17 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा




‘दोबारा’ देखी, तो अकल बुरा मान जाएगी...
----------------------------------------------------------------------------------------

‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई - दोबारा’ या मुळात मुंबईच्या लोकलसारख्या (आणि वर ‘दोबारा’ हा शब्द जोडल्याने आठ डब्यांऐवजी बारा डब्यांच्या लोकलएवढ्या) लांबलचक नावाचा आणि जवळपास पावणेतीन तास एवढ्या लांबलचक वेळेचा सिनेमा एकदा बघितल्यावर त्यातल्या नायकाचीच भूमिका करणाऱ्या व्हिलनचा संवाद थोडा बदलून म्हणावंसं वाटतं - अगर मैंने ये फिल्म ‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी!




‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हा या सिनेमाचा पहिला भाग आणि त्यानंतर ‘डर्टी पिक्चर’सारखा ‘बुम्बाट’ सिनेमा देणाऱ्या मिलन लुथरियानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला तशी पाटी येते, म्हणून असं म्हणायचं एवढंच. बाकी मिलननं या सिनेमात केवळ तीच नाही, तर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत फक्त पाट्याच टाकल्या आहेत, हे पहिल्या रिळातच लक्षात येतं.
साठच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारीचा झालेला उदय, त्यानंतर एकेका डॉनची भाईगिरी, दादागिरी आणि त्यांची दहशत याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यावर अनेक दिग्दर्शकांना सिनेमे काढण्याचा मोह झाला. या भाईलोकांचा हिंदी चित्रपटसृष्टीवर असणारा वचक आणि त्यांचं ‘लव्ह-हेट’ नातं याचंही एक सुप्त आकर्षण अनेकांना आहे. दाऊद इब्राहिम हा या कुख्यात भाईलोकांमधला सर्वांत नीच, पाताळयंत्री माणूस. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आता उंदरासारखा पाकिस्तानात लपून बसलेला हा भ्याड माणूस सिनेमाचा विषय नक्कीच होऊ शकतो. मात्र, देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असलेल्या या माणसावर त्याच्या नावाने सिनेमा काढायला सिनेमावाली मंडळी घाबरतात. मग खोटं नाव देऊन आणि ‘सर्व पात्रं काल्पनिक’ असं म्हणून सुटका करून घेता येते. मिलनही तेच केलंय. या सिनेमात दाऊदचं नाव त्यानं केलं आहे शोएब. अर्थात सुरुवातीला यातली सर्व पात्रं काल्पनिक आहेत, अशी पाटी मात्र नाही. तेव्हा दिग्दर्शकाच्या मनातल्या गोंधळाला येथूनच सुरुवात होते.
‘वन्स अपॉन’चा पहिला भाग निखालस गुन्हेगारीपट होता. हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदा या अट्टल तस्करांकडून मुंबईच्या अधोविश्वाची सत्ता दाऊदकडं कशी जाते, याची नीटस मांडणी मिलननं त्या सिनेमात केली होती. या सिनेमात दाऊद मुंबईत कसा जम बसवतो आणि त्यानंतर या शहरात काय काय धंदे करतो, येथपासून मुंबईच्या बॉम्बस्फोटापर्यंतचा प्रवास तो दाखवील, अशी स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांना सुरुंग लावून दिग्दर्शक एक (कथित) प्रेमत्रिकोणाची कथा आपल्यासमोर मांडतो. अर्थात त्यात चूक काहीच नाही. त्यानं ही कथा नीट मांडली असती, तर या अपेक्षाभंगाचंही दुःख झालं नसतं. मात्र, त्यानं ही कथाही धड मांडलेली नाही. त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख ‘दोबारा’ वाट्याला येतं.
या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच सतत काही तरी बिनसल्याचा फील येतो. आधी दोन मुलांच्या रेसचं दृश्य येतं. त्यानंतर खुद्द शोएबचं (अक्षयकुमार) दर्शन होतं. या दोन मुलांना कामावर ठेवण्याचा आदेश शोएब आपल्या माणसांना देतो. ही दोन मुलं म्हणजेच अस्लम (इम्रान खान) आणि देढटांग (पितोभाष त्रिपाठी) नंतर त्याचे खास विश्वासू माणसं होतात. त्यानंतर एक-दोन रिळं इकडं-तिकडं चाचपडल्यानंतर सिनेमात नायिकेचं म्हणजेच जस्मिनचं (सोनाक्षी सिन्हा) आगमन होतं. जस्मिनची एकाच वेळी शोएब आणि अस्लमशी ओळख होते आणि दोघेही एकदम तिच्यावर प्रेम करू लागतात. स्वाभाविकच कथा एकदम या प्रेमत्रिकोणाकडं झुकते. त्यानंतर भाईची गुंडगिरी साइड-बाय-साइड आणि लव्हस्टोरी मुख्य ट्रॅकवर चालते. ती शेवटपर्यंत आपला कंटाळा घालवू शकत नाही.
अक्षयकुमारचा गेटअप आणि एकूण लूक चांगला आहे. तरीही तो ‘दाऊद’ वाटत नाही. चित्रपटातील पहिला संवाद म्हणताना त्यानं आवाजाची एक विशिष्ट पट्टी (पीच) राखली आहे. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यानं ती सोडलेली नाही. मात्र, सदैव त्याला त्याच पीचमध्ये ऐकताना कंटाळा येतो. तीच गोष्ट संवादलेखक रजत अरोराची. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकायचा अशा इराद्याने त्यानं या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. ‘अगर मैं अच्छा इन्सान बना, तो मेरी पहचान बुरा मान जाएगी’ हे किंवा असलेच अनेक संवाद आपण प्रोमोजमध्ये पाहिले आहेत. हे सातत्यही दाद देण्यासारखे असले, तरी कुठलीही व्यक्ती सदैव टाळ्याखाऊ वाक्यांतच कशी बोलेल? आपण रोज पुरणपोळी किंवा बिर्याणी खातो का? पण मिलन-रजतची पात्रं प्रत्येक संवाद अगदी टेचात उच्चारतात. ते काही काळानं अत्यंत विनोदी वाटू लागतं. शिवाय प्रत्यक्षात विनोद म्हणून लिहिलेले संवाद अश्लीलतेकडं झुकल्यानं बऱ्याच ठिकाणी सेन्सॉरला ‘बीप’ वाजवावं लागलं आहे. तरी लोकांना व्हायचा तो ‘अर्थकोर्स’ होतोच!
सोनाक्षी सिन्हाची कामगिरी बरी असली, तरी शेवटच्या दृश्यात ती कर्कशपणे शोएबवर ओरडताना बघवत नाही. तीच गोष्ट इम्रान खानची. या चिकन्याचुपड्या हिरोला अस्लमची भूमिका शोभलेली नाही. काही काही दृश्यांत टाळ्याखाऊ संवाद बोलताना त्याची कुचंबणा झालेली स्पष्ट जाणवते. मात्र, अस्लमची प्रेमी म्हणून जी शेड आहे, ती त्यानं चांगली रंगवली आहे. पितोभाष त्रिपाठीनं साकारलेल्या ‘देढटांग’ची भूमिका लक्षात राहणारी आहे. महेश मांजरेकरचा रावल हा खलनायक लिखाणातच फार वाव नसलेला आहे. त्यामुळं जस्मिनला जखमी करण्यापलीकडं त्यानं फार काही साधलेलं नाही.
पहिल्या सिनेमातली गाणी चांगली होती. या सिनेमात मात्र प्रीतमनं काहीशी निराशा केली आहे. ‘तैयबअली प्यार का दुश्मन हाय हाय’ या ‘अमर अकबर अँथनी’त ऋषी कपूरनं साकारलेल्या जबरदस्त लोकप्रिय गाण्याचं नवं रूप या सिनेमात पाहायला मिळतं. इम्राननं या गाण्यात धमाल केली आहे.
मात्र, असे काही तुरळक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमा अत्यंत कंटाळवाण्या वेगानं पुढं सरकतो. त्यामुळं एकदा हा सिनेमा बघणारा माणूस ‘‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी...’ असं म्हणणार यात शंका नाही.
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : मिलन लुथरिया
लेखक, संवाद : रजत अरोरा
संगीत : प्रीतम
प्रमुख भूमिका : अक्षयकुमार, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, पितोभाष त्रिपाठी, महेश मांजरेकर
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - १७ ऑगस्ट २०१३, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

10 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - चेन्नई एक्स्प्रेस

चालो, ये पिच्चर देखेगी...




अय्यय्यो, रामा, शिवा, गोविंदा... शाहरुखा, दीपिका, रोहिता... क्या पिच्चर बनाई! क्या पिच्चर बनाई! चेन्नई एक्स्प्रस्स... हमारी गाव की नाम की पिच्चर... नंबर वन्न... फुल्ल यंटरटनमंट्ट... यंटरटनमंट्ट... और्र यंटरटनमंट्ट! हिरो कैसा यकदम चिकना... हिरोइन भा कैसा यकदम लंबा, लंबा और ब्यूटीफुल्ल, ब्यूटीफुल्ल... दोनों के गाल्ल पर डिम्पल्ल, डिम्पल्ल... और्र स्टोरी यकदम सिम्पल्ल... सिम्पल्ल... यन्ना रास्कला... मैं मीना, अपनी पूना की मीना... तुम को बोलती - चालो, हम-तुम ये पिच्चर देखेगी... फिर देखेगी... और्र फिर देखेग्गी!
...रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या नव्या हिंदी सिनेमाविषयी खरं तर याच भाषेत लिहायला हवं. 'जब तक है जान'च्या वेळी काहीसा ढपलेला वाटलेला आणि आता पुन्हा फॉर्मात आलेला शाहरुख खान, त्याला दीपिका पदुकोणच्या अप्रतिम अभिनयाची मिळालेली साथ आणि सध्या 'हात लावीन तिथं शंभर कोटी' असा परीस गवसलेल्या रोहित शेट्टी नामक हलवायानं पुन्हा एकदा जमविलेली भट्टी... यामुळं 'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक प्रेक्षणीय अनुभव ठरतो. मुख्य प्रवाहातल्या हिंदी सिनेमाकडून प्रेक्षकांच्या ज्या ज्या अपेक्षा असतात, त्या हा सिनेमा पूर्ण करतो. त्यामुळं 'अडीच तास डोक्याला नो त्रास' हा मूलमंत्र जपणाऱ्या कोणाही प्रेक्षकाला आपले (वाढीव रेटचे) पैसे वसूल झाल्याचं समाधान 'चेन्नई एक्स्प्रेस' नक्कीच मिळवून देतो.
नायक राहुल (शाहरुख) त्याच्या आजीच्या आग्रहावरून आजोबांच्या अस्थी रामेश्वरमला विसर्जित करण्यासाठी निघाला आहे. खरं तर त्यानं मित्रांसोबत परस्पर गोव्याला जाण्याची योजना आखली आहे. मात्र, स्टेशनवर सोडायला आजी आल्यानं त्याला ट्रेनमध्ये बसण्याचं नाटक करावं लागतं. इथं त्याला नायिका मीना (दीपिका) भेटते. तिचे वडील तमिळनाडूतील एका गावातील डॉन आहेत. दुसऱ्या गावातील डॉनच्या मुलासोबत तिचं लग्न ठरवल्यानं ती पळून आली आहे. मात्र, तिचे आडदांड चुलतभाऊ तिला पकडून पुन्हा गावाकडं निघालेले आहेत. राहुल मीनासोबत तिच्या गावी पोचतो. बरंच भवती-न-भवती झाल्यानंतर दोघं पळून जातात. सिनेमाच्या उत्तरार्धात मग प्रेमाचा ट्रॅक सुरू होतो. राहुल व मीना जवळच्याच एका गावात राहतात. तिथं एक लग्नसोहळा सुरू असतो. तिथं या दोघांना नवरा-बायको बनून राहावं लागतं. काही 'रस्म' (रस्सम नव्हे) पूर्ण कराव्या लागतात. त्यातून दोघांमधलं 'बाँडिंग' वाढत जातं. मग शेवटी रोहित शेट्टी स्टाइल गाड्यांची उडवाउडवी, तुफान मारामारी, शाहरुखचं एक भावस्पर्शी भाषण आणि मग गोड शेवट...
या सिनेमाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघून छान एन्जॉय करता येतो. कुठलीही बीभत्सता किंवा हल्लीच्या हिंदी सिनेमांत वाढलेली (नसती) फिजिकल इंटिमसी यांना या करमणूकपटात अजिबात स्थान नाही. साधारण आठ ते बारा वयोगटातील मुले (आणि त्या मानसिकतेचे कुठल्याही वयाचे प्रेक्षक) डोळ्यांसमोर ठेवून रोहितनं चेन्नई एक्स्प्रेस काढला आहे. त्यामुळं मारामारीचे काही दाक्षिणात्य शैलीचे भडक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमावर फील गुड क्षणांची प्रसन्न छाप आहे. आणि हेच या चित्रपटाचं मोठं बलस्थान ठरलं आहे. शाहरुख खान अनेकदा ओव्हरअॅक्ट करतो. त्याचे ते विशिष्ट शैलीतले मॅनरिझम (तिरकं डोकं करून मान झुकवणं, किंवा ओठांची विचित्र हालचाल करणं, किंवा गाण्यात दोन्ही हात फैलावून कमरेत तिरकं वाकणं वगैरे) कधी कधी बोअर होतात. पण या सिनेमात रोहितनं शाहरुखचे हे सगळं गुण-अवगुण योग्य प्रमाणात वापरल्यानं ते कंटाळवाणे वाटत नाहीत. किंबहुना ते प्लस पॉइंट ठरतात. स्वतः शाहरुखनं अनेक प्रसंगात त्याची अभिनेता म्हणून असलेली छाप उमटवली आहे. त्यातून शाहरुख पुन्हा फॉर्मात आल्याचं जाणवतं. त्याला अतिशय अप्रतिम साथ दिलीय ती दीपिकानं. तमिळ मुलगी मीनाची भूमिका तिनं तंतोतंत साकारली आहे. (त्यात ती 'पूना'ची राहणारी आहे, हे कळल्यावर आणि मध्येच एकदा ती 'तुझ्या नानाची टांग', 'तुझ्या आयचा घो' असं शाहरुखला सुनावते, तेव्हा टाळ्याच घेते.) तिची हिंदी उच्चारणाची एक विशिष्ट शैली तिनं शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. ती दाक्षिणात्य वळणाची हिंदी ऐकायला खूप गोड वाटते. तिनं या सिनेमात साकारलेला स्वप्न पडण्याचा प्रसंग पाहण्यासारखा आहे.
'चेन्नई एक्स्प्रेस' ही प्रेमकहाणीच आहे. पण तिची ट्रीटमेंट अगदी वेगळी आहे. सुरुवातीपासून या सिनेमानं एक विनोदी ढंग अंगीकारला आहे. अशा प्रसंगी नायकाला चॅप्लिनसदृश कारनामे करायला लावण्याचा मोह अगदी स्वाभाविक आहे. मात्र, शाहरुखची अभिनयप्रकृती पाहून रोहितनं तो मोह टाळला आहे, ही बाब विशेष अभिनंदनीय. त्याऐवजी त्यानं शाहरुखच्या यापूर्वीच्या लोकप्रिय भूमिकांची आठवण करून देणारे प्रसंग पेरून हा ढंग खुलवला आहे. त्या दृष्टीनं सुरुवातीला ट्रेनमध्ये शाहरुख-दीपिका शाहरुखच्या लोकप्रिय गाण्यांच्या भेंड्या खेळतात, तो प्रसंग पाहण्यासारखा आहे. याशिवाय सिनेमातले संवादही चटपटीत आहेत. शाहरुखच्या लोकप्रिय सिनेमांतल्या गाण्यांसोबत लोकप्रिय संवादही (डोण्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन, माय नेम इज राहुल, आय अॅम नॉट टेररिस्ट इ.) जागोजागी वापरण्यात आले आहेत. हे संवाद शाहरुखच्या फॅन्सना नॉस्टॅल्जिक करतात आणि उत्स्फूर्त टाळ्याही मिळवतात. (अर्थात एका मोबाइल हँडसेटची किमतीसकट केलेली जाहिरात, भले तो हँडसेट महागडा असला, तरी फारच 'चीप' आहे!) असो.
मुलींना अजूनही पती निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, हे सांगताना शाहरुखनं शेवटाकडे जो एक लांबलचक संवाद म्हटला आहे, तो त्यानं अगदी मनापासून साकारल्याचं जाणवतं. या दृश्याला तो टाळ्या घेतो, यात आश्चर्य नाही.
सिनेमात मोजकीच गाणी आहेत. शेवटच्या टायटल्सना येणारं गाणं धरून पाच गाणी आहेत. त्यातही दुसऱ्या भागात दोन गाणी अगदी लागोपाठ येतात. ही गाणी अगदीच ग्रेट नसली, तरी सुमारही नाहीत. विशेषतः शाहरुख आणि दीपिकाचं एक रोमँटिक ड्युएट पैसावसूल आहे. पूर्वार्धात येणारं आयटेम साँगही ठेकेदार आहे. चित्रपटात दूधसागर धबधब्याचं अप्रतिम दर्शन घडवलंय. रामेश्वरम आणि तिथल्या रेल्वेपुलाचं दर्शनही छान. एकूणच रेल्वेचे सर्व प्रसंग खास चित्रित केलेयत. एकूणच, सिनेमॅटोग्राफी एक नंबर आहे.
(अर्थात कल्याणहून कर्जतला चाललेली ट्रेन सिंगल ट्रॅकवरून आणि डिझेल इंजिन लावून का धावते, हे विचारायचं नाही. सुरुवातीला म्हटलं, तसं कोणतेही तर्कसुसंगत विचार मनात न आणता फक्त करमणूक म्हणून पाहण्याची ही चीज आहे. शिवाय या हिंदी सिनेमात एवढी तमीळ वापरली आहे, की या सिनेमाची भाषा हिंदी-तमिळ अशीच लिहायला हवी होती. शिवाय सबटायटल्स नसल्यानं एवढे तमीळ संवाद झेपत नाहीत. यामागचं लॉजिकही दिग्दर्शकानं सिनेमात सूचकपणे सांगितलंय. पण तरीही हे तमिळी संवादाचे खडे कमी करायला हवे होते. असो.)
आणि हो, शाहरुखनं दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर जाहीरपणे सांगितल्यानुसार, या सिनेमापासून त्याच्या नायिकेचं नाव त्याच्याआधी पडद्यावर झळकायला सुरुवात झाली आहे. तेव्हा सुरुवातीची टायटल्स चुकवू नका आणि शेवटची तर तुम्ही चुकवू शकणारच नाही. कारण तिथं साक्षात रजनी सरांचं (भले फोटोंच्या रूपानं का होईना) दर्शन घडतं.
सो... बोर्ड ऑन धिस एक्स्प्रेस फॉर फुल्ल फन जर्नी....
वाई वेट्टिंग... चालो....
---
निर्माते - रेड चिलीज, यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
संगीत - विशाल-शेखर
संवाद - साजिद-फरहाद
प्रमुख भूमिका - शाहरुख खान, दीपिका पदुकोण, सत्यराज, निकेतन धीर
दर्जा - ****

(पूर्वप्रसिद्धी - १० ऑगस्ट, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)
---

13 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - भाग मिल्खा भाग

आपल्या नसानसांतून 'धावणारा' प्रेरणापट...




भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांची - ज्यांना सर्व जग गौरवानं 'फ्लाइंग सिख' म्हणून ओळखतं - अपूर्व जीवनगाथा कधी तरी हिंदी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर झळकेल, अशी आपण कल्पनाही केली नव्हती. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा या आघाडीच्या दिग्दर्शकानं हे आव्हान पेललंय आणि त्यांनी हा मिल्खा नावाचा अवलिया धावपटू पडद्यावर अक्षरशः जिवंत केलाय. मेहरांसोबतच हा मिल्खा जगणारा अभिनेता फरहान अख्तर याचंही श्रेय तेवढंच महत्त्वाचं. या दोघांच्या ध्यासातून साकारलेला हा सिनेमा पाहणं म्हणजे एक भावनोत्कट अनुभव आहे. चांगला सिनेमा या व्याख्येच्या तांत्रिक फूटपट्ट्यांमध्ये 'भाग मिल्खा भाग' बसत नसेलही... किंबहुना नाहीच बसत - परंतु तरीही तो एक मस्ट वॉच सिनेमा आहे. याचं कारण या सिनेमाच्या कथानायकाशी या देशाचं आणि देशातील प्रत्येक नागरिकाचं जैव नातं जडलेलं आहे; रक्ताचं नातं जडलेलं आहे. हे नातं तुटलेल्या मायभूमीचं आहे, डोळ्यांसमोर 'कत्ले-आम' झालेल्या सर्व आप्तेष्टांचं आहे, या देशाचा ब्लेझर अंगावर मिरविण्याच्या अभिमानाचं आहे, लाखो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर तिरंगा लहरत असताना आणि राष्ट्रगीत वाजत असताना ऊर भरून येण्याचं आहे... फाळणीच्या जखमा घेऊन निर्वासितांच्या कॅम्पमध्ये दीनवाणेपणे जगताना डोळ्यांत भव्य स्वप्न घेऊन जगायचं आहे, कष्ट-निर्धार आणि समर्पणातून शून्यातून विश्व उभं करण्याचं ते नातं आहे आणि त्यामुळंच प्रत्येक भारतीय प्रेक्षक कथानायकाच्या प्रत्येक व्यथेशी आणि प्रत्येक यशाशी एकरूप होतो. सध्या हयात असलेल्या एखाद्या गाजलेल्या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनविताना प्रेक्षकांना त्याची ही पूर्वपीठिका माहिती असणं हा नक्कीच त्या सिनेमासाठी पूरक घटक ठरतो. अर्थात मिल्खासिंग कोण आहेत आणि या देशाच्या क्रीडा इतिहासात त्यांचं नक्की काय स्थान आहे, याचा केवळ पाठ्यपुस्तकातला धडा असावा तसा हा सिनेमा नाही, हेही इथं आवर्जून नमूद करायला हवं. ही मिल्खासिंग नावाच्या माणसाची स्वतःशी चाललेली लढाई आहे आणि या लढाईत तो काय जिद्दीनं विजय मिळवतो, याची ही वीरविजयगाथा आहे. अॅथलिट मिल्खासिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला जाल, तर फसगत होईल. क्रीडा क्षेत्रातील आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर मिल्खासिंग यांनी ४०० मीटर्सच्या शर्यतीत ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड त्या काळात स्थापन केलं, हे त्यांचं सर्वोच्च यश होतं. अॅथलेटिक्सच्या 'ट्रॅक अँड फिल्ड' प्रकारात तोपर्यंत कोणीही भारतीय एवढ्या उत्तुंग कामगिरीच्या जवळही गेला नव्हता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये आलेल्या अपयशानंतर मिल्खासिंग यांचे डोळे उघडले. त्यांनी त्यानंतर अफाट मेहनत करून टोकियोच्या एशियाडमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली (तीही त्या वेळी आशियात अव्वल धावपटू म्हणून गाजत असलेल्या पाकिस्तानच्या अब्दुल खलीदला हरवून) आणि त्यानंतर कार्डिफमधील कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारताला ४०० मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळंच १९६० च्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत पंतप्रधान पंडित नेहरूंपासून सर्व देशवासीयांना मिल्खासिंग यांच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. मात्र, या सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धेत मिल्खासिंग चौथ्या स्थानावर फेकले गेले. ही वास्तवातल्या मिल्खासिंग यांच्या करिअरची आकडेवारी आहे.
सिनेमा हे सगळं सांगतो, पण तो सिनेमाचा केंद्रबिंदू नाहीच. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या गावात धर्मांधांकडून वडिलांचं डोकं उडवलं जात असताना, भाग मिल्खा भाग या त्यांच्या जीवघेण्या आरोळीपासून कायम धावतच राहिलेल्या एका शूर सरदार मुलाची ही गोष्ट आहे. दिल्लीतल्या निर्वासित कॅम्पमध्ये जगत असताना बहिणीच्या आसऱ्यानं मोठं झालेल्या एका एकाकी मुलाची ही कथा आहे. उमलत्या वयात बीरोवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या, नंतर प्रेमभंग झाल्यावर आर्मी जॉइन करणाऱ्या आणि एक ग्लास दुधाच्या अपेक्षेनं धावण्याची शर्यत जिंकण्याची उमेद ठेवणाऱ्या एका साध्या-भोळ्या भारतीय तरुणाची ही कहाणी आहे. मिल्खासिंग नावाच्या तरुणाची ही गोष्ट अशी प्रातिनिधिक पातळीवर नेऊन दिग्दर्शकानं फार मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळं ही फक्त एका गाजलेल्या क्रीडापटूची चरित्रवजा मांडणी उरत नाही... तर जगातल्या प्रत्येक अडथळ्यावर, संकटावर जिद्दीनं मात करण्याची प्रेरणा जागवणाऱ्या तरुणाईची ही गोष्ट बनते.
राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या कलाकृतीवर अफाट मेहनत घेतात. ते प्रत्येक दृश्यात जाणवतंही. पीरियड फिल्म बनवणं, त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं कलादिग्दर्शन असणं या आता फार अवघड गोष्टी नाहीत. मेहनतीच्या जरूर आहेत. मेहरांसारख्या दिग्दर्शकाकडून ती किमान अपेक्षा असतेच. मेहरांची एक विशिष्ट शैली आहे. एखादा विलंबित ख्यालातला राग गायकानं तब्येतीनं रंगवावा, अशी त्यांची मांडणी असते. आता अनेकांना ही मांडणी कंटाळवाणी वाटू शकते. नव्हे, वाटतेच. त्यामुळंच तीन तास आठ मिनिटांचा हा लांबलचक सिनेमा पाहताना हे सगळं एवढं यात हवंच होतं का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मेहरा मात्र प्रत्येक तपशील खुलवून, सावकाश सांगण्यावर भर देतात. पूर्वार्धात या प्रकारच्या मांडणीचा कंटाळा येऊ शकतो. उत्तरार्धात मिल्खासिंग यांची मैदान मारण्याची कामगिरी सुरू होते आणि कथेलाही थोडा वेग येतो. अर्थात मिल्खासिंग यांच्या करिअरमधला सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांनी सेट केलेलं ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड. मात्र, मेहरांच्या गोष्टीत ही बाब क्लायमॅक्सला येत नाही. रोममधला त्यांचा जिव्हारी लागणारा पराभवही नाही. किंबहुना तो पराभव सुरुवातीलाच त्यांनी दाखविला आहे. याउलट पाकिस्तानबाबत लहानपणी अत्यंत कटू भावना असताना, नेहरूंच्या आग्रहाखातर लाहोरला जाणं आणि तिथं पुन्हा एकदा खलिदला हरवून अयूब खान यांच्याकडून फ्लाइंग सिख हा गौरव मिळवणं या बिंदूवर सिनेमाचा शेवट करण्याचा निर्णय दिग्दर्शकानं घेतला आहे. तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी त्यांना आहे, कारण या बिंदूमध्ये असलेलं नाट्य रंगवणं दिग्दर्शकाला मोह पाडणारंच आहे. मिल्खासिंग यांचं पाकिस्तानात जाणं, आपल्या मूळ गावाला, घराला भेट देणं हे सगळं दाखवून मग तेथील मित्रत्वाच्या शर्यतीत त्यांनी खलिदला हरवणं यात अनेक प्रतीकं सामावलेली आहेत. मेहरांनी ती नेमकी टिपलीयत.
सिनेमाची कथा सांगताना दिग्दर्शकानं अनेक फ्लॅशबॅक, तर कधी फ्लॅशबॅकमध्ये आणखी एक फ्लॅशबॅक असे प्रकार वापरले आहेत. 'सेपिया टोन'विषयी मेहरांना असलेली प्रीती आता सर्वांना माहिती आहे. सेपियाटोनचे फ्लॅशबॅक जमले असले, तरी पूर्वार्धात ते बरेचसे ताणले गेले आहेत. विशेषतः आर्मी कॅम्पमधले प्रसंग, बीरोबरोबरचे प्रेमप्रसंग, मेलबर्नमधली नाचगाणी, छोटीसी लव्हस्टोरी हे सगळं आणखी कट-शॉर्ट करता आलं असतं, असं वाटत राहतं.
बिनोद प्रधान यांची सिनेमॅटोग्राफी आणि शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या दोन्ही गोष्टी सिनेमाच्या दर्जात भरच घालतात. विशेषतः मिल्खा व कोच रणबीरसिंग यांचे लडाखमधले प्रसंग अप्रतिम जमले आहेत. विशेषतः'जिंदा' हे गाणं जमलेलं.
अभिनयाबाबत बोलायचं तर फरहाननं हा सिनेमा खाऊन टाकलाय. त्याच्या या भूमिकेविषयी कितीही विशेषणं वापरली, तरी ती कमीच पडतील. मिल्खासिंग यांनी स्वतःच फरहानला 'तुझ्यात माझा भास होतो,' असं प्रमाणपत्र दिलंय. आता याहून मोठं बक्षीस काय हवं? फरहानला यंदा अभिनयाची बरीच अॅवॉर्ड मिळतील, यात शंका नाही. त्याची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते. कायाकल्प वगैरे शब्द आपण नुसतेच ऐकतो. त्याचा अर्थ काय, हे पाहायचं असेल, तर या सिनेमातल्या फरहानकडं पाहावं. खास त्याच्या या रोलसाठी हा सिनेमा पाहायला हरकत नाही. बाकी सोनम कपूर, पवन मल्होत्रा, प्रकाश राज, योगराजसिंग यांनीही आपापली कामं छान केली आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफीनं जलतरणपटू पेरिझादच्या छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. मिल्खाच्या वडिलांच्या भूमिकेद्वारे हॉलिवूड कलाकार आर्ट मलिक यांनीही प्रथमच हिंदी चित्रपटात काम केलंय. विशेष उल्लेख करावा लागेल तो मिल्खाच्या बहिणीची भूमिका करणारी दिव्या दत्ता आणि छोट्या मिल्खाची भूमिका करणारा जपतेजसिंग यांचा.
तेव्हा मिल्खासिंग यांची ही प्रेरणादायी कथा नक्की पाहा. त्यांच्या प्रत्येक धावेच्या वेळी आपणच धावतोय असं वाटेल... जणू आपल्या रक्तातून, नसानसांतून ही धाव येतेय, असा फील येईल आणि आपल्याला आपलाच अभिमान वाटेल!
---

निर्मिती - राकेश मेहरा, व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा
पटकथा-संवाद - प्रसून जोशी
संगीत - शंकर-एहसान-लॉय
सिनेमॅटोग्राफी - बिनोद प्रधान
प्रमुख भूमिका - फरहान अख्तर, सोनम कपूर, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, योगराजसिंग, दलीप ताहिल, जपतेजसिंग, मीशा शफी, रिबेका ब्रीड्स आदी.
दर्जा - ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - १३ जुलै १३)
----

6 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा

उत्कट प्रेमाचं रंगलेलं पान
--------------------------------



सध्याच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात निवांतपणा कसा हरवून गेला आहे... आपलं प्रेम, राग, भांडणं, ब्रेक-अप हे सगळं कसं झटपट होत असतं... अशा या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या सुपरफास्ट दशकात कुणी साठ वर्षांपूर्वीच्या शांत, निवांत आणि उत्कट प्रेमाची गोष्ट सांगू लागला तर...? विक्रमादित्य मोटवानी या दिग्दर्शकानं आपल्या लूटेरा या नव्या हिंदी चित्रपटात तेच केलंय... आणि खरं सांगू, धावपळीच्या आयुष्यातून एखाद्या सुशेगाद हिलस्टेशनवर वर्षभर राहायला जावं आणि बाहेर बर्फ भुरभुरत असताना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुंदर सुंदर पुस्तकं वाचत बसावं, असा अनुभव हा सिनेमा देतो. खरं प्रेम नक्की कसं असतं, याचा एक हळुवार प्रत्यय आपल्याला कानात गुज सांगावं, तसा देतो. सिनेमा संपल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या सर्वांत प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना अशा व्यक्तीच्या हातात हात गुंफून पाहण्याचाच हा सिनेमा आहे. ओ. हेन्रीच्या द लास्ट लीफ या प्रसिद्ध कथेचा आधार या सिनेमाला आहे, हे सांगितल्यानंतर शीर्षकात रंगलेलं पान असं का म्हटलं आहे, हे लक्षात येईल. हे पान म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे...
सिनेमाचा कालखंड आहे वर सांगितल्याप्रमाणं १९५३ चा. बंगालमधील माणिकपूर या गावातील जमीनदार रॉयचौधरी (वरुण चंदा) यांच्या प्रासादतुल्य हवेलीत कथा सुरू होते. रॉयचौधरी यांची एकुलती एक मुलगी पाखी (सोनाक्षी) तिच्या वडिलांसमवेत राहत असते. तरुण वयातच तिला दम्यासारख्या विकारानं ग्रासलेलं असतं. एक दिवस त्यांच्या हवेलीत पुरातत्त्व संशोधक असलेला तरुण वरुण (रणवीरसिंह) आणि त्याचा एक मित्र (विक्रांत मॅसी) येतात. चौधरीसाहेब त्यांना त्यांच्या इस्टेटीतील एका मंदिर परिसरात संशोधनासाठी खणण्याची परवानगी देतात. हळूहळू वरुण आणि पाखी यांचं प्रेम फुलू लागतं. त्यांचा वाङ्निश्चयही ठरतो.  मात्र, त्याच वेळी वरुणचा खरा चेहरा कळतो आणि एक धक्का देऊन मध्यंतर होतो. मध्यंतरानंतर गोष्ट डलहौसीला शिफ्ट होते. नायिकेचे वडील मरण पावले आहेत. ती आता एकटीच त्यांच्या डलहौसीतील आलिशान घरात राहतेय. वर्षभराचा काळ लोटलाय. आता नायक पुन्हा एकदा डलहौसीत तिच्या समोर येतो, पण सर्वस्वी वेगळ्या रूपात! विश्वासघातासारख्या कठोर प्रहारानं दुभंगलेली त्यांची मनं आणि आत कुठं तरी एकमेकांविषयीचं दडून बसलेलं खरं प्रेम यांची कसोटी आता सुरू होते...
विक्रमादित्यनं ही गोष्ट छान खुलविली आहे. साठ वर्षांपूर्वीचा कालखंड उभा करणं हे साधं काम नव्हे. मात्र, दिग्दर्शकानं सिनेमाचा पूर्वार्ध अतिशय रम्यपणे सादर केलाय. सिनेमाचा वेग या भागात अत्यंत हळूवार आहे. क्वचितप्रसंगी एवढा संथ सिनेमा आपल्याला चुळबूळही करायला भाग पाडतो. परंतु मध्यंतराला मिळणारा किंचित धक्का आणि त्यानंतर काहीसा थ्रिलर असा उत्तरार्ध यामुळं एकूण भट्टी पुन्हा जमून येते. चित्रपटातील हवेलीचं अंतर्गत चित्रिकरण, नायक-नायिकेची वेषभूषा, व्हिंटेज कार, चित्रकला शिकण्याचे प्रसंग या सर्वांतून दिग्दर्शक तो काळ जिवंत करतो. नायकाच्या खऱ्या रूपाविषयी एक सस्पेन्स त्यानं पहिल्यापासून कायम ठेवलाय. त्यामुळं मध्यंतराला बसणारा धक्का फारसा अनपेक्षित नसला, तरी या कथानकातून नायिकेविषयी पुरेपूर सहानुभूती निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. हा हळुवारपणा सिनेमातील कथावस्तूची प्रत काय पातळीवरची आहे, याची आपल्याला सातत्यानं जाणीव करून देत राहतो.
उत्तरार्ध काहीसा वेगवान आणि पळापळीचा आहे. तुलनेत नायक-नायिकेच्या पुनर्भेटीतून अपेक्षित असलेल्या प्रेमाच्या नव्या प्रत्ययाचा भाग कमी येतो. मात्र, याची सर्व कसर दिग्दर्शकानं क्लायमॅक्सच्या दृश्यांत भरून काढली आहे. या दृश्यामुळं सिनेमा उंची गाठतो. नायकाच्या मास्टरपीसबरोबरच दिग्दर्शकाच्या कारागिरीलाही आपण तिथं दाद देतो.
सोनाक्षीला तिची लाइफटाइम भूमिका मिळाली आहे. साठच्या दशकातील जमीनदार घराण्यातील अतिश्रीमंत; परंतु एकाकी नायिका पाखी तिनं समरसून साकारली आहे. कोपरापर्यंत लांब ब्लाउज आणि उंची साड्यांमध्ये ती दिसतेही छान. दम्यानं खंगलेली, विश्वासघातानं दुभंगलेली उद्-भवत पाखी तिनं उत्तरार्धात जबरदस्त साकारलीय. रणवीरनंही वरुणची वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय. उत्तरार्धातील त्याचे लूक अत्यंत प्रभावी. एकाच माणसात कधी कधी दोन टोकाचे स्वभाव असलेली व्यक्तिमत्त्वं वास करून असतात. अशा प्रकारची ही भूमिका रणवीरनं अगदी मेहनतीनं सादर केल्याचं जाणवतं.
संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अभिजित भट्टाचार्य ही जोडी सध्या फॉर्मात आहे. त्रिवेदींचं संगीत खास. मोनाली ठाकूरच्या आवाजातलं संवार लूं... मैं संवार लूं हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते छानच आहे. याशिवाय बाकी गाणी (मोंटा रे, शिकायतें.. इ.) चांगली जमली आहेत. सिनेमॅटोग्राफर महेंद्र शेट्टी यांच्या कॅमेऱ्यानं डलहौसीतील निसर्ग अप्रतिम टिपलाय.
या झक्कास सिनेमाविषयी तक्रार असलीच तर फक्त एकच. सिनेमाचं नाव एवढं खास नाही. किंबहुना बी ग्रेड मसाला हिंदी सिनेमाचं हे शीर्षक वाटतं. इतक्या काव्यात्म चित्रकादंबरीला तितकंच अभिजात शीर्षक असतं, तर छान वाटलं असतं. (अगदी ‘आखरी पन्ना’ हे भाषांतरित नावही चाललं असतं!) असो.
तेव्हा हा सिनेमा नक्की पाहा. हा गडबडगुंडा सिनेमा नाही. भरपूर, निवांत वेळ काढून जा... आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरच पाहा... प्रेम उत्कट असलं, की पान कसं रंगतं, याचा पुन्हा प्रत्यय येईल!
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी
संगीत : अमित त्रिवेदी
सिनेमॅटोग्राफर : महेंद्र शेट्टी
प्रमुख भूमिका : रणवीरसिंह, सोनाक्षी सिन्हा, वरुण चंदा, विक्रांत मॅसी, अदिल हुसेन, चंदा, दिव्या दत्ता आदी.
दर्जा : ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, ६ जुलै, पुणे )
---