30 Nov 2018

ग्राहकहित दिवाळी १७

मराठी चित्रपटांतील मुलांचं भावविश्व
----------------------------------


आधुनिक जगातील सर्व कलांमध्ये चित्रपटकला ही सर्वांत तरुण! तंत्रज्ञानावर आधारित ही कला एकोणिसाव्या शतकाच्या अगदी अखेरीस जन्माला आली आणि विसाव्या शतकात बघता बघता प्रचंड मोठी झाली. चित्रपटांनी अभिव्यक्तीच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हे माध्यम विलक्षण प्रभावी; त्याचा आस्वाद घेण्यासाठी साक्षर असण्याचीही गरज नाही. पंचेद्रिये व्यवस्थित असली की झाले. त्यामुळं विसाव्या शतकात जगभर या माध्यमाचा फार झपाट्यानं विस्तार झाला. आज एकविसाव्या शतकात तर आपण चित्रपटांशिवाय हे जग कसं असू शकेल याची कल्पनाही करू शकत नाही, एवढा सिनेमा आपल्या जगण्याचा अभिन्न भाग झालाय. या सिनेमानं आपलं जगणं तर आपल्यासमोर मांडलंच; पण जे आपण जगू शकत नाही ते स्वप्नातलं विश्वही आपल्यासमोर सादर केलं. म्हणून तर चित्रकर्मींना 'सपनों के सौदागर' असं म्हटलं जातं. माणसाच्या मनात येऊ शकणारी प्रत्येक भावना टिपण्याचा प्रयत्न या माध्यमानं केला आहे. विविध वंश, धर्म, वर्ण, लिंग, भाषा, संस्कृती, जमाती अशा सर्व प्रकारांतील सर्व माणसांसाठी सिनेमे तयार झाले. केवळ माणसांचेच नव्हे, तर प्राण्यांचे, वनस्पतींचे, पर्वतांचे, सागराचे... थोडक्यात आपल्या सभोवती अस्तित्वात असलेल्या पंचमहाभूतांचे दर्शन घडविणारेही सिनेमे आले. 
यात अर्थातच लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करणारे अनेक उत्तमोत्तम सिनेमे जगभर तयार झाले. आपल्या सगळ्यांना लहान मुलांचे सिनेमे पाहायला आवडतात. याचं कारण आपण प्रत्येक जण आपापलं लहानपण 'मिस' करत असतो. आपल्या जगण्यातले तेव्हाचे अनुभव पुनःपुन्हा जगायला आपल्याला आवडतं. सिनेमा आपल्याला हा आनंद देतो. त्यामुळंच अगदी सुरुवातीपासून जगभरात मोठमोठ्या दिग्दर्शकांनी लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखविणारे सिनेमे केले. चार्ली चॅप्लिनपासून ते ख्रिस कोलंबस, स्टीव्हन स्पिलबर्गपर्यंत मोठी यादी सांगता येईल. 
मराठी सिनेमांचा विचार करायचा झाल्यास, मराठीत अगदी अलीकडच्या काळात अशा सिनेमांचं प्रमाण खूप वाढलंय असं म्हणता येईल. 'श्वास' हा या टप्प्यातला पहिला सिनेमा. 'श्वास' हा केवळ मुलांचं भावविश्वच नव्हे, तर इतर अनेक बाबतींत मराठी सिनेमांचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो, हे खरं. मात्र, या सिनेमाचा नायक एक छोटा मुलगा असणं ही गोष्ट त्याचा वेगळेपणा ठळकपणे अधोरेखित करते, हेही महत्त्वाचं. मराठीत त्यापूर्वी मुलांना केंद्रस्थानी ठेवणारे सिनेमे आले नव्हते असं नाही; पण 'श्वास'ची ट्रीटमेंट वेगळी होती. जगभरात मुलांचं भावविश्व टिपणारे अप्रतिम सिनेमे म्हणून इराणी सिनेमांची ख्याती आहे. माजिद माजिदी, जफर पनाही, मखमलबाफ, अब्बास किआरोस्तोमी अशा अनेक इराणी दिग्दर्शकांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून सुंदर सिनेमे तयार केले. ते जगभर नावाजले गेले. भारत आणि इराण सांस्कृतिकदृष्ट्या जवळचे असल्यानं आपल्यालाही ते सिनेमे फार आवडले. इथल्या चित्रपट महोत्सवांतून हजारो भारतीयांपर्यंत हे सिनेमे पोचले. या सिनेमांचा प्रभाव आपल्या दिग्दर्शकांवर नक्कीच पडला. 'श्वास'वर हा परिणाम जाणवतो. अर्थात कथानक अस्सल या मातीतलं आहे. मात्र, त्याची हाताळणी निश्चितच इराणी सिनेमांच्या धर्तीवरची आहे. 'श्वास'नंतर मराठीत मग अशा सिनेमांची एक लाटच आली. मंगेश हाडवळेचा 'टिंग्या' हा सिनेमा त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्या चितंग्या या बैलावर अतोनात प्रेम करणारा टिंग्या हा मुलगा आणि बैल विकावा लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याच्या भावविश्वाची झालेली उलथापालथ असा हा सिनेमाचा विषय होता. ही स्वतः मंगेश हाडवळेचीच कहाणी आहे. मंगेश जुन्नरजवळच्या एका छो़ट्या गावात राहणारा शेतकरी कुटुंबातील मुलगा! त्याच्या जगण्याचीच ही गोष्ट असल्यानं त्यानं फार प्रेमानं, जीव ओतून हा सिनेमा केला. शरद गोयकर या मुलाकडून त्यानं 'टिंग्या'चं काम फार सुंदर करून घेतलं. 'टिंग्या' आपल्या इथं अनेकांना आवडला, काळजाला भिडला. याचं कारण इथल्या मातीतलं दुःख सांगणारा, इथली वेदना पोचवणारा, इथलं प्रेम दर्शविणारा असा हा साधा-सोपा सिनेमा होता. हा सिनेमा तयार करताना मंगेशवर 'द बायसिकल थीफ' हा जगप्रसिद्ध इटालियन सिनेमाचा प्रभाव होता, हे त्यानंच एका ठिकाणी लिहिलंय. 'बायसिकल थीफ'मध्ये गरिबीनं गांजलेल्या बाप व मुलाची कहाणी समोर येते. तो सिनेमा पाहताना मंगेशला स्वतःच्या आयुष्याशी त्या सिनेमाचं असलेलं साधर्म्य जाणवलं आणि त्यातून त्यानं 'टिंग्या' करण्याचा निर्णय घेतला. 'बायसिकल थीफ' हा सिनेमा त्यातल्या मुलाच्या - ब्रुनोच्या - दृष्टिकोनातून दिसतो. 'टिंग्या'लाही मंगेशनं तशीच ट्रीटमेंट दिली. त्यामुळं 'टिंग्या'च्या परिणामकारकतेत भरच पडली. 
यानंतरचा महत्त्वाचा सिनेमा म्हणजे सुजय डहाकेचा 'शाळा'. मिलिंद बोकील यांची २००४ मध्ये आलेली 'शाळा' ही कादंबरी खूप लोकप्रिय ठरली. पौगंडावस्थेतील शहरी मध्यमवर्गीय मुलाचं आयुष्य या कादंबरीत बोकिलांनी चितारलं होतं. यात अर्थातच त्याची पहिलीवहिली प्रेमकहाणीही होती. (म्हणूनच कदाचित अनेकांनी ती आपलीच गोष्ट वाटली असू शकेल.) याच कारणामुळं 'शाळा'चं माध्यमांतर करण्याचा मोह अनेक जणांना झाला. या कादंबरीवर एक नाटक आणि एक हिंदी सिनेमा येऊ गेल्यानंतरही सुजयला या कादंबरीवर मराठी सिनेमा करायचा होता. त्यानं हे आव्हान चांगलं पेललं. मूळ कादंबरी आणि सिनेमा यांची तुलना करण्यात अर्थ नाही. याचं कारण, अशा तुलनेत मूळ कलाकृती (त्यातही ते पुस्तक असेल तर अधिकच...) नेहमीच बाजी मारून जाते. सुजयनं कादंबरीचा नायक मुकुंद याचं भावविश्व तरलपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर फोकस ठेवला. मूळ कादंबरीत आजूबाजूलाही बऱ्याच घटना-घडामोडी (आणीबाणी इ.) घडताना दिसतात. या सिनेमात मात्र मुकुंदची प्रेमकहाणीच ठळकपणे समोर येते. अंशुमन जोशीनं मुकुंदचं आणि केतकी माटेगावकरनं शिरोडकरचं काम उत्तम केलं होतं. त्यामुळं 'शाळा' चित्रपट परिणामाच्या दृष्टीनं चांगला ठरला.
किरण यज्ञोपवितनं दिग्दर्शित केलेले 'ताऱ्यांचे बेट' आणि 'सलाम' हे दोन्ही चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वाचा चांगला वेध घेणारे होते. 'ताऱ्यांचे बेट'मधल्या कोकणात लहान गावात राहणाऱ्या मुलाला मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचं असतं. म्हणजे त्याच्या वडिलांनीच त्याला तसं प्रॉमिस केलेलं असतं. नंतर सगळा सिनेमा त्या लहान मुलाच्या नजरेतूनच घडतो. तरी पण हा निव्वळ लहान मुलांचा सिनेमा आहे, असं मला वाटलं नाही. भौतिक सुखांच्या मृगजळामागं धावणाऱ्या सगळ्या पिढीचाच हा सिनेमा आहे, असं मला वाटलं. मुंबईत जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं हे त्या अर्थानं फार प्रतीकात्मक आहे, असं जाणवतं. जगभरात, विशेषतः आपल्याकडं गेल्या २०-२५ वर्षांत जे ऐहिक बदल झाले, त्या बदलांना सामोरे जाणारी आमची एक आख्खी पिढी सुरुवातीला अत्यंत संभ्रमावस्थेत होती. नंतर तिनं झटकन या बदलांना स्वीकारलं आणि पुढं वाटचाल केली. ही प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. या बदलांच्या प्रक्रियेमध्ये एक नाट्यमयता होती. काही हरवणं, काही गवसणं अशी काही तरी गंमत होती. ती टिपण्याची ताकद प्रतिभावान कलाकारांमध्ये असते. किरण हा असाच एक प्रतिभावान दिग्दर्शक असल्यानं त्यानं 'ताऱ्यांचे बेट'मध्ये ही सगळी नाट्यमयता मनोरंजक पद्धतीनं आणली होती. त्यामुळं हा सिनेमा मला भावला. त्याचाच 'सलाम' हा चित्रपटही दोन लहान मुलांच्या नजरेतून घडतो. एकाचे वडील पोलिस आणि एकाचे वडील लष्करात जवान असतात. त्या दोघांत सुप्त स्पर्धा असते. अशा कथानकातून सुरू होणारा हा सिनेमा लहानांसोबतच मोठ्यांच्याही मनाची मशागत करू पाहतो. 
नागराज मंजुळेचा 'फँड्री' हा सिनेमा सर्व स्तरांवर गाजला. या सिनेमाचा नायक जब्या हा एक १४-१५ वर्षांचा मुलगा आहे. गावातली डुकरं पकडणे हा त्याच्या कुटुंबाचा पिढीजात धंदा. जब्याला ते काम करायचं नाही. त्याला आता शहरातली आकर्षणं खुणावताहेत. भारतात बाजारपेठ खुली झाल्यानंतर आधी प्रचंड महानगरं, मग मोठी शहरं, मग लहान शहरं आणि मग तालुक्याचं गाव अशाच गतीनं प्रगती खालपर्यंत झिरपली. जब्याचं गाव आणि कुटुंब अजूनही या प्रगतीपासून दूरच आहे. मात्र, आजूबाजूला ही प्रगती त्याला दिसते आहे. त्यालाही त्या प्रगतीची फळं चाखायची आहेत. पण समाजावर असलेली जात नावाच्या व्यवस्थेची पकड त्याला अस्वस्थ करते आहे. त्याला हवं तसं जगू देत नाही. नागराजनं या सिनेमातून स्वतःचीच कथा सांगितली आहे. बहुतेक दिग्दर्शक पहिला सिनेमा करताना स्वतःचीच गोष्ट सांगतात. त्यासाठी ते तन-मन अर्पून काम करतात. त्यामुळंच अनेकांचा पहिला सिनेमा मस्त जमून आलेला असतो. नागराजचा 'फँड्री' असाच जमून आलेला होता. मराठीत 'श्वास'नंतर सुरू झालेल्या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाचा प्रवाह आता मोठा होत चालला होता. अनेक दिग्दर्शकांना त्यामुळं बळ मिळालं होतं. एरवी सोलापूर-नगरकडच्या ग्रामीण भागातील, कैकाडी समाजातील मुलाची ही कहाणी पडद्यावर येतीच ना! 'फँड्री'च्या शेवटी जब्या पडद्याकडं जो दगड भिरकावतो, तो केवळ प्रेक्षकालाच नव्हे, तर या चित्रपटसृष्टीलाही जागं करणारा ठरला. वेगळ्या आशयाची ही नांदी होती. 
लहान मुलांचं भावविश्व म्हणजे एका परीनं आपणच आपल्या बालपणाकडं पुन्हा डोकावून पाहणं... त्यामुळं अशा सिनेमांना प्रेक्षकवर्गही मोठ्या प्रमाणात लाभला. रवी जाधवसारख्या दिग्दर्शकानं हे हेरून 'बालक-पालक', 'टाइमपास'सारखे पौगंडावस्थेतल्या मुलांचं भावविश्व मांडणारे सिनेमे केले. 'बालक-पालक' ही पुन्हा दिग्दर्शकाची स्वतःची गोष्ट असावी, असं दिसतं. याचं कारण सिनेमा सगळा १९८५-८६ या काळात घडताना दाखविला होता. त्यामुळं त्या काळात जी मुलं १४-१५ वर्षांची होती, त्यांना त्या सिनेमातल्या पर्यावरणाची ओळख लगेचच पटली. त्यामुळंच या सिनेमाला गर्दीही वाढली. पौगंडावस्था हे तसं नाजूक वय. या वयातल्या मुलांच्या भावभावना काय असतात, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, त्या थेट पडद्यावर मांडण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं. मात्र, गेल्या काही वर्षांत मराठीत अगदी सहजपणे अशा आशयाचे सिनेमे काढण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातले फारच थोडे अंतःकरणाची तार छेडू शकले. याचं कारण त्या वयातल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीबाबतच्या सुप्त आकर्षणाचंच आकर्षण बहुतेक दिग्दर्शकांना होतं. त्यामुळं बहुतेक सिनेमांचे नायक मुलगेच होते. मुलीच्या दृष्टिकोनातून या वयातली स्टोरी सांगणारी एकही गोष्ट आली नाही, ही बाब इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते.
मुलग्याच्या भावविश्वाचा आणखी नेमका आलेख मांडणारा सिनेमा म्हणजे अगदी अलीकडं आलेला 'किल्ला'. हाही अविनाश अरुण या सिनेमॅटोग्राफरचा पहिलाच सिनेमा. (ही त्याची स्वतःचीच गोष्ट आहे, हे आता सांगायला नको.) वडील नसलेला हा मुलगा आईच्या बदलीमुळं पुण्यासारख्या मोठ्या शहरातून कोकणातल्या एका लहान गावात जातो. सातवीतून आठवीत गेलेला हा मुलगा अगदी पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर आणि फारच हळव्या वयात आहे. त्याची आई नोकरीच्या ठिकाणी सेटल होण्यासाठी धडपडते आहे. नायकाच्या अशा काहीशा एकाकी मनोवस्थेत सिनेमा सुरू होतो. मग हळूहळू त्याला इथं मित्र मिळतात. त्यांच्यासोबत तो एकदा त्या गावात असलेल्या एका मोठ्या भुईकोट किल्ल्यावर जातो आणि हरवतो... पुढचा सगळा प्रवास हा त्या मुलाच्या भावभावनांच्या आलेखाचा आहे. परिस्थिती माणसाला टणक बनवते, जगण्याची ऊर्मी माणसाला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचं बळ देते असं सांगणारा हा सिनेमा आहे. यात तो मुलगा एका नावाड्याबरोबर खोल समुद्रात जातो, तो सीन पाहण्यासारखा आहे. आपल्या आयुष्यात लहानपणी अनेकदा असं घडतं. आपण काही तरी आपल्या मानानं धाडस करायला जातो, पण घर नावाचा किनारा आपल्याला कायम बांधून घेत असतो. किल्ल्याचं प्रतीकही असंच वाटतं. त्या मुलाच्या मनाचे तट किल्ल्यासारखेच अभेद्य असतात. या सिनेमाचं छायांकनही अव्वल दर्जाचं होतं. दिग्दर्शक स्वतः सिनेमॅटोग्राफर असला, की त्याला तो सिनेमा आधीच 'दिसतो' हे इथं अक्षरशः खरं वाटतं. सिनेमा हे शेवटी दृश्य माध्यम असल्यानं दृश्यमांडणीचा परिणाम सर्वांत जास्त असतो. त्या अर्थानं 'किल्ला' हा मुलांच्या भावविश्वावरचा अलीकडचा एक चांगला सिनेमा नक्कीच म्हणता येईल.
याच मालिकेत मी परेश मोकाशीच्या 'एलिझाबेथ एकादशी'चाही उल्लेख करीन. पंढरपूरच्या एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही कथा आकाराला येते. वडील नसलेली दोन मुलं आई आणि आजीसोबत पंढरपूरमध्ये एका वाड्यात राहत आहेत. आईचं विणकामाचं मशिन गहाण पडलंय आणि ते सोडवायला पैसे नाहीत. वडिलांनी मुलाला घेऊन दिलेली 'एलिझाबेथ' ही सायकल मात्र त्या कुटुंबाचा अनमोल असा ठेवा आहे. पैशांसाठी ही सायकल विकावी लागणार, असा पेच निर्माण होतो. त्यावर ही दोन लहानगी मुलं आपल्या परीनं मार्ग शोधतात, अशी ही हृद्य कथा. परेशची पत्नी आणि मूळची पंढरपूरनिवासिनी मधुगंधा कुलकर्णी हिनं या चित्रपटाची कथा लिहिली आहे. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो.
मराठीत 'श्वास'नंतर जे वेगळे प्रयोग झाले, त्यात या सर्व सिनेमांचं योगदान महत्त्वाचं. याशिवाय काही उल्लेखनीय प्रयत्नही झाले. यात नितीन दीक्षित या दिग्दर्शकाच्या 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. लहान मुलांच्या स्वप्नांची एक वेगळीच दुनिया असते. आपल्याकडे विष्णूच्या दहा अवतारांची गोष्ट सांगितली जाते. तिचा उपयोग करून दिग्दर्शकानं यात लहानग्यांचं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला होता. 'आरोही : गोष्ट तिघांची' नावाचा एक सिनेमा मध्यंतरी आला होता. त्यात केतकी माटेगावकरनं काम केलं होतं. यात गाण्याच्या स्पर्धेत चमकणाऱ्या एका मुलीची गोष्ट मांडण्यात आली होती. प्रमोद जोशी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. 'कुटुंब' या सिनेमातही अशीच स्पर्धात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबाची गोष्ट सादर करण्यात आली होती. 'आम्ही चमकते तारे' या सिनेमाचा विषयही असाच होता. 
याखेरीज काही सिनेमांमध्ये मुलांचं भावविश्व हा थेट विषय हाताळला नसला, तरी त्यात मुलांची भूमिका किंवा गरज महत्त्वाची होती. यात शिवाजी लोटन पाटील यांचा 'धग' हा सिनेमा महत्त्वाचा आहे. यातही नायकाच्या मुलाचं भावविश्व चांगल्या पद्धतीनं चितारण्यात आलं होतं. प्रमोद प्रभुलकर यांच्या 'गोड गुपित' या चित्रपटात नातवंडं आजी-आजोबांचं लग्न लावून देतात, अशी धमाल गोष्ट रंगविण्यात आली होती. 'तुझ्या-माझ्यात', 'छडी लागे छमछम', 'मामाच्या गावाला जाऊ या', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'आनंदी-आनंद' अशा काही सिनेमांतही मुलांची कामं महत्त्वाची होती. अक्षय दत्त याच्या 'आरंभ' या पहिल्याच चित्रपटात स्वतःच्या लहान मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या बापाची आणि त्याला धडा शिकवणाऱ्या आईची गोष्ट अत्यंत संयतपणे, तरलपणे मांडण्यात आली होती. 
या सर्व सिनेमांत एक अगदी वेगळा प्रयत्न म्हणता येईल, असा सिनेमा आला होता व त्याचं नाव होतं 'आम्ही असू लाडके'. अभिराम भडकमकर दिग्दर्शित या सिनेमात विशेष मुलांची गोष्ट सांगण्यात आली होती. सुबोध भावेनं यात काम केलं होतं आणि कोल्हापुरातल्या विशेष मुलांच्या संस्थेतल्या मुलांनीच यात काम केलं होतं. अभिरामचा हा सिनेमा केवळ लहान मुलांच्या नव्हे, तर अशा विशेष लहान मुलांच्या भावविश्वाचं अत्यंत मनोज्ञ दर्शन घडविणारा होता. 
'श्वास'पूर्वीही असे चांगले, मुलांचं मन जाणू पाहणारे चांगले सिनेमे आलेच होते. त्यात विशेष उल्लेख करायचा म्हणजे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा 'दहावी फ'. चित्रपटाच्या नावावरूनच त्याचा कथाविषय स्पष्ट होतो. अभ्यासात कच्ची, सतत नापास होणारी, दुर्लक्षित अशी सगळी मुलं ई, फ अशा खालच्या तुकड्यांमध्ये असतात. अशाच एका दंगेखोर तुकडीतील वाया जाऊ पाहणाऱ्या मुलांचा एका शिक्षकाने केलेला कायापालट अशी या सिनेमाची गोष्ट होती. या गोष्टीला वास्तवातल्या एका बातमीचा आधार होता. अतुल कुलकर्णीनं यात शिक्षकाचं काम केलं होतं आणि हा सिनेमा तेव्हा (१९९७) चांगलाच चालला होता. याच जोडीच्या 'वास्तुपुरुष'मध्येही लहानग्या भास्करच्या रूपानं पौगंडावस्थेतील मुलाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं होतं. 
याशिवाय माझा स्वतःचा एक अत्यंत आवडता सिनेमा म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी यांचा 'भेट'. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर अचानक एके दिवशी आई व तिच्या (आता मोठ्या झालेल्या) मुलाची एका लग्नात ओझरती भेट होते. त्यानंतर त्या मुलाला भेटण्यासाठी आईची जी तडफड सुरू होते, त्याची कहाणी म्हणजे हा सिनेमा. चंद्रकांत कुलकर्णी यांनी जुन्या, अभिजात मराठी कादंबरीचा लूक या सिनेमाला दिला आहे. यात अतुल कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर यांच्यासह त्या लहान मुलाचं काम करणाऱ्या अपूर्व कोरेगावे या मुलाचंही काम छान झालं आहे. रोहिणी कुलकर्णी यांच्या लघुकादंबरीवर निघालेला हा सिनेमा १९८० च्या काळातील नागपूर-इंदूर या शहरांचं दर्शन घडवतो व तेथील मराठी कुटुंबांची गोष्ट सांगतो. अगदी लहान वयातले श्रेयस तळपदे, प्रिया बापट हेही आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतात. 
तत्पूर्वी स्मिता तळवलकरांच्या 'कळत-नकळत' या चित्रपटातही दोन्ही मुलांची कामं महत्त्वाची होती. 'नाकावरच्या रागाला औषध काय' हे मृण्मयी चांदोरकर या बालकलाकारासह अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं व स्वतः अशोक सराफ यांनी गायलेलं अन् तेव्हा अतिशय गाजलेलं गाणंही याच सिनेमातलं! त्याआधीच्या काळात लहान मुलांची भूमिका असणारे भरपूर सिनेमे असले, तरी त्यांच्या भावविश्वावर केंद्रित असलेले फारच थोडे! राजा परांजपे यांचा 'हा माझा मार्ग एकला' (१९६३) या चित्रपटातून लहानग्या सचिन पिळगावकरनं पडद्यावर पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग हा लहान मुलगा होता. महेश कोठारे यांचंही पदार्पण बालकलाकार म्हणूनच 'छोटा जवान' (१९६३) या सिनेमातून झालं होतं. त्याहीपूर्वीचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अर्थातच आचार्य अत्रे दिग्दर्शित 'श्यामची आई' (१९५३). या चित्रपटाविषयी वेगळं काही सांगायला नको. सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराचे सुवर्णकमळ देण्याची पद्धत त्या वर्षापासून सुरू झाली आणि हे पहिलं सुवर्णकमळ 'श्यामची आई'ने मिळविले होते, एवढे सांगितले तरी पुरे. गंमत म्हणजे त्यानंतर मराठीला सुवर्णकमळ मिळाले ते थेट ५१ वर्षांनी - 'श्वास'साठी. म्हणजेच मराठीची पहिली दोन्ही सुवर्णकमळं ही मुलांचं भावविश्व सांगणाऱ्या सिनेमांना मिळाली आहेत, हे लक्षणीय आहे.
मराठी सिनेमांत हल्ली वेगळे प्रयोग खूप होत आहेत आणि त्यात मुलांच्याही भावविश्वाचा विचार होतोय, हे नक्कीच चांगलं लक्षण आहे. अर्थात जागतिक सिनेमे पाहिले, तर आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय हे लक्षात येईल. पण प्रवास योग्य मार्गानं सुरू होणं हीच यशाची पहिली पायरी असते. मराठी सिनेमांनी त्या वाटेवर पाऊल टाकलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

---
(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक २०१७)
---

8 Nov 2018

रिव्ह्यू - आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

अवलियाचा 'कॅड्डॅक', नशीला खेळ
----------------------------------------


मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार अशी ख्याती मिळविणारे, अनेक लोकप्रिय भूमिका करून नाट्यरसिकांच्या हृदयात स्थान मिळविणारे डॉ. काशिनाथ घाणेकर हे एक मनस्वी वृत्तीचे, कलंदर अभिनेते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर तब्बल ३२ वर्षांनी त्यांच्यावरचा बायोपिक 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटाच्या रूपाने पडद्यावर आला, तेव्हा तो पाहण्याचा मोह टाळता येण्यासारखा नव्हताच. सुबोध भावे हा आवडता अभिनेता यात डॉ. घाणेकरांची भूमिका करतो आहे, हे समजल्यावर तर आणखीनच उत्सुकता वाटली. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे प्रोमोज आणि 'गोमू संगतीनं' हे गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा काही तरी चांगलं पाहायला मिळेल, असा विश्वास वाटू लागला. त्यामुळं अभिजित देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाल्याबरोबर पहिल्याच 'शो'ला पाहिला. सिनेमानं अपेक्षाभंग केला नाही. डॉ. काशिनाथ घाणेकरांसारख्या अवलिया कलावंताला या चित्रकृतीनं खऱ्या अर्थानं आता अजरामर केलंय, असं म्हणायला हरकत नाही.
मराठी रंगभूमीवरचा साधारणतः १९६० ते १९८५ असा तब्बल २५ वर्षांचा कालखंड सिनेमात येतो. या कालावधीत मराठी रंगभूमीवर डॉ. काशिनाथ घाणेकर तेजाने तळपत होते. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या वसंत कानेटकर लिखित नाटकात त्यांनी साकारलेले शंभूराजे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेले. त्यानंतर आलेल्या कानेटकरांच्याच 'अश्रूंची झाली फुले'मधील त्यांच्या लाल्याच्या भूमिकेनं तर इतिहास घडविला. मराठी रंगभूमीवर एंट्रीला टाळी मिळविणारे डॉक्टर हे पहिले अभिनेते ठरले. लोक त्यांचे संवाद त्यांच्यासोबत तोंडपाठ म्हणू लागले. खेळ संपल्यावर चाहत्यांची अफाट गर्दी त्यांच्याभोवती होऊ लागली. त्यानंतर आलेल्या 'गारंबीचा बापू', 'इथे ओशाळला मृत्यू', 'आनंदी गोपाळ' आदी नाटकांतही डॉ. घाणेकर चमकले. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली, की नाटकाच्या श्रेयनामावलीत त्यांचं नाव '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' असं लिहिलं जाऊ लागलं. रंगमंचावर काम करण्याची नशा काही औरच असते. त्यात डॉक्टरांसारखा मनस्वी कलावंत वाहून गेला नसता, तरच नवल! चाहत्यांच्या या प्रेमाने डॉक्टर अक्षरशः आंधळे झाले. त्यांच्याकडून अनेक चुका होत गेल्या. वैयक्तिक आयुष्यही फार काही सुखावह नव्हतं. डॉ. इरावती ही त्यांची पहिली पत्नी. अनेकदा प्रयत्न करूनही मूल होत नसल्यानं दोघेही नैराश्यग्रस्त झालेले. अशा वेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची कन्या कांचन त्यांच्या आयुष्यात एखाद्या झुळुकीसारखे येते. या झुळुकीचं रूपांतर पुढं वादळात होतं. सुलोचनादीदींमुळंच डॉक्टरांना अनेक मराठी सिनेमांमध्येही काम करायला मिळालं होतं. पण तिथं ते फार रमले नाहीत. 'गोमू संगतीनं' गाण्यात आपण गाढवासारखे नाचलो. डॉ. काशिनाथ घाणेकर वेडा झाला होता, असं ते स्वतःच सांगतात. त्यात रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागूंसारख्या कलाकाराचं आगमन झाल्यानंतर तर डॉ. घाणेकरांसमोर मोठंच आव्हान उभं राहतं. अशा अत्यंत अस्ताव्यस्त व बेफिकीर आयुष्यात त्यांना कांचनचं प्रेमही स्थिर राहू देत नाही. डॉक्टरांकडून चुका होत राहतात. 'आईसाहेब' म्हणून ते हाक मारत असलेल्या लाडक्या सेवकाकडून दुधात दारू मिसळून पिण्यापासून ते दारू पिऊन रंगमंचावर एका नाटकातले संवाद भलत्याच नाटकात म्हणण्यापर्यंत त्यांची अधोगती होते. वडिलांच्या कौतुकाच्या दोन शब्दांसाठी झुरणाऱ्या या उमद्या नटाची दारू आणि सततची सिगारेट यामुळं वाताहत होत राहते. अखेर १९८६ मध्ये अमरावतीला दौऱ्यावर असतानाच सतत पाठीमागे दबा धरून बसलेला मृत्यू त्यांना गाठतोच. एका कलावंताची अखेर शेवटी ग्रीनरूममध्ये मेकअप लावत असतानाच होते...
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचं सर्वप्रथम अभिनंदन करायला हवं ते त्यांनी या सिनेमाचं शिवधनुष्य चांगल्या पद्धतीनं पेलल्याबद्दल. अवघ्या ५४ वर्षांचं, पण वादळी आयुष्य लाभलेल्या या कलावंतावर बायोपिक काढणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र, दिग्दर्शकानं अत्यंत प्रेमानं या विषयाला न्याय दिल्याचं जाणवतं. त्यासाठी घेतलेली मेहनत दिसते. डॉ. घाणेकर यांच्यातला मनस्वी, कलंदर कलावंत दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला आहे. घाणेकर यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे हा सिनेमा नेमकेपणानं दाखवतो. कुठंही रेंगाळत नाही की गरजेपेक्षा वेगाने धावत नाही. डॉ. घाणेकरांचं निधन झालं, त्याला आता ३२ पेक्षा अधिक वर्षं झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी 'नाथ हा माझा' हे पुस्तक लिहिलं. या सिनेमालाही याच पुस्तकाचा मोठा आधार आहे. या पुस्तकाव्यतिरिक्त आणि घाणेकर यांच्या काही मोजक्या चित्रपटांव्यतिरिक्त आता त्यांचं कुठलंही काम दृश्यरूपानं आपल्याकडं दुर्दैवानं अस्तित्वात नाही. डॉ. घाणेकर यांची कुठलीही मुलाखत किंवा कार्यक्रम, नाटकातले प्रसंग यांचं व्हिडिओ चित्रण उपलब्ध नाही. त्यामुळं त्यांचा तो काळ पुन्हा जिवंत करणं हे तसं कठीण काम होतं. शिवाय डॉ. घाणेकरांना प्रत्यक्ष रंगमंचावर काम करताना पाहिलेले बहुतेक लोक आज साठीच्या घरात किंवा त्याहून मोठे असेच आहेत. डॉ. घाणेकर गेले तेव्हा मी जेमतेम १०-११ वर्षांचा होतो. ते गेले तेव्हा पेपरला आलेली मोठी बातमी मला आठवते. मात्र, त्यांचं रंगमंचावरचं काम पाहायला मिळालेलं नाही. सिनेमांबाबतही तेच. नंतर 'दूरदर्शन'वर दाखवलेले थोडे फार सिनेमे पाहिले इतकंच. पण ती सगळी स्मृती आता धूसर झाली आहे. अशा परिस्थितीत नव्या पिढीचा डॉ. घाणेकर यांच्याशी मुळीच नसलेला कनेक्ट लक्षात घेता, हा चित्रपट तयार करणं म्हणजे फारच मोठी रिस्क होती. मात्र, हा सिनेमा पाहिल्यावर आता वाटतं, की नव्या पिढीला डॉ. घाणेकरांविषयी अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल. त्यांच्या शंभूराजांची, बापूची, लाल्याची जादू प्रत्यक्ष अनुभवता आली नाही, तरी ती जादू नक्की काय होती, याचा थोडा फार अंदाज तरी नक्कीच येऊ शकेल.
याचं श्रेय दिग्दर्शकाचं, तसंच कलाकारांचंही. या चित्रपटात सुलोचनादीदी, कांचन घाणेकर, भालजी पेंढारकर, प्रभाकर पणशीकर, मा. दत्ताराम, वसंत कानेटकर, डॉ. श्रीराम लागू अशी डॉक्टरांशी संबंधित बरीच मंडळी पडद्यावर दिसणार होती. अभिजित देशपांडे यांनी परफेक्ट कास्टिंग केल्यानं सिनेमाचं निम्मं यश तिथंच निश्चित झालं. सुलोचनादीदींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, कांचनच्या भूमिकेत वैदेही परशुरामी, डॉ. लागूंच्या भूमिकेत सुमीत राघवन, वसंत कानेटकरांच्या भूमिकेत आनंद इंगळे आणि प्रभाकरपंतांच्या भूमिकेत प्रसाद ओक यांनी जीव ओतून काम केलंय. मोहन जोशी भालजी म्हणून फारसे पटले नाहीत. पण तो रोलही फार मोठा नाही.
सगळ्यांत महत्त्वाचा उल्लेख अर्थातच सुबोधचा. या भूमिकेसाठी सुबोधचं खरोखर मनापासून अभिनंदन. अशा चरित्रनायकांच्या भूमिका हा त्याच्यासाठी आता हातखंडा झाला आहे. वास्तविक सुबोधची अंगकाठी आणि एकूण चेहरा डॉ. घाणेकरांच्या चेहऱ्याशी फार मिळताजुळता नाही. मात्र, त्यानं ही उणीव आपल्या अभिनयानं भरून काढली आहे. सुरुवातीला मा. दत्ताराम यांच्यासमोर संभाजीची भूमिका मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांपासून ते शेवटी ग्रीनरूममध्ये कोसळून मृत्यू होईपर्यंत सुबोध घाणेकरांचंच आयुष्य जगला आहे. त्या माणसाची कलंदरी, बेफिकीरपणा, चाहत्यांच्या प्रेमात आकंठ बुडण्याचा सोस हे सगळं सुबोधनं फार प्रभावीपणे दाखवलं आहे. या भूमिकेसाठी त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होणार, हे नक्की.
सोनाली कुलकर्णीनं सुलोचनादीदी फार उत्तम उभ्या केल्या आहेत. सुमीत राघवननंही डॉ. लागू शब्दशः 'साकारले' आहेत. या दोन्ही व्यक्ती अद्याप हयात असताना त्यांच्या भूमिका पडद्यावर करायला मिळणं हा तसा बहुमान आणि एक प्रकारे आव्हानही! मात्र, सुमीत आणि सोनाली या दोघांनीही ते आव्हान उत्तम पेललंय. प्रसाद ओकने उभे केलेले 'पंत' पणशीकर अगदी लाजवाब. डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा सच्चा मित्र ही पणशीकरांची (नव्या पिढीसाठी) नवी ओळख प्रसादनं चांगली अधोरेखित केली. कांचन घाणेकरांचं काम करणारी वैदेही परशुरामी हे या चित्रपटातलं सगळ्यांत गोड सरप्राइज पॅकेज म्हणायला हवं. हा सिनेमा पाहण्याआधी मी 'नाथ हा माझा' हे पुस्तक मुद्दाम आणून वाचलं. त्यामुळं संपूर्ण सिनेमा हा कांचनच्या नजरेतूनही पाहता आला. त्या दृष्टीनं विचार करता, हे पुस्तक न वाचता ही भूमिका करणाऱ्या वैदेहीचं खास कौतुकच करायला हवं. कांचन घाणेकरांनाही तिचा हा रोल नक्की आवडेल.
या चित्रपटासाठी 'शूर आम्ही सरदार', 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' आणि 'गोमू संगतीनं' ही तीन गाणी अप्रतिमपणे रिक्रिएट करण्यात आली आहेत. प्रोमोजमध्ये दिसतात तेवढ्या लांबीची ही गाणी सिनेमात अर्थातच नाहीत आणि ते योग्यच आहे. ती कथेच्या ओघात जेवढी हवी तेवढी एखाद्या मिनिटभरासाठी दिसतात. पण त्या गाण्यांमुळं या संपूर्ण कथानकाला एक छान कोंदण मिळालंय. शिवाय मूळ ट्रॅकच वापरला असल्यानं नॉस्टॅल्जिया जागृत करण्याचं काम ही गाणी अचूक करतात. याखेरीज कांचन आणि काशिनाथ यांचं लग्न झाल्यानंतर येणारं एक हळुवार प्रेमगीत आणि एक 'लाल्यागीत'ही यात आहे. ती दोन्ही गाणीही जमून आली आहेत. या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन हा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. या चित्रपटात ते उत्तम रीतीनं साकारलं आहे.
एखादं चक्रीवादळ वेगानं यावं आणि तेवढ्याच वेगानं निघून जावं, तसं डॉ. घाणेकरांचं आयुष्य होतं. चेहऱ्यावर रंग लावल्यानंतर आणि रंगमंचावरचे लाइट्स उजळल्यानंतर येणारी नशा काय असते, याचा अनुभव ती नशा ज्यांनी एकदा तरी अनुभवली आहे, तेच घेऊ शकतात. आपण अशा लोकांच्या आयुष्याकडं केवळ स्तिमित होऊन पाहत राहण्यापलीकडं काही करू शकत नाही. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याच्या फूटपट्ट्या त्यांना लावता येत नाहीत. मात्र, तरीही लौकिक जगणं या कलाकारांना चुकत नाहीच. त्यातून होणारी त्यांची उद्विग्न तडफड हा सिनेमा फार नेमकेपणानं दाखवतो.
मराठी रंगभूमीवरच्या एका सुपरस्टारला नव्या पिढीकडून मिळालेला हा ट्रिब्यूट अनुभवावा असाच... चुकवू नका.
---
दर्जा - चार स्टार
---

30 Oct 2018

जगणं मस्त मजेचं - ऑक्टोबर

जगणं मस्त मजेचं...
-----------------------

रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
या मालिकेसाठी लिहिलेले स्क्रिप्ट मी इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. (मी अजूनपर्यंत यातल्या एकाही कलाकाराला भेटलेलो नाही.)
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. जूनमध्ये नव्या स्वरूपात ही मालिका सुरू झाली, तेव्हा मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकांनी तिचे सुरुवातीचे भाग लिहिले होते. त्यामुळं ही धुरा पुढं वाहताना मला किंचित दडपणही आलं होतं. पण पहिलाच भाग आवडल्याचं गौरी लागूंनी कळवलं आणि मला हुश्श झालं...
मला आशा आहे, आपल्यालाही हे स्क्रिप्ट * वाचायला आवडेल...

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----

१. सहा ऑक्टोबरचा भाग
-----------------------------


रेणू (जोरजोरात हाका मारतेय) - कुणाल, कुणाल... कुणाल, अरे, कुठं आहेस? 
कुणाल - अगं हो हो, आलो आलो...
रेणू - अरे, मी पाच मिनिटांपूर्वी अंघोळीला गेले तेव्हा झोपला होतास आणि मी बाहेर येईपर्यंत तू चक्क गायब? होतास कुठं तू?
कुणाल - अगं, काय सांगू तुला... मी झोपलोच होतो. स्वप्न पाहत होतो. माझ्या स्वप्नात कोण आलं असेल? ओळख बघू...
रेणू (वैतागून) - आली असेल तुझी माधुरी किंवा विद्या किंवा अशीच कुणी तरी...
कुणाल - हा हा हा... नाही गं नाही. तशी कुणी नाही. ऐक, माझ्या स्वप्नात ना, फुलराणी आली फुलराणी...
रेणू (हसते) - ए बास हां... तुझी टेप लावू नकोस सकाळी सकाळी.... मला खरोखर वेळ नाहीय. कॉलेज आहे मला. तू फटाफटा नाश्त्याचं काय ते बघ. मला निघायचंय हं अर्ध्या तासात...
कुणाल - अगं विचार तरी कोण फुलराणी? कुठली फुलराणी?
रेणू (डिप्लोमॅटिकली) - हे बघ, फुलराणी म्हटलं ना, की माझ्या डोळ्यांसमोर आधी बालकवींची फुलराणी येते... हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, सुंदर त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती... (ट्रान्समध्ये जात)अहाहा... काय सुंदर काव्य!
कुणाल (हसत) - नाही, नो... ही नव्हेच.
रेणू - मग फुलराणी म्हटलं, की माझ्या डोळ्यांसमोर आणखी येते ती आपल्या पेशवे पार्कातली फुलराणी...
कुणाल - आयला हो... मी कसा विसरलो त्या फुलराणीला? चालू आहे का गं अजून ती?
रेणू - कुणाल, आपण शेवटचं त्या पार्कात कधी गेलो होतो ते आठवतंय तरी का तुला? 
कुणाल - खरंच की गं... माझ्या बालपणीचा नॉस्टॅल्जिया आहे फुलराणी म्हणजे... तेव्हा बघ, मी दहा वर्षांचा असेन... आणि ना...
रेणू - कुणाल, प्लीज. तू पेशवे पार्कात हरवल्याचा तो किस्सा परत सांगू नकोस हां... खूपदा ऐकलाय मी तो... आणि आपण काय बोलत होतो? ही पेशवे पार्कातली फुलराणी आली होती का आपल्या स्वप्नात, महाराज? ते सांगा आधी...
कुणाल - नाही, नाही. तुझा हाही अंदाज चुकला. आता लास्ट चान्स...
रेणू (विचार करीत) - अं...अं...अं...? मग साईना नेहवाल? तिला म्हणतात ता फुलराणी?
कुणाल (खो खो हसतो) - अगं काहीही काय रेणू! तुझं डोकं बाकी भन्नाट चालतं हं... अगं, ती कशाला येईल आता माझ्या स्वप्नात? हां, आता ती छान दिसते, छान खेळते... मलाही बॅडमिंटन आवडतं हे सगळं खरंय. पण साईना नेहवाल माझ्या स्वप्नात म्हणजे जरा... अतीच हां... (हसतो)
रेणू (वैतागून) - बरं बाबा, हरले! सांग कोणती फुलराणी आली होती तुझ्या स्वप्नात ते! आणि तू कुठं गायब झाला होतास तेही सांग...
कुणाल - सांगतो, सांगतो. अगं, माझ्या स्वप्नात आपल्या टेरेसमधली गुलाबाची फुलं आली होती स्वप्नात... तो लाल गुलाब... ती जाई-जुई, मोगरा, सदाफुली हे सगळे... ही फुलराणी म्हणत होतो मी... मला स्वप्नात येऊन म्हणाली, की काय कुणाल, लक्ष कुठंय तुझं? आम्हाला विसरलास? मला इतकं कसं तरी झालं ना... मी पांघरूण फेकून ताडकन उठलो आणि आधी टेरेसमध्ये गेलो... सगळ्या झाडांना, फुलांना, वेलींना गोंजारलं... त्यांना पाणी घातलं... इतकं बरं वाटलं ना... आणि आइसिंग ऑन द केक म्हणजे कुठूनसा एक भारद्वाज आला आणि आपल्या टेरेसच्या रेलिंगवर येऊन बसला... अहाहा, भारद्वाजाचं दर्शन झालं सकाळी सकाळी... आता दिवस मस्त जाणार.... 
रेणू - वा, वा, वा... ती फुलं स्वप्नात आल्यानं का होईना, तुला आपल्या घराची, आपल्या टेरेसची, तिथल्या तूच हौसेनं आणून लावलेल्या झाडांची, रोपांची आठवण आली हे काय कमी झालं! छान... एरवी मीच करते त्यांचं सगळं... तुला असतो का वेळ?
कुणाल - तेच ना रेणू... मला इतकं वाईट वाटलं बघ. आपण आपल्या या रुटीनच्या रहाटगाडग्यात इतके अडकून गेलोय ना... 
रेणू - मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं, तर सर्वेपि रुटीनः जन्तु... 
कुणाल - हो ना, सुखाच्या जागी हे रुटीन कधी येऊन बसलं, ते कळलंच नाही. मग असे छोटे छोटे, हळवे, सुखाचे क्षणही नीट उपभोगता येत नाहीत बघ.
रेणू - असं काही नाही. आपल्याला यातूनच वेळ बाजूला काढावा लागतो कुणाल...
कुणाल - हं, खरंय. वेळेचं व्यवस्थापन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बाई. तुला जमतं ते सगळं खरं... मला तर शनिवार-रविवार लोळत पडून राहावंसं वाटतं... पूर्वी मला उत्साह असायचा. ट्रेकिंगला जाऊ, सिनेमाला जाऊ, मित्रांकडं जाऊ, महत्त्वाचं म्हणजे पक्षिनिरीक्षणाला जाऊ... हे आता काहीच होत नाहीय माझ्याकडून... कंटाळा! नुसता कंटाळा भरलाय आता अंगात...
रेणू - आमच्या कॉलेजमधले सायकॉलॉजीचे वर्दे सर आहेत ना, ते नेहमी सांगतात, कंटाळा म्हणजे मनाची एक स्थिती आहे. कंटाळा, वैताग हे सगळं सापेक्ष असतं. तुमचं मन कसा विचार करतं, त्यावर असतं हे सगळं...
कुणाल (तिरकसपणे) - हे सांगायला सायकॉलॉजीचे सर कशाला पाहिजेत? माझ्यासारख्या बायकोलॉजीमध्ये एक्स्पर्ट असलेल्या माणसाला विचार की. मी पण हेच सांगीन.
रेणू (हसते) - कुणाल, झाले का तुझे पीजे सुरू परत? बायकोलॉजी काय अरे! 
कुणाल - मग काय! सर्व लॉज्या आणि लॉजिक जिथं हात टेकतं आणि फक्त 'जी, जी' असं म्हणतं, ती बायकोलॉजी... 
रेणू (खो खो हसते) - कुणाल, गप्प बैस हं... काहीही बोलतोस! आणि काय रे, तुझा उत्साह एवढा मावळायला झालंय तरी काय? असं काय अगदी वय झालंय तुझं? ते गोंधळेकरकाका बघ, अजून किती उत्साही आहेत!
कुणाल - ए, अगं, कशाला नाव काढलंस त्यांचं? कधीही येऊन टपकतात ते सकाळी सकाळी...
रेणू - अरे नाही. एवढ्या दोन-तीन आठवड्यांत नाही आले ते...

(तेवढ्यात बेल वाजते. गोंधळेकरकाका येतात.)

कुणाल - नक्की गोंधळेकरकाकाच. त्यांना खूप आयुष्य आहे बुवा खरंच. या काका, या. आता तुमचा विश्वास बसणार नाही, पण आत्ता खरंच तुमचंच नाव काढलेलं आम्ही दोघांनी; की तुम्ही खूप दिवसांत आला नाहीत, म्हणून...
गोंधळेकरकाका - वा, वा! या म्हाताऱ्याची तुम्हाला आठवण येते म्हणजे कमालच म्हणायची. तुम्ही तुमच्या व्यापात बिझी असणारे लोक... 
रेणू - काका, अहो हाच विषय चालला होता... बरं, तुम्ही काय सहज आला होता का? ते काय आहे आणि तुमच्या हातातल्या पिशवीत?
गोंधळेकरकाका - अगं, गावी गेलो होतो. तिथं आमच्या भावानं नर्सरी सुरू केलीय. मग तुझ्यासाठी दोन रोपं घेऊन आलो. मिरची आणि कढीपत्ता आहे बघ. तुला घरच्या घरी मिळतील आता मिरच्या आणि कढीपत्ता...
रेणू - व्वा काका! आत्ता आमचा टेरेसवरच्या झाडांचा, फुलांचाच विषय चालला होता आणि जोडीला 'आपल्याला वेळ कसा नाही' हा नेहमीचा विषय! पण बरं झालं तुम्ही ही रोपं आणलीत. मला हवीच होती. 
गोंधळेकरकाका - वा, वा... बरं झालं मग. आता पुढच्या वेळी घरच्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून पोहे कर हो. आणि महत्त्वाचं म्हणजे मला बोलाव खायला... काय? (हसतात)
रेणू - म्हणजे काय काका! अहो, हे काय बोलणं झालं? मी नक्की बोलावणार तुम्हाला...
कुणाल - काका, तुमचा उत्साह पाहून आता मला मला नव्यानं उत्साह आला आहे. आता मी गच्चीतली बाग या विषयात पुन्हा लक्षात घालायला सुरुवात करणार आहे. आता नव्या कुंड्या पण आणतो आजच... सगळी रचना पण मला बदलायची आहे. मागं तुम्ही दिलेल्या पिवळ्या गुलाबाला छान फुलं आली बरं का... आज घेऊन जा एखादं...
गोंधळेकरकाका (हसतात) - अरे राहू दे, राहू दे. तू ते सगळे गुलाब या रेणूला दे. तिलाच छान दिसतील ते! 
रेणू - काका, हा स्वतःहून मला देईल होय गुलाबाचं फूल... मुळीच शक्य नाही.
कुणाल (हसत) - अहो काका, तिला गरजच नाही. तिला रोज सकाळी एवढे गुलाब मिळतात ना, की रोज म्हटलं तरी गुलकंद करून खाता येईल.
गोंधळेकरकाका - काय बोलतोस मला काही कळत नाही बाबा. आता दुधासारखा गुलाबाचा पण रतीब सुरू केलाय का तुम्ही?
कुणाल - हां काका, तसा रतीबच म्हणायचा. पण हा रतीब आपल्याला सुरू करावा लागत नाही. लोकच सुरू करतात आपल्यासाठी...
रेणू (हसते) - ए कुणाल, काय रे! अहो काका, व्हॉट्सअपवर रोज सकाळी येणाऱ्या मेसेजबद्दल बोलतोय तो...
गोंधळेकरकाका - ते तुमचं व्हॉट्सअप वगैरे आपल्याला काही नाही जमत हां... आम्ही आपले थेट लोकांना जाऊन भेटतो आणि समोरासमोर नमस्कार घालतो.
कुणाल - काका, खरं सांगू का? असं समोरासमोर भेटण्यात जी मजा आहे ना, ती त्या कृत्रिम संदेशांमध्ये नाही, हे अगदी खरंय बरं का...
गोंधळेकरकाका - अरे, नाहीच येणार. जिवंत माणसासारखा माणूस भेटतो हे किती महत्त्वाचं आहे! माणसासारखं इंटरेस्टिंग या जगात दुसरं काही नाही बघ.
रेणू - आणि हल्ली ना काका, आपण या माणसालाच भेटायला टाळतो आहोत. अहो, चार माणसं जरी भेटली ना, तरी ती मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. म्हणूनच आम्ही शनिवारी सकाळी मोबाइलवर बंदी आणलीय. निदान थोडा वेळ तरी आपण त्या यंत्रापासून दूर राहू शकतो का, हे आम्ही बघतो. आणि खरं सांगू का, काही बिघडत नाही दोन तास नाही पाहिला तो मोबाइल तर...
गोंधळेकरकाका - अगं रेणू, माणसानं माणसाला भेटलं पाहिजे. गप्पा मारल्या पाहिजेत. ख्यालीखुशाली विचारली पाहिजे. असं पाहिजे की नको? मला तर या तुमच्या पिढीचं काही कळतच नाही. 
कुणाल - आमचं कसं झालंय माहितीय का काका, जेवढी जेवढी म्हणून आम्हाला संवादाची अत्याधुनिक साधनं उपलब्ध होतायत ना, तेवढे तेवढे आम्ही अधिकाधिक प्रायव्हेट होत चाललो आहोत. पूर्वी आपण जास्त सार्वजनिक होतो. आता फार खासगी होत चाललो आहोत. हे नक्की किती बरोबर आहे, मला तर काही कळतच नाही. पण काही तरी चुकतंय एवढंच जाणवतं.
रेणू - मी सांगू का, प्रायव्हेट होण्यात गैर काही नाही. फक्त आपल्याकडं तारतम्य नावाच्या गोष्टीची जरा कमतरताच आहे. त्यामुळं कुठल्याही तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं आणि किती नाही, हे कळतच नाही... एक तर वाहून जायचं पूर्ण त्यात किंवा एकदम दूर राहायचं... दोन्हींचा समन्वय साधता येतो की...
कुणाल - मला आज हे फुलराणीचं स्वप्न पडल्यापासून तर काही तरी वेगळीच अनुभूती येतेय. मला ना, निसर्ग परत खुणावतोय रेणू... आपण जायचं का ट्रेकला?
गोंधळेकरकाका - तुला हेच सांगणार होतो कुणाल. मी आत्ताच गावाकडं जाऊन आलो म्हटलं ना. तिथं एवढं छान वाटत होतं ना, की असं वाटलं, भावाला म्हणावं, मी पण येतो रे परत इकडंच राह्यला... मस्तपैकी एखादी झोपडी बांधू आणि राहू. आहे काय अन् नाही काय!
कुणाल - काका, तुम्हाला शहरात राह्यची झालीय सवय... चार दिवस ठीक आहे; पण नंतर कंटाळून जाल तुम्ही तिकडं. बघा, माझं चॅलेंज आहे. 
रेणू - खरंच काका. अहो, खेड्यांत चार दिवस पाहुणे म्हणून जाणाऱ्यांना सगळ्यांनाच तिथलं छान, मस्त वगैरे वाटतं. पण तिथं कायमस्वरूपी राहणं अवघडच आहे. विशेषतः शहरात राहण्याची सवय असलेल्या तुमच्यासारख्यांना...
गोंधळेकरकाका - अगं, हा सगळा घोळ आहे. खेड्यांतून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर होत असतं. आणि ही काही आजची प्रक्रिया नाही. गेली कित्येक वर्षं हे चालू आहे आणि जगभर चालू आहे. पण आता हा रिव्हर्स मायग्रेशनचा नवा ट्रेंड बघायला मिळतोय. बापूजी म्हणायचे, की खेड्याकडं चला. आता लोकांना त्यांचं म्हणणं पटलं आहे असं वाटतं. 
कुणाल - अहो, पण ते वेगळ्या संदर्भात म्हणाले होते. आता काय त्याचं?
गोंधळेकरकाका - महात्मा गांधींची जयंती आत्ताच दोन तारखेला आपण साजरी केली ना! आता तर त्यांची दीडशेवी जयंती आहे पुढच्या वर्षी. तेव्हा या निमित्तानं हे वर्षभर आपल्याला गांधीजी नीट आठवले, पचले तरी पुष्कळ. काळाच्या पुढचे विचार होते बघ त्यांचे... सगळेच काही आपल्याला झेपतील असं नाही.
रेणू - काका, गांधीजींचे आदर्श समोर ठेवून गडचिरोलीत काम करणारे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचं काम मला खरंच आवडतं. मी जाऊन आलेय त्यांच्या प्रकल्पात. सगळं काम पाहून आले आहे. तीच गोष्ट प्रकाश आणि मंदाताई आमटेंची... या लोकांनी तिथं उभं केलेलं काम बघून थक्क व्हायला झालं. अगदी शून्यापासून सुरुवात करून त्यांनी आज केवढे मोठे प्रकल्प उभारलेयत. खरोखर कमाल वाटते या माणसांची...
कुणाल - मोठ्या माणसांपासून अशी प्रेरणा घेऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी माणसं मलाही आवडतात. याचं कारण ते फक्त बोलत नाहीत, तर ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवतात. 
रेणू - खरंय. एकदम पटलं बघ.
गोंधळेकरकाका - आमच्या लहानपणी मी आमच्या वडिलांकडून गांधीजींच्या गोष्टी ऐकायचो. आमच्या अप्पांनी गांधीजींना वर्ध्यातल्या आश्रमात प्रत्यक्ष बघितलं होतं. तो प्रभाव त्यांच्यावर शेवटपर्यंत होता. आमच्या घरात त्यांनी गांधीजींचा फोटो लावला होता. 
कुणाल - काका, पण नंतर प्रॉब्लेम हा झाला, की आपण फक्त त्यांचे फोटोच लावले. विचार तसेच राहिले. फार थोड्या लोकांनी ते खरोखर आचरणात आणले. 'खेड्यांकडे चला' हा गांधीजींचा उपदेश लोकांनी त्यातलं मर्म समजून, तेव्हाच अमलात आणला असता ना, तर आज आपल्या शहरांची ही जी केविलवाणी अवस्था झाली आहे, ती झाली नसती. 
रेणू - खरंय रे. स्थलांतराचा प्रश्न एवढा भयंकर झालाय आणि त्यातून शहरांची जी सूज आल्यासारखी वाढ झालीय ना आपल्या, ती बघून डोकं गरगरतं अक्षरशः 
गोंधळेकरकाका - माझ्या लहानपणीचं गाव आणि आत्ताचं गाव यात फार फरक पडलाय रे... मलाही तो जाणवतो. गावाचं गावपण हरवलंय आणि शहरंही धड 'शहर' म्हणावं अशी झाली नाहीत. सगळीच तिरपागडी अवस्था... आपण खेड्यांचं खेडेपण जपायला हवं होतं. एके काळी सगळ्या बाबतींत ही खेडी स्वयंपूर्ण होती. आता सगळीच अधांतर अवस्था...
कुणाल - आपल्याकडं नगरनियोजन नावाचा प्रकार आहे की नाही, अशी शंका येते अनेकदा. काही अपवाद सोडले ना, तर शहरंही किती बकाल होत चाललीयत आपली... वाहतुकीपासून ते सार्वजनिक सुविधांपर्यंत... किती अडचणी आहेत!
गोंधळेकरकाका - म्हणूनच मला वाटलं कुणाल, की आपल्या भावाकडं जाऊन राहावं गावी. तेच बरं...
रेणू (हसते) - काका, असे वैतागू नका. आणि कुठंही जाऊ नका. आणि तिकडं गेलात तर तुम्हाला कुणालच्या हातचा नाश्ता आणि माझ्या हातचा चहा मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
गोंधळेकरकाका (हसतात) - अरे हो. हे बाकी खरं बरं का. मला काही या दोन गोष्टींचा मोह सोडवायचा नाही. आणि गांधीजींची शपथ घेऊन खरं सांगतो - मी काही कुठं जात नाही. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ...
रेणू व कुणाल (एकदम) - ये हुई ना बात...!

(सगळे हसतात...)

---

२. १३ ऑक्टोबरचा भाग
----------------------

कुणाल - मेरे सपनों की रानी कब आएगी तू, चली आ, रेणू तू चली आ...
रेणू - आले आले... ओ किशोरकुमार, थांबा आता... आजूबाजूचे लोक पळून जातील तुमचं गाणं ऐकून... आणि मोठ्यांदा ओरडू नकोस. आणि आत्ता पहाटेचे सव्वापाच वाजले आहेत एवढं लक्षात ठेव...
कुणाल - अगं रेणू, खरंच उशीर होतोय... पावणेसहाला पोचायचं होतं अगं मला अभ्याच्या घरी... एक तर किती दिवसांनी ट्रेकला निघालोय... त्यात माझ्यामुळं उशीर नको. नाही का?
रेणू - अरे हो... तुझा डबाच भरतेय... व्यवस्थित खा. सँडविचेस आहेत, बिस्किटं आहेत, नारळपाण्याचे सॅशे आहेत. पाण्याची बाटली आहे. तुझ्या गोळ्या आहेत. अजून काय राहिलंय बघ...
कुणाल - अगं, एवढं कशाला भरलंय? तिकडं साग्रसंगीत चुलीवर जेवण तयार करणार आहोत आम्ही...
रेणू - अरे, असू दे. येता-जाता लागतं हे. आणि काळजी घे. नीट जा, नीट ये. कळलं का? 
कुणाल - हो. खरंच एवढं मस्त वाटतंय ना रेणू. किती दिवसांनी हा योग आलाय बघ ना... परवा सई अचानक म्हणाली, की परत ट्रेकला जाऊ या. मग अभ्या, निल्या आणि आमची सगळी गँगच तयार झाली. मजा येणार आहे. खरं तर तू पण यायला हवं होतंस रेणू...
रेणू - अरे हो. पण तुला माहितीय ना, साराच्या शाळेत आज पेरेंट्स मीटिंग आहे. मला खरं तर कॉलेजमध्ये पण काम होतं. ते फेलोशिपच्या अर्जाचं काम अजून रखडलंच आहे. देशमुख सर चिडले आहेत खूप. काय काय करू? त्यात आज साराच्या शाळेत जायचं म्हणून उशिरा जावं लागणार आहे कॉलेजात...
कुणाल - सॉरी हं रेणू... अगं, आमचा ट्रेकचा प्लान अचानक ठरला. एरवी एवढं अचानक काही ठरत नाही. पण या वेळी मला मोह आवरला नाही. पण आपण पुढच्या महिन्यात परत जाऊ.
रेणू - जाऊ रे. तू नको गिल्टी वाटून घेऊ. आता आपल्याला नाही जमत सगळ्या गोष्टी एकत्र करायला... तू जा. मजा कर. तुला हा ब्रेक हवाच होता ना नाही तरी.
कुणाल - अॅक्चुअली रेणू... पावसाळा संपायची वाटच पाहत होतो. आता एवढी ऑक्टोबर हीट आहे ना, ती जाऊ दे. मग माझा आवडता ऋतू येणार आहे. वॉव... वेटिंग वेटिंग फॉर हिवाळा... 
रेणू - खरंच. माझा पण आवडता आहे बरं का हिवाळा... कवीलोक म्हणतात तसं, चित्तवृत्ती वगैरे फुलून येतात अगदी त्या ऋतूत...
कुणाल - अहाहा... ती गुलाबी थंडी, ती मऊमऊ दुलई... पहाटेची साखरझोप आणि तुझ्या...
रेणू - बास, बास... कळल्या भावना. सगळंच बोलून टाकणार आहेस का?
कुणाल - आणि तुझ्या हातचा गरमागरम चहा असं म्हणणार होतो, रेणू! तुझ्या मनात काही दुसरं आलं का? हा हा हा...
रेणू - इश्श! गप रे... भलत्या वेळी काहीही सुचतंय तुला...
कुणाल - भलत्या वेळी? वा, वा! ही पहाटेची मस्त वेळ जर 'भलतीच' असेल, तर मी संपलोच मग! मला ते कुमार गंधर्वांचं गाणं आठवलं... आज अचानक गाठ पडे... भलत्या वेळी भलत्या मेळी असता मन भलतीचकडे...
रेणू (गाते) - नयन वळविता सहज कुठे तरी, एकाएकी तूच पुढे...!
कुणाल - वा, वा... रेणू... आपलं आवडतं गाणं... म्हणूनच तर आपलं जमलं नाही गं... कुमार तर आपले आवडतेच!
रेणू - अगदी. म्हणूनच 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीस तुष्टता मोठी' असं झालं ना आपलं...
कुणाल - अहाहा... रेणू, तू आता खरोखर भलत्या वेळी मला नॉस्टॅल्जियात अडकवू नकोस हं... की मी जाऊ नये म्हणून तू हे एकेक अस्त्र बाहेर काढतीयेस?
रेणू - नाही रे बाबा. तू निघ. आता माझ्यामुळं उशीर होतोय असं म्हणू नकोस बरं का.
कुणाल - अगं हे बघ. अभ्याचा मेसेज आलाय. गाडीचा काही तरी प्रॉब्लेम झालाय म्हणतोय. तेव्हा तो आता निघ म्हणाल्यावरच मी निघणार आहे. आहे अजून थोडा वेळ... एक मिनिट, पेपर आले का बघतो...
रेणू - इतक्या लवकर कुठले पेपर येताहेत रे? साडेपाच झालेयत फक्त...
कुणाल - आलेयत पण. हे बघ. आजचा रंग ग्रे आहे म्हणे.
रेणू - माझ्याकडं ती लिस्ट तयार आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये आम्हीही ग्रे कलरच्या साड्या नेसून फोटो काढणार आहोत, कळलं का! 
कुणाल - मी तर ट्रेकिंगला चालल्यामुळं आज बाय डिफॉल्ट ग्रे आहे सगळा. माझे शूज, पँट, टी-शर्ट... बघ सगळं 'ग्रे'च आहे... फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे... हा हा हा... 
रेणू - कुणाल, बास... कळल्या भावना बरं का... आज पहाटे फारच रोमँटिक मूड झालाय का?
कुणाल - अगं हो. वातावरणच तसं आहे बघ ना. सारा उठली नाहीय ना अजून... मग ऐक ना, आपण जरा... 
रेणू - काय? 
कुणाल - काही नाही. 'रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना...' म्हणणार होतो. 
रेणू - कुणाल... आवरा... भावना आवरा आपल्या...
कुणाल - गंमत गं...! पण बघ ना. आज किशोर आठवतोय सारखा. त्याची पुण्यतिथी आहे गं आज... 
रेणू - हो? खरंच? तुला बऱ्या या तारखा लक्षात राहतात बाई...
कुणाल - राहतात बुवा. आणि खरं सांगू का? हल्ली व्हॉट्सअपमुळं मध्यरात्री बारा वाजल्यापासून त्या त्या दिवसाचं माहात्म्य कळायला सुरुवात होते. 
रेणू - हे बाकी खरंय.  
कुणाल - हो ना. किशोरकुमार गेल्याचं मला आठवतंय. मी फार लहान होतो. १९८७ मध्ये किशोर गेला, त्या दिवशी बुधवार होता. तेव्हा 'चित्रहार' रद करून किशोरकुमारचा एक जुना लाइव्ह कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला होता. मला अजून आठवतंय.
रेणू - भारीच अवलिया होता हा माणूस... त्याचं ते 'यॉडलिंग' वगैरे म्हणजे तर कहर होता. पण गंभीर गाणी पण किती उत्कटतेनं म्हणायचा....
कुणाल - अगदी. आज ट्रेकमध्ये सगळी किशोरच्या गाण्यांची आवर्तनं होणार आहेत बघ. चला, निघायला हवं.
रेणू - महाराज, तेच म्हणणार होते. निघा आता. मलाही आवरायचंय अरे. आणि हो, दिघेकाकू येणार होत्या आत्ता...
कुणाल - आत्ता? पहाटे साडेपाचला?
रेणू - अरे, पाचलाच येते म्हणाल्या होत्या. त्यांना चतुःशृंगीला जायचं होतं. देवीला. मला घेऊन चल म्हणत होत्या. 
कुणाल - तू हे काही बोलली नाहीस रेणू. आणि किती गर्दी असेल तिकडं आत्ता...
रेणू - अरे, तू काल उशिरा आलास. काल रात्री तू यायच्या आधी जस्ट येऊन गेल्या होत्या, त्या. 
कुणाल - अगं, तुला आज एवढी गडबड आहे, तर मग तू त्यांना सांगायचंस ना, जमत नाहीय म्हणून...
रेणू - खरंय रे. पण काकूंचं मन मोडवलं नाही मला. आणि पहाटे जायचं होतं ना. तुझ्यासाठी उठायचंच होतं मला लवकर. म्हणून मी त्यांना हो म्हटलं...
कुणाल (हसत) - धन्य आहात हो आपण... हात जोडतो...

(तेवढ्यात बेल वाजते.)

रेणू - आल्याच बघ त्या. तू निघणार आहेस ना लगेच.
कुणाल - हो. आता एकदमच बाहेर पडू.
रेणू - हो, एक मिनिट. 

(दार उघडते. दिघेकाकू येतात.)

दिघेकाकू - अगं बाई, अजून तयार नाही का झालीस? आणि तू एवढा पहाटेचा का उठलायस रे बाबा?
कुणाल - काकू, मी ट्रेकला चाललोय. म्हणून लवकर उठून आवरून बसलोय.
रेणू - काकू, पाच मिनिटं बसा हं. मी आवरून येते.
दिघेकाकू - सावकाश गं बाई. माझ्यामुळं तुझी गडबड झालेली दिसतेय. अगं काल बोलली असतीस, तर मी त्या श्रद्धाला सांगितलं असतं. तिच्याबरोबर गेले असते.
रेणू - असू द्या हो काकू. माझी शनिवारची गडबड नेहमीचीच आहे. कुणाल ट्रेकला जाणार, म्हणून मला लवकर उठायचंच होतं. त्यामुळं तुमच्यामुळं काही त्रास झालेला नाही.
दिघेकाकू - अगं, आमच्याकडं नवरात्राची पूर्वी गडबड असायची. गौरींसारखंच नवरात्रही साग्रसंगीत करायचे. आता फक्त गौरींचं तेवढं करते. नवरात्राचं एवढं होत नाही बाई मला. म्हणून म्हटलं, निदान नऊ दिवसांतले एक-दोन दिवस तरी पहाटे जाऊ देवीला...
रेणू - काकू, तुमची तब्येत सांभाळून तुम्ही करताय ते पुष्कळ आहे.
दिघेकाकू - हो बाई. पण तुला खरं सांगू का, सणाचे दिवस आले, की मनाला आपोआप एक उत्साह येतो बघ. वातावरण पण कसं बदलतं ना...
कुणाल - काकू, मला पण केवळ या बदललेल्या वातावरणामुळं ट्रेकला जायचा उत्साह आलाय. पाऊस संपलाय, सगळीकडं हिरवंगार झालंय. तुमचा रोजचा रंग कुठला का असेना, आमच्या मनाचा रंग तरी रोज 'हिरवा' असाच झालाय बरं का! 
रेणू (लटकेपणानं) - काही सांगू नकोस तुझ्या हिरव्या मनाचं... पुरे झालं कौतुक...
दिघेकाकू - निसर्ग हा खरा जादूगार आहे बघ रेणू. या दिवसांत हे असं छान वातावरण तयार होतं सगळीकडं आणि नेमके त्याच काळात आपले हे सगळे सण येतात...
कुणाल - खरंय काकू. आपल्या भोवतालाचा आपल्यावर परिणाम होतच असतो. बघा ना, कडक उन्हाळा असेल, तर कसं मलूल झाल्यासारखं वाटतं. धुवाँधार पाऊस पडत असेल, तर फार भव्य, उदात्त असं काही तरी वाटतं आणि हिवाळा तर माझ्यासाठी सृजनाचा ऋतू आहे. असलं भारी वाटतं ना हिवाळ्यात... मला तर वाटतं, की आपण युरोपातच जन्माला यायला हवं होतं. 
रेणू (हसत) - अगदी अगदी. बरं का काकू, कुणालला तर पूर्वी या ऋतूत कविता वगैरे व्हायच्या.
दिघेकाकू - अगं, याचं सोड. मीदेखील कविता करायची. अगदी गेल्या हिवाळ्यातसुद्धा मी कविता केली होती. तुला ऐकवीन एकदा...
रेणू - वा, वा... आत्ता ऐकवा ना... 
दिघेकाकू - एवढी कुठली गं लक्षात माझ्या... घरी असेल वही माझी... पण ऐकवीन एकदा...
कुणाल - काकू, तुम्ही चक्क कविता करता? माहिती नव्हतं हं हे अजिबात. दंडवत घ्या...
दिघेकाकू - तुला वाटलं काय कुणाल? अरे, आमच्या मिरजेच्या कॉलेजमध्ये मी काव्यवाचनात पहिली आले होते. पण नंतर संसाराच्या रामरगाड्यात कविता हरवलीच बघ कुठं तरी...
रेणू - असंच होतं हो काकू... पण तुम्ही परत कविता लिहायला लागलात हे ऐकून फार छान वाटलं बरं का! 
दिघेकाकू - अगं, एवढी काही विशेष नाही. उगाच आपली करमणूक म्हणून चार ओळी खरडायच्या झालं.
कुणाल - काकू, तुमच्या आनंदासाठी तुम्ही लिहिता ना... हे सगळ्यांत बेश्ट आहे बघा. आपण आपला आनंद मिळवावा. मला पक्षिनिरीक्षणातून, ट्रेकमधून मिळतो. रेणूला गाण्यातून, भाषेच्या अभ्यासातून मिळतो. तुम्हाला तर स्वयंपाक करून लोकांना खायला घालण्यातसुद्धा आनंद मिळतो. खरं की नाही!
दिघेकाकू - कळतंय बरं का... गौरीचं मेहुण झालं, आता नवरात्रात कधी बोलावताय जेवायला, असं म्हण की सरळ...
कुणाल (हसतो) - नाही नाही. असं काही नाही. पण बघा, म्हणजे तेवढं ते पुरणपोळी, साजूक तूप वगैरे...
रेणू - कुणाल, कमाल आहे हं तुझी. अरे, काकूंना काय सांगतोयस? मी करीन की घरी...
दिघेकाकू - असू दे गं. गेल्या वर्षीपासून मी हे नवरात्राचं जरा कमी केलंय. म्हटलं ना, हल्ली होत नाही म्हणून. नाही तर माझं आमंत्रण ठरलेलं असतं. तुम्हालाही माहिती आहे. 
कुणाल - काकू, नाही हो. गंमत केली. तुम्हीच या आज आमच्याकडं जेवायला. मी तर बाहेर चाललोय. दुपारी रेणू आणि सारा दोघीच आहेत घरी. 
रेणू - कुणाल, मी काकूंना ऑलरेडी सांगून ठेवलंय. आम्ही बाहेरच जाणार आहोत जेवायला. माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी पण येणार आहेत.
कुणाल - आयला! परस्पर प्लॅन ठरवून मोकळ्या! मला कुणी सांगायलाही तयार नाही. कुणाल ट्रेकला निघाला, की तुमचे इकडे प्लॅन सुरू... काय!
दिघेकाकू - असू दे रे. तुला काय सांगायचंय सगळं... आमचं आम्ही ठरवलंय. पण रेणू, अगं, किती वेळ बोलत बसलोय आपण... जायचंय ना देवीला. पटकन जाऊन येऊ. 
रेणू - हो काकू. निघू या. कुणाल पण निघणार आहेच... 
कुणाल - रेणू, तू काकूंकडं नीट बघितलंस का? काकू आज ग्रे कलरची साडी नेसल्यायत चक्क...
दिघेकाकू (लाजून हसतात) - अरे काय सांगू, आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपवर. त्यात आम्ही ठरवत असतो हे असलं सगळं. आज संध्याकाळी आमच्या मंडळाचा कार्यक्रम पण आहे. गेटटुगेदर की काय ते!
रेणू - काकू, हे भारी आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात हे माहिती होतं. पण तुमचा ग्रुप वगैरे हे आजच कळतंय. मस्तच हं...
दिघेकाकू - आम्हा म्हाताऱ्यांना चांगली करमणूक झालीय बाई ती. माझी ती मिरजेची मैत्रीण आहे ना वीणा, तिनं पुढाकार घेऊन केलंय हे सगळं. ती पण हल्ली पुण्यातच आलीय राहायला.
कुणाल - व्वा.. व्वा... काकू, हे तुम्ही जे काळासोबत राहताय ना, ते फार छान वाटतंय बघा.  
दिघेकाकू - अरे, आता आमचे दिवस असे राहिलेतच किती! आला दिवस सुखानं कसा घालवता येईल तेवढं बघायचं.
रेणू - काकू, काहीही बोलता हं. काय झालंय तुम्हाला... मागच्या वेळी तर म्हणाला होतात, की बसल्या बैठकीला आजही २०-२५ माणसांचा स्वयंपाक कराल म्हणून...
दिघेकाकू - होच मुळी. मी आहे तेवढी खंबीर. पण हल्ली कुणाचं काही सांगता येत नाही बाई. त्यामुळं फार ताण नको वाटतो मनाला... देवाचं आपलं होईल तेवढं करते.
कुणाल - काकू... हे पटलंय आपल्याला. फार मस्त बोललात.
रेणू - खरंय अगदी. फार ताण घ्यायचाच कशाला? हे जगणं मस्त मजेचं आहे. ते तसंच जगू या.
कुणाल - आता तुम्हा दोघींना असं बोलताना बघून मला भरून वगैरे आलं आहे. सकाळी तुम्हा दोघींच्या रूपात मलाच देवीचं दर्शन झालंय असं वाटतंय. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये हे देवीतत्त्व असतं. आपण ते ओळखायला आणि त्याचा आदर करायला शिकायला पाहिजे, असं मला नेहमी वाटतं.
रेणू - नुसतं असं बोलून काही उपयोग नाही रे कुणाल. वागण्यात दिसलं पाहिजे ते...
दिघेकाकू - आणि नुसतं याच्या नाही गं... सगळ्या पुरुषांच्या वागण्यात दिसलं पाहिजे.
कुणाल - झालात का सुरू तुम्ही परत? देवी कोपली का लगेच? आता काय करावं?
रेणू (हसून) - ऐक मग वत्सा! या देवीला आत्ताच्या आत्ता गरमागरम चहा हवा आहे. तो भक्त कुणाल आणून देईल का?
दिघेकाकू - भक्ता, मलाही अर्धा कप चालेल.
कुणाल (हसतो) - तुम्हाला सकाळी सकाळी चहाचा नैवेद्य दाखवला, म्हणजे आमचा ट्रेक जोरदार होईल. चला, तिकडं गडावरची व्याघ्रेश्वरीही आमची वाट पाहत असेल. अभ्याचा मेसेजही आलाय. निघू या म्हणून. तेव्हा आता चहा घेऊ आणि निघू....
रेणू व दिघेकाकू - व्वा... नीट जा, नीट ये. शुभास्ते पंथानः सन्तु...

(सगळे हसतात...)
---

३. २० ऑक्टोबरचा भाग
-----------------------

(पार्श्वभूमीवर माणसांचे बोलल्याचे आवाज येत आहेत...)

रेणू - कुणाल, कुणाल, अरे इकडं, इकडं आहोत आम्ही... 
सई - कुणाल... अरे इकडं बघ...
कुणाल - इकडं आहात होय तुम्ही... कुठं कोपऱ्यात येऊन बसलात?
रेणू - ए, इथं किती गर्दी असते माहितीय ना सकाळच्या वेळी? लगेच जागा मिळाली हेच खूप झालं...
कुणाल - अगं, मी गाडी पार्क करून येईपर्यंत थांबायचं ना पाच मिनिटं...
सई - ए, आम्ही थांबलो होतो रे. पण इकडं जागा झाली आणि वेटरनी हाक मारली आम्हाला... आणि बरं झालं आलो लवकर ते... किती वेटिंग आहे बघ आता...
कुणाल - हो ना. कंटाळा येतो या गर्दीचा यार. मला तर शनिवारी उठून कुठं जायचं म्हणजे ना असा वैताग येतो! आणि या रस्त्यावर गाडी लावायला एक जागा मिळत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे.
रेणू - अरे, मग काय केलं, शेवटी?
कुणाल - अगं, इथं ते कॉर्पोरेशनचं पार्किंग झालंय तिकडं लावून आलो गाडी. तिथून चालत आलो. अर्धा किलोमीटर तरी लांब असेल...
सई - तरीच वेळ लागला बरं का रे तुला...
कुणाल - मग काय अगं! उगाच पायपीट... पण तुम्हाला हे 'खादाडेश्वर'च लागतं ना...
रेणू (हसत) - असू दे रे... तसंही आज तू वॉकिंगला दांडी मारली आहेस. पार्किंगच्या निमित्तानं तेवढंच तुझं चालणं झालंय...
कुणाल - ए काही नाही गं... मागच्याच शनिवारी मी ट्रेकच्या निमित्तानं खूप खूप खूप चाललोय. माझा आठवड्याचा कोटा खरं तर मागच्या शनिवारीच भरलाय. कळलं ना...
सई - ए हो... मजा आली ना. संध्याकाळी पाय दुखले रे पण जाम... पण हा चेंज आपल्याला पाहिजेच होता नाही का! ए रेणू, पुढच्या ट्रेकला तू पण चल. 
रेणू - अगं, साराचं सगळं शेड्यूल बघावं लागतं बाई... आज पण तिला दिघेकाकूंकडं सोडलंय तास-दीड तासात जाऊन येते म्हणून... मग झाली माझी सुटका...
कुणाल - तुझी धावपळ होतेय खूप रेणू, हे मान्यच आहे. पण ट्रेकचं हे एक निमित्त होतं बघ. त्या निमित्तानं मी पण खूप दिवसांनी पुण्याच्या बाहेर पडलो. बाहेर अजून जरा बरं वातावरण आहे. सह्याद्रीच्या कुशीत हिरवागार निसर्ग आहे, स्वच्छ हवा-बिवा आहे... एकूण बाहेर बरं चाललंय जगाचं... (हसतो)
सई - मग काय... मी तर तो स्वच्छ हवेतला ऑक्सिजन असा भरभरून घेतला शरीरात. त्या जोरावर पुढचा एक महिना आता सहज निघेल. मग दिवाळी झाल्यावर पुन्हा एका ट्रेकचं प्लॅनिंग आहेच... आणि रेणू, तुला त्या वेळी मी नेणारच आहे, बरं का...
रेणू - मी तर शेवटची अशी ट्रेकला वगैरे कधी गेले होते हेच मला आठवत नाहीय. साराच्या जन्मापासून तर गेली चार-पाच वर्षं ट्रेक सोड, साधं बाहेर कुठं फिरायला जाणं झालेलं नाही बघ आमचं...
सई - हो अगं, तुझी धावपळ खूपच वाढलीय ना रेणू...
रेणू - अगं पण धावपळ नाही केली, तर काहीच करता येणार नाही. करिअर वगैरे तर सोड. आपल्या उपजीविकेसाठी ही नोकरी करावी लागतेय तीही करता आली नसती मग...
कुणाल - पण काय गं, तुझ्या आवडीचा जॉब आहे ना... प्रोफेसर रेणू मॅडम... मराठीचा तुमचा अभ्यास सत्कारणी लागलाय ना. वर दणदणीत पगारही मिळतोय की छान.
सई - अरे, बाहेरून सगळं छान दिसतंच की. पण त्या त्या जॉबच्या अडचणी असतात त्या बाहेर कुणाला कळत नाहीत.
रेणू - बघ की... बरं ऑर्डर काय द्यायचीय ते सांगा पटकन... तो वेटर दोनदा येऊन गेलाय हं... आपण नुसतं पाणीच पितोय मघापासून... आता तो तिसऱ्यांदा येऊन आपल्याला खरंच पाणी पाजून जाईल हां... (हसते)
सई - मला चीज डोसा...
कुणाल - मला पण डोसाच, पण साधा...
रेणू - मग मी आप्पे घेते. आणि नंतर तीन फिल्टर कॉफी ना... हां... हे बेश्ट... 
कुणाल - मामा, घ्या लवकर ऑर्डर... हां, काय बोलत होता तुम्ही? जॉब आणि आनंद वगैरे ना... ते सगळं खरं सांगू का, रेणूच्या प्राध्यापकी मराठीत सांगायचं ना, तर सापेक्ष असतं बरं का सगळं...
रेणू - अरे हो की! आम्ही तक्रार करतच नाही आहोत. उगाच काय?
कुणाल - हो, सापेक्ष म्हणजे कुठलीही गोष्ट आपण तिच्याकडं कसं बघतो त्यावर असते ना... आता हा पाण्याचा जग, मला इथून जसा दिसतो तसा तुला तो तुझ्या जागेवरून दिसणारच नाहीय. तुला त्याची दुसरी बाजू दिसणार आहे.
सई - ए, फार बेसिक सांगू नकोस हां... हे आम्हालाही कळतंय. पण मूळ मुद्दा काय होता?
रेणू - अगं हेच. जॉब सॅटिसफॅक्शन, करिअर आणि कशासाठी आपण नक्की काय किंमत मोजतो हा विषय होता ना.
सई - त्यावर कितीही बोललो तरी शेवटी चर्चा अपूर्णच राहील. पण मला काय वाटतं, माहितीय का? आपण व्यवस्थापन शिकून घेतलं पाहिजे आयुष्यात... वेळेचं, माणसांचं, भावनांचं...
कुणाल - भावनांचं व्यवस्थापन? ओहो, छान मुद्दा आहे. पण त्याचा इथं काय संबंध?
रेणू - हो ना. म्हणजे या दोन गोष्टी कशा जोडतेयस तू?
सई - असं बघ. आपण आयुष्यात फोकस्ड असणं जसं महत्त्वाचं असतं ना, तसं ऑर्गनाइज्ड असणं पण महत्त्वाचं असतं. म्हणजे या दोन गोष्टी एकमेकींना पूरक आहेत. तुला प्राध्यापकीमध्ये करिअर करायचंय हा तुझा फोकस झाला आणि त्यासाठी तुझ्या आयुष्यातल्या त्याच्याशी निगडित सर्व गोष्टींचं छान व्यवस्थापन करणं हे ऑर्गनाइज्ड असणं झालं. राइट?
कुणाल - हो, पण हा टाइम मॅनेजमेंटचा विषय झाला. भावनांचा संबंध येतो कुठं?
सई - अरे, आपण माणसं आहोत ना! की रोबो आहोत? आपण काम करतो म्हणजे आपलं मन गुंतलेलं असतं तिथं. इन फॅक्ट, आपण मन गुंतविल्याशिवाय कुठलंही काम नीट करू शकत नाही. पण हे मन म्हणजे मोठी विचित्र गोष्ट असते. त्यावर आपलं नियंत्रण नसतं. मग ते इकडं-तिकडं भरकटतं. पण त्याला पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी आणि पुन्हा त्याच्याकडून फोकस्ड पद्धतीनं काम करवून घेण्यासाठी जे करावं लागतं ना, त्याला भावनांचं व्यवस्थापन म्हणतात.
कुणाल - ए, हे खूप बोजड होतंय हं... बाउन्सर जाताहेत.
रेणू - हं, मला थोडं कळलं सई काय म्हणतेय ते... आपल्याला कधी कधी कामाचा, रुटीनचा वैताग येतो बघ. फटिग येतो. तेव्हा आपण काय म्हणतो, मरू दे. सोडून देतो आता हे सगळं... तेव्हा एक प्रकारे तो भावनांचा उद्रेकच असतो. पण आपण प्रत्यक्षात काही असा जॉब सोडू शकत नाहीच. त्यातून मग फ्रस्ट्रेशन येतं. मग मुळात त्या उद्रेक होऊ घातलेल्या भावनांना नियंत्रित करणं गरजेचं असतं.
कुणाल - ते कळलं. पण ते करायचं कसं? 
सई - ओके. आता तुम्हाला बेसिकली भावनेच्या व्यवस्थापनाची गरज पटलीय हे महत्त्वाचं. एकदा आपण ही गरज मान्य केली, की मग त्यावरची उपाययोजना स्वीकारणं सोपं असतं. परिस्थितीचा स्वीकार करणं, तिची अपरिहार्यता समजून घेणं ही सगळ्या समस्यांच्या पूर्ततेसाठीची पूर्वअट असते, हे लक्षात घे. 
कुणाल - ए, हिच्या डोशात नक्की काय घालतंय पाहा गं रेणू? ही फार जड जड बोलतेय...
सई (हसते) - सॉरी सॉरी. अरे पण, हे फार अवघड नाहीय समजायला. 
रेणू - ए, तू सांग गं... छान सांगतीयेस... मजा येतेय मला ऐकताना.
सई - हं, तर ऐक. तुला उद्या अचानक असं वाटायला लागलं, की आपण जे काही करतोय त्यात काही अर्थ नाही. हे काम आपल्या योग्यतेचं नाही, आपण दुसरं काही तरी करायला हवं, तर याचा अर्थ तू काय घेशील?
कुणाल - याचा अर्थ एक तर माझ्या कामात साचलेपणा आलाय किंवा मी स्वतः साचेबद्ध झालोय.
सई - राइट. मग यावर उपाय काय? 
कुणाल - काम बदलून बघणं...
सई - उपयोग होईल?
रेणू - नाही. कारण हा माणूस तोच आहे. 
सई - हं, म्हणजे दोन्ही अर्थांनी लागू आहे. तुझ्या कामात साचलेपण आलं असेल, तर तुला काम बदलून बघितल्यावर लगेचच फरक लक्षात येईल. पण काम बदलूनही तुला निरर्थकता जाणवत राहिली तर प्रॉब्लेम कुठं आहे?
कुणाल - माझ्यात... (एकदम उसळून) ए, माझा काय इंटरव्ह्यू चालवलाय का तुम्ही दोघींनी? की उगाच कौन्सेलिंगचे प्रयोग करताय माझ्यावर? मला काहीही झालेलं नाहीये हां... सांगून ठेवतोय.
सई - हे बघ, हे बघ. ही अशी आततायी प्रतिक्रिया देणं हेसुद्धा काही तरी बिघडल्याचंच लक्षण आहे बरं का कुणाल... (हसते.) 
रेणू - ए, तू ती सांगतेय ती उत्तरं दे. नाही तर आम्ही दोघी बोलतो.
कुणाल - नाही नाही, ठीक आहे. हं, बोल. 
सई - तर सांग ना, काम बदलूनही तुला निरर्थकता जाणवत राहिली तर प्रॉब्लेम तुझ्यात आहे हे तुला कळलं ना...
कुणाल - हो कळलं. पण भावनांचं व्यवस्थापन कुठं येतंय इथं? बाकी तो शब्द आपल्याला आवडलाय बरं का सई! भावनांचं व्यवस्थापन... मस्त... रेणू, काही तरी ब्लॉग वगैरे लिही ना यावर.
रेणू - तू शांत बस रे. ती चांगलं काही तरी सांगतेय तर ऐकून घे ना...
कुणाल - हो, हो. शहाण्या मुलासारखा वागतो. हातावर बोट, तोंडावर घडी...
सई (हसते) - हा हा हा. तसं नसतं रे ते. हाताची घडी, तोंडावर बोट... असं असतं ते...
रेणू - याला आधी शब्दांचं व्यवस्थापन शिकवावं लागणार आहे मला...
सई - बघ की. तर ऐक रे नीट. तर आपला प्रॉब्लेम झालेला असतो, हे आपल्याला कळतं. पण तो नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे माहिती नसतं. तर हा प्रॉब्लेम असतो तो भावनांच्या व्यवस्थापनाचा... म्हणजे अॅक्चुअली भावनांच्या गैरव्यवस्थापनाचा...
रेणू - अच्छा अच्छा... येतंय लक्षात.
कुणाल - मला तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यासारखं वाटतंय. मी कुठं तरी गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार केलाय असं वाटायला लागलंय.
सई - ऐक रे जरा. तर हे भावनांचं व्यवस्थापन म्हणजे तरी काय! तर मोकळ्या माळरानात दावं सुटलेल्या वासरागत हुंदडणारं हे जे मन आहे ना, त्याला लगाम घालणं. त्याला आपल्या संयमाच्या गोठ्यात आणून बांधणं...
कुणाल - ए, ही काय बोलतेय! मानसशास्त्रातनं एकदम शेतीत कुठं शिरली ही... तुझंच मन जास्त हुंदडतंय सई. त्याला आवर घाल. 
सई - माझं मन बरोबर असायचं तिथंच आहे. माझा चीज डोसा संपलाय. तुझा बघ. अजून अर्धाही संपलेला नाही. आणि काय रे, शेतीत शिरली काय! मनाचं पण शेतीसारखंच असतं बरं का! त्या मनाचीही उत्तम मशागत करावी लागते. तरच त्यात चांगल्या विचारांचं पीक येतं. 
रेणू - हे भारी आहे हं वाक्य. सानेगुरुजींचं पुस्तक वाचल्यासारखं वाटतंय. 
सई - अगं हा बघ की. याला समजून सांगायचं म्हणून असं सोपं उदाहरण दिलं. 
रेणू - मला तर तुझं हे व्याख्यान ऐकून ते गाणं आठवलं - कई बार यूं ही देखा है... ये जो मन की सीमारेखा है... मन तोडने लगता है... अंजानी प्यास के पीछे, अंजानी आस के पीछे, मन दौडने लगता है... कसलं मस्त गाणं आहे ना! अगदी अर्थपूर्ण...
कुणाल - आमचं तर मन फॉर्म्युला वनमधल्या कारसारखं पळत असतं सतत...
रेणू - ते माहितीय आम्हाला. म्हणूनच सई हे सांगतीय ना...
कुणाल - नुकताच दसरा झालाय. आपल्याकडं आपण दसऱ्याला सीमोल्लंघन करतो. आणि ही सीमेच्या आत खेचतेय (हसतो)...
सई - अरे हो. ते सीमोल्लंघन वेगळं. काही तरी पराक्रम गाजवण्यासाठी आपल्या नेहमीच्या कक्षा सोडून, सीमा सोडून धैर्यानं पुढं येणं अशा अर्थानं सीमोल्लंघन अभिप्रेत आहे बरं का त्यात.
रेणू - हो ना! आम्हाला सीमोल्लंघन म्हणजे फक्त सिग्नलच्या अलीकडं मारलेल्या पांढऱ्या रेषेला ओलांडून पुढं जाणं आणि सिग्नलचं उल्लंघन करणं एवढंच माहिती आहे. 
कुणाल - आणि आमच्या वर्गात ना ती एक सीमा होती. आम्ही काय करायचो, तिच्या...
रेणू व सई (एकदम) - बास, बास... नको हां प्लीज. तो पीजे परत नको. भावना पोचल्या. 
कुणाल - पोचल्या ना... म्हणजे मला नीट व्यवस्थापन करायला जमतंय म्हणायचं त्या भावनांचं...
सई - कुणाल, अरे जमतंय तुला. मुळात काय आहे माहितीय का, आपण लहानपणापासून काही विशिष्ट संस्कार, शिकवण घेऊनच वाढत असतो. त्यात आपल्या रुढी-परंपरा असतातच. या सगळ्यांतून आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं. त्यातून हे भावनांचं व्यवस्थापनही आपण नकळतपणे करतच असतो. पण कधी कधी हे दोर सैल पडतात आणि मन भरकटतं. मग करिअरवरचाही फोकस हलतो आणि उगाच फ्रस्ट्रेशन येतं. ते टाळलं की झालं.
रेणू - हं, दोर सैल झाले आहेत हे बाकी खरंय बरं का...
कुणाल - अरे, तुम्ही म्हणजे मी कुणी तरी बैल आहे आणि माझा कासरा तुमच्या हातात आहे असंच बोलताय. कम्मॉन... आणि तुम्हाला नाही का गरज भावनांचं व्यवस्थापन करण्याची? की आज फक्त माझीच शाळा घेताय?
सई - अरे, यात तू किंवा आम्ही असा काही भेदभाव नाही. हा नियम सगळ्यांनाच लागू आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही. उलट स्त्रीचं मन जास्त हळवं असतं. तिला तर याची जास्त गरज आहे. 
कुणाल - हां, आता कसं! या रेणूला सांग. तिची फारच द्विधा अवस्था झालेली असते कायम...
रेणू - मुळीच नाही. करिअर करण्यावर मी ठाम होते आणि म्हणूनच ते झालंय. कळलं ना... 
कुणाल - बरं बाई. तू महान आहेस. पण ए, ऐका दोघीही. उशीर झालाय. आता मला खरोखर सीमोल्लंघन करण्याची वेळ आलेली आहे. मी निघू का? माझी काही अर्जंट कामं आहेत. ती करून मी परस्पर घरी जाणार आहे. तुम्ही दोघी बसा हवं तर...
सई - हो. नीघ लवकर. आणि पुढच्या वेळी भेटायला वेळेत ये.
कुणाल - का बुवा का? 
सई - कारण, पुढचं लेक्चर मी वेळेचं व्यवस्थापन यावर ठेवणार आहे. 

(सगळे हसतात.)

---

४. २७ ऑक्टोबरचा भाग
-----------------------

(कुणाल व रेणू गोंधळेकरकाकांच्या घरी आले आहेत... दारातून कुणाल हाक मारतो...)

कुणाल - काका आहेत का घरी?
गोंधळेकरकाका - अरे, कुणाल? रेणू? या, या, या... या गोंधळेकरांच्या घराला आपल्या चरणकमलदल लागले... वा, वा... आम्ही धन्य झालो...
रेणू (हसते) - काय हो काका? कधी येत नाही का आम्ही?
कुणाल - मग काय? अहो, तुम्हाला बरं नाही असं कळलं म्हणून मुद्दाम आलो. बाहेरच निघालो आहोत. म्हटलं, तुमच्याकडं डोकावून जावं....
गोंधळेकरकाका - ते बरं केलंस. अरे, तुम्ही आमच्या घरी यायचे प्रसंग कमीच. मी मात्र अनेकदा येत असतो की नाही सांगा तुमच्याकडं...
रेणू - असू दे हो काका. बरं, आता कसंय तुमचं?
गोंधळेकरकाका - बरंच आहे म्हणायचं. काल सकाळी चालायला गेलो, तेव्हा जरा धाप लागल्यासारखी वाटली. आमची ज्येष्ठ नागरिकांची गँग होतीच सोबत. रामभाऊ होते, शिंदेकाका होते. मग जरा बसलो, पाणी प्यायलो. मग शिंदेकाका मागंच लागले, की लगेच डॉक्टरला दाखवू या म्हणून. मग गेलो दोघे रिक्षा करून डॉक्टर जोशींकडं... ते आमचे फॅमिली डॉक्टरच. त्यांनी तपासलं. बीपी जरा हाय झालं होतं. बाकी काळजीसारखं काही नाही म्हणाले. पण जरा वजन कमी करायला सांगितलंय. शिवाय एकदा संपूर्ण चेकअप पण करून घेऊ म्हणाले आहेत.
कुणाल - काका, तुम्ही सत्तरीचे वाटत नाही हे खरंय. पण तरीही तब्येतीची काळजी घेतलेली बरी, नाही का? डॉक्टर जोशी म्हणताहेत, तसं एकदा खरंच संपूर्ण चेकअप करून घ्या. हवं तर मी येईन तुमच्यासोबत हॉस्पिटलला.
रेणू - अरे, हल्ली तर घरी येऊनसुद्धा सगळं चेकिंग करतात. 
गोंधळेकरकाका (हसतात) - अगं रेणू, मी एवढा म्हातारा झालेलो नाहीय. मी स्वतः चालत जाईन हॉस्पिटलात... हो...
कुणाल - हो, हो. मला खात्री आहे तुमच्याबद्दल. पण मी आलो तरी काही बिघडत नाही. असू द्या.
गोंधळेकरकाका - हं... आता मी ठीक आहे बरं का, पण आता सांगायला हरकत नाही, की काल एका क्षणी ब्रह्मांड आठवलं होतं. तो जो अस्वस्थतेचा एक क्षण असतो ना, तो एखाद्या युगासारखा वाटतो. आजूबाजूला सगळी माणसं असतात, पण यातलं आत्ता आपल्या कुणीच उपयोगाचं नाही, असं वाटायला लागतं.
रेणू - आई गं... किती वाईट फीलिंग आहे ना हे...
कुणाल - हे बघ रेणू, आपण शेवटी हाडामासाची माणसं आहोत. वेदना झाली की कण्हणार, दुःख झालं की रडणार, तसंच आनंद झाला की हसणार. नाही का?
गोंधळेकरकाका - नाही रे कुणाल. मी सांगतोय ते जरा वेगळं आहे. तुम्ही अजून लहान आहात. पण माझ्यासारख्या वय झालेल्या माणसाला ना, ही सगळं संपत चालल्याची जाणीव फार त्रासदायक असते. ती अस्वस्थता नुसती शारीरिक नसते; मानसिक जास्त असते. एका क्षणी असं वाटतं, की संपलं आता सगळं... आता काही आपण जगत नाही. आणि मग त्या क्षणभरात आपलं मन हजारो प्रकाशवर्षांइतकं वेगानं धावून किती तरी गोष्टींचा विचार करतं. आपलं हे करायचं राहिलंय, आपलं ते राहिलंय, हे अजून पाहिलं नाही, ते अजून दिसलं नाही... किती तरी गोष्टी!
रेणू - काका, मी कल्पना करू शकते. माणसाचं मन ही फारच विलक्षण गोष्ट आहे. 'वैरी न चिंती ते मन चिंती' असं म्हटलंच आहे. पण खरं सांगू का, आपल्या जगण्याला शिस्तबद्ध जीवनशैलीची जोड दिली ना, तर पुष्कळ गोष्टी सोप्या होतात.
कुणाल - आली, आली. रेणूचं शिस्तीवरचं व्याख्यान ऐकण्याची वेळ आली. (हसतो) अहो काका, मागच्या शनिवारी हिनं आणि त्या सईनं माझी अशीच शाळा घेतली होती. त्या 'खादाडेश्वरा'तला तो पेसरट्टू डोसा काही मला नीट खाऊ दिला नव्हता या दोघींनी... भावनांचं व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन, शब्दांचं व्यवस्थापन... अहो, एका क्षणी तर मला वाटलं, की मी पुन्हा मॅनेजमेंटच्या कोर्सला अॅडमिशन घेतलीय...
रेणू - पण काही खोटं आहे का ते? तुझ्याच भल्यासाठी सांगत होतो बरं का आम्ही! 
गोंधळेकरकाका - कुणाल, ती सांगतीय ते काही खोटं नाही बरं का... अरे, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात वर्षातून किमान २०-२५ व्याख्यानं होतात. त्यातली ९० टक्के ही आपल्या जीवनशैलीत कसा बदल करावा हे सांगणारी असतात. खरं तर आम्ही जुन्या पिढीतली माणसं... उलट आम्हाला या तुमच्या एकविसाव्या शतकातल्या जीवनशैलीशीच जुळवून घेता येत नाही बघ. सारखे धावत असता तुम्ही मंडळी... पण त्रास आम्हाला होतो.
कुणाल - काका, अहो, आजच्या काळात दुसरा काही इलाज आहे का त्याला सांगा! धावलो नाही तर मागे पडू. स्पर्धाच एवढी तीव्र आहे सगळीकडं...
रेणू - ते सगळं खरंय कुणाल. पण आयुष्याला एक ठेहराव हवा, स्वल्पविराम हवा, पॉज हवा. गाण्यात या 'ठेहरावा'चं महत्त्व आहे. गायक असा एकतानतेनं गात असतो, स्वरांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतो आणि मग त्याच्या गाण्यात तो एका क्षणाचा ठेहराव येतो बघ. तिथं श्रोतेही थबकतात. त्यांना तो 'पॉज' जाणवतो. खरे रसिक असतात ते या ठेहरावालाही दाद देतात आणि गाणं पुढं सुरू राहतं. नाटकात तर हा 'पॉज' किती महत्त्वाचा असतो हे मी तुला सांगायला नकोच...
कुणाल - खरंय गं ते सगळं रेणू. पण इथं आयुष्याचंच नाटक झालंय बघ सगळं... कसले पॉज आणि कसलं काय! 
गोंधळेकरकाका - तो वर बसलाय ना, त्याच्या हातात सगळ्यांच्या दोऱ्या आहेत बरं का. तो खेळवतोय आपल्या सगळ्यांना... त्याच्या लेखी आपला पार्ट संपला, की आपली नाटकातून एक्झिट ठरलेली.
रेणू - व्वा काका! तुम्ही एवढी छान फिलॉसॉफी मांडताय, तर मग घाबरता कशाला? सरळ आल्या प्रसंगाला तोंड द्या... आणि काही होत नाही तुम्हाला इतक्यात... शंभर वर्षं जगणार आहात तुम्ही...
गोंधळेकरकाका (हसतात) - कसं आहे रेणू, फिलॉसॉफी आणि सल्ला या गोष्टी दुसऱ्याला फुकट द्यायला छान वाटतात. आपल्यावर त्याचा प्रयोग करायची वेळ आली ना, की मग खरं काय ते कळतं. 
कुणाल - मला त्या ठेहरावाची आयडिया आवडलीय रेणू. आपण खरंच आपल्या या अत्यंत व्यग्र वगैरे, पण खरं तर फालतू दिनक्रमातून वेळ काढला पाहिजे यार. ठेहराव जरूरी है... आय नीड अ पॉझ... 
रेणू - मग तू आजच काही तरी ठरव. तुला आजच्या दिवसाची एक गंमत माहितीय का? 
कुणाल - नाही. काय आहे आज?
रेणू - आज २७ ऑक्टोबर. म्हणजे हा वर्षातला तीनशेवा दिवस असतो.
गोंधळेकरकाका - काय सांगतेस? तुला या अशा गोष्टी बऱ्या माहिती असतात गं?
रेणू (हसते) - अहो, हे 'व्हॉट्सअप ग्यान' आहे काका. मी 'व्हॉट्सअप विद्यापीठा'ची पदवीधर झालीय ऑलरेडी...
कुणाल (हसतो) - हा हा हा. ते काही सांगायला नकोच. आणि या विद्यापीठात रोज सकाळी नाश्त्याला बदामाचा शिरा असतो बरं का काका...
रेणू - गप रे... किती वेळा त्या बदामांचा उद्धार! मी काय सांगतेय ते ऐक. तर २७ ऑक्टोबर हा वर्षातला तीनशेवा दिवस. आणि अर्थात लीप इयर असेल तर हा तीनशे एकावा दिवस असतो. तर मुद्दा काय, की हा एक चांगला मुहूर्त आहे ना, आपण वर्षभरात काय केलं, काय करायचं राहिलं याचा आढावा घ्यायला! बघ. तीनशे दिवस संपले आणि फक्त ६५ दिवस राहिलेयत आता २०१८ चे.
गोंधळेकरकाका - अरे वा... मला हे माहिती नव्हतं बरं का रेणू. चांगली कल्पना आहे की ही.
कुणाल - मला तरी आत्ता उरलेले ६५ दिवस फक्त झोपून, लोळून, आराम करीत, सिनेमे बघत घालवायचे आहेत गं रेणू... जमेल का हे? बघ ना, म्हणजे तूच मला मदत करू शकशील...
रेणू - ऐक जरा. ऑन ए सीरियस नोट, तू खरंच तुझी सगळी बेरीज-वजाबाकी मांड वर्षभराची. हवं तर चक्क लॅपटॉपमध्ये एक्सेल शीटमध्ये कर. आणि मग बघ. तुझं तुलाच कळेल, की तू हे तीनशे दिवस कसे घालवलेयत ते... 
कुणाल - नको नको. मला आत्ताच माहिती आहे, की मी अनेक गोष्टी करीन करीन म्हटलं आणि केलेल्याच नाहीयत. सगळं वर्ष असंच जाणार आहे.
गोंधळेकरकाका - असं आयुष्य आखून-रेखून जगता आलं असतं, तर काय पाहिजे होतं रेणू! पण तुला खरं सांगू का, आयुष्यात जी अनिश्चितता आहे ना, ती फार सुंदर गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ना, ती 'ग्लोरियस अनसर्टन्टी' की काय, ती! पुढं काय वाढून ठेवलंय हे माहिती नसतं. म्हणून तर उजाडणारा प्रत्येक दिवस कसा मस्त येतो.
रेणू - काका, हे अगदीच मान्य आहे. पण याचा अर्थ आयुष्यात आपल्याला जे काही करायचंय त्याचं नियोजन करू नये असा नाहीय. हे बघा. सुरळीत चाललेल्या आयुष्यात अनेक गोष्टी नियोजन करून पार पाडता येणाऱ्या असतात. त्यामुळं एक तर आपला वेळ वाचतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या गुणामुळं एकूणच आयुष्य ऑर्गनाइज्ड व्हायला मदत होते.
कुणाल - क्रिकेटवरून आठवलं. अरे, आज आपल्या पुण्यात मॅच आहे यार. आपली आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे दुपारी इथं. गहुंज्यात. मला जायचं होतं खरं तर... मित्र तयार होते, पण ही रेणू नको म्हणाली.
गोंधळेकरकाका - का गं? जाऊ द्यायचं की त्याला तरी...
रेणू - अहो काका, मागं एकदा आम्ही गेलेलो आहोत तिकडं. तुम्हाला खरं सांगते, आपल्या घरी सोफ्यावर निवांत बसून सामना बघणं यासारखं सुख नाही. 
कुणाल - तुला तर क्रिकेट आवडतच नाही. तू काही बोलूच नकोस. सामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यात जे थ्रिल आहे ना, ते नाही कळायचं तुला.
गोंधळेकरकाका - पूर्वी पुण्यात एवढे सामने होत नसत. आम्ही मुंबईला जाऊन कसोटी सामने पाहिले आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमला... गावसकर, विश्वनाथ, वाडेकर, सरदेसाई.... अहाहा... वेस्ट इंडिजचे ते मार्शल, होल्डिंग, गार्नर रॉबर्टस वगैरे लोक आग ओकायचे अक्षरशः आग... आणि आपला हा पठ्ठ्या - गावसकर - हेल्मेट न घालता खेळायचा. पण त्याची नजर अशी तेज, की कधीही बॉल डोक्याला लागला नाही. 
रेणू - झालं. काका रमले आता नॉस्टॅल्जियात... पण काका, खरंच तुम्हाला एवढं आवडतं क्रिकेट तर तुम्ही आता यू-ट्यूबवर सगळ्या जुन्या मॅचेस पाहू शकता. 
गोंधळेकरकाका - काय सांगतेस? मागच्या आठवड्यात आमचा रामभाऊ पण मला त्या कुठल्या तरी अॅपविषयी सांगत होता बरं का... पण आता आम्हाला हे एवढं टेक्निकल काही जमत नाही हो तुमच्या पिढीसारखं...
कुणाल - काही नाही काका. सगळं अत्यंत सोपं आहे. हे सगळे अॅप किंवा टेक्नॉलॉजी ही यूजर फ्रेंडली अशी तयार करतात. अगदी लहान मुलांनाही वापरता येईल अशी. तुम्हाला तर सहज जमेल.
रेणू - कुणाल, काकांना ते हेल्थचे अॅप पण डाउनलोड करून दे. रोज प्रकृतीचे सगळे अपडेट्स कळतील.
गोंधळेकरकाका - ते सगळं ठीक आहे. पण यंत्रानं आपल्या तब्येतीची चौकशी करण्यापेक्षा तुमच्यासारख्या जिवंत, हाडामांसाच्या माणसांनी प्रत्यक्ष घरी येऊन विचारपूस केली ना, तर ते आम्हाला जास्त आवडतं रे. आमचं आयुष्य त्यामुळं नक्कीच एक-दोन दिवसांनी वाढतं. 
कुणाल - काका, अगदी बरोबर आहे. आता मी किंवा रेणू रोज संध्याकाळी तुमच्याकडं थोडा वेळ येऊन बसत जाऊ.
गोंधळेकरकाका - आमच्या आयुष्यातल्या कॅलेंडरमधले तीनशे दिवस संपले. आता फक्त ६५ राहिले बघ. तेवढे आनंदानं, हसतमुखानं, आपला दुसऱ्याला अजिबात त्रास न होता जाऊ दे, एवढीच त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना आहे. बरं, हे मोदक घ्या. काजूचे मोदक... आज चतुर्थी आहे. म्हणून आणले.
रेणू - अहो काका, तुम्हाला बरं नाहीय ना. मग उपास वगैरे कशाला करताय?
गोंधळेकरकाका - उपास अजिबात नाही. सगळं खाऊन-पिऊन देवाची भक्ती असते आपली... दुपारी मिसळीचा बेत आहे. शिंदेकाका स्वतः पार्सल घेऊन येताहेत. तुम्हीही येता का?
रेणू - मला तर कॉलेजात जाययंच काका. अजून सुट्ट्या नाही लागल्या. त्यात दिवाळीची थोडी फार तयारी...
कुणाल - काका, मी एका पायावर तयार आहे. मला आज सुट्टीच आहे. आपण इथंच मिसळ खात, मॅच बघत दंगा करू...
गोंधळेकरकाका - वा, वा, वा... हे बेश्ट झालं बघ. ये... ये... तो गणपतीबाप्पा तुला अशीच सुबुद्धी देवो...
कुणाल (हसतो) - येतो, येतो. आयुष्यात थोडा 'ठेहराव' घ्यायलाच हवा ना... तो आज तुमच्या घरी घेतो... ठेहराव विथ मिसळ-पाव... वा, वा, वा!!!

(सगळे हसतात...) 

----