8 Aug 2014

बाळपणीचा खाऊ सुखाचा...


लहानपणी - म्हणजे जेव्हा 'खाऊ' या शब्दाचा अर्थ 'खाण्याचे पदार्थ' एवढाच होता - त्या वेळच्या शाळेतल्या, मधल्या सुट्टीतल्या चटकमटक खाण्याच्या या आठवणी आहेत. गाभुळलेल्या चिंचा पाहिल्यावर तोंडाचे जे काही होते, तेच आत्ता माझ्या मनाचे या आठवणी जागवताना झाले आहे. मेंदूतली ती विशिष्ट संप्रेरके जागृत झाली आहेत आणि शाळेतल्या मधल्या सुट्टीची घंटा कानात घणघणू लागली आहे. या आठवणी १९८१ ते १९८५ या काळात प्राथमिक शाळेत गेलेल्या इतर कुठल्याही मुला-मुलींच्या आठवणीसारख्याच आहेत. सगळ्याच गोड अजिबात नाहीत... बऱ्याचशा आंबट, तुरट, खारट आणि तिखटही आहेत. माझं शिक्षण तालुक्याच्या गावाला जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जि. प. च्या शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर' हेच नाव असतं. तसंच ते माझ्या शाळेलाही होतं. चौकोनी आकारात शाळा होती. काटकोनात दोन कोन मुलांचे, तिसरा मुलींचा आणि चौथा म्हणजे एक भिंत होती. त्या भिंतीवर 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी' असं भल्या मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं. ('जगामाजी'चा अर्थ माहिती नसल्यानं बरेच दिवस हे लिहायला चुकलंय असंच वाटायचं.) ही भिंत लांबलचक होती. 'विद्येनेच' आणि 'जगामाजी' या शब्दांमध्ये चांगलं पन्नास-साठ मीटर अंतर असेल. 'विद्येनेच' या शब्दाच्या आश्रयाला एक खाऊवाला असायचा आणि 'जगामाजी' दुसरा बसायचा. याशिवाय काही अंतर सोडून खासगी माध्यमिक शाळा होती. या दोन्हीच्या जंक्शनला तर भरपूर खाऊवाले बसायचे. त्यात मावशा जास्त असायच्या. खाऊमध्ये लेमन गोळ्या, चिक्की असायची. चॉकलेटं फार नसत. किमती पाच पैशांपासून ते ५० पैशांपर्यंत असायच्या. 
 मुलांकडं पाच, दहा, वीस, पंचवीस आणि ५० पैशांची नाणी असत. रुपया क्वचितच कुणाकडं असे. दहा पैशांचं नाणं गोल, पण झिगझॅग आकाराचं असायचं. वीस पैशांचं नाणं बहुदा षटकोनी आकाराचं होतं. २५ पैसे अर्थात चाराणे हे नाणं फारच लहान होतं. ५० पैशांचं नाणं जरा चांगल्या धातूचं (निकेल?) असायचं. मधली सुट्टी झाली, की पोरांच्या कंपासमधून किंवा खाकी चड्ड्यांमधून ही नाणी बाहेर यायची. त्या वेळी पारलेनं 'किसमी' नावाचं एक चॉकलेट काढलं होतं. ते या खाऊवाल्यांकडं मिळत नसलं, तरी किराणा दुकानांत मिळायचं. लिमलेट किंवा लेमनच्या रंगीबिरंगी गोळ्या असायच्या. त्या अतिगोड असत आणि दातानं कडाकडा फोडून खायला मजा येत असे. रावळगावच्या टॉफ्याही क्वचित असत. 

या खाऊवाल्यांकडं घरगुती चिक्की मिळायची. अल्युमिनियमच्या एका मोठ्या परातीत ती ठेवलेली असायची. मावशा किमतीनुसार ती हातानंच तोडून देत. भलती चिकट असायची. त्यात गूळ मजबूत. ही चिक्की खाण्यापेक्षा इतर पोरांना पाठीमागं किंवा डोक्यात केसांना लावण्यासाठीच वापरली जायची. आणखी एक लोकप्रिय खाऊ म्हणजे बॉबी. ही बॉबी भरपूर खावी, असं मला वाटे आणि कितीही खाल्ली तरी समाधान होत नसे. पाच बोटांत पाच बॉब्या घालून मिरवणे हा तर सगळ्यांचाच आवडता छंद होता. ही बॉबीदेखील नगावर मिळायची आणि ती कधीच पुरत नसे. (पुढं मोठं झाल्यावर मग बॉबीचे मोठमोठे पुडे आणून मी ती हौस फेडली.) कधी तरी 'बुढ्ढी के बाल'वाला माणूस यायचा. ते आम्ही कधी तरी खायचो. या पदार्थाविषयी पुष्कळ प्रवाद असायचे. त्यात एकदा एका मुलानं मला हा पदार्थ कशापासून बनवतात हे सांगितलं (ते मी इथं लिहू शकत नाही...), तेव्हापासून मी हा पदार्थ कायमचा सोडला. पुढं त्यात काही तथ्य नव्हतं, हे कळलं तरीही! आणि हो, कुल्फीवाले, गारेगारवाले असायचेच. त्यातल्या त्यात मलई कुल्फी आम्ही खायचो. गारेगारला हात लावू नये, असंच घरून शिकवण्यात आलं होतं. पण कधी तरी चोरून-मारून खाणं व्हायचंच. याशिवाय सीझननुसार रानमेवा असायचा. 
चिंचा, बोरं, पेरू, आवळे, जांभळं हे सगळं मिळायचं. आणि अगदी स्वस्तात. गाभुळलेल्या चिंचांकडं अर्थात मुलींचा ओढा असायचा. त्यांच्या गर्दीतून वाट मिळाली, तरच मुलांना बोरं वगैरे मिळायची. ही गावरान, शेंबडी बोरं असायची. ती वर्गात चोरून न्यायची आणि बोरं खाऊन बिया फेकून मारण्याचं (मुलं वि. मुली असं) युद्ध रंगवायचं हे तर चालायचंच.

शहरी मुलांना मिळणारे केक, क्रीमरोल, पाव, सँडविच, जेली, जॅम, सॉस, क्रीम बिस्किटं हे पदार्थ आमच्या गावीही नव्हते. (म्हणजे शब्दशः आमच्या गावात मिळत नसत.) शहरात कुणी गेलं किंवा तिथून कुणी आलं तरच हे बेकरी प्रॉडक्ट्स तोंडी पडत. पण त्यासाठी आम्ही हपापलेले नव्हतो. उलट गावच्या गावरान खाऊमुळं चांगल्या वाढीला मदतच झाली. आमच्या लहानपणचं एकमेव बिस्कीट म्हणजे पारले ग्लुकोज. (जे नंतर 'पारले-जी' झालं!) या बिस्कीट कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागाला आपला साष्टांग दंडवत आहे. 
कारण लहानपणी जी चव लागत असे, तीच आजही हे बिस्कीट खाताना लागते. लहानपणाशी धागा जोडणारा हा एकच पदार्थ आता उरला आहे. माझं लहानपण फारशा सोयी-सुविधा नसलेल्या तालुक्याच्या लहान गावात गेलं. तिथल्या खाऊच्या आठवणी फार अगदी 'वॉव' करायला लावणाऱ्या नसतीलही; पण अगदी 'वॅक' करायला लावतील अशाही नाहीत! आपल्या मध्यमवर्गीय जगण्यासारख्या त्या आठवणीही मध्यम मध्यमच आहेत. काही गोड, काही आंबट, काही तुरट, तर काही तिखट! फार तीव्र, टोकाचं असं काही नाही. तरीही त्या अजून मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत आहेत... कारण त्या फार गोड अन् निरागस आहेत. आपल्या लहानपणासारख्याच! 

_______________________________________________

No comments:

Post a Comment