21 Nov 2017

हंपी - रिव्ह्यू

डोण्ट वरी, बी हम्पी..
------------------------

हंपी या नव्या चित्रपटाचा लूक अत्यंत फ्रेश आहे, तो आजच्या तरुणाईची गोष्ट सांगतो आणि गोष्ट सांगताना 'बिटवीन द लाइन्स' बऱ्याच गोष्टी सांगतो, हे सगळं सांगण्याऐवजी हा 'प्रकाश कुंटेचा नवा सिनेमा आहे,' एवढं सांगितलं, तरी चालेल एवढी आता या दिग्दर्शकाची शैली परिचित झाली आहे. हा त्याचा तिसराच चित्रपट. 'कॉफी आणि बरंच काही...' आणि '& जरा हट के' या त्याच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांवर मी लिहिलं आहे. त्यात हेच मुद्दे आले आहेत. त्यामुळं आता 'हंपी'विषयी वेगळं काही तरी लिहायचं तर ते काय, असा सुरुवातीला मला प्रश्न पडला. या दिग्दर्शकानं थोड्याच अवधीत स्वतःची तयार केलेली शैली म्हणून त्याचं कौतुक करावं, की आता त्यानं तातडीनं काही तरी वेगळं केलं पाहिजे, असा इशारा द्यावा?
मला तरी त्याचे हे तीन चित्रपट म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ट्रायोलॉजी वाटते. आजच्या काळाचं, आजच्या तरुणाईचं, आजच्या मराठी समाजाचं दर्शन घडवणारे त्याचे हे तीन सिनेमे आहेत, असं मला वाटतं. आपल्याला काय मांडायचं आहे त्या अवकाशाचं पुरेपूर भान असलेला हा दिग्दर्शक आहे. तिन्ही चित्रपटांत त्यानं हे दाखवून दिलं आहे. 'कॉफी' एक तरुण व एका तरुणीच्या प्रेमाविषयी बोलणारा होता, तर '& जरा हट के'मध्ये पालक आणि मुलांच्या नात्यावर भाष्य होतं. 'हंपी' त्याच्या एक पाऊल पुढं जातो आणि आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेल्या तरुणीच्या मनाची घालमेल मांडू पाहतो. आजच्या काळातलं प्रस्थापित नात्यांचं तुटलेपण आणि त्यातून सुटून नवे बंध जोडू पाहणारी आजची तरुण पिढी यांची तगमग हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो. इतर चार सिनेमांसारखी एका सरळ रेषेत चालणारी गोष्ट यात नाही. पण तरीही तो प्रथमदर्शनी आपल्याला भिडतो, याचं कारण त्यांच्या मांडणीतील वेगळेपण आणि या गोष्टीला असलेलं हंपी या ऐतिहासिक शहराचं नेपथ्य!
हंपी आपल्याला ईशा (सोनाली) या तरुणीची गोष्ट सांगतो. सिनेमाच्या सुरुवातीला एक छोटी मिनीबस रस्त्याच्या उतारावरून चढावर येताना दिसते आणि त्या चढावरून वर वर येत असलेल्या बससोबतच 'हंपी' हे सिनेमाचं शीर्षक वर वर येतं. या दृश्यापासूनच हा सिनेमा आपल्या मनाची दृश्यात्मकरीत्या पकड घेतो. हंपीचं नेपथ्य वापरण्याची कल्पना एकदम अफलातून. मराठी सिनेमात न दिसणारी दृश्यं त्यानिमित्तानं दिसली, हे एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या नायिकेची सध्याची मनःस्थिती. एके काळी नांदतं-गाजतं असलेलं हंपी आता पार विखुरलं आहे. एके काळच्या वैभवाचे आता नुसतेच अवशेष उरले आहेत. नायिकेच्या आई-वडिलांचं एके काळी बहरलेलं नातं आता असंच विखुरलं आहे. हंपीमधल्या देवळांमध्ये, वैभवशाली साम्राज्याच्या अवशेषांमध्ये नायिकाही अशीच विस्कटलेल्या स्थितीत भिरभिरते आहे. माणसाच्या नात्यांवरचा, प्रेमावरचा तिचा विश्वास पार उडाला आहे. अशा वेळी ती या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात आली आहे. 
यानंतरचा तिचा हंपीमधला प्रवास, तिला भेटलेला ग्लोबल दिल नावाचा रिक्षावाला (प्रियदर्शन जाधव) आणि कबीर (ललित प्रभाकर) या दोघांच्या मदतीनं सुरू होतो. (अंतर्वस्त्रं वाळत टाकताना नायिका आणि नायक एकमेकांना प्रथम पाहतात, हे दृश्य लक्षणीय आहे.  एकदम इनर सोल की काय म्हणतात, तसं!) यानंतर कबीर व तिची एकदम दोस्ती होते, हे सांगायला नकोच. कबीरचं एकदम हॅपी गो लकी, स्वच्छंदी असणं हेही तसं आवश्यकच. मध्यंतरात ईशाची मैत्रीण गिरीजा (प्राजक्ता माळी) येते आणि गोष्टीत एक अकारण त्रिकोण निर्माण होतो.
यानंतरचा सिनेमाचा प्रवास कसा होणार, हे वर्षानुवर्षे सिनेमे पाहणाऱ्यांना सांगावे लागू नये. तर ते जसं व्हायचं तस्संच होतं आणि सिनेमा संपतो. 
पावणेदोन तासांचा हा सिनेमा संपल्यानंतर आपल्या लक्षात काय राहतं, तर अमलेंदू चौधरीच्या अप्रतिम कॅमेरानं टिपलेली अत्यंत सुंदर अशी हंपी आणि नरेंद्र भिडे व आदित्य बेडेकर यांनी संगीत दिलेली अपने ही रंग में (राहुल देशपांडे) आणि मुरुगेरा ओ राघवा (रूपाली मोघे) ही गाणी. 
मग सिनेमाचं काय?
मला वाटतं, की हा सिनेमा सर्वांनाच भिडेल, आवडेल असं नाही. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. विजय निकम व छाया कदमचा ट्रॅक अकारण मोठा झाला आहे, असं वाटतं. विशेषतः विजय निकमचं पात्र तर अनावश्यक वाटलं. दुसरं, मैत्रिणीचं अचानक येणं आणि त्यानंतर तिनं गंमत म्हणून कबीरच्या मागं लागणं हेही उगाचच आलं आहे. ईशा आणि कबीर यांचं एकत्र येणं निश्चित असताना, शेवटी तो उगाचच गायब का केलाय, याचंही नीट उत्तर मिळत नाही. 
आदिती मोघे यांनी लिहिलेल्या पटकथेत असे अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. त्यामुळं सिनेमाचा एकसंधपणा लोप पावला आहे. मुख्य पात्रांच्या मनोव्यापारांकडं अधिक लक्ष द्यायला हवं होतं. ईशा जेवढी कळते, तेवढा कबीर कळत नाही. सिनेमात अनेकदा सतत तत्त्वज्ञान ऐकू येतं. ईशा एकदा म्हणतेही, की सगळे बोलायला लागले की एकदम तत्त्वज्ञान का ऐकवतात? खरंच! का ऐकवतात? नायिका सोनाली असल्यामुळं की काय, तिच्या नृत्यकौशल्याला वाव देणारं एक दृश्यही यात घालण्यात आलंय. अशा काही गोष्टींमुळं सिनेमा पाहताना प्रेक्षकाचं मन गुंतून पडण्याऐवजी ते विचलितच जास्त होतं. असो.
तरीही मला हा दिग्दर्शक आवडतो. त्याचा हा प्रयत्नही प्रामाणिक आहे आणि नक्की एकदा बघावा असा आहे.
सोनाली यात वेगळ्या गेटअपमध्ये आणि छान दिसलीय. तिनं कामही समजून-उमजून केलंय. ललित प्रभाकर हा धमाल अभिनेता आहे. त्यानं यात कबीरची भूमिका छान केली आहे. प्रियदर्शन जाधव रिक्षावाल्याच्या भूमिकेत मजा आणतो. या एरवी गंभीर सिनेमातला तो एक महत्त्वपूर्ण स्ट्रेसबस्टर आहे. 
 ---
दर्जा - तीन स्टार
---

6 comments:

  1. As usual apt description and because of that we look forward to see the movie!

    ReplyDelete
  2. बसबरोबर वर-वर येणारं हम्पी हे नाव मला देखील एकदम अपील झालं होतं. 'मुरूगेरा ओ राघवा' चा फ्युजन ट्रॅक तर मी गेल्या 48 तासांत 24 वेळा वगैरे तरी ऐकला असावा. एकंदरीत तुमच्या सिनेपरीक्षणामुळे व या चित्रपटामुळे आता प्रकाश कुंटेनच्या आधीच्या मूव्हीज आवर्जून पाहाव्या लागणार.

    ReplyDelete