24 Aug 2026

रुपेरी मुकुटाचे मानकरी – रजनीकांत

झगमगता सुपरस्टार, साधा माणूस
-----------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

श्रोते हो, नमस्कार!
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, महान कलाकार होऊन गेले. अनेक कलाकारांची रुपेरी कारकीर्द थक्क करणारी, अविस्मरणीय अशी आहे. मात्र, फारच थोड्या कलावंतांना त्यांच्या हयातीतच ‘दंतकथा’ होण्याचं भाग्य लाभलं आहे. सुपरस्टार रजनीकांत हे असंच एक नाव. केवळ तमिळच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील मोजक्या महानायकांमध्ये त्यांच्या नावाचा सहज समावेश करता येईल. तमिळमध्ये ‘थलैवा’ (अर्थ नेता किंवा बॉस) या विशेषणाने ओळखले जाणारे रजनीकांत यांची रुपेरी कारकीर्दही त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेप्रमाणेच भव्यदिव्य, विस्मयचकित करणारी आहे. विशेष म्हणजे पडद्यावर अतिशय ग्लॅमरस, सुपरहिरो असणारे रजनीकांत प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साधे आहेत. कुठल्याही मेकअपविना ते साधेपणाने सर्वत्र वावरत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी आणखीनच आपुलकी वाटते.
रजनीकांत यांच्या चित्रपट प्रवासाची सफर विलक्षण आहे. एका सामान्य बस कंडक्टरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगातील एका अद्वितीय 'सुपरस्टार'च्या रूपाने लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. ज्यांच्या केवळ एका नजरेने, गॉगल फिरवण्याच्या एका शैलीने आणि पडद्यावरच्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो असा हा सुपरस्टार अभिनेता आहे.

श्रोतेहो, पडद्यावर दिसणारं ग्लॅमर, नयनरम्य रोषणाई आणि लाखो चाहत्यांचं प्रेम यांच्या मागं अनेकदा एका अत्यंत खडतर संघर्षाची कहाणी लपलेली असते. रजनीकांत यांचा प्रवासही असाच संघर्षाने आणि जिद्दीने भरलेला आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय मराठी भाषक कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. होय, रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड! आईचं नाव जिजाबाई आणि वडील रामोजीराव. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. शिवाजी अवघा पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईचं छत्र हरपलं.
वयाच्या अतिशय कोवळ्या टप्प्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, घरातल्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लहानग्या शिवाजीनं अनेक प्रकारची कामं केली. हमालीकाम करण्यापासून ते सुतारकामापर्यंत अनेक छोटी-मोठी कामं त्यानं केली. मोठा झाल्यावर शिवाजीरावांना बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली.
बंगळुरूत १०४ नंबरच्या बसमध्ये तिकीट फाडणारा हा तरुण कंडक्टर... पण तो केवळ तिकीट फाडत नव्हता! तिकीट देण्याची त्याची वेगळीच शैली, सुट्टे पैसे देण्याची ढब आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचं कसब यामुळे त्या बसमधील प्रवासी शिवाजीरावांच्या प्रेमात पडायचे. मित्रांनो, अंगात अभिनयाची आणि कलेची ठिणगी अशी आधीपासूनच पेटलेली होती. बस कंडक्टर म्हणून काम करतानाच ते कन्नड नाटकांमध्ये अभिनय करू लागले. 'दुर्योधन'सारख्या पौराणिक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.
अंगातील कलागुणांना अधिक धार यावी म्हणून शिवाजीरावांनी तत्कालीन मद्रास शहरात जाऊन मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरची नोकरी सोडून अनोळखी शहरात, अनोळखी भाषेत नशीब आजमावणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांचा मित्र राजबहादूर याने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली.
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असतानाच, तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक के. बालचंदर यांची नजर या मराठी तरुणावर पडली. शिवाजीराव यांच्या डोळ्यांतील ती विशिष्ट चमक, शरीराची चपळाई आणि संवादफेकीची वेगळी शैली बालचंदर यांनी टिपली. बालचंदर यांनी या तरुणाला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला आणि १९७५ मध्ये आलेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून त्यांना पहिली संधी दिली. याच चित्रपटादरम्यान के. बालचंदर यांनी 'शिवाजीराव गायकवाड' हे नाव बदलून त्यांना एक नवं नाव दिलं - रजनीकांत! 'अपूर्व रागांगल' चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती. चित्रपटाच्या शेवटी एका दरवाजाची कडी उघडून आत येणारा तो तरुण... प्रेक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती, की दरवाजाची कडी उघडून आत आलेला हा नवा चेहरा पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीचे सर्व दरवाजे स्वतःच्या हिमतीवर उघडणार आहे!
श्रोतेहो, सुरुवातीच्या काळात रजनीकांत यांना मुख्य नायकापेक्षा खलनायकाच्या आणि ग्रे-शेड्स असलेल्या भूमिका मिळाल्या. 'मुन्द्रू मुदिचू', '१६, वायाथिनिले', 'अवरगल' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी साकारलेला नकारात्मक चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. सिगारेट हवेत उडवून ओठांत धरण्याची त्यांची खास स्टाइल, चष्मा फिरवून डोळ्यांवर चढवणं आणि त्यांची जलद हालचाल प्रेक्षकांना प्रचंड भावू लागली.
पण के. बालचंदर आणि इतर दिग्दर्शकांच्या लवकरच लक्षात आलं, की हा अभिनेता केवळ खलनायक राहण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रेक्षक त्यांच्या स्टाइलवर आणि पडद्यावरील वावरावर फिदा होत होते.
'भैरवी' हा १९७८ मध्ये आलेला चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसले. आणि याच चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान 'भैरवी'चे वितरक कलाईपुली एस. थानू यांनी मद्रासच्या रस्त्यांवर रजनीकांत यांचे ३५ फुटी कटआउट लावून त्यांना पदवी दिली - 'सुपरस्टार'!
तिथून पुढे 'मुथू', 'बाशा', 'अन्नामलाई', 'यजमान', 'पदयाप्पा' अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. 'बाशा' या चित्रपटाने तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत इतिहास घडवला. एका साध्या रिक्षाचालकापासून ते अंडरवर्ल्डच्या डॉनपर्यंतचा रजनीकांत यांचा तो अभिनय प्रेक्षकांच्या कायमचा स्मरणात राहिला.

तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांवर हुकूमत गाजवल्यानंतर रजनीकांत यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. १९८३ मध्ये आलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अमिताभ बच्चन, हेमामालिनी यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीतही रजनीकांत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली.
त्यानंतर 'गिरफ्तार', 'हम', 'चालबाज', 'इन्स्पेक्टर धनुष', 'फूल बने अंगारे' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी चांगलं यश मिळवलं. 'हम' चित्रपटातील अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांची जुगलबंदी आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते.
पण रजनीकांत केवळ ॲक्शन आणि स्टाइलपुरते मर्यादित नव्हते. त्यपलीकडे जाऊन रजनीकांत साकारलेल्या त्यांच्या काही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. 'मुथू'मधील त्यांचा सहजाभिनय, 'तलपती'मधील मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली दाखवलेला भावूक आणि सशक्त अभिनय किंवा 'चंद्रमुखी'मधील सायकॉलॉजिकल थ्रिलर ड्रामा... रजनीकांत यांनी सिद्ध केलं, की ते केवळ एक स्टाइल आयकॉन नाहीत, तर एक परिपक्व आणि ताकदीचे अभिनेते आहेत. 'तलपती' या १९९१ मध्ये आलेल्या चित्रपटात रजनीकांत यांनी ‘सूर्या’ हे पात्र साकारले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटात महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीचा आधुनिक पट मांडला होता. रजनीकांत यांनी साकारलेला अनाथ आणि स्वाभिमानी 'सूर्या' प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. मामुट्टींसोबतची त्यांची जुगलबंदी अद्भुत होती.
'बाशा' या १९९५ मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी माणिक्यम या पात्राची भूमिका केली. एका साध्या, शांत रिक्षाचालकाचे जेव्हा भूतकाळातील भयानक डॉन 'माणिक बाशा'मध्ये रूपांतर होते, तो क्षण पडद्यावर पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. कमर्शियल सिनेमाचा तो एक मानदंड मानला जातो.
रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'मुथू' हा चित्रपट जेव्हा जपानमध्ये 'मुथू: ओदोरू महाराजा' या नावाने प्रदर्शित झाला, तेव्हा जपानी प्रेक्षकांनी रजनीकांत यांना डोक्यावर घेतले! जपानमध्ये रजनीकांत यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. एका भारतीय अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः आशियाई देशांत एवढी लोकप्रियता मिळणे ही एक दुर्मीळ गोष्ट होती.
'चंद्रमुखी' या २००५ मधील चित्रपटातील डॉ. सर्वणन आणि वेत्तय्यान राजा या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञासोबतच क्रूर राजा 'वेत्तय्यान' अशी दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची अफाट ताकद दाखवून दिली.
काळासोबत रजनीकांत यांनी स्वतःला बदलले. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करत त्यांनी 'शिवाजी : द बॉस', 'रोबोट' (एंधिरन), 'कबाली', 'कााला' आणि 'जेलर' यांसारखे चित्रपट दिले.
एस. शंकर दिग्दर्शित 'रोबोट' चित्रपटात त्यांनी 'डॉ. वशीकरण' हा शास्त्रज्ञ आणि 'चिट्टी ' हा रोबोट अशा दोन्ही भूमिका ज्या ताकदीने साकारल्या, त्याने भारतीय व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटांना एक नवी दिशा दिली. ‘रोबोट’ चित्रपट तुफान गाजला. पुढं त्याचा सीक्वेलही आला. मात्र, पहिला भाग अतिशय  उत्कृष्ट जमून आलेला होता. ऐश्वर्या राय या चित्रपटात त्यांची नायिका होती. वयाच्या सत्तरीतही जेव्हा रजनीकांत पडद्यावर चालत येतात, तेव्हा ‘कबाली' किंवा 'जेलर'मधील त्यांची एंट्री पाहून चित्रपटगृहाचे छत हादरून जाते! म्हणूनच त्यांना श्रद्धेने आणि प्रेमाने नाव मिळाले - 'थलैवा', म्हणजेच 'नेता' किंवा 'नायक'!
चित्रपटातील अलौकिक यश, अफाट संपत्ती आणि जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम मिळूनही रजनीकांत नावाचा हा माणूस जमिनीवरच राहिला. पडद्यावर अतिशय भपकेबाज, रंगीबेरंगी आणि स्टायलिश दिसणारे रजनीकांत वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे, धोती-कुर्ता परिधान करणारे, पांढऱ्या दाढी-केसांसह आणि कोणत्याही मेकअपशिवाय लोकांसमोर येणारे अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व आहे.
असं म्हटलं जातं, की जगात दोनच प्रकारचे अभिनेते असतात - एक ज्यांना चित्रपट प्रसिद्ध करतो, आणि दुसरे म्हणजे रजनीकांत, जे स्वतः एका संपूर्ण चित्रपटापेक्षा मोठे असतात! रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे किस्से आणि दंतकथा इतक्या अद्भुत आहेत, की जगातील कोणत्याही अभिनेत्याच्या वाट्याला अशी लोकमान्यता आलेली नाही. इंटरनेटच्या जगात 'रजनीकांत यांचे विनोद' किंवा 'रजनीकांत फॅक्ट्स' हा एक स्वतंत्र प्रकारच झाला. ‘रजनीकांत यांना घड्याळाची गरज नसते, वेळ ठरवते की रजनीकांत कधी काय करतील!’ किंवा ‘सूर्य उगवत नाही, रजनीकांत डोळे उघडतात!’ अशा हलक्या-फुलक्या चटकदार विनोदांमधून प्रेक्षकांनी त्यांच्या अचाट क्षमतेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
पण या केवळ दंतकथा नव्हत्या! जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो, तेव्हा दक्षिण भारतात अक्षरशः सण साजरा केला जातो. भल्या पहाटे तीन किंवा चार वाजताचे शो हाऊसफुल्ल होतात, त्यांच्या ५०-५० फुटी कटआउट्सना दुधाचा अभिषेक घातला जातो आणि रस्तेच्या रस्ते फटाक्यांच्या आवाजाने दणाणून जातात. अनेक कंपन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना अधिकृत सुट्टी जाहीर करतात! ही नुसती लोकप्रियता नसून, हे प्रेक्षकांनी रजनीकांत यांचं एक प्रकारे केलेलं 'दैवतीकरण’च आहे.
श्रोते हो, रजनीकांत आणि महाराष्ट्र यांच्या नात्याविषयी सांगायलाच हवं. संपूर्ण जगानं जरी त्यांना 'तमिळ सिनेसृष्टीचे सुपरस्टार' म्हणून डोक्यावर घेतलं असलं, तरी रजनीकांत यांचा मूळ पाया आणि संस्कार मराठी मातीतलेच आहेत! छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ज्यांचं नाव 'शिवाजीराव' ठेवलं गेलं, तो हा मराठी मुलगा. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. ते जरी जन्माने बंगळुरूचे असले आणि त्यांची कर्मभूमी चेन्नई असली, तरी आजही रजनीकांत आपल्या कुटुंबात अतिशय स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतात. कोल्हापूर, पुणे आणि मुंबईशी त्यांचा जुना स्नेह आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील आठवणींना उजाळा दिला आहे. एका मूळ मराठी माणसाने दाक्षिणात्य तमिळ सिनेसृष्टीवर गेल्या ५० वर्षांपासून अखंड एकछत्री साम्राज्य गाजवावं, ही प्रत्येक मराठी मनासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
तमिळनाडूतील राजकारणात अभिनेत्यांनी राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्रिपद मिळविण्याची परंपरा आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता ते आताचे सी. जोसेफ विजय यांच्यापर्यंत ही परंपरा सुरूच आहे. रजनीकांत यांची अफाट लोकप्रियता पाहता, तेही या वाटेने जातील, असं वाटत होतं. मात्र, रजनीकांत यांना राजकारणाची वाट जमली नाही. त्यांनी नंतर त्यापासून दूर राहणंच पसंत केलं. अर्थात त्यांच्या लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झालेला नाही.
त्यांच्या या प्रदीर्घ, यशस्वी आणि समर्पित चित्रपट प्रवासाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना २००० मध्ये 'पद्मभूषण' आणि २०१६ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानानं सन्मानित केलं.  २०१९ मध्ये ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण सिनेसृष्टीने आणि देशाने उभे राहून या महानायकाला सलाम केला. पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी अत्यंत नम्रपणे आपले हे यश आपले जुने मित्र राजबहादूर, आपले गुरू के. बालचंदर आणि आपले बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांना समर्पित केलं. एका कंडक्टरपासून सुरू झालेला हा प्रवास फाळके पुरस्काराच्या सुवर्णकमळापर्यंत पोहोचला, हा भारतीय चित्रपट इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी अध्याय आहे.
श्रोतेहो, तमिळ चाहत्यांसाठी तर रजनीकांत हे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे, एक फिनिक्स पक्ष्यासारखी घेतलेली झेप आहे. 'काहीही अशक्य नाही' हे आपल्या कर्तृत्वाने दाखवून देणारा हा 'रुपेरी मुकुटाचा मानकरी' आजच्या नव्या पिढीसाठीही एक मोठा आदर्श आहे.
अशा या महान कलावंताच्या अभिनय प्रवासाला आणि कलासाधनेला मानाचा मुजरा!

---
हा भाग यूट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment