8 Feb 2015

ज्याची त्याची अभिरुची...


एआयबी - अर्थात ‘ऑल इंडिया बकचोद’ नावाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला. त्यात करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीरसिंह यांसारखे बॉलिवूडमधले बडे दिग्दर्शक-कलाकार आणि काही स्टँडअप कॉमेडियन सहभागी झाले होते. चार हजार रुपयांचं तिकीट घेऊन सुमारे चार हजार लोकांनी तो कार्यक्रम पाहिला. त्यात दीपिका पदुकोण, आलिया भट, अनुराग कश्यप असे अनेक नामवंत स्टार प्रेक्षकांत होते. इन्सल्ट कॉमेडी नावाचा हा प्रकार परदेशांत पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्याच्या स्वरूपामुळंच त्याच्यावर आपल्याकडं जोरदार टीका झाली. अर्थात अनेकांनी तो ऑनलाइन एंजॉयही केला. या कार्यक्रमाला आक्षेप असणाऱ्यांनी असे कार्यक्रम होऊच नयेत, असं म्हणण्यापेक्षा ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडं दुर्लक्ष करावं, हेच योग्य.
काही नामवंत लोकांना या कार्यक्रमात आमंत्रित करायचं आणि उपस्थित कॉमेडियन मंडळींनी त्यांचा होता होईल तो वाईट भाषेत पाणउतारा करायचा, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्यात एरवी असभ्य म्हणून गणले गेलेले शब्द आणि भाषा आलीच. अर्थात हा सर्व प्रकार मजेमजेनंच घ्यायचा असल्यामुळं ज्यांना हे मान्य आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होतात, यात शंका नाही. शिमग्याला एक दिवस जसं आपल्याला वाट्टेल ते बोलण्याची परवानगी असते तसंच हे आहे. हे सगळं पाहता या कार्यक्रमावर आक्षेप येणार यात शंका नव्हतीच. तसे ते आलेही.
आपल्याकडं असभ्य किंवा वाईट शब्दांची लोकांना अॅलर्जी आहे. खासगी संभाषणात ते कितीही मुक्तपणे वापरले तरी सार्वजनिकरीत्या आणि कायदेशीर मार्गाने असं काही होतं आहे, ही कल्पनाच अनेकांना सहन होऊ शकत नाही. ते साहजिकच आहे. मात्र, हा कार्यक्रम तिकीट लावून होता आणि त्याचं स्वरूप अगदी स्पष्ट होतं. तरीही तो ज्या अर्थी हाउसफुल्ल झाला आणि त्यात महिलाही मोठ्या प्रमाणात आल्या, याचा अर्थ समाजातील एका वर्गाला असा कार्यक्रम एंजॉय करायचा आहे (आणि त्यांना त्याची सवयही आहे...) हे स्पष्ट झालं. अशा खासगीत करायच्या अनेक गोष्टी पूर्वीपासूनच महानगरांत चालत आल्या आहेत आणि जोवर त्या विशिष्ट वर्तुळातच सुरू होत्या तोपर्यंत त्याला कुणी आक्षेप घेण्याचा सवाल नव्हता. आता यू-ट्यूबच्या माध्यमातून हे सगळं समाजाच्या सर्वच स्तरांपर्यंत (अर्थात अगदी शंभर टक्के नाहीच, पण पूर्वीपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणात) पोचत असल्यामुळं हा सर्व प्रश्न आला आहे.
या कार्यक्रमाचा तासाभराचा संपादित अंश मीही यू-ट्यूबवर पाहिला. मला तर तो फारच फालतू वाटला. म्हणजे त्यात अश्लील शब्द वापरले म्हणून नव्हे, तर ते वापरण्यात जराही अक्कलहुशारी नव्हती किंवा त्यातून विनोदनिर्मिती करण्याचे प्रयत्न फारच टुकार होते, म्हणून. यातले ‘फ’कारी-‘भ’कारी शब्द हल्लीच्या तरुण पिढीच्या तोंडात सर्रास असतात. त्याचं समर्थन करण्याचा मुद्दा इथं नाही. पण अशा कार्यक्रमांतून प्रेक्षकांना आपण काही तरी नवं पाहतो आहे, याचा एक धक्का बसायचा असतो, तो फारसा काही बसला नाही, या अर्थानं तो फालतू होता हे नक्की. यात करण जोहरनं स्वतःवर अनेक विनोद केले किंवा उपस्थितांनीही त्याच्यावर अनेक विनोद केले. करण जोहरविषयीचे विनोद कसले असतील, हे जाणकारांना सांगण्याची आवश्यकता नाही. प्रेक्षकांत आलिया भट बसली होती. तिला थेट उद्देशून काही कॉमेडियन 'आलिया, पोटॅशियमचं रेणूसूत्र म्हणजे के... तू या विषयात प्रयत्नही करू नकोस,' किंवा 'आयसिस ही एक दहशतवादी संघटना आहे, आयएसआय मार्क असतो तो वेगळा...' असे काही विनोद करत होते. तीही हसून याला दाद देत होती. हा सगळा प्रकार फारच उथळ होता, पण निदान इथं थोडंफार हसायला तरी येत होतं. इन्सल्ट कॉमेडी करताना त्या माणसाची वैगुण्यं नेमक्या भाषेत हेरून त्याला टोमणे मारणं अपेक्षित आहे. इथं फारच कमी कॉमेडियननी तो सेन्स दाखवला. एक-दोन अपवाद. बाकी सर्वांनी लैंगिक संबंधसूचक शब्द वापरणे, एखाद्याच्या वर्णावर, जाडीवर कमेंट करणे असे सगळे फालतू प्रकार करूनच विनोद केले. या कार्यक्रमाचं समीक्षण करणं हा हेतू नाहीय. पण हा जो नवा प्रकार आपल्याकडं आणायचा तो त्यातल्या त्यात बुद्धी चालवून जरा अजून आकर्षक करण्याचा प्रयत्नही संयोजकांनी केला नाही. त्याऐवजी आपल्याकडच्या शिव्या आणि येऊन-जाऊन सेक्सवरचे टिपिकल विनोद करण्यातच त्यांनी धन्यता मानली. परदेशी कार्यक्रमांतले असे विनोद आणि आपल्याकडचे असे सेक्सी विनोद यांत दर्जात्मक फरक जाणवतो, याचं कारण मुळात त्यांच्याकडं या विषयाकडं पाहण्याचा असलेला मोकळेपणा आणि आपल्याकडचा झापडबंदपणा. त्यांच्याकडं समाजव्यवस्था खुली आहे. ती अशा कार्यक्रमांतून सहजी प्रतिबिंबित होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपल्याकडे असं नाही. त्यामुळं आपल्या आईसमोर असे घाणेरडे विनोद करताना करण जोहरला, सुरुवातीलाच काही वेळानं ‘हे ऐकून तिच्यासाठी अॅम्बुलन्स मागवावी लागेल,’ असा विनोद करावा लागला. इथंच हा कार्यक्रम फसला. आपल्याकडं अर्वाच्य शब्द उच्चारणाऱ्यांच्या तोंडी ती भाषा वापरण्यातली सहजता दिसत नाही. (आपल्या सध्याच्या समाजव्यवस्थेमुळं ती येणंही शक्य नाही आणि त्यात काहीच गैर नाही.) पण त्यामुळं त्याला घाणेरडा वास येतो, याची जाणीव संयोजकांना नव्हती. परदेशातल्या नटाने आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडला छाती उघडी करून दाखवणं खपून जातं. पण आपल्याकडं असं करणारा अर्जुन कपूर ओंगळवाणा वाटतो. परदेशांतल्या कार्यक्रमाचं केवळ अंधानुकरण केल्यानंच असं होतं.
या अशा कार्यक्रमाच्या मानसिकतेकडंही पाहायला हवं. काय उद्देश असेल असे कार्यक्रम सादर करण्याचा? विनोदातून सामाजिक व्यंगावर बोट ठेवणं हा एक असू शकेल. यासाठी जी भाषा वापरली जाते, ती मला वाटते तरुणाईच्या बंडखोरीचे प्रतीक आहे. एखादी गोष्ट करायची नाही असा समाजाचा नियम असला, की तरुणवर्गाला ती मोडण्यात विशेष काही तरी केल्यासारखं वाटतं. (आपल्या तरुणाईच्या ऊर्जेची वाफ अशा कार्यक्रमांतून दवडायची का, हा नंतरचा मुद्दा आहे. त्याला विधायक वळण कसं लावता येऊ शकतं हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.) पण तरुणाईला तसं करण्यात सुरुवातीला गंमत वाटत असेल, तर करू द्यावं. त्यातलं नावीन्य संपलं, की ती स्वतःहूनच बाजूला होणार आहे. आपल्या समाजाचा याबाबतचा दांभिकपणा अलौकिक आहे. आपल्या पिढीत आपण बंडखोरी मानलं गेलेलं सर्व काही करायचं, पण आपल्या पुढच्या पिढीला मात्र उपदेशाचे वायफळ डोस पाजायचे हे आपल्याकडचं व्यवच्छेदक सामाजिक लक्षण आहे. किमान समाजानं तरी हे असलं ढोंगी पालकत्व घेऊ नये. आणखी एक मुद्दा, म्हणजे शिव्या देणं किंवा जाहीर रीतीनं त्या उच्चारणं हा एक उत्तम ‘स्ट्रेसबस्टर’ आहे, असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा ज्या काही शिव्या द्यायच्यात त्या सगळ्यांसमोरच द्या; सुरुवातीला थ्रिल म्हणून त्यात अपशब्द येतील, पण नंतर कदाचित ही टीका सेलिब्रिटींपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारीही ठरू शकेल. आपण किती फालतू आहोत, हे समजायला लागेल. अशी टीका ऐकून घेण्याची सवय लागणं हेही चांगलंच आहे की. त्यातून वाढली तर सहिष्णुताच वाढेल. पण ती फार लांबची प्रक्रिया आहे, हे खरं.

राहिला प्रश्न तो असे कार्यक्रम होऊ द्यावेत की नाही, याचा. माझ्या मते, त्यांना विरोध करायचं काही कारण नाही. ज्याला ओंगळवाणे विनोद ऐकण्याची हौस आहे आणि ज्याच्याकडे चार हजार रुपये आहेत त्यानं खुशाल या कार्यक्रमाला जावं. ज्यांना हे पटत नाही त्यांनी तिकडं फिरकू नये. मात्र, उगाच देशाची संस्कृती बुडत असल्याचा आविर्भाव आणू नये. असे केल्यानं या फालतू कार्यक्रमाला आपण अवाजवी महत्त्व देतो. असे कार्यक्रम दर्जा नसल्यानं आपल्या मरणानंच मरतील. आपल्या समाजात एक सामूहिक शहाणपण अबाधित आहे. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी म्हटल्याप्रमाणे, हा देश कीर्तनानं कधी सुधारला नाही आणि तमाशानं कधी बिघडला नाही! ते खरंच आहे. त्यामुळं या कार्यक्रमाच्या नावे WTF म्हणून खडे फोडण्यात काही अर्थ नाही. श्लील-अश्लीलतेच्या कल्पना काळानुरूप बदलत असतात. काल जे खटकतं होतं, ते आज खटकतंच असं नाही. त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. कुठल्याही गोष्टीचं ओव्हरएक्स्पोजर झालं, की त्याची किंमत कमीच होते. याही कार्यक्रमाचं कदाचित तसंच होईल. त्यामुळं ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडं दुर्लक्ष करावं. सांस्कृतिक पोलिसगिरी करणं योग्य नाही. या देशात कायद्याच्या चौकटीत लोकांना जे काही अभिव्यक्त व्हायचं आहे ते होऊ द्या.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, ८ फेब्रुवारी २०१५ - संपादित)
---

No comments:

Post a Comment