9 Aug 2014

रमा-माधव

उत्कट, उदात्त प्रेमगाथा...
-----------------------------
मृणाल कुलकर्णी... हॅट्स ऑफ... इतिहासाच्या पानांतून दरवळणारी, थेऊरच्या सतिस्थळी किंवा श्री चिंतामणीच्या गाभाऱ्यात गुंजणारी, शनिवारवाड्याच्या प्रत्येक दगड-विटांनी अनुभवलेली... रमा आणि माधव यांची उत्कट, उदात्त प्रेमगाथा, तू किती प्रेमानं दाखवलीस! जीव ओतला आहेस या कलाकृतीत... १४७ मिनिटांची मंत्रमुग्ध करणारी अलौकिक गाथा... उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम वेषभूषा, सुंदर संवाद... सगळं काही मृणालनं मनापासून, कष्ट घेऊन केलं आहे हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं... आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे यांच्या रूपानं एक देखणी, अभिनयसंपन्न नवी जोडी मराठी सिनेमाला दिलीय... आनंद मोडक काकांची गाणी ऐकताना, विशेषतः गणपतीची आरती, डोळे झरतच राहले स्वतःच्याही नकळत... आनंदकाकांसाठी! अतिशय तरल, हळव्या भावना व्यक्त करणारे सुंदर शब्द देणाऱ्या मोघेकाकांसाठी... या आणि अशा गोष्टींमुळं हा फक्त रूपेरी पडद्यावरचा निर्जीव खेळ राहिलेला नाही... त्यानं आपल्याशी सघन, जैव नातं जोडलंय... अशा भाषेत ही कलाकृती आपल्याशी बोलते, जी शब्दांनी नाही व्यक्त होत... होते फक्त हृदयानं...!
थोरल्या माधवराव पेशव्यांची कर्तबगारी इतिहासकारांनी लिहून ठेवलीय. मराठ्यांचं पानिपत झाल्यानंतर अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवेपद मिळालेल्या माधवरावांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आणि समशेरबहादरीनं पुढील ११ वर्षं राज्यकारभार केला. उत्तम केला. त्यांना रयत 'स्वामी' म्हणू लागली. हा सगळा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. ज्ञात नव्हतं ते रमा या त्यांच्या पत्नीसोबत असलेलं त्यांचं हळवं-तरल नातं. खरं म्हणजे आता या नात्याविषयी आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण सोळाव्या वर्षीही पत्नीस ऋतुप्राप्ती न झाल्यानं त्या वेळच्या सर्वमान्य रिवाजानुसार, राजकीय वारसासाठी दुसरं लग्न करण्याचा आईचा - गोपिकाबाईचा - सल्ला धुडकावून, आई, पुन्हा हा विषय काढू नकोस, असं सांगणाऱ्या माधवरावांच्या मनात रमेविषयी नक्की काय भावना असाव्यात, हे सांगायला फार प्रतिभेची गरज नाही. शिवाय अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी राजयक्ष्म्यामुळं अकाली गेलेल्या पतीपाठोपाठ शांतपणे सती जाण्याचा निर्णय घेणारी रमा पतीविषयी नक्की काय भावना मनात बाळगून होती, हेही सांगायला नको. अशा या प्रेमाची प्रत, त्याची उत्कटता, उदात्तता उलगडून पाहण्याची इच्छा केवळ प्रतिभावंत कलावंतांनाच होऊ शकते. मृणालनं केवळ ही इच्छा बाळगली नाही, तर ती रूपेरी पडद्यावर भव्यतेनं, सौंदर्यदृष्टीनं आणि विलक्षण कष्टानं साकारून दाखवली म्हणून तिला हॅट्स ऑफ. मराठी सिनेमाची निर्मिती कशी होते, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या म्हणण्यामागचं मर्म समजेल. अनेक पुरुष दिग्दर्शकही ज्या विषयाला हात लावू धजत नाहीत, तो ऐतिहासिक विषय पार्श्वभूमीला घेणं आणि त्यासोबत ही अलौकिक प्रेमगाथा सादर करणं हे खरंच येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. मृणालला हा विषय प्रिय असण्याचं कारण म्हणजे रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीवर आलेली स्वामी ही दूरदर्शन मालिका. गजानन जागीरदारांसारख्या दिग्गजानं रमाच्या भूमिकेत १७-१८ वर्षांच्या मृणालला निवडलं आणि पुढचा सर्व इतिहास आपल्याला ठाऊक आहे. या मालिकेनं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता तेव्हा. आज पंचविशीत असलेल्या पिढीला हे आठवण्याचं, माहिती असण्याचं काही कारण नाही. ही मालिका आली, तेव्हा अस्मादिकही सातवी-आठवीतले शाळकरी विद्यार्थी होते. पण अजूनही तोच पिता साक्षात मानावा, हे रवी साठेंनी गायलेलं टायटल साँग, रवींद्र मंकणींनी साकारलेले माधवराव, अस्सं का? अरे व्वा! असं म्हणणारे ठसकेबाज राघोबादादा सादर करणारे श्रीकांत मोघे आणि अर्थात मृणालची लोभस, राजस रमा लक्षात आहे. मात्र, ती मालिका प्राधान्यानं माधवराव आणि त्यांच्या कर्तबगारीवर फोकस करणारी होती, असं मला वाटतं. त्यात रमा-माधव यांचं नातं हा साइड-ट्रॅक होता. रमा-माधव सिनेमात मात्र तीच मुख्य कथा आहे. राजकारण दुय्यम आहे. तरीही नेपथ्यरचनेसाठी हे सगळं येतंच. 'रमा-माधव'च्या दिग्दर्शिकेचं कौतुक अशासाठी, की मुख्य कथेसोबतच तिनं या आजूबाजूच्या गोष्टींकडं, त्या अन्य पात्रांकडंही लक्ष दिलं आहे. विशेषतः सर्व कलाकारांची निवड अगदी अचूक जमली आहे. रवींद्र मंकणींनी नानासाहेबांचा सर्व दरारा, आदब आणि शेवटी पुत्रवियोगानं येणारी हळहळ फार समर्थपणे दाखवली आहे. 
तीच गोष्ट स्वतः मृणालनं साकारलेल्या गोपिकाबाईंची. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर खचून न जाता, धोरणीपणानं धाकट्या मुलाकडं पेशवेपद कसं येईल हे पाहणारी, मुलावर प्रेम करणारी, पण त्याचं कर्तव्यकठोर मन ओळखू न शकणारी मुत्सद्दी, पण काहीशी भरकटलेली गोपिकाबाई तिनं सुरेखच उभी केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंना सदाशिवरावभाऊच्या भूमिकेत फार स्कोप नाहीये. पण त्यांनी छोट्याशाच रोलमध्ये जीव ओतून काम केलंय. पार्वतीबाईंच्या भूमिकेत श्रुती मराठेनंही चांगलं काम केलंय. पतीची वाट पाहणारी पार्वती तिनं खूप तन्मयतेनं उभी केली आहे. आलोक राजवाडेनं माधवरावांच्या भूमिकेत अत्यंत आश्वासक कामगिरी केली आहे. त्याच्याकडून आता मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. पर्ण पेठेनं रमा पूर्णपणे समजून-उमजून उभी केली आहे. ती रमा म्हणून छान शोभते आणि तिनं कामही चांगलं केलं आहे. छोटी रमा झालेली श्रुती कार्लेकर खूपच गोड आहे. तिनं कामही अगदी झक्कास केलं आहे. सोनाली कुलकर्णीनं आनंदीबाई खूपच ठसक्यात सादर केली आहे. ती आनंदीबाई म्हणून दिसलीय खूपच छान. या सर्वांत खरा टाळ्यांचा मानकरी ठरला आहे तो राघोबादादा साकारणारा प्रसाद ओक. गादीसाठी त्यांची चालू असलेली धडपड, राजकारण सर्व काही त्यानं झकास उभं केलं आहे. रणधुरंधर, पण त्याच वेळी नर्तकीकडं जाणारा रंगेल राघोबा प्रसाद ओकनं टेचात उभारला आहे. पुतण्याविषयी मधूनच उफाळून येणारं प्रेम आणि त्यातून येणारी हतबलता प्रसादनं समजून सादर केली आहे. त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळायला हरकत नाही. 
'रमा-माधव'मध्ये काही त्रुटी अर्थातच आहेत. विशेषतः पहिला भाग काहीसा संथ वाटतो. हमामा रे पोरा हमामा पोरा हे माधुरी पुरंदरेंनी म्हटलेलं लोकप्रिय गाणं सुरुवातीला येतं. रमाचं मिरजेतलं बालपण आणि तेथून तिचा शनिवारवाड्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर तिचं गोपिकाबाई आणि अन्य ज्येष्ठ सासवांसोबतचं नातं, मंगळागौरीचं गाणं यात बराच वेळ जातो. माधवरावांचं लहानपण, पानिपतच्या लढाईची तयारी आणि राघोबांची नाराजी यानंतर कथानक वेग घेऊ लागतं. त्यातही रमा-माधव यांचा एका तलावाकाठी पाण्यात दगड मारण्याचा प्रसंग अनावश्यक मोठा झाल्याचं जाणवतं. शिवाय याच लोकेशनला नंतर अनेक वेगवेगळ्या प्रसंगांची दृश्यं आहेत. काही प्रसंगांची लिंक लागत नाही. युद्धाचे प्रसंग ऑथेंटिक व्हावेत म्हणून दिग्दर्शिकेनं भरपूर प्रयत्न केले असले, विशिष्ट अँगलनी शूट केले असले, तरी त्यातल्या मर्यादा खूपच जाणवतात. उत्तरार्धात माधवराव पेशवेपदाची सूत्रं हाती घेतात, तेव्हापासून कथानकाला वेग येतो. विशेषतः रमा मोठी होते आणि दोघांमधलं प्रेम फुलू लागतं, हा भाग सविस्तर, तपशिलानं येतो. यात एक गाणंही आहे. ते जरा अस्थानी वाटत असलं, तरी गाणं म्हणून ते खूपच चांगलं आहे. सिनेमात सर्वांत खटकणारी बाब म्हणजे सुरुवातीची आणि शेवटी येणारी नामावली. या नामावलीत असंख्य चुका आहेत. रवींद्र हा शब्द रवींर्द्र असा लिहिला आहे, तर पर्श्वगाइका, मंगळागैर या सहज दिसलेल्या चुका. बाकी तर भरपूर आहेत.
आनंद मोडकांनी संगीत दिलेला हा शेवटचा सिनेमा. यातली शंकर महादेवननं म्हटलेली गणपतीची आरती जमली आहे. 'स्वप्नीही नव्हते दिसले' हे हृषीकेश रानडे आणि प्रियांका बर्वेनं म्हटलेलं हळुवार गाणंही सुंदर. 'लुट लियो' ही मधुरा दातारनं सादर केलेलं मुजरा गीत थेट देवदासमधल्या 'काहे छेड मोहे'ची आठवण करून देणारं. आदिती राव-हैदरी या गाण्यात नाचलीय छान आणि दिसलीही आहे सुंदर. 
थोडक्यात, 'रमा-माधव इज ए ट्रीट टु आइज'! महाराष्ट्रातल्या एक थोर, कर्तबगार पेशव्याची आणि त्याच्यावर मनःपूत प्रेम करणाऱ्या रमेची ही गाथा नक्की पाहावी अशीच.
---

निर्मिती : शिवम-जेनिम फिल्म्स
कथा, दिग्दर्शिका : मृणाल कुलकर्णी
संवाद : मृणाल कुलकर्णी, मनस्विनी लता रवींद्र
सिनेमॅटोग्राफी : राजीव जैन
संगीत : आनंद मोडक
प्रमुख भूमिका : आलोक राजवाडे, पर्ण पेठे, रवींद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी, डॉ. अमोल कोल्हे, श्रुती मराठे, सोनाली, श्रुती कार्लेकर आणि प्रसाद ओक.
दर्जा : *** १/२
----

No comments:

Post a Comment