31 Aug 2026

रुपेरी मुकुटाचे मानकरी – मनोजकुमार

देशभक्त ‘भारतकुमार’
----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


श्रोते हो, नमस्कार.

'पुणे आकाशवाणी'च्या 'रुपेरी मुकुटाचे मानकरी' या विशेष मालिकेमध्ये सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास हा केवळ मनोरंजनाचा इतिहास नाही, तर तो या देशाच्या बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासाचा आरसा आहे. या रुपेरी पडद्याला आपल्या राष्ट्रभक्तीने, सशक्त कथाभागाने आणि अनोख्या दिग्दर्शन शैलीने सजवणारे अनेक मानकरी लाभले. आज आपण अशाच एका ज्येष्ठ कलाकाराच्या प्रवासाला उजाळा देणार आहोत. सर्व जग त्यांना 'भारतकुमार' या नावाने ओळखतं. होय, २०१५ च्या 'दादासाहेब फाळके' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्याविषयीच आपण बोलत आहोत.

श्रोतेहो, २४ जुलै १९३७ रोजी तत्कालीन ब्रिटिश इंडियातील अबोटाबाद (आताचे पाकिस्तान) येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात मनोजकुमार यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. लहानपणापासूनच शांत, पण डोळ्यात काही तरी वेगळं करून दाखवण्याची चमक असलेला हा मुलगा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली आणि लाखो कुटुंबांप्रमाणेच गोस्वामी कुटुंबालाही आपलं घरदार सोडून निर्वासित व्हावं लागलं. अवघ्या दहा वर्षांच्या हरिकृष्णने तो रक्तरंजित इतिहास, तो संघर्ष आणि आपल्या माणसांची झालेली परवड अतिशय जवळून पाहिली. दिल्लीच्या किंग्जवे कॅम्पमधील शरणार्थी छावणीत त्यांचं कुटुंब दिवस काढत होतं. बालपणीच्या या अनुभवांनी मनोजकुमार यांच्या संवेदनशील मनावर कधीही न पुसले जाणारे संस्कार केले. त्याचे पडसाद पुढे त्यांच्या सिनेमांमधून देशप्रेमाच्या रूपाने उमटले.
दिल्लीच्या 'हिंदू कॉलेज'मधून पदवी घेत असतानाच, हरिकृष्ण यांच्या मनावर रुपेरी पडद्याची जादू मोहिनी घालत होती. त्या काळात अभिनेते दिलीपकुमार यांचा प्रचंड दबदबा होता. १९४९मध्ये आलेल्या 'शबनम' या चित्रपटात दिलीपकुमार यांनी एका पात्राची भूमिका केली होती, ज्याचे नाव होते 'मनोज'.  तो सिनेमा आणि दिलीपकुमार यांचा अभिनय पाहून १२ वर्षांचा हरिकृष्ण इतका प्रभावित झाला, की  त्यानं मनोमन ठरवून टाकलं, 'मी जर कधी नट झालो, तर माझं नाव मनोजकुमार असेल!' एका सामान्य तरुणाने आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पात्रावरून स्वतःचं नाव बदलणं, हा केवळ एक बालहट्ट नव्हता, तर तो चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक दृढ निश्चय होता.

हाच ध्येयवेडा तरुण खिशात काही रुपये आणि डोळ्यात अथांग स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झाला. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. स्टुडिओचे चकरा मारणे, नकारांचा सामना करणे हा संघर्ष सुरूच होता. अखेर १९५७ मध्ये 'फॅशन' या चित्रपटात त्यांना एक अतिशय छोटी भूमिका मिळाली; पण खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा लोकांच्या नजरेत आला तो १९६० च्या 'कांच की गुडिया' या चित्रपटातून. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मनोजकुमार यांनी रुपेरी पडद्यावर अधिकृतपणे पाऊल ठेवलं. या सिनेमात सइदा खान नामक नटीसमोर नायकाची भूमिका करण्याची संधी मनोजकुमार यांना लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, तेही कळलं नाही. मात्र, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मनोजकुमार यांनी सिनेसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. 'कांच की गुडिया'नंतर 'पिया मिलन की आस' आणि 'रेशमी रुमाल' हे चित्रपट आले. मात्र, त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो  १९६२ मध्ये आलेल्या 'हरियाली और रास्ता' या चित्रपटाने. विजय भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात मनोजकुमार आणि माला सिन्हा यांची जोडी रसिकांना प्रचंड आवडली. 'इब्तदा-ए-इश्क में हम सारी रात जागे' किंवा 'लाखो तारे आसमां में' ही गाणी आजही जुन्या पिढीच्या ओठांवर रेंगाळतात. या चित्रपटामुळे मनोजकुमार यांच्याकडे एक 'स्टार रोमँटिक हिरो' म्हणून पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या सोज्वळ आणि देखण्या रूपामुळे एक रोमँटिक हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होतीच. पण 'मनोजकुमार' नावाच्या या हिऱ्याला अजून निराळेच पैलू पडायचे होते...
मुळात ते केवळ रोमँटिक भूमिकांमध्ये अडकून राहणारे नट नव्हते. १९६४ मध्ये राज खोसला यांनी त्यांना 'वह कौन थी' या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका दिली. साधना यांच्या गूढ व्यक्तिमत्त्वाला जोड देणारा डॉक्टर आनंद त्यांनी पडद्यावर अप्रतिम जिवंत केला. मदनमोहन यांचं संगीत आणि मनोजकुमार यांचा संयत अभिनय यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. यानंतर १९६५ मध्ये आलेला 'गुमनाम' हाही असाच एक मैलाचा दगड ठरलेला सस्पेन्स सिनेमा. 'हिमालय की गोद में' या चित्रपटातून त्यांनी एका शहरातून आलेल्या डॉक्टरची, ग्रामीण भागातील संघर्षाची कथा मांडली. यातही माला सिन्हा त्यांची नायिका होती. आशा पारेख नायिका असलेला ‘दो बदन’ हा १९६६ मधला चित्रपटही लोकप्रिय ठरला. एकामागून एक येणारे हे हिट चित्रपट मनोजकुमार यांना यशाच्या शिखरावर घेऊन जात होते. पण याच काळात, त्यांच्यातल्या एका खऱ्या देशप्रेमी कलाकाराचा उदय होणार होता...
१९६५ हे वर्ष मनोजकुमार यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला एक संपूर्ण नवीन वळण देणारं ठरलं. देशाभिमानी मनोजकुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित 'शहीद' या चित्रपटाची कथा लिहिली. केवल कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी स्वतः भगतसिंग यांची मध्यवर्ती भूमिका साकारली. लहानपणी फाळणीच्या वेदना सोसलेल्या मनोजकुमार यांनी या भूमिकेत आपले सर्वस्व ओतलं. त्यांची ती करारी नजर, भगतसिंगांची ती देशप्रेमाची ऊर्मी त्यांनी पडद्यावर अशी काही साकारली, की प्रेक्षक चित्रपटगृहात गहिवरले. पं. रामप्रसाद बिस्मिल यांच्या रचना आणि प्रेम धवन यांचं संगीत असलेल्या या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. या चित्रपटानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री इतके प्रभावित झाले, की त्यांनी मनोजकुमार यांना एक खास आवाहन केलं... आणि तिथूनच भारतीय चित्रपटसृष्टीला लाभला एक नवा 'भारत'!
श्रोते हो, 'शहीद' चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. लालबहादूर शास्त्री यांनी हा चित्रपट पाहिला आणि भारावून गेलेले शास्त्रीजी थेट मनोजकुमार यांच्याजवळ आले. त्यांनी मनोजकुमार यांचे कौतुक तर केलेच; पण सोबतच एक विचार मांडला. ते म्हणाले, 'मनोज, मी नुकताच 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आहे. या घोषणेवर, आपल्या देशातल्या शेतकरी आणि जवानांवर आधारित एखादा चित्रपट तू बनवू शकलास तर देशहितासाठी ते मोठे योगदान ठरेल.' देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या मनोजकुमार यांच्यासाठी हा केवळ एक सल्ला नव्हता, तर पंतप्रधानांनी दिलेला जणू एक आदेश होता.
दिल्लीहून मुंबईला परतणाऱ्या २४ तासांच्या रेल्वे प्रवासात मनोजकुमार झोपले नाहीत. त्यांच्या डोक्यात शास्त्रीजींचा तो नारा घुमत होता. मुंबईत उतरेपर्यंत त्यांच्या मनात एका नव्या चित्रपटाची संपूर्ण कथा तयार झाली होती, तो चित्रपट म्हणजेच 'उपकार'! या चित्रपटाच्या निमित्ताने मनोजकुमार यांनी केवळ कथा-पटकथा लिहिली नाही, तर पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उपकार' या चित्रपटानं इतिहास रचला. यात मनोजकुमार यांनी 'भारत' नावाच्या एका सुपुत्राची भूमिका साकारली. तो आपल्या भावाच्या शिक्षणासाठी शेतात घाम गाळतो आणि वेळ पडल्यास देशाच्या रक्षणासाठी सीमेवर बंदूकही हाती धरतो. हा सिनेमा इतका गाजला, की इथून पुढे मनोजकुमार यांचं नावच 'भारतकुमार' पडलं!
दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांची दृष्टी खूप मोठी होती. 'उपकार'च्या अफाट यशानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना करणारा 'पूरब और पश्चिम' (१९७०) हा चित्रपट आणला. परदेशात जाऊन आपली संस्कृती विसरणाऱ्या तरुण पिढीला 'भारत'ने पुन्हा एकदा आपल्या मातीची थोरवी पटवून दिली. यातलं ‘है प्रीत जहाँ की रीत सदा’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी यांचं संगीत होतं. यानंतर १९७४ मध्ये आलेला 'रोटी कपडा और मकान' हा चित्रपट त्या काळातील वाढती बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक दुरवस्थेवर अचूक बोट ठेवणारा ठरला. या सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठी मनोजकुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि झीनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यानंतर मनोजकुमार यांची हेमामालिनीबरोबर जोडी जमली. या दोघांचे संन्यासी (१९७५) आणि दस नंबरी (१९७६) हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ त्यांच्या कारकि‍र्दीत थोडा खंड पडला. अखेर १९८१ मध्ये मनोजकुमार यांना त्यांचे आदर्श अभिनेते दिलीपकुमार यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली ती ‘क्रांती’द्वारे. एका अर्थानं त्यांचं स्वप्नच पूर्ण झालं होतं. हाच सिनेमा त्याच्या कारकि‍र्दीतला खऱ्या अर्थाने अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कथा सांगणारा हा त्यांचा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमामालिनी होती. उत्कृष्ट गाणी, तगडी स्टारकास्ट आणि समाजप्रबोधन ही मनोजकुमार यांच्या दिग्दर्शनाची त्रिसूत्री झाली होती. दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांनी नेहमीच भव्यता आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा सुवर्णमध्य साधला.
या देशभक्तिपर चित्रपटांव्यतिरिक्त मनोजकुमार यांचे इतरही काही चित्रपट चांगले चालले. १९७२ मध्ये आलेल्या ‘बेइमान’साठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या वर्षी त्यांचा अभिनेत्री नंदासोबतचा ‘शोर’ आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला, तरी कालांतरानं या सिनेमावर समीक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली. ‘इक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायिलेलं प्रसिद्ध युगुलगीत (संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) याच चित्रपटातलं.

केवळ हेच नव्हे तर मनोजकुमार यांच्या बहुतांश चित्रपटांतील गाणी चांगलीच गाजली. याचं कारण मनोजकुमार यांना संगीताची उत्तम जाण होती. ते उत्तम कानसेन होते! त्यांच्या सिनेमांमधली गाणी केवळ ऐकण्यासारखी नसून ती पडद्यावर पाहणे हासुद्धा एक डोळ्यांचा उत्सव असायचा. कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या दिग्गज संगीतकारांशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं. 'दिवानी मस्तानी' गाणी असोत, देशभक्तिपर गीते असोत की विरहाची गाणी; मनोजकुमार यांच्या सिनेमातले संगीत काळाच्या पलीकडं जाणारं ठरलं. मुकेश, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाचा त्यांनी आपल्या पात्रांसाठी अप्रतिम वापर करून घेतला. उपकार सिनेमातलं गाजलेलं ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे-मोती’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गाणं (संगीत कल्याणजी-आनंदजी) आजही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला वाजवलं जातं. ‘क्रांती’मधलं ‘ज़िंदगी की ना टुटे लड़ी’ हे नितीन मुकेश आणि लतादीदींच्या आवाजातलं गाणंही असंच प्रचंड लोकप्रिय ठरलं.
‘क्रांती’नंतर मात्र मनोजकुमार यांची कारकीर्द उतरणीला लागली. त्यांनी १९८९ मध्ये 'क्लर्क' नावाचा एक सामान्य सिनेमा काढला होता. महंमद अली आणि झेबा बख्तियार या पाकिस्तानी नट-नट्यांना त्यानं या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं, हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य. ‘मैदान-ए-जंग’ (१९९५) या सिनेमानंतर मनोजकुमार यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी ‘जयहिंद’ नामक सिनेमा १९९९ मध्ये काढला. मात्र, तोही साफ अपयशी ठरला. त्या वर्षी एक गोष्ट मात्र चांगली झाली. ‘फिल्मफेअर’नं मनोजकुमार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं.
मनोजकुमार यांना आणखी एक ओळख मिळवून दिली ती ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाने. साईभक्त असलेल्या मनोजकुमार यांनीच हा सिनेमा लिहिला होता आणि त्यात कामही केलं होतं. शिर्डीकरांनीही तेथील एक रस्त्याला मनोजकुमारचे नाव देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीय.
केवळ संगीतच नाही, तर अभिनेता म्हणून त्यांची एक अतिशय वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. संवाद फेकत असताना किंवा विचारात गढलेले असताना चेहऱ्यावर, डोळ्यांवर हात ठेवण्याची त्यांची एक अजब लकब होती. त्याची खूप नक्कलही झाली. २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खाननं मनोजकुमार यांची तशीच नक्कल करणारं एक पात्र दाखवलं होतं. त्यानंतर संतापून मनोजकुमार यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं. मात्र, नंतर त्यात कोर्टाबाहेर तडजोड झाली आणि ते प्रकरण मिटलं.
भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीचा एक नवा रंग देणाऱ्या, सिनेमाच्या माध्यमातून समाज जोडणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा सन्मान करणं म्हणजे एका युगाचा सन्मान करण्यासारखं होतं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या याच अफाट आणि अजरामर योगदानासाठी भारत सरकारनं २०१५मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित केलं. जेव्हा ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले, तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून या 'भारतपुत्रा'ला मानवंदना दिली. हा सन्मान म्हणजे त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासाला मिळालेला एक सुवर्णमुकुट होता.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं तेव्हा ७९ वर्षं वय असलेला हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला. तोवर ते चित्रपटसृष्टीच्या विस्मरणात गेले होते. त्यांच्या असलेल्या वा नसलेल्या अभिनयगुणांविषयी, ठोकळेबाज अभिनयशैलीविषयी, त्यांच्या देशप्रेमी सिनेमांच्या बाळबोधपणाविषयी चर्चा होत राहील; मतभिन्नताही असेल... पण मनोजकुमार यांचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही, या बाबी एक माणूस म्हणून त्याचं मोठेपण सांगणाऱ्या आहेत, हे सर्वच जण मान्य करतील.
चार एप्रिल २०२५ रोजी मनोजकुमार यांचं मुंबईत निधन झालं. ते देहानं आपल्यातून निघून गेले असले, तरी आपल्या अभिनयातून आणि चित्रपटांतून त्यांनी रुपेरी पडद्यावर कोरलेलं 'भारत' हे नाव आणि दिलेला राष्ट्रप्रेमाचा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम जिवंत राहील. अशा या थोर देशभक्त कलाकाराला, दिग्दर्शकाला आणि रुपेरी पडद्याच्या खऱ्या मानकर्‍याला 'पुणे आकाशवाणी'चा मानाचा मुजरा.


हा भाग यूट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment