5 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ७ ते ९

 बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा तिसरा भाग...

----


७. दहावी फ

-------------

‘फ’ची पोरं हुश्शार...

-------------------------

बालमित्रहो, या सुट्टीत तुम्ही आवर्जून पाहिलाच पाहिजे असा एक मराठी चित्रपट म्हणजे ‘दहावी फ’. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या प्रसिद्ध दिग्दर्शकद्वयीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हाही या चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळविली होती. चित्रपटाचं नाव आहे ‘दहावी फ’, त्यामुळं या नावावरूनच हा सिनेमा कशाविषयी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बरोबर... इयत्ता दहावीच्या ‘फ’ तुकडीत शिकणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. पुण्यातील एका शाळेत प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवरून सुमित्रा भावे यांना हा चित्रपट सुचला. 

या सिनेमाची गोष्ट अगदी प्रेरणादायी आहे. आपल्याकडं शाळांमधल्या तुकड्या कशा ठरतात, हे तुम्हाला माहिती आहे. ‘अ’ तुकडी ही हुशार मुलांची, ‘ब’ ही त्याहून कमी हुशार... असं करत करत ‘फ’ तुकडी म्हणजे अगदी ढ मुलांची असंच समीकरण रूढ आहे. पुण्यातल्या एका शाळेत अशाच तुकड्या असतात. या तुकडीतील मुलं गरीब घरांतील, कष्ट करून शिकणारी अशीच असतात. सहामाही परीक्षेत त्यातली तीनच मुलं सर्व विषयांत पास होतात. त्यात अ तुकडीतील एक मुलगा फ तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यावरून त्यांची मारामारी होते. या मारामारीत दोष ‘फ’च्या मुलांचाच असणार, या समजुतीने मुख्याध्यापक त्यांना दंड ठोठावतात. या अन्यायामुळं ही मुलं आणखीनच चिडतात आणि शाळेचं नुकसान करायचं ठरवतात. रात्री ही मुलं एकत्र येऊन शाळेची तोडफोड करतात. या प्रकारानंतर तर शाळेचे मुख्याध्यापक या प्रकाराची पोलिसांत तक्रार करायची, असा निर्णय घेतात आणि या मुलांना शाळेतून निलंबितही करतात.
या मुलांचे लाडके गणिताचे देशमुख सर मात्र या प्रकारामुळं अत्यंत अस्वस्थ होतात. ते या मुलांना विश्वासात घेतात. ही मुलं मुळात वाईट नाहीत; परिस्थितीमुळं ती तशी वागत आहेत याबद्दल त्यांना खात्री असते. ते या मुलांशी बोलून एक निर्णय घेतात. शाळेचं झालेलं नुकसान भरून देण्याचा निर्णय! हा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी २५ हजार रुपये उभे करायचे असतात. मुलांची आर्थिक परिस्थिती मुळीच तशी नसते. मात्र, ही मुलं काम करून, कष्ट करून हे पैसे कमावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर पुढं काय होतं, मुलांना त्यात यश येतं का आदी गोष्टी प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हव्यात.
कुणीही विद्यार्थी मुळात वाईट किंवा ढ नसतो. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला तसं घडविण्यास कारणीभूत असते. आपण चांगलं वागायचं ठरवलं, तर सगळे आपल्याला मदत करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो, असा चांगला संदेश हा सिनेमा देतो. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक पुण्यातलेच असल्यामुळं त्यांनी पुण्यातल्याच रावसाहेब पटवर्धन विद्यालयात या चित्रपटाचं सर्व चित्रिकरण केलं. या चित्रपटात अनेक हळवे, संवेदनशील प्रसंग आहेत. देशमुख सर मुलांना आपल्या कॉलेजमधली आठवण सांगतात, तो प्रसंग किंवा सिद्धार्थची आई देशमुख सरांसह बोलते तो प्रसंग असे किती तरी प्रसंग आपल्यावर ठसतात.
अतुल कुलकर्णी यांनी यातील गणेश देशमुख सरांची भूमिका केली आहे. याबरोबरच ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे आदी कलाकारांनीही यात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. वृषसेन दाभोळकर, सिद्धार्थ दफ्तरदार, निमिष काठाळे आदी मुलांनी प्रथमच या चित्रपटात काम केलं होतं. श्रीरंग उमराणी यांचं संगीत होतं.
शालेय जीवनावर आधारित असा हा चित्रपट रसिकांनीही चांगलाच उचलून धरला. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तेव्हा तुम्हीही तो नक्की पाहा.

---

दहावी फ, भारत, २००२

दिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर

प्रमुख भूमिका : अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे, वृषसेन दाभोळकर, निमिष काठाळे

----

८. हॅलो

---------

हरवण्याची व गवसण्याची गोष्ट

-------------------------------------

बालमित्रांनो, तुमची अतिशय आवडती, लाडकी अशी एखादी तरी वस्तू असेलच ना... तुमची बाहुली म्हणा, किंवा खेळणं म्हणा, क्रिकेट बॅट म्हणा किंवा रॅकेट म्हणा... समजा, तुमची ही लाडकी वस्तू हरवली तर? तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल... रडाल, ओरडाल, हात-पाय आपटाल... आपण आत्ता ज्या चित्रपटाची माहिती घेणार आहोत, त्या ‘हॅलो’ नावाच्या हिंदी चित्रपटाची नायिका पण अगदी असंच करते आहे. ही नायिका आहे साशा नावाची एक सात वर्षांची छोटी मुलगी. तिचा ‘हॅलो’ नावाचा अत्यंत गोड, लाडका कुत्रा हरवलाय आणि आता ती त्याचा शोध घ्यायला निघालीय... या शोधाचीच गोष्ट म्हणजे ‘हॅलो’ हा सिनेमा. 

प्रसिद्ध कॅमेरामन संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. संपूर्ण सिनेमा अत्यंत गमतीशीर पद्धतीनं चित्रित केला आहे. दिग्दर्शक स्वत: कॅमेरामन असल्यानं त्यानं या छायाचित्रणाच्या खूप गमती-जमती केल्या आहेत. संपूर्ण सिनेमा हा साशाच्या नजरेतून घडताना दिसतो. त्यामुळं त्या छोट्या मुलीच्या उंचीएवढा किंवा तिच्या ‘आय-लेव्हल’लाच अनेक वेळा कॅमेरा लावलेला दिसतो. लहान मुलांना अनेकदा खाली वाकून पायांमधून उलटं पाहण्याची किंवा मान तिरकी करून पाहण्याची सवय असते. तर असेच अनेक गमतीशीर अँगल या चित्रपटात सिवन यांनी वापरलेले आहेत.
साशाला आई नसते. तिच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम असतं, पण तरीही तिला आईविना खूप एकटं वाटत असतं. सुट्टीत इतर मुलं खेळत असतात, तेव्हा बिचारी साशा एकटीच घरात बसलेली असते. मग तिच्या घरातले नोकर तुला देवाकडून भेट (वलय - ज्याला इंग्रजीत Halo म्हणतात) मिळणार आहे, असं सांगतात. त्यानंतर साशाला रस्त्यावरील एक गोड, छोटा कुत्रा दिसतो. हाच आपल्याला भेटणार असलेला देवदूत आहे, अशा समजुतीतून साशा त्या कुत्र्याला जवळ घेते. ती त्याचं नावही ‘हॅलो’ असंच ठेवते. हा ‘हॅलो’ तिचा जीव की प्राण होतो. तिचे वडीलही काही म्हणत नाहीत. साशा आणि तिचा ‘हॅलो’ छान राहू लागतात. मात्र, एके दिवशी तो गायब होतो. साशाला अत्यंत दु:ख होतं. तिला काय करावं तेच समजत नाही. मग या कुत्र्याच्या शोधासाठी ती घराबाहेर पडते. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या चित्र-विचित्र लोकांसोबत तिची भेट होते. त्यात एका वृत्तपत्राचे संपादक असतात, मुंबईचे पोलिस कमिशनर असतात, गुंड-पुंड असतात आणि रस्त्यावरची वांड मुलंही असतात. या सगळ्यांना भेटून साशा आपली अडचण सांगते. कुत्र्याला शोधण्यासाठी मदत करायची विनंती करते. पण तिला वेगवेगळे अनुभव येतात. शेवटी काय होतं, तिला ‘हॅलो’ सापडतो का हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. तो शेवट पाहताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, एवढं मात्र नक्की!
साशाची भूमिका बेनाफ दादाचंदजी नावाच्या अतिशय गोड, निरागस मुलीनं केली आहे. बेनाफच्या अभिनयामुळं आपण या सिनेमात गुंतत जातो. मुलांनो, तुम्हाला प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी माहिती असतील ना? तर या संतोषींनी या सिनेमात साशाच्या बाबांची भूमिका केली आहे. आहे ना गंमत? याशिवाय मुकेश ऋषी, टिनू आनंद, विजू खोटे आदी अनेक नामवंत कलाकारांनीही यात वेगवेगळ्या, विचित्र, पण गमतीशीर वेषभूषा असलेल्या भूमिका केल्या आहेत. तेव्हा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि आपल्या मित्रांनाही पाहायला सांगा... पाहिल्यावर आम्हालाही कळवा तुम्हाला तो कसा वाटला ते!

---

हॅलो, भारत, १९९६

दिग्दर्शक : संतोष सिवन

प्रमुख भूमिका : बेनाफ दादाचंदजी, राजकुमार संतोषी, टिनू आनंद, विजू खोटे, मुकेश ऋषी

---

९. पेले : बर्थ ऑफ ए लीजंड

----------------------------------

महान फुटबॉलपटू घडताना...

-----------------------------------

बालमित्रांनो, शाळा सुरू झाल्या आणि त्याबरोबरच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धाही सुरू झाली. सध्या ही स्पर्धा रशियात सुरू आहे. अजून अभ्यासाची फारशी घाई नाही, त्यामुळं फुटबॉल स्पर्धा एंजॉय करायला हरकत नाही. होय ना! फुटबॉल हा जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, हे तुम्हाला  माहिती आहेच. आपल्या भारतातही फुटबॉलचे चाहते खूप वाढले आहेत. रात्र रात्र जागून सामने पाहणारे कित्येक फुटबॉलप्रेमी तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतील. तुम्हीही फुटबॉलप्रेमी आहात का? असाल तर तुम्हाला पेले हे नाव नक्कीच ठाऊक असेल. ब्राझीलच्या या महान खेळाडूवर दोन वर्षांपूर्वी 'पेले : बर्थ ऑफ ए लीजंड' हा इंग्रजी चित्रपट आला होता. एखाद्या खेळाडूची जडणघडण कशी होते, त्याच्यासमोर कोणत्या अडचणी असतात, त्यावर  तो कसा मात करतो, महान खेळाडू होण्याकडे एखाद्याची वाटचाल कशी सुरू होते, हे जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.

ब्राझीलमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एडसन अरांतेस दो नशिमेंतो असं नाव असलेल्या या मुलाचं रूपांतर 'पेले' नामक दंतकथेत कसं झालं, याची कहाणी हा चित्रपट सांगतो. पेलेचे वडील डॉनडिन्हो फुटबॉलपटू होते. त्यांनी पेलेचं नाव प्रख्यात अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन याच्यावरून एडिसन असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते त्याला 'एडसन' असंच म्हणू लागले. पुढं मात्र एडसनला सगळं जग 'पेले' म्हणूनच ओळखू लागलं. 'पेले' या नावाला पोर्तुगीज भाषेत तसा काहीही अर्थ नाही. लहानपणी पेलेच्या एका आवडत्या फुटबॉलपटूचं नाव बिले असं होतं. मात्र, ते नाव तो 'पेले' असं उच्चारायचा. त्यावरून एडसनलाच सगळे जण पेले असं म्हणू लागले.
जेफ झिंबालिस्ट या अमेरिकी दिग्दर्शकानं 'पेले' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे यात पेलेच्या जीवनाचा अगदी सुरुवातीचा, संघर्षाचा काळ दाखविला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंतचा पेलेचा प्रवास हा चित्रपट घडवतो. त्यासाठी दिग्दर्शकाने दोन कलाकारांची निवड केली आहे. दहा वर्षांच्या पेलेची भूमिका लिओनार्दो लिमा कार्व्होलो या मुलानं केली आहे, तर केविन डी पाऊला या कलाकारानं मोठ्या पेलेची, म्हणजे मुख्य भूमिका केली आहे.
पेले दहा वर्षांचा असताना, म्हणजे १९५० च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उरुग्वेनं ब्राझीलला अंतिम सामन्यात हरवून विश्वकरंडक पटकावला होता. अवघा ब्राझील देश व अर्थात पेलेही दु:खात बुडाला होता. या पराभवामुळेच पेलेच्या मनात कुठं तरी विश्वकरंडक देशासाठी मिळवायचाच, अशी ठिणगी पडली होती. दिग्दर्शकाच्या मते, एका अर्थानं ब्राझीलच्या राष्ट्रीयत्वाच्या दृढ भावनेचा आणि पेलेचा उदय एकाच वेळी होत होता. पेले आणि त्याचे वडील यांचं नातं या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सेऊ जॉर्ज या अभिनेत्याने पेलेच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
आपल्यासाठी या चित्रपटाचं भारतीय कनेक्शन म्हणजे या चित्रपटाला संगीत दिलं होतं ए.आर. रेहमान यांनी. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण रिओ डी जानिरोसह ब्राझीलमधील विविध ठिकाणी झालं. दिग्दर्शकानं २०१३ मध्ये चित्रिकरण सुरू केलं, तेव्हा २०१४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी तो प्रदर्शित होईल, असा अंदाज होता. मात्र, चित्रपटाचं काम रखडल्यानं तो मे २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात काही त्रुटी नक्कीच आहेत. समीक्षक व प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं संमिश्र स्वागत केलं. मात्र, एका महान फुटबॉलपटूचं लहानपण आणि तेथून त्याचा 'लीजंड' म्हणजे एक जिवंत दंतकथा होण्याकडं झालेला प्रवास अनुभवण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हवा.

---

पेले : बर्थ ऑफ ए लीजंड, अमेरिका, २०१६

दिग्दर्शक : जेफ झिंबालिस्ट

प्रमुख भूमिका : केविन डी पाऊला, लिओनार्दो लिमा कार्व्होलो, सेऊ जॉर्ज, मरियाना नन्स

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

1 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ४ ते ६

बिंगोस्कोप
-------------


स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा दुसरा भाग...

----

४. द किड

-------------

खूप काही बोलणारी मूक कहाणी

----------------------------------------

मुलांनो, चार्ली चॅप्लिनचे सिनेमे पाहायला तुम्हाला खूप आवडतात ना! तसं असेल तर तुम्ही त्यांचा 'द किड' हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल. नसेल तर आवर्जून पाहाच. विनोद आणि करुणा यांचा अनोखा संगम असलेले चित्रपट तयार करण्यासाठी चार्ली चॅप्लिन प्रसिद्ध होते. त्यांनी तयार केलेला 'द किड' हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट. तो प्रदर्शित झाला फेब्रुवारी १९२१ मध्ये. त्या काळात सिनेमा अद्याप 'बोलू' लागला नव्हता. त्यामुळे सगळे चित्रपट हे मूकपटच असत. 

आपण ज्या 'द किड' सिनेमाविषयी बोलतोय, त्यात एका अनाथ मुलाची कथा दाखविण्यात आली आहे. आपल्या चित्रपटाचा नायक म्हणजे एक गरीब, फाटका, भणंग माणूस आहे. नायकाचं हे काम स्वतः चॅप्लिन यांनीच केलं आहे, हे सांगायला नकोच. तर या नायकाला अगदी नुकतेच जन्मलेले हे छोटे बाळ दिसते. त्याची आई त्याला सोडून गेलेली असते. अशा छोट्या बाळाचं काय करायचं असा प्रश्न चार्लीला पडतो. सुरुवातीला तो दुसऱ्या एका बाईच्या ताब्यात हे मूल देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. पोलिस संशयानं पाहू लागल्यावर तो अखेर या बाळाला घेऊन घरी जातो. लहान मुलाला कसं सांभाळतात हे त्याला मुळीच माहिती नसतं. त्यामुळं त्याची चांगलीच तारांबळ उडते. पण तो मोठ्या प्रेमानं या मुलाला सांभाळतो.
चित्रपटात यानंतरचा कथाभाग तो छोटा मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर सुरू होतो. चार्लीनं या मुलाचं नाव जॉन असं ठेवलेलं असतं. अत्यंत गरिबीमुळं दोघंही कशीबशी रोजची रोजीरोटी मिळवत असतात. जॉन दगड मारून घरांच्या काचा फोडत असतो आणि नंतर चार्ली साळसूदपणे तिथं जाऊन ती काच दुरुस्त करीत असतो. दरम्यानच्या काळात जॉनची आई एक श्रीमंत गायिका झालेली असते. ती आणि जॉन एकदा एकमेकांसमोरून जातातही; पण अर्थातच एकमेकांना ओळखत नाहीत. काही काळानंतर जॉन आजारी पडतो, तेव्हा चार्लीला डॉक्टरला बोलवावं लागतं. तो डॉक्टर हा मुलगा चार्लीचा नाही, हे ओळखून पोलिसांना कळवतो. त्यानंतर अनाथाश्रमाचे दोन लोक जॉनला घेऊन जायला येतात. पण चार्ली मोठ्या हिकमतीने पाठलाग करून जॉनला परत मिळवतो. त्यानंतर मात्र अशा काही घटना घडतात, की चार्ली आणि जॉनची ताटातूट अटळ ठरते. शेवटी काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट...
चार्लीचा हा पहिलाच सिनेमा असला, तरी पुढं त्याची ओळख बनलेल्या 'आसू आणि हसू' यांच्या मिश्रणाचा हा पहिलाच सिनेमा ठरला. कमालीच्या विपरीत परिस्थितीतही चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवून आल्या स्थितीला तोंड देणारा त्याचा सर्वसामान्य, भेदरट, बावळट; पण प्रामाणिक सामान्य माणूस प्रेक्षकांना अत्यंत भावला. या चित्रपटाने १९२१ मध्ये अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाची कमाई केली. चार्ली आणि जॉनचं काम करणारा जॅकी कूगन हा छोटा मुलगा यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी चार्लीच्या स्वतःच्या आयुष्यात काही दुःखद घटना घडल्या होत्या. त्याचा प्रभाव या सिनेमावर आहे. याशिवाय चार्लीच्या बालपणीच्या काही वाईट आठवणीही या सिनेमात नकळत गुंफल्या गेल्या आहेत. चार्ली चॅप्लिन यांनी यातल्या ट्रॅम्पचं म्हणजेच भणंग, भटक्या माणसाचं व्यक्तिचित्र खूप अप्रतिम रंगवलं आहे. या सिनेमात शेवटी एक स्वप्नदृश्य आहे. त्यात माणसांना पंख असतात. हे सुंदर दृश्य चॅप्लिन यांनी ज्या पद्धतीनं चित्रित केलंय, ते मुळातूनच पाहण्यासारखं आहे. हा चित्रपट करताना त्यांनी स्वतःचं समाधान होईपर्यंत अनेकदा पुनःपुन्हा चित्रिकरण केलं. त्याचा चांगला परिणाम चित्रपट पाहताना जाणवतो.
या चित्रपटाला अनेक मान-सन्मान मिळाले. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. तो पाहायला हवाच. 

---

५. मदर इंडिया

------------------

कणखर आणि धीरोदात्त...

-------------------------------

बालमित्रांनो, मार्च महिन्याच्या आठ तारखेला दर वर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, हे तुम्हाला माहिती असेलच. स्त्रीशक्तीला वंदन करण्याचा, तिचा आदर करण्याचा, तिच्याविषयी जाणून घेण्याचा हा खास दिवस. या दिवसानिमित्त स्त्रीशक्तीची गाथा म्हणून आपल्याकडे गाजलेल्या, क्लासिक अशा 'मदर इंडिया' या हिंदी चित्रपटाची ओळख करून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल, असं वाटतं.

'मदर इंडिया' हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला आहे. तो २५ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. यात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, कन्हैयालाल आणि राजकुमार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेहबूब खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बडे दिग्दर्शक मानले जातात. त्यांनी १९४० मध्ये 'औरत' नावाचा हिंदी चित्रपट तयार केला होता. 'मदर इंडिया' हा याच चित्रपटाचा रिमेक होता. 'मदर इंडिया' हा चित्रपट म्हणजे भारतीय स्त्रीच्या कणखरपणाचे, धीरोदात्तपणाचे आणि संघर्षाचे एक उदाहरण आहे. राधा (नर्गिस) या शेतकरी महिलेची ही कहाणी आहे. भारतात त्या काळात जवळपास ८० टक्के लोकांची उपजीविका शेतीवर चालत होती. मात्र, दुष्काळ आणि सावकारी या दोन संकटांना तोंड देताना शेतकरी हतबल होत असे. या परिस्थितीत आजही फारसा फरक पडलेला नाही. राधाच्या कुटुंबावर असंच एका सावकाराचं कर्ज असतं. त्यात अपघातात अपंग झालेला तिचा पती एक दिवस घर सोडून परागंदा होतो. मात्र, राधा हिंमत न हरता, स्वतःच्या मुलांना लहानाचे मोठे करते, शेती सांभाळते, दुष्काळाला तोंड देते आणि सावकाराच्या दुष्टपणाशीही दोन हात करते. मुलं मोठी होतात. राधा पारंपरिक भारतीय नीतिमूल्यांचा आदर करणारी स्त्री असते. पुढे असे काही प्रसंग घडतात, की तिला तिच्या स्वतःच्या मुलाबरोबरही संघर्ष करावा लागतो. मात्र, नीतिमूल्यांसाठी ती स्वतःच्या मुलालाही गोळी घालायला मागे पाहत नाही.
त्या काळात 'मदर इंडिया'ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठविलेला गेलेला पहिला चित्रपट होय. त्याला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकनही मिळालं. मात्र, पुरस्कार अवघ्या एका मताने हुकला. असं असलं, तरी आजतागायत या सिनेमाची लोकप्रियता कमी झालेली नाही. नर्गिस या अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम भूमिका मानता येईल. तिच्यावर तर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. याच चित्रपटाच्या सेटवर आग लागली असताना, सुनील दत्त यांनी नर्गिसचे प्राण वाचविले. त्यानंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडली व नंतर त्या दोघांचा विवाह झाला.
हा चित्रपट १७२ मिनिटांचा आहे, म्हणजे जवळपास तीन तासांचा. यात राधाचा संपूर्ण जीवनप्रवास चित्रित करण्यात आला आहे. त्या काळात सर्वच चित्रपटांमध्ये संगीत महत्त्वाचे असे. 'मदर इंडिया'ला प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटात एकूण १२ गाणी असून, सगळीच प्रचंड लोकप्रिय झाली. 'गाडीवाले', 'दुनिया में हम आए है तो जीना ही पडेगा', 'नगरी नगरी द्वारे द्वारे', 'दुखभरे दिन बीते रे भय्या' आदी गाणी अगदी आजही लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर, महंमद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम आदी दिग्गज गायकांनी ही गाणी गायिली आहेत.
प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने लोकप्रियतेेचे अनेक उच्चांक मोडले. तेव्हाचा हा एक खर्चीक सिनेमा मानला जात होता. मात्र, आजही तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान टिकवून आहे. भारतीय सिनेमा समजून घ्यायचा असेल, तर 'मदर इंडिया' पाहण्याशिवाय पर्याय नाही. हा सिनेमा पाहताना भारतीय समाजमनाचे, इथल्या स्त्रीचे, तिच्या संघर्षाचे स्तिमित करणारे दर्शन दिग्दर्शक आपल्याला घडवतो आणि आपण केवळ थक्क होऊन जातो. हा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीच्या शक्तीला सलाम करण्यासाठी 'मदर इंडिया' नक्की पाहा.

---

६. चिल्ड्रन ऑफ हेवन
---------------------------

निरागस बालपणाची हळवी गोष्ट
--------------------------------------

बालमित्रांनो, लवकरच तुमच्या परीक्षा संपतील आणि तुम्हाला सुट्ट्या लागतील. सुट्टीमध्ये तुम्ही 'बिंगोकिड्स'च्या पहिल्या अंकापासून आत्तापर्यंत 'बिंगोस्कोप'मध्ये माहिती दिलेले सर्व सिनेमे एकेक करून नक्की पाहा. त्यातही 'चिल्ड्रन ऑफ हेवन' हा सिनेमा जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल, तर आधी पाहा. 
प्रख्यात इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी १९९७ मध्ये तयार केलेला हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वाचं खूप प्रभावीपणे दर्शन घडवतो. हा सिनेमा पाहताना आपल्याला कळतं, की जगात अनेक देश असले, भाषा वेगळ्या असल्या, वर्ण किंवा वंश भिन्न असले, जाति-धर्म निराळे असले, तरी माणूस म्हणून सगळ्यांची भावना एकसारखीच असते. त्यातही लहान मुलांचं जग तर सगळीकडं समानच असतं. आपलं कुटुंब, आपले आई-बाबा, आपली भावंडं यांच्याविषयीचं प्रेम सगळ्या जगात 'सेम टु सेम' असतं. 
हा सिनेमा जगभर गाजला. गेल्या वीस वर्षांपासून तो जगभरातील अनेक महोत्सवांत दाखविला गेला आहे. या चित्रपटाला १९९८ च्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परभाषा चित्रपट विभागात नामांकन मिळालं होतं. 
या सिनेमाची कथा अगदी साधी आहे. किंबहुना अगदी साधी कथा, रोजच्या जगण्यातलं वास्तव साधेपणानं मांडणं हे इराणी चित्रपटांचं वैशिष्ट्यच आहे. अली आणि झायरा या बहीण-भावांची ही गोष्ट आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरान या भल्यामोठ्या शहराच्या दक्षिण भागात अलीचं कुटुंब राहत असतं. परिस्थिती गरिबीची असते. वडील मोलमजुरी करीत असतात. आई आजारी असते. घराचं भाडं पाच महिन्यांपासून थकलेलं असतं. किराणाची उधारी राहिलेली असते. अशा परिस्थितीत अली आपल्या बहिणीचे फाटके गुलाबी बूट दुरुस्त करून घरी जाताना आपल्याला दिसतो. तो एका ठिकाणी बटाटे घेत असताना एक माणूस ते बूट उचलून रद्दीच्या पिशवीत टाकतो. बहिणीचे बूट गेल्यानं अलीला अतिशय वाईट वाटतं. तो त्याच्या आई-वडिलांना हे सांगू शकत नसतो. वडील आधीच वैतागलेले असतात. आई आजारी असते. त्यामुळं तो बहिणीला बूट गेल्याचं सांगतो. नवे बूट आणण्याची ऐपत नसते आणि शाळेत तर बूट घातल्याशिवाय जाणं शक्यच नसतं. अखेर झायरा एक तोडगा काढते. तिची सकाळची शाळा झाल्यावर ती तिचे बूट अलीला देईल आणि अली तेच बूट घालून त्याच्या शाळेत जाईल, अशी योजना ठरते. अली शाळेत हुशार असतो, पण या धावपळीत त्याला उशीर होऊ लागतो. एकदा तर मुख्याध्यापक त्याला वडिलांना घेऊन यायला सांगतात, पण शिक्षकांनी रदबदली केल्यामुळं अली वाचतो. तिकडं झायराला तिचे बूट रोया नावाच्या एका मुलीच्या पायात दिसतात. तिला आश्चर्य वाटतं. ती शाळा संपल्यावर हळूच तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत जाते. तिचे वडील कचरा उचलणारे व अंध असतात हे तिच्या लक्षात येतं.
नंतर अलीला शाळेत एक स्पर्धा जाहीर झाल्याचं समजतं. त्या धावण्याच्या शर्यतीत तिसरं बक्षीस बुटांच्या जोडीचं असतं. या स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर मिळवायचा असं अली ठरवतो. पुढं काय होतं, ते तुम्ही या सिनेमातच पाहा.
हा सिनेमा पाहताना दिग्दर्शक माजिदी यांच्या दृष्टिकोनाचं आपल्याला कौतुक वाटतं. त्यांनी हा सिनेमा त्या दोन लहान मुलांच्या नजरेतूनच आपल्याला दाखवला आहे. आपल्याला आपलं बालपण आठवतं. अनेकदा डोळ्यांत पाणी येतं आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. 
आमीर फारोख हाशेमियाँ याने अलीची, तर बहार सिद्दिकीनं झायराची भूमिका खूप छान केली आहे. प्रसिद्ध इराणी अभिनेते रेजा नाझी यांनी त्यांच्या वडिलांचे काम केले आहे.
या चित्रपटातील या दोन मुलांची अनेक दृश्यं हेलावून टाकणारी आहेत. माजिदी यांनी तेहरान शहरातच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण केलं आहे. चित्रीकरण वास्तववादी व्हावं, यासाठी अनेकदा ते ऐन गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांत चित्रीकरण करीत असत. 
या चित्रपटाने इराणी चित्रपटांना जागतिक नावलौकिक मिळवून दिला. या चित्रपटाच्या रूपानं प्रथमच इराणी चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. तिथं त्याला पुरस्कार मिळू शकला नसला, तरी जगभराच्या अनेक महोत्सवांतून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
असा हा चित्रपट तुम्ही येत्या सुट्टीत आपल्या मित्र-मैत्रिणींसह नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---


---

28 Nov 2020

बिंगोस्कोप - भाग १ ते ३

बिंगोस्कोप
-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे.

----

बालमित्र हो, आपल्याला सिनेमा पाहायला आवडतं. तंत्रज्ञानावर आधारित या कलेनं विसाव्या शतकात क्रांती घडवून आणली. आपल्या 'बिंगोस्कोप' या सदरातून आपण जगभरातील काही निवडक, नामवंत सिनेमांची ओळख करून घेणार आहोत. हे सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर उत्तमच; पण पाहिले नसतील तर आवर्जून पाहावेत यासाठीच हा खटाटोप...

------

१. बायसिकल थिव्ह्ज

-------------------------

'चोरी'ची अजरामर गोष्ट....

---------------------------------

इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी'सिका यांचा 'बायसिकल थिव्ह्ज' (अमेरिकेत हा चित्रपट 'द बायसिकल थिफ' म्हणून ओळखला जातो.. पण मूळ इटालियन शीर्षकात 'चोर' हा शब्द अनेकवचनी आहे...) हा सिनेमा जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक गणला जातो. हा चित्रपट १९४८ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजतागायत तो जगभरातील चित्रकर्मींना प्रेरणा देत आला आहे. इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या सिनेमाची कथा घडते. कथानक अगदी साधे आहे. मात्र, माणसातल्या आदिम जीवनप्रेरणेचे आणि मूल्यांचे उत्तुंग दर्शन हा सिनेमा घडवीत असल्याने त्याची अभिजात कलाकृतींमध्ये नोंद होते. 

इटलीची राजधानी असलेल्या रोम शहराच्या जवळच्या वस्तीत या सिनेमाची गोष्ट आकारास येते. काळ आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम संपूर्ण युरोपावर झाले. अशा या अस्थिर, अस्वस्थ काळात हा सिनेमा आकारास येतो. या चित्रपटाचा नायक अंतानिओ (लँबार्तो मॅग्गिओरानी) हा एक गरीब, बेरोजगार गृहस्थ आहे. पत्नी मारिया (लिआनेला कॅरेल), सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एंझो स्टैओला) आणि आणखी एक छोटं बाळ असं त्याचं कुटुंब आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो काम शोधतो आहे. अखेर अंतानिओला तेथील सरकारी रोजगार केंद्रातून एक काम मिळते. हे काम असते भिंतींवर पोस्टर चिकटविण्याचे. फक्त एकच अडचण असते. ज्या व्यक्तीकडे सायकल असेल, त्यालाच हे काम मिळणार असते. अंतानिओ आपल्या पत्नीच्या कानावर ही गोष्ट घालतो. अंतानिओची सायकल गहाण ठेवलेली असते. मग त्याची पत्नी घरातल्या चादरींचा ढीग घेऊन जाते आणि त्या विकून पतीची सायकल सोडवून आणते. अंतानिओ पत्नी व मुलासह ही सायकल घेऊन आनंदात घरी येतो. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन तो कामावर निघतो. मात्र, एका शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असताना एक चोर त्याची सायकल घेऊन पळून जातो. अंतानिओ जीव खाऊन त्याचा पाठलाग करतो, पण चोर सापडत नाही. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा... अंतानिओ आणि ब्रुनो दोघेही सायकलच्या शोधात सगळं शहर पालथं घालतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं त्यांना भेटणारी माणसं, इटलीमधलं तेव्हाचं सामाजिक वातावरण, गरिबी, आर्थिक विषमता यांचं एक विषण्ण करणारं दर्शन आपल्याला होतं. चित्रपटाचा शेवटही खूप चटका लावणारा आहे. तो शेवट तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच पाहावा, असं मी सुचवीन.
हा सिनेमा निघाला त्याला आता जवळपास ७० वर्षं होतील. मात्र, आजही तो पाहावासा वाटतो किंवा भावतो याचं कारण कुटुंबसंस्था, नातेसंबंध, प्रेम आणि त्यासंबंधीचे माणसाचे विचार आजही तसेच आहेत. यातला नायक गरीब आहे, पण तो आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्या मार्गात त्याला येणारे अडथळे आणि अपेक्षाभंग आपल्याला पाहवत नाहीत. याचं कारण आपल्याही आयुष्यात आपण अनेकदा अशा परिस्थितीला तोंड देत असतो. एखाद्या साध्या गोष्टीत असा वैश्विक विचार असेल, तर ती गोष्ट जगातल्या प्रत्येक माणसाला भावते. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डी'सिका यांच्या या सिनेमात कमालीचा साधेपणा आणि सच्चेपणा आहे. हा सिनेमा आपल्याला भिडतो, त्यामागं त्याची ही हाताळणी आहे.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे डी'सिका यांनी प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत तेव्हाचे कुठलेही नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री घेतले नाहीत. प्रमुख भूमिका करणारे लँबार्तो मॅग्गिओरानी या सिनेमात काम करण्यापूर्वी एका कारखान्यात साधे कामगार होते. (गंमत म्हणजे या सिनेमात काम केल्यामुळं त्यांच्या मालकानं त्यांना पुन्हा कामावर घेतलं नाही. मग त्यांना अभिनय क्षेत्रच निवडावं लागलं.) मारियाचं काम करणारी लिआनेला कॅरेल हीदेखील एक सामान्य स्त्री होती. तिनं यापूर्वी कधीही कॅमेराला तोंड दिलं नव्हतं. तीच गोष्ट लहानग्या ब्रुनोचं काम करणाऱ्या एंझो या मुलाची. त्यानं तर या भूमिकेत कमाल केली आहे. त्याच्या डोळ्यांतले भाव (आणि विशेषतः शेवटचं दृश्य) काळजात घर करून जातात.
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर इटलीत त्यावर टीका झाली. इटलीतील जीवनाचे नकारात्मक चित्र त्यात रंगविले आहे, असे तेथील लोकांना वाटले. मात्र, जगभरात या सिनेमाचे खूप चांगले स्वागत झाले आणि आज तो सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो, यातच त्याचं यश आहे.

---

२. श्यामची आई

---------------------

मातृप्रेमाची महन्मंगल गाथा...

-----------------------------------

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या पुस्तकावरून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ मध्ये याच शीर्षकाचा मराठी चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ देण्यास १९५४ मध्ये सुरुवात झाली, तेव्हा हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकणारा चित्रपट म्हणजे 'श्यामची आई'.

सानेगुरुजी यांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात असताना कैद्यांना आपली गोष्ट सांगितली. नंतर त्यांनी पाच दिवसांत ही संपूर्ण गोष्ट लिहून पूर्ण केली. त्यातून 'श्यामची आई' हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकात ४२ प्रकरणे असून, पहिली रात्र, दुसरी रात्र अशा शीर्षकांनी यातील गोष्टी येतात. ही स्वतः सानेगुरुजींचीच गोष्ट असून, पुस्तकातील श्याम म्हणजे स्वतः सानेगुरुजीच होत. सानेगुरुजींनी त्यांच्या आईची कथा यात अत्यंत हळव्या, प्रेमळ मनाने सांगितली आहे. आई आणि मुलाचे नाते त्यांनी फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आचार्य अत्रे यांच्यावर सानेगुरुजींचा प्रभाव होता. सानेगुरुजींच्या निधनानंतर त्यांचे हे अजरामर लेखन सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचा निर्धार अत्रे यांनी केला. ते झपाट्याने कामाला लागले. दोन वर्षांत त्यांनी हा सिनेमा पूर्ण केला आणि मार्च १९५३ मध्ये हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा सिनेमाही लोकांना अतिशय आवडला. अभिनेत्री वनमाला यांनी श्यामच्या आईचे - यशोदाचे काम केले होते. माधव वझे या मुलाने श्यामचे, तर शंकर कुलकर्णी यांनी श्यामच्या वडिलांचे, म्हणजे सदूभाऊंचे काम केले होते. बाबूराव पेंढारकर, सुमती गुप्ते, दामुअण्णा जोशी, बापूराव माने या तेव्हाच्या लोकप्रिय कलाकारांनीही यात भूमिका केल्या होत्या. प्रख्यात गीतकार प्रा. वसंत बापट यांनी या सिनेमातील बारक्याची भूमिका केली होती, तर दुर्वांची आजी ही गाजलेली भूमिका सौ. सरस्वती बोडस यांनी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनीही या सिनेमात पुराणिकबुवांची एक छोटीशी भूमिका केली आहे.
या चित्रपटाला त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. यातील 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण' हे आशा भोसले यांनी गायिलेले गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी तेव्हा, त्यांच्या कुमारवयात गायिलेले यातील 'छडी लागे छमछम' हे गाणेही अत्यंत गाजले.
यातील एका दृश्यात श्याम अंघोळ झाल्यानंतर पायाला घाण लागेल, म्हणून जमिनीवर पाय ठेवायला तयार नसतो, असं दृश्य आहे. तेव्हा श्यामची आई त्याला म्हणते, 'श्याम, पायाला घाण लागू नये, म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो...' हे आणि यासारखे चित्रपटातील अनेक संवाद आजही लोकांना मुखोद्गत आहेत.
'श्यामची आई' हे पुस्तक कधीही वाचले नाही, असे एकही मराठी घर नसेल. त्याचप्रमाणे 'श्यामची आई' हा चित्रपटानेही अनेक पिढ्यांवर गारूड केले आहे. या चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका करणारे माधव वझे आज प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'महाराष्ट्रीय कलोपासक' या संस्थेने त्यांना अभिनयाचे शिक्षण दिले होते. सिनेमाच्या नामावलीत तसा उल्लेख करण्यात आला आहे. या सिनेमाची सुरुवात होते तेव्हा सानेगुरुजींचा पुतळा दिसतो आणि मागे गाय-वासरांचे हंबरणे ऐकू येते. या सूचक दृश्यापासून सिनेमा जो पकड घेतो, तो शेवटर्यंत... अत्यंत भावनात्मक असा हा सिनेमा पाहताना अनेक माणसे अक्षरशः घळघळा रडतात, असा अनुभव आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे, असा हा महत्त्वाचा चित्रपट आहे.

----

३. बूट-पॉलिश

-----------------

मुठ्ठी में है तकदीर हमारी...

-----------------------------------

भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशात गरीब जनतेचं प्रमाण खूप होतं. अनेक लोकांना काम नसे. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असे. काही लोकांना नाइलाज म्हणून भीक मागून पोट भरावं लागे. अशाही स्थितीत स्वाभिमान बाळगून कष्टानं आपली रोजीरोटी कमावण्याचं त्यांचं स्वप्न असे. 'बूट-पॉलिश' या १९५४ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटात अत्यंत विपरीत परिस्थितीत सापडलेल्या दोन लहान मुलांची हृदयद्रावक, पण तितकीच प्रेरणादायक कथा सांगण्यात आली आहे.

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांनी आपल्या आरके स्टुडिओद्वारे या सिनेमाची निर्मिती केली, तर प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शन केलं आहे.
बेलू आणि भोला या दोन अनाथ मुलांची ही करुण कहाणी आहे. बेलूचं काम बेबी नाझ हिनं, तर भोलाचं काम रतनकुमार या बालकलाकारानं केलं आहे. या चित्रपटात या दोन मुलांची एक दुष्ट काकू आणि शेजारचे एक अपंग, पण प्रेमळ असे जॉनचाचा अशी आणखी दोन महत्त्वाची पात्रे आहेत. जॉनचाचांचे काम हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते डेव्हिड यांनी केलं आहे.
आई मरण पावल्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता बेलू आणि भोलाला त्याच्या काकूकडं आणून सोडतो. मात्र, ही काकू दुष्ट असते. ती या मुलांना छळते आणि भीक मागायला लावते. जॉनचाचांचं पहिल्यापासून या मुलांशी मेतकूट जमलेलं असतं. ते या मुलांना स्वाभिमानाचे धडे देतात आणि भीक न मागण्याबद्दल सांगतात. भोला मोठा असल्यानं त्याला ते पटतं. बेलूही त्याला साथ देते. दोघंही पैसे वाचवून बूट-पॉलिशचं सामान विकत घेतात आणि भोला रेल्वे स्टेशनांवर लोकांचे बूट पॉलिश करून देऊ लागतो. काकूला हे समजताच ती दोघांना मारहाण करते आणि घराबाहेर हाकलून देते. दरम्यान, जॉनचाचांनाही दारू विकत असल्याबद्दल पोलिस अटक करतात. जॉनचाचांचा आसरा गेल्यामुळं मुलं रस्त्यावर येतात. दरम्यान पावसाळा सुरू होतो आणि भोलाला बूट पॉलिशचं काम मिळेनासं होतं. दोघांनाही प्रचंड भूक लागते, तेव्हा एक जण भोलाला भिकारी समजून एक नाणं फेकतो. बेलू ते नाणं घेते, तेव्हा भोला तिला मारतो आणि भीक न मागण्याबद्दल खडसावतो. रेल्वे स्टेशनवर काही तरी काम करून भोला पैसे मिळवतो आणि बेलूसाठी खायला आणतो, तेव्हाच पोलिस येतात आणि पळापळीत बेलू आणि भोलाची ताटातूट होते. बेलू एका रेल्वेगाडीत चढते. तिथं एक दाम्पत्याच्या नजरेस ती पडते. त्यांना मूल-बाळ नसल्यानं ते बेलूला दत्तक घेतात. इकडं भोलाला अटक होते. सुटल्यानंतर भोला बेलूला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती सापडत नाही. तिकडं बेलूलाही रोज भोलाची आठवण येत असते. त्यानंतर काय होतं, हे बहीण-भाऊ एकमेकांना भेटतात का, जॉनचाचांचं काय होतं, हे प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हवं.
या चित्रपटात दोन्ही बालकलाकारांची कामं महत्त्वाची आहेत. मुलीच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी मुंबईतील १२ शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर बेबी नाझला हे काम मिळालं. रतनकुमार यानंही भोलाचं काम खूपच सुंदर केलं आहे. या चित्रपटाला तेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर डेव्हिड यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चित्रपटाला शंकर-जयकिशन यांचं संगीत असून, यातील आठही गाणी श्रवणीय आहेत. पण तरी यातलं आशा भोसले व महंमद रफी यांनी गायिलेलं 'नन्हे-मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है, मुठ्ठी में है तकदीर हमारी' हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
गरिबी असली, तरी स्वाभिमानानं जगायला शिकवणारा हा प्रेरणादायक सिनेमा प्रत्येक मुलानं पाहायलाच हवा.

---

(क्रमश:)

-----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

18 Nov 2020

द क्राउन - चौथा सीझन

तिघींचे तीन ऋतू
-------------------


‘द क्राउन’ ही ‘नेटफ्लिक्स’वरची सर्वांत महाग, भव्य अशी निर्मिती असलेली वेबसीरीज मी पहिल्या सीझनपासून पाहतो आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जीवनप्रवासावर ही मालिका आधारित आहे. चार दिवसांपूर्वी या मालिकेचा चौथा सीझन आला. राणीच्या राज्यरोहणाचा थोडा आधीचा काळ इथपासून ते १९७९ या वर्षापर्यंत तीन सीझनमध्ये या वेबसीरीजचा प्रवास झाला होता. विन्स्टन चर्चिलपासून हॅरॉल्ड विल्सनपर्यंत सर्व पंतप्रधान यात येऊन जातात. या चौथ्या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे यात ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि प्रिन्सेस डायना यांची एंट्री आहे. थोडक्यात, हा संपूर्ण सीझन या शक्तिशाली, जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि वादग्रस्त अशा तीन महिलांचा आहे. त्यामुळंच हा संपूर्ण सीझन अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा असा झाला आहे. एकूणच ही सर्व सीरीज उत्तम आहेच; त्यातही हा चौथा ऋतू विशेष प्रेक्षणीय ठरला आहे, यात वाद नाही. 

जगभरात सत्ता गाजविणारी घराणी आणि त्या घराण्यांचे अंतर्गत ताणतणाव किंवा वादविवाद हे विषय कायमच सर्वांना आकर्षून घेणारे असतात. त्यात सत्ता गाजवणारी जर बाई असेल, तर विशेषच! ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ सुमारे १९५२ पासून राजगादीवर विराजमान आहेत. म्हणजेच आज सुमारे ६८ वर्षं त्या ब्रिटनच्या महाराणी आहेत. सध्या त्यांचं वय ९३ आहे आणि अजूनही त्या उत्तम हिंडत्या-फिरत्या तब्येतीच्या आहेत. अशा या राणीचं आयुष्य म्हणजे खंडकाव्याचा, महाकादंबरीचाच विषय! नुसत्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना एकासमोर एक ठेवायच्या झाल्या, तरी केवढा मोठा पट तयार होईल. एलिझाबेथ यांनी राणीपदाचा मुकुट मस्तकी धारण केला, तेव्हा भारतात पं. नेहरू पंतप्रधान होते. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी पाच वर्षं झाली होती आणि जगभर ब्रिटिश साम्राज्याचा डंका अद्याप जोरात वाजतच होता. एवढी एक गोष्ट लक्षात घेतली तरी या राणीनं केवढा मोठा काळ त्या पदावर राहून बघितला आहे, हे लक्षात येतं. ब्रिटनमध्ये राणीचं पद हे जरी नामधारी असलं, तरी मान मोठा आहे. काही घटनादत्त जबाबदाऱ्या आहेत. एलिझाबेथ यांनी सुरुवातीपासून काही एका निष्ठेने, जबाबदारीने हे पद निभावले आहे. ‘क्राउन’च्या पहिल्या तिन्ही सीझनमधून हा सर्व काळाचा प्रवास अगदी चित्रमयरीत्या आपल्यासमोर येतो. या मालिकेची भव्य निर्मिती, तपशिलातली अचूकता टिपण्यासाठी केलेला अभ्यास, वेषभूषा, रंगभूषा, कलादिग्दर्शन आणि दिग्दर्शन हे सर्वच अव्वल दर्जाचं आहे.
या राजघराण्याविषयी जगभरात, विशेषत: ब्रिटनमध्ये जनसामान्यांत प्रचंड कुतूहल आहे, कौतुकही आहे, रागही आहे. प्रेम आहे, तसंच द्वेषही आहे. ब्रिटिश माध्यमे तर हात धुऊन या घराण्याच्या मागे लागलेली असतात. तिथली टॅब्लाइड वृत्तपत्रं आणि त्यांचे छायाचित्रकार यांचा ससेमिरा कायमच राजघराण्यातल्या व्यक्तींच्या मागे लागलेला असतो. अशा परिस्थितीत १९७९ मध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधानपदी आल्या आणि त्याच सुमारास प्रिन्स चार्ल्सच्या आयुष्यात डायना आली. इथून पुढचा ११ वर्षांचा काळ या तिन्ही महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा, धगधगता कालखंड होता. ‘क्राउन’चा चौथा ऋतू आपल्याला हाच काळ तपशिलात दाखवतो. माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सांगतो आणि या तिघींच्याही आयुष्याचा परस्परांवर कसा परिणाम झाला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं एखाद्या रंजक कादंबरीप्रमाणे हा सीझन रंगला आहे. राणी आणि थॅचरबाई यांच्यातील कथित वादात बळीचा बकरा बनवण्यात आलेले राणीचे प्रेस सेक्रेटरी मायकेल शिया एक उत्कंठावर्धक कादंबरी टाइप करून संपवतात, असं एक सूचक दृश्य या सीझनमध्ये आहे, ते पुरेसं बोलकं आहे.

मार्गारेट थॅचर सत्तेवर आल्या आणि अल्पावधीतच त्यांनी ब्रिटनला ‘पूर्वीच्या वैभवाकडे’ नेण्यासाठी आर्थिक सुधारणांची जोरदार मोहीम सुरू केली. जुने कामगार कायदे रद्दबातल केले. सरकारी खर्चांना कात्री लावण्याचा मोठा आग्रह धरला. यातून त्यांच्याविरुद्ध काही क्षेत्रांतून नाराजीही तयार होत होती. ‘मॅगी’ एकाच वेळी अत्यंत लोकप्रियही होती आणि ‘मार्गारेट थॅचर मिल्क स्नॅचर’ अशा घोषणाही त्यांच्याविरुद्ध दिल्या जात होत्या. राणी एलिझाबेथ आणि थॅचर एकाच वयाच्या. त्यातही थॅचर सहा महिन्यांनी मोठ्या! थॅचर एकदा राणीशी बोलताना फार सूचकपणे याचा उल्लेख करतात. किंबहुना राणी आणि थॅचर यांचे ‘पर्सनल ऑडियन्स’चे (एकांतातील भेट) सर्वच प्रसंग अतिशय बहारदार झाले आहेत. दोघींचे स्वभावविशेष त्यात विशेष खुलले आहेत. आता यात दिग्दर्शकाने उघडच ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलेली दिसते. मात्र, प्रसंग रंगविण्यासाठी हे धारदार संवाद फार उपयुक्त ठरले आहेत. राणीसमोर येताच पाय किंचित वाकून ‘युअर मॅजेस्टी’ म्हणणं आणि नंतर त्याच राणीला आपल्या खास शैलीत, पण राणीचा सन्मान राखून ‘सुनावणं’ ही कसरत थॅचरबाईंनी कशी साधली असेल, याचा प्रत्यय या सर्व दृश्यांत येतो. ऑलिव्हिया कोलमन (राणी एलिझाबेथ) आणि गिलियन अँडरसन (थॅचर) या दोन्ही अभिनेत्रींना या सर्व प्रसंगांसाठी दाद द्यावीशी वाटते. अल्पावधीतच फॉकलंड बेटांचं युद्ध होतं आणि अर्जेंटिनाविरुद्धचं हे युद्ध थॅचर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटन जिंकतं. या घटनेनंतर थॅचर यांच्या लोकप्रियतेत अमाप वाढ होते. एका रशियन पत्रकाराकडून त्यांना ‘आयर्न लेडी’ अशी उपाधी मिळते. 

या सर्व घटनाक्रमाला समांतर अशी एक घडामोड प्रिन्स चार्ल्स याच्या जीवनात घडत असते. त्याच्या आयुष्यात ‘डायना’ नावाचं वादळ येतं. कॅमिला पार्कर बोल्सच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या चार्ल्सला अल्लड, टीनएज अशा डायनाचं सौंदर्य मोहित करतं. त्यांचं एकमेकांत गुंतणं आणि प्रेमात पडणं हे एवढ्या वेगात होतं, की रा णीला हे समजल्यानंतर त्यांच्या विवाहाचाच घाट घातला जातो. चार्ल्स आणि डायना एकमेकांना नीट ओळखण्यापूर्वीच विवाहबंधनात अडकतातही. या घाईघाईत केलेल्या विवाहातच पुढील स्फोटक घटनाक्रमांची बीजं दडलेली असतात. डायनाची भूमिका करणारी अभिनेत्री इमा कोरिन प्रथमदर्शनी अगदी डायनासारखी वाटली नाही. मात्र, तिचा मेकअप आणि वेषभूषा एवढी तंतोतंत आहे, की नंतर ती ‘डायना’ आहे, याबाबत आपण कन्व्हिन्स होतोच! 
मार्गारेट थॅचर यांच्या सत्ताकाळात सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाचा फटका थेट राणीला कसा बसतो, हे सांगणारा ‘फेगन’ नावाचा एक स्वतंत्र भागच यात आहे. यात फेगन नावाचा एक नोकरी गेलेला सामान्य ब्रिटिश माणूस थेट बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणीच्या शयनकक्षातच घुसखोरी करतो. एकदा नव्हे तर दोनदा! याशिवाय थॅचर यांचा मुलगा मार्क थॅचर कार रेसमध्ये भाग घेण्यासाठी गेला असताना अल्जिरियाच्या जवळ ‘हरवतो’ (व नंतर सापडतो) आणि नंतर काही वर्षांनी प्रिन्स चार्ल्स एका हिमप्रपातातून वाचतो या दोन्ही घटना बारकाईनं दाखवण्यात आल्या आहेत. या दोन्ही महिलांमधील ‘आई’ या वेळी तीव्रतेनं दिसते. थॅचरबाई आपल्या कॅबिनेटमधील निवडक मंत्र्यांना घरी जेवायला बोलावतात आणि स्वत: स्वयंपाक करून त्यांना व नवऱ्याला-मुलांना जेवायला वाढतात. पुढं चार्ल्स डायना यांच्यातली दरी विकोपाला जाते, तेव्हा चार्ल्सला त्याच्या चुकांबद्दल खडे बोल सुनावणारी राणीमधली ‘आई’च लखलखीतपणे दिसते. थॅचर यांच्याबरोबर वाद असले, तरी शेवटी त्या राजीनामा द्यायला येतात, तेव्हा त्यांना ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान स्वत:च्या हाताने त्यांच्या कोटवर लावणाऱ्या राणीची एक हळवी, संवेदनशील बाजूही दिसते. 

डायनाचं यातलं व्यक्तिचित्र तर अनेक अर्थांनी बघण्यासारखं आहे. राजघराण्यात लग्न झाल्यानंतरच्या भागाचं नावच ‘फेअरी टेल’ असं आहे. डायना आणि चार्ल्सचं लग्न ही जगातल्या अनेकांसाठी एक परिकथाच होती. तेव्हा आताएवढा मीडिया सर्वव्यापी नव्हता, तरी सर्व जगात त्यांचा शाही विवाह सोहळा चर्चिला गेला होता. त्यानंतरचे काही दिवस डायनासाठी खरोखर स्वप्नवत होते. मात्र, नंतर राजघराण्यातल्या रीतीरिवाजांच्या, रुढी-परंपरांच्या चौकटी तिला बेड्यांसारख्या जाचू लागल्या. कुणासमोर कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठं उभं राहायचं, कुठले शब्द उच्चारायचे, कुणाला कसा मान द्यायचा (आणि कुणाला द्यायचा नाही हेही), कुठल्या प्रसंगी कुठले कपडे घालायचे, कुठली पादत्राणे घालायची याचं एक ट्रेनिंगच तिला देण्यात येतं. लग्न झालं तेव्हा तर सर्व सोहळ्याची रीतसर रंगीत तालीम करण्यात येते. सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये झालेला हा शाही सोहळा म्हणजे एक पर्वणीच होती. डायना तेव्हा अवघी २० वर्षांची होती. ती चार्ल्सच्या आकंठ प्रेमात होती आणि तिला त्याच्यापुढे बाकी काही दिसत नव्हतं. मात्र, विवाह झाल्यानंतर तिला राजघराण्यात आपला विवाह झालाय म्हणजे नक्की काय, याचा अंदाज आला. मनस्वी स्वभावाची डायना पॅलेसच्या सोनेरी पिंजऱ्यात सुखानं नांदणं शक्यच नव्हतं. चौथ्या सीझनच्या प्रत्येक भागात डायनाची ही तडफड, चिडचिड समोर येत राहते. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा दोघांचा दौरा, त्यात छोट्या विल्यमला सर्वत्र सोबत ठेवण्याचा तिचा आग्रह, नंतर न्यूयॉर्कचा राजेशाही दौरा एकटीनं करणं या आणि अशा अनेक प्रसंगांत तिची आणि चार्ल्सचं दुभंग नातं दिसत राहतं. 

‘द क्राउन’चा हा चौथा सीझन म्हणजे अशा रीतीनं या तीन वेगवेगळ्या महिलांचे तीन वेगवेगळे ऋतू दाखवणारा कोलाज झाला आहे. भव्य, श्रीमंत निर्मितीला उत्तम अभिनय व तपशीलवार चित्रणाची जोड मिळाल्यानं हा कोलाज खास रंगतदार झाला आहे. मुळात जगभरातल्या महिलांना आपली वाटेल, अपील होईल अशीच ही तिघींची गोष्ट आहे. खरं तर, राजेशाही असो वा सामान्य माणूस; एकदा सुखाची किंवा दु:खाची तार जुळली की सगळ्या भावना, सगळी नाती, सगळी माणसं आपलीच वाटायला लागतात. हाडामासांची, चुकणारी, रडणारी, चिडणारी साधी-सरळ माणसं... ‘द क्राउन’मधली माणसंही आपलीच आहेत, असं वाटू लागतं आणि हेच या तिघींच्या जबरदस्त चित्रणाचं यश आहे.

----

(ओटीटी - नेटफ्लिस, दर्जा - चार स्टार)

----




19 Oct 2020

डीडीएलजेवरील ‘मटा’ लेख

एका ‘स्वप्ना’ची पंचविशी 
----------------------------- 


‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला येत्या २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षं पूर्ण होतील. ‘यशराज फिल्म्स’ला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर १९९५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज यशराज फिल्म्सचा सुवर्णमहोत्सव आणि ‘डीडीएलजे’चा चक्क रौप्यमहोत्सव साजरा होतोय. केवढा काळ बदलला! काही पिढ्या बदलल्या... मात्र, ‘डीडीएलजे’ची जादू कायम राहिली आहे. एखादा चित्रपट जन्मताना सर्व शुभयोग एकत्र यावेत, तसं ‘डीडीएलजे’चं झालं असावं. हा सिनेमा म्हणजे एक दंतकथा ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट हे त्याचं बिरुद तर ध्रुवताऱ्यासारखं अढळ राहील, असं वाटतंय. एकाच चित्रपटगृहात सर्वाधिक काळ चाललेला हाच चित्रपट! हिंदीतला सर्वाधिक यशस्वी रोमँटिक चित्रपट हाच! लोकप्रियतेचे उच्चांक गाठून नवनवे माइलस्टोन तयार केले ते याच चित्रपटानं...! या चित्रपटातील संवाद, गाणी, एकेक दृश्य प्रचंड गाजलं. पुढं अनेक वेळा त्याची कॉपी झाली. ‘राज’ आणि ‘सिमरन’ ही भारतीय प्रेमकथांमधली ‘सर्वनामं’ झाली. विशेषनामांचं सर्वनाम होणं यापेक्षा लोकप्रियतेचा आणखी कोणता मोठा पुरस्कार असेल! सुरुवातीला हा चित्रपट नाकारणाऱ्या शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या चित्रपटानं त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. काजोलला या चित्रपटानं अव्वल श्रेणीतल्या नायिकांमध्ये कायमचं स्थान दिलं.
‘डीडीएलजे’ प्रदर्शित झाला १९९५ मध्ये... म्हणजे मागच्या शतकात! हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या फक्त दोन महिने आधीच भारतात पहिला मोबाइल कॉल केला गेला होता. एका मोठ्या क्रांतीची ती सुरुवात होती. त्या अर्थानं ‘डीडीएलजे’ हा मोबाइलपूर्व काळातला शेवटचा मोठा सुपरडुपर हिट चित्रपट. चित्रपटाचं निम्मं कथानक परदेशात घडत असलं, तरी त्यात मोबाइल नाही. भारतानं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारून अवघी चारच वर्षं झाली होती. मधल्या दोन वर्षांत देशात जातीय दंगली, बॉम्बस्फोट आदी घटनांनी वातावरण पूर्ण बिघडलं होतं. अशा वेळी मोठ्या रुपेरी पडद्यावरचं मनोरंजन हा इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी एक महत्त्वाचा भाग होता. यशराज फिल्म्स म्हणजे वर्षानुवर्षं लोकप्रिय चित्रपट देणारी फॅक्टरीच झाली होती. या वेळी यश चोप्रांचा मुलगा आदित्य दिग्दर्शनात उतरला होता. त्याची ही पहिलीच फिल्म असणार होती. आदित्यच्या डोक्यात या चित्रपटाचा प्लॉट पक्का होता. परदेशात राहूनही ‘भारतीय संस्कार’ जपणारं पंजाबी कुटुंब आणि ‘बॉय मीट्स गर्ल’ फॉर्म्युला! शाहरुख वगळता चित्रपटाचं सगळं कास्टिंगही तयार होतं. शाहरुखची बहीण त्याच काळात खूप आजारी होती. त्यामुळं शाहरुख वेगळ्या मन:स्थितीत होता. सुरुवातीला तर त्यानं राजचा रोल खूप ‘गर्लिश’ आहे, म्हणून नाकारलाच होता. अखेर त्यानं ही भूमिका स्वीकारली आणि ‘डीडीएलजे’ नावाच्या इतिहासाला सुरुवात झाली...
आज २५ वर्षांनंतर हा चित्रपट पाहिला तर काही ठिकाणी हसू येतं. अमरीश पुरीचा ‘भारतीय संस्कारां’चा आग्रह आणि त्यावर त्याच्या मुलींची व अगदी आईचीही प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. याउलट मुलाचं अपयश सेलिब्रेट करणारा अनुपम खेरचा बाप हा जास्त ‘आज’चा (तेव्हा काळाच्या पुढचा) वाटतो. चित्रपटाची लांबी तब्बल तीन तास १० मिनिटांची! तीही तेव्हाच्या सिंगल स्क्रीनला साजेशीच. पहिला चित्रपट तयार करताना आदित्यनं कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती. परदेशांतली लोकेशन्स, उत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कलाकार, सुपरहिट संगीत आणि विनोदापासून ते मारामारीपर्यंत सर्व मसाल्याचं योग्य मिश्रण... सगळी भेळ उत्कृष्टपणे जमून आली होती. हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थांनी ‘माइलस्टोन’ ठरला. मात्र, माझ्या मते तो एवढा हिट होण्याचं कारण म्हणजे विसाव्या शतकातल्या शेवटचा दशकात आलेला हा चित्रपट दोन्ही पिढ्यांना धरून ठेवणारा कदाचित शेवटचाच चित्रपट होता. एका अर्थानं यश चोप्रांच्याही पिढीला आवडेल आणि आदित्यच्याही पिढीला आवडेल असा हा शेवटचाच ब्लॉकबस्टर! त्यानंतरही फॅमिली ड्रामा आणि प्रेमकथा आल्याच; पण एवढं उत्तुंग यश कुठलाही दुसरा सिनेमा मिळवू शकला नाही. पुढच्या पाच वर्षांत आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करणार होतो. जग बदलणार होतं, सिनेमाही बदलणार होताच! ‘डीडीएलजे’ त्याआधीच्या काळातला सिनेमा होता. आपल्याला जुन्या काळाशी जोडून घेणारा एक धागा सदैव हवाच असतो. ‘डीडीएलजे’नं माझ्या पिढीला कायमस्वरूपी हा धागा पुरवला. एकाच वेळी परदेशांतलं लोकेशन, तिथली धमाल आणि सोबत ‘कधीही हात न सोडणारे’ भारतीय संस्कार हा ‘कॉम्बो पॅक’ अफलातूनच होता. नायिकेला ‘जरासा झूम लू मैं’ म्हणत परदेशांतल्या रस्त्यांवर बागडण्याचं स्वातंत्र्यही होतं... आणि ‘परक्या पुरुषा’सोबत रात्री नकळत ‘तसलं’ काही तर घडलं नाहीय ना, या विचारानं रडण्याचा ‘संस्कारी’ हक्कही अबाधित होता. भारतीय मानसिकतेला काय आवडतं, काय झेपतं, याचा अचूक अंदाज आदित्य चोप्राला होता. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला झेपेल एवढीच ‘बंडखोरी’ करायची हे तर यशाचं आदिसूत्र! या चित्रपटातही सिमरनला तिची आई सांगते - बेटा, सपने मत देखो ऐसा कौन कहता है? बस, उनके पूरे होने की शर्त मत रखो! आता हे फारच थोर तत्त्वज्ञान झालं. आज २५ वर्षांनी त्याकडं बघताना गंमत वाटते, पण १९९५ मध्ये ते किती अचूक होतं, हे या चित्रपटाच्या अफाट यशानं सिद्ध केलंच. 
एका व्यापक अर्थानं बघायचं तर ‘डीडीएलजे’ हे एक भव्य आणि हवंहवंसं वाटणारं स्वप्न होतं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भारतीय तरुणाईला मोहवून टाकणारं स्वप्न! आई-वडील, पालक यांच्या मनाविरुद्ध, त्यांना दुखवून नव्हे, तर त्यांचं मन जिंकून आयुष्यातली उद्दिष्टं, ध्येयं साध्य करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या पिढीला ‘राज’ आवडला नसता तरच नवल! एकविसाव्या शतकात भारतीय तरुणाईकडं वेगवेगळ्या कारणांनी जग जिंकण्याचा आत्मविश्वास आला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांना सगुण साकार रूप मिळण्यासाठी बहुतांश वेळेला ‘बंडखोरी’ आवश्यक ठरली. एकविसावं शतक सुरू होताना झळकलेला फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट याचं प्रमाण होता. या तरुणाईला आता ‘आपल्या टर्मवर’ जगायचं होतं. पालक आणि त्यांच्यातले संबंध दुभंग तरी होते किंवा भावशून्य तरी! पाचच वर्षात एका शतकाचा फरक पडायचा होता, तो हा असा! या पार्श्वभूमीवर ‘डीडीएलजे’नं भारतीय मानसिकतेला सदैव कुरवाळायला आवडत असलेला ‘लाडाकोडा’चा, ‘संस्कारा’चा, ‘फील गुड’चा भाव पुरवला. भारतीय समाजमनाला हवी असणारी, आवडणारी ही ‘हेही हवं आणि तेही हवं’वाली स्वप्नाळू (आणि काहीशी चतुर) मेजवानी आदित्य चोप्रानं अगदी नीट पुरवली. ही पंजाबी डिश सगळ्यांना आवडण्यासारखीच होती. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असं सगळं काही होतं त्यात! ‘जा, सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ म्हणणारा कर्तव्यकठोर, पण प्रेमळ बाप होता, ‘हे हे हे सेन्योरिटा’ करत फ्लर्ट करणारा आगाऊ; पण तरीही हवाहवासा वाटणारा हिरो होता, ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’ असंही म्हणणारा हिरो होता, ‘अपने देस की मिट्टी’ होती, ‘सरसों का साग और मकई दी रोटी’ होती... टिपिकल पंजाबी लग्न होतं, तिथल्या ‘सोणी कुड्या’ होत्या, प्रेमळ आज्जी होती... काय नव्हतं ते विचारा! 
 मुंबईत ‘मराठा मंदिर’ला मॅटिनीला वर्षानुवर्षं ‘डीडीएलजे’ सुरू राहिला... सध्या ‘करोना’नं त्याला खीळ बसली असली, तरी पुन्हा सगळं सुरळीत झाल्यावर ‘डीडीएलजे’ पुन्हा पहिल्याच दिमाखात सुरू राहील. ‘मेरे ख्याबों में जो आए...’ म्हणत लतादीदींचा तो चिरतरुण सूर कानी पडत राहील... ‘जरा सा झूम लूँ मैं...’ म्हणत आशाबाईंचा अवखळ सूर मनाला आनंद देत राहील... ‘तुझे देखा तो ये जाना सनम...’ म्हणत मोहरीच्या शेतावरून विहरत, लहरत येणारा कुमार सानूचा तो सानुनासिक आवाज थिएटर दुमदुमवत राहील... अमरीश पुरींचा दमदार आवाज अस्सल ‘पंजाबी माती’चा सुगंध घेऊन येईल... हिमानी शिवपुरी, सतीश शहाच्या गमतीजमती आठवत राहतील... मंदिरा बेदी, करण जोहर यांचं रूपेरी पडद्यावरचं हे पदार्पण केवढं अविस्मरणीय ठरलं हे आठवून त्यांनाही आश्चर्य वाटत राहील... शेवटी ‘डीडीएलजे’ हे आपल्या सगळ्या भारतीयांचं रुपेरी स्वप्न आहे.... जोवर भारतीय सिनेमा आहे आणि इथला शेवटचा प्रेक्षक आहे तोवर ‘डीडीएलजे’ नावाचं हे स्वप्नही आपल्या डोळ्यांत राहीलच!

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संवाद पुरवणीत १८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)

-----

9 Oct 2020

वॉकिंग अनुभव - लेख

चालायची गोष्ट
-----------------

दहा-बारा दिवसांपूर्वी ऑफिसमधे ‘११ दिवसांत ५० किलोमीटर चालायचं’ असा ‘बूट’ निघाला. उत्साही मंडळींनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. रीतसर ‘गुगल फिट’ ॲप डाउनलोड केलं आणि दुसऱ्याच दिवसापासून, म्हणजे ३० सप्टेंबरपासून चालायला सुरुवात करायची, असं ठरवण्यात आलं. एकूण ११ दिवस होते. मी स्वत:साठी रोज पाच किलोमीटर चालायचं, असं बंधन घालून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून, आवरून आमच्या इथे खाली असलेल्या जॉगिंग / वॉकिंग ट्रॅकवर दाखल झालो. मी नांदेड सिटीत राहायला आल्यापासून इथं गेली चार वर्षं सातत्यानं चालतोय. पावसाळ्यात अपवाद होतो. पण तरीही वर्षातले किमान २५० दिवस तरी मी चालत असेन. यंदा मात्र करोनामुळं सर्व जगणंच विस्कळित झालं. तरी जूनमध्ये वॉकिंगला परवानगी मिळाल्यानंतर मी चालायला सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा पावसामुळं त्यात खंड पडला. मी एक ऑक्टोबरपासून तसाही चालायला सुरुवात करणार होतोच; पण ऑफिसमधल्या या चॅलेंजमुळं मला जरा अधिक उत्साह आला, यात शंका नाही. माझ्याकडं गेल्या वर्षी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले शूज होते, पण त्यातलं स्पंज जरा निघालं होतं आणि तिथं टोचायला लागलं. मग सरळ सँडल घालून चालायचं ठरवलं. मी रात्रपाळी करून रात्री एक-दीडला झोपत असल्यामुळं अगदी सकाळी उठून चालायला मला जमत नाही. मग ‘जब जागो तब सवेरा’ या न्यायाने मी उठल्यानंतर आवरून, पेपर वाचून वगैरे नऊ किंवा साडेनऊ वाजता चालायला जातो. पूर्वी एफएमवर गाणी ऐकत चालायचो. पण परवा लता मंगेशकरांच्या गाण्यांची एक लिस्ट सापडली. मग रोज तीच गाणी ऐकत चॅलेंज पूर्ण केलं. आमच्या खाली क्लब हाउस आहे आणि भोवती छान झाडी आणि सभोवती आयताकृती ट्रॅक आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. बाहेरच्या बाजूनं झाडांचं कुंपण आहे. आतील बाजूनंही लॉन आहे. उत्तम निगा राखली जाते. सकाळी अनेक उत्साही लोक इथं फिरत असतात. मात्र, मी खाली येतो तेव्हा ही संख्या कमी झालेली असते. मला मग हा ट्रॅक जवळपास मोकळा मिळतो. दोन्ही बाजूंनी इमारती असल्यानं ट्रॅकवर दहा वाजताही सावली असते. साडेदहानंतर हळूहळू ऊन या ट्रॅकवर यायला लागतं. तोवर चालणं संपवायचं... नंतर क्लब हाउससमोर झाडीत दगडी बाक टाकले आहेत, तिथं विश्रांती घ्यायची. गार हवा खायची आणि वर यायचं असा हा क्रम!
डेडलाइन घेऊन मी पहिल्यांदाच चालत होतो. मला आमच्या इथल्या ट्रॅकची लांबी-रुंदी माहिती होती. मी साधारण २०० मीटरचा एक लूप घेतला. संपूर्ण ट्रॅकवर फिरण्याऐवजी एल आकारात एकाच बाजूनं मी फिरत होतो. या लूपच्या पाच फेऱ्या झाल्या, की एक किलोमीटर होतो. सुरुवातीला मी अतिउत्साहानं थोड्या थोड्या वेळानं ॲपमधल्या घड्याळाकडं नजर टाकून किती मिनिटांत किती अंतर झालं हे बघायचो. मग लक्षात आलं, की असं केल्यानं आपोआप आपल्या चालण्यात एक अडथळा येतो. हा अडथळा त्या ॲपमध्ये पॉझसारखा नोंदवला जातो आणि एकूण चालण्याचा वेग कमी होऊन वेळ वाढतो. मग मी असा निश्चय केला, की एक गाणं पूर्ण ऐकून झाल्यावरच ॲपमध्ये डोकवायचं. ही युक्ती चांगली लागू पडली. एक तर गाणं नीट लक्ष केंद्रित करून ऐकता यायला लागलं आणि दुसरीकडं सतत ॲपमध्ये डोकवायची सवय सुटली. लता मंगेशकरांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेली गाणी माझ्या लिस्टमध्ये होती. ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’पासून ते ‘कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी’पर्यंत साधारण आठ ते दहा गाणी व्हायची. मला पाच किलोमीटर अंतर चालायला साधारण ४० ते ४५ मिनिटं लागली. (हा वेग खूप चांगला आहे, असं मला नंतर सहकाऱ्यांकडून कळलं.) खरं तर मी मुद्दाम, जीव तोडून वेगानं चालत नव्हतोच. पण अगदी बागेत चालल्यासारखंही चालत नव्हतो. ‘ब्रिस्क वॉक’ मला माहिती होता. तसंच मी चालत होतो. शिवाय पाच वर्षं चालण्याची सवय होती. ती अधूनमधून खंडित झाली असली तरी मुळात शरीराला सवय होती. अगदी पूर्वी म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षापासून ते २४ व्या वर्षापर्यंत खूपच खूप सायकलिंग केलं होतं. त्यामुळं माझे पाय तसे बऱ्यापैकी मजबूत आणि चालायला सक्षम आहेत. त्यामुळं आपण सरासरी नऊ मिनिटांत एक किलोमीटर चाललो, याचं फार आश्चर्य वाटलं नाही. नंतर मात्र, हे अंतर रोज तेवढ्याच वेळात पूर्ण होतंय ना, हे पाहायची खोड लागली. अर्थात एखादा अपवाद वगळता कधीही ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नाही. चालताना सतत ॲपमध्ये बघायचं नसल्यामुळं मी गाण्यांवर अंतराचे ठोकताळे बांधू लागलो. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ किंवा ‘सावर रे सावर रे’ ही गाणी एवढी मोठी आहेत, की ती ऐकता ऐकता जवळपास एक किलोमीटर अंतर कापलं जायचं. ते गाणं संपल्यानंतर ॲपमध्ये डोकावलं, की अंतर एकदम वाढलेलं दिसायचं. नंतर नंतर मला गाण्यांचा क्रम आणि कुठलं गाणं संपल्यावर साधारण किती अंतर कापलं गेलं असेल याचाही अंदाज यायला लागला. तो बहुतेकदा बरोबर यायचा. ब्रिस्क वॉक केल्यानं अंगातून घाम पाझरायला सुरुवात व्हायची. टी-शर्ट वरून खाली असा ओला होत जायचा. घामाची रेषा शर्टवर कुठं आल्यावर किती किलोमीटर झाले असतील, याचाही अंदाज बांधायला मी सुरुवात केली. तोही बरोबर यायला लागला. साधारणत: पहिले दोन किलोमीटर अंतर झाल्यावर घाम यायला सुरुवात व्हायची. आधी कपाळावरून भिवयांवर सतत पाणी येत राहतं. मग ते झटकत झटकत चालायचं. नंतर टी-शर्ट ओला व्हायला सुरुवात व्हायची. सुरुवातीला नऊ मिनिटांत एक किलोमीटर पूर्ण झाला नाही, तर मला थोडं वाईट वाटायचं. मग दुसऱ्या लूपला मी वेग काहीसा वाढवायचो. स्वत:समोर काल्पनिक टास्क ठेवायचो. उदा. हे शेवटचे २०० मीटर मी आता दीड मिनिटांत कापले तर नीलला ‘नासा’वाले त्यांच्या टीममध्ये प्रवेश देणार आहेत किंवा मी आज शेवटचा लूप साडेआठ मिनिटांच्या आत पूर्ण केला तर ब्रिटनची राणी मला राजेपद बहाल करणार आहे वगैरे. 

गाण्यांची मजा असते. मी ही ठरावीक गाणी रोज ऐकल्यानं मला त्यातले चढ-उतार, कडवी, म्युझिक पीसेस, खटके-मुरके अगदी पाठ झाले. वास्तविक ही गाणी मी यापूर्वीही अनेकदा ऐकली आहेत. पण आत्ता चालताना ऐकताना विशेष आनंद मिळाला. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं ऐकताना मी थेट पाच किंवा सहा वर्षांचा होऊन जायचो. जामखेडला आमच्या गावी टुरिंग टॉकीज होती. तिथं सिनेमा सुरू व्हायच्या आधी गाणी लावायचे. माझ्या लहानपणच्या आठवणी १९८१ पासून सुरू होतात. हे गाणं ऐकलं, की मी जामखेडमध्ये पोचतो. माझ्या घरात मी आहे आणि दूरवरून लाउडस्पीकरवरून हे (किंवा ‘एक दुजे के लिए’मधली इतर गाणी) गाणं लागलं आहे, हेच दृश्य डोळ्यांसमोर तरळतं. क्वचित कधी तरी टॉकीजमध्ये जाऊन हे गाणं ऐकलं, की मग तर तेच सूर कानात राहायचे. अनुप जलोटानं गायलेल्या त्या सुरुवातीच्या दोन ओळी आणि नंतर दीदींची जबरस्त तान... अंगावर काटाच येतो. दर वेळी येतो. सोबत लहानपणात घेऊन जाणारा तो स्वरमेळ! हीच गोष्ट ‘बरसात’च्या गाण्यांची. आमच्याकडं ‘बरसात’ आणि ‘श्री ४२०’ची कॅसेट होती. ती मी आमच्या टेपरेकॉर्डरवर लावून सतत ऐकत असे. शक्यतो वरचं कव्हर उघडं ठेवून कॅसेट आत घालायची आणि दोन्ही हात हनुवटीवर ठेवून त्या इकडून तिकडं फिरत जाणाऱ्या तपकिरी टेपकडं आणि मागच्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाकडं एकटक पाहत राहायचं हा माझा छंद होता. ‘हवा में उडता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का’ आणि ‘जिया बेकरार है’ ही दोन गाणी आत्ताच्या माझ्या प्ले-लिस्टमध्ये आली आणि काय सांगू! पुन्हा एकदा लहानपणच जागं झालं. चालताना ही गाणं ऐकणं म्हणजे पर्वणीच होती. माझं शरीर आपोआप हलकं हलकं होत जात असे आणि चालण्याचा वेग त्या गाण्याची लय पकडत असे. या सूरांना आपलं शरीर असाच प्रतिसाद देत असतं. ‘सोलह बरस की...’मधली ती अशक्य तान ऐकून अंगावर काटा यायचा आणि पोटात उचंबळून यायचं. ‘हवा में उडता जाए’मधल्या ‘फरफर फरफर उडे चुनरियाँ’ ऐकताना पावलं आपोआप वेगात पडायची. ‘घुंगरू बाजे छुन्नुक छुन्नुक चाल हुई मस्तानी’ ऐकताना मागं वाजणारे घुंगरू ऐकून चालता चालता आपण हवेत उडतोय की काय, असं वाटायला लागायचं. ‘जाने क्या बात है...’मध्ये दीदी ‘बडी लंबी रात है’ हे वाक्य होता होईल तेवढं लांबवून म्हणतात. तेव्हा आपोआप पावलांची गती मंद व्हायची. ‘सावर रे सावर रे’ ऐकताना ‘उंच उंच झुला’च्या वेगासोबत आपलाही वेग वाढायचा. अशा या सगळ्या गमती-जमतींमुळं चालणं आनंददायी झालं.
मी चालताना अगदी अधोमुख होऊन चालतो. याचं कारण आमच्या इथं ट्रॅकवर बरेच जीवजंतू विहरत असतात. बारीक मुंग्या, मुंगळे, इतर काही कीटक असतात. यांच्यावर चुकूनही पाय पडू नये याची दक्षता मी घेत असतो. त्यासाठी सदैव खाली बघून चालावं लागतं. कधी कधी मानेला किंचित रग लागते, पण मी हे कटाक्षानं पाळतोच. कधी तरी कुणी कुत्र्यांना खेळायला तिथं लॉनवर घेऊन येतात. लांबून त्यांना बघितलं, की माझी दिशा बदललीच म्हणून समजा. क्वचित भटकी कुत्रीही येऊन बसतात. पण मी त्यांना घाबरत नाही. वळसा घालून जातो. मात्र, ही पाळीव, आडदांड कुत्री लॉनवर मोकळी सुटली, की मला धडकीच भरते.
चालून झालं, की ॲपवरचे आकडे आणि तिथल्या गमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मजा येते. नाइस वर्क, श्रीपाद किंवा अनस्टॉपेबल, यू डिझर्व्ह ए ब्रेक वगैरे वाचून हसायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवर टाकून द्यायचा. मग गार सावलीत पाच मिनिटं बसायचं...
अशी ही माझी चालण्याची गोष्ट... ही वाचून तुम्हालाही चालायला प्रेरणा मिळाली तर आनंदच आहे. ‘चालायचंच’ म्हणून सोडून देऊ नका फक्त!

---

30 Sept 2020

व्यंगचित्रांवरील लेख

वक्ररेषेच्या मिषाने...

----------------------

माणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणू शकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करू शकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं. 

लहानपणी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या माध्यमातून व्यंगचित्रांची आपली पहिली ओळख होते. कित्येकदा पानावरची मुख्य बातमी कोणती हे वाचण्यापूर्वी आपण अनेकदा हे कार्टून पाहतो आणि मगच इतरत्र वळतो. याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित एखादा मुद्दा त्यात हलक्याफुलक्या रीतीनं मांडलेला असतो. आदल्या दिवशी घडलेल्या एखाद्या घटनेवर काही टिप्पणी असते. ती वाचून आणि ते व्यंगचित्र पाहून आपल्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटतं. दिवसाची सुरुवात प्रसन्न होते, सकारात्मक होते. व्यंगचित्रातून अगदी मोजक्या शब्दांत फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. अनेकदा ती सर्वसामान्य माणसाच्या मनातलंच काही तरी सांगणारी असते आणि त्यामुळंच ती प्रत्ययकारक ठरते. 

व्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला! यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते. घरातील गृहिणी जसं धान्य निवडून त्यातले खडे फेकून देते, तसंच व्यंगचित्रकाराला समाजातलं जे जे काही टोचणारं, बोचणारं आहे, ते चित्राद्वारे मांडून ते दूर करण्याचं आवाहन समाजाला करावं लागतं. ही प्रक्रिया आपोआप होते. चित्र पाहताना आपल्या अबोध मनात त्यातली विसंगती ठसत जाते आणि प्रत्यक्ष जगण्यात अशी विसंगती न ठेवण्याकडं आपला कल वाढतो. 

व्यंगचित्रकाराची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत असावी लागते. व्यंगचित्रात चित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ! याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही! म्हणजे व्यंगचित्रात शब्द नसतील, तर चालतं. एकही शब्द नसलेलं व्यंगचित्र असू शकतं आणि ते अनेकदा असतंही... आणि ते सर्वश्रेष्ठही असू शकतं. पण चित्र नसेल आणि केवळ संवाद किंवा एखादं विनोदी वाक्य असेल, तर त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकणार नाही. तो केवळ शाब्दिक विनोद झाला. अनेक व्यंगचित्रकार शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरतीवर भर देताना दिसतात. पण ती दुय्यम गोष्ट आहे, हे वाचकांनीही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. एकही शब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. जगातील सर्वोत्तम व्यंगचित्रकारांची उदाहरणं घेतली तर ती केवळ चित्रांतूनच अधिक बोलतात, हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आपल्याकडं बोलक्या व्यंगचित्रांची परंपरा आहे. तीही चांगलीच असतात. पण शब्दांना चांगल्या रेषांची जोड मिळणं मात्र आवश्यक असतं. खरं तर हे सूर आणि ताल यांच्यासारखं आहे. दोन्हींच्या मिलाफातून अजोड संगीत तयार होतं. तसं चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडं दिवाळी अंकांमध्ये व्यंगचित्रं देण्याची परंपरा आहे. माझ्या माहितीनुसार, अगदी पहिल्या दिवाळी अंकातही व्यंगचित्र होतंच. त्यामुळं व्यंगचित्रांना दिवाळी अंकांत हक्काची जागा असते. व्यंगचित्रांच्या उपस्थितीमुळं दिवाळी अंकांचा दर्जा उंचावण्यास मदतच झाली आहे. 'आवाज'सारख्या दिवाळी अंकातल्या 'त्या खिडक्या' हे एके काळी फार आकर्षण होतं. त्या 'खिडकीच्या आड' दडलंय काय, हे पाहण्याची उत्सुकता असे. अनेक घरांत तर हा अंक जणू काही प्रौढांसाठीच असल्यासारखा चोरून वाचला जाई. सूचक व चावट लैंगिक संदर्भ असल्यानं ते तसं होत असावं. (आजच्या पिढीला ती चित्रं दाखवली तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ती बालिश ठरतील. तर ते असो.) आमच्या लहानपणी मात्र गोल, घाटदार आणि सौष्ठवपूर्ण सौंदर्यवती स्त्रिया पाहण्याची ती नामी संधी असायची. व्यंगचित्रकारही फार प्रेमानं त्या बायकांच्या पडलेल्या पदराचे आणि आतल्या ऐवजाचे चित्र रंगवीत असत. हा व्यंगचित्रांचा एक प्रकार झाला. बाकी आत पानोपानी समोर येणाऱ्या इतर विनोदी व्यंगचित्रांचं वाचन करणं हाही निश्चितच आनंदाचा भाग असायचा. या व्यंगचित्रांना कुठलेही विषय वर्ज्य नसत. साधारणतः महागाई, संसारी माणसांचे व्याप-ताप, नट-नट्या आणि राजकारण हे तर हातखंडा विषय! एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं!' हा अर्थातच अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेला विनोद होता. पण तो कायमचा लक्षात राहिलाय तो व्यंगचित्रकारानं या घटनेतलं व्यंग नेमकं हेरल्यामुळं. 

भारतात व्यंगचित्रं म्हटलं, की काही नावं हमखास ओठांवर येतात. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्यापासून ते मराठीत शि. द. फडणीस, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, खलील खान, विवेक मेहेत्रे, हरिश्चंद्र लचके, प्रभाकर झळके, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, विकास सबनीस आणि प्रशांत कुलकर्णींपर्यंत अनेक नावं आठवतात. पुलंच्या पुस्तकांत वसंत सरवटेंची व्यंगचित्रं असत. अपूर्वाई, पूर्वरंग, व्यक्ती आणि वल्ली, असामी असा मी आणि विशेषतः बटाट्याची चाळ या पुस्तकांत सरवटेंनी काढलेली चित्रं अफलातून आहेत. पुलंचा विनोद आणि सरवट्यांची चित्रं एखाद्या उत्तम चित्रात मिसळून आलेल्या रंगांप्रमाणे यात एकमेकांत सामावून गेली आहेत हे लक्षात येईल. गंमत म्हणजे ती व्यक्तिचित्रणं वाचून आपल्या डोळ्यांसमोर जशी व्यक्ती उभी राहील, साधारण त्याच्या अगदी जवळ जाणारं व्यंगचित्र सरवट्यांनी काढलेलं आपल्याला दिसून येतं. हा तादात्म्यभाव अपूर्व आहे. बटाट्याच्या चाळीची सरवट्यांनी काढलेली चित्रं तर अक्षर वाङ्मय म्हणून मिरवावीत एवढी अप्रतिम आहेत. लेखकाला कदाचित शब्दांच्या जंजाळातून जे सांगता येत नाही, ते व्यंगचित्रकार आपल्या रेषांनी दाखवू शकतो. लेखकाची प्रतिमासृष्टी शब्दांनी आकार घेते, तर व्यंगचित्रकाराची रेषांनी, एवढाच काय तो फरक! मात्र, जेव्हा या दोन्हींमध्ये संकल्पनाचं अद्वैत होतं, तेव्हा वाचकालाही परमानंद होतो. पुलंचे लेख आणि सरवटेंची चित्रं यांनी आपल्याला हा आनंद अपरंपार दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली राजकीय व्यंगचित्रं नंतरच्या काळात संग्रहाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली. बाळासाहेबांची रेष जबरदस्त होती. इंदिरा गांधींच्या राजवटीत नऊ राज्यांत काँग्रेस सरकारांचा पाडाव झाला आणि तिथं विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आले, तेव्हा बाळासाहेबांनी काढलेलं 'नाकी नऊ आले' हे व्यंगचित्र आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यात इंदिराजींचं मूळचंच लांब नाक आणखी मोठ्ठं करून दाखवलं होतं आणि त्या नाकावर हे नऊ मुख्यमंत्री बसलेले दाखवले होते. उत्तम व्यंगचित्र कल्पना आणि शाब्दिक कोटी यांचा अचाट संगम या व्यंगचित्रात झाला होता आणि म्हणूनच ते आज जवळपास ५० वर्षांनीही लोकांच्या लक्षात राहिलंय.

वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप हा प्रकार पाश्चात्त्य देशांत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडं मराठीत तो जास्त रुजवला आणि लोकप्रिय केला तो चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारा 'चिंटू' तमाम मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'चिंटू'च्या लोकप्रियतेनं अगदी लवकरच कळस गाठला. पुलं गेल्यानंतरचा निःशब्द 'चिंटू' आजही लोकांच्या लक्षात आहे. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक यश मिळविणारी कार्टून स्ट्रिप म्हणूनच 'चिंटू'चा उल्लेख करावा लागेल. मराठी मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता, वृत्तपत्राचा वाचकवर्ग, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्यातले प्रसंग यांचा एवढा जबरदस्त अभ्यास आणि निरीक्षण पंडित-वाडेकर जोडीनं केलं होतं, की हा 'चिंटू' एकदाही म्हणजे एकदाही कधी फसला नाही. प्रत्येक वेळी तो आनंदच देत गेला. यशाचं एवढं सातत्य राखणं ही कमालीची कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी वाचकांसाठी 'चिंटू' हा आता केवळ एक कार्टून स्ट्रिपमधला मुलगा नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घरातल्या एखाद्या सदस्यासारखा झाला आहे. केवळ चिंटूच नव्हे, तर यात पंडित-वाडेकर जोडीनं तयार केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा फारच ठसठशीत लक्षात राहिल्या आहेत. चिंटू मालिकेवरून पुढं चित्रपटही तयार झाले. मराठीत तरी ही अभूतपूर्व गोष्ट होती. एक तर चारुहास पंडितांची रेष फारच गोड आहे. अशीच गोड रेष शि. द. फडणीसांचीही आहे. ठसठशीत आणि सामान्य प्रेक्षकांना एकदम अपील होईल, अशी ही सुंदर रेष आहे. त्यामुळंच फडणीसांची 'हसरी गॅलरी' काय, किंवा पंडित-वाडेकरांचा 'चिंटू' काय, मराठी घरांत आणि मनांत अढळ स्थान मिळवून आहेत.

वृत्तपत्रांत पान १ वर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या बाबतीत आर. के. लक्ष्मण यांचं स्थान भारतीय व्यंगचित्रांच्या इतिहासात तरी ध्रुवताऱ्यासारखं आहे, असंच म्हणावं लागेल. आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला आणि सदैव अबोल असणारा 'कॉमन मॅन' ही आता एक जिवंत दंतकथा झाली आहे. लक्ष्मण यांच्या या 'कॉमन मॅन'नं पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांची सकाळ हसरी केली. केवळ हसरी केली असं म्हणता येणार नाही. प्रसंगी उद्विग्न केलं, असहाय केलं, हताश केलं, चीड आणली, संताप आणला, रडू आणलं... थोडक्यात, आमच्या सर्व भावभावना लक्ष्मण यांनी त्यांच्या या छोट्याशा चित्रातून मांडल्या. उत्कृष्ट व्यंगचित्रकार कसा असावा, याचं लक्ष्मण हे जितंजागतं उदाहरण होते. लक्ष्मण यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाची व्यंगचित्रकला रसिकांना भावली. खुद्द बाळासाहेब आणि नंतर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी मराठी जनांना दीर्घकाळ भुरळ घातली. बाळासाहेबांनी तर व्यंगचित्रांना वाहिलेलं 'मार्मिक' हे नियतकालिकच सुरू केलं. माझ्या माहितीनुसार, ते मराठीतलं पहिलं आणि एवढा दीर्घकाळ सुरू असलेलं एकमेव व्यंगचित्र नियतकालिक होय. 'मार्मिक'मध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यंगचित्रं असतात. मात्र, तसा कुठलाही विषय या नियतकालिकाला वर्ज्य नाही. बाळासाहेबांप्रमाणंच राज ठाकरे यांचीही रेष ताकदवान, पण लयबद्ध आहे. तिच्या एका फटकाऱ्यात अनेकांना घायाळ करण्याचं सामर्थ्य आहे. अर्थात बाळासाहेबांप्रमाणंच राजही पूर्णवेळ राजकारणात उतरल्यानं त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर तसा अन्यायच झाला आहे. मात्र, या राजकारणाच्या धकाधकीतही ते मधूनच एखादं व्यंगचित्र काढतात, तेव्हा त्यांच्यातला कलाकारही सुखावत असणार.

अलीकडच्या काळात 'लोकसत्ता'त येणारी प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी आणि परिणामकारक वाटतात. प्रशांत कुलकर्णी यांची राजकीय, सामाजिक समज उत्तम आणि रेषांचं भान पक्कं आहे. त्यामुळं त्यांनी हाताळलेले विषय हमखास चेहऱ्यावर हसू फुलवतात. विकास सबनीस हेही माझे आवडते व्यंगचित्रकार होते. सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नुकतीच सुरू झालेली तंबी दुराई यांची ‘असं बोललात!’ ही नवी व्यंगचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेते आहे. मराठीत अनेक नियतकालिकांमध्ये अनेक वर्षं दिसणारं आणखी एक नाव म्हणजे खलील खान. खलील खान यांचीही व्यंगचित्रं जबरदस्त असतात. त्यांचा तो 'ट्रेडमार्क' छोटा कुत्राही अफलातून आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक नामवंत व्यंगचित्रकार आज चांगलं काम करीत आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख माझ्या अज्ञानामुळं इथं करणं शक्य नाही. तरीही हे सर्वच कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्य सर्वांना हसवताहेत आणि आपलं मनोरंजन करताहेत, यात शंकाच नाही. 

स्वतःच्या चुकांवर किंवा व्यंगांवर किंवा विसंगतीवर हसणारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, असं म्हणतात. याचं कारण आपल्या चुका किंवा विसंगती समजायलाही एक बौद्धिक कुवत लागते. ब्रिटिश समाजाचं उदाहरण याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. एरवी रुक्ष असलेल्या साहेबाला स्वतःवर हसणं जमतं. मराठी समाजात हेच काम आपले व्यंगचित्रकार करीत आहेत. ते नसते, तर आपल्या सामाजिक जीवनातलं ते एक फार व्यंग ठरलं असतं, यात वाद नाही. 

---

(एका नियतकालिकासाठी दिवाळी अंकासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला, पण प्रसिद्ध न झालेला हा लेख आहे.)

(वि. सू. - व्याकरणदृष्ट्या व्यंग्यचित्र हा शब्द बरोबर आहे. पण व्यंगचित्र हा शब्द रूढ आहे. म्हणून या लेखात तो तसाच वापरला आहे.)

------

18 Sept 2020

‘बंदिवासा’तली डायरी

एक डायरी ‘बंदिवासा’तली...
----------------------------------


रसिक वाचकहो, 

मी १९९१ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमाला पुण्यात ॲडमिशन घेतली आणि पहिल्याच वर्षी नापास झालो. शाळेत कधीही पहिले तीन नंबर न सोडणाऱ्या मला हा फार मोठा धक्का होता. यानंतर मी पुण्यातच आळंदी रोडला आमच्या आत्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये एकटा राहिलो आणि सदाशिव पेठेत सायकलवर जाऊन डिप्लोमाचे क्लास अटेंड केले. या काळात मी लिहिलेली डायरी... मध्यंतरी ही वही गायब झाली होती. ती परत मला सापडली आणि एक खजिना सापडल्याचा आनंद झाली. त्या वहीतली ही डायरी.... माझं वय तेव्हा केवळ १७ वर्षं होतं... आयुष्यात पहिल्यांदाच अपयश पाहिलेल्या आणि त्यामुळं खचलेल्या या मुलाची, स्वत:च स्वत:ला उमेद देत राहणारी ही डायरी आज मी तटस्थपणे वाचू शकतो. हा १७ वर्षांचा मुलगा एवढा विचार करून लिहीत होता, हे बघून आश्चर्य वाटतं. बरं लिहिलंय हे सगळं, असंही वाटलं. काळानुरूप आपल्यात असलेला निरागसपणा, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा हरवत जातो आणि आपण बनचुके, कोडगे होत जातो. त्या अर्थानं आज मी या मुलालाच गुरू करायला हवं त्याच्या या गुणांसाठी... असो!

ही डायरी, तेव्हा जशी लिहिली होती, तशीच्या तशी....

----

मनोगतातलं (बरंच) थोडं... (एक विचारमंथन)
-------------------------------------------------------

९/११/१९९२
...................


१.


मला काही तरी लिहायचंय. काय लिहू? खूप मनात आहे, पण ते कागदावर येताना शब्दच आटून जातात. पेनात शाई भरपूर, पण शब्दच आटलेले; काय उपयोग? माझं हे काय चाललंय? माझा अभ्यास का होत नाहीये? खरं सांग, तूच तो नीट करत नाहीयेस!

ते खरंय, पण मी पूर्वी करत नव्हतो असं कधी! हे आत्ताच का होतं? ऐन उमेदीच्या दिवसांत ही निराशा कसली? कसलं मळभ दाटून आलंय? माझं इंग्रजी कच्चं आहे का? की प्राध्यापकांनी सांगितलेलं समजत नाही? पण खरं तर मला हे प्रचंड दगडी कॉलेज आणि तिथली घडीची पोरं पेललीच नाही. हे खरं का? मला परकं परकं वाटतं. एकदम ज्यावर स्वत:ला बिनधास्त झोकून द्यावं असं कोणीच भेटलं नाही - अगदी अभ्यासाची वह्या-पुस्तकं पण! फेल झाल्यानं ही निराशा वाढतेच आहे. मला भीती कसली वाटतीये? मी मनात आणलं तर खूप अभ्यास करून, चांगले मार्क्स मिळवू शकतो. पण हे मनातच का येत नाही? मला खरोखर शिकण्याची तळमळ नाही का? की माझा आत्मविश्वास पारच नाहीसा झालाय? हे अगदी नाही, पण काहीसं खरंय! जबरदस्त आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा मनात निर्माण होण्यासाठी मदत करणारे, पूरक असे सारेच घटक इथे गैरहजर आहेत. का बरं? मीच त्यांच्याकडे का जाऊ नये? पण पायात बळ नाहीये. कारण तेच. आत्मविश्वास वाटत नाही. असा का विचित्र तिढा बसलाय.
की मला, ‘घरच्यांसाठी आपण हे केलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे,’ ह्या जबाबदारीची जाणीवच नाही? सांग ना! मी खरोखर लाडात वाढलो. अजूनही फेल झाल्यानंतर माझे लाड पुरवले जातायत. असे पालक, नातेवाईक नाही मिळायचे कुठे! खरंच, माझ्यावर त्या साऱ्यांचं खूप प्रेम आहे. पण माझंही त्यांच्यावर प्रेम आहे, ह्याचा मी त्यांना विश्वास देऊ नाही शकलो काही ठोस कृतीद्वारा - उदा. पास होऊन, चांगले मार्क्स मिळवून दाखवणं - तर ते हे प्रेम सतत चालूच ठेवतील का, ही भीती वाटते. पण ही भीती निरर्थक आहे. मग माझं मलाच हसू येतं. असो.
की मला माझ्यातल्या गुणांना पूर्णपणे ओळखता आलेलं नाहीये? मी भिडस्त स्वभावाचा मुलगा आहे. पण तरी कुठे तरी मी ठोस निर्णय घेतला पाहिजे होता किंवा अजूनही त्याची गरज निर्माण होऊ शकते.
माझा कल कुठे आहे? खरंच, मला का ऽऽ ही समजत नाही. मग मी मठ्ठ आहे का? तसंही मी म्हणू शकत नाही. मी असं म्हटलं तरी त्यावर कुणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही. मग मला काय केलं पाहिजे, की आत्मविश्वास परत मिळवला पाहिजे. त्यासाठी एकाग्र चित्ताने अभ्यास केला पाहिजे; जो की मी आत्ता लगेच करणार आहे.
...मला माहित्ये की ह्या कामाचं फळ खूप खूप गोड मिळणार आहे. नाही तुम्हाला असं वाटत?

......

२.

हे सगळं खरंय हो! पण अभ्यासाला बसल्यावर त्यातलं समजत नाही का? समजतं. पण ते सगळं पेपरमध्ये आठवत नाही, असंही होऊ शकतं. माझी मानसिक ताकद खच्ची तर झालेली नाही ना! मला अजूनही आधाराची गरज का वाटते? मी स्वत:हून का नाही काही करू शकत? पण हेही खरं नाही! मी तर स्वत:हून बरंच काही करू शकतो. आता मला अधिक हुशार, धूर्त, चतुर बनावयास हवं. त्याशिवाय माझा निभाव लागणं कठीण आहे. ह्या आजच्या जगात उत्कृष्टतेचं शिखर गाठल्याशिवाय कोणी विचारत नाही अन् मला तर तिचा पत्ताच माहीत नाही! हे होता कामा नये. यू मस्ट स्टडी हार्ड! तुला हे केलंच पाहिजे, अशी मी सक्ती नाहीये करत! पण हे अशाकरता की स्वाभिमान, माझा आत्मविश्वास - जो मला आज अत्यंत हवासा आहे - तो मला फक्त ह्याच गोष्टी करून मिळवता येईल - अन्य मार्ग नाही!

.....

३.

मी इथं एकटा राहतो. तुम्हाला माहितीये का एकटा राहण्यात किती दु:ख आहे ते? माणूस हा सामाजिक प्राणी आहे. मी त्यातून ‘सोशल’ स्वभावाचा. मी अजिबात माणूसघाणा नाही. उलट मला माणसांत राहायला आवडतं. सगळ्या प्रकारची माणसं. अन् आपल्या इथं गर्दीला तोटा नाही. मग मी इथनं बाहेर पडतो. चहाच्या निमित्तानं कोपऱ्यावरची गर्दी पाहून घेतो. अहो हो, ह्या गोष्टी केल्यानंच तर मला जगात आपण आहोत, ह्याची जाणीव होते. नाही तर, मला इथे, तुरुंगात ‘एकांतवास’ नावाचा भयंकर प्रकार असतो, त्याचीच प्रचिती वारंवार येत राहते. केवढी जबरदस्त शिक्षा आहे ‘एकांतवास’ ही! हे म्हणजे पाण्यातल्या माशाला पाण्याबाहेर राहण्याची शिक्षा दिल्याप्रमाणेच होय. मी कोणाकडे बघू? ह्या निर्जीव भिंतींकडे? कुणाशी बोलू? ह्या लाकडी टेबल-खुर्च्यांशी? कुणाला आपल्या गमतीजमतीच्या गप्पा सांगू? ह्या कृत्रिम दाराखिडक्यांना? सांगा! अहो, वेड लागतं माहितीये वेड! तरी बरं, रेडिओ होता इतके दिवस! पण तो स्वत:च बोलतो, आपल्याला बोलूच देत नाही. अन् आता टीव्हीचीही भर पडलीये ह्यात! म्हणजे माझा अभ्यास आणखी न व्हायला! मोहाच्या आहारी न जायला मी कुणी ऋषी-मुनी नव्हे. मी तो टीव्ही बघतोच. उलट एकटा असल्यामुळे नेहमीच्यापेक्षा जास्तच! म्हणजे वेळ गेला का वाया? मला सारं कळतं, पण वळत कसं नाही? मी वरील कारणं सांगितली तीत माझा समर्थनाचा कोणताही हेतू नाही. समर्थन होऊच शकत नाही. मी, टीव्ही इथे नाहीच्चे, असं गृहीत धरतो. पण मग समोर तो प्रचंड खोका दिसत राहतो की! टोचतो सारखा! मग मन म्हणतं, का उगीच खोटं ठोकतोयस! दिसतो तर आहे खरा समोर! लाव बघू चटकन! तर हे सगळं असं आहे.

मला एकांताची सजा मिळतीये. मी पूर्ण प्रायश्चित्तलो आहे. पण हे प्रायश्चित्त अभ्यास करून, पास होऊन, घ्यायचं आहे. अन् ह्याच्याच वाटेत हा घोर एकांत येतो आहे. म्हणजे अभ्यास व्हावा म्हणून एकांत आणि एकांतामुळे अभ्यासच होत नाही? वा रे वा! काही तरी चुकतंय खरं! ह्या एकांतात माझ्यासारखा ‘सोशल’ मुलगा राहू शकत नाही. पण अरे, तुला हौसेनं कोणी ठेवलेलं नाहीच्चे! हेच तर मग प्रायश्चित्त ना! अन् मग पास होण्याचं प्रायश्चित्त ते कुठलं? की दोन दोन प्रायश्चित्तं? छे बुवा! भलताच गोंधळ उडतोय माझा! चल्! गोंधळ-बिंधळ काहीही उडत नाहीये. तू मुद्दामच घालतोयस गोंधळ! टाईमपास करण्यासाठी! अभ्यासाच्या वेळी झोपा अन् हा टाईमपास! छे छे! अभ्यासालाच फर्स्ट मान! चला, मी आता बसतोच आहे अभ्यासाला. पण हे लिहून टाकल्याशिवाय मनाची अस्वस्थता नाही शांत होत. अहो, शेवटी मी भावनाप्रधान मुलगा आहे. मी गेले दोन-अडीच महिने डोळ्यांतून टिपूसही न काढता ढसाढसा रडतोय हो! पण रडायला काय झालं, आँ? कुणी मेलंबिलं तर नाही ना? नालायक! रडतोय म्हणे! काही लाजही वाटत नाही वर सांगायला - रडण्याच्या वेळात अभ्यास केला असतास ना तरी ते चाललं असतं! असो. अहो, रागावू नका हो असं. मी करणारच आहे खूप खूप अभ्यास. खूपच खूप अभ्यास. त्या अभ्यासानं मी पास होईन. मग मला ताठ मानेनं जगता येईल. आयुष्यात एक तर ताठ मानेनं जगावं किंवा जगूच नये. मी दोन्ही करत नाहीये. मी ‘जगू नये’ हा दुसरा पर्याय अजिबात धुडकावून लावत आहे. मी ताठ मानेनं जगणार आहे. होय! इतके दिवस ताठ मानेनं जगलो अन् घरच्यांचीही मान ताठ राहिली. आता मला वाटतंय दु:ख ते फक्त याचं, की माझ्यामुळं त्यांची मान झुकली. त्यांना केवढं प्रचंड दु:ख झालं ह्या प्रकाराने! पण त्यांनी बोलून नाही दाखवलं कुणी! कारण त्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पण म्हणून मला कळत नाही असं थोडंच आहे? पण आता मी माझ्या कृतीद्वारे त्यांचा (स्वाभि)मान परत मिळवून देणार आहे. मी अभ्यास करणार आहे. ह्याच कृतीद्वारे आता मी हे करू शकतो. चला, ठरलं तर. ह्या परीक्षेत नक्की पास होणारच. माझा आत्मविश्वास हळूहळू फायदेशीररीत्या मला परत मिळतोय. चला, ह्या एवढ्या पानांच्या नासाडीचं हे फळ काय कमी आहे?

......

४. 

हे जीवन मला काही मीच प्रदान केलेलं नाही. त्यावर इतरांचाही हक्क आहे; उलट तुझ्यापेक्षा कांकणभर जास्तच! मग हे जीवन संपविण्याचा मला अजिबात अधिकार नाही. अन् मी म्हणतो, कशाला हे सगळं? आँ? खरंच, हे जग किती सुंदर आहे! टवटवीत निसर्ग आहे, नद्या आहेत, शेतं आहेत हिरवीगार, पाऊस आहे, अन् त्याहीपेक्षा ‘माणूस’ नावाच्या प्राण्यानं प्रचंड ऊतपात करून रचलेलं हे कृत्रिम जग किती सुंदर आहे! सुंदर शहरं, उंच उंच उत्तुंग, सुबक, देखण्या इमारती! रस्ते, चकचकीत गाड्या, दुकानं, ही सुखाची साधनं, हा टीव्ही, हा रेडिओ! खरंच! किती प्रचंड पसारा मांडलाय ह्या उद्योगी माणसानं. मला तो पुरता पाह्यचाय. मीही काही ना काही उद्योग करून माझा खारीचा किंवा त्याहून कमी वाटा उचलीन. पण ह्या जगाच्या सुंदरतेत कुठे तरी भर घालीन. एका स्वच्छ, सज्जन अशा व्यक्तीची माझ्या रूपाने तरी मला भर घालता येईलच ना! नक्की येईल. मी प्रतिष्ठा मिळवीन. पंचक्रोशीत का होईना, थोडंफार नाव मिळवीन. खूप इच्छा-आकांक्षा आहेत मह्या इवल्याशा जीवनात माझ्या! पण प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजेच यशस्वी होणं! मी सध्या अयशस्वी मुलगा आहे. म्हणजे पायाशीच सगळं बांधकाम अडलंय. पण मग मी यशस्वी होऊन ही धोंड दूर करायला हवी. मग मी यशस्वी व्हायला काय केलं पाहिजे? तर मी अभ्यास केला पाहिजे. त्याने तू इच्छिलेल्या साऱ्या गोष्टी पूर्ण होतील. पण अभ्यास का होत नाहीये? आत्मविश्वास जरा कमीच वाटतोय. तोही अभ्यासावरच अवलंबून आहे. आधी अभ्यास! तो केल्याने सारं मिळेल. अगदी आत्मविश्वाससुद्धा! ठीक तर. हा आता बसतोच अभ्यासाला. पार झकासपैकी करून टाकतो अभ्यास! बेस्ट म्हणजे बेस्टच होऊन जाईल मग सारं!!

......


५. 

कधी कधी वाटतं, हे सगळं फेकून द्यावं, झटकून टाकावं पालीसारखं अन् दूर दूर कुठे तरी निघून जावं. मला खरोखर ह्या साऱ्यांत रुची वाटतच का नाही? वाटत होती - आता नाही! ह्याची काही ठोस कारणं असली पाहिजेत. का बरं अशी अनासक्ती निर्माण व्हावी? तीही माझ्यासारख्या ‘सोशल’ मुलात? ह्या तरुण वयात? छे! खरं तर पुरतं असं वाटतच नाही कधी. मी मनातलं सारं खरं खरं तरी लिहितोय का इथे? हो, मला तरी तसं वाटतं. हे वाक्य इथं लिहिलंय त्यावरून तरी. नाही तर ही शंका मनातच ठेवली असती. 

मला हे गणिती खेळ नाही जमत. हा दोष माझा नव्हे. मला परफेक्टनेसपेक्षा प्युअरनेस जास्त भावतो. मला सगळंच पट्टी अगर ड्राफ्टरने नाही मोजता येत. हाही दोष माझा नव्हे. पण याचा अर्थ तुला ते येतच नाही, असं नाही. एकदा त्यात शिरलं की ते यायलाच हवं. आवडत नाही म्हणजे जमत नाही, असं नाही. तर ते अभ्यासानं सहज मिळवता येतं. अन् मी ते मिळवीन. मी संगीतप्रेमी आहे. मला नाटकं आवडतात. सिनेमे, टीव्ही पाह्यला आवडतं. लिहायला तर चिक्कार आवडतं. पेन हे माझं शस्त्र आहे. मी बोलू शकत नाही. मी भिडस्त स्वभावाचा माणूस आहे. एखादी गोष्ट हॅमरिंग करून म्हणा अथवा ठासून सांगून म्हणा, दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची कला नाही आपल्याला जमत! वक्तृत्वगुण नाहीचेत म्हणा ना माझ्या अंगात! शाळेतसुद्धा कधी फार भाषणं केली नाहीत. जी थोडी फोर केली, त्यातही चेहऱ्यापेक्षा हातपायच हलायचे. असो. मी त्यापेक्षा लिहिणं जास्त पसंत करतो. आपल्याला जे वाटतं ना, ते लिहून ठेवावं. दुसऱ्याला ते आवडलं तर वाचेल, नाही तर ठेवून देईल. शिवाय लिहिल्यानं एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. शिवाय अभ्यासपूर्ण मतं मांडण्याची सवय होते. तोंडची वाफ दवडण्यापेक्षा हे बरं. पण मी घुम्याही नाही. फालतू व निरुद्देश अखंड बडबड करायलाही मला आवडतं. असो.

पण मी ह्या कला क्षेत्रात काय करतूद दाखवणार? तेथे आधीच गर्दी इतकी, की प्रेक्षकांपेक्षा कलाकारच जास्त झालेले. शिवाय ह्या महागाईच्या काळात पोटापुरतं तरी मिळवावयास हवं. मला नाही वाटत, की हे कला क्षेत्र त्या दृष्टीनं योग्य आहे म्हणून! तेथे शिखरावर पोहोचलेलेसुद्धा पोटापाण्यासाठी ‘साईड बिझिनेस’ करतात. मग माझ्यासारख्या नवख्यानं तर विचारदेखील करायला नको.

हे असं निराशाजनक चित्र मला का दिसतंय सगळीकडं? मन निराशावादी म्हणून सगळंच निराशावादी, असं तर नसेल? मला हा भिकार, देशोधडीला लावणारा निराशावाद देशोधडीला लावला पाहिजे. मी निराशावादी नाही. मी आशावादी मुलगा आहे. कुठं तरी आशेचा किरण लुकलुकत असतो, आपण तोच धागा पकडून पुढं जायचं असतं. मीही तेच करणार आहे. आधी ज्यात पाऊल ठेवलंय, ते क्षेत्र तर काबीज करू. मग इतरांची चर्चा! 

म्हणजेच मला आधी हा कोर्स पूर्ण करावयास हवा. म्हणजेच छान झटून अभ्यास करायला हवा व उत्तम गुणांसह तो पूर्ण करावयास हवा. म्हणजेच मला त्यासाठी अभ्यासच करावयाला हवा. मी तो करेन. काही चुका जरून झाल्या असतील, पण त्यांची आता पुनरावृत्ती तरी मी निदान होऊ देणार नाहीये. मी आता लागतोच धडाकेबाज अभ्यासाला! छानपैकी पेपर सोडवून टाकणारे यावेळेस! ठेवणारच नाही मागे काही कटकट! चला, होऊनच जाऊ द्यात आता. दे दणादण!!!

.....

६.

‘मी यशस्वी होणारच’, ‘मी ह्यात ह्याचं शिखर गाठीन’, ‘माझ्यासारखा ह्या ह्या क्षेत्रात कुणी होणार नाही’ असं जबरदस्त आत्मविश्वासपूर्ण लिहून थोडाफार काळ मनाचं समाधान नक्कीच मिळवता येतं. पण नीट लक्षात ठेव, थोडाफार काळ! नेहमीसाठी नाही बरं! ठोस काही तरी उपाय हवाय ह्या समस्येवर! माझं मन अजून कसं हे स्वीकारत नाही की आत्मविश्वास मनात निर्माण होण्यासाठी मला काही गोष्टी करणं नितांत जरुरीचं आहे. उदा. अभ्यास करणं. ह्या गोष्टीमुळे भलताच फरक पडू शकतो बरं! ही अशी गोष्ट आहे, की जीमुळं मला माझा आत्मविश्वास नक्की परत मिळू शकतो. मी तो प्रयत्नपूर्वक मिळवावयास हवा. 

जगात काही गोष्टी अशा असतात, की त्यांच्याशिवाय तुम्ही अगदीच लुळेपांगळे होऊन जाता. तुम्हाला काहीच करता येत नाही किंवा करावंसं वाटत नाही. ती गोष्ट म्हणजे जोडीदार, मित्र. मी ह्या बाबतीत आत्तापर्यंत भलताच दुर्दैवी निघालो. मला कध्धीच चांगला मित्र मिळाला नाही. त्या त्या काळापुरते उत्तम आणि बरेच असे मित्र मला लाभले. पण ज्यांच्यावर विश्वासानं विसंबून राहावं, ज्यांच्याशी सारं मन मोकळं करावं, असं कुणीच भेटलं नाही! की मीच कुणाला शोधलं नाही? माझी पारख करण्याची क्षमता कमी आहे का? बहुदा तसं असावं. की माझा स्वभाव वाईट आहे? स्वार्थी आहे? पण मग मला काही मित्र तर उत्तम मिळाले होते, ते स्वभावाच्या बाबतीत माझ्यावर अगदी खूष होते. अन् मलाही असं कधी वाटलं नाही. मी ‘मित्र’ म्हटलं, की सगळं झोकून देतो. आजही कुणी माझा मित्र झाला तर माझी हीच स्थिती कायम राहील. कारण स्वभावच तो! कसा बदलेल?

मात्र या घडीला कुणा अत्यंत जवळच्या सुहृदाची उणीव खूप खूप जाणवतेय, हे निश्चित. मग तो कुणीही असो. मुलगा किंवा मुलगी! तरुण वयात असल्यामुळे मुलगी मैत्रीण असावी, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला त्याबाबतीत नाही म्हणायचं. मुलगी अशाकरता, की मुलांपेक्षा मुली दुसरीचं किंवा दुसऱ्याचं दु:ख किंवा भावभावना अधिक चट्कन समजून घेतात. नुसत्या समजून घेतात असं नव्हे, तर त्या भावनांशी एकरूप होतात. ही मोठी फायदेशीर गोष्ट आहे एखादी मुलगी आपली मैत्रीण असण्यात! पण मी याही बाबतीत अजून दुर्दैवीच म्हणावा लागेल. असो. अजून खूप जीवन बाकी आहे. कोणी ना कोणी भेटेलच. त्या ‘त्याला’ किंवा ‘तिला’ शोधत राहायचं आपण फक्त! 

आज मला त्या ‘त्याने’ किंवा ‘तिने’ नक्कीच आधार दिला असता, समजून घेतलं असतं. माझा आत्मविश्वास परत मिळवून दिला असता. अशा एखाद्या ‘त्याची’ किंवा ‘तिची’ खूप उणीव भासतेय. खरंच, त्या बाबतीत मी अगदीच भिकारी कसा काय राह्यलो, काही कळत नाही बुवा! असो.

खरा प्रश्न आहे तो म्हणजे मला कुणी समजावून घेण्याचा अगर ‘माझं’ म्हणून कुणी तरी असण्याचा! जाऊ दे झालं. काही बाबतींत नशिबावरच अवलंबून राहावं लागतं. असेल माझं नशीब जोरदार तर भेटेलही अशी एखादी व्यक्ती जी खरोखर माझी अत्यंत जवळची किंवा लाडकी ‘मित्र’ होऊन जाईल. 

अरेच्चा! पुन्हा तेच? सांगितलं ना खरा प्रश्न समजावून घेण्याचा आहे म्हणून! पण समजून घेण्याची मला, कुणी तरी, आत्ताच गरज का निर्माण व्हावी? अन् मला वाटतं, तुला घरच्यांनी आत्तापर्यंत खूपच समजून घेतलेलं आहे तसं! मग आत्ताच काय आहे त्याचं एवढं? हं! खरं आहे ते! मी खरं तर एवढं एरंडाचं गुऱ्हाळ घालायलाच नको होतं ह्या बाबतीत! एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी सत्य आणि स्पष्ट आहे की, तुला आत्मविश्वास हा परत मिळवावयासच हवा व त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे अभ्यासाचा! अभ्यास करूनच हे आत्मबित्मविश्वास परत मिळवता येतात, कळलं का? अन्य मार्ग नाहीच.

तेव्हा तू आता अभ्यासास लागावंस, हे उत्तम! उत्तम अभ्यास केला, की मला उत्तम गुण मिळतील. प्रगतीतले सारे अडथळे दूर होतील. मला पुढं जाण्यासाठी नवा उत्साह येईल. हो! मी आशावादी तरुण आहे. हे सगळं असंच होईल हे नक्की! चला तर मग. मग घरच्यांनाही उत्साह येईल, उमेद येईल. मग करतोच मी सुरुवात आता दणकेबाज अभ्यासाची!!!

......

७.

माणसाचं आयुष्य केवढंसं आहे नाही! अवघं ऐंशी-पंचाऐंशी वर्षांचं! जग तर किती जुनं आहे कोटी कोटी वर्षांचं! पण माणसाचं जीवन तसं पाहिलं तर केवढं तरी मोठंच आहे. किती उलथापालथी करतो हा प्राणी एवढ्याशा आयुष्यात! सतत पुढं जाण्याची धडपड असते त्याची! प्रगतीचं वेड आहे त्याला! ह्या जगात किती तरी बुद्धिमान माणसं होऊन गेली, ह्याची गणतीच नाही. त्यांनीच हे सुंदर जग उभं केलं. नाही नाही ते उद्योग केले. पण मजा आहे! चांगलं वाटतं, असं लढूनलढून, धडपडून पुढं जायला! साऱ्या माणसाच्या जातीचीच ही कहाणी तर मीही मग माणूसच आहे ना! प्रत्येकाला कुठे ना कुठे अपयश हे लिहून ठेवलेलंच आहे. कुठे तरी हा ‘बॅडपॅच’ लागतोच. मग मलाही तो आत्ता लागला असेल. पण मग तो कधीच समाप्त होणार नाही का? होईल ना! पण प्रयत्न करावयास हवेत. असं हातपाय गाळून नाही चालणार. पण हा अपयशाचा बट्टा अगदीच हातपाय गाळून टाकतो आपले. काही काही करावंसं वाटत नाही. पुढं जाण्यातला सुरुवातीचा उत्साह नष्ट होतो. ठेच लागलेली असते ना! पण मग ही जखम आयुष्यभर कुरवाळत बसायचे का? तिला तात्पुरती मलमपट्टी करून पुढं नाही का जाता येणार? येईल, नक्की येईल. यायलाच पाहिजे.

माणसाचं मला मोठं नवल वाटतं. म्हणजे तसा हेवा वाटतो म्हणा ना! तेवढ्यापुरत्या अपयशाला तो अजिबात भीक घालत नाही. त्याला ओलांडून पुढे जातो. आकाशाहून मोठा होतो. मग मीही माणूसच आहे ना! मलाही ही महत्त्वाकांक्षा आहे. मीही हे अपयश धुऊन टाकणार. थोडाफार असा धक्का बसल्याशिवाय मला तरी कसा अनुभव येणार ह्या जीवनाचा? पण अनुभव असाच, ह्याच पद्धतीने याला हवा होता, असं काही बंधन नव्हतं कधी! पण ठीक आहे. मी आहे ती परिस्थिती स्वीकारलीये. मला आता ह्याच्याही पुढे जायचंय - अन् मी जाईनच!!

......

८.

मला माणसाच्या स्वभावाचं गूढ उकलत नाही. त्याला उत्तुंग ठिकाणी जायचं तर असतं, पण तो कधी कधी इतका हताश होऊन जातो, की स्वत:च्या जीवनाचा अंतच करून टाकतो. पण मी भित्रा नाही. भेकड, पळपुटा नाही. मी माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगांचा, परिस्थितीचा योग्य तो सामना करू इच्छितो. यालाच तर ‘जीवन’ म्हणतात. जीवनात संघर्ष नाही लागला करावा तर ते जीवन अगदीच अळणी होऊन जाईल. नाही, मला अळणी जीवन नाही जगायचं! पण ह्या अपयशी प्रसंगांशी झगडा करीत करीतच मरायचंही नाही. शेवट कुठं तरी चांगला व्हायला हवा. तो म्हणजे यशस्वी असा व्हायला हवा.

मग त्यासाठी काय केलं पाहिजे? यशस्वी होण्यासाठी आज अनेक चांगले-वाईट मार्ग उपलब्ध आहेत. अर्थात, वाईट मार्गच जास्त! पण मला वाईट मार्गानेही यशस्वी व्हायचं नाही. कारण मला माहित्ये की ह्या मार्गाने यशस्वी होण्याचं मानसिक सुख कधीही मिळत नसतं. किंबहुना, आपण यशस्वीसुद्धा झालेलो नसतो तर फक्त वरवर तसं वाटत असतं, आपल्याला सारखं. मनाचं खोटं समाधान करून घेत कुढत अतो आपण तसल्या मार्गाने!

मग मला चांगल्या मार्गाने यशस्वी व्हायचंय. मग साहजिकच मला खूप श्रम करावे लागतील. मी तर म्हणतो, मी अजून खरे श्रम केलेलेच नाहीत. खरे श्रम म्हणजे काय, हेच मला माहीत नाही. त्याचा अनुभवच नाही. मग मी तो आता घ्यायला हवा. आता कष्ट करायला हवेत. मग त्याचा रस्ता जातो तो थेट यशस्वीतेकडे!!

......

९. 

आजूबाजूला खूप मुलं आहेत, सगळी हुशार आहेत. ह्यांच्या गर्दीत मी काय टिकणार? मला काय येतंय, ही भावना अगदी गोळ‌ी घालून ठार केली पाहिजे मला! मी म्हणजे फार भारी कुणी तरी आहे, असा थोडासा ‘ओव्हर’च, पण आत्मविश्वास असल्याशिवाय नाही मला काही करता येणार! 

आणि जग तर हे असं आहे, की तुम्हाला शब्दांच्या टोची मारून मारून, घायाळ करून, तुमचा आत्मविश्वास - काही करण्याची उमेद - अगदी चेचून मारायला टपलेलेच असतात सगळे. मला ह्यांच्या तावडीत सापडलं ना, की अगदी नक्को नक्को होऊन जातं. कुठून ही नसती बिलामत ओढवून घेतली अंगावर, असं होतं. पण मला ह्या साऱ्यांचा सामना केलाच पाहिजे. अर्थात माझ्या नजरेला सगळेच असे का दिसतात? वाईट! म्हणजे माझ्या विचारसरणीतही काही तरी दोष आहे. मी पॉझिटिव्हली थिंकिंग करीत नाही का? करतो! मला तसा ह्या जगाचा राग नाही येत, कारण समोरचा चुकला की त्याचे कान उपटायला मीही सगळ्यांच्या दोन पावलं पुढंच असतो की! मग स्वत:वर शेकलं की असा राग का यावा? वा रे वा! बराच आहेस की! हे योग्य नाही. मी सगळ्यांशी असंच वागलं पाहिजे, जसं त्यांनी माझ्याशी वागावं असं मला वाटतं. म्हणजेच चांगलं वागायला पाहिजे. मग पण मी कुठे वाईट वागतोच कुणाशी? नाही रे! वाईट नाही वागत तू, पण नाही म्हटलं तरी थोडी चिडचीड होतेच की!

खरं तर दुसरे असा, माझ्याइतका विचारही करत नसतील माझ्याशी बोलताना! पण काही जण नक्कीच असेल आहेत, की जे वरीलप्रमाणे विचार करूनच माझ्याशी बोलतात. त्या ‘माझ्या’ अशा लोकांशी मी पण इतका विचार करूनच वागणार, बोलणार! तरच ते योग्य होणार आहे.

.......

१०.

मी आता मोठा झालोय! लहान नाही राहिलो! पण मला कधी कधी एकदम बालपण आठवून लहान व्हावंसं वाटतं, सगळ्यांप्रमाणेच! ‘बालपण दे गा देवा’ असं तुकाराम उगाच नाही म्हणाले काही. खरंच! बालपण किती सुंदर आहे! पण तज्ज्ञांच्या मते, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर अशा काळात असताना, म्हणजेच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मला लहान व्हावं आपण, असं का वाटावं? हे विचार कुठे तरी ‘डिफेक्टिव्हिटी’ दर्शवतात माझ्यातली! नेमकं काय बिनसलंय? मला हे आगामी तारुण्य नकोय का? अर्थात, माझ्या हातात काहीही नाही, अन् मला ते नकोय असंही नाही.

खरोखरच, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर कालखंडात प्रवेश करताना, त्याला नाकारण्याचा करंटेपणा मी कसा करीन? मला हे सळाळतं तारुण्य, उत्साह, ऐन यौवनातली ती बहारदार स्वप्नावस्था, सारं सारं हवंय. पण मग इच्छा एवढीच आहे, की ह्या उत्साहाचा, ह्या जोशाचा उपयोग माझ्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, आयुष्यात काही तरी बनण्यासाठी व्हावा.

नाही तर हे तारुण्य म्हणजे एक उत्साही, सळाळती लाटच आहे. जशी जोरात येऊन बिलगते, तशीच विरूनही जाते. ती पुरती विरण्याच्या आत मला तिचा पुरता उपयोग करून मोठं व्हायचंय. ऐन उमेदीतल्या वर्षांना माझ्या आयुष्यातली ‘गोल्डन मेमोरियल इयर्स’ बनवायची आहेत. तशी, सर्वांप्रमाणेच, माझीही इच्छा आहे. पण मग मी ती इच्छा यशस्वीतेत बदलण्यासाठी काय केलं पाहिजे तर खूप कष्ट केले पाहिजेत. 

खूप झटलं पाहिजे मला माझी स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी! आणि मी झटणार आहे!!

.......

११.

मी कोण आहे? मी कधी मलाच शोधलं आहे का? मनाच्या प्रतिबिंबात मी कधी डोकावलं आहे का? मी कधी स्वत:चा नीट असा विचार केला आहे का? माझ्यातले गुण-दोष नीट तपासले आहेत का? स्वत:चा स्वभाव मला पूर्णतया उमगला आहे का? मी इतरांशी कसं वागावं, हे मला कळतं का? आयुष्यातल्या बऱ्याचशा घडामोडींशी तू जवळजवळ परिचित झालायस का? 

मला वाटतं, बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येतील. खरंय ते. आत्तापर्यंत फुलांच्या ताटव्यातनं फिरत होतो मी! जीवनाच्या मुख्य महामार्गाला आताशी कुठं लागलोय मी! इथली प्रचंड रहदारी पाहून बावरलोय मी! पण मग मी कधीच हा विचार करू नये का? करावा! जरूर करावा! स्वत:ला पूर्ण ओळखावं. अगदी ‘आत्मज्ञान’ वगैरे नाही समजत, पण कुठे तरी स्वत:शीच जाऊन भिडावं, मनाशी हितगुज करावं. 

मी हे सारं करून पाह्यलंय पहिल्यांदाच! पण छान वाटतं! मनात कुठेही खळबळ माजलेली राहत नाही, विचारांना एक पूर्णत्व लाभलं जातं. मनाचा हा तलाव डहुळलेला राहत नाही, तर शांत, धीरगंभीर बनतो. अर्थात तो सतत तसाच राहू नये, हेही खरं! पण प्रश्नांचे, चिंतेचे, काळजीचे खडे त्यात पडले की विचारांचे तरंग आपोआप उमटतातच! त्यात आपल्याला स्वत:ला विशेष असं काही करावं लागत नाही. 

पण ठीक आहे. मला माझ्या मनाशी ‘संवाद’ साधण्याची प्रक्रिया - कला - जमतेय हळूहळू. कुठे तरी हा संवाद ‘टेप’ केला जातोय माझ्या मनात! कुठे तरी मी आता असा अंतर्मुख होऊन हा संवाद करतोय तरी निदान!

बरं वाटतं, असं केल्यानं मला! आता मी पूर्ण ‘क्लीन’ आहे. माझं मन ‘स्वच्छ’ झालंय. ही खळबळ, हे असंबद्ध विचार बरेचसे कागदावर उतरले आहेत, मला वाटतं. मला हे वाचून एक नवीन काही तरी जाणीव व्हायला लागलीये. मी कुठे तरी एक ‘उंची’ गाठलीय, असंही मला उगीचच वाटायला लागलंय. 

अरेच्चा! ह्यालाच तर ‘आत्मविश्वास’ म्हणत नसावेत? व्वा! आता मी यशस्वीतेच्या दिशेने जबरदस्त गरुडझेप घेईन. मी त्यात यशस्वी होईनच, असा तुफानी आत्मविश्वास मला वाटायला लागला आहे. 

हे अत्यंत चांगलं फळ मला ह्याकामी मिळालेलं आहे!!

---

लेखनसीमा.

-----




-------------------------