24 Feb 2018

बडोदा डायरी ४

समारोप अन् समाधान... 
----------------------------

शनिवारचा पूर्ण दिवस संमेलनांत अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. आम्ही सकाळी हॉटेलमधून नऊ-साडेनऊच्या सुमारास बाहेर पडलो. समोर मावशींकडं चहा घेऊन, रिक्षा करून संमेलनस्थळी आलो. नाश्ता केला. आलूबोंडे आणि भजी होती. सोबत कढी होतीच. नाश्ता झाल्यावर मग मेहता सभागृहात गेलो. तिथं निमंत्रितांचं कविसंमेलन चालू होतं. तेलकरांचे मित्र मंगेश विश्वासराव हेही यात कविता सादर करणार होते. पण आम्ही तिथं गेलो तोवर त्यांची कविता होऊन गेली होती. गर्दी बऱ्यापैकी होती. एक-दोन चांगल्या कविता झाल्या. मग सिकंदराबादहून आलेले एक साठीचे काका कविता वाचायला आले. त्यांची लांबलचक आणि फालतू कविता संपेचना. लोकांनी मग त्यांची हुर्यो उडविली. तरीही काका हटले नाहीत. 'कुठं चाललाय हा देशाचा गाडा' असं त्यांचं पालुपद होतं. त्यांच्या कवितेचा गाडा मात्र पूर्ण भरकटला होता. एकदा तर सूत्रसंचालक त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. तरीही काका एकदम खमके होते. त्यांनी संपूर्ण कविता वाचलीच. त्यानंतर सूत्रसंचालक प्रत्येकाला काकुळतीनं 'अगदी छोटी कविता वाचा आणि गाऊन सादर करू नका' असं म्हणत होते. हे त्यांनी म्हटल्यावर आलेल्या कवयित्री काकूंनी पहिल्याच वाक्याला वरचा 'सा' लावला. तो ऐकून आमचा 'आ' वासला. एकूण कहर प्रकार होता. तरी एसी हॉलचं सुख सोडवत नसल्यानं आम्ही हा अत्याचार सहन करीत तिथं उगा बसून राहिलो. वास्तविक हे कविसंमेलन सकाळी नऊ ते अकरा होतं. त्यानंतर अकरा वाजता श्याम मनोहर व गंगाधर पानतावणे यांचा सत्कार होता. पण तो कार्यक्रम जवळपास साडेबाराला सुरू झाला. श्याम मनोहर चांगलं बोलत होते, पण शेवटी त्यांनीही लांबण लावली. कुठं थांबायचं याचं अचूक भान ज्याला असतं तो माझ्या मते उत्कृष्ट वक्ता. इथं सगळीच बोंब होती. दुपारी बारा वाजता काकासाहेब कालेलकर सभागृहात एक परिसंवाद होता. मी अजून या ठिकाणी गेलो नव्हतो. मग तिकडं निघालो. तेलकर, विनायक पात्रुडकर हेही सोबत आले. विद्यापीठाच्या सायन्स डिपार्टमेंटमधला एक वर्गच होता. तिथंच हा परिसंवाद सुरू झाला होता. समोर श्रोते बेंचवर बसले होते. मी इथं यायचं कारण म्हणजे सोलापूरचे सुनील शिनखेडे या परिसंवादात होते. धनश्रीचे सोलापूरचे काका-काकू यांच्या चांगल्या ओळखीचे होते आणि काकूंनी मला आवर्जून फोन करून सांगितलं होतं, की ते तिथं आलेयत तर त्यांची ओळख करून घे म्हणून. पण परिसंवाद तर सुरू झाला होता. मला व्यासपीठावर बसलेल्या तीन पुरुषांपैकी शिनखेडे कोण हेही माहिती नव्हतं. संपूर्ण परिसंवादाला थांबणं शक्यच नव्हतं. म्हणून मग आता काय करावं, असा विचार करीत होतो. तेवढ्यात त्या हॉलच्या कोपऱ्यात गडबड झाली. एक ज्येष्ठ काका पडले होते आणि त्याचा जोरात आवाज झाला होता. बोलणाऱ्या बाई थांबल्या. सगळे तिकडं धावले. काकांना डोक्याला चांगलीच खोक पडली होती व रक्त येत होतं. मला रक्त पाहून गरगरतं, त्यामुळं मी तिथून दूर झालो. तेवढ्यात मला लक्षात आलं, की आता शिनखेडेंना भेटू शकतो. मग मी सरळ व्यासपीठावरील एकांना विचारलं, की शिनखेडे कुठं आहेत म्हणून. ते त्या गृहस्थांना पाहायला गेले होते. हाक मारल्यावर आले. त्यांच्याशी तिथंच घाईत बोललो. काका-काकूंची ओळख सांगितली. काकूंची मुलगी मधुरा व जावई नीलेश गेल्या तीन वर्षांपासून इथंच असतात. तेही सांगितलं. ती व नीलेश कालच संध्याकाळी येऊन मला भेटून गेले होते. शिनखेडेंनीही 'मी तुमच्या लेखनाचा फॅन आहे,' वगैरे सांगितलं. मला बरं वाटलं. त्या काकांना तिथल्या स्वयंसेवकांनी खाली नेलं. सुदैवानं तिथं एक रुग्णवाहिका तैनात होती. तीमधून काकांना लगेच नेण्यात आलं. आम्हीही तिथून बाहेर पडलो. मग भोजन मंडपात जेवण करून, थोडा वेळ मीडिया सेंटरमध्ये जाऊन, थोडा वेळ जरा भटकून पुन्हा मेहता सभागृहात आलो. तेव्हा दुपारी दोनला संपणारं चर्चासत्र अजून सुरूच होतं. बाबा भांड बोलत होते. सयाजीरावांवरचा परिसंवाद होता. तो संपल्यावर तिथं 'कथा, कथाकार व कथानुभव' हा परिसंवाद होता. त्यात मंगला गोडबोले, रेखा बैजल व मोनिका गजेंद्रगडकर असल्यानं मला तो ऐकण्याची उत्सुकता होती. रेखा बैजल आल्या नव्हत्या. हिमांशी शेलत या गुजराती कथालेखिका होत्या. नीलिमा बोरवणकर यांनी या परिसंवादाचं बहारदार सूत्रसंचालन केलं. त्यामुळं अपेक्षेप्रमाणंच मजा आली. विशेषतः मंगला गोडबोलेंनी जोरदार बॅटिंग केली. दुपारी जेवणाच्या तिथंच त्या मला भेटल्या होत्या व त्यांनी स्वतःहून मला ओळख दिली होती. त्यामुळं मला बरं वाटलं होतं. त्यांनी हा परिसंवाद एकदम रसरशीत, जिवंत केला. हिमांशी पण छान बोलल्या. मोनिका गजेंद्रगडकर काहीशा रिझर्व्ह वाटल्या. फार मोकळेपणानं बोलल्या असं वाटलं नाही. असो. यानंतर इथंच बहुभाषिक कविसंमेलन होतं. ते ऐकण्यात आम्हाला रस नव्हता. म्हणून मग बाहेर पडलो. ग्रंथप्रदर्शनात जरा भटकलो. मी 'बेस्ट ऑफ जयवंत दळवी' घेतलं. सुहास बोकिलांनी अत्र्यांचं प्रदर्शन ठेवलेल्या स्टॉलवर जाऊन आलो. नंतर आम्हाला काही खरेदी करायची होती, म्हणून संमेलनस्थळावरून बाहेर पडलो. इथं रावपुरा म्हणून भाग आहे. तो आपल्या लक्ष्मी रोडसारखा मार्केट एरिया आहे. मग तिकडं गेलो. जरा भटकलो. तो एरिया मस्तच आहे. जाताना बडोद्याची कलेक्टर कचेरीची ब्रिटिशकालीन इमारत दिसली. एकूणच या इमारती इथं चांगल्या जतन करून ठेवल्या आहेत. तिथंच बडोदा जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाची शो-रूम होती. तिथं आत शिरलो. पण विंडो शॉपिंगच झाली. नंतर आम्हाला 'जगदीश' हे चिवड्यांचं दुकान शोधायचं होतं. बरीच पायपीट करीत पुढं गेलो, तेव्हा ते दुकान दिसलं. मग तिथं चिवडे, खारे शेंगादाणे वगैरे खरेदी केली. तिथं बाहेर गाडीवर एक कमळक नावाचं फळ विकणारा माणूस दिसला. अननसासारख्या त्याच्या फोडी करून त्या माणसानं दिल्या. त्या स्टारसारख्या दिसत होत्या. त्यावर चाट मसाला टाकून ते आंबूसगोड फळ छान लागलं. मग रिक्षा करून परत मंडपात आलो. इथं संध्याकाळी साडेसातला श्रीनिवास खळे रजनीचा कार्यक्रम होता. तो वेळेवर सुरू झाला होता. सुनील बर्वे आणि मधुरा वेलणकर सूत्रसंचालनाला होते. त्यांनी नेटक्या व सुयोग्य शब्दांत खळ्यांचा संगीतप्रवास सादर केला. गायला हृषीकेश रानडे, अजित परब, माधुरी करमरकर आणि काही स्थानिक कलाकार होते. सगळ्यांनी छान गाणी म्हटली. एक तर खळ्यांची गाणी एक से एक! बुवा (रवींद्र साठे) मधेच येऊन 'लळा जिव्हाळा' गाऊन गेले, हा बोनसच. तिथल्या एका मुलीनं 'उगवला चंद्र पुनवेचा' जबरदस्त म्हटलं. तिचं नाव कळलं नाही. मला आठवतंय तसं अनिरुद्ध जोशी, आनंदी जोशी, अपूर्वा गज्जला वगैरेंच्या गाजलेल्या 'सारेगमप'मध्ये एक पटेल आडनावाची मुलगी होती, तशीच ही दिसत होती. कदाचित तीच असेलही, पण खात्रीशीर कळलं नाही. असो. हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण ऐकला. मधेच जेवून आलो, पण परत येऊन शेवटपर्यंत ऐकला. एकूण मजा आली.
रविवारी सकाळी तेलकर निवांत होते. मग मी आणि अभिजितच पुढं आलो. मावशींकडं चहा घेऊन रिक्षा करून संमेलनस्थळी आलो. नाश्ता केला. आज फाफडा अन् गरम जिलबी होती. नंतर मेहता सभागृहात आलो. तिथं न्या. नरेंद्र चपळगावकरांची मुलाखत होती. मला ती ऐकायची होती. नानांचे मित्र बापू, म्हणजे सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित होते मुलाखत घ्यायला. एकूण चांगली झाली मुलाखत.
तिथून खाली आलो, तर प्राची (पाठक) भेटली. राधा भावे भेटल्या. त्यांना मी आदल्या दिवशीही भेटलो होतो. मग तिघांचा एक सेल्फी घेणं आलंच. प्राची भारी व्यक्तिमत्त्व आहे. तिला भेटून मजा आली. त्या दिवशी (रविवारी) मला मधुरा व नीलेशनं त्यांच्या घरी बोलावलं होतं. नीलेश मला घ्यायला येणार होता. मग त्याची वाट पाहण्यासाठी गेटवर आलो, तर तृप्ती (कुलकर्णी) व अमोल भेटले. चार दिवस ते इथंच होते, पण आमची भेट झाली नव्हती. मी परत आल्यावर भेटू, असं सांगून निघालो. नीलेश आलाच. त्यानं मला उत्साहानं बडोद्यातले रस्ते, ठिकाणं दाखवण्यासाठी जरा लांबून चक्कर मारली. एका ठिकाणी थांबून परत फाफडा, जिलबी, आळुवडी घेतली. त्यांच्या घरी पोचलो. मग जेवण झालं. गप्पा झाल्या. त्यांचं घर, सोसायटी व एकूण परिसर मस्तच आहे. अजून खूप वर्दळ नाहीय तिथं. त्यामुळं छान वाटतं. नीलेशनंच परत आणून सोडलं मग संमेलनस्थळी. चपळगावकरांच्या मुलाखतीनंतर मेहता सभागृहात रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर, उज्ज्वल निकम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. तोही जोरात झाला, असं कळलं. तिथंही तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात जागा नव्हती, म्हणून संयोजन समितीचे १५-१६ पदाधिकारी खुर्च्या टाकून स्टेजवरच बसले होते. त्याचीही चर्चा झाली. पण मधुराकडं गेल्यामुळं मला हा कार्यक्रम काही पाहता आला नाही. नंतर जरा मीडिया सेंटरमध्ये गेलो. आमच्या तिकिटांचं काही कन्फर्म होत नव्हतं. मग उद्याचा अहमदाबादचा प्लॅन रद्दच करावा असं ठरलं. उद्या सकाळी बसनं सुरतनं जाऊ असं ठरवलं. संध्याकाळी परत ग्रंथप्रदर्शनात भटकलो. मग योगेश नांदुरकर भेटले, तृप्ती भेटली. प्राची पाठक तिथं आली होती. मग तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. सगळ्यांबरोबर सरबत झालं. नंतर कॉफी झाली. नंतर आमचा मित्र संतोष देशपांडेही भेटला.
'अक्षरधारा'च्या स्टॉलवर मला 'टी-टाइम'च्या प्रती ठेवलेल्या दिसल्या. आनंद वाटला. संध्याकाळच्या समारोपाच्या कार्यक्रमावरून पण काही गोंधळ सुरू झालेला दिसला. प्रकाशकांची बरीच नाराजी होती. त्यांचा फार व्यवसाय झाला नव्हता, हे उघडच होतं. अखेर समारोपाचं सत्र आयोजकांनी त्या मेहता सभागृहातच उरकलं. आम्ही तर तिकडं फिरकलोही नाही. मैदानात संध्याकाळी 'बडोद्याचं कलावैभव' हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो थोडा वेळ पाहिला, जेवलो आणि निघालो. आता परतीचे वेध लागले होते. खरं तर मधुरा सोमवारी मला शॉपिंगला न्यायला येणार होती. पण आम्हाला सकाळी हॉटेल सोडायचं होतं. मग तो बेत कॅन्सल केला. तिला तसं कळवलं. सोमवारी सकाळी 'चेक-आउट' करून निघालो. बडोद्याच्या बसस्टँडवर आलो. हे स्टँड एकदम चकाचक, एखाद्या मॉलसारखं आहे. तिथून आम्हाला शेवटी 'बडोदा-अंमळनेर' ही आपली एसटीच मिळाली. बडोद्याचा निरोप घेतला. या एसटीनं आम्ही अडीच तासांत सुरतला आलो. सुरतचं जेवढं कौतुक ऐकलं होतं, तेवढं काही हे शहर स्वच्छ वगैरे वाटलं नाही. त्या तुलनेत बडोदा खरंच चकाचक होतं. बारा वाजले होते. आम्हाला जेवायचं होतं. मग एका हॉटेलात जाऊन मस्त पंजाबी जेवण, नंतर ताक असं छान जेवलो. सुरत रेल्वेस्टेशनवर येऊन झाशी-बांद्रा ट्रेन पकडून बोरिवलीला आलो. आमच्या समोर दोन तरुण गुजराती बेन आणि त्यांची दोन छोटी पिल्लं होती. त्यामुळं प्रवास सुखाचा झाला. तिथून कर्नाटकची एसटी पकडून रात्री साडेबाराला पुण्यात पोचलो. मला थोडा शीण वाटला, पण दिवसाचा प्रवास मला आवडतो. एखाद्या प्रदेशात नुसतंच जाण्यापेक्षा तो प्रदेश नीट न्याहाळत यावं, असं मला वाटतं. मुंबईत आम्ही बोरिवली ते पनवेल असा तीन तास प्रवास करीत होतो. पण अशी निवांत मुंबई मला एरवी कधीच पाहायला मिळाली नसती. त्यामुळं मी तो ट्रॅफिक जॅम पण एंजॉय केला.
बडोद्याहून १५ तासांच्या प्रवासावरून पुण्यात पोचलो, की एकदम हलकं हलकं, छान वाटलं. आपल्या गावात, आपल्या हवेत, आपल्या माणसांत येऊन श्वास घेतला, की मन भरून येतं. पुण्यात राहून पुण्याचं कौतुक वाटत नाही, तेवढं कुठूनही बाहेरून परत पुण्यात आलं, की वाटायला लागतं. यात आपल्या सवयीचा भाग असतो हे खरं. पण हवा, पाणी, स्वच्छता अशा काही बाबतींत पुण्याला तोड नाही, यात शंकाच नाही. बडोद्याच्या या पाच दिवसांच्या मुक्कामानं खूप काही दिलं... प्रवास नेहमीच माणसाला अधिक चतुर, अधिक हुशार, अधिक शहाणं करतो. त्यासाठी या छोट्याशा ट्रिपला मनापासून थँक्यू...

(समाप्त)
---

No comments:

Post a Comment