23 Aug 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - मर्दानी (A)

चवताळलेली वाघीण
-------------------------

 स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून, त्यातही आठ ते बारा वर्षांच्या कुमारिका मुलींना पळवून नेऊन, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारे आणि त्यातून करोडो रुपयांची माया गोळा करणारे नराधम पाहून खरोखर आपली ‘सटकते’! पण असे नरराक्षस आपल्या देशात अगदी राजरोस वावरत आहेत. अशा नराधमांना काय म्हणावं हे कळत नाही असं नाही; पण वृत्तपत्रीय लिखाणाच्या मर्यादेमुळं इथं लिहिता येत नाही, एवढंच! अशा लोकांना खास आपल्या स्टाइलनं वठणीवर आणणारी ‘मर्दानी’ राणी मुखर्जीच्या रूपानं रूपेरी पडद्यावर अवतरली आहे. लहान मुलींच्या कोवळ्या शरीराशी अत्यंत निर्घृण व्यवहार करणारे नामर्द लोक क्लायमॅक्सला मर्दानी राणीच्या बुटाखाली आणि नंतर त्या मुलींच्या लाथांखाली शेवटी तुडवले जातात, तेव्हा प्रेक्षागृहात (विशेषतः मुलींकडून) होणारा जल्लोष पाहून, या प्रकाराबाबत जनमानसात केवढा संताप खदखदतो आहे, याची कल्पना येते. सिनेमाची बाकी गुणवत्ता जाऊ द्या; केवळ या तीव्र भावनेला पडद्यावर अत्यंत परिणामकारकरीत्या सादर केल्याबद्दल निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक प्रदीपदादा सरकार आणि राणी खास अभिनंदनास पात्र आहेत, हे सांगायलाच हवं.
प्रदीपदादा हे कसलेले दिग्दर्शक आहेत, हे ‘परिणिता’पासूनच आपल्याला ठाऊक आहे. नंतरचे दोन सिनेमे मात्र ते एवढी चमक दाखवू शकले नव्हते. पण त्यांना या सिनेमात पुन्हा सूर गवसला आहे, हे सांगायला आनंद वाटतो. त्यांनी ११३ मिनिटांचा हा क्राइम ड्रामा जोरकसपणे मांडला आहे. या सिनेमाचा विषय अत्यंत संवेदनशील असला, तरी त्यांनी कुठंही त्यातून चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध एकरेषीय पद्धतीने पुढं जात असला, तरी तो पुरेसा खिळवून ठेवणारा झाला आहे. मुंबईसारख्या महानगरातून लहान मुलींना उचलणारी टोळी, त्यांची अंगावर काटा आणणारी कार्यपद्धती आणि मुंबईत क्राइम ब्रँचमध्ये सीनियर इन्स्पेक्टर असणाऱ्या शिवानी शिवाजी रॉय (राणी) या तडफदार अधिकाऱ्याची योगायोगानं या नेटवर्कशी पडलेली गाठ हा सर्व भाग पूर्वार्धात येतो. रस्त्यावर फुले विकणारी प्यारी (प्रियांका शर्मा) शिवानीच्या भाचीची मैत्रीण असते. एके दिवशी ही प्यारी गायब होते आणि शिवानी आपोआप या प्रकरणात ओढली जाते. प्यारीच्या निमित्ताने ती या गुन्ह्याच्या आणि त्याच्या बड्या सूत्रधारांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते, हा सर्वच भाग अत्यंत वेगवान पद्धतीनं आपल्यासमोर येतो. खऱ्या सूत्रधाराची शिवानीची फोनवरूनच झालेली ओळख आणि दोघांचं एकमेकांना आव्हान देणं आणि ३० दिवसांच्या आत त्याची गठडी वळण्याचं शिवानीनं चॅलेंज घेणं इथपर्यंत मध्यंतराचा प्रवास रोचक होतो. उत्तरार्धात कथा दिल्लीत पोचते. कुठलाही आगापिछा नसताना शिवानी खऱ्या गुन्हेगारांपर्यंत कशी पोचते आणि त्यांना कायमचा धडा शिकवते हे उत्तरार्धात रंजक आणि थरारक पद्धतीनं दिग्दर्शकानं मांडलं आहे.
दादांना पहिला सलाम तो प्रमुख भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड केल्याबद्दल! राणीनं शिवानीची भूमिका ज्या पद्धतीनं उभी केली आहे, ते पाहण्यासारखं आहे. बंबय्या हिंदी-मराठीतून बोलणारी, ‘भ’ आणि ‘च’पासून सुरू होणाऱ्या शिव्यांचा सर्रास वापर करणारी जिंदादिल पोलिस ऑफिसर तिनं झक्कास साकारली आहे. प्यारीविषयीच्या जिव्हाळ्यातून गुन्हेगारीचं मोठं नेटवर्क तोडण्याचं आव्हान घेणारी, वरिष्ठांकडून होणारा विरोध सोसणारी आणि कनिष्ठ सहकाऱ्यांची मनापासूनची साथ घेऊन लढणारी शिवानी ही राणीच्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका ठरणार, यात शंकाच नाही. कोणताही प्रमुख पुरुष कलाकार नसतानाही हा सिनेमा आपल्याला कुठंही ती कमतरता राणीमुळंच जाणवू देत नाही. किंबहुना दादांच्या सिनेमात नायिका हीच खरी हिरो असते. राणीनं क्षणात हळवी होणारी, पण दुसऱ्याच क्षणी कर्तव्यकठोर होऊन लढणारी नायिका साकारताना आपल्या अभिनयक्षमतेची कक्षा लक्षणीयरीत्या विस्तारली आहे, हे लक्षात येतं.
या सिनेमात काही त्रुटी नक्कीच आहेत. विशेषतः मुंबईत राणी एकटीच या मोठ्या गुन्हेगारांशी लढते, तेव्हा तिचे कोणीच वरिष्ठ अधिकारी दाखवलेले नाहीत. एकाच प्रसंगात एक सीनियर अधिकारी तिला ओरडताना दाखवला आहे. पण त्यानंतर जेव्हा ती मुलींच्या ट्रॅफिकिंगच्या विरोधात उभी राहते, तेव्हा तिच्या दोन विश्वासू सहकाऱ्यांसह फक्त ती लढताना दाखवली आहे. मुंबईतून ती दिल्लीत जाते, तेव्हा एकदा एक वरिष्ठ अधिकारी तिला या केसमधून दूर व्हायला सांगतो, असं दाखवलं आहे. नंतर मात्र राणी स्वतःच वैयक्तिकरीत्या ही केस हाताळते. शिवाय जेव्हा ती प्रमुख सूत्रधाराच्या घरी पोचते, तेव्हा तो तिला फार काही न करता सोडून देतो, हे पटत नाही. त्याचं नंतर एक कारण सांगितलं जातंही; पण ते फारच फिल्मी आहे. सिनेमाच्या तोपर्यंतच्या वास्तववादी प्रवासाला ते सूट होत नाही. राणी तिचं नाव शिवानी शिवाजी रॉय असं सांगते. पण तिच्या घरावर पाटी मात्र डॉ. बिक्रम रॉय अशी असते. (अर्थात तिच्या वडिलांचं नाव शिवाजी असेल आणि नवऱ्याचं डॉ. बिक्रम असेल; दोघांचंही आडनाव एकच असेल आणि ती पोलिस दलात जुन्याच नावानं वावरत असेल, ही एक शक्यता आहे.)
प्रमुख खलनायक वॉल्ट उर्फ करण रस्तोगीच्या रूपात ताहिर रंजन हा नवा कलाकार आहे. त्यानं या उलट्या काळजाच्या खलनायकाची प्रत्येक छटा जीव ओतून दाखवली आहे. छोट्या भूमिकेत जिश्शू सेनगुप्ता आणि मोना आंबेगावकर प्रभावी. अन्य छोट्या भूमिकांत अनेक नवोदित कलाकार आहेत. त्यांचीही कामं चांगली झाली आहेत. विशेषतः शिवानीच्या मुंबई पोलिस दलातील मुस्लिम सहकाऱ्याचं काम करणारा कलाकार छाप पाडतो. सिनेमाला संगीत शंतनू मोईत्रा यांचं असून, शेवटी ‘छेड के देखो तुम मुझ को मैं तुम को नही छोडूंगी,’ हे (‘मर्दानी अँथम’ असं वर्णिलेलं) गाणं जमलेलं आहे.
निर्भया प्रकरणानंतर आपल्या देशात स्त्री अत्याचारांविरुद्ध मोठी जागृती झाल्याचं चित्र वरकरणी दिसतं. मात्र, प्रत्यक्षात अनेक लहान मुलींना आजही राजरोस पळवून नेलं जातं आणि त्यांना परदेशांत करोडो रुपयांना विकलं जातं. हे प्रकार बंद होतील, तेव्हाच देशातला प्रत्येक पुरुष ‘मर्द’ म्हणवण्यास लायक असेल. अन्यथा तोपर्यंत अशा नराधमांना ‘मर्दानीं’च्या बुटांचा प्रसाद वाटप करीत राहणे, हाच या सिनेमाचा खरा संदेश!
---
निर्माते : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
कथा : गोपी पुथरन
संगीत : शंतनू मोईत्रा
प्रमुख भूमिका : राणी मुखर्जी, जिश्शू, रंजन, प्रियांका शर्मा, मोना आंबेगावकर आदी.
कालावधी : एक तास ५३ मिनिटे
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २३ ऑगस्ट २०१४)
----
--------------------------------------------------------------------------------------
 

No comments:

Post a Comment