21 Apr 2015

पंजाब डायरी - भाग ४

संमेलनाचं सूप, वाघा सीमा अन् ‘घरवापसी’...
------------------------------------------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांतील गाण्यांच्या ठेक्यावरच रात्री अमृतसरला पोचलो आणि लगेच निद्राधीन झालो. संध्याकाळी फय्याज यांनी ‘लागी कलेजवाँ कटार’चा लावलेला सूर कानात रेंगाळत होता. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार होते. तेजासिंगजींची धावपळ सुरू होतीच. पण बस तरीही साडेअकराच्या आसपास घुमानला पोचली. ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची मुलाखत सुरू होती मुख्य मंडपात. मंडपात शिरताना संजय नहार भेटले. धावपळीत होते. मंडपात बऱ्यापैकी गर्दी होती. काल पर्यटनाला गेलेली मंडळी परतली होती. गणेश देवींची मुलाखत चांगली झाली. म्हणजे ते चांगलं बोलत होते. पण मुलाखतकार (सुषमा करोगल आणि अरुण जाखडे) त्यांना फार लांबलचक प्रश्न विचारत होते. त्यामुळं वेळ जात होता, असं वाटलं. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही जेवलो आणि लगेच मुख्य मंडपात परत आलो. त्या वेळी निमंत्रितांचं कविसंमेलन सुरू झालं होतं. याचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी करणार, असं पत्रिकेत छापलं होतं. पण ती आलीच नाही. अशोक नायगावकरांनीच सूत्रं सांभाळली. हे कविसंमेलनही यथातथाच झालं. नायगावकरांनीही जुनीच कविता ऐकवली. ते काही तरी मराठी आणि पंजाबी माणसं भेटल्यावर काय धमाल उडते, यावर छान कविता ऐकवतील, असं वाटलं होतं. पण साठ तासांच्या प्रवासानं त्यांच्यातला कवी ‘वीक’ झाला असावा. असो. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनाची सांगता व्हायची होती. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादलही असणार होते. आम्ही तिथंच थांबलो मग मुख्य मंडपात. मग एकेक जण करून मीडिया सेंटरमध्ये गेलो. कारण मोबाइलचं चार्जिंग ढपायचं. सुनीतकडं पॉवर बँक होती. पण त्यावर किती वेळ (आणि किती जण) चार्ज करणार? मीडिया सेंटरमध्येही पॉवर पॉइंट सगळे कुणी ना कुणी ताब्यात घेतलेले असायचे. मग पीसीला किंवा लॅपटॉपला मोबाइल लावून थोडा थोडा चार्ज करायचा. मला यामुळंच बरेच फोटो काढता आले नाहीत किंवा रेकॉर्डिंगही करता आलं नाही. अर्थात तेलकर असल्यामुळं त्यांच्याकडून ते फोटो घेता येणार आहेत, तो भाग वेगळा. आम्ही मीडिया सेंटरमध्ये असतानाच मुख्यमंत्री आले. ते आधी पत्रकार परिषद घेणार, असं कळलं. पण तिथं फारच गर्दी होती. आणि मला चार्जिंगला लावलेला मोबाइल सोडून जाताही येत नव्हतं. तेलकरही मीडिया सेंटरमध्येच होते. शिवाय मुख्य मंडपात गर्दी वाढत होती. आमच्यापैकी एक जण जागा धरून बसायचा आणि नंतर पेंढारकरला आमच्या दोन सीट राखून ठेवण्यासाठी बराच किल्ला लढवावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत इंदू मिलच्या जागेच्या ताब्याबाबत काही घोषणा केली, एवढं कळलं. नंतर आम्ही धावतपळत मंडपात आमच्या जागेवर आलो. समारोपाचा समारंभ राजकीय मंडळींच्या उपस्थितीत एकदाचा सुरू झाला. ठरावाचं वाचन झालं. विशेष म्हणजे यात संयुक्त महाराष्ट्राचा ठरावच नव्हता. पूर्वी हा ठराव अगदी न चुकता असायचा. आता केवळ उपचार म्हणूनसुद्धा हा ठराव वाचला गेला नाही. बाकी ठराव नेहमीचेच होते. घुमानमध्ये हे करावं, ते करावं असेही ठराव संयोजकांनी बरेच केले होते. या वेळी ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक प्रा. रहमान राही उपस्थित होते. त्यांचं भाषण झालं. मात्र, त्यांनी उर्दूतूनच सुरुवात केली. अस्खलित उर्दूतून ते बोलत होते. संजय नहारांचं त्यांनी कौतुक केलं. प्रा. राही साहेब बरेच थकलेही होते. पण त्यांनीही डॉ. मोरेंसारखं स्थळ-काळाचं भान न राखता, दीर्घ भाषण ठोकायला सुरुवात केली. तेव्हाही लोक कंटाळले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यांनी सुरुवात पंजाबीतूनच केली. नेहमीप्रमाणं जोरदार भाषण ठोकलं. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादलही दोन शब्द मराठी बोलले. आमरस-पुरी आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी लोक आणखी आठवडाभर इथं राहिले, तर पंजाबी नागरिक पंजाबी खाणं विसरून जातील, असं ते म्हणाले. ही जरा जादाच स्तुती होती. पण भारी वाटलं. हा समारंभ संपल्यानंतर सगळ्यांची बातम्या देण्याची पुन्हा झुंबड उडाली. आम्ही मंडपापाशी जरा रेंगाळलो. आता एकदम सगळे कार्यक्रम संपल्याची जाणीव झाल्यानं काहीसं रितं रितं वाटलं. आम्ही जेवलो आणि अमृतसरच्या बसमध्ये येऊन बसलो. ही बस नेहमीपेक्षा वेगळी असणार होती. नेहमीची बस विशेष रेल्वेतील प्रवासी घेऊन बियास आणि उमरतांडा रेल्वे स्टेशनांवर जाणार होती.
 आम्ही तेजासिंगजींचा निरोप घेतला. आमची बस निघाली. अमृतसरला आणखी एखादा दिवस राहणारे आम्ही काही पत्रकार त्यात होतो. ही बस नेहमीच्या रूटनं गेली नाही. अन्य काही हॉटेलांमध्ये असणाऱ्या बसमधील पत्रकारांना सोडत ही बस चालली होती. आमचं हॉटेल सर्वांत शेवटी होतं. अमृतसर येताच बायपाससारख्या एका मोठ्या रोडनं ही बस शहरात निघाली. हा भाग आम्ही पूर्वी पाहिला नव्हता. हा भाग बराच चकाचक होता. अनेक रिसॉर्ट, मोठमोठी हॉटेलं, मॉल, बागा त्या रस्त्यावर होत्या. एखाद्या आधुनिक शहरासारखा हा भाग दिसत होता. अमृतसर फारच गलिच्छ आणि जुनाट शहर आहे, हे आमचं सुरुवातीचं मत काहीसं बदलायला या बसफेरीचा उपयोग झाला. सर्वांना सोडून शेवटी आमची बस आमच्या हॉटेलवर आली. सर्वांचा निरोप घेतला आणि रूमवर येऊन झोपलोच. दमणूक भरपूर झाली होती. शिवाय उद्या लवकर उठायची घाई नव्हती. त्यामुळं झोप तर चांगली झाली.

'वाघा'च्या गुहेत...
---------------------
 सकाळी आठ-साडेआठला उठलो. आवरलं. ब्रेकफास्ट झाला. आज आम्हाला वाघा बॉर्डरला जायचं होतं. त्याआधी दिवसा पुन्हा एकदा सुवर्णमंदिर पाह्यचं होतं. मग पुन्हा तिकडं गेलो. तिथंच शॉपिंग वगैरे झालं. त्यापूर्वीच वाघा बॉर्डरला जाण्यासाठी एक टमटमवजा रिक्षा बुक केली. खरेदी करण्यात प्रत्येकाचा तासभर तरी गेला. पतियाळा ड्रेसेस, खास तिकडचे दुपट्टे, फुलकारी ड्रेस, टॉप, अमृतसरी जुती, सुवर्णमंदिरात मिळणारी हातात घालायची कडी आदींची खरेदी झाली.
मग एका ठिकाणी पंजाबी लस्सी प्यायलो. मला ती पोटभर झाली. त्यामुळं दुपारी कुणीच जेवलो असं नाही. शिवाय खायचे पदार्थ सोबत होतेच. अखेर एक वाजता आमचा रिक्षावाला बोलवायला आला. एका विशिष्ट ठिकाणी उभं राह्यला त्यानं सांगितलं होतं. आमच्याखेरीज आणखी तीन मुलं त्यानं घेतली होती. रिक्षा जुन्या अमृतसरमधल्या बोळकांडांमधून बाहेर पडून एकदाची महामार्गाला लागली. मला वाटलं होतं, की वाघा बॉर्डरपर्यंतचं अंतर २०-२२ किलोमीटर आहे. प्रत्यक्षात ते थोडं जास्त, म्हणजे २९ किलोमीटर निघालं. एवढं अंतर टमटम रिक्षानं जाण्याचा निर्णय चुकला तर नाही ना, असं वाटून गेलं. त्यात थोडं अंतर गेल्यावर रिक्षावाला डिझेल भरायला थांबला. समोर एक मोठ्ठी हेरिटेज टाइप तपकिरी इमारत दिसत होती. हे अमृतसरचं प्रसिद्ध खालसा कॉलेज. रिक्षा थांबल्याचा फायदा घेऊन मामूंनी त्याचे भरपूर फोटो काढले. मीही काढले. पुढं गुरू नानक विद्यापीठाचं प्रवेशद्वारही दिसलं. रिक्षा शहराबाहेर पडल्यावर चांगला चौपदरी महामार्ग लागला. आम्ही आता लाहोरच्या दिशेनं निघालो होतो. मनात एक वेगळंच फीलिंग यायला लागलं. फाळणीच्या दिवसांविषयी कुठं कुठं वाचलेलं, ते सगळं आठवायला लागलं. पंजाबनं काय सोसलं त्या काळात! एखाद्या शरीराचे दोन भाग करावेत, तसं एका रात्रीतून रॅडक्लिफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं नकाशावर फाळणीची रेघ ओढली. पंजाबच्या हृदयावर सुराच भोसकला. कालपर्यंत एक अखंड असलेलं शेत आज दोन देशांत विभागलं गेलं. तीच जमीन, तोच गहू, तेच पाणी... पण मध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषा उभी राहिली. आपल्याला फाळणीची अशी थेट धग बसली नाही. उलट महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेले गोवा, दीव-दमण वगैरे भाग तर नंतर भारतातच समाविष्ट झाले. मराठवाडाही हैदराबाद संस्थानातून मुंबई राज्यात आला. आपलं काही तरी गमावण्याचं दुःख पंजाब आणि बंगालनं जसं सोसलं, ते कुणीही नाही. मनात हे विचार घोळत असतानाच वाघा बॉर्डर जवळ यायला लागली. अट्टारी हे आपल्या बाजूचं शेवटचं रेल्वे स्टेशन. आपल्या बाजूनं सर्वत्र अधिकृतपणे अट्टारी बॉर्डर असाच उल्लेख पुढं दिसला. तेव्हा लक्षात आलं, की वाघा हे गाव आता मुळात आपल्याकडं नाहीच. ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाकिस्तानात एक किलोमीटरवर असलेलं गाव आहे. अट्टारीच्या एका जहागीरदाराकडं हा सगळा भाग होता. वाघा हे गावही त्याचंच होतं. ती सगळी गोष्ट पुढं आम्ही जो ध्वज उतरविण्याचा सोहळा पाहिला, त्या वेळी निवेदकानं सांगितली. तेव्हा आपण खरं तर या सीमेला अट्टारी सीमा किंवा अट्टारी बॉर्डर म्हणायला पाहिजे. तेवढ्यात सीमारेषा आलीच. अर्थात एक-दीड किलोमीटर अलीकडंच वाहनांना पार्किंगची व्यवस्था होती. पुढं पायीच जावं लागत होतं. आमचं सामान एका ठिकाणी ठेवून आम्ही पायी निघालो.
 समोरच लाहोर २३ कि. मी. असं दाखवणारी मोठी कमान होती. सीमा सुरक्षा दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात होते. पर्यटकांची स्त्री आणि पुरुष अशा दोन रांगा त्यांनी केल्या. दोन ठिकाणी चेकपोस्ट होते. मोबाइल, पाण्याची बाटली सोडून बाकी मोठी बॅग वगैरे काही आत नेता येत नाही. बाहेर लॉकर असतात. त्या लोकांकडं प्रत्येक डागाला ५० रुपये देऊन आपल्या बॅगा, सॅक आदी तिथंच ठेवाव्या लागतात. तिसरी चेक पोस्ट ओलांडली आणि समोरच थेट भारत-पाकिस्तान सीमा दिसू लागली. अलीकडं आपलं स्वर्णजयंती प्रवेशद्वार आणि त्यानंतर थोड्याच अंतरावर पाकिस्तानचं तसंच प्रवेशद्वार. आपल्याकडं महात्मा गांधी, तर तिकडं बॅ. जीनांचं चित्र मधोमध लावलेलं. हे दृश्य अनेकदा पूर्वी बातम्यांमध्ये, माहितीपटांत, टीव्हीवर पाहिलं होतं. पण प्रत्यक्षात तिथं जाण्याचं थ्रिल काही औरच होतं. रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी दोन्ही बाजूंना स्टेडियमसारख्या पायऱ्या केल्या आहेत. तिथं चांगली जागा पटकावण्यासाठी तिसऱ्या चेकपोस्टनंतर लोक पळतच सुटले. आपल्या लोकांना कुठंही न्या, शिस्त म्हणून नसतेच. तरीही इथं आजूबाजूला बंदूकधारी जवान वावरत होते. पण इथं कुणालाच त्यांची काही धास्ती वाटायचं कारण नव्हतं. लोक आपले सैरावैरा धावत होते. आम्हीही पळालोच मग. तरीही आम्ही आत जाईपर्यंत पुढच्या पाच-सहा रांगा फुल्ल झाल्या होत्या आणि आम्हाला साधारण त्या स्टेडियमच्या मधोमध आणि थोडं पश्चिमेला म्हणजे सीमेच्या बाजूला बसायला मिळालं. तेव्हा तीन-सव्वातीन झाले होते आणि रिट्रीट सोहळा साडेपाच वाजता सुरू होणार होता. तोपर्यंत ढगाळ असलेलं वातावरण एकदम बदललं आणि सूर्य ढगांबाहेर आला. आता तिथं चांगलंच ऊन जाणवायला लागलं. आम्ही सकाळी लस्सीनंतर काहीही खाल्लं नव्हतं. तेव्हा भुकेची जाणीव प्रकर्षानं झाली. मग मी धडपडत बाहेर गेलो आणि तिथं एका कॅफेटेरियात मिळाल्या त्या तीन आलू टिक्क्या आणि केक घेऊन आलो. ते खाल्ल्यावर जरा बरं वाटलं. मी परत येईपर्यंत गर्दी भलतीच वाढली होती आणि मला जागेवर जाईपर्यंत मोठीच कसरत करावी लागली. तरीही त्या दिवशी सोमवार होता आणि रोजच्या मानानं ही गर्दी काहीच नाही, असं आमच्या रिक्षावाल्यानं नंतर सांगितलं. तरीही तिथं आठ-दहा हजार लोक असावेत. मी पलीकडं पाकिस्तानच्या बाजूला उत्सुकतेनं पाहत होतो.
तिथलं स्टेडियम मोकळंच होतं. समोरच्या बाजूला दोन-तीन बायका बसलेल्या दिसल्या फक्त. नंतर मग हळूहळू तिकडंही गर्दी झाली. तिकडं पुरुषांसाठी वेगळा स्टँड होता आणि समोर महिलांसाठी वेगळा. हे आमच्या नंतर लक्षात आलं. हळूहळू वातावरणात देशभक्तीचा जोर अन् ज्वर चढायला लागला. समोर स्पीकरवर मोठमोठ्यांदा देशभक्तिपर गाणी वाजायला सुरुवात झाली. मी जरा अलिप्तपणे आधी पाहत होतो. पण नंतर मीही गर्दीचा भाग होऊन घोषणा वगैरे दिल्याच. समोर रस्त्यावर काही मुलींची ओळ करण्यात आली. नंतर बीएसएफचा एक पांढरे कपडे घातलेला अधिकारी हातात माइक घेऊन आला. हा सर्व सोहळ्याचा सूत्रसंचालक होता. त्यानं आपले चार राष्ट्रध्वज आणले आणि त्या ओळीत उभ्या राहिलेल्या मुलींच्या हाती दिले. त्या मुलींनी समोर गेटपर्यंत तो झेंडा हाती घेऊन धावायचं. ही कल्पना मस्त होती आणि अगदी म्हाताऱ्या आजी, काकू यांना तिरंगा हाती घेऊन धावताना पाहताना मजा येत होती. तो सूत्रसंचालक लोकांना मोठमोठ्या घोषणा द्यायला लावत होता. फक्त भारतमाता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद आणि वंदे मातरम् या तीनच घोषणा द्यायची परवानगी होती. थोडक्यात, पलीकडच्यांना डिवचणाऱ्या घोषणा देऊ नका, असं सांगण्यात आलं. तिथलं ते वातावरण आणि जमलेले आपले उन्मादी लोक पाहून मला तर एकूण हा सगळा देशभक्तिपर पर्यटनाचा (पॅट्रिऑटिक टुरिझम) प्रकार वाटला. नंतर नंतर मी गंमत म्हणून पाहू लागलो. त्या जवानांचा तो आवेश, ते बूट थाडथाड आपटणं, वेगवेगळ्या आक्रमक पोझेस घेऊन सीमेपलीकडं आपला रुबाब दाखवणं हे सगळं झक्कासच होतं. पण हे सगळं ठरवून, घडवून आणलेलं नाट्य आहे हे माहिती असल्यानं त्यात नंतर गंमत वाटेनाशी झाली. एकूण हा प्रकार एकदाच पाहण्यासारखा आहे, यात शंका नाही. सीमेवर सदैव तैनात असलेल्या आपल्या जवानांना नागरिकांच्या अशा उपस्थितीने आणि घोषणाबाजीने प्रेरणा वगैरे मिळत असेल, तर ठीकच आहे. आम्ही आपले फोटो काढले आणि निघालो.

परत येताना समोर 'गणतन्त्र भारत में आप का स्वागत है' असा फलक दिसला. तो फलक पाहून खूप भारी वाटलं. एकदमच आपल्या देशाविषयीचं प्रेम माझ्या मनात दाटून आलं. (मागं एकदा कन्याकुमारीला जाताना एका चढावर लँड एंड्स अशी पाटी वाचून अंगावर असाच काटा आला होता. नंतर एकदम समोर त्रिसिंधूदर्शन झालं होतं, तेही थरारक!) आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडून असा फलक अन्यत्र कुठं पाहिला नव्हता. मग आम्ही तिथंही फोटो वगैरे काढून घेतले. बाकी आपले सर्व बेशिस्त लोक पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या पदार्थांच्या पिशव्या तिथंच टाकून निघाले होते बावळटसारखे - देशप्रेमाच्या घोषणा देत! मी जमेल तेवढा कचरा उचलला आणि बाहेर असलेल्या कचरापेटीत टाकला. बाकी कुणाला तेवढा उत्साहही दिसला नाही. बीएसएफनं खरं तर लोकांना कचरा उचलल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायलाच नको. आम्ही रस्ता ओलांडून पलीकडं आंतरराष्ट्रीय सीमारेषा पाह्यला गेलो. लोक हेच पुटपुटत होते, की एकच जमीन, एकच भाषा, एकच वेशभूषा, एकच शेती अन् आता उगाच हे दोन देश करून ठेवले आहेत.
 आम्ही हळूहळू तिथून निघालो. खरं तर अजून तिथं काही वेळ घालवावा असं वाटत होतं. कारण पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी यायला जमेलच असं नाही. पण 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' हे माहिती असल्यानं निघालो. बाहेर येऊन पुन्हा आम्ही भेळेसारखं काही तरी खाल्लं आणि परतीची वाट धरली. तासाभरात अमृतसरच्या कलकलाटात पोचलो. संध्याकाळी तर रणभेदी वाजल्यासारखे रस्त्यांवर तुफान हॉर्न केकाटत होते. माझं तर डोकंच उठलं. हॉटेलात पोचल्यावर जरा फ्रेश झालो आणि मी अन् अभिजित पुन्हा बाहेर पडलो. सुवर्णमंदिराच्या परिसरात जाऊन पुन्हा राहिलेली काही खरेदी वगैरे केली आणि परत आलो. रात्री मी अन् तेलकरांनी 'साग्रसंगीत संपूर्ण रंगीत' पार्टी करायचं ठरवलं होतं. आमच्या हॉटेल मॅनेजरनं वरच्या मजल्यावरच सर्व व्यवस्था करून दिली आणि आम्हास परमसुख प्राप्त जाहले. मॅनेजरनं खास स्थानिक स्वाद मागवला होता. बाकीही सर्व सरबराई व्यवस्थित होती. नंतर अभ्याही जेवणासाठी आम्हाला जॉइन झाला. गप्पा मारता मारता बारा केव्हा वाजले, तेही कळलं नाही. मजा आली. अखेर सकाळी लवकर उठून ट्रेन गाठायची असल्यानं आम्ही आवरतं घेतलं आणि तरंगतच खाली येऊन रूमवर येऊन, बेडवर झोकून दिलं.
सकाळी उठून भराभरा आवरलं अन् चेकआउट केलं. चहाही घेतला नाही. हलका पाऊस पडत होता. रिक्षा करून स्टेशनावर आलो. मग तिथंच चहा घेतला अन् सँडविच खाल्लं. तोवर आमची पश्चिम एक्स्प्रेस येऊन उभी राहिलीच होती. बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी ट्रेन सुटली अन् आमची टूरही संपली...
बियास स्टेशनवर एक वृद्ध दाम्पत्य आमच्या कंपार्टमेंटमध्ये आलं. ते शेवटपर्यंत म्हणजे अंधेरीला उतरेपर्यंत सोबत होते. जातानाचा प्रवास नेहमीच कंटाळवाणा होतो. तरी आम्ही आमच्या ट्रिपचे सुरुवातीपासूनचे फोटो, व्हिडिओ पाहत बराच टाइमपास केला. दुसऱ्या दिवशी अडीचला गाडी बरोबर बांद्रा टर्मिनसला पोचली. मग आम्ही टॅक्सी करून दादरला आलो. प्रगती एक्स्प्रेसचं बुकिंग होतंच. दादरला समोर उडप्याकडं खाल्लं. कैलाश मंदिरमध्ये जाऊन पंजाबी लस्सी हाणली. 'प्रगती' वेळेत आली. हाही प्रवास उत्तम झाला. शिवाजीनगरला उतरलो. निगडीपासूनचं रेल्वेतून दिसणारं पुणं पाहून भरून आलं. देशातली अनेक शहरं गाडीतून पाहिली होती. पण पुण्याएवढं स्वच्छ शहर (रेल्वेतून पाहताना) दुसरं दिसलं नाही. शिवाजीनगरला हर्षदा कार घेऊन आम्हाला न्यायला आली होती. तिच्यासोबत निमिषही आला होता. तेलकर स्टेशनला जाणार होते. मग मी अन् अभिजित त्यांच्या कारमधून त्यांच्या घरी गेलो. तिथं धनश्री अन् नील आलेच होते मला न्यायला. त्या दोघांना पाहिलं अन् प्रवासाचा सगळा शीणच गेला... पंधरा मिनिटांत घरी पोचलो. आठ दिवसांची ट्रिप संपली... पंजाबचे बल्ले बल्ले लाइफ संपले... पूर्वीचे होल्ले होल्ले आयुष्य सुरू जाहले...

                                                                                                                           (समाप्त)
----------------------------------------------
 ---------------------------------------

2 comments: