यक्षांच्या घरी लालित्यपूर्ण चहा आणि चर्चा झाल्यावर एकच गोष्ट आमच्या लक्षात आली. प्रसिद्ध व्हायचे असेल तर मोठ्या माणसांवर दगड भिरकावल्याशिवाय तरणोपाय नाही. मग आम्ही संमेलनाध्यक्षांवरच टीका करताना एक फर्मास लेख लिहून काढला. 'शिशुपालाचे शंभर अपराध आणि आपण सारे कृष्ण' या दीर्घ शीर्षकाचा तो लेख छापायला कुणीच तयार होईना. अगदी अध्यक्षांच्या व्याख्यानाने पीडित लोकांनाही विचारून पाहिलं. पण नाही. अखेर आम्हाला फेसबुकचा आधार घ्यावा लागला. आमची पोस्ट वाचून गवताची काडीही हलली नाही, तिथं साहित्यविश्वात हलकल्लोळ वगैरे माजण्याची शक्यताच नव्हती. अखेर देव आमच्या मदतीला धावून आला. एक चळवळ्या प्रकाशक भेटला. त्याच्या खिशात लेखणी नसून, एक छोटीशी तलवारच ठेवली होती. जो मार्गात आडवा येईल, त्याला कापून काढायचं, असा त्याचा आवेश होता. मग आमचा हा लेख आम्ही त्याच्याच साप्ताहिकात छापायला दिला. तो वाचून काही लोकांचे फोन आले. काहींना छान वाटले, तर काहींना घाण वाटले. पण बस्स... एवढंच. आमचा टीआरपी काही पुढं सरकायला तयार नव्हता. अखेर कळलं, की संमेलनाध्यक्षांचाच टीआरपी घसरलाय. मग त्यांच्यावरील टीकेला तरी टीआरपी कसा मिळायचा? मग आम्ही आमच्याच काही मित्रांना या लेखावर टीका करायची विनंती केली. मित्रांनी भरपूर मोठी पार्टी उकळून अखेर आमचा बाजार उठवला. खराखुरा आणि फेसबुकवरसुद्धा! थोडी फार हालचाल झाली... पण ३८ लाइक, एक शेअर आणि चौदा कमेंट म्हणजे काहीच नव्हेत. कमेंटासुद्धा आमच्यावर टीका करणाऱ्या नसून, अभिनंदन वगैरे करणाऱ्या होत्या. आता मात्र हद्द झाली. काय करावं ते सुचेना. अखेर डोक्यात प्रकाश पडला.
आम्ही भराभर की-बोर्ड समोर ओढला आणि एक मुरलेला राजकारणी, एक नामवंत उद्योगपती, एक अतिमहान खेळाडू आणि एक लय भारी गायक या सगळ्यांवर ज्वलज्जहाल टीका करणारा लेख एकटाकी खरडून काढला. लेख एवढा तप्त-जहाल होता, की शेवटीशेवटी आमची बोटं भाजू लागली. लेख त्याच चळवळ्या प्रकाशकाकडं दिला. त्यालाही 'आ बैल मुझे मार' हाच छंद होता. त्यानं तो जपला आणि लेख छापला... आणि काय आश्चर्य! एका रात्रीत आम्ही फेमस की हो झालो... सगळीकडं 'कोण आहे हा?' अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्या एका कथित ईनोदवीराच्या मागोमाग ठोंब्यालाही अटक झालीच पाहिजे, या मागणीचा चक्क मोर्चा निघाला. (पण नंतर आम्ही जागे झाल्यावर कळलं, की ते स्वप्नच होतं. हाय हाय...) पण शनिवारवाड्यावर आमचं पोस्टर जाळून खळ्ळं खट्यॅक करण्याचा डाव काही राजकीय संघटनांनी रचला होता म्हणे. पण आमचा फोटोच न सापडल्यानं त्यांनी उगाचच एक कापडी बाहुला जाळून प्रतीकात्मक इ. निषेध केला. राजकारणी भाईंचे दत्तू आमचा पत्ता विचारू लागले. त्यातले काही घरी पण आले. पण आम्ही एव्हाना सा. सं. अध्यक्षांना आमच्या बाजूला केलं होतं. कारण ते मुरलेले राजकारणी अध्यक्षांना अजिबात विचारत नव्हते, त्यामुळं अध्यक्षमहोदयही त्यांच्यावर जरा खार खाऊनच होते. तर आमचा बचाव करण्यासाठी आम्ही साक्षात त्यांनाच आमच्या घरी बसवलं. आणि चमत्कार की हो जाहला... त्यांना घरात पाहताच लोक दारातूनच आल्या पावली माघारी फिरू लागले... एक-दोन जण धाडसानं चर्चा वगैरे करायला आत आले खरे; पण पुढच्या दीड तासांनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करायची वेळ आली. अध्यक्ष महाराजांएवढी आमची कुठली ऐपत! मग आम्हीही आमच्या परीनं खिंड लढवत होतो.
आणखी एक कल्पना सुचली. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते आहे, अशी आरोळी आम्ही ठोकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. शब्द ऐकल्यानंतर ज्यांचा आमचा कधी संबंध आला नाही, असे काही राजकीय पक्ष आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दारात उभे ठाकले. काही इंग्रजी वृत्तपत्रांनीही आमच्यावर आपला 'टाइम' खर्च केला. हळूहळू आम्ही केवळ आमच्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात चांगलेच फेमस होऊ लागलो. लेखक म्हणून आपला एक वट निर्माण झाला आहे, असा आत्मविश्वास मनात जागा झाला आणि आम्हास आमचे मूळ काम आठवले. लेखक म्हणून आमच्या लेखनाचे मानधन मिळणे हा आमचा हक्क आहे, वगैरे गोष्टी लक्षात येऊन वेळी-अवेळी बाहू फुरफुरू लागले. आम्ही तडक आमच्या 'नव्हाळी'च्या प्रकाशकांकडं गेलो. तर त्यानं आमच्याकडंच काही हजार रुपयांची बाकी असल्याचं सांगून अस्मादिकांस फेफरं आणलं. 'मान मिळतोय तो घ्या; धन लागतंय कशाला लेखकाला?' असंही वर ऐकवलं. लेखक म्हणून आम्ही कितीही मोठे झालो, तरी प्रकाशक नावाची ही जी काही महान संस्था आहे ना, ती नेहमीच आमचा रथ पुन्हा जमिनीवर आणते. झालं... त्यांच्या या वाक्यासरशी आमचा टीआरपी एकदम शून्यावरच आला... आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार...!

----


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जुलै २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

4 comments:

  1. "सुळावरची पोळी "एकदम खरपूस भाजलेली व खमंग लागली ..पोट मस्त भरलं👍👌😊

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद... कृपया आपले नाव लिहा...

      Delete