18 Sept 2020

‘बंदिवासा’तली डायरी

एक डायरी ‘बंदिवासा’तली...
----------------------------------


रसिक वाचकहो, 

मी १९९१ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमाला पुण्यात ॲडमिशन घेतली आणि पहिल्याच वर्षी नापास झालो. शाळेत कधीही पहिले तीन नंबर न सोडणाऱ्या मला हा फार मोठा धक्का होता. यानंतर मी पुण्यातच आळंदी रोडला आमच्या आत्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये एकटा राहिलो आणि सदाशिव पेठेत सायकलवर जाऊन डिप्लोमाचे क्लास अटेंड केले. या काळात मी लिहिलेली डायरी... मध्यंतरी ही वही गायब झाली होती. ती परत मला सापडली आणि एक खजिना सापडल्याचा आनंद झाली. त्या वहीतली ही डायरी.... माझं वय तेव्हा केवळ १७ वर्षं होतं... आयुष्यात पहिल्यांदाच अपयश पाहिलेल्या आणि त्यामुळं खचलेल्या या मुलाची, स्वत:च स्वत:ला उमेद देत राहणारी ही डायरी आज मी तटस्थपणे वाचू शकतो. हा १७ वर्षांचा मुलगा एवढा विचार करून लिहीत होता, हे बघून आश्चर्य वाटतं. बरं लिहिलंय हे सगळं, असंही वाटलं. काळानुरूप आपल्यात असलेला निरागसपणा, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा हरवत जातो आणि आपण बनचुके, कोडगे होत जातो. त्या अर्थानं आज मी या मुलालाच गुरू करायला हवं त्याच्या या गुणांसाठी... असो!

ही डायरी, तेव्हा जशी लिहिली होती, तशीच्या तशी....

----

मनोगतातलं (बरंच) थोडं... (एक विचारमंथन)
-------------------------------------------------------

९/११/१९९२
...................


१.


मला काही तरी लिहायचंय. काय लिहू? खूप मनात आहे, पण ते कागदावर येताना शब्दच आटून जातात. पेनात शाई भरपूर, पण शब्दच आटलेले; काय उपयोग? माझं हे काय चाललंय? माझा अभ्यास का होत नाहीये? खरं सांग, तूच तो नीट करत नाहीयेस!

ते खरंय, पण मी पूर्वी करत नव्हतो असं कधी! हे आत्ताच का होतं? ऐन उमेदीच्या दिवसांत ही निराशा कसली? कसलं मळभ दाटून आलंय? माझं इंग्रजी कच्चं आहे का? की प्राध्यापकांनी सांगितलेलं समजत नाही? पण खरं तर मला हे प्रचंड दगडी कॉलेज आणि तिथली घडीची पोरं पेललीच नाही. हे खरं का? मला परकं परकं वाटतं. एकदम ज्यावर स्वत:ला बिनधास्त झोकून द्यावं असं कोणीच भेटलं नाही - अगदी अभ्यासाची वह्या-पुस्तकं पण! फेल झाल्यानं ही निराशा वाढतेच आहे. मला भीती कसली वाटतीये? मी मनात आणलं तर खूप अभ्यास करून, चांगले मार्क्स मिळवू शकतो. पण हे मनातच का येत नाही? मला खरोखर शिकण्याची तळमळ नाही का? की माझा आत्मविश्वास पारच नाहीसा झालाय? हे अगदी नाही, पण काहीसं खरंय! जबरदस्त आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा मनात निर्माण होण्यासाठी मदत करणारे, पूरक असे सारेच घटक इथे गैरहजर आहेत. का बरं? मीच त्यांच्याकडे का जाऊ नये? पण पायात बळ नाहीये. कारण तेच. आत्मविश्वास वाटत नाही. असा का विचित्र तिढा बसलाय.
की मला, ‘घरच्यांसाठी आपण हे केलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे,’ ह्या जबाबदारीची जाणीवच नाही? सांग ना! मी खरोखर लाडात वाढलो. अजूनही फेल झाल्यानंतर माझे लाड पुरवले जातायत. असे पालक, नातेवाईक नाही मिळायचे कुठे! खरंच, माझ्यावर त्या साऱ्यांचं खूप प्रेम आहे. पण माझंही त्यांच्यावर प्रेम आहे, ह्याचा मी त्यांना विश्वास देऊ नाही शकलो काही ठोस कृतीद्वारा - उदा. पास होऊन, चांगले मार्क्स मिळवून दाखवणं - तर ते हे प्रेम सतत चालूच ठेवतील का, ही भीती वाटते. पण ही भीती निरर्थक आहे. मग माझं मलाच हसू येतं. असो.
की मला माझ्यातल्या गुणांना पूर्णपणे ओळखता आलेलं नाहीये? मी भिडस्त स्वभावाचा मुलगा आहे. पण तरी कुठे तरी मी ठोस निर्णय घेतला पाहिजे होता किंवा अजूनही त्याची गरज निर्माण होऊ शकते.
माझा कल कुठे आहे? खरंच, मला का ऽऽ ही समजत नाही. मग मी मठ्ठ आहे का? तसंही मी म्हणू शकत नाही. मी असं म्हटलं तरी त्यावर कुणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही. मग मला काय केलं पाहिजे, की आत्मविश्वास परत मिळवला पाहिजे. त्यासाठी एकाग्र चित्ताने अभ्यास केला पाहिजे; जो की मी आत्ता लगेच करणार आहे.
...मला माहित्ये की ह्या कामाचं फळ खूप खूप गोड मिळणार आहे. नाही तुम्हाला असं वाटत?

......

२.

हे सगळं खरंय हो! पण अभ्यासाला बसल्यावर त्यातलं समजत नाही का? समजतं. पण ते सगळं पेपरमध्ये आठवत नाही, असंही होऊ शकतं. माझी मानसिक ताकद खच्ची तर झालेली नाही ना! मला अजूनही आधाराची गरज का वाटते? मी स्वत:हून का नाही काही करू शकत? पण हेही खरं नाही! मी तर स्वत:हून बरंच काही करू शकतो. आता मला अधिक हुशार, धूर्त, चतुर बनावयास हवं. त्याशिवाय माझा निभाव लागणं कठीण आहे. ह्या आजच्या जगात उत्कृष्टतेचं शिखर गाठल्याशिवाय कोणी विचारत नाही अन् मला तर तिचा पत्ताच माहीत नाही! हे होता कामा नये. यू मस्ट स्टडी हार्ड! तुला हे केलंच पाहिजे, अशी मी सक्ती नाहीये करत! पण हे अशाकरता की स्वाभिमान, माझा आत्मविश्वास - जो मला आज अत्यंत हवासा आहे - तो मला फक्त ह्याच गोष्टी करून मिळवता येईल - अन्य मार्ग नाही!

.....

३.

मी इथं एकटा राहतो. तुम्हाला माहितीये का एकटा राहण्यात किती दु:ख आहे ते? माणूस हा सामाजिक प्राणी आहे. मी त्यातून ‘सोशल’ स्वभावाचा. मी अजिबात माणूसघाणा नाही. उलट मला माणसांत राहायला आवडतं. सगळ्या प्रकारची माणसं. अन् आपल्या इथं गर्दीला तोटा नाही. मग मी इथनं बाहेर पडतो. चहाच्या निमित्तानं कोपऱ्यावरची गर्दी पाहून घेतो. अहो हो, ह्या गोष्टी केल्यानंच तर मला जगात आपण आहोत, ह्याची जाणीव होते. नाही तर, मला इथे, तुरुंगात ‘एकांतवास’ नावाचा भयंकर प्रकार असतो, त्याचीच प्रचिती वारंवार येत राहते. केवढी जबरदस्त शिक्षा आहे ‘एकांतवास’ ही! हे म्हणजे पाण्यातल्या माशाला पाण्याबाहेर राहण्याची शिक्षा दिल्याप्रमाणेच होय. मी कोणाकडे बघू? ह्या निर्जीव भिंतींकडे? कुणाशी बोलू? ह्या लाकडी टेबल-खुर्च्यांशी? कुणाला आपल्या गमतीजमतीच्या गप्पा सांगू? ह्या कृत्रिम दाराखिडक्यांना? सांगा! अहो, वेड लागतं माहितीये वेड! तरी बरं, रेडिओ होता इतके दिवस! पण तो स्वत:च बोलतो, आपल्याला बोलूच देत नाही. अन् आता टीव्हीचीही भर पडलीये ह्यात! म्हणजे माझा अभ्यास आणखी न व्हायला! मोहाच्या आहारी न जायला मी कुणी ऋषी-मुनी नव्हे. मी तो टीव्ही बघतोच. उलट एकटा असल्यामुळे नेहमीच्यापेक्षा जास्तच! म्हणजे वेळ गेला का वाया? मला सारं कळतं, पण वळत कसं नाही? मी वरील कारणं सांगितली तीत माझा समर्थनाचा कोणताही हेतू नाही. समर्थन होऊच शकत नाही. मी, टीव्ही इथे नाहीच्चे, असं गृहीत धरतो. पण मग समोर तो प्रचंड खोका दिसत राहतो की! टोचतो सारखा! मग मन म्हणतं, का उगीच खोटं ठोकतोयस! दिसतो तर आहे खरा समोर! लाव बघू चटकन! तर हे सगळं असं आहे.

मला एकांताची सजा मिळतीये. मी पूर्ण प्रायश्चित्तलो आहे. पण हे प्रायश्चित्त अभ्यास करून, पास होऊन, घ्यायचं आहे. अन् ह्याच्याच वाटेत हा घोर एकांत येतो आहे. म्हणजे अभ्यास व्हावा म्हणून एकांत आणि एकांतामुळे अभ्यासच होत नाही? वा रे वा! काही तरी चुकतंय खरं! ह्या एकांतात माझ्यासारखा ‘सोशल’ मुलगा राहू शकत नाही. पण अरे, तुला हौसेनं कोणी ठेवलेलं नाहीच्चे! हेच तर मग प्रायश्चित्त ना! अन् मग पास होण्याचं प्रायश्चित्त ते कुठलं? की दोन दोन प्रायश्चित्तं? छे बुवा! भलताच गोंधळ उडतोय माझा! चल्! गोंधळ-बिंधळ काहीही उडत नाहीये. तू मुद्दामच घालतोयस गोंधळ! टाईमपास करण्यासाठी! अभ्यासाच्या वेळी झोपा अन् हा टाईमपास! छे छे! अभ्यासालाच फर्स्ट मान! चला, मी आता बसतोच आहे अभ्यासाला. पण हे लिहून टाकल्याशिवाय मनाची अस्वस्थता नाही शांत होत. अहो, शेवटी मी भावनाप्रधान मुलगा आहे. मी गेले दोन-अडीच महिने डोळ्यांतून टिपूसही न काढता ढसाढसा रडतोय हो! पण रडायला काय झालं, आँ? कुणी मेलंबिलं तर नाही ना? नालायक! रडतोय म्हणे! काही लाजही वाटत नाही वर सांगायला - रडण्याच्या वेळात अभ्यास केला असतास ना तरी ते चाललं असतं! असो. अहो, रागावू नका हो असं. मी करणारच आहे खूप खूप अभ्यास. खूपच खूप अभ्यास. त्या अभ्यासानं मी पास होईन. मग मला ताठ मानेनं जगता येईल. आयुष्यात एक तर ताठ मानेनं जगावं किंवा जगूच नये. मी दोन्ही करत नाहीये. मी ‘जगू नये’ हा दुसरा पर्याय अजिबात धुडकावून लावत आहे. मी ताठ मानेनं जगणार आहे. होय! इतके दिवस ताठ मानेनं जगलो अन् घरच्यांचीही मान ताठ राहिली. आता मला वाटतंय दु:ख ते फक्त याचं, की माझ्यामुळं त्यांची मान झुकली. त्यांना केवढं प्रचंड दु:ख झालं ह्या प्रकाराने! पण त्यांनी बोलून नाही दाखवलं कुणी! कारण त्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पण म्हणून मला कळत नाही असं थोडंच आहे? पण आता मी माझ्या कृतीद्वारे त्यांचा (स्वाभि)मान परत मिळवून देणार आहे. मी अभ्यास करणार आहे. ह्याच कृतीद्वारे आता मी हे करू शकतो. चला, ठरलं तर. ह्या परीक्षेत नक्की पास होणारच. माझा आत्मविश्वास हळूहळू फायदेशीररीत्या मला परत मिळतोय. चला, ह्या एवढ्या पानांच्या नासाडीचं हे फळ काय कमी आहे?

......

४. 

हे जीवन मला काही मीच प्रदान केलेलं नाही. त्यावर इतरांचाही हक्क आहे; उलट तुझ्यापेक्षा कांकणभर जास्तच! मग हे जीवन संपविण्याचा मला अजिबात अधिकार नाही. अन् मी म्हणतो, कशाला हे सगळं? आँ? खरंच, हे जग किती सुंदर आहे! टवटवीत निसर्ग आहे, नद्या आहेत, शेतं आहेत हिरवीगार, पाऊस आहे, अन् त्याहीपेक्षा ‘माणूस’ नावाच्या प्राण्यानं प्रचंड ऊतपात करून रचलेलं हे कृत्रिम जग किती सुंदर आहे! सुंदर शहरं, उंच उंच उत्तुंग, सुबक, देखण्या इमारती! रस्ते, चकचकीत गाड्या, दुकानं, ही सुखाची साधनं, हा टीव्ही, हा रेडिओ! खरंच! किती प्रचंड पसारा मांडलाय ह्या उद्योगी माणसानं. मला तो पुरता पाह्यचाय. मीही काही ना काही उद्योग करून माझा खारीचा किंवा त्याहून कमी वाटा उचलीन. पण ह्या जगाच्या सुंदरतेत कुठे तरी भर घालीन. एका स्वच्छ, सज्जन अशा व्यक्तीची माझ्या रूपाने तरी मला भर घालता येईलच ना! नक्की येईल. मी प्रतिष्ठा मिळवीन. पंचक्रोशीत का होईना, थोडंफार नाव मिळवीन. खूप इच्छा-आकांक्षा आहेत मह्या इवल्याशा जीवनात माझ्या! पण प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजेच यशस्वी होणं! मी सध्या अयशस्वी मुलगा आहे. म्हणजे पायाशीच सगळं बांधकाम अडलंय. पण मग मी यशस्वी होऊन ही धोंड दूर करायला हवी. मग मी यशस्वी व्हायला काय केलं पाहिजे? तर मी अभ्यास केला पाहिजे. त्याने तू इच्छिलेल्या साऱ्या गोष्टी पूर्ण होतील. पण अभ्यास का होत नाहीये? आत्मविश्वास जरा कमीच वाटतोय. तोही अभ्यासावरच अवलंबून आहे. आधी अभ्यास! तो केल्याने सारं मिळेल. अगदी आत्मविश्वाससुद्धा! ठीक तर. हा आता बसतोच अभ्यासाला. पार झकासपैकी करून टाकतो अभ्यास! बेस्ट म्हणजे बेस्टच होऊन जाईल मग सारं!!

......


५. 

कधी कधी वाटतं, हे सगळं फेकून द्यावं, झटकून टाकावं पालीसारखं अन् दूर दूर कुठे तरी निघून जावं. मला खरोखर ह्या साऱ्यांत रुची वाटतच का नाही? वाटत होती - आता नाही! ह्याची काही ठोस कारणं असली पाहिजेत. का बरं अशी अनासक्ती निर्माण व्हावी? तीही माझ्यासारख्या ‘सोशल’ मुलात? ह्या तरुण वयात? छे! खरं तर पुरतं असं वाटतच नाही कधी. मी मनातलं सारं खरं खरं तरी लिहितोय का इथे? हो, मला तरी तसं वाटतं. हे वाक्य इथं लिहिलंय त्यावरून तरी. नाही तर ही शंका मनातच ठेवली असती. 

मला हे गणिती खेळ नाही जमत. हा दोष माझा नव्हे. मला परफेक्टनेसपेक्षा प्युअरनेस जास्त भावतो. मला सगळंच पट्टी अगर ड्राफ्टरने नाही मोजता येत. हाही दोष माझा नव्हे. पण याचा अर्थ तुला ते येतच नाही, असं नाही. एकदा त्यात शिरलं की ते यायलाच हवं. आवडत नाही म्हणजे जमत नाही, असं नाही. तर ते अभ्यासानं सहज मिळवता येतं. अन् मी ते मिळवीन. मी संगीतप्रेमी आहे. मला नाटकं आवडतात. सिनेमे, टीव्ही पाह्यला आवडतं. लिहायला तर चिक्कार आवडतं. पेन हे माझं शस्त्र आहे. मी बोलू शकत नाही. मी भिडस्त स्वभावाचा माणूस आहे. एखादी गोष्ट हॅमरिंग करून म्हणा अथवा ठासून सांगून म्हणा, दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची कला नाही आपल्याला जमत! वक्तृत्वगुण नाहीचेत म्हणा ना माझ्या अंगात! शाळेतसुद्धा कधी फार भाषणं केली नाहीत. जी थोडी फोर केली, त्यातही चेहऱ्यापेक्षा हातपायच हलायचे. असो. मी त्यापेक्षा लिहिणं जास्त पसंत करतो. आपल्याला जे वाटतं ना, ते लिहून ठेवावं. दुसऱ्याला ते आवडलं तर वाचेल, नाही तर ठेवून देईल. शिवाय लिहिल्यानं एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. शिवाय अभ्यासपूर्ण मतं मांडण्याची सवय होते. तोंडची वाफ दवडण्यापेक्षा हे बरं. पण मी घुम्याही नाही. फालतू व निरुद्देश अखंड बडबड करायलाही मला आवडतं. असो.

पण मी ह्या कला क्षेत्रात काय करतूद दाखवणार? तेथे आधीच गर्दी इतकी, की प्रेक्षकांपेक्षा कलाकारच जास्त झालेले. शिवाय ह्या महागाईच्या काळात पोटापुरतं तरी मिळवावयास हवं. मला नाही वाटत, की हे कला क्षेत्र त्या दृष्टीनं योग्य आहे म्हणून! तेथे शिखरावर पोहोचलेलेसुद्धा पोटापाण्यासाठी ‘साईड बिझिनेस’ करतात. मग माझ्यासारख्या नवख्यानं तर विचारदेखील करायला नको.

हे असं निराशाजनक चित्र मला का दिसतंय सगळीकडं? मन निराशावादी म्हणून सगळंच निराशावादी, असं तर नसेल? मला हा भिकार, देशोधडीला लावणारा निराशावाद देशोधडीला लावला पाहिजे. मी निराशावादी नाही. मी आशावादी मुलगा आहे. कुठं तरी आशेचा किरण लुकलुकत असतो, आपण तोच धागा पकडून पुढं जायचं असतं. मीही तेच करणार आहे. आधी ज्यात पाऊल ठेवलंय, ते क्षेत्र तर काबीज करू. मग इतरांची चर्चा! 

म्हणजेच मला आधी हा कोर्स पूर्ण करावयास हवा. म्हणजेच छान झटून अभ्यास करायला हवा व उत्तम गुणांसह तो पूर्ण करावयास हवा. म्हणजेच मला त्यासाठी अभ्यासच करावयाला हवा. मी तो करेन. काही चुका जरून झाल्या असतील, पण त्यांची आता पुनरावृत्ती तरी मी निदान होऊ देणार नाहीये. मी आता लागतोच धडाकेबाज अभ्यासाला! छानपैकी पेपर सोडवून टाकणारे यावेळेस! ठेवणारच नाही मागे काही कटकट! चला, होऊनच जाऊ द्यात आता. दे दणादण!!!

.....

६.

‘मी यशस्वी होणारच’, ‘मी ह्यात ह्याचं शिखर गाठीन’, ‘माझ्यासारखा ह्या ह्या क्षेत्रात कुणी होणार नाही’ असं जबरदस्त आत्मविश्वासपूर्ण लिहून थोडाफार काळ मनाचं समाधान नक्कीच मिळवता येतं. पण नीट लक्षात ठेव, थोडाफार काळ! नेहमीसाठी नाही बरं! ठोस काही तरी उपाय हवाय ह्या समस्येवर! माझं मन अजून कसं हे स्वीकारत नाही की आत्मविश्वास मनात निर्माण होण्यासाठी मला काही गोष्टी करणं नितांत जरुरीचं आहे. उदा. अभ्यास करणं. ह्या गोष्टीमुळे भलताच फरक पडू शकतो बरं! ही अशी गोष्ट आहे, की जीमुळं मला माझा आत्मविश्वास नक्की परत मिळू शकतो. मी तो प्रयत्नपूर्वक मिळवावयास हवा. 

जगात काही गोष्टी अशा असतात, की त्यांच्याशिवाय तुम्ही अगदीच लुळेपांगळे होऊन जाता. तुम्हाला काहीच करता येत नाही किंवा करावंसं वाटत नाही. ती गोष्ट म्हणजे जोडीदार, मित्र. मी ह्या बाबतीत आत्तापर्यंत भलताच दुर्दैवी निघालो. मला कध्धीच चांगला मित्र मिळाला नाही. त्या त्या काळापुरते उत्तम आणि बरेच असे मित्र मला लाभले. पण ज्यांच्यावर विश्वासानं विसंबून राहावं, ज्यांच्याशी सारं मन मोकळं करावं, असं कुणीच भेटलं नाही! की मीच कुणाला शोधलं नाही? माझी पारख करण्याची क्षमता कमी आहे का? बहुदा तसं असावं. की माझा स्वभाव वाईट आहे? स्वार्थी आहे? पण मग मला काही मित्र तर उत्तम मिळाले होते, ते स्वभावाच्या बाबतीत माझ्यावर अगदी खूष होते. अन् मलाही असं कधी वाटलं नाही. मी ‘मित्र’ म्हटलं, की सगळं झोकून देतो. आजही कुणी माझा मित्र झाला तर माझी हीच स्थिती कायम राहील. कारण स्वभावच तो! कसा बदलेल?

मात्र या घडीला कुणा अत्यंत जवळच्या सुहृदाची उणीव खूप खूप जाणवतेय, हे निश्चित. मग तो कुणीही असो. मुलगा किंवा मुलगी! तरुण वयात असल्यामुळे मुलगी मैत्रीण असावी, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला त्याबाबतीत नाही म्हणायचं. मुलगी अशाकरता, की मुलांपेक्षा मुली दुसरीचं किंवा दुसऱ्याचं दु:ख किंवा भावभावना अधिक चट्कन समजून घेतात. नुसत्या समजून घेतात असं नव्हे, तर त्या भावनांशी एकरूप होतात. ही मोठी फायदेशीर गोष्ट आहे एखादी मुलगी आपली मैत्रीण असण्यात! पण मी याही बाबतीत अजून दुर्दैवीच म्हणावा लागेल. असो. अजून खूप जीवन बाकी आहे. कोणी ना कोणी भेटेलच. त्या ‘त्याला’ किंवा ‘तिला’ शोधत राहायचं आपण फक्त! 

आज मला त्या ‘त्याने’ किंवा ‘तिने’ नक्कीच आधार दिला असता, समजून घेतलं असतं. माझा आत्मविश्वास परत मिळवून दिला असता. अशा एखाद्या ‘त्याची’ किंवा ‘तिची’ खूप उणीव भासतेय. खरंच, त्या बाबतीत मी अगदीच भिकारी कसा काय राह्यलो, काही कळत नाही बुवा! असो.

खरा प्रश्न आहे तो म्हणजे मला कुणी समजावून घेण्याचा अगर ‘माझं’ म्हणून कुणी तरी असण्याचा! जाऊ दे झालं. काही बाबतींत नशिबावरच अवलंबून राहावं लागतं. असेल माझं नशीब जोरदार तर भेटेलही अशी एखादी व्यक्ती जी खरोखर माझी अत्यंत जवळची किंवा लाडकी ‘मित्र’ होऊन जाईल. 

अरेच्चा! पुन्हा तेच? सांगितलं ना खरा प्रश्न समजावून घेण्याचा आहे म्हणून! पण समजून घेण्याची मला, कुणी तरी, आत्ताच गरज का निर्माण व्हावी? अन् मला वाटतं, तुला घरच्यांनी आत्तापर्यंत खूपच समजून घेतलेलं आहे तसं! मग आत्ताच काय आहे त्याचं एवढं? हं! खरं आहे ते! मी खरं तर एवढं एरंडाचं गुऱ्हाळ घालायलाच नको होतं ह्या बाबतीत! एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी सत्य आणि स्पष्ट आहे की, तुला आत्मविश्वास हा परत मिळवावयासच हवा व त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे अभ्यासाचा! अभ्यास करूनच हे आत्मबित्मविश्वास परत मिळवता येतात, कळलं का? अन्य मार्ग नाहीच.

तेव्हा तू आता अभ्यासास लागावंस, हे उत्तम! उत्तम अभ्यास केला, की मला उत्तम गुण मिळतील. प्रगतीतले सारे अडथळे दूर होतील. मला पुढं जाण्यासाठी नवा उत्साह येईल. हो! मी आशावादी तरुण आहे. हे सगळं असंच होईल हे नक्की! चला तर मग. मग घरच्यांनाही उत्साह येईल, उमेद येईल. मग करतोच मी सुरुवात आता दणकेबाज अभ्यासाची!!!

......

७.

माणसाचं आयुष्य केवढंसं आहे नाही! अवघं ऐंशी-पंचाऐंशी वर्षांचं! जग तर किती जुनं आहे कोटी कोटी वर्षांचं! पण माणसाचं जीवन तसं पाहिलं तर केवढं तरी मोठंच आहे. किती उलथापालथी करतो हा प्राणी एवढ्याशा आयुष्यात! सतत पुढं जाण्याची धडपड असते त्याची! प्रगतीचं वेड आहे त्याला! ह्या जगात किती तरी बुद्धिमान माणसं होऊन गेली, ह्याची गणतीच नाही. त्यांनीच हे सुंदर जग उभं केलं. नाही नाही ते उद्योग केले. पण मजा आहे! चांगलं वाटतं, असं लढूनलढून, धडपडून पुढं जायला! साऱ्या माणसाच्या जातीचीच ही कहाणी तर मीही मग माणूसच आहे ना! प्रत्येकाला कुठे ना कुठे अपयश हे लिहून ठेवलेलंच आहे. कुठे तरी हा ‘बॅडपॅच’ लागतोच. मग मलाही तो आत्ता लागला असेल. पण मग तो कधीच समाप्त होणार नाही का? होईल ना! पण प्रयत्न करावयास हवेत. असं हातपाय गाळून नाही चालणार. पण हा अपयशाचा बट्टा अगदीच हातपाय गाळून टाकतो आपले. काही काही करावंसं वाटत नाही. पुढं जाण्यातला सुरुवातीचा उत्साह नष्ट होतो. ठेच लागलेली असते ना! पण मग ही जखम आयुष्यभर कुरवाळत बसायचे का? तिला तात्पुरती मलमपट्टी करून पुढं नाही का जाता येणार? येईल, नक्की येईल. यायलाच पाहिजे.

माणसाचं मला मोठं नवल वाटतं. म्हणजे तसा हेवा वाटतो म्हणा ना! तेवढ्यापुरत्या अपयशाला तो अजिबात भीक घालत नाही. त्याला ओलांडून पुढे जातो. आकाशाहून मोठा होतो. मग मीही माणूसच आहे ना! मलाही ही महत्त्वाकांक्षा आहे. मीही हे अपयश धुऊन टाकणार. थोडाफार असा धक्का बसल्याशिवाय मला तरी कसा अनुभव येणार ह्या जीवनाचा? पण अनुभव असाच, ह्याच पद्धतीने याला हवा होता, असं काही बंधन नव्हतं कधी! पण ठीक आहे. मी आहे ती परिस्थिती स्वीकारलीये. मला आता ह्याच्याही पुढे जायचंय - अन् मी जाईनच!!

......

८.

मला माणसाच्या स्वभावाचं गूढ उकलत नाही. त्याला उत्तुंग ठिकाणी जायचं तर असतं, पण तो कधी कधी इतका हताश होऊन जातो, की स्वत:च्या जीवनाचा अंतच करून टाकतो. पण मी भित्रा नाही. भेकड, पळपुटा नाही. मी माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगांचा, परिस्थितीचा योग्य तो सामना करू इच्छितो. यालाच तर ‘जीवन’ म्हणतात. जीवनात संघर्ष नाही लागला करावा तर ते जीवन अगदीच अळणी होऊन जाईल. नाही, मला अळणी जीवन नाही जगायचं! पण ह्या अपयशी प्रसंगांशी झगडा करीत करीतच मरायचंही नाही. शेवट कुठं तरी चांगला व्हायला हवा. तो म्हणजे यशस्वी असा व्हायला हवा.

मग त्यासाठी काय केलं पाहिजे? यशस्वी होण्यासाठी आज अनेक चांगले-वाईट मार्ग उपलब्ध आहेत. अर्थात, वाईट मार्गच जास्त! पण मला वाईट मार्गानेही यशस्वी व्हायचं नाही. कारण मला माहित्ये की ह्या मार्गाने यशस्वी होण्याचं मानसिक सुख कधीही मिळत नसतं. किंबहुना, आपण यशस्वीसुद्धा झालेलो नसतो तर फक्त वरवर तसं वाटत असतं, आपल्याला सारखं. मनाचं खोटं समाधान करून घेत कुढत अतो आपण तसल्या मार्गाने!

मग मला चांगल्या मार्गाने यशस्वी व्हायचंय. मग साहजिकच मला खूप श्रम करावे लागतील. मी तर म्हणतो, मी अजून खरे श्रम केलेलेच नाहीत. खरे श्रम म्हणजे काय, हेच मला माहीत नाही. त्याचा अनुभवच नाही. मग मी तो आता घ्यायला हवा. आता कष्ट करायला हवेत. मग त्याचा रस्ता जातो तो थेट यशस्वीतेकडे!!

......

९. 

आजूबाजूला खूप मुलं आहेत, सगळी हुशार आहेत. ह्यांच्या गर्दीत मी काय टिकणार? मला काय येतंय, ही भावना अगदी गोळ‌ी घालून ठार केली पाहिजे मला! मी म्हणजे फार भारी कुणी तरी आहे, असा थोडासा ‘ओव्हर’च, पण आत्मविश्वास असल्याशिवाय नाही मला काही करता येणार! 

आणि जग तर हे असं आहे, की तुम्हाला शब्दांच्या टोची मारून मारून, घायाळ करून, तुमचा आत्मविश्वास - काही करण्याची उमेद - अगदी चेचून मारायला टपलेलेच असतात सगळे. मला ह्यांच्या तावडीत सापडलं ना, की अगदी नक्को नक्को होऊन जातं. कुठून ही नसती बिलामत ओढवून घेतली अंगावर, असं होतं. पण मला ह्या साऱ्यांचा सामना केलाच पाहिजे. अर्थात माझ्या नजरेला सगळेच असे का दिसतात? वाईट! म्हणजे माझ्या विचारसरणीतही काही तरी दोष आहे. मी पॉझिटिव्हली थिंकिंग करीत नाही का? करतो! मला तसा ह्या जगाचा राग नाही येत, कारण समोरचा चुकला की त्याचे कान उपटायला मीही सगळ्यांच्या दोन पावलं पुढंच असतो की! मग स्वत:वर शेकलं की असा राग का यावा? वा रे वा! बराच आहेस की! हे योग्य नाही. मी सगळ्यांशी असंच वागलं पाहिजे, जसं त्यांनी माझ्याशी वागावं असं मला वाटतं. म्हणजेच चांगलं वागायला पाहिजे. मग पण मी कुठे वाईट वागतोच कुणाशी? नाही रे! वाईट नाही वागत तू, पण नाही म्हटलं तरी थोडी चिडचीड होतेच की!

खरं तर दुसरे असा, माझ्याइतका विचारही करत नसतील माझ्याशी बोलताना! पण काही जण नक्कीच असेल आहेत, की जे वरीलप्रमाणे विचार करूनच माझ्याशी बोलतात. त्या ‘माझ्या’ अशा लोकांशी मी पण इतका विचार करूनच वागणार, बोलणार! तरच ते योग्य होणार आहे.

.......

१०.

मी आता मोठा झालोय! लहान नाही राहिलो! पण मला कधी कधी एकदम बालपण आठवून लहान व्हावंसं वाटतं, सगळ्यांप्रमाणेच! ‘बालपण दे गा देवा’ असं तुकाराम उगाच नाही म्हणाले काही. खरंच! बालपण किती सुंदर आहे! पण तज्ज्ञांच्या मते, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर अशा काळात असताना, म्हणजेच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मला लहान व्हावं आपण, असं का वाटावं? हे विचार कुठे तरी ‘डिफेक्टिव्हिटी’ दर्शवतात माझ्यातली! नेमकं काय बिनसलंय? मला हे आगामी तारुण्य नकोय का? अर्थात, माझ्या हातात काहीही नाही, अन् मला ते नकोय असंही नाही.

खरोखरच, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर कालखंडात प्रवेश करताना, त्याला नाकारण्याचा करंटेपणा मी कसा करीन? मला हे सळाळतं तारुण्य, उत्साह, ऐन यौवनातली ती बहारदार स्वप्नावस्था, सारं सारं हवंय. पण मग इच्छा एवढीच आहे, की ह्या उत्साहाचा, ह्या जोशाचा उपयोग माझ्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, आयुष्यात काही तरी बनण्यासाठी व्हावा.

नाही तर हे तारुण्य म्हणजे एक उत्साही, सळाळती लाटच आहे. जशी जोरात येऊन बिलगते, तशीच विरूनही जाते. ती पुरती विरण्याच्या आत मला तिचा पुरता उपयोग करून मोठं व्हायचंय. ऐन उमेदीतल्या वर्षांना माझ्या आयुष्यातली ‘गोल्डन मेमोरियल इयर्स’ बनवायची आहेत. तशी, सर्वांप्रमाणेच, माझीही इच्छा आहे. पण मग मी ती इच्छा यशस्वीतेत बदलण्यासाठी काय केलं पाहिजे तर खूप कष्ट केले पाहिजेत. 

खूप झटलं पाहिजे मला माझी स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी! आणि मी झटणार आहे!!

.......

११.

मी कोण आहे? मी कधी मलाच शोधलं आहे का? मनाच्या प्रतिबिंबात मी कधी डोकावलं आहे का? मी कधी स्वत:चा नीट असा विचार केला आहे का? माझ्यातले गुण-दोष नीट तपासले आहेत का? स्वत:चा स्वभाव मला पूर्णतया उमगला आहे का? मी इतरांशी कसं वागावं, हे मला कळतं का? आयुष्यातल्या बऱ्याचशा घडामोडींशी तू जवळजवळ परिचित झालायस का? 

मला वाटतं, बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येतील. खरंय ते. आत्तापर्यंत फुलांच्या ताटव्यातनं फिरत होतो मी! जीवनाच्या मुख्य महामार्गाला आताशी कुठं लागलोय मी! इथली प्रचंड रहदारी पाहून बावरलोय मी! पण मग मी कधीच हा विचार करू नये का? करावा! जरूर करावा! स्वत:ला पूर्ण ओळखावं. अगदी ‘आत्मज्ञान’ वगैरे नाही समजत, पण कुठे तरी स्वत:शीच जाऊन भिडावं, मनाशी हितगुज करावं. 

मी हे सारं करून पाह्यलंय पहिल्यांदाच! पण छान वाटतं! मनात कुठेही खळबळ माजलेली राहत नाही, विचारांना एक पूर्णत्व लाभलं जातं. मनाचा हा तलाव डहुळलेला राहत नाही, तर शांत, धीरगंभीर बनतो. अर्थात तो सतत तसाच राहू नये, हेही खरं! पण प्रश्नांचे, चिंतेचे, काळजीचे खडे त्यात पडले की विचारांचे तरंग आपोआप उमटतातच! त्यात आपल्याला स्वत:ला विशेष असं काही करावं लागत नाही. 

पण ठीक आहे. मला माझ्या मनाशी ‘संवाद’ साधण्याची प्रक्रिया - कला - जमतेय हळूहळू. कुठे तरी हा संवाद ‘टेप’ केला जातोय माझ्या मनात! कुठे तरी मी आता असा अंतर्मुख होऊन हा संवाद करतोय तरी निदान!

बरं वाटतं, असं केल्यानं मला! आता मी पूर्ण ‘क्लीन’ आहे. माझं मन ‘स्वच्छ’ झालंय. ही खळबळ, हे असंबद्ध विचार बरेचसे कागदावर उतरले आहेत, मला वाटतं. मला हे वाचून एक नवीन काही तरी जाणीव व्हायला लागलीये. मी कुठे तरी एक ‘उंची’ गाठलीय, असंही मला उगीचच वाटायला लागलंय. 

अरेच्चा! ह्यालाच तर ‘आत्मविश्वास’ म्हणत नसावेत? व्वा! आता मी यशस्वीतेच्या दिशेने जबरदस्त गरुडझेप घेईन. मी त्यात यशस्वी होईनच, असा तुफानी आत्मविश्वास मला वाटायला लागला आहे. 

हे अत्यंत चांगलं फळ मला ह्याकामी मिळालेलं आहे!!

---

लेखनसीमा.

-----




-------------------------


29 Aug 2020

रिव्ह्यू - महानटी

‘सावित्री’चं वाण

-------------------


बरेच दिवस पाहायचा राहिलेला ‘महानटी’ हा तेलगू सिनेमा आत्ता ‘अमेझॉन प्राइम’वर बघितला. जिवंतपणीच दंतकथा झालेल्या तेलगू व तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायिका सावित्री यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटसृष्टीत एखाद्या धूमकेतूप्रमाणे अवचित आलेल्या आणि नंतर आपल्या कर्तृत्वाने ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळविलेल्या सावित्रीची ही कहाणी पडद्यावर बघताना शेवटी डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. दिग्दर्शक नाग चैतन्य यांचं अभिनंदन यासाठी, की ही केवळ एका नटीची गोष्ट राहत नाही. ती त्याहून किती तरी मोठी होत ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी...’ या दर्जापर्यंत पोचते. कितीही मोठी झाली, तरी प्रत्येक स्त्रीच्या नशिबी स्त्री म्हणून येणारी विटंबना, मानहानी, अवहेलना आणि अन्यायाचं दर्शन घडविते आणि पुढच्या पिढीला सावित्रीपासून मिळणारी अखंड प्रेरणा दाखवत सकारात्मक शेवटही करते. अत्यंत देखणं रूप लाभलेल्या कीर्ती सुरेश या अभिनेत्रीनं सावित्रीचं काम केवळ कमाल केलं आहे. तिच्यासाठी तरी हा सिनेमा एकदा सर्वांनी पाहावाच. 

सावित्रीचं आयुष्य सर्वार्थानं वादळी होतं. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी तिनं चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. वडील लहानपणीच गेलेले. काकानं वाढवलेलं. तत्कालीन मद्रास इलाख्यात येणाऱ्या तेलगू भाषक प्रदेशात (गुंटूर जिल्हा) तिचा जन्म झाला. मद्रासमध्ये तेव्हा तमिळ‌ चित्रपटसृष्टी बहरली होती. सावित्रीला तिचे काका मद्रासला घेऊन आले. तिला धड तमिळही बोलता येत नव्हतं. सुरुवातीला सिनेमा मिळणंही अवघड गेलं. एखादा सिनेमा मिळाला, तर तमिळ संवाद म्हणताना तिची धांदल उडायची. इथपासून ते तमिळ चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा चित्रपट दोन तास ५० मिनिटांत दाखवतो. या सगळ्यांत जेमिनी गणेशन यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासोबत झालेलं सावित्रीचं (दुसरं) लग्न आणि त्या दोघांमधले ‘अत्यंत मधुर ते अत्यंत कडवट’ या रेंजमधले सर्व संबंध हा महत्त्वाचा भाग ठळकपणे येतो. 

कलावंतांचं जगणं सामान्य लोकांपेक्षा वेगळं असतं. म्हणूनच ते कलावंत असतात. त्यांचं मनस्वी जगणं, स्वच्छंद-मुक्त वागणं-बोलणं, त्यांना मिळणारी अफाट लोकप्रियता आणि त्या जोडीला येणारं डोळे विस्फारून टाकणारं ऐश्वर्य या सगळ्यांबाबत आपल्याला अत्यंत कुतूहल असतं. सावित्रीला लाभलेलं अवघं ४५ वर्षांचं आयुष्यही असंच वादळी होतं. तिची ही कथा बघताना अगदी तिच्यासारख्याच समांतर चालणाऱ्या आणखी काही अभिनेत्रींच्या कथा आठवतात. काही काही बाबतींत या सगळ्या जणींचं प्राक्तन एवढं सारखं कसं, असाही प्रश्न विचारी प्रेक्षकाला पडू शकतो. हंसा वाडकरांचं ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र आणि त्यावर बेनेगलांनी काढलेला ‘भूमिका’ हा चित्रपट (आणि त्यातली स्मिताची अजरामर भूमिका) सहजच आठवते. मराठीत अगदी अलीकडं निघालेला ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटही आठवतो. मनस्वी कलाकारांनी दारूच्या नशेपायी करून घेतलेला आत्मनाश हा समान दुवा! शिवाय ‘सावित्री’ची कथनशैली पाहता, ओम राऊत दिग्दर्शित ‘लोकमान्य - एक युगपुरुष’ या चित्रपटाची आठवण येते. ‘लोकमान्य’प्रमाणेच इथेही आजच्या पिढीतलं कुणी तरी इतिहासात जाऊन आपल्या कथानायकाचा / नायिकेचा चरित्रशोध घेते. ‘सावित्री’त हे काम मधुरावाणी या गोड नावाची पत्रकार करते. त्यात ही भूमिका ‘जानू’मुळे अत्यंत आवडती झालेल्या समंथा रुथ-प्रभूनं केलीय. और क्या चाहिए! 

‘सावित्री’मध्ये दिग्दर्शक अत्यंत तपशिलाने नायिकेच्या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवतो. पुरेसा वेळ घेतो. तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व ठळक व्यक्तिरेखाही पुरेशा विकसित होऊ देतो. यामुळं आपण चित्रपटात आणि नायिकेच्या भावविश्वात गुंतत जातो. ‘सावित्री’ चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८१ पर्यंतचा काळ येतो. हा सर्व काळ चित्रपटात दाखवायचा म्हणजे उत्कृष्ट कला दिग्दर्शनाची जोड हवी. या चित्रपटात हे कला दिग्दर्शन अत्यंत भव्य पातळीवर आणि सुंदर योजलं आहे. तेव्हाचे स्टुडिओ, गाड्या, इमारती, कपड्यांची स्टाइल हे सगळे बारकावे अत्यंत तपशिलात नोंदविले आहेत. त्यामुळं चित्रपट पाहताना आपणही ‘टाइम ट्रॅव्हल’ करून जणू त्या काळात पोचतो. त्या काळातले राजकीय, सामाजिक तपशील माहिती असतील तर आणखी मजा येते. (उदा. श्रीरामुलू यांचं आंध्र प्रदेश राज्यासाठी झालेलं आमरण उपोषण व त्यांच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे यांचं एक दृश्य चित्रपटात येतं. त्यानंतर जेमिनी सावित्रीबरोबर बोलताना तमीळ-तेलगू वादावर काही भाष्य करतो. त्यावर सावित्रीचं उत्तर ऐकण्यासारखं आहे.) एन. टी. रामाराव यांचा तेलगू चित्रपटसृष्टीत, तर शिवाजी गणेशन यांचा तमिळ चित्रपटसृष्टीत झालेला उदय, सावित्रीच्या लहानपणी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून तिचं झालेलं कौतुक, स्वातंत्र्यलढ्यासाठी गावोगावी सुरू असलेली चळवळ असे अनेक तत्कालीन संदर्भ सिनेमात जवळपास प्रत्येक दृश्यात येत राहतात. त्यामुळं हा चित्रपट केवळ सावित्रीचीच नव्हे, तर त्या काळाचीच कहाणी सांगतो आहे, असं वाटायला लागतं. एखाद्या प्रदेशाचा भू-राजकीय इतिहास ज्यांना आवडतो, त्यांच्यासाठी तर ही ट्रीटच आहे. 

सावित्रीची व्यक्तिरेखा हा अर्थातच या चित्रपटाचा प्राण आहे. या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश या अभिनेत्रीची झालेली निवड किती सार्थ आहे, हे एंड स्क्रोलिंगला जेव्हा मूळ सावित्रीची छायाचित्रं आणि कीर्तीची छायाचित्रं शेजारी दिसतात तेव्हा लक्षात येतं. खरं तर, कीर्ती मूळ सावित्रीपेक्षा दिसायला काकणभर सरसच वाटते. चौदा वर्षांची एक अल्लड मुलगी ते वयाच्या पंचेचाळिशीत ‘महानटी’चे सगळे भोग भोगून चिरविश्रांतीआधी कोमात गेलेली सावित्री हा प्रचंड कॅनव्हास कीर्तीनं पडद्यावर अक्षरश: जिवंत केला आहे. या अभिनेत्रीचे चेहरा व विशेषत: डोळे कमालीचे बोलके आहेत. चेहऱ्यात अत्यंत गोडवा आहे. तिचे सर्व विभ्रम केवळ मोहवणारे आहेत. शेवटी मद्याच्या आहारी गेलेल्या सावित्रीचं सगळं दु:खही तिच्या डोळ्यांत साकळतं. सावित्रीचा सगळ्यांत मोठा गुण म्हणजे ती अत्यंत उदारहृदयी होती. एवढं ऐश्वर्य असूनही काळाचं दान उलटं पडल्यानं अगदी साधं जीवन जगण्याची वेळ तिच्यावर येते. तेव्हाही ती घरातली महागडी साडी विकून नुकतीच ओळख झालेल्या व तिचा फॅन असलेल्या वृद्ध टॅक्सीवाल्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी भलीमोठी रक्कम हातात ठेवते, तो प्रसंग हेलावून टाकतो. भरपूर पैसे असताना ज्यांच्या नावे इस्टेट घेऊन ठेवली, ते सगळे ऐन वेळी कशी पाठ फिरवतात आणि त्यानंतरही सावित्री त्यांच्याविषयी कुठलीही कटुता ठेवत नाही, हे पाहून तिच्याविषयी करुणा दाटल्याशिवाय राहत नाही. मद्याच्या आहारी गेलेली सावित्री शेवटी स्वत: दारू तर सोडतेच; पण हे व्यसन असलेल्यांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचाही निश्चय करते. अशा अनेक प्रसंगांची गुंफण या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेते. 
जेमिनी गणेशनच्या भूमिकेत दलकीर सलमान (मामुट्टीचा मुलगा) या लोकप्रिय अभिनेत्यानं जीव ओतला आहे. एवढ्या नामांकित आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वाची भूमिका पेलताना त्या भूमिकेचे सर्व पैलू दाखवण्यात सलमान यशस्वी ठरला आहे. जेमिनी आणि सावित्री यांच्या नात्यात नंतर ‘अभिमान’सदृश वादळ निर्माण होतं, त्या सर्व काळात नैराश्यग्रस्त झालेल्या जेमिनीचा वावर सलमान सहजतेनं दाखवतो. तमिळ चित्रपटसष्टीतला सर्वांत रोमँटिक हिरो आपल्या दुसऱ्या पत्नीचा उत्कर्ष सहन करू शकत नाही आणि सवयीनं ‘तिसरी’कडं वळतो. त्यानंतरचा त्याचा सर्व स्खलनाचा प्रवास दलकीर सलमानने उत्कृष्टपणे पेलला आहे. या अभिनेत्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची भूमिका ठरावी.

सावित्रीच्या या प्रवासाचा शोध घेते पत्रकार मधुरावाणी. सावित्रीचा शोध घेता घेता वाणीला तिच्या आयुष्यातही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे बळ मिळते. अँथनी या ख्रिश्चन तरुणाशी प्रेम करण्याचं धैर्य ती अखेर एकवटते. वर्षभर कोमात राहिलेली सावित्री अखेर १९८१ मध्ये हे जग सोडून जाते. मात्र, शेवटी वाणी म्हणते, तसं - सावित्री, तू फक्त देहरूपाने संपलीस. पण रूपेरी पडद्यावरच्या तुझ्या भव्य अस्तित्वाला मरण नाही. तुझ्या कर्तृत्वाची गाथा आम्ही पुढच्या पिढ्यांना सांगत राहू... बोलताना अडखळणाऱ्या, आधी एका किकमध्ये दुचाकी स्टार्ट करू न शकणाऱ्या आणि शेवटच्या सीनमध्ये एका किकमध्ये दुचाकी स्टार्ट करून हसत निघणाऱ्या मधुरावाणीची भूमिका समंथानं फारच उत्कृष्ट साकारली आहे. तसा छोटा रोल असला, तरी संपूर्ण नॅरेशन करणारा असल्यानं महत्त्वाचा आहे. त्यात समंथा लक्षात राहते. तिच्या नायकाच्या भूमिकेत विजय देवेरकोंडा हा आणखी एक लोकप्रिय अभिनेता आहे. याशिवाय सहायक भूमिकांमध्ये तेलगू व तमीळ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची मांदियाळीच आहे.
‘महानटी’ बघताना सावित्रीच्या सुख-दु:खात आपण सहभागी होतो, तिच्याबरोबर हसतो, तिच्याबरोबर रडतो, हे दिग्दर्शकाचं यश आहे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी आपल्याच एका राज्यात चित्रपटसृष्टीवर राज्य करणारी अशीही एक राणी होती, हे अनेकांना ठाऊक नसेल. मात्र, ‘महानटी’ बघितल्यानंतर आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सावित्रीला विसरू शकणार नाही, हे निश्चित! भारतात कमी-अधिक यश मिळविणाऱ्या बहुतेक स्त्रियांच्या भाळी हे ‘सावित्रीचं वाण’ असतंच. त्यामुळं कुणाही संवेदनशील माणसाला हा चित्रपट पाहताना या वास्तवाची दाहक व्याप्ती आणि खोली लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ‘सावित्री’ अनुभवायची ती अशा काही साक्षात्कारी क्षणांसाठी...!!

...

दर्जा - चार स्टार

---

11 Aug 2020

रिव्ह्यू - फर्स्ट मॅन

आउट ऑफ धिस वर्ल्ड....

------------------------------

गेल्या शतकात घडलेली मानवजातीच्या इतिहासातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे चंद्रावर पडलेले मानवाचे पहिले पाऊल! मला अगदी लहानपणी पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हापासून त्या घटनेविषयीचे कुतूहल सतत वाढत गेले आहे. मानवाच्या बुद्धीची ही झेप केवळ थक्क करून टाकणारी आहे, यात वादच नाही. कितीही विशेषणे वापरली, तरी त्या घटनेचे यथार्थ वर्णन केले असे वाटतच नाही. मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये जेव्हा पहिल्यांदा रुजू झालो, तेव्हा पहिल्याच दिवशी मी तेथील सुसज्ज ग्रंथालयात जाऊन कोणती गोष्ट पाहावयास मागितली असेल, तर माणूस चंद्रावर उतरला ही बातमी असलेला अंक! त्यानंतरही मी शक्य तितक्या वेळा या विषयावर वाचलं आहे, पाहिलं आहे. मात्र, कुतूहल शमण्याऐवजी वाढतच गेलं आहे. अगदी माझ्या मुलाचं नावही ‘नील’ ठेवण्यामागे नील आर्मस्ट्राँग या माणसाचं ‘एकमेवाद्वितीय’ असणं हाच भाव आहे! माणसाच्या मनाला असलेली अज्ञाताची तीव्र ओढ आणि मानवी बुद्धीची उत्तुंग झेप या दोन्ही गोष्टींचा विस्तार अनंत अवकाशाच्या पोकळीएवढाच असावा. असो.

नमनाला एवढं घडाभर तेल वाहण्याचं कारण म्हणजे परवा ‘नेटफ्लिक्स’वर मी पाहिलेला ‘फर्स्ट मॅन’ हा चित्रपट. चित्रपटाच्या नावावरून विषय थेट स्पष्ट होत नसला, तरी नील आर्मस्ट्राँगच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे, असं सांगितलं, की त्या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट होते. ‘ला ला लँड’ या २०१६ मध्ये आलेल्या आणि माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटाचा दिग्दर्शक डॅमियन शेझेल यानंच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘ला ला लँड’चा नायक रायन गोसलिंग हाच इथेही नायकाच्या, अर्थात नील आर्मस्ट्राँगच्या भूमिकेत आहे. ‘द क्राउन’ या ‘नेटफ्लिक्स’वरच्या बहुचर्चित वेबसीरीजमध्ये तरुण राणी एलिझाबेथची भूमिका साकारणारी ब्रिटिश अभिनेत्री क्लेअर फॉय यात नायिकेच्या, म्हणजे नील आर्मस्ट्राँगच्या पत्नीच्या - जेनेटच्या - भूमिकेत आहे. ही नामावली पाहिल्यावर मी हा चित्रपट २०१८ मध्येच का पाहिला नाही, असा मला प्रश्न पडला. पण तेव्हा राहून गेलेला हा चित्रपट परवा पाहिला आणि माझे सव्वादोन तास सत्कारणी लागले. नील आर्मस्ट्राँग चंद्रावरून सुखरूप परत आल्यानंतर पत्रकारांनी जेनेटची मुलाखत घेताना तिच्या भावना विचारल्या होत्या, तेव्हा ती गमतीने ‘आउट ऑफ धिस वर्ल्ड’ म्हणते, अगदी तेच शब्द मला या सिनेमाच्या अनुभवाबाबत म्हणावेसे वाटतात. म्हणून या रिव्ह्यूचं शीर्षकही हेच!

हा चित्रपट नील आर्मस्ट्राँगच्या चांद्रमोहिमेपेक्षाही त्याआधी आणि त्या मोहिमेदरम्यान एक माणूस म्हणून त्याच्या मानसिक प्रवासाविषयी आहे, असं दिग्दर्शकानं एका मुलाखतीत स्पष्ट केलंय. नील आर्मस्ट्राँगचं यान १९६१ मध्ये एका अवकाश मोहिमेदरम्यान वातावरणाबाहेर भरकटतं, पण मुश्किलीने तो सुखरूप उतरतो, या घटनेनं सिनेमा सुरू होतो. नील आर्मस्ट्राँगचं चित्त थाऱ्यावर नसतं आणि याच कारणानं त्याला काही काळ मोहिमेबाहेर बसवलं जातं. त्याची अडीच वर्षांची मुलगी कॅरन ब्रेन ट्यूमरने आजारी आहे आणि तिच्यासाठी हर प्रकारचे उपचार शोधण्यात नीलचं मन गुंतून गेलंय. मोहिमेतून बाहेर बसावं लागण्यामागचं कारण हेच आहे. त्याचे सर्व उपाय हरतात आणि एके दिवशी त्याची मुलगी हे जग सोडून जाते. दु:खातून बाहेर येण्यासाठी नील पुन्हा एकदा ‘नासा’कडे ‘प्रोजेक्ट जेमिनी’साठी अर्ज करतो आणि सुदैवानं त्याचा अर्ज मंजूर होतो. इथून पुढचा सगळा प्रवास नील आर्मस्ट्राँग नावाच्या माणसाच्या मनाचा, त्याच्या मनात सुरू असलेल्या खळबळीचा, अज्ञाताच्या ओढीचा आणि माणसाच्या मनाच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय देणारा आहे. नील आर्मस्ट्राँग या माणसाचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या मनात हाच विचार येतो, की हा माणूस इंग्लिशमध्ये जसं म्हणतात ना, तसा कोणत्या ‘मेटल’चा बनला असेल? काय पद्धतीने तो विचार करीत असेल? आपण कदाचित परत येऊ शकणार नाही अशा मोहिमेवर जाताना मन कसं स्थिर, शांत ठेवत असेल? हा सिनेमा पाहताना या प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळतात. चित्रपट नील आर्मस्ट्राँगचा हा प्रवास दाखवताना नेपथ्याला ‘नासा’च्या मोहिमेची १९६१ ते १९६९ या काळात झालेली आगेकूच, केनेडींचं स्वप्न, सोविएत युनियनबरोबर सुरू असलेली स्पर्धा, अमेरिकेत चांद्रमोहिमेला सुरू असलेला विरोध, तिघा अंतराळवीरांना सरावाच्या वेळी झालेला अपघात आणि आगीत त्यांचा झालेला मृत्यू हे सगळंही दिग्दर्शक दाखवत राहतो. त्यामुळं हे चित्र परिपूर्ण व्हायला मदतच होते. 
यासंबंधीचे दोन सीन मला विशेष आवडले. अमेरिकेलाही ही मोहीम यशस्वी होईल, असं वाटत नव्हतं. अनुकूल परिस्थिती नसेल, तर या चांद्रवीरांनी यानातून खाली न उतरता माघारी फिरावं आणि अपोलो १२, १३ किंवा १४ मध्ये प्रत्यक्ष चंद्रावर उतरावं अशी योजना ‘नासा’ने तयार केली होती. हे चांद्रवीर प्रत्यक्ष मोहिमेला निघाले, तेव्हाच ते मोहिमेत मरण पावले तर वाचायचं एक पत्र आधीच ड्राफ्ट केलं जातं, तो प्रसंग हेलावणारा आहे. अगदी मोहिमेला निघताना नील घरात कपड्यांची बॅग आवरत असतो. तेव्हा जेनेट त्याला मुलांशी बोलायला सांगते, तो प्रसंग तर मुळातूनच बघण्यासारखा आहे. नीलला मुलांशी बोलायचं नसतं. मात्र, मुलं त्याला प्रश्न विचारतात. तो शांतपणे सांगतो, की मी चंद्रावर चाललोय. (जगात किती मुलांना आपल्या बापाकडून हे ऐकायला मिळालं असेल?) नंतर मुलं विचारतात, की किती दिवस? मग तो सांगतो, की जायला एवढे दिवस, यायला एवढे दिवस... मग एक महिना क्वारंटाइनमध्ये राहावं लागेल वगैरे. मग धाकटा विचारतो, की आमच्या शाळेतल्या स्पर्धेला तू नसणार का बाबा? तेव्हा नील उदास चेहरा करून ‘नाही रे’ असं सांगतो. थोरला मुलगा जरा कळता असतो. तो विचारतो, की तू परत न येण्याची शक्यता आहेच ना? तेव्हा एकच सन्नाटा पसरतो. थोड्या वेळानं नील अगदी शांतपणे सांगतो, की हो. तशी शक्यता आहे. पण आम्ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. झालं. आई सांगते, मुलांनो, आता झोपायची वेळ झाली, बाबाला टाटा करा आणि झोपा. कुठल्याही अनावर भावना नाहीत, अश्रुपात नाही, कढ नाहीत, काही नाही!
नील व त्याचे सहकारी प्रत्यक्ष यानात बसायला निघतात, तेव्हा लिफ्टमधून वर जाताना नीलला समोर आकाशात चंद्राची कोर दिसते. नंतर त्याच्या हेल्मेटमधे चंद्राचे प्रतिबिंब दिसते. इथपासून ते ‘अपोलो ११’च्या उड्डाणाचा सगळा थरार केवळ अनुभवण्यासारखा आहे. (त्या वेळी मात्र तीव्रतेनं असं वाटलं, की सिटीप्राइड कोथरूडच्या एक नंबरच्या स्क्रीनवर हा सिनेमा पाहायला हवा होता. मोठ्या पडद्याची जादू काही औरच! असो.) नंतर यानाचा प्रवास, नील व बझ ऑल्ड्रिनचे यानातले विनोद, प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल टाकतानाचा थरारक क्षण, ‘ए स्मॉल स्टेप ऑफ मॅन, ए जायंट लीप ऑफ मॅनकाइंड’ हे त्याचे गाजलेले उद्गार हे सगळं बघताना अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. क्षणाक्षणाला अपयश येण्याची भीती, जीव गमावण्याचा धोका, आपली माणसं पुन्हा कधीही न दिसण्याचं भय हे सगळं विसरून ज्या धीरोदात्तपणे नील आर्मस्ट्राँग या सगळ्या मोहिमेला सामोरा गेला, ते बघून आपल्याला केवळ थक्क व्हायला होतं. (सिनेमात नील चंद्रावर एका क्रेटरजवळ जातो आणि सोबत आणलेलं आपल्या लेकीचं ब्रेसलेट तिथं टाकून देतो, असा फार भावनोत्कट प्रसंग आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने तो ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणून दाखवला असावा, असं म्हणायला वाव आहे.) चित्रपटाचं साउंड डिझाइन अफाट आहे. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यानंतर चंद्रावर वातावरण नाही, म्हणजे आवाजही नाही, या वैज्ञानिक सत्याला जागून पुढची चंद्रावरची सर्व दृश्यं संपेपर्यंत पार्श्वभूमीला अजिबात आवाज वापरलेला नाही. (केवळ ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीनं सुरू असलेल्या नीलच्या श्वासोच्छ्वासाचा क्षीण आवाज येत राहतो. हा इफेक्ट अर्थात इअरफोनमुळंच कळतो. मात्र, क्रेटरमध्ये नील मुलीचं ब्रेसलेट टाकतो, तेव्हा ते थेट खाली गेलेलं दाखवलं आहे. चंद्रावरचं एक षष्ठांश गुरुत्वाकर्षण लक्षात घेता, ते ब्रेसलेट असं खाली जाणार नाही. पण एवढी चूक माफ करायला हरकत नाही.) असो.

चांद्रमोहीम फत्ते होते. नीलचं यान सुखरूप पृथ्वीवर परत येतं. अमेरिकेत आणि जगभर एकच जल्लोष होतो. ब्रिटनच्या राणीपासून ते आफ्रिकेतल्या गरीब बाईपर्यंत सगळे आनंद व्यक्त करतात. नील आणि त्याचे सहकारी शांतपणे क्वारंटाइन होतात. तिथं जेनेट भेटायला येते. मधे काच असते. सगळं जग आता जेनेटच्या बाजूला असतं आणि समोर वेगळ्याच जगात जाऊन आलेला माणूस बसलेला असतो. तो हळुवारपणे पत्नीकडे हात करतो, तीही इकडून हात टेकवते. मधे काच असते. त्यावर धुकं जमा होत जातं... या फ्रेमवर सिनेमा संपतो.
माणसाच्या विलक्षण मानसिक ताकदीची ही कथा आहे. खरीखुरी घडलेली... अगदी ५१ वर्षांपूर्वीच! आत्ताच्या वेगळ्या क्वारंटाइन काळात, लॉकडाउन काळात आपल्या जगण्याला उमेद देणारी... विजिगिषू वृत्तीने जगण्यावर प्रेम करायला लावणारी, प्रेरणा देणारी! 

----

दर्जा - साडेतीन स्टार


----

31 Jul 2020

आपले छंद दिवाळी अंक लेख २०१९ - पाऊस

पाऊस... जनांतला, मनातला!
----------------------------------

पावसाळा म्हटलं, की आयुष्यातल्या काही ओल्याचिंब आठवणींची सर बरसू लागते. पावसाळ्यातल्या खाण्याप्रमाणेच या काळातल्या आठवणीही चटक-मटक चवीच्या असतात. काही कांदा-भज्यांसारख्या कुरकुरीत अन् खुसखुशीत, तर काही लालजर्द मिसळीच्या तर्रीप्रमाणे झणझणीत... काही वाफाळत्या चहाच्या स्वादासारख्या तरतरीत, तर काही विशेष पेयांसारख्या मादक अन् उत्तेजक... पावसाळ्यातल्या पायवाटेप्रमाणेच काही आठवणीही निसरड्या, तर काही आठवणी दुष्काळासारख्या - कायमचा घाव घालून गेलेल्या! ते काहीही असलं, तरी पावसाळी आठवणींच्या गमती-जमतींची सर इतर कुठल्याही आठवणींना नाही.
लहानपणीचा पाऊस खेळगड्यासारखा सोबत करायचा. पाऊस सुरू झाला, की 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करत खेळ सुरू व्हायचा. पावसात मुक्तपणे भिजणं लहानपणी जसं जमलं, तसं नंतर कधीच जमलं नाही. नंतर सामाजिक रीतीरिवाजांचा आणि 'कोण काय म्हणेल' या भीतीचा रेनकोट जो अंगात चढला, तो नंतर उतरणं शक्यच झालं नाही. पावसाचा थेंब जेवढा शुद्ध तेवढंच तो झेलणारं निरागस बालपणही शुद्ध! ही अशी अंतर्बाह्य स्वच्छता नंतर फारशी वाट्याला आली नाही. 'दाग अच्छे है' असं मनाला पटवत राहणं एवढंच राहिलं. बाकी त्या लहानपणी कोसळणाऱ्या त्या पावसानं अविरत, संततधार आनंदच दिला. कागदी होड्यांचं आणि प्रत्येकाच्या बालपणाचं एक अद्भुत नातं आहे. म्हणून तर कवीला 'वो कागज़ की कश्ती, वो बारीश का पानी' असं लिहावंसं वाटलं. या कागदी होड्या करून पाण्यात सोडण्यात एक अपरिमित आनंद असायचा. पावसाच्या पाण्याशी आपलं नातं जुळवणारी ती चिमुकली होडी पाच-दहा फूट पळायची आणि पुढं कुठं तरी ओली होऊन बुडायची तरी किंवा फाटून संपून तरी जायची. आपलं बालपणही असंच संपून जातं. पण त्या ओल्याचिंब आठवणी मागे राहतात.
पावसाचा आणि शाळेचा संबंधही असाच 'लव्ह-हेट' पद्धतीचा. 'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' हे बालगीत एवढं अफाट लोकप्रिय होण्यामागे पावसाचा आणि सुट्टीचा असलेला अन्योन्य संबंधच असावा. आपल्याकडं शाळा आणि पाऊस दोन्ही एकदमच जूनमध्ये सुरू होतात. त्यामुळं शाळेच्या अत्यावश्यक खरेदीत शहरांत तरी रेनकोट आणि छत्री असतेच. माझं बालपण तालुक्याच्या गावात गेलं. कित्येक मुलांच्या पायांत चपलांचादेखील पत्ता नसायचा, तिथं रेनकोट आणि छत्र्या कुठल्या असायला? अनवाणी पावलांनी, चिखलयुक्त रस्ता तुडवत शाळेला जायचं. आमच्या शाळेभोवती कधी तळं साचून सुट्टी मिळाली नाही, पण शाळेच्या मागेच एक तळं होतं. तिथं म्हशी डुंबत असायच्या. वर्गातून कधी कधी ते दृश्य दिसायचं. बाहेर पाऊस कोसळत असताना वर्गात बीजगणित, भूमिती वगैरे विषय बोअर व्हायचे. पण मराठी, इतिहास, भूगोल असे विषय आवडायचे. त्यातही मराठीतल्या कविता शिकायला, ऐकायला मजा यायची. भूगोलातही 'पाऊस कसा पडतो' इथपासून ते बारमाही नद्या, धरणं यांची माहिती वाचताना समृद्ध झाल्यासारखं वाटायचं. पाऊस आणि आपलं जगणं यांचा काही तरी फार महत्त्वाचा संबंध आहे, हे शाळेतच समजायचं. मग 'मान्सून' आणि त्याच्या नाना कळा शिकायला मिळाल्या. शाळेतले पहिले काही दिवस म्हणजे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या वासाचे आणि पावसाने ओल्या झालेल्या धरतीच्या वेडावणाऱ्या सुगंधाचे...! या दिवसांचं स्मरणरंजन म्हणजे जगातल्या सर्वांत मौल्यवान अत्तराची कुपी! कधीही उघडावी आणि त्या धुंद वासानं मन नादावून जावं... याच काळात शाळेत नवे मित्र यायचे. काही सोडून जायचे. तेव्हा लहानपणी मित्रांना, नातेवाइकांना पोस्टानं कार्डं लिहायचो. खुशाली कळविण्यामधला महत्त्वाचा मजकूर हा पावसासंबंधीचा असायचा. इकडं पाऊस सुरू आहे, तुमच्याकडं येतोय का, असा मजकूर असायचाच. मित्राचं पत्र आलं, की तो पूर्ण दिवस आनंदात तरंगत राहायचं. पुनःपुन्हा ते पत्र काढून वाचायचं. जरा मोठे झालो आणि वर्गात मुलीही आल्या! मग आयुष्य निरागस राहिलं नाही. अर्धवट वय होतं. काही कळायचं नाही. पण पलीकडल्या बाकांविषयी काही तरी आतून गुदगुल्या करणारं असं वाटायचं. पाऊस हा तर अशा भावनांना खतपाणी घालणारा रोमँटिक ऋतू. मग मनातल्या मनातच पाऊस पडायचा, इंद्रधनूही उगवायचं, चंद्रही दिसायचा, चांदणंही लखलखायचं. असा सगळा निसर्ग शरीराच्या पेशीपेशींत कसल्या तरी अनाम आकर्षणाची पेरणी करून जायचा. त्या वयातले ते सगळे दिवस सगळेच असायचे. त्या वेळच्या सगळ्या नाजूक भावनांना पावसाची सोबत असायची. म्हणून तर स्मरणरंजनाचा एक धागा पावसाशी कायम जोडलेला असतो. पाऊस पडू लागला, की मागच्या सगळ्या पाऊसवेळा आठवतात आणि डोळ्यांत पुन्हा पाऊस उभा राहतो. चांगल्या आठवणींची याद येते, तशाच काही गमतीशीर आठवणी आठवून हसायलाही येतं. पावसात अनेकदा झालेली फजिती आठवते. समोरच्या गाडीनं आपल्या शाळेच्या नव्या कोऱ्या ड्रेसवर उडवलेली चिखलाची नक्षी आठवते आणि आपण चिडून त्या गाडीच्या दिशेनं फेकलेले दगड आठवतात. मित्राच्या घरी वाढदिवसाला जाताना, छत्री न घेताच निघाल्यानं पावसानं नवे कोरे कपडे भिजलेले आठवतात. तशाच अवस्थेत तिथं कापलेला केक, नंतर मित्राच्या लक्षात येऊन त्यानं बदलायला दिलेले कपडे... असं सगळं आठवत जातं. न वाळणारे कपडे हा तर एक थोर प्रकार याच काळात घडत असतो. ते कपडे वाळवण्यासाठी घाईघाईत केलेली इस्त्री आणि कधी तरी त्या नादात कपडेच जाळून टाकण्याचे किस्से हे सगळं आठवतं.

लहानपणचा पाऊस आणि तेव्हाच्या आठवणीही अशा निरागसच असतात. मग आपण मोठे होतो. पावसाच्या आणखी गमतीजमती कळू लागतात. आपण वयात येऊ लागतो, तसतशी कविता नावाची एक गोष्ट आपल्या आयुष्यात येऊन दाखल होते. एखाद्या बोअर तासाला किंवा ऑफ तासाला, बाहेर तुफान पाऊस कोसळत असताना वहीच्या मागच्या पानावर कवितेसारख्या कुठल्याही चार ओळी खरडल्या नाहीत, असं क्वचितच कुणी असेल! या कवींचं आणि पावसाचं नातं काय विचारता! अहाहा! यांचं नातंही गमतीशीर, पण प्रेमाचं! मुळात समस्त पावसाळी कवीमंडळींनी पावसाला प्रियकर किंवा प्रेयसीचीच उपमा देऊन त्याला अगदी आपल्यातलाच एक करून टाकलाय. पावसाळा सुरू होण्याची नुसती चर्चा जरी झाली, तरी कवीमंडळींना कविता 'होतात', म्हणे. पण खरंच पाऊस हा सर्जनाचाच ऋतू आहे. आपली सगळी परंपरा कृषीसंस्कृतीची आहे. या कृषीसंस्कृतीत पावसाचं महत्त्व काय, हे सांगायला नकोच. पहिल्या बीजाचं रोपण आणि भरणपोषण व्हायला पहिला पाऊस पडायलाच हवा. शेतीतलं धनधान्य हे समृद्धीचं प्रतीक, तसंच सर्जनाचंही! त्यामुळंच नवं काही उगवून येण्यासाठी पावसाची हजेरी ही हवीच. अगदी मनातल्या भावभावना उमलून येण्यासाठीही आजूबाजूचा निसर्ग अनुकूल असावा लागतो. कडक उन्हात, घामाच्या धारा लागलेल्या असताना प्रेमकविता सुचणं अंमळ कठीणच. याउलट थंडगार वारं सुटलं, जमीन शांतावली, झाडं हलू लागली आणि पाऊस आला, की आपल्या मनातल्या सर्जनालाही सहजीच अंकुर फुटतात. ही अभिव्यक्ती बाहेरच्या कुणाला भले कितीही हास्यास्पद वाटो, आपल्याला ती आनंदच देऊन जाते. जगण्यासाठीचं एक सबळ कारण पुरवून जाते. पावसाबरोबरच आपल्याही आतून काही तरी फुलून येतंय, ही भावना वास्तविक आनंदाचीच. पण आपल्याकडं या अभिव्यक्तीची नीट कदर होत नाही. 
कवी आणि पावसाच्या कविता यांची जेवढी टर उडविली गेली असेल, तेवढी अन्य कशाचीही उडविली गेली असेल, असं मला वाटत नाही. वास्तविक पाऊस पडला, की सगळ्यांनाच छान वाटतं. हे छान वाटणं शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर असतं. उन्हाळ्यातला असह्य दाह कमी झालेला असतो. शरीराची तलखी संपून जाते. मग आपोआप चित्तवृत्तीही फुलून येते. अशा वेळी माणसाला व्यक्त व्हावंसं वाटतं. मग कुणी गाणं म्हणतं, तर कुणी चित्र काढतं, कुणी नाचायला लागतं, तर कुणी वाद्य वाजवतं, कुणी भटकायला जातं, तर कुणी फोटो काढतं... या सगळ्यांत कविता करणं सगळ्यांनाच सोपं वाटतं. 'ट'ला 'ट' जोडला, की झालं. बालकवी किंवा कुसुमाग्रजांसारखी प्रतिभा सगळ्यांकडे कुठून येणार? मग सुमार कवितांचं एक वेगळंच पीक येतं. या कविता पूर्वी खासगी मैफलींत किंवा फार तर वृत्तपत्रांतच पाहायला मिळत. आता सोशल मीडियामुळं प्रत्येकाला आपली ती 'खास' पावसाळी कविता टाकायची संधी मिळाली आहे. मग ती कोण सोडणार? कांदाभज्यांचं आणि या पावसाळी कवितांचं प्रस्थ फारच वाढलं, तशी मग आपोआपच त्यांची टिंगल व्हायला लागली. पावसाळ्यात होणाऱ्या काव्य मैफली म्हणजे तर अचाट प्रकार असतो. तोटी नसलेल्या नळातून अखंड पाणी गळत असावं, तसं या कथित मैफलींतून कवितांमागून कविता गळू लागतात. इयत्ता पाचवी 'ब'मध्ये शिकणाऱ्या एखाद्या वर्षाराणीपासून ते विद्यापीठात पीएचडी सादर करणाऱ्या एखाद्या प्रा. जोशीकाकांपर्यंत सगळ्यांनाच कविता होऊ लागतात आणि त्या ऐकवण्याची खुमखुमीही येते. अशा वेळी 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत त्या कविता ऐकणे हा एकच पर्याय उरतो. तिकडं गुलज़ारांनी 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे' लिहिलं, की आमच्याकडच्या नवोदित कवीनं 'पावसात जाताना दिसलीस तू, स्वप्नातल्या परीवाणी भिजलीस तू, माझ्याकडं होती एक छत्री, पण त्यात तू येईनास भित्री' वगैरे लिहून त्यावर सूड उगवलाच म्हणून समजा. 'कविता म्हणजे आकाशीची वीज. ती धरू पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव जण जळून खाक होतात,' वगैरे केशवसुतांनी म्हटलं असलं, तरी पावसात हे नवोदित कवीलोक कवितांपाठोपाठ कविता सादर करून समोरच्या प्रेक्षकांवर विजा कोसळवत असतात. समोरच्या शंभरपैकी नव्व्याण्णव श्रोते त्यात जळून खाक होतात. (जो एक उरतो, तोही शेवटी उठून मंचावर जातो आणि आपली कविता सादर करतो.) पावसाळ्यात माणसाच्या पचनसंस्थेवर एकूणच विपरीत परिणाम होतो. त्यामुळं पावसाळ्यातच आपल्याकडं चातुर्मास पाळतात. वांगी आदी वातुळ पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. मात्र, कवीमंडळी बहुदा चातुर्मास पाळत नसावेत. त्यामुळं ते कविता सादर करायला मंचावर आले, की त्यांच्यातली वातप्रकृती जागी होते. ते वेडवाकडे हातवारे करू लागतात. प्रेमळ कविता असेल, तर ठीक; पण कवितेत बंडखोरीची 'वात' पेटलेली असली, तर प्रेक्षकांना वात आलाच म्हणून समजा. हे असलं वातुळ खाऊन, बिघडलेल्या पोटानं केलेली निर्मिती कशी काय सकस वगैरे असेल! 
पावसाळ्यातच अनेक प्राणी, पक्षी व कीटकांचा मीलनाचा काळ येतो. बेडूक आदी मंडळी त्यांच्या उन्हाळी निद्रेतून जागे होऊन मादीसाठी 'डराव डराव'ची आर्त साद घालू लागतात, तशीच काही कवी मंडळी आपल्या उन्हाळी 'हायबरनेशन'मधून जागे होऊन फेसबुकादी 'सायबर नेशन'मध्ये प्रविष्ट होतात आणि प्रेमकवितांचा रतीब घालून, 'जे 1 झालं का?' असं विचारायला कुणी आपल्यासारखीच विव्हल कवयित्री भेटते का, ते बघू लागतात. श्वानजगतातील 'भाद्रपदा'ची ख्याती तर प्रसिद्धच आहे. ते बिचारे प्राणी असल्यानं त्या एकाच महिन्याशी एकनिष्ठ असतात. 'सायबर नेशन'मध्ये बाराही महिने 'भाद्रपद' सुरू असतो. थोडक्यात, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याप्रमाणेच माणूस या प्राण्याच्याही रोमँटिक वृत्तीला या पाऊसकाळात अगदी बहर येतो. वेगळ्या अर्थानं 'सर्जनशीलते'चा अक्षरशः धुमाकूळ सुरू होतो. अशा वेळी पावसाळ्यात बुंदी पाडावी तशा कविता पाडणाऱ्या कवीमंडळींच्या कवितांमध्ये प्रेमकवितांना पूर यावा, यात नवल नाही. चारोळ्यांपासून ते कथित खंडकाव्यापर्यंत प्रेमाचे नाना आविष्कार कवितेतून बदाबदा कोसळू लागतात. या अशा प्रेमवीरांना पावसाळी पर्यटनाचा किडा चावला, की मग तर काही विचारायलाच नको! पाऊस सुरू झाला रे झाला, की जवळचा एखादा गड, एखादा ओसाड किल्ला, एखादं बारकुडं धरण किंवा कुठल्या तरी शंकराचं डोंगर-दरीत असलेलं देवस्थान गाठायला या प्रेमवीरांची अगदी झुंबड उडते. एखाद्या तळ्यावर शेवाळं साठावं तसे त्या किल्ल्यावर किंवा गडावर या प्रेमीलोकांची गर्दी दिसते. बाइक चालविणाऱ्या, एखाद्या लुकड्यासुकड्या आणि झँगपँग गावठी गॉगल लावणाऱ्या हिरोच्या मागं तशीच कडकी कन्यका बसलेली असते. त्याला तो सलमान आहे असं वाटत असतं आणि तिला कतरिना! अशा या प्रेमवीरांच्या टोळ्याच्या टोळ्या वानरांसारख्या या गडावरून त्या गडावर (किंवा खरं तर या झाडावरून त्या झाडावर) उड्या मारत असतात. प्रेमात पडलेल्यांना कुठलीही भीती अथवा लज्जा नसते, हे जगजाहीर आहे. त्यामुळं ऐतिहासिक वारसास्थळं असलेल्या त्या वास्तूंच्या सान्निध्यात ही मंडळी वेगळाच इतिहास लिहिण्याच्या मागं लागलेली असतात. तरी पूर्वीचे ते वासू आणि सपना आता पुष्कळ कमी झाले. तरी काळ्या दगडी भिंतींवर पांढऱ्या खडूनं बदाम वगैरे काढून त्यात तिरका बाण रेखाटून मध्ये आपलं नाव लिहिणारी दिवटी जमात अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. कुठल्याही प्रेमवीराला सर्वांत गरजेची गोष्ट कुठली आहे, असं विचारलं, तर तो सांगेल - आडोसा! उडप्याच्या हॉटेलमध्ये गेल्यावर कुठला डोसा पाहिजे, असं विचारल्यानंतर 'आडोसा' असं उत्तर देणारी हीच ती जमात! एकदा हा तो आडोसा नवसानं लाभला, की यांच्या पुढच्या सगळ्या नवसांची तयारी जवळपास तिथंच पूर्ण होते. रंगीत तालीमच म्हणा ना हनीमूनची! अनेकदा तर हा प्रेमालाप एवढ्या थराला जातो, की त्यांना जागं करून सांगावंसं वाटतं, 'मित्रा, अरे, हनीमूनसाठी थोडं शिल्लक ठेव रे... इथंच उरकणारेस का सगळं?' पण मग आपल्याला आपल्या टीनएजमधले दिवस आठवतात आणि 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' म्हणून आपण गप्प बसतो. 
बाकी पावसाळा आणि प्रेमीजन यांचं हे नातं भारीच आहे. दर शनिवार, रविवारी लोकलला लटकून किंवा बाइकवर स्वार होऊन, लोणावळा गाठणारी अतिउत्साही तरुणाई बघायची. पाऊस पडल्या पडल्या एकदा सिंहगडावर जाऊन तिथली कांदाभजी खाणे आणि दुसरं म्हणजे लोणावळ्यात जाऊन त्या भुशी डॅमच्या पाण्यात उघडंबंब होऊन बसणे या दोन गोष्टी केल्या नाहीत, तर पुण्यातल्या तरुणाईमध्ये तो 'फाउल' धरला जातो. याशिवाय लवासा, मुळशी, हाडशी, ताम्हिणी, वरंध, माळशेज, आंबोली आदी ठिकाणं तर देवानं सह्याद्रीमध्ये खास पावसाळ्यात लोकांना वेडाचार करण्यासाठीच निर्माण केली असावीत, अशी दाट शंका येते. सह्याद्रीतली एकही धबधबा किंवा एकही घळ आता अनाघ्रात राहिली नसेल. प्रत्येक दगडा-दगडावर आमच्या 'दगडू आणि प्राजक्ता'ची प्रेमफुले पडलेलीच असणार. पण बाकी इतर कुठल्याही चाळ्यांपेक्षा धबधबे गाठून, त्याखाली उघडे होऊन भिजणे हा एक खास विशेष सोहळा आहे. पहिल्यांदा जाणाऱ्या हौशी पर्यटकांना हे जमत नाही. त्यासाठी विशेष नैपुण्य प्राप्त करावे लागते. धबधबा पर्यटनाची रेसिपी येणेप्रमाणे - एक तर तुम्ही एकटे-दुकटे जाण्यात अर्थ नसतो. किमान दहा लोकांचा ग्रुप घेऊन जावे. एसयूव्हीचे धूड सोबत नेले तर विशेष प्रभाव पडतो. त्यातही मोठमोठ्याने स्पीकरवर वाह्यात गाणी लावावीत. काचेतून मुंडके बाहेर काढून माकडालाही लाजवतील असे चाळे करावेत. आपण जेथे चाललो आहोत, त्या भागातला सर्वांत मोठा धबधबा निवडावा. तिथं गाडी शक्यतो रस्त्यात मधोमध लावावी. होता होईल तो सगळे कपडे गाडीतच काढून ठेवावे आणि अर्धनग्न अवस्थेत धबधब्याकडे कूच करावे. आपला अवतार बघूनच तिथले साधेसुधे लोक पळून गेले पाहिजेत. एका हातात मद्याची बाटली असेल तर ही दृश्यचौकट विशेष खुलते. नरड्यातून जेवढा शक्य आहे तेवढा किंकाळीसदृश टाहो फोडावा. आयुष्यात प्रथमच पाणी बघितल्यासारखा चेहरा करून, वेगवान हालचाली करून धबधबा गाठावा. मधली धार पकडून डोईवर घ्यावी. शक्य झाल्यास माकडासारख्या उड्या माराव्यात. नंतर आयुष्यात प्रथम अंगाला पाणी लागल्यासारखे सर्वांग घुसळावे. हे करताना किंचाळणे सुरूच ठेवावे. आपल्या या विलोभनीय कृतीने आसमंतातील पक्षी उडून जातील, कीटक दडून बसतील, सरिसृप वर्ग लपून जाईल आणि जलचर पाण्यातल्या पाण्यातच जीव देतील! हे साधलं तरच तुम्ही खरे व्यावसायिक, परिपूर्ण धबधबा पर्यटक! आपल्या राज्यात अशा अनेक व्यावसायिक पर्यटकांनी आपला सगळा सह्याद्री पादाक्रांत करून टाकला आहे. कवी केशवसुत म्हणाले होते, 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे दिसताहेत', त्याच चालीवर सह्याद्रीत कुठंही गेलं, की आपली ही महान पर्यटक भावंडे दिसतातच. त्यांना लांबूनच नमस्कार करावा आणि आपल्या वाटेनं चालू पडावं, हेच खरं.
पर्यटनासोबतच पावसात शहरातल्या शहरात आपली गाडी चालवण्याची गंमत अशीच न्यारी. पावसात चारचाकी बाहेर काढणारा हा, पुलंच्या भाषेत सांगायचं, तर आमच्या शहरात भोपळे बांधून पोहणाऱ्याएवढाच बावळट समजला जातो. इथं बाइकच हवी. त्यातही बाइकच्या मागच्या चाकाला मडगार्ड लावलेले असले, तर तो फाउल धरला जातो. जोरदार पावसात मागच्या चाकातून रस्त्यावरचे चिखलयुक्त पाणी मागच्याच्या अंगावर उडवत जाणे हे आमच्याकडे खऱ्या मर्दाचे लक्षण मानले जाते. पावसाळ्यात शक्यतो सिग्नल बंदच ठेवले जातात. उगाच लोकांना पावसात भिजत सिग्नलला उभे राहायला लागू नये, हाच त्यामागचा चांगला विचार असतो. अशा बेधुंद, बेभान वाहतुकीत आपली बाइक तीरासारखी काढत पुढं पुढं नेणं हे विशेषातले विशेष नैपुण्य मानले जाते. या शहरातला पोरगा वयाचे सोळावे वरीस गाठले, की लायसन्स मिळायच्या आधी हे कौशल्य प्राप्त करतोच. पावसाळ्यात नेहमीच्या रस्त्याने बाइक हाकणे हे तसे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते. शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या फूटपाथवरून गाडी चालवत पुढं पुढं नेणे हेच खऱ्या कर्मयोग्याचे लक्षण होय. वरून धो धो पाऊस सुरू असताना सुपरफास्ट वेगात बाइक पळविणे याला वाघाचे काळीज लागते. आपल्या शहरातील हजारो युवकांनी हे काळीज कष्टाने मिळविले आहे. त्यात ती स्पोर्ट बाइक असेल आणि मागे एखादी कन्या बसली असेल, तर गाडीला विशेष वेग येतो. या गाडीचा पार्श्वभाग शेळीच्या शेपटासारखा असतो. 'धड माशीही वारली जात नाही आणि अब्रूही झाकली जात नाही,' अशी शेळीच्या शेपटाची स्थिती असते. तीच गत या बाइकची असते. उंचच उंच तिरकी चढत गेलेली मागची सीट आणि त्यावर समोरच्या मदनाच्या पाठीवर 'झोकून देऊन' बसलेली त्याची रती हे दृश्य बघून अनेकांना लहानपणी बघितलेली 'विक्रम और वेताल' मालिकाच आठवते. त्यात तो वेताळ त्या विक्रमाच्या पाठीमागे अगदी अस्साच बसलेला असतो. अशी ही भयावह जोडी रस्त्यातल्या प्रत्येकाला मरणभय दाखवीत मार्गक्रमणा करीत पुढे पुढे जात राहते, तेव्हा 'राम राम' म्हणत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं.
पावसाळा आला, की आजारपण आलंच. ओल्या हवेनं कपडे वाळत नाहीत. घरभर सगळीकडं आतले बाहेरचे कपडे वाळत घातलेले दिसतात. त्या ओल्या वासानं कसंसंच व्हायला लागतं. पण इलाज नसतो. मग जुने कपडे बाहेर येतात. इस्त्र्या फिरवायला सुरुवात होते. ऑफिसची घाईची वेळ, त्यामुळं प्रत्येकाला सकाळी ऑफिसच्या दिशेनं धावत सुटायचं असतं. त्या घाईत आजारपण आलं, तर संपलंच. पण त्याला आपणच जबाबदार असतो, कारण या पावसाळी हवेत पाणीपुरी, भेळ, कांदाभजी, मिसळ असलं अरबट-चरबट खाण्याचा मोह होतोच. पोटाची इच्छा नसताना, जिभेचे लाड पुरवले जातात. मग कधी तरी पोटाचं बंड होतं. लगेच डॉक्टरकडं पळायची वेळ येते. नेमकी पावसाळ्यात सगळ्या डॉक्टरांची क्लिनिकं भरून वाहत असतात. खासगी हॉस्पिटलांमध्येही जागा नसते. सरकारी दवाखान्यांची अवस्था तर काही विचारूच नका. तिथली गर्दी बघून आजारी पडल्याचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर कुठलं तरी साधंसं इन्फेक्शन होतं आणि आपलं नाक पार चोंदून जातं. बाहेरची गर्दी आधीच असह्य झालेली असते, त्यात ही आतली सर्दी! अशा वेळी मग माणूस सर्द न झाला तरच नवल! थोडक्यात निभावलं, तर ठीक; नाही तर हॉस्पिटलात अॅडमिट व्हायची वेळ येते. तिथल्या गमती-जमती आणखी वेगळ्या. पावसाळी हवेत औषधांचा वास मिसळला, तर असह्य असा वास तयार होतो. हा वास नाकात बसला, तर जगणं असह्य होऊन जातं. त्यामुळं शक्य तो आजारी पडू नये, याकडं लक्ष द्यावं. पावसाळ्यात सगळ्यांत आनंदी असतात ते डॉक्टर, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. 'यमज्येष्ठसहोदरा'चं सगळं देणं देऊन झालं, की आपले खिसे पूर्ण रिकामे झालेले असतात, हे नंतर लक्षात येतं.
असा हा पावसाळा... अस्मादिकांना हा ऋतू आवडतो, नाही असं नाही. पण पावसाळा सुरू होताना मन उदास होतं, हेही खरं. याचं कारण शाळा आणि कॉलेजमधल्या दिवसांशी आहे. मोठ्या शहरात पहिल्यांदाच शिकायला आलेल्या मुलांना हा अनुभव आलेला असेल. शहरातली सर्व मोठी कॉलेजे आणि शिक्षण संस्था भक्कम दगडी बांधकामात उभ्या आहेत. तिथं जाताना त्या थंडगार इमारतीचंच दडपण येतं. आपल्या छोट्या घरातल्या भिंती देत असलेली ऊब इथं अजिबातच नसते. उलट त्या दगडी भिंतींचा अजस्र थंडपणा अंगावर येतो. आपण एकटेच असतो. कुठं तरी होस्टेलला नुकताच प्रवेश मिळालेला असतो. गावातले आत्तापर्यंतचे मित्र आता दुरावलेले असतात. इथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा असतो. सगळंच नवीन असतं. अशाच वातावरणात मान्सूनचा संततधार पाऊस सुरू होतो. होस्टेलच्या दाट झाडी असलेल्या इमारतीभोवती अजूनच अंधारून येतं. अशा वातावरणात वर्गात जावंसं वाटत नाही. गेलो तरी शंभर अनोळखी मुला-मुलींमध्ये एकटं एकटं वाटू लागतं. उंच छताच्या कोपऱ्यात वळचणीला बसलेल्या भिजलेल्या एकांड्या कबुतरात आणि आपल्यात विलक्षण साम्य वाटायला लागतं. लेक्चरमधे लक्ष लागत नाही. मुळात काय शिकवत आहेत, तेच समजत नाही. लेक्चर संपलं, की आपण गुपचूप बाहेर येतो. बाहेर सगळी मुलं हसत-खिदळत कँटीनला जातात. आपल्याला अजूनही कुणी जवळचं मित्र नसतं. होस्टेलच्याच तीन-चार मुलांचा ग्रुप जमतो. आपण बळंच त्यांच्यात सामील होतो. कँटीनला गेलो, तरी त्यांच्या गप्पांमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. गावची, घराची आठवण येत राहते. बाहेरचं कुंद वातावरण पावसामुळं अजूनच दमट-घामट-कोंदट झालेलं असतं. आपल्याला आतल्या आत गुदमरायला लागतं. आत्ताच्या आत्ता गाडी पकडून गावी निघून जावं, असं वाटू लागतं.
अशा वेळी मग जे भाग्यवान असतात, त्यांना कुणी तरी जिवा-भावाचं माणूस भेटतं. मग ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. हातात हात गुंफले जातात आणि पावसाळा सुखाचा होतो. पुढचे सगळे पावसाळेही सुखाचे जातात. आयुष्यभर आनंदाच्या सरी कोसळत राहतात. दुर्दैवानं ज्यांना कुणी भेटत नाही, त्यांच्या आयुष्यात पुढंही गावातल्यासारखाच दुष्काळी रखरखाट कायम राहतो. कुठंच कसलीच ओल म्हणून राहत नाही. आपण आतून आतून कोरडे होत जातो. पाऊस असतानाही रडवतो आणि नसतानाही रडवतो, तो असा!
म्हणूनच पावसाळा म्हटलं, या अशा ओल्या आठवणी मनात दाटून येतात. त्यातल्या काही जनांतल्या असतात, तर काही मनातल्या! ज्या जनांतल्या असतात, त्या गमतीदार असतात; पण ज्या मनातल्या असतात, त्या कधी मोरपिशी असतात, तर कधी कडव्या...!! 
तो पाऊस मात्र सर्व काळ सारखाच असतो - अगदी स्वच्छ, निर्मळ अन् पवित्र!!

---

17 Jul 2020

रिव्ह्यू – जानू

हरवलेल्या मोरपिसाची मधुर मोहिनी...
----------------------------------------------


शाळेत असताना प्रेमात पडतोच आपण. तेव्हा कळतच नसतं, की त्या प्रकाराला नक्की काय म्हणायचं? प्रेम असतं का खरंच? की त्या पौगंडावस्थेतलं केवळ शारीरिक आकर्षण? काहीही म्हणा, पण कुणी तरी आवडतं, बस्स... आणि मग बाकी काही सुचतच नाही. हवेवर तरंगणाऱ्या मोरपिसासारखं मन हलकं हलकं होऊन जातं. समोर फक्त ती (किंवा तो) दिसत राहते. अहोरात्र तिचाच विचार मनात येत राहतो. पण मनातलं प्रेम व्यक्त करता येतंच, असं नाही. शंभरातल्या किमान ८० जणांना तरी ते नसेलच करता येत! नकाराची भीती वाटत राहते, विशेषतः मुलांना.... पुढं शाळा संपते. आपापले रस्ते वेगळे होतात. पुढं लग्नं होतात, संसार सुरू होतात. तरी ती सध्या काय करते याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटणं सहज शक्य झालंय. शाळांची रियुनियन म्हणजे जुन्या प्रेमांची गॅदरिंगंच झालीयत जणू. तिथं बहुतेकांना आपापलं जुनं प्रेम दिसतं. वस्तुस्थितीचं भान येतं आणि मनातलं मोरपीस मनातच कोमेजून जातं. काही भाग्यवानांचं मात्र प्रेम टिकतं... कायम राहतं. अशा भेटीच्या वेळी मग हृदय दहावीतल्यासारखंच दुप्पट वेगानं धडधडू लागतं. जुन्या आठवणी आषाढातल्या कृष्णघनांसम आवेगानं कोसळू लागतात. मेंदू बधिर होतो. हाता-पायांना कंप सुटतो... ती अशी समोर येते आणि आपण अक्षरशः कोसळतो. नंतर आपल्याला कळतं, की ती परदेशातून आलीय. मोठ्या मुश्किलीनं मुलीला घरी ठेवून तिनं यायचं जमवलंय. पहाटेच्या फ्लाइटनं ती परत जाणार आहे. हातात केवळ काही तास आहेत. तिचा सहवास लाभणार आहे तो तेवढाच काळ... आता या काळातल्या प्रत्येक क्षणावर कादंबरी होऊ शकते, महाकाव्य लिहिलं जाऊ शकतं, कवितांचा पूर येऊ शकतो आणि आठवणींच्या चांदण्यांनी मनाचं आकाश लखलखू शकतं.
सी. प्रेमकुमार दिग्दर्शित 'जानू' या तेलगू चित्रपटाचं कौतुक अशासाठी, की त्यानं या सर्व शक्यता आजमावल्या आहेत. प्रेमाची नवी गाथा सांगितली आहे. खरं तर ती नवी नाहीच, पण तिच्यातली तरलता मात्र नवी भासू शकते. आपल्या आजूबाजूचं सर्व जग आणि एकूणच अभिव्यक्ती व्यवहारी आणि रोकडे हिशेब मोजणारी होत असताना, एवढं नितळ, स्वच्छ काही असू शकतं का, यावरचा आपलाच विश्वास उडण्यासारखी परिस्थिती आहे, म्हणूनही ही तरलता नवी भासू शकते.
खरी गोष्ट अशी आहे, की या कलाकृतीतून आपल्यात पूर्वी असलेली आणि आता कुठे तरी हरवून गेलेली निरागसता आपल्याला अशी जुन्या प्रेयसीसारखी अवचित गवसते. त्या प्रेमातील निरागसता आणि निरागसतेवरचं आपलं प्रेम दोन्ही आत्ताच्या रुक्ष जगात गवसण्याची एक शक्यता ही कलाकृती निर्माण करते आणि म्हणूनच मला तिचं खूप खूप मोल वाटतं. 
चित्रपटाची सुरुवात आणि मध्यंतरापर्यंतचा भाग एरवीच्या शालेय प्रेमपटांसारखाच पुढं सरकतो आणि आपल्याला पुढं काय होणार याचा काहीसा अंदाज येतो. मात्र, चित्रपटाची खरी जान आहे तो याचा उत्तरार्ध. तो फक्त आपल्या नायक-नायिकेचा आणि त्यांच्यातल्या त्या खास क्षणांचा आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, याचा काहीएक अदमास यातून येऊ शकतो. ज्यांनी कधी तरी एकदा का होईना, असं निस्सीम प्रेम केलंय, त्यांना यातल्या अबोध प्रेमाची तरलता कळू शकेल. नायक-नायिका एकदाही अंगचटीला न येता, शारीर स्पर्शाविना प्रेमाचं एवढं उत्कट दर्शन घडवू शकतात, यावर हल्ली कुणाचाच विश्वास बसायचा नाही. पण जानू असं प्रेम दाखवतो. किंबहुना हा अशक्य वाटणारा प्रेमाचा पैलू फार ठळकपणे दाखवतो आणि त्यातली हवीहवीशी अशक्यता स्वप्नवत सत्यात उतरवून दाखवतो. म्हणूनच भिडतो.
'जानू'चा सगळा प्राण हा त्या दोघांच्या त्या अव्यक्त क्षणांमध्ये आहे. तिला लिफ्ट द्यायची आहे हॉटेलपर्यंत... तिथून पहाटे एअरपोर्टला सोडायचंय.... मधल्या काळात भूतकाळाची सगळी उजळणी होते. कुठं काय चुकलं हे समजत जातं. ती उन्मळून पडते. एक लहानशी चूक निमित्तमात्र झालेली असते. आता काळाची चक्रं उलटी फिरवणं अशक्यच असतं. पण फ्लाइटची वेळ होईपर्यंतचा प्रत्येक क्षण तिला त्याच्यासोबत काढायचा असतो. मग दोघे हॉटेलमधून बाहेर पडतात. तिला त्याला दहावीच्या रूपात पाहायचं असतं. मग सलूनमध्ये जाऊन आधी ती त्याची दाढी करवून घेते. नंतर शहरातल्या सुनसान रस्त्यांवर दोघे भटकत राहतात. प्रत्येक क्षण असोशीनं जपू पाहतात. मेट्रोनं फिरतात. कॅफेमध्ये जातात. तिथं त्याच्या विद्यार्थिनी भेटतात. तिला त्याची पत्नी समजतात. गप्पा मारतात. तीही भूतकाळातली घटना तिला जशी घडायला हवी होती, तशी रचून सांगते. तो ती ऐकताना अस्वस्थ होतो. अखेर त्या मुली जातात. नंतर त्याच्या घरी जातात दोघं. दारातून पाऊल आत टाकताना आवर्जून तो तिला उजवा पाय आधी टाकायला सांगतो. पावसानं भिजलेली ती त्याच्या बाथरूममध्ये जाते. अंघोळीला त्याचाच साबण वापरते. तो संकोचानं तिला टॉवेल व त्याचे शर्ट देऊ पाहतो. ती निश्चिंतपणे त्याचा शर्ट घालते. शर्टचा गंध घेऊन पाहते... तो कॉफी करतो... गॅलरीत दोघं गप्पा मारतात... तिला त्याचं लग्न व्हावं, असं वाटतंय, त्याला मुलं झालेली बघायची आहेत. ती हे सगळं असोशीनं त्याला सांगत राहते... त्याला भूक लागलेली असते. ती त्याच्या स्वयंपाकघरात जाते, खायला करते. तो तिच्यासमोर बसून मांडी घालून बसतो आणि खात राहतो. तिच्यातल्या प्रेयसीतलं हे मातृस्वरूप दर्शन प्रेमाची उच्च प्रत दाखवून जातं. एका टप्प्यानंतर हेच उरतं ना खरं तर... एकमेकांची काळजी, जिव्हाळा, माया.... एवढंच राहतं. शारीर आकर्षणापलीकडं गेलेलं हे प्रेम... अचानक लाइट जातात. तो बॅटरी आणायला धावतो. ती एकदम 'यमुना तटी...' म्हणायला सुरुवात करते. राधाकृष्णाचं हे गाणं... त्यानं शाळेत अनेकदा फर्माइश करूनही तिनं कधीच न म्हटलेलं! आज असं अचानक त्याच्या घरात ती म्हणते. त्यांच्यातल्या उत्कट प्रेमाचा हा सर्वोच्च क्षण असतो... ती शांतपणे त्याच्या बेडवर पडते. श्रमानं तिचा डोळा लागतो. तो खाली जमिनीवर निजतो. पण झोप येत नाहीच. तो पाहत राहतो तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडं... आता काही काही नको असतं. हृदय उचंबळून येतं, मन भरून येतं.... 'क्षण एक पुरे प्रेमाचा', तो हाच...
अखेर तिचा जाण्याचा क्षण येतो. दोघं तिच्या हॉटेलवर येतात. कारनं एअरपोर्टला जायला निघतात. एअरपोर्ट जवळ येतो, तसं तिला जाणवतं, की हे सगळं लवकरच संपणार आहे. तिचा हात नकळतपणे गिअरवर जातो. तो बघतो. तिच्या हातावर हात ठेवून गिअर बदलत राहतो. शेवटी ती न राहवून म्हणते, मला अजून तुझा थोडा वेळ हवाय. मग तो चक्क तिच्या विमानाचं आणखी एक तिकीट स्वत:साठी काढतो. दोघंही आत जातात. मूकपणे एकमेकांची सोबत अनुभवत राहतात. पण शेवटी ताटातुटीचा प्रसंग पुन्हा येतोच. सगळे बांध फुटतात.... ती त्याच्या गळ्यात पडू पाहते. पण सावरते लगेच आणि विमानाकडं धावत सुटते. तो घरी येतो. दहावीनंतर तिनं शाई शिंपडलेला शर्ट आणि आत्ता तिचा ‘विसरलेला’ कुर्ता तो बॅगेत बंद करून ठेवतो. मोरपीस पुन्हा वहीत जातं.... मन एकाच वेळी रिक्तही असतं आणि तृप्तही...
शर्वानंद (राम) आणि जानकी उर्फ जानू (समंथा रुथ प्रभू) या दोघांचा अभिनय केवळ लाजवाब. त्यातही समंथानं साकारलेली जानू केवळ अप्रतिम. अनेक शांत, संथ क्षणांमध्ये अर्थ उतरवण्याचं अवघड काम या दोघांनीही फार उत्कृष्ट पेललंय. 
शाळेत एकदा तरी प्रेम केलेल्यांना नक्की आवडेल असा हा सुंदर चित्रपट चुकवू नका.

----

दर्जा – चार स्टार

-----------------------
 

26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३


नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
---------------------------------------------

भाग ३
--------

माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर १९९७ या वर्षानं घडवून आणलं. मी नगर कायमचं सोडलं आणि 'पुणे लोकसत्ता'त रुजू झालो. त्यामागं काही कारणं होती. छोट्या तलावात मी राहू नये, असं माझ्या गुरुजींना वाटत होतं. त्यांचा सल्ला मी ऐकला आणि पुण्यात आलो. तिथं आल्यानंतर दीडच महिन्यात माझी 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. 'सकाळ'तर्फे तेव्हा रीतसर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. 'सकाळ'तर्फे ही दीर्घ काळानं केली जात असलेली भरती होती, असंही कळलं. 'सकाळ'शेजारी असलेल्या एच. व्ही. देसाई कॉलेजात आम्हाला शंभर मार्कांचा पेपर देण्यात आला होता व त्या कॉलेजच्या वर्गात बसून तीन तासांत आम्ही तो पेपर सोडवला होता. या परीक्षेला खूप लोक आले होते. त्यात अनेक सीनियर मंडळीही दिसत होती. माझा डिप्लोमा अर्धवट सुटल्यानं मी १९९६ मध्ये नगरला न्यू आर्टस कॉलेजमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. 'सकाळ'च्या परीक्षेत मी पहिला आलो आणि तिथं माझी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. एक सप्टेंबर १९९७ रोजी मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो. माझ्यासोबत श्रीपाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संजय आवटे, संजीव ओहोळ व सूरश्री चांडक असे पाच जण होते. आम्ही रुजू झालो, त्याच्या आदल्याच दिवशी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचीच ठळक बातमी अंकात होती. मी पहिल्याच दिवशी 'सकाळ'च्या ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा अंक पाहायला मागितला. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांनीही तत्परतेनं मला तो अंक काढून दाखवला होता. 'लोकसत्ता'तले विनायक लिमये यांच्या ओळखीनं भाऊमहाराज बोळात ओक वाड्यात कॉट बेसिसवर मी राहत होतो. तिथून मी अरोरा टॉवर्सला 'लोकसत्ता'च्या ऑफिसात सायकलवर जात असे. आता 'सकाळ'चं ऑफिस एकदमच जवळ आलं. मी तर अनेकदा तुळशीबाग, जोगेश्वरीच्या बोळातून चालत ऑफिसात जात असे. तेव्हाचे सहसंपादक राजीव साबडे यांच्या हाताखाली आमचं प्रशिक्षण सुरू झालं. इथून पुढं मी खऱ्या अर्थानं 'बातमी'शी जोडला गेलो. या दिवसानंतरच्या प्रत्येक मोठ्या घडामोडीचा मला या ना त्या प्रकारे साक्षीदार होता आलं. त्यावर लिहिता आलं. 
सन १९९७ या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. तेव्हा रूमवर राहत असताना मी पहिल्यापासून सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया हे चार पेपर रोज घ्यायचो. (ही परंपरा आजही चालू आहे.) त्या वर्षी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं १५ ऑगस्टला शंभर पानांचा बंपर अंक काढला होता. तो अंक आणि त्यातल्या अत्याधुनिक जाहिराती पाहून माझे डोळे विस्फारले होते. आपल्या आजूबाजूचा भवताल वेगानं बदलत असल्याची त्या जाहिराती ही ठळक खूण होती. दुसरीकडं कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तीही अफाट लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही कविता सर्व शासकीय कार्यालयांत लावण्याचं फर्मान तेव्हाच्या राज्य सरकारनं काढल्याचं आठवतं. बाकी 'टाइम्स'च्या जाहिरातींतल्या सगळ्याच गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नसल्या, तरी महानगरांमध्ये हा बदल घडतोय हे आम्हाला दिसत होतं. याच वर्षी दिल्लीत पहिला मॉल आणि पीव्हीआर हे पहिलं मल्टिप्लेक्स उभारण्यात आलं. पुणंही झपाट्यानं बदलत होतंच. पुण्याची वस्ती आता चहूबाजूंनी वाढत होती. मी १९९७ मध्ये बहुसंख्य ठिकाणी सायकलवरूनच बातमीदारी केल्याचं मला आठवतंय. मात्र, १९९४ ला बालेवाडी स्टेडियम उभं राहिलं आणि कात्रज-देहूरोड बायपासच्या दोन्ही बाजूला तेव्हा वैराण माळरान होतं, ते हळूहळू इमारतींनी व्यापू लागलं. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'नं याच वर्षी आम्हाला 'पागल' करून टाकलं होतं. नायिकांचे कपडे तोकडे होत चालले होते. शहरांमध्ये त्या फॅशनचं प्रतिबिंब आता लगोलग पडलेलं दिसू लागलं होतं. मोबाइलनं सर्व जग व्यापण्यापूर्वी पेजर नावाचा एक प्रकार याच काळात आला आणि धुमकेतूसारखा अंतर्धानही पावला. 'सकाळ'मध्ये नोकरीचे सुरुवातीचे दिवस मी फार एंजॉय केले. मी, मंदार, श्रीपाद आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नसायचा. आम्ही बॅचलर व रूमवर राहणारे असल्यानं दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्येच पडीक असायचो. कुठलंही काम करायला आम्ही नाही म्हटलं नाही. गावभर फिरायचो. जवळपास प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही छोट्या शहरांतून आलेली मुलं होतो. आमचं सांस्कृतिक कुपोषण लपलेलं नव्हतं. मग आम्ही पुण्यात आल्यावर या गोष्टी भरभरून लुटायला सुरुवात केली. सवाई गंधर्व, 'बालगंधर्व'ची नाटकं, मंगला किंवा 'प्रभात'चे सिनेमे, एनएफएआयमधले वेगळे सिनेमे यातलं काही आम्ही चुकवलं नाही. 'सकाळ'मध्ये अगदी सुरुवातीलाच 'झलक' हे सांस्कृतिक डायरीचं काम माझ्याकडं आलं. त्यानिमित्तानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळातील बहुसंख्य लोकांची ओळख झाली, ती आजतागायत टिकून आहे. 'सकाळ'चा रुबाब पुण्यात तेव्हा एवढा होता, की 'सकाळ'चा बातमीदार येतोय म्हणून पत्रकार परिषदा थांबलेल्या आहेत. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतलाय. 'सकाळ' ही आमची 'मास्टर की' होती. 'सकाळ'मधून आलो म्हटल्यावर सगळीकडची कुलपं निघायची. आम्ही याचा चांगल्या अर्थानं भरपूर फायदा करून घेतला. आम्हाला बाकी काहीच नको होतं. आम्हाला फक्त सगळीकडं उपस्थित राहायचं होतं आणि सगळं भरभरून अनुभवायचं होतं. तेव्हाची माझी डायरी आज नुसती वाचली, तरी दमायला होतं. तेव्हा मी प्रत्यक्ष ते सगळं करत होतो. कंटाळा नावाची गोष्टच माहिती नव्हती. पण या भरभरून जगण्याची, सगळ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची ही जी सवय लागली, तिचा आयुष्यभर फार मोलाचा उपयोग झाला. पत्रकारिता करीत असताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं, तर ते कुतूहल. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत लहान मुलासारखं कुतूहल पाहिजे. माझ्या ठायी ते भरपूर होतं आणि त्यामुळंच मला भरपूर बघावंसं वाटायचं, लिहावंसं वाटायचं. तेव्हाचं हे संचित पुष्कळ पुरलं. 
बघता बघता १९९८ उजाडलं. आमच्या ऑफिसमध्ये मार्च महिन्यात आणखी २२ जणांची 'मेगाभरती' झाली. आम्ही लगेच 'सीनियर' झालो. हा सगळा शिकण्याचा काळ होता, जडणघडणीचा काळ होता. ऑफिसमध्ये वरिष्ठ सांगतील ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. आजूबाजूचं जग बदलत होतं. लोक सढळ हातानं खर्च करताना दिसत होते. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस-वे बांधायचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ याच वर्षात झाला. तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम वेगात पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी मुंबईतही ५५ उड्डाणपूल बांधल्यानं लोक त्यांना 'ब्रिज'भूषण गडकरी म्हणायला लागले होते. याच वर्षी केंद्रातलं (देवेगौडा जाऊन आलेलं) गुजराल सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी लोकांनी वाजपेयींच्या बाजूनं झुकतं माप दिलं. तरीही त्यांना माया, ममता व जयललिता या तिघींचा पाठिंबा घ्यावा लागला. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विजनवासातून बाहेर येऊन प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा 'सकाळ'मध्ये या दोघांविषयीचा माहितीपर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. 
एप्रिलमध्ये शारजात सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं आणि त्यानं शेन वॉर्नच्या ऑस्ट्रेलियाचा दोनदा कचरा करून, भारताला अजिंक्यपद मिळवून दिलं. पंचविशीचा हा तरुण आता देशाचा 'यूथ आयकॉन' झाला होता. दोन वर्षांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात आणखी दोन हिरे भारतीय संघाला गवसले होते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली... १९९६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला रडणारा भारत आता दिसत नव्हता. उलट सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेल्या दोन झंझावाती शतकांनी सगळा माहौलच बदलवून टाकला. याच वर्षात करण जोहर नामक दिग्दर्शकाचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आला आणि या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे सगळे आयामच बदलले. 'कुछ कुछ' तुफान हिट झाला. 'राहुल' आणि 'अंजली' घराघरांत पोचले. याच काळात भारतात पेप्सी आणि कोला या अमेरिकी जायंट शीतपेय कंपन्यांचं 'युद्ध' सुरू झालं होतं. क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपपासून ते रस्त्यावरच्या बसस्टॉपवरील होर्डिंगपर्यंत सगळीकडं पेप्सी किंवा कोका-कोला दिसायला लागले होते. ही शीतपेयं पिणं म्हणजे 'कूल' असणं असं समस्त तरुणाईला वाटायला लागलं होतं. 'लहर पेप्सी'च्या जाहिरातीत 'आहा' म्हणत रेमो फर्नांडिस आणि जूही चावला नाचू लागले होते. जागतिकीकरण स्वीकारल्याच्या घटनेला आता सात-आठ वर्षं उलटून गेली होती आणि सरकारं बदलली तरी धोरण बदललं नव्हतं. देशाचा सुस्त पहुडलेला हत्ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळं हळूहळू हालचाल करायला लागला होता. याच वर्षी मे महिन्यात पोखरणमध्ये भारताने पाच अणुचाचण्या केल्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अणुचाचण्यांद्वारे पंतप्रधान वाजपेयींनी जगाला भारताच्या सामर्थ्याची पुन्हा एक चुणूक दाखविली होती.
सन १९९९. या वर्षी एक मार्च रोजी आम्ही 'सकाळ'मध्ये परमनंट झालो. आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं वाटायचा तो काळ होता. दीड वर्ष राबल्यावर आम्ही कायम झालो होतो, त्यामुळं असं वाटणं स्वाभाविक होतं. याच वर्षात मे महिन्यात मी माझ्या बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता मला आणि मंदारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची पदवी घेण्याचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आम्ही जूनमध्ये या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. तेव्हा आमच्या सुदैवानं अरुण साधू या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्ससाठी आमची निवडही केली. या कोर्ससाठी मी दाखल झालो, हा आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा. वयाची चोविशी आली, तरी माझं शिक्षण सुरूच होतं. पण एकीकडं नोकरी करत असल्यानं हा सगळा प्रवास आता आनंददायी वाटत होता. याच वर्षी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या वेळी मात्र त्यांना जनतेनं बऱ्यापैकी बहुमत दिलं होतं. 'रानडे'मध्ये दिवसा कॉलेज आणि दुपारी ऑफिस अशा धावपळीत हे वर्ष कसं संपलं ते कळलंही नाही. याच वर्षी सुभाष घईंचा 'ताल' प्रदर्शित झाला. राज्यात मनोहर जोशी जाऊन धडाकेबाज नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारनं मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका जाहीर करायला लावल्या आणि त्यात युतीचा निसटता पराभव झाला. (पुढची पंधरा वर्षं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केलं.) याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी सोनियांच्या परदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. यामुळं राज्यातील राजकारणाचे आयामच बदलले...
...या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असताना २००० हे वर्ष उजाडलं. नव्वदचं दशक संपलं होतं आणि जग या विसाव्या शतकातील शेवटच्या वर्षात शिरलं होतं. आज मागं वळून पाहताना लक्षात येतं, की आज आपला जो काही भला-बुरा पिंड घडला आहे, तो या नव्वदच्या दशकानं घडवला आहे. 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त' असा हा प्रवास होता. वयाच्या चौदा वर्षांसारख्या अत्यंत अस्वस्थ, अस्थिर वयापासून ते चोविसाव्या वर्षापर्यंत, थोडक्यात आयुष्याला स्थैर्य देण्यापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्यासोबत किंवा माझ्या आगे-मागे तीन-चार वर्षं जन्मलेल्या सर्वांनी या काळात असाच प्रवास केला असेल. तपशील निराळे असतील, पण आपला रस्ता हाच होता. साध्या रस्त्यावरून आपण सहापदरी एक्प्रेस-वेवर येऊन दाखल झालो होतो. आता इथं सीटबेल्ट घट्ट बांधायचे होते आणि गाडी सुसाट सोडायची होती... तोही प्रवास भन्नाटच झाला... पण त्याविषयी नंतर केव्हा तरी.. 
तूर्त मला घडविणाऱ्या आणि काही अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या या दशकाबद्दल केवळ आणि केवळ कृतज्ञता!!!

(समाप्त)

---- 

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
----------------------------------------------

भाग २
--------

सन १९९१ उजाडलं आणि आखाती युद्ध सुरू झालं. टीव्हीवर पहिल्यांदाच लाइव्ह युद्ध दिसू लागलं. अमेरिकेची ‘क्रूझ’, ‘स्कड’ ही क्षेपणास्त्रं इराकवर भूमीवर कोसळून, तो देश बेचिराख करत होती. शाळेत शिकवता शिकवता काही जाणते शिक्षक या युद्धाबद्दलही चर्चा करीत होते, अभ्यासासोबत हे युद्धही टीव्हीवर पाहा, असं सांगत होते. या धामधुमीतच दहावीची परीक्षा आली. गावातल्या भारी शाळेत परीक्षेचा नंबर आला होता. तेवढा काळ का होईना, अस्मादिकांना त्या भारी शाळेत बसायला मिळालं. तिथल्या सुंदर मुलींकडं बघता आलं, हाच काय तो भाग्ययोग! दहावीची परीक्षा संपली आणि मानेवरचं ‘जू’ उतरल्यासारखं झालं. भूगोलाचा पेपर संपल्यावर मला तातडीनं कोणता तरी सिनेमा पाहायचाच होता. तेव्हा एकही धड सिनेमा गावात लागलेला नव्हता. पण संजय दत्तचा 'फतेह' नावाचा टुकार सिनेमा पाहून आम्ही परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन केलं. सुट्टी मजेत गेली. निकाल लागला. बरे मार्क होते. ८५ टक्क्यांहून अधिक मार्क पडलेल्यांनी इंजीनिअरिंगला जायचं हा अलिखित दंडक होता. मी पण सोलापूर, औरंगाबाद आणि पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अर्ज टाकून ठेवले होते. पण माझा चॉइस पक्का होता - पुणे! पुण्याशिवाय दुसरं शहर मी निवडणं शक्यच नव्हतं. 
माझ्या आयुष्यातलं दुसरं आणि फार महत्त्वाचं स्थलांतर घडून आलं ते जुलै १९९१ मध्ये. मी पुण्याच्या 'जीपीपी'मध्ये होस्टेलवर राहायला आलो. विशेष म्हणजे तेव्हा सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम केलेल्या डॉ. मनमोहनसिंग नावाच्या नव्या अर्थमंत्र्यांनी देशाचं नशीब बदलवणारा अर्थसंकल्प याच जुलैमध्ये सादर केला होता. अर्थात तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व समजणं शक्यच नव्हतं. आम्ही आमच्या रूमवर नवी गादी, नवी बादली, नवे कपडे आणण्यात मग्न झालो होतो. थोड्याच काळात भारतात 'झी' ही पहिली खासगी दूरचित्रवाहिनी सुरू झाली. मी कॉलेज लाइफ एंजॉय करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. इंजिनीअरिंग काहीही समजत नव्हतं. दहावीपर्यंतची हुशारी कुठे गेली होती, देव जाणे! शहरातल्या मुला-मुलींचा स्मार्टनेस पाहून मी दचकलो होतो, विझलो होतो; आत आत संपत चाललो होतो. नगर आणि पुण्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आमची शाळा गरिबांची होती. इथं कॉलेजच्या इमारतीपासून ते शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सगळंच लई भारी! पहिलं वर्ष कॉमनच असतं. पण मला वर्कशॉपमध्ये जाऊन जॉब करायला आवडायचं. मुलींना आयते जॉब करून देणारी पोरं इथंच पाहिली. मात्र, इंजीनिअरिंगच्या संपूर्ण तीन वर्षांत एकदाही, एकाही मुलीला 'चहा घ्यायला येतेस का?' असं विचारायचाही धीर झाला नाही. तेव्हा एक रुपयाला वडा-पाव आणि एक रुपयाला फुल चहा मिळायचा. घरून पाचशे रुपये मिळायचे. मेसचे २७० रुपये भरून उरलेल्या २३० रुपयांत महिना आरामात निघायचा. मिनी ड्राफ्टर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर वगैरे खरेदी असली, की जास्त पैसे लागायचे, पण ती सगळी खरेदी आधीच झाली होती. तोवर कॉलेजमध्ये होस्टेलची मुलं आणि 'सिटी'तली मुलं असे गट पडलेच होते. स्लीव्हलेस ब्लाउज घालून वर्गावर येणाऱ्या हाय-फाय मॅडम बघून शिकण्यातलं उरलंसुरलं लक्षही पार कापरासारखं उडून गेलं होतं. त्याच मॅडम अचानक समोर आल्या, तर मात्र अंगाला कापरं भरत होतं. फिजिक्सचे सर मात्र आवडायचे. ते म्हणायचे, नुसती अभ्यासाची पुस्तकं वाचू नका; बाहेर फिरा, जग बघा, सिनेमे बघा... मी त्या सरांचा सल्ला तंतोतंत अमलात आणला.
राहुल - ७० एमएम! तेव्हाचं पुण्यातलं सगळ्यांत भारी थिएटर होतं राहुल! आमच्या पॉलिटेक्निकपासून सायकलनी दहा मिनिटांच्या अंतरावर! गणेशखिंड रस्त्यावर सगळा उतारच होता. एक पायडल मारलं, की थेट 'राहुल'पाशी सायकल थांबायची. तिथं सगळे इंग्रजी सिनेमे लागायचे. पण आम्ही १६-१७ वर्षांची मुलं लहान दिसायचो. कधी आत सोडायचे, तर कधी नाही! एकदा 'टू मून जंक्शन'ला बसायला मिळालं. पहिल्याच दृश्यात बाथरूममधली विवस्त्र नायिका दिसली आणि कानशिलं तापली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पडद्यावर नग्न स्त्री पाहिली होती. त्यामुळं माझ्या आयुष्यात या थिएटरचं स्थान किती महत्त्वाचं होतं, हे सांगायला नकोच. अर्थात आम्ही फक्त 'राहुल'ला इंग्रजी सिनेमे बघत होतो, असं नाही. अगदी ट्रिपल सीट सायकलवरून 'प्रभात'ला जाऊन सोळाव्या आठवड्यातही जोरात सुरू असलेला 'माहेरची साडी' पण बघितलाच होता. एक रूम-पार्टनर घरी येताना भलताच भावूक झाला होता. पण हे असे क्षण तसे कमीच. बाकी होस्टेली आयुष्य म्हणजे भर दुपारचं वाळवंटातून चालणं होतं. त्याच वर्षी नानाचा 'प्रहार' प्रदर्शित झाला. या सिनेमात नाना लष्करातून सिव्हील लोकांमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या अंगाचा तिळपापड होऊन तो लोकांना मारत सुटतो. तेव्हा आजूबाजूला सगळं असंच चित्र होतं. समाजातलं दूषित, घाणेरडं वातावरण बघून आमच्याही डोक्यात तिडीक जात होती. पण या संतापाला वाट करून देण्यासाठी मार्गच नव्हता. असंच १९९१ संपलं आणि १९९२ उजाडलं. माझं अभ्यासात लक्ष नव्हतंच. ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला होता. आम्ही पोरं पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या मॅचेस 'लाइव्ह' पाहायला युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर जायचो. तेव्हा नव्यानंच 'स्टार'चं प्रक्षेपण सुरू झालं होतं. ते प्रक्षेपण पाहताना खास वाटत होतं. सचिन तेंडुलकर नावाचा नवा हिरा सहाव्या नंबरवर येऊन चांगली बॅटिंग करत होता. पाकिस्तानला आपण त्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं. मियाँदादच्या माकडउड्या गाजल्या. बाकी वर्ल्ड कप आपल्याला तथातथाच गेला. माझी अभ्यासात तीच अवस्था होती. वर्गात शिकवलं, त्यापलीकडं काही अभ्यास करण्यात मला रस वाटत नव्हता. होस्टेलवर खाली पडलेले पेपर वाचण्यात मी टाइमपास करत होतो. वह्यांची मागची पानं भरत होती. आमच्या गॅदरिंगमध्ये थर्ड इयरच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वतः पेटी वाजून, स्वतःचीच कविता असलेलं 'मन तळ्यात मळ्यात' हे गाणं गायलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. तेव्हा 'नक्षत्रांचे देणे' कॅसेट बाजारात आली होती. आशाताईंची 'तरुण आहे रात्र अजुनी' वगैरे गाणी ऐकून, त्यावर फुलस्केप लेख लिहिण्याइतपत प्रगती झाली होती. परिणामी, पहिल्या वर्षाचा 'निकाल' लागला. अस्मादिक नापास झाले होते. सपशेल लोटांगण! हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेला भलताच 'प्रहार' होता. 'राजसा, (परीक्षेत असा) निजलास का रे,' असं स्वतःलाच विचारायची वेळ आली होती.
नापास झालो, तरी गावी घरी गेलो नाही. लाज वाटली. मग पुण्यातच राहिलो. आमच्या आत्याचा एक छोटा फ्लॅट होता आळंदी रोडवर. तिथं मुक्काम हलवला. तिथून सायकल चालवत सदाशिव पेठेत सायकलवर भिडे क्लासला यायचं. परत जाताना कसब्यात आत्याकडं जेवायचं आणि संध्याकाळचा डबा घेऊन आळंदी रोडवर जायचं. रात्री त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये, भकासपणे ती गार पोळी-भाजी खायची. काही दिवसांनी आत्याचा जुना टीव्ही तिथं आला आणि किमान रात्रीचा भयाणपणा गेला. शुक्रवारी रात्री दूरदर्शनवर 'प्रौढांसाठीचे' सिनेमे लागायचे. मी शुक्रवारची रात्र उगवायची आतुरतेने वाट पाहायचो. याच ठिकाणी मी माझी पहिली डायरी लिहिली. (ही डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...) स्वतःशीच लढणाऱ्या मुलाचं ते करुण मनोगत होतं. ती डायरी कित्येक दिवस माझ्याकडं होती. तिथून घरी पत्र पाठवताना मी वर 'येरवडा कारागृह (?)' असं लिहीत असे. थोडक्यात, पुलंची पुस्तकं वाचून तरारलेली विनोदबुद्धी शाबूत होती. तिनंच तर तारलं नंतर कायम! पण हे वाचून घरच्यांना काय वाटत असेल, याचा कधीही विचार मनात आला नाही. पण एकूणच १९९२ हे वर्ष प्रचंड खळबळीचं ठरलं. वैयक्तिक आयुष्यातही आणि देशाच्याही! याच वर्षी सहा डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशीद पडली. देश कायमस्वरूपी बदलला या घटनेनंतर! तेव्हा हे कळत नव्हतं. फक्त आजूबाजूला सुरू असलेलं हिंसक थैमान तेवढं दिसत होतं. तोवर सलमान, आमीर आणि शाहरुख या तिन्ही खानांची चित्रपटसृष्टीत चलती सुरू झाली होती. लता-आशा अजून गात होत्या; पण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण हे गायक आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित हे संगीतकार हळूहळू आपलं स्थान निर्माण करत होते. 'आशिकी' हा नव्वदमध्ये आलेला चित्रपट मला दहावीमुळं पाहता आला नव्हता; पण त्याच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. कित्येक दिवस 'चित्रहार'मध्ये 'आशिकी'चं गाणं पहिल्यांदा लागायचं. या सगळ्यांत बापमाणूस म्हणावासा एक संगीतकार १९९२ मध्येच अवतरला. चित्रपट होता - रोजा आणि या अवलिया संगीतकाराचं नाव होतं ए. आर. रेहमान! रेहमानच्या संगीताचा अमीट ठसा या संपूर्ण दशकावर उमटला आहे. पुढचं प्रत्येक वर्ष त्याचा एकेक क्लासिक चित्रपट येत गेला आणि आमची पिढी रेहमानच्या मागे वेडी झाली. 'रोजा'नंतर बॉम्बे, रंगीला, दिल से, ताल, झुबेदा अशा प्रत्येक सिनेमागणीक रेहमान एकेक मास्टरपीस गाणी निर्माण करत होता आणि लता-आशासह भारतातले झाडून सर्व दिग्गज त्याच्याकडे गात होते. 
अशा धाकधुकीतच १९९३ उजाडलं. पु. ल. देशपांडे यांची कथा-पटकथा असलेला शेवटचा चित्रपट 'एक होता विदूषक' एक जानेवारी १९९३ रोजी झळकला. मात्र, दंगलीच्या धामधुमीत तेव्हा तो पाहताच आला नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत मुंबईत पुन्हा दंगली झाल्या. मार्चमध्ये या दंगलींचा सूड म्हणून दाऊदनं मुंबईत १२ तारखेच्या शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट घडविले आणि मुंबई पहिल्यांदा दहशतवादाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. देशात हळूहळू काही तरी बिघडत चाललंय, याची एक अस्पष्ट जाणीव कुठं तरी मनात रुजत गेली ती याच काळात. याच वर्षी मे महिन्यात पेपर दिले आणि पास झालो. पुन्हा पुण्यात कॉलेज सुरू झालं. त्या वर्षीचा गणेशोत्सव विशेष होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ती शताब्दी होती. तेव्हा बाबूराव सणस मैदानात भव्य मंडप उभारून, महिनाभर सलग रोज कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मी रोज तिथं जायचो. बाबामहाराज सातारकरांचं कीर्तन असायचं. रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे. त्यातच पं. हृदयनाथ मंगेशकरांचा 'अमृताचा घनु' कार्यक्रम ऐकला. आशा भोसले आणि लतादीदींना 'लाइव्ह' ऐकलं प्रथमच! पण हा आनंद काही काळच टिकला. त्याच वर्षी गणपतीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ३० सप्टेंबरला लातूरमध्ये किल्लारीला महाभयंकर भूकंप झाला आणि हजारो लोक ठार झाले. त्या दिवशी पहाटे मी आत्याच्या घरी झोपलो होतो. हा भूकंप मी स्पष्टपणे अनुभवला. तोवर मला भूकंपाचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. दुपारी 'संध्यानंद' आला आणि त्यात बातमी वाचली, तेव्हा कळलं. भूकंपाच्या भयावह कहाण्या आणि पुनर्वसनाचे प्रयत्न याबाबतच्या बातम्या पुढचे कित्येक दिवस पेपरांमधून येत होत्या. माझं कॉलेजमधलं दुसरं वर्ष पहिल्या वर्षाहून भीषण निघालं. फक्त या वेळी काही नवे मित्र मिळाले. ते मैत्र बरेच काळ टिकलं. मला सगळं इंजीनिअरिंग अवघड जात होतं, हे तर उघडच होतं. मला घासून अभ्यास कसा करतात, हे माहिती नव्हतं. मी टीपी करत बसायचो. बाकी मुलं गुपचूप अभ्यास करायची. शेवटी गावाकडच्या एका मित्रानं बाहेर नेलं. चतुःश्रुंगीच्या पायथ्याशी एका बाकड्यावर बसवून भलं-मोठं लेक्चर दिलं. पण काहीही परिणाम झाला नाही. 
बघता बघता १९९४ उजाडलं. उजाडलं तीच एक दुःखद बातमी घेऊन! माझी आजी (वडिलांची आई) गेली. आजोबा पाच वर्षांपूर्वीच गेले होते. आता आजीही गेली. गावाकडचे सगळ्यांत घट्ट बंध एका फटक्यात तुटल्यासारखे झाले. मन सैरभैर होऊन गेलं. दोनच दिवसांनी, चार जानेवारीला 'पंचमदा' अर्थात, आर. डी. बर्मन गेले. अर्थात त्यांच्या मृत्यूमुळं झालेला तोटा कळण्याचं ते वय नव्हतं. पुढं त्याच वर्षी आलेल्या त्यांच्या शेवटच्या '१९४२ - ए लव्ह स्टोरी'तील गाण्यांनी आणि विशेषतः मनीषानं आम्हाला वेड लावलं होतं. 'कुछ ना कहो' गाण्यातला मनीषा-अनिल कपूरचा हळुवार, पण तरीही तप्त रोमान्स बघून डोकं झिणझिणलं होतं. मग हळूच हिंदीत ज्याला 'दबे पाँव' म्हणतात, तशी परीक्षा आली आणि पुन्हा माझा त्रिफळा उडवून गेली. सलग दुसऱ्या वर्षीही नापास! आता काही खरं नव्हतं. गुपचूप घरची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढचे तीन-चार महिने कसे गेले, मला काहीही आठवत नाही. एकच आठवतं, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं त्याच्या गावाकडं गळफास लावून आत्महत्या केली होती. वर्षभर एकाच खोलीत राहणारे आम्ही, पण त्याच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकलो नाही. आतून पूर्ण कोलमडून गेलो होतो. कसा अभ्यास केला, कशी परीक्षा दिली काहीही आठवत नाही. पण या वर्षातला नोव्हेंबर माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' घेऊनच उगवणार होता. तेव्हा नगरला एक मे १९९४ रोजी धुमधडाक्यात 'लोकसत्ता' सुरू झाला होता. मुंबईचा मोठा ब्रँड असलेल्या या वृत्तपत्रानं नगरमध्ये 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' म्हणत आपली जंगी आवृत्ती सुरू केल्याचं नगरकरांना फार अप्रूप वाटत होतं. सगळे जण फक्त 'लोकसत्ता' वाचत होते तेव्हा नगरमध्ये! माझ्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचं भवितव्य मला स्पष्ट दिसत होतं. अशातच एक दिवस 'लोकसत्ता'त 'मुद्रितशोधक पाहिजेत' अशी जाहिरात वाचली आणि 'मुद्रितशोधक' म्हणजे काय, त्याचं काम काय असतं, वगैरे काहीही माहिती नसताना अर्ज ठोकून दिला. नाही तरी पुढच्या वर्षी कॉलेज सुरू होईपर्यंत घरी बसून काय करायचं, हा प्रश्न होताच. काही दिवसांनी मला काहीच उत्तर आलेलं नाही, बघून मी स्वतःच 'लोकसत्ता'च्या कार्यालयात गेलो. मी गेल्यावर त्यांनी माझा अर्ज पुन्हा बाहेर काढला. तिथल्या तिथं मला एक बातमी तपासायला दिली. मला प्रूफरीडिंग कसं करतात हे माहिती नव्हतं. पण चुकीचे शब्द कोणते, वाक्यरचना कशी हवी हे कळत होतं. माझा पेपर तपासल्यानंतर त्यांनी तिथल्या तिथं माझा इंटरव्ह्यू घेतला आणि 'उद्यापासून ये' असं सांगितलं. माझा आनंद गगनात मावेना. चार वर्षं सगळीकडून रिजेक्शनच झेलल्यानंतर कुणी तरी मला स्वीकारलं होतं. मला काही तरी येतंय, मी आयुष्यात काही तरी करू शकतो, हा फार मोठा दिलासा आणि विश्वास त्या दहा मिनिटांच्या इंटरव्ह्यूनं मला दिला. मी 'लोकसत्ता'त रीतसर प्रूफरीडर म्हणून नोकरीला लागलो. मला एक हजार रुपये पगार मिळायला लागला. मी सायकलवरून सात किलोमीटर अंतरावरील ऑफिसला जायचो आणि रात्री बाराच्या सुमारास परत यायचो. माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा होता. आपण काय करू शकतो, याचा अंदाज मला इथं आला. 'लोकसत्ता'तले सतीश कुलकर्णी माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड होते. त्यांनी माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली. 'लोकसत्ता'तले ते सात-आठ महिने माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे ठरले. 
मी तेव्हा नुकतीच १९ वर्षं पूर्ण केली होती. याच वर्षी सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' झाल्या होत्या. (यातली सुश्मिता मला इतकी आवडली, की तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय मी करून टाकला. तो बरेच दिवस टिकला होता.)
अशातच १९९५ हे वर्ष उजाडलं आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. सोनईला त्यांची पहिली सभा झाली. त्याची एक जनरल बातमी तिथल्या बातमीदारानं पाठविली होती. मात्र, त्यातलं एक वाक्य - 'जोशी, महाजनांच्या हाती सत्ता देणार का?' आमच्या वरिष्ठांनी अचूक हेरलं. त्याचीच हेडलाइन झाली आणि ती 'लोकसत्ता'च्या सर्व आवृत्त्यांत छापून आली. मी हे सर्व बघत होतो. पुढं महाराष्ट्राची निवडणूक फिरली आणि 'जोशी-महाजनां'चीच सत्ता आली. त्यात या बातमीचा फार मोठा वाटा होता, असं मला अजूनही वाटतं. दरम्यान माझा सेकंड इयरचा निकाल लागला आणि मी पास झालो. 'लोकसत्ता'त आधीच सांगितल्याप्रमाणे मी काम सोडलं आणि थर्ड इयरसाठी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. त्या गणपतीत 'गणपती दूध पीत असल्या'ची जोरदार अफवा सगळीकडं पसरली. आजच्यासारखा सोशल मीडिया नसतानाही अत्यंत वेगानं ही अफवा सगळीकडं पसरली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, त्यांच्या घरचा गणपतीही दूध पीत असल्याचं सांगून, टीकाकारांच्या हाती आयतं कोलीत दिलं. दिवाळीच्या आधी आमच्या टेस्ट होत्या. मशिन डिझाइनचा पेपर होता. माझा अभ्यास अजिबात झाला नव्हता. बाहेर कुंद पावसाळी वातावरण होतं. सगळीकडं एक ओलसर उदासपणा दाटला होता. मला रूममध्ये बसून प्रचंड ढवळून यायला लागलं. आपण हे काय करतोय, असं सारखं वाटायला लागलं. हे संपूर्ण वर्ष आपल्याकडून इथं निघणं अशक्य आहे, याची जाणीव झाली आणि मी एक निर्णय घेतला. माझा बाडबिस्तरा गुंडाळून, रूममधलं सगळं सामान घेऊन मी रिक्षा केली आणि तडक शिवाजीनगरला येऊन नगरची बस पकडली. मी इंजिनीअरिंग सोडलं ते कायमचं! त्या दिवसापासून आजतागायत मी 'जीपीपी'मध्ये पुन्हा पाय ठेवलेला नाही. सेकंड इयरला असताना 'मेकॅनिकल'ला मी मिळवून दिलेलं क्विझ काँपिटिशनचं विजेतेपद आणि 'दमां'च्या हस्ते गॅदरिंगमध्ये मिळालेलं त्याचं बक्षीस एवढा एकच चांगला क्षण माझ्या आठवणीत या कॉलेजबाबत राहिला.
नगरला परत आलो आणि पुन्हा 'लोकसत्ता'त जाऊन उभा राहिलो. तुमच्या भरवशावर सगळं सोडून आलोय, असं सांगितलं आणि पुन्हा नोकरीवर घ्या, म्हणालो. त्यांनी पण लगेच मला कामावर घेतलं. पगारही पाचशे रुपयांनी वाढला. आजूबाजूचं वातावरण हळूहळू बदलताना दिसत होतं. हर्षद मेहताचा गैरव्यवहार घडून गेला होता. सूटकेसमध्ये कोटी रुपये कसे बसू शकतात, यावर जसपाल भट्टी टीव्हीवर त्यांच्या 'शो'मध्ये धमाल कॉमेडी करत होते. (हा माणूस माझ्या आयुष्यात पुढं फार महत्त्वाची भूमिका बजावणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.) १९९५ च्या १५ ऑगस्टला तेव्हाचे दूरसंचारमंत्री सुखराम यांनी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना दिल्ली ते कोलकता असा मोबाइल कॉल केला आणि भारतात मोबाइलचं युग अवतरलं. तेव्हा बिर्ला एटी अँड टीच्या कृष्णधवल पूर्ण पान जाहिराती पेपरांमध्ये झळकलेल्या आठवतात. पोलिसांच्या वायरलेस सेटसारखे दिसणारे मोठ्या आकाराचे मोबाइल काही जणांकडे दिसू लागले. आउटगोइंगला २४ रुपये मिनिट आणि इनकमिंगला १६ रुपये मिनिट हा दरही चांगलाच लक्षात आहे. यातूनच 'जुगाडू' भारतीयांनी 'मिस कॉल' नावाच्या अद्भुत प्रकाराचा शोध लावला. मला विशीबरोबर मिशी फुटली होती, पण ती राखावी असं कधीच वाटलं नाही. होस्टेलवर मित्रानं दाढी करायला शिकवलं होतं. वडील 'गोदरेज'चा गोल डबीतला साबण आणि 'टोपाझ'चं ब्लेड घेऊन दाढी करताना पाहिले होते. मी मात्र पहिल्यापासून 'यूज अँड थ्रो' रेझरनं दाढी करायला लागलो. भारीतलं शेव्हिंग क्रीम आणि आफ्टरशेव्ह लोशन माझ्याकडं होतं. वडिलांप्रमाणे तुरटी वगैरे कधी मी फिरवली नाही. हे बदल तेव्हा जाणवत नव्हते, पण आजूबाजूचा भवताल असा सूक्ष्मपणे बदलत होता. रामगोपाल वर्माच्या 'रंगीला'त रेहमानच्या तालावर थिरकणाऱ्या अल्पवस्त्रांकित ऊर्मिलाला बघून आम्हाला 'आँ!' असं झालं होतं. याच वर्षी दिवाळीत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' झळकला आणि हे बदल अधिक लखलखीतपणे दृग्गोचर होत गेले. भारतातल्या तमाम मुलींना यातला 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा संदेश मनापासून भिडला, पटला!
अशातच १९९६ उजाडलं. मी 'लोकसत्ता'त काम करतच होतो. मला आता 'कॉलेज पोर्च' नावाचं सदर लिहायची संधीही मिळाली होती. मी वेगवेगळ्या कॉलेजांत जाऊन तिथल्या कार्यक्रमांचं वार्तांकन करीत असे. जेव्हा असं काही नसे, तेव्हा मी वेगवेगळ्या विषयांवर ललित लेखन करत असे. या लेखनानं मला आपण लिहू शकतो आणि ते पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन हजारो वाचकांपर्यंत पोचू शकतं, त्यांना ते आवडू शकतं, हा आत्मविश्वास दिला. तेव्हा आम्ही नगरमधले सगळे पत्रकार सकाळी वाडिया पार्कला क्रिकेट खेळायला जायचो. जानेवारीत नगरला क्रॉम्प्टन करंडक ही मोठी क्रिकेट स्पर्धा भरायची. महाराष्ट्रातले मोठमोठे क्लब यात भाग घ्यायचे. एकदा रोहन गावसकरला जवळून बघण्याची संधी तेव्हा मिळाली होती. एकदा झहीर खान नावाचा श्रीरामपूरचा एक डावखुरा मुलगा फार भारी फास्ट बोलिंग करतो, असं ऐकलं. वाडिया पार्कच्या वरच्या डेकवर बसून मी त्या मुलाची गोलंदाजी पाहिलीसुद्धा होती. याच वर्षी बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्तानं मला आयुष्यात प्रथमच मुंबईला जाण्याची संधी मिळाली. मी वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रथम या महानगरीत पाऊल ठेवलं. पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर असताना एका मित्रानं मला मुंबईचा भलामोठा नकाशा दिला होता. तो नकाशा मी अगदी पाठ करून ठेवला होता. त्यामुळं एकटाच पहिल्यांदा मुंबईत गेलो तरी कुणाला न विचारता, मी बेस्ट, लोकल अशी सगळी सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरून मुंबई दिवसभर पालथी घातली. संध्याकाळी दादरला शिवाजी मंदिरला जाऊन साक्षात प्रभाकर पणशीकरांचं 'तो मी नव्हेच' नाटकही पाहिलं. तेव्हा त्याचं तिकीट होतं २० रुपये. (पुढं पाचच वर्षांनी मला पंतांचा एक पूर्ण दिवस सहवास लाभणार आहे आणि त्यांची मुलाखतही घेता येणार आहे, हे तेव्हा गावीही नव्हतं.) मुंबईला माझं जाणं म्हणजे एक प्रकारे विहीर, मोठा तलाव, सरोवर झाल्यानंतर थेट महासागराचं दर्शन घेण्यासारखं होतं. मुंबईच्या दर्शनानं मी स्तिमित होऊन गेलो. मला त्या भव्य शहरानं प्रथमदर्शनीच प्रेमात पाडलं आणि ते प्रेम अजूनही कायम आहे. मुंबईत जाऊन राहावं, तिथं काम करावं अशी तेव्हा प्रचंड इच्छा झाली होती. मात्र, तो योग अजूनपर्यंत तरी काही आलेला नाही. असो.
१९९७. नगरमध्ये सत्तरावं साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या तुतारीनंच १९९७ हे वर्ष उजाडलं. नगरच्या संमेलनामुळं मी आयुष्यात प्रथमच साहित्य संमेलन बघितलं. या प्रकाराशी पुढं आपली कायमची नाळ जोडली जाणार आहे, हे तेव्हा अर्थातच माहिती नव्हतं. नगरचं संमेलन प्रचंड गर्दीमुळं गाजलं. ग्रंथदिंडीत भेटलेले विंदा बघून भारावून जायला झालं. गिरीश कार्नाडांचं दमदार उद्घाटनाचं भाषण जोरात गाजलं. 'लोकसत्ता'त आम्ही या संमेलनाचं जोरदार वार्तांकन करीत होतो. पुण्याहूनही ज्येष्ठ-श्रेष्ठ लोक आले होते. त्यांच्या कॉप्या (बातमी) वाचायची, त्यांचं प्रूफरीडिंग करण्याची संधी मला मिळाली. एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाचं वार्तांकनही मी केल्याचं आठवतंय. शेवटच्या दिवशी साक्षात गुलजारांच्या उपस्थितीत हृदयनाथ मंगेशकरांनी पहाटेपर्यंत रंगविलेली 'भावसरगम'ची मैफल अजूनही लक्षात आहे. या वर्षात आजूबाजूची परिस्थिती झपाट्यानं बदलताना दिसत होती. नरसिंह रावांचं सरकार गेलं होतं आणि वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारच्या नाट्यानंतर आलेले देवेगौडा तेव्हा पंतप्रधान होते. केंद्रात अस्थिर वातावरण होतं, पण राज्यात बाळासाहेबांचा 'रिमोट कंट्रोल' जोरात होता. पुलंना महाराष्ट्रभूषण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि १९९६ च्या शेवटी त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना केलेली ठोकशाहीवरची टीका यांचं सावट नगरच्या संमेलनावर होतं. कार्नाडांच्या भाषणात त्यांनी यावर 'सैनिकां'ची गोष्ट सांगून फार सूचक भाष्य केलं होतं. आमच्या घरी तेव्हा छोटा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता आणि फक्त अँटेनावरून दिसणारं 'दूरदर्शन' हे एकच चॅनेल होतं. तेव्हा नगरच्या लघुप्रक्षेपकाद्वारे नऊ क्रमांकाच्या चॅनेलवरून दूरदर्शन दिसे. पुण्याच्या सिंहगडवरून होणारं प्रक्षेपण पाच क्रमांकाच्या चॅनेलवरून दिसे. दिल्लीचं प्रक्षेपण झालं, की मुंबई दूरदर्शनचं प्रक्षेपण सुरू होत असे व त्याच्या सूचना या थेट पडद्यावरूनच जाहीर दिल्या जात असत. अनेकदा नगरच्या केंद्रातले लोक मुंबई दूरदर्शनवर 'स्विच' करत नसत. त्यामुळं संध्याकाळचे पाच वाजून गेले, तरी आम्हाला दिल्लीचेच कार्यक्रम दिसत. मग अशा वेळी मी वर जाऊन अँटेना पुण्याच्या (सिंहगडच्या) दिशेनं फिरवी व खाली येऊन पाच क्रमांकाचं चॅनेल लावी. ‘सिंहगड’चे लोक कधी चुकत नसत. त्यामुळं थोडं खरखरीत का होईना, पण मुंबई दूरदर्शन व विशेषतः मराठी सिनेमा बघायला मिळे. आम्ही केबल घेतली नसल्यानं त्या काळातल्या 'झी' वगैरेवरील मालिका मला माहिती नसायच्या. पण काही मित्रांच्या बोलण्यात या मालिकांचे उल्लेख यायचे तेव्हा आपण मागासलेले आहोत, असं वाटायचं. मात्र, या वर्षी भारतात झालेला विल्स वर्ल्ड कप पुरेपूर एंजॉय केला. विशेषतः बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपण पाकिस्तानचा पुन्हा खात्मा केला, तेव्हा देशभर उसळलेला जल्लोष अभूतपूर्व होता. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलकत्यात आपण माती खाल्ली आणि कांबळी रडला. लोकांनी स्टेडियम पेटवून द्यायचंच बाकी ठेवलं होतं. त्या कटू आठवणी खूप दिवस छळत राहिल्या.
पण १९९७ या वर्षानं माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर घडवून आणलं...

(क्रमश:)