4 Jan 2019

रिव्ह्यू - भाई : व्यक्ती की वल्ली

पुतळा चैतन्याचा...
----------------------

सध्या मराठीत बायोपिकची चलती आहे. बालगंधर्वांपासून ते डॉ. काशिनाथ घाणेकरापर्यंत अनेकांवरचे चित्रपट निघाले आहेत. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ असलेले पु. ल. देशपांडे तरी याला कसे अपवाद ठरतील? त्यात सध्या पुलंची जन्मशताब्दी सुरू आहे. त्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी पुलंवरील बायोपिक ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ तयार केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, त्यातील पूर्वार्ध आज, ४ जानेवारीला सर्वत्र झळकला आहे.
पुलंच्या लेखनावर (उदा. म्हैस) चित्रपट काढण्याचे आधीचे प्रयत्न वाईट फसले होते. स्वत: पु. ल. उत्तम परफॉर्मर असल्याने त्यांच्या कलाकृतींना बाकी कुणी हातच लावू नये, असं वाटायचं. पण इथं त्यांच्या कुठल्या पुस्तकावर वा व्यक्तिरेखेवर हा चित्रपट नसून, त्यांचा जीवनपटच आहे. त्यामुळं कशाशी तुलना होण्याचा प्रश्न आधीच निकालात निघाला. आता प्रश्न, की हा जीवनपट कसा झाला आहे? तर याचं उत्तर ‘उत्तम’, ‘अप्रतिम’ असं असून, पुलंवर, मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट ताबडतोब जाऊन पाहिला पाहिजे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं एवढा मोठा लेखक व माणूस होऊन गेला, याची माहिती आज चाळिशीत वा त्यापुढे असलेल्या पिढीला असली, तरी नव्या पिढीला ती होणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि सिनेमा हे माध्यम नव्या पिढीपासून ते सर्वांपर्यंत सहज पोचत असल्यानं या सिनेमाद्वारे पु. ल. नावाचं रसायन नक्की काय होतं, याची माहिती आता खूप जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. महेश मांजरेकर यांनी हे फार महत्त्वाचं काम केलं असल्यामुळं त्यांचं आणि पटकथा लेखक गणेश मतकरी यांचं अभिनंदन करायला हवं.
पुलंचं एक (व कदाचित एकमेव) चरित्र प्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांनी ‘पुलं : चांदणे स्मरणाचे’ या नावानं लिहिलं आहे व ते नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की हे पुस्तक वाचून हा सिनेमा बघितला तर दुधात साखर! याचं कारण सिनेमा त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना, सगळा कालक्रम दाखवू शकत नाही. मात्र, पुस्तकातून तो आपल्याला नीट कळतो. तो माहिती असेल, तर या सिनेमातल्या लहानसहान जागांचा, संदर्भांचा, पुलंच्या व इतर पात्रांच्या बोलण्याचा आनंद अधिक लुटता येईल.
आता या सिनेमाविषयी! हा सिनेमा अगदी पहिल्या फ्रेमपासून आपल्या मनाची पकड घेतो. पुलंचं आयुष्य एवढं विविधरंगी, विविधढंगी होतं, की ते रूपेरी पडद्यावर अगदी दोन भागांत बसवायचं म्हटलं, तरी ते ‘घागरीत सागर’ सामावण्याएवढं कठीण. त्यामुळं लेखक व दिग्दर्शकासमोर त्यांच्या आयुष्यातल्या निवडक घटनाच घेण्याचं व दाखवण्याचं आव्हान होतं. इथं ती गोष्ट जमून गेल्यानं प्रेक्षक पुलंच्या या चरित्रपटात सुरुवातीपासून रमून जातो.
पु. ल. पुण्यात ‘प्रयाग’ला शेवटी ॲडमिट होते, तिथून या फ्लॅशबॅकनं ही चरित्रकथा सुरू होते. त्याहीआधी पुलंच्या वल्लीपणाची झलक दाखवणारा, न. चिं. केळकर यांना मुंबईतील व्याख्यानानंतर विचारलेल्या ‘पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे हो?’ या प्रश्नाचा प्रसंग सुरुवातीला येतो. मात्र, चित्रपटाच्या उपशीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे ‘व्यक्ती की वल्ली’ यापैकी पुलंच्या ‘व्यक्ती’ या अंगाचं अधिक दर्शन या चित्रपटात होतं आणि ते अगदी मनोज्ञ आहे.
पुलंच्या व्यक्तिगत आयुष्यातले, पण कदाचित लोकांना फारसे माहिती नसलेले अनेक प्रसंग या चित्रपटात तपशीलवार पद्धतीनं येतात. त्यात त्यांच्या आईची - लक्ष्मीबाईंची - व्यक्तिरेखा, आबांचं (वडील) पुलंच्या कलागुणांवरील प्रेम व प्रोत्साहन, त्यांचं अकाली जाणं, पुण्यातील दिवाडकर कुटुंबातील सुंदर या मुलीसोबत पुलंचा झालेला विवाह व अवघ्या आठवड्यात त्या नववधूचं टायफॉइडमुळं झालेलं निधन, सुनीताबाईंची व पुलंची पहिली भेट, प्रेम, रत्नागिरीत अगदी साधेपणानं झालेलं लग्न, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी यांच्याशी असलेलं मैत्र आदी गोष्टी येतात. आता या गोष्टी सांगताना दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे यातली पात्रं आणि दुसरी म्हणजे त्या प्रसंगांची मांडणी.... ‘भाई’ दोन्ही बाबींमध्ये उजवा ठरतो. यातली पात्रनिवड चांगली जमली आहे. पुलंचे वडील लक्ष्मणराव (मांजरेकरांचे लाडके) सचिन खेडेकर यांनी साकारले आहेत, तर आईची भूमिका अश्विनी गिरी यांनी केली आहे. अजय पूरकर भीमसेन जोशी, पद्मनाभ बिंड वसंतराव देशपांडे, तर स्वानंद किरकिरे कुमार गंधर्वांच्या भूमिकेत आहेत. अर्थात सिनेमात या सगळ्यांच्या भूमिकेची लांबी फार नाही. मात्र, त्यांचं दिसणं कन्व्हिन्सिंग असणं प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचं होतं. या कसोटीवर हा सिनेमा अगदी पूर्ण उतरतो. (अर्थात जब्बार पटेलांच्या छोटेखानी भूमिकेत सुनील बर्वे शोभत नाही, पण ती भूमिका अगदी काही मिनिटांचीच आहे. त्यामुळं दुर्लक्ष करण्याजोगी!) बाकी महत्त्वाच्या पात्रांची निवड अचूक असल्यानं हा सिनेमा पहिल्या फ्रेमपासून आपल्याला त्या काळात घेऊन जातो. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. रत्नाकर मतकरींनी तो सगळा काळ पाहिलेला असल्यानं त्यांच्या संवादलेखनात आपोआप ती ‘ऑथेंटिसिटी’ आली आहे. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला दिसतो.
आता यातली सर्वांत महत्त्वाची दोन पात्रं म्हणजे सुनीताबाई व खुद्द पु. ल.! पैकी सुनीताबाईंच्या तरुणपणीच्या भूमिकेत इरावती हर्षे आहे आणि वयस्कर भूमिकेत शुभांगीताई दामले आहेत. शुभांगीताईंनी चांगलं काम केलं आहे आणि सुनीताबाईंच्या नजरेतला करारीपणा नेमका दाखवला आहे. इरावती हर्षेनंही सुनीताबाई चांगल्या उभ्या केल्या आहेत. मात्र, काही वेळा मेकअप जाणवतो. सगळ्यांत बाजी मारून गेला आहे तो पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख. सागरवर या सर्व सिनेमाचा डोलारा उभा होता. मात्र, त्यानं उभे केलेले ‘भाई’ अगदी शंभर टक्के नसले, तरी खूपसे कन्व्हिन्सिंग वाटतात. (कितीही मोठा कलाकार असला, तरी ज्यांनी पुलंना लाइव्ह बघितलं आहे, त्यांच्यासाठी कुणीच ही भूमिका शंभर टक्के अचूक साकारू शकेल, असं वाटत नाही.) सागरनं तरुण वयातले पु. ल. नेमके उभे केले आहेत. पुलंचे सशासारखे पुढचे दात त्यांच्या चेहऱ्याला व एकूणच व्यक्तिमत्त्वाला एक मिश्कीलपणा, भाबडेपणा व निरागसपणा मिळवून देतात. सागरच्या चेहऱ्यावर मुळातच तो निरागस व भाबडा भाव आहे. त्यामुळं त्याला फक्त कृत्रिम दात बसविले, की काम होऊन गेलं... चित्रपट सुरू होताना पुलंचं पात्र ज्या ज्या प्रसंगात येतं, तेथे तेथे शाब्दिक विनोद, कोट्या करतानाच दिसतं. त्यामुळं पुलंचं पात्र एकदम ‘कॅरिकेचर’कडं झुकतंय की काय, अशी भीती वाटायला लागली. मात्र, सुदैवानं दिग्दर्शक, लेखक व अभिनेत्यानं हा सोस वेळीच कमी केला व भूमिका संतुलित झाली. विशेषत: सुनीताबाईंकडं ‘गुड न्यूज’ असताना आपल्याच धुंदीत रमलेले पु. ल. आणि त्यांचा हा अवतार पाहून नंतर सुनीताबाईंनी घेतलेला ‘तो’ निर्णय व त्यावर पुलंची व त्यांच्या आईची झालेली हळवी प्रतिक्रिया हा सगळा काहीसा गंभीर भाग खूप संयतपणे आणि नेमकेपणानं येतो. पुलंचं साधं ‘माणूस’ असणंच त्यातून अधोरेखित होतं. त्या दृष्टीनं हा प्रसंग महत्त्वाचा ठरतो.
या चित्रपटात पुलंच्या अजरामर पात्रांपैकी नाथा कामत व अंतू बर्वा वेगळ्या नावांनी येतात. मात्र, पुलंच्या पात्रांचं नाट्यीकरण झालं, की (म्हणजे पुलंव्यक्तिरिक्त अन्य कोणी ते केलं की) जो अनुभव येतो, तोच इथंही येतो. इथला नाथा कामत फारसा आवडत नाही, की इथला अण्णा कर्वे फारसा भिडत नाही. (विद्याधर जोशींनी काम मात्र चांगलं केलंय.) अगदी शेवटी राम गबाले, माडगूळकर व रावसाहेब ही पात्रंही अवतीर्ण होतात. यापैकी रावसाहेबांचं पात्र हृषीकेश जोशीनं धमाल रंगवलं आहे. (अर्थात पुन्हा, यात हृषीकेशनं त्या पात्राला अर्कचित्राचा जो टोन दिलाय, तो मूळ व्यक्तीवर अन्याय करणारा आहे. पण तरी सिनेमात हे पात्र थोडाच वेळ येत असल्यानं तेवढं खपून जातं, असं म्हणायला हरकत नाही.)
या सिनेमातला सर्वांत रंगलेला व टाळ्या घेणारा प्रसंग म्हणजे अर्थातच पु. ल., भीमसेन व वसंतराव हिराबाई बडोदेकरांकडं (सिनेमात चंपूताई असा घरचा उल्लेख आहे...) जातात व तिथं आधीच उपस्थित असलेल्या कुमार गंधर्वांसह मैफल रंगवतात तो! यातलं ‘सावरे ऐजैयो’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ ही गाणी ऑलरेडी सुपरहिट झाली आहेत. मला वाटतं, पुल या माणसाचं व या सिनेमाचंही सगळं सार या मैफलीत दडलेलं आहे. गाण्यात रमलेला, उत्तम कलागुण असलेला, सुंदर पेटी वाजवणारा, उत्कृष्ट आस्वादक असलेला आणि दाद देणारा असा एक खेळिया, कलंदर माणूस पुलंच्या रूपानं यात दिसतो. तेव्हाच्या महाराष्ट्राची संस्कृतीही दिसते. आपण त्या काळी का नव्हतो, आपण त्या मैफलीत का नव्हतो याची खंत वाटावी असं सादरीकरण म्हणजे त्या काळाला, त्या माणसांना व अर्थातच त्या कलाकृतीला दिलेली दाद असते. त्यामुळंच या गाण्यानंतर थिएटरमध्ये कडाडून टाळी पडते. हा सिनेमा आवडल्याचीही ती पावती असते. त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणं ‘पुतळा चैतन्याचा’ हे वर्णन विठ्ठलाचं असलं, तरी ते पुलंनाही चपखल लागू होतं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा तो विठ्ठलच होता... त्यानं सुरू केलेल्या आनंदयात्रेत आपण सगळे वारकरी अजूनही न्हाऊन निघत आहोत... ‘भाई’ हा सिनेमा हेच सत्य पुन्हा अधोरेखित करताना डोळ्यांच्या कडाही ओलावतो...
दोन तासांत सिनेमाचा पूर्वार्ध संपल्यावर वाटतं, की अरे, पुढचे दोन तासही आपण सहज बसलो असतो! पण आता पुढच्या भागाची ८ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करणं आलं...
(पुढच्या भागात पुलंची दूरदर्शनमधील कामगिरी, बटाट्याची चाळ व इतर एकपात्री प्रयोगांचा धमाल काळ, बाबा आमटेंशी स्नेह आदी गोष्टी असणार आहेत व त्याची झलक या सिनेमाच्या शेवटी पाहायला मिळते.)
तेव्हा पुलप्रेमींनी व अन्य रसिकांनीही चुकवू नये, असाच हा चित्रपट आहे!
---
दर्जा : चार स्टार
----

20 comments:

  1. व्वा !!!
    आजच रात्री चाललोय....
    👍

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन

    ReplyDelete
  3. सुंदर वर्णन

    ReplyDelete
  4. Mst lihilay. Jsa picture bghun aaloy agadi tschya tas varnan kelay.

    ReplyDelete
  5. आजच पाहिला
    अप्रतिमच

    ReplyDelete
  6. मी पण आजच पाहीन

    ReplyDelete
  7. छान लिहिलंय परीक्षण .. उद्या जाणार निश्चितच

    ReplyDelete
  8. जरा जास्तच Detail झालय वर्णन.

    ReplyDelete
  9. खुपच छान विश्लेषण. मी सिनेमा कालच बघितला परंतु काही व्यक्तिरेखांचा संदर्भ लागला नव्हता तो हे वाचून लागला त्याबद्दल श्रीपाद तुझे धन्यवाद.

    ReplyDelete
  10. या सिनेमातला सर्वांत रंगलेला व टाळ्या घेणारा प्रसंग म्हणजे अर्थातच पु. ल., भीमसेन व वसंतराव हिराबाई बडोदेकरांकडं (सिनेमात चंपूताई असा घरचा उल्लेख आहे...) जातात व तिथं आधीच उपस्थित असलेल्या कुमार गंधर्वांसह मैफल रंगवतात तो! यातलं ‘सावरे ऐजैयो’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ ही गाणी ऑलरेडी सुपरहिट झाली आहेत. मला वाटतं, पुल या माणसाचं व या सिनेमाचंही सगळं सार या मैफलीत दडलेलं आहे. 

    सिनेमा बघितल्याचे सार्थक झाले.

    ReplyDelete
  11. Superb movie.....saglyanich kaam chan keli aahet.....सावरे ऐजैयो’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ ही गाणी केवळ अप्रतिम....

    ReplyDelete
  12. कालच पहिला,
    उत्तम
    दुसरी प्रतिक्रिया असूच शकत नाही.

    ReplyDelete