31 Aug 2017

'ऐसी अक्षरे'साठी लेख

वृत्तपत्र विद्यापीठ
---------------


पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवलं गेलेलं एक वाक्य कायमचं लक्षात राहिलंय. वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या मजकुराची एक व्याख्या 'घाईत लिहिलेलं साहित्य' (Liturature in hurry) अशी केलेली आहे. वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्यांना कायमच वेळेच्या मर्यादेत, घाईत काम करावं लागतं. या 'डेडलाइन'ची टांगती तलवार सदैव डोक्यावर असते. विशिष्ट वेळेत, विशिष्ट शब्दांत आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणारा मजकूर हुकमी पद्धतीनं लिहिता यावा लागतो. पत्रकार होण्याची ती जणू पूर्वअटच असते. त्यामुळंच भाषेवर पकड असणाऱ्यांना, चांगली शब्दसंपदा असणाऱ्यांना आणि काळ-वेळ-संदर्भाचं अचूक भान असणाऱ्यांना वृत्तपत्रांच्या जगात मान असतो; मागणी असते. 
मी गेल्या वीस वर्षांपासून या व्यवसायात आहे. लिहिण्याची आवड हाच व्यवसाय झाला. असं होणं हे दोन गोष्टींसाठी फार भाग्याचं मानायला हवं. एक तर तुम्हाला तुमच्या या छंदासाठी पगार मिळतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं काम हे काम वाटत नाही. काम हे जेव्हा 'काम' वाटतं, तेव्हा त्या कामाचं ओझं वाटू लागतं. माझं सुदैवानं तसं झालं नाही; आणि अर्थात पत्रकारितेत कोणत्याही कामाचं ओझं वाटून चालत नाही. वेळप्रसंगी प्रूफरीडरपासून ते संपादकापर्यंतची सर्व कामं एकाच माणसाला करावी लागू शकतात, हेही एक कारण आहेच. माझ्या या दोन दशकांहून अधिक झालेल्या कारकिर्दीत पुष्कळ वेळा हे सगळं करावं लागलं आहे. 
सुदैवानं 'लोकसत्ता', मग 'सकाळ' आणि आता 'महाराष्ट्र टाइम्स' या महाराष्ट्रातल्या तिन्ही आघाडीच्या वृत्तपत्रांत काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. तर सांगायचा मुद्दा हा, की बहुतेक पत्रकारांना प्रूफरीडर ते संपादक ही सगळी कामं कधी ना कधी करावीच लागतात. पत्रकारांच्या कामकाजाचे प्रामुख्यानं दोन भाग पडतात. एक बातमीदारीचा, म्हणजे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बातम्या आणण्याचा आणि दुसरा संपादनाचा, म्हणजे टेबलवर बसून बातमीवर संस्कार करण्याचा! मी दुसऱ्या कामात जास्त रमलो किंवा ते काम मला अधिक चांगलं जमत असावं म्हणून दिलं गेलं, असं म्हणता येईल. पण बातमीदारीही केलीच. प्रत्येक उपसंपादकाला उमेदवारीच्या काळात बातमीदारी करावीच लागते. मुळात वृत्तपत्रांत कामकाजाचा भाग म्हणून हे दोन वेगळे विभाग केलेले असतात. प्रत्यक्ष काम करताना एवढी कट्टर विभागणी नसते. उपसंपादक हाही बातमी आणू शकतोच. तर त्या पद्धतीनं मीही बातमीदारी केली. सुरुवातीला उमेदवारी म्हणून केली आणि नंतर आपल्या विशेष आवडीच्या, म्हणजे माझ्या बाबतीत, साहित्य व सिनेमा या दोन गोष्टींच्या संदर्भात आवर्जून बातमीदारी केली...
माझी सुरुवात नगरला 'लोकसत्ता'मधून मुद्रितशोधक म्हणून झाली असली, तरी पुण्यात एक सप्टेंबर १९९७ पासून मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझी पत्रकारिता सुरू झाली असं म्हणता येईल. तिथं उपसंपादकीचे, बातमीदारीचे धडे गिरवता आले. अनेक दिग्गज पत्रकारांच्या अनुभवांचा आम्हाला फायदा मिळाला. त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. आम्ही चार-पाच जण ट्रेनी असताना आम्हाला राजीव साबडे सरांच्या ताब्यात देण्यात आलं. सहा महिन्यांत त्यांनी आमच्याकडून बातमीदारीचं, उपसंपादकीचं, ग्रंथालय शास्त्राचं आणि क्रीडा बातमीदारीचं तंत्र घोटून घेतलं. हा शिक्षणाचा काळ मोठा विलक्षण होता. अनेक नव्या गोष्टी प्रथमच माहिती झाल्या. अर्थात एक आहे. आपल्या स्वतःच्या बालसुलभ उत्साहाची, नवं शिकण्याच्या तयारीची आणि कुतूहलाची जोड त्याला पाहिजे. मी तेव्हा २१-२२ वर्षांचा तरुण होतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्या अंगात होत्या. त्याचा पुढं फार उपयोग झाला. जन्मजात कुतूहल असल्याशिवाय पत्रकारितेत मजा नाही. मी 'सकाळ'मध्ये रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा 'सकाळ'चा अंक मला दाखवा, अशी विचारणा केली होती. कारण ती बातमी तेव्हा कशी दिली होती, हे जाणून घेण्याची मला अत्यंत उत्सुकता होती. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव सर माझं हे कुतूहल पाहून अत्यंत खूश झाले आणि त्यांनी जुनी फाइल काढून मला केवळ ती बातमीच दाखविली असं नाही, तर त्या बातमीच्या वेळी तेव्हा घेतल्या गेलेल्या परिश्रमांचीही माहिती दिली. 'सकाळ'च्या परुळेकर शैलीनुसार 'माणूस चंद्रावर उतरला' एवढंच, पण थेट बातमी सांगणारं शीर्षक होतं. हे शीर्षक अत्यंत मोठ्या टायपात होतं, हे उघडच दिसत होतं. तेव्हा एवढ्या मोठ्या अक्षरांचा ब्लॉक नव्हता. तर तो मुद्दाम तयार करवून घेऊन मग हे शीर्षक वापरण्यात आलं होतं. माझ्या मते, ही विसाव्या शतकातील पहिल्या क्रमांकाची बातमी होती आणि तिची ट्रीटमेंट आपण पाहायलाच हवी होती.
कान व डोळे उघडे ठेवून वावरलं की बातम्या मिळतात, असं आम्हाला सांगितलं जायचं. नुसती बातमी मिळवून भागायचं नाही, तर त्यातील सर्व माहिती अचूक असेल, याची खातरजमा करावी लागायची. यासाठी संबंधित व्यक्तींना अनेकदा फोन करावे लागत किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागे. मी तेव्हा सायकलवर सर्व पुणे शहरात फिरून अनेकदा ही माहिती गोळा केली आहे. तेव्हा मोबाइल नुकतेच आले होते; पण सर्रास वापर नव्हता. माणसांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्यावरच अधिक भर असायचा. यामुळं एक फायदा असा झाला, की पुण्यातल्या त्या काळातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या निवासस्थानी वा कार्यालयांत भेटता आलं, बोलता आलं. बातमीदारीच्या निमित्तानं पोलिस आयुक्तालयापासून ते एनडीएच्या सुदान ब्लॉकपर्यंत आणि वेदशास्त्रोत्तेजक सभागृहापासून कासेवाडी झोपडपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी फिरावं लागायचं. स्वतः या सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा बातमीदारी केलीत, की मग उपसंपादक म्हणून काम करणं पुढं सोपं जातं. शहरातील महत्त्वाच्या संस्था, व्यक्तींची नावं तुम्हाला माहिती होतात. नावांच्या मागचे-पुढचे संदर्भ कळू लागतात. मार्केट यार्डमध्ये सकाळी जाऊन भाज्यांचे भाव आणणे हा ट्रेनी बातमीदारांच्या कामाचा एक अविभाज्य भाग असतो. अनेकांना हे काम कंटाळवाणं वाटतं. मी मात्र फार उत्साहानं मार्केट यार्डात जायचो. तिथं विलास भुजबळांना भेटायचो. ते सगळी माहिती सांगायचे. (मला वाटतं, अजूनही तेच ही सगळी माहिती देत असतात.) तत्कालीन पुणे विद्यापीठ, महापालिका, कँटोन्मेंट बोर्ड, रेल्वे स्टेशन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हाधिकारी कार्यालय, झेडपी, स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकं, मंडई, वेधशाळा, आकाशवाणी व दूरदर्शन, मराठा चेंबर, कॅम्प, भारत इतिहास संशोधन मंडळ, नव्या पेठेतील पत्रकार भवन आणि महत्त्वाचं म्हणजे वैकुंठ... ही बातम्या मिळण्याची तेव्हाची प्रमुख ठिकाणं होती. अजूनही हीच आहेत. काहींची नव्यानं फक्त भर पडली आहे.
'वैकुंठ'वरून आठवलं. या प्रशिक्षणाच्या काळात एक काम मी फार सातत्यानं केल्याचं माझ्या लक्षात आहे. एखादी मोठी व्यक्ती गेली, की तिचं अल्पचरित्र लिहायचं, हे ते काम! 'सकाळ'चं संदर्भ ग्रंथालय उत्कृष्ट आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं अल्पचरित्र लिहायचं झाल्यास ग्रंथालयातून त्या व्यक्तीचं पाकीट आणायचं. त्यात त्या व्यक्तीबद्दल छापून आलेली ओळ न् ओळ जतन करून ठेवलेली असायची. ज्यांचं अल्पचरित्र वृत्तपत्रं छापतात ती मुळातच मोठी माणसं असल्यानं त्यांच्याविषयीची भरपूर माहिती वृृृत्तपत्रांकडं असतेच. तेव्हा 'गुगल'पेक्षा ग्रंथालयांचा वापर करण्याची पद्धत होती. तर मी सहा महिन्यांच्या काळात अशी चार-पाच तरी मोठ्या व्यक्तींची चरित्रं लिहिली. 
त्यात गोनीदा, यशवंत दत्त, मालती पांडे, अनंतराव कुलकर्णी आदींचा समावेश होता. याशिवाय अनेक मोठ्या लोकांशी बोलण्याची, त्यांची मुलाखत घेण्याची वेळ येई. तेव्हा ग्रंथालयात जाऊन त्या व्यक्तीविषयीची सर्व माहिती वाचून मगच तिला भेटायला जायचं, अशी आम्हाला सक्त ताकीद होती. त्यामुळं अज्ञानातून हसं होण्याचे प्रसंग कधीच आले नाहीत. किंबहुना याला आपल्याविषयी नीट माहिती आहे, हे कळलं की ती समोरची व्यक्ती खुलून अधिक मोकळेपणाने बोलत असे. लिहिताना साधी-सोपी, सरळ वाक्यं लिहावीत, याचा संस्कार होता. (हा लेख वाचतानाही वाचकांना ते जाणवेल.) वाचकाला कुठलीही अडचण न येता, थेट माहिती कळली पाहिजे, ही शिकवण होती. बातमीच्या सुरुवातीला लिहिल्या जाणाऱ्या मजकुराला 'लीड' असं म्हणतात. हा 'लीड' तीस शब्दांहून अधिक मोठा असता कामा नये, असा दंडक होता. याशिवाय बातमीच्या सुरुवातीलाच संक्षिप्त रूपं न वापरणं (भाजप न म्हणता पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष असं पूर्ण लिहायचं), व्यक्तीचं पूर्ण नाव (म्हणजे सौ. टिळक असं न लिहिता, मुक्ता टिळक असं पूर्ण लिहायचं) लिहिणं, शक्यतो मराठीच आद्याक्षरं वापरणं (लोकप्रिय नावं - उदा. एस. एम. जोशी हे अर्थात अपवाद), इंग्रजी शब्दांचं अनेकवचन न लिहिणं (बसेस किंवा डॉक्टर्स न लिहिता चारशे बस किंवा शहरातले डॉक्टर असंच लिहायचं...) अशा कित्येक बारीक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही लिखाणावर तोच संस्कार कायम आहे. आपला अंक विद्यापीठाचे कुलगुरूही वाचणार आहेत आणि स्टेशनवरचा हमालही वाचणार आहे; त्यामुळं दोघांनाही कळेल असं लिहा, असं आम्हाला सांगितलं जायचं. ते अगदी पटण्याजोगंच आहे.
पुण्यात पत्रकारिता करताना काही काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. इंग्रजीत ज्याला 'होली काऊ' म्हणतात, अशी बातम्यांची काही ठिकाणं वा घटना असतात. उदा. पुण्यातल्या गणपतींचं व विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन, दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात येणाऱ्या दोन्ही पालख्या व त्यांचे मुक्काम... आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुद्द पुणे. या तिन्ही गोष्टींविषयी पुणेकर वाचक कमालीचा हळवा आणि संवेदनशील आहे. तेव्हा त्याला न दुखावता, या घटनांचं वार्तांकन करावं लागतं. त्यामुळं वाचकांच्या लक्षात आलं असेल, की या सर्व बाबतींत पुण्यातील वृत्तपत्रं (विशेषतः मराठी) एकमतानं, एकाच पद्धतीचं वृत्त देताना दिसतात. त्यात फार काही बदल करणं त्यांना शक्य झालेलं नाही. अगदी गेल्या तीन-चार वर्षांत मात्र थोडासा बदल होताना निश्चित दिसतो आहे. याखेरीज काही व्यक्ती, समाज व संस्थांविषयीही पुणेकर वाचक हळवे आहेत. विशेषतः पुण्याच्या अभिमानाची प्रतीकं मानल्या जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांविषयी! त्यांची नावं इथं लिहिण्याची गरज नाही; आपल्यापैकी अनेकांनी ती सहज लक्षात येतील. 
या सर्व अनुभवाची शिदोरी घेऊन आपण पुण्याबाहेर किंवा परराज्यांत वा परदेशात वार्तांकन करायला जातो, तेव्हा निश्चितच मग आपल्यावर एक जास्तीची जबाबदारी येऊन पडते. सुदैवानं मला सुरुवातीपासून असं बाहेर जाऊन वार्तांकन करायची संधी मिळत गेली. एखादी सांस्कृतिक बातमी थोड्या ललित अंगानं, शैलीदार शब्दांनी नटवून लिहिण्याची मला आवड होती. थोडं फार जमत होतं तसं... मग तशा बातम्या लिहिणं ही तुमची जबाबदारीच होऊन जाते. या बातम्या तेव्हा मजकूर इटॅलिक करून वापरल्या जात. शिवाय अशा बातम्यांमध्ये वाक्यांनंतर पूर्णविराम न देता, तीन टिंबं (...) देण्याची पद्धत असे. मला अनेक सहकारी 'तीन टिंबांची बातमी लिहिणारा...' असं चिडवत असत. पण प्रत्येक बातमी अशी लिहायची नसते, हे मला अर्थातच कळत होतं. 
माझ्या या लिखाणामुळं असेल, लवकरच मला साहित्य संमेलनाचं वार्तांकन करायची संधी मिळाली. ऑफिसमधल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत मी (१९९९ मध्ये) बेळगाव साहित्य संमेलनाला गेलो. प्रवास करताना उघड्या डोळ्यांनी करायचा, नवा प्रदेश डोळ्यांत साठवून ठेवायचा, ही माझी पूर्वीपासूनची आवड. मग वार्तांकनाला बाहेर जायला लागलो, तेव्हा या आवडीचा फार उपयोग झाला. मला प्रवासात झोप येत नाही आणि फार लांबचा प्रवास नसेल तर दिवसाच प्रवास करणं मला आवडतं. त्यायोगे ज्या भागात मी प्रथमच चाललो असेन तो भाग नीट पाहता येतो. इंग्रजीत ज्याला 'Terrain' म्हणतात, तो भूभाग पाहण्यात मला फार रस असतो. हा भूभाग पाहिल्यानंतर त्या परिसराविषयी किती तरी गोष्टी न सांगताच समजतात. तिथली माणसंही समजायला लागतात. एखादा भाग डोंगराळ आहे, की सखल आहे, पठारावर आहे की समुद्रकिनारी आहे, समुद्रसपाटीपासून साधारणतः किती उंचीवर आहे, तिथं कोणकोणत्या वाहतुकीच्या सोयी आहेत, तिथलं हवापाणी कसं आहे या साऱ्या गोष्टी जाणून घेण्यात मला रस असतो. याचं कारण आपण तिथं जे काही वार्तांकन करायला चाललेलो असतो, ती घटना वा प्रसंग काही निर्वात पोकळीत घडत नसतात. या साऱ्या सभोवतालाचा त्यावर कळत-नकळत परिणाम होत असतो. त्यातून त्या भागात कधीच न गेलेल्या वाचकाला आपण त्या भागाचा 'आँखो देखा हाल' सांगू शकतो आणि त्यामुळं वार्तांकनाचं मूल्य निश्चितच वाढतं. बेळगावला गेल्या गेल्या लक्षात आलं ते तिथल्या हवेचं वेगळेपण. एवढी थंड, आल्हाददायक हवा ऐन एप्रिल महिन्यात तिथं जाणवत होती. मग त्याचा नकळत उल्लेख किंवा परिणाम त्या बातम्या लिहिण्यावर होऊ लागला. बेळगावात कायम धगधगणारा मराठी-कन्नड वाद, त्या पार्श्वभूमीवर य. दि. फडके संमेलनाध्यक्ष असणं, तिथल्या मराठी शाळा, संमेलनाच्या निमित्तानं गावातून मिळणारा प्रतिसाद या सगळ्या गोष्टी संमेलनाच्या वार्तांकनात आपसूक येत गेल्या. त्यामुळंच तिथल्या कुंद्यासारखंच हे वार्तांकनही चांगलं जमून गेलं. पुढं अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहून वार्तांकन करण्याचा योग आला. बहुतेक ठिकाणी पहिल्या दिवशी त्या गावातून निघणाऱ्या ग्रंथदिंडीतच संमेलनाचा रागरंग समजून यायचा. याचं कारण ही दिंडी म्हणजे त्या गावानं संमेलनाला नेमका कसा प्रतिसाद दिलाय हे सांगणारी एक लिटमस टेस्टच असायची किंवा असते.  
नंतर लगेचच तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचं वार्तांकन करायला जाण्याचा योग आला. एवढ्या लांबच्या राज्यात असं वार्तांकन करायला जायची ही माझी पहिलीच वेळ होती. त्याही वेळी ग्रंथालयात जाऊन त्या राज्याचा भौगोलिक-सामाजिक अभ्यास करणं, गेल्या चार-पाच महिन्यांतील घडामोडींशी परिचय करून घेणं या गोष्टी केल्या. तमिळनाडूत भाषेचा प्रश्न येणार, हे माहिती होतं. ट्रेनमध्ये मला एक तमिळी कुटुंब भेटलं. त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्या कुटुंबात असलेल्या दहावीतल्या एका मुलीकडून मी चार-पाच वाक्यं तमिळमध्ये लिहून घेतली आणि पाठ करून टाकली. 'नमस्कार, मी अमुकतमुक.. महाराष्ट्रातून निवडणुकीचं वार्तांकन करायला आलो आहे' इ. प्रकारची ती चार-पाच  वाक्यं होती. त्यातलं 'येनक्कं तमिल थेरियादं' (मला तमिळ येत नाही) एवढं एकच वाक्य आता लक्षात आहे. गंमत म्हणजे मी हे वाक्य तमिळमधून म्हणत असल्यानं तिकडं सगळे (उदा. रिक्षावाले) हसायचे आणि 'थेरियादं?' (येत नाही काय?) म्हणून माझीच फिरकी घ्यायचे. पण हा एक अनुभवच होता. मी गेलो होतो २००१ च्या ऐन रणरणत्या मे महिन्यात. माझं अंग तिकडं भाजून निघालं. मात्र नवा प्रदेश, नवे लोक, नवी भाषा यांचं आकर्षण जबरदस्त होतं. माझ्या पहिल्या बातमीत अर्थातच तापलेल्या चेन्नईचा उल्लेख होता. जयललिता यांचा वेदनियलम हा प्रासादवजा बंगलाही तेव्हाच पाहिला. त्यांच्या 'जया टीव्ही'च्या ऑफिसात गेलो. द्रमुकच्या ऑफिसात गेलो. मी तेव्हा २५-२६ वर्षांचा होतो. महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी एवढ्या लांब तमिळनाडूची विधानसभा कव्हर करायला आलाय, याचंच त्या लोकांना भारी आश्चर्य वाटायचं. त्यामुळं मदतही खूप मिळायची. स्थानिक पत्रकारांनी तर खूपच मदत केली. आमचे एन. सत्यमूर्ती नावाचे प्रतिनिधीही तिथं होते. त्यांनीही बऱ्याच टिप्स दिल्या. यामुळं तिथलं वातावरण बऱ्यापैकी टिपण्यात मी यशस्वी झालो, असं वाटतं. प्रत्येक ठिकाणी टिपिकल राजकीय बातम्या किंवा सभांच्या बातम्या देण्यापेक्षा वेगळं काही दिसतंय का हे पाहत गेलो. चेन्नईच्या एका उपनगरात करुणानिधींच्या भिंतीवरील चित्रासमोरच तेथील बायकांची सार्वजनिक नळावर पाण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चेन्नईत तेव्हा पाण्याचा फारच प्रॉब्लेम होता. मी तो फोटो आणि तिथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचीच बातमी करून पाठविली होती. रजनीकांत व एकूणच सिनेमांचं तिथल्या लोकांचं वेड, अत्यंत स्वस्त खाणं-पिणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचाही नकळत उल्लेख बातम्यांमध्ये येत असे.
मी तमिळनाडूतून परत आल्यावर सहाच महिन्यांत दिल्लीत संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेत १२-१३ पोलिस कर्मचारी व निमलष्करी दलाचे अधिकारी मरण पावले होते. या घटनेला २००२ मध्ये एक वर्ष पूर्ण होत असताना, या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना मी भेटून यावं आणि त्याची एक स्टोरी करावी असं मला आमचे तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. त्यानुसार नोव्हेंबर २००२ मध्ये मी दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत जाऊन संबंधित जवान व कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना भेटून आलो. हा अतिशय विलक्षण आणि हृद्य अनुभव होता. किंबहुना ही माझी आत्तापर्यंत केलेली सर्वोत्तम असाइनमेंट होती, असं वाटतं. या वार्तांकनासाठी विविध ठिकाणी फिरावं लागलं. रिक्षा, बस, ट्रेन, सिक्स सीटर, ट्रॅक्टर, टू-व्हीलर आणि पायी अशा सर्व वाहतुकीच्या साधनांचा वापर करून मला त्या त्या ठिकाणी पोचावं लागलं. मात्र, या जवानांच्या घरी झालेलं स्वागत आणि त्यांनी व्यक्त केलेला जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. जगदीशकुमार यादव या शहीद अधिकाऱ्याचं कुटुंब राजस्थानातील 'नीम का थाना' इथं राहत होतं. मी दिल्लीवरून बसनं चार तासांचा प्रवास करून त्यांच्या घरी गेलो. जगदीशकुमार यांची तिशीतही नसलेली पत्नी, दोन छोटी मुलं आणि जगदीशकुमार यांचे आई-वडील तिथं राहत होते. त्या कुटुंबाला मी तिथं पोचल्याचं पाहून झालेला आनंद व आश्चर्य मी आजही विसरू शकत नाही. अत्यंत भावनिक असा तो क्षण होता. 'देश माझ्या मुलाला विसरला नाही,' हे त्यांच्या वडिलांचे उद्-गार होते. मला निघायला रात्र झाली, तर ते आजोबा मला तिथंच राहण्याचा आग्रह करीत होते. मी खूप निग्रहानं निघालो, तेव्हा जेवण केल्याशिवाय मात्र त्यांनी सोडलं नाही. हे असे क्षण कायमचे लक्षात राहणारे असतात. पत्रकारितेच्या रोजच्या धबगड्यात फार आत्मिक समाधान देणारे असतात. असे क्षण जगून लिहिलेली बातमी किंवा लेख वाचकांच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही, असा माझा अनुभव आहे. 
अशा साहित्याला मग कुणी 'घाईत लिहिलेलं साहित्य' वा रद्दी म्हटलं, तरी माझ्या लेखी तो अजरामर असा दस्तावेज आहे.

---
(पूर्वप्रसिद्धी - ऐसी अक्षरे जून-जुलै १७ अंक)

27 Aug 2017

मटामधील लेख - खासगी आणि सार्वजनिक

खासगी आणि सार्वजनिक 
------------------------
आपण भारतीय लोक तसे बऱ्यापैकी सार्वजनिक आहोत. सार्वजनिक व्हायला, वागायला, बोलायला आपल्याला आवडते. आपली उत्सवप्रियता हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. जन्माला आल्यापासून हॉस्पिटलात सगळ्या नातेवाइकांचा लोंढा आपल्याला भेटायला येतो, तिथपासून ते परलोकीचा प्रवास सुरू होताना सगळे खांद्यावर नेतात तिथपर्यंत आपल्या जगण्यातला कुठलाच क्षण तसा खासगी नसतो. बारशापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक कार्याला सगळा कुटुंबकबिला हजर पाहिजेच. लहान मूल असल्यापासून ते लग्न होऊन आपल्याला मूल झालं तरी आपल्याला सल्ले देणारे थोर लोक आपल्या आजूबाजूला कायम हजर असतातच. त्यातच आपण मध्यमवर्गीय लोक राहतो त्या चाळी, गावातली घरं, गल्ल्या, वाडे आणि अगदी शहरातल्या सोसायट्या यातल्या खासगीपणाविषयी काय बोलावे? शेजाऱ्याचा संसार आपलाच आहे, असं समजून त्याला प्रेमानं सल्ला देणारे शेजारी आपल्या इथं काही कमी नाहीत. 'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' ही आपली लाडकी वृत्ती... अन् कुठलंही गॉसिप ही तर आपली राष्ट्रीय आवड! त्यातल्या त्यात लग्नानंतर हनीमूनला सोबतीला चार नातेवाइक येत नाहीत, एवढाच काय तो दिलासा...
अशा या आपल्या अतिसार्वजनिक देशात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच 'खासगीपणा (मराठीत प्रायव्हसी) हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे,' असा निकाल दिल्यानंतर तर आम्हास हसूच आवरेना. आम्ही आमचा खासगीपणा आम जनतेला केव्हाच आंदण दिलाय, हे कोण सांगणार यांना? गमतीचा भाग बाजूला ठेवला, तरी मुळात खासगीपणा ही तशी महाग चीज आहे. ती आमच्या इथं अनेकांना परवडतच नाही, हे दारूण वास्तव लक्षात घ्यायला हवं. 
एक काळ असा होता, की आपलं सगळंच जगणं सार्वजनिक होतं..! विशेषतः ज्यांचं लहानपण वाड्यातल्या दहा बाय दहाच्या खोलीत गेलंय अशा पिढीला हे अगदी पटेल... जिथं मुलग्यांना आंघोळीला सार्वजनिक नळ अन् मुलींना खोलीतली कोपऱ्यातली मोरी; जिथं सकाळी कोण किती वाजता 'मागे' जातो याची सर्वांना खबर, तिथं कसलं आलंय खासगी आयुष्य? आज कोणाकडं जेवायला काय बेत आहे, ते कोणाच्या घरी काय 'अडचण' आहे हे सगळंच सगळ्यांना ठाऊक असे. महानगरांतल्या चाळींत तर याहून भयानक परिस्थिती... पती-पत्नीला एकत्र यायचं तर घरातल्या सर्वांनी ठरवून बाहेर जेवायला किंवा फिरायला जायचं... आणि तासाभरात परत येऊन सगळ्यांनी एकाच अंथरूणावर पडायचं... घरातली तरुण बहीण ऋतुमती झाली, हे वाड्यातल्या काकवा-मावशांना आधी कळायचं आणि कित्येक वर्षांनी मग त्या बहिणीच्या धाकट्या भावाला! तीच गोष्ट भाऊरायाच्या वयात येण्याचीही! ते तर जणू सगळ्यांनी गृहीतच धरलेलं असायचं. सार्वजनिक बागांचे आडोसे आणि समुद्रकिनारे यांना अदृश्य भिंती बांधून, आमच्यातल्या कित्येक पिढ्यांनी आपलं पहिलंवहिलं चुंबन घेतलं! इराण्याच्या हॉटेलांतल्या खासगी रूमसाठी नंबर लागायचे. तिथं प्रेयसीला घेऊन अर्धा तास बसता आलं, तरी स्वर्गसुख अशी अवस्था होती. 
या सार्वजनिकपणाचे फायदे होते, तसे तोटेही होतेच. म्हणजे घरात कुणी आजारी पडलं, तर त्याला दवाखान्यात नेण्यापासून घरी डबे देण्यापर्यंत सगळी मदत शेजारीपाजारी करीत. कुणी गेलं, तर सगळं उत्तरकार्य हेच लोक पार पाडीत. हे नक्कीच फायदे होते. पण कुठल्याही व्यक्तिविशेषाला स्वतःचं असं काही मत किंवा खासगीपण नसे. एखादा मुलगा दहावी झाला, की त्यानं पुढं काय करायचं हे आधी तो सोडून त्याच्या घरातले सर्व आणि मग शेजारचे काका, पलीकडचे भाऊ आदी मंडळी ठरवीत. तीच गोष्ट मुलींचीही! ती जरा वयात येण्याचा अवकाश, शेजारपाजारची अदृश्य 'वधूवर सूचक मंडळं' अचानक कार्यान्वित होत आणि त्या मुलीची इच्छा काय, तिला पुढं शिकायचंय की नाही याचा कुठलाही विचार न करता, 'चांगलं स्थळ मिळतंय तर घे बाई पदरात पाडून,' म्हणत तिला बोहोल्यावर चढवलं जाई. अशी कित्येक वर्षं गेली. काळ बदलला. लोकांचं जगणं बदलू लागलं. पुढच्या पिढ्यांनी आपलं गाव, शहर, राज्य, देश सोडून दुसरीकडं जाण्याचं धैर्य दाखवलं (की कदाचित या अतिसार्वजनिकपणाला कंटाळून पहिली संधी मिळताच त्यांनी त्याचा त्याग केला?) आणि त्यांच्याकडं मग पैसा खेळू लागला. पैसा मिळाला, तशी त्यांच्याकडं ऐहिक सुखसाधनांची रेलचेल झाली. आता खासगीपणा परवडू शकेल, अशी स्थिती आली.
आता महानगरांतल्या सामाजिक स्थितीनं एकदम १८० अंशांचं वळण घेतलं. खासगीपणाचं महत्त्व सगळ्यांच्या हळूहळू ध्यानी येऊ लागलं. त्याचा पहिला फटका एकत्र कुटुंबव्यवस्थेला बसला. घरं वेगळी झाली. संसार फुटले. 'न्यूक्लिअर फॅमिली' जन्माला आली. पती-पत्नीला हक्काचा एकांत आणि 'खासगीपणा' मिळू लागला. खासगीपणाचा एक फायदा असा, की माणूस स्वतः विचार करायला लागतो. दुसऱ्याच्या डोक्यानं आयुष्य घालवायची सवय लागलेल्या एका पिढीला हा खासगीपणा काही मानवेना. मग त्यांची द्विधा अवस्था झाली. एकत्र कुटुंबपद्धती नष्ट झाल्याबद्दल सर्वाधिक गळे काढले ते याच पिढीनं. त्यांची पुढची पिढी (म्हणजे जे आत्ता साधारण चाळिशीत आहेत असे सगळे) मात्र लहानपणापासून या खासगीपणाचा फायदा घेतच वाढली. त्यामुळं या पिढीला खासगीपणाचं, स्वतःच्या आणि इतरांच्या 'स्पेस'चं महत्त्व चांगलंच कळत होतं. त्याच वेळी या काळापर्यंत एकत्र कुटुंबवाली सगळीच पिढी नष्टही झाली नव्हती. विशेषतः छोट्या गावांत, मध्यम शहरांत ती बऱ्यापैकी अस्तित्वात होती. त्यामुळं या पिढीनं या दोन्ही प्रकारांचा अनुभव घेतला. दोन्हीतल्या बरे-वाईट गोष्टी सोसल्या. त्यामुळं माझ्यासारख्याच्या पिढीला या दोन्ही गोष्टींतला समन्वय साधता येतो आणि त्याचा आनंद आहे. आम्ही काही प्रसंगी पुरते सार्वजनिक असतो आणि त्याच वेळी काही प्रसंगी अत्यंत खासगीही असतो. दुसऱ्याचंही आयुष्य असंच असू शकेल, याची आम्हाला कल्पना आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. 
पुढं काळ आणखी बदलला आणि ही पिढीही पालकांच्या भूमिकेत आली. त्यांची मुलं एकविसाव्या शतकात जन्मलेली आणि फारच आधुनिकोत्तर काळातली. तोपर्यंत या पिढीनं जागतिकीकरणाचे सर्व फायदे उपभोगून (अर्थात त्यासाठी भरपूर कष्टही उपसून) आपली जीवनशैली जवळपास जागतिक स्तरावर नेऊन ठेवली होती. नेमका हाच काळ होता दळणवळण तंत्रज्ञानातील क्रांतीचा. डेस्कटॉपवरील ई-मेलरूपी इंटरनेट वापरापासून सुरू झालेला हा प्रवास अवघ्या दहा-पंधरा वर्षांत स्मार्टफोनपर्यंत येऊन पोचला. जग लहान झालं... 'ग्लोबल व्हिलेज' झालं. सोशल मीडिया उपलब्ध झाला. गेल्या पाच-सात वर्षांत फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर आदी साधनांमुळं तर माणसांना कथित सोशल नेटवर्किंगचं व्यसनच जडलं. नुकतं नुकतं खासगीपणाचं महत्त्व ओळखलेली आमची पिढी पुन्हा 'सार्वजनिक' होऊ लागली. यातली विसंगती अशी, की जिवंत माणसांबरोबरचे संवाद खुंटले आणि आभासी जगाशी आभासीच 'संवाद' सुरू झाला. हा संवाद एकतर्फी होता, आपल्याला हवा तसा होता. त्यामुळं त्याचं व्यसन सुटणं अवघड झालं. एकीकडं प्रचंड खासगीपणा जपताना दुसरीकडं या सोशल मीडियाच्या अटी व शर्ती (न पाहताच) मान्य करून, आपली सर्व खासगी माहिती सहज त्याच्याकडं सुपूर्द करून टाकली. आता 'गुगल' मला उठता-बसता सांगू लागलं, की तुझ्या ऑफिसची वेळ झाली; उठ. इकडून जा, तिकडे गर्दी आहे! काल त्या तमक्या रेस्टॉरंटला कॉफी प्यायलास! कशी वाटली सांग... आज हे दुसरं तसंच रेस्टॉरंट ट्राय करतोस का? परवा त्या ढमक्या कंपनीचा शर्ट घेतलास म्हणे. आम्ही सांगतो, आज या या मॉलमध्ये जा... तिथं 'सेल' लावलाय तुझ्यासाठी... आज ऑफिसला जाणार नाहीयेस का? मग तुझ्या घराजवळ हे मल्टिप्लेक्स आहे. तिथं साडेबाराचा शो बघतोस का? तुला दोन तिकिटं सवलतीत मिळतील बघ. ती अमुक तमुक तुझ्या पोस्टवर सारखी कमेंट करीत असते. तिला हे हे आवडतं... तिचा वाढदिवस जवळ आलाय. बघ, हे घेतोस का तिच्यासाठी? इव्हेंट क्रिएट करतोस का? की आम्ही करून देऊ? मागच्या वर्षी तू या वेळी पावसाळी ट्रेकला गेला होतास... यंदा नाही जात आहेस? हा हा ट्रेक आहे बघ या वीकएंडला... बघ जातोस का?....
एक ना दोन... अहो, आम्ही आमचं सगळं आयुष्यच या 'गुगल महाराजां'च्या हवाली करून टाकलंय. तिकडं अमेरिकेत बसून हे महाशय आमचा सगळा डेटा प्रोसेस करतात. आम्ही काय करतो, काय खातो, काय पितो, कुठं जातो, कुणाबरोबर जातो, किती वेळा जातो याचा सगळा हिशेब ठेवतात. दुसरीकडं आमच्या मायबाप सरकारनं त्या आधार कार्डावर आमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन ठेवलेयत. त्या फुकटात सिमकार्ड वाटणाऱ्या कंपनीच्या मोहात अडकून आम्ही त्यांचं कार्डही घेतलंय. वर त्यांचं अॅप डाउनलोड केलंय. त्यांच्या सर्व अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. फुकट इंटरनेट डेटा मिळविण्याच्या बदल्यात आम्ही आमचं आख्खं आयुष्यच त्यांच्या हवाली केलंय... 
आता सांगा, आम्ही पूर्वी अधिक खासगी होतो की आत्ता? काहीच कळत नाहीय...
पण म्हणूनच एक गोष्ट नक्की, खासगीपणा आणि आपली 'स्पेस' ही आपल्या या देशात आजही तशी फार महागाची गोष्ट आहे. 
---

(मटा, पुणे आवृत्तीत २७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
----

17 Aug 2017

मला काहीच प्रॉब्लेम नाही - रिव्ह्यू

होय, मला प्रॉब्लेम आहे!
--------------------------

समीर विद्वांस या दिग्दर्शकाचं काम मला आवडतं. त्याचे 'डबलसीट' आणि 'वायझेड' हे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. त्याचा यंदा आलेला सिनेमा आहे 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' महानगरी तरुण दाम्पत्याचा उभा छेद घेणारा हा चित्रपट असून, तो त्यानं अत्यंत सहज-सोप्या, सुंदर रीतीनं हाताळला आहे. सुखासीन आयुष्यातूनही माणसाला हवं असलेलं सुख मिळतंच असं नाही; त्यासाठी पैशांव्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते, असा म्हटलं तर बाळबोध, म्हटलं तर आत्ताच्या काळाला अनुसरून अगदी योग्य असा संदेश हा सिनेमा आपल्याला देतो. सिनेमात काही त्रुटीही आहेत. पण त्यांच्याकडं थोडं दुर्लक्ष करून पाहता येईल, अशी ही कलाकृती आहे. प्रमुख जोडीचा उत्तम अभिनय, चांगलं संगीत, चांगली गाणी आणि जोडीला चांगलं चित्रिकरण यामुळं हा सिनेमा पाहणं सुखावह ठरतं.
केतकी (स्पृहा जोशी) आणि अजय (गश्मीर महाजनी) या जोडीची ही गोष्ट आहे. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलेलं हे जोडपं. लग्नानंतर सात वर्षांनी आपली गोष्ट सुरू होते. या काळात या दोघांना एक छान मुलगा झाला आहे. पण मुंबईतल्या अत्यंत बिझी लाइफस्टाइलमध्ये हे दोघे हरवून गेले आहेत. केतकीच्या शब्दांत सांगायचं, तर त्यांचं आयुष्य 'ऑटो पायलट' मोडवर टाकल्यासारखं सुरू आहे. तिला हे अजिबात मान्य नाही. मुलाच्या शाळेत मीटिंगला यायला अजयला वेळ नसणं, रोज उशिरा घरी येऊन मद्यपान करणं इथपासून सेक्स लाइफमधल्या कंटाळ्यापर्यंत केतकीला अनेक गोष्टींत प्रॉब्लेम आहेत. आपण उगाच एकमेकांसोबत राहतोय की काय, असंही तिला वाटत राहतं. तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच डॉमिनेटिंग आहे आणि ते तिलाही माहिती आहे. अजयला अनेकदा काही तरी बोलायचं असतं, पण तेही तो बोलू शकत नाही, हेही तिला माहिती आहे. त्याच्या या स्वभावामुळं त्यांच्यातला पेच आणखीनच वाढत चाललाय. दोघांच्याही एका जीवलग मित्राची मदत अजय घेऊ पाहतो. तेही केतकीला भयंकर खटकतं. आता या दोघांचं नातं तुटणार असं आपल्यालाही वाटत असतं... त्याच वेळी घराची बेल वाजते. अजयचे आई-वडील, भाऊ-वहिनी वगैरे नातेवाइक नागपूरवरून थेट त्याच्या घरात अचानक टपकतात. (ते असे कसे काय अचानक येतात, असा प्रश्न आपल्यालाही पडतो. पण त्याचं उत्तर नंतर मिळतं.) त्यांच्या येण्यामुळं घरातलं वादळ तात्पुरतं तरी शांत होतं. यानंतर अजयची आई (निर्मिती सावंत) आता केतकीच्या आई-वडिलांची माफी मागायला आपल्याला कोकणात त्यांच्या घरी जायचंय, असं जाहीर करते.
मध्यंतरानंतरचा सगळा चित्रपट मग अर्थातच कोकणात, केतकीच्या घरी घडतो. नागपूरचं कुटुंब कोकणात आल्यानंतर जे काही प्रादेशिक वाद-विसंवादाचे प्रसंग घडतात, तेच इथेही घडतात. त्यातून मग या दोघांच्या नात्याचं पुढं काय होतं, याची ही गोष्ट आहे.

समीर विद्वांसचे सिनेमे लखलखीत असतात. त्याची पात्रं आजच्या काळातली असतात, आजच्या पिढीची भाषा बोलतात, ती आपल्या आजूबाजूला सतत दिसत असतात... त्यामुळं समीरच्या सिनेमांविषयी मनात एक नकळत जिव्हाळा उत्पन्न होतो. त्यानं या सिनेमात रंगवलेल्या जोडप्याशी आजच्या काळातली अनेक जोडपी शंभर टक्के स्वतःला 'रिलेट' करू शकतील. किंबहुना ही आपलीच गोष्ट सांगितली जात आहे, असंही त्यांना वाटेल. या सिनेमात पूर्वार्धात त्यानं या दाम्पत्याच्या जगण्यातला ताण अत्यंत प्रभावीपणे दाखविला आहे. त्यासाठी त्यानं वापरलेलं नेपथ्य, चित्रचौकटी पाहण्यासारख्या आहेत. अप्पर वरळीसारख्या अपमार्केट भागातील टोलेजंग इमारतीत २३ व्या मजल्यावर त्यांचा भलामोठा फ्लॅट असणं, त्यात फ्लॅटमध्ये तीनच माणसं असणं (त्या फ्लॅटमधला दालीचा फोटो लक्षणीय!), याशिवाय हे दोघंही बोलत असताना त्या चौकटीत सतत पार्श्वभूमीवर दिसत राहणारी मुंबईची स्कायलाइन यातून 'गर्दीतले एकटे' अशी त्या दोघांची झालेली स्थिती दिग्दर्शक फार नेमकेपणानं दाखवतो. दोघांमधल्या स्वभावातला फरक, परिस्थितीवर दोघांचं वेगवेगळं रिअॅक्ट होणं हे स्पृहा आणि गश्मीरनं फार छान दाखवलंय. या दोघांमधले ताण-तणाव हल्लीच्या काळातली जवळपास सगळेच जोडपी सहन करीत असल्यानं ते समजून घेणं प्रेक्षकांना सोपं जात असावं. विशेषतः केतकीला या नात्याविषयी नक्की काय वाटतंय ते खूप महत्त्वाचं आहे. ते केतकी नीट सांगू शकते आहे आणि आपणही तिची भूमिका, तिचं मत समजून घेऊ शकतो, हे दिग्दर्शकाचं यश आहे. 
सिनेमा मध्यंतरानंतर एकदम कोकणातल्या केतकीच्या घरी शिफ्ट होतो. यामुळं सिनेमाचे रचनात्मकदृष्ट्या सरळसरळ दोन भाग पडतात. पहिल्या भागात दोनच पात्रांचा जास्तीत जास्त वावर आणि उत्तरार्धात पात्रांची गर्दीच गर्दी असं झाल्यानं हा उत्तरार्ध एकदम अंगावर येतो आणि पूर्वार्धाशी मिसळून न आल्यासारखा वाटतो. अर्थात दिग्दर्शक लवकरच सर्व गोष्टी सुविहितपणे घडवतो आणि सिनेमा पूर्ण विस्कळित होण्यापासून वाचतो. या भागात केतकी आणि अजयच्या जवळच्या नातेवाइकांच्या नात्यांतील ताणही दिग्दर्शक दाखवू इच्छितो. यात केतकीची विधवा आत्या आणि अजयचा मोठा भाऊ व वहिनी यांचे समांतर उपकथानक थोडक्यात येतं. केतकी आणि अजयचे आई-वडील मान-पानासकट सर्व काही विधी, शांत वगैरे रीतसर करू पाहतात, तेव्हा केतकीचा असल्या कर्मकांडांवर नसलेला विश्वास आणि घरच्यांचं ऐकायचं की केतकीचं या द्विधा अवस्थेत सापडलेला अजय यांचं वेगळंच द्वंद्व समोर येतं. यातही पाळीच्या प्रसंगावरून आणि आत्याला ओवाळण्यासाठी न बोलावण्यावरून केतकीची आणखी चिडचीड होते आणि अजयची गोची आणखी वाढते... अजयचे वडील आणि त्याच्या नात्याचाही एक धागा समोर येतो आणि अखेर अजय जेव्हा त्यांना सडेतोडपणे काही सुनावतो, तेव्हा केतकीलाही आपला नवरा असं बोलू शकतो, याची जाणीव होते...
अखेर नात्यांच्या या प्रॉब्लेमचा गुंता सकारात्मक नोटवरच सुटतो... मुळात आपल्यासमोर भरपूर प्रॉब्लेम असताना आपण 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असं सतत म्हणत, त्या प्रॉब्लेमपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याऐवजी केतकीसारखं त्या प्रॉब्लेमच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याचं अस्तित्व मान्य केलं, तर बरेच प्रॉब्लेम सहजी सुटण्यास मदत होते, असं काहीसं समीर विद्वांस आपल्याला या कलाकृतीच्या माध्यमातून सांगू पाहतो. त्यापैकी बरेचसे मुद्दे आपल्याला पटतात. कौस्तुभ सावरकर यांचे संवाद झक्कास जमलेले!
सिनेमात चार गाणी आहेत. ती चांगली जमली आहेत. ्याचं श्रेय संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज आणि गीतकार वैभव जोशी व गुरू ठाकूर यांचं. त्यातलं वैभव जोशींचं 'मौनातुनी ही वाट चालली पुढे पुढे' हे खास आहे. प्रसाद भेंडे यांची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. कोकणाचं दर्शन सुखद. मुख्य रोलमध्ये स्पृहा आणि गश्मीरनं चांगली कामं केलीयत. निर्मिती सावंत, सतीश आळेकर, मंगल केंकरे, सीमा देशमुख, विजय निकम, विनोद लव्हेकर यांनीही आपापली कामं चोख बजावली आहेत. त्यामुळं सिनेमा कुठंही कंटाळवाणा होत नाही. 

तेव्हा एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पाहायला हरकत नाही.
---
दर्जा - साडेतीन स्टार
---

30 Jul 2017

रविवारसाठी लेख - दाद

ही 'दाद' आहे?
-----------------


एखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो... किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते... आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो... मूडच जातो...
हल्ली असं बऱ्याचदा घडतं. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे? कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी! त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय? काही तरी चुकतं आहे हे नक्की...
कला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.
याचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत. अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे!) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातील ५५ वर्षांची प्रौढ स्त्री एका तरण्याबांड जलतरण प्रशिक्षकाशी फोनवर बोलून तिची लैंगिक सुखाची फँटसी अनुभवत असते. यात ती अनेकदा त्याच्याशी एरवी ज्याला चावट म्हणता येईल, अशी वाक्यंही बोलत असते. आता वास्तविक पाहता, हे काहीसे करुणात्मक दृश्य आहे. त्या महिलेच्या बाजूने जरा विचार केला, तर तिच्या आयुष्यात ती या साध्या सुखालाही पारखी झाल्याचे दिसून येते. तेव्हा तिची ती धडपड पाहताना वाईट वाटते किंवा तिच्याविषयी करुणा उत्पन्न होते. आता ही भावना समजून न घेतल्याने काही जणांकडून तिच्या त्या फोन कॉलच्या वेळी (अस्थानी) हशा येतो. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही. 
आपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.
आपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा बनतो.
दाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दिलेली दाद त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. अशी दाद सर्वांना देता यावी आणि सगळे कणसूर लोप पावून आनंदगाणं सुरेल व्हावं, एवढीच साधी अपेक्षा!
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, ३० जुलै २०१७) 
---

23 Jul 2017

लिपस्टिक अंडर माय बुरखा - रिव्ह्यू

बाईच्या 'फँटसी'ची फँटॅस्टिक गोष्ट...
------------------------------------------




फँटसी ही गोष्टच अद्भुत... दुसऱ्या दुनियेत नेणारी... त्यात ती बाईची फँटसी असेल तर... आणि त्यातही ती तिच्या लैंगिकतेची फँटसी असेल तर..? या 'फँटसी'ची आपण कल्पनाही कदाचित करू शकणार नाही. पण जिथं कदाचित कल्पनाही पोचू शकत नाही, अशा अज्ञात जागांची सफर करणं हे तर कलाकारांचं काम असतं. त्यातूनच कलाकृती जन्माला येतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात... 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ही अशीच एक कलाकृती आहे. वरकरणी 'ब्लॅक' कॉमेडीचा 'बुरखा' (Pun Intended) पांघरलेली, पण आतून खूप काही तरी निराळं सांगणारी ही एक फँटसीची फँटॅस्टिक गोष्ट आहे. दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवनं ही आगळीवेगळी 'लिपस्टिक' आपल्यासमोर अशा काही तडफेनं सादर केलीय, की बस्स!
माणसाची लैंगिक प्रेरणा ही आदिम गोष्ट... पण आज २०१७ मध्येही आपण त्याविषयी नीट बोलत नाही. आपल्या दांभिक मानसिकतेचा हा क्लासिक नमुना आहे. आपली लैंगिकता किंवा ती भावना ही आपल्या हगण्या-मुतण्याइतकीच नैसर्गिक गोष्ट; पण वर्षानुवर्षं गोपनीयतेच्या बुरख्यात दडवली गेली. त्यातही बाईच्या लैंगिकतेविषयी बोलायचं तर अब्रह्मण्यम! आणि त्यातही तिनं स्वतःच बोलायचं म्हणजे तर अबबच!

SPOILER AHEAD

अशा वेळी मग अलंकृता आपल्याला भोपाळच्या चार बायकांची गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे या बायकांच्या लैंगिक प्रेरणांची, त्याच्या दमनाची, उद्वेगाची आणि उद्रेकाचीही! यातल्या दोन जणी मुस्लिम आहेत हा योगायोग. पण गोष्टीसाठी महत्त्वाचा... आणि मुस्लिम म्हणून त्या बायकांच्या होणाऱ्या जास्तीच्या कोंडीचं एक वेगळं परिमाण या गोष्टीला लाभतंच. उषा परमार ऊर्फ बुवाजी ऊर्फ 'रोझी' (रत्ना पाठक-शाह), शिरीन (कोंकणा सेनशर्मा), रेहाना (प्लबिता बोरठाकूर) आणि लीला (आहना कुमरा) या चार वेगळ्या वयोगटातल्या, वेगळ्या परिस्थितीतल्या बायका... त्यांच्यातला समान धागा एकच... सध्या त्या जे जगताहेत त्यात त्यांना समाधान नाही.
बुवाजी ५५ वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी त्या (पती निधन झालेलं असल्यानं) एक देवधर्म करणाऱ्या ज्येष्ठ महिला आहेत. असं असलं, तरी बुवाजींच्या आतली (कदाचित कित्येक वर्षं उपाशी राहिलेली) स्त्री अजून जिवंत आहे. ती आतून वेळी-अवेळी धडका देत असते. मग देवधर्माच्या पुस्तकांच्या मध्ये 'त्या' रंगीत कादंबऱ्या वाचून बुवाजी आपल्या इच्छांची अर्धीमुर्धी पूर्ती करीत असतात. अशाच एका कादंबरीची नायिका असते 'रोझी'. बुवाजी 'रोझी' वाचत जातात आणि ही गोष्टच या सिनेमाचंही निवेदन बनते. एकदा काही कारणाने बुवाजींची गाठ एका स्विमिंग ट्रेनर तरुणाशी पडते. त्या तरुणाचा कमावलेला घाटदार देह बुवाजींच्या मनातल्या दबलेल्या भावनांवर अलगद फुंकर घालतो.
रेहाना टिपिकल मुस्लिम घरातली कॉलेजवयीन मुलगी आहे. तिला इंग्लिश गाणी पाठ आहेत आणि स्पर्धेसाठी ऑडिशन द्यायचीय. एरवी सक्तीनं बुरखा वापरावा लागणारी रेहाना कॉलेजमधील 'जीन्स हटाव'विरोधी मोर्चात उत्साहानं सामील होते. तिला हव्या त्या वस्तू मिळविण्यासाठी मॉलमध्ये चोरी करायची सवय लागते. रेहानाचं एका हिंदू मुलावर प्रेम आहे. हा मुलगा तिच्याच मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे.
लीलाचं अर्शद नावाच्या एका मुस्लिम फोटोग्राफरवर प्रेम आहे. पण तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न एका दुसऱ्या तरुणाबरोबर ठरवत आहेत. लीला ब्यूटिशियन आहे आणि तिला या छोट्या शहराचा कंटाळा आलाय. लीलाची कामभावनाही जरा जोरकस आहे.
शिरीन चोरून सेल्सचं काम करते आहे. तिला तीन मुलं आहेत आणि नवरा सौदीतील नोकरी सोडून परत आलाय. शिरीनच्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईसोबत अफेअर चालू आहे. लैंगिक संबंधांबाबत तो इतर सनातनी भारतीय पुरुषांसारखाच आहे. त्याला काही झालं तरी कंडोम वापरायचा नाहीय आणि बायकोचे तीन गर्भपात झाले तरी त्याला फिकीर नाहीय. लैंगिक संबंध ही दोन व्यक्तींचा सहभाग असलेली क्रिया असते आणि त्यात समोरच्या व्यक्तीलाही काही 'से' असू शकतो, ही गोष्ट त्याच्या आकलनापलीकडची आहे. (त्याचे आणि शिरीनचे संबंध पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाच शिसारी येते, तर शिरीनचं काय होत असेल?) शिरीनला या सगळ्याचा वीट आलाय आणि तिला सेल्स ट्रेनर म्हणून आलेली ऑफर नवऱ्याची पर्वा न करता स्वीकारायची आहे.
या चारही मुली/बायका बुवाजीच्या हवेलीत राहत असतात. जुन्या आणि नव्या भोपाळच्या नेपथ्यावर ही गोष्ट घडताना पाहणं फारच अर्थपूर्ण आहे. तिथल्या जुन्या गल्ल्यांप्रमाणे आपल्या रुढी-परंपरांची वस्ती या बायकांच्या अवतीभवती एखाद्या नागासारखी वेटोळं घालून आहे. नव्या भोपाळमध्ये मॉल आहेत. चकाचक सौंदर्यप्रसाधनं विकली जातायत. बुवाजीला स्विमिंग शिकायला जाताना नवा स्विम सूट घ्यायचा आहे तर या मॉलमध्येच जावं लागतं. तिथल्या सरकत्या जिन्यावरून वर जाताना ती अडखळते. तेव्हा छोट्या मुस्लिम मुलींचा एक घोळका सराइतपणे त्या सरकत्या जिन्यावरून वर जातो आणि त्यातली शेवटची मुलगी नकळतपणे बुवाजीचा हात धरून तिला वर नेते, हा फार सुंदर शॉट यात आहे. बुवाजी नंतर 'रोझी' बनून स्विमिंग ट्रेनर जसपालशी बोलू लागते. नंतर तर हा फोन हीच तिच्या आयुष्यातली मोठी फँटसी बनून जाते. बुवाजी आणि जसपाल फोनवरून शृंगारिक बोलत असतानाचं एक अप्रतिम दृश्य यात आहे. यात रत्ना पाठक शाहनं केलेला अभिनय जबरदस्त. कित्येक वर्षं लैंगिक भूक न भागलेल्या स्त्रीच्या सर्व भावभावना तिनं केवळ चेहऱ्यावरून व्यक्त केल्या आहेत.
कोंकणा सेनशर्माची शिरीनही अशीच जबरदस्त! लीला तिचं वॅक्सिंग करत असतानाचा शॉट व तेव्हाचे दोघींचे संवाद भारी आहेत. पती जवळपास रोज जबरदस्ती करीत असताना, तीन मुलांना वाढवताना, वेगवेगळ्या घरी घुसून वस्तू विकताना शिरीननं 'सेन्स ऑफ ह्यूमर' जपला आहे आणि तो कोंकणानं फार छान दाखवला आहे. ती अभिनेेत्री म्हणून ग्रेट आहेच. पण शिरीन साकारताना कोंकणानं खूपच मोठी मजल मारली आहे, असं म्हणावंंसं वाटतं. ती पहिल्यांदा ज्या बाईच्या घरी घुसते तेव्हाचा प्रसंग, नंतर नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये पाहते तो प्रसंग आणि नंतर त्या बाईच्या घरी जाऊन 'मेरी मूँह की चीज तुम क्यूं इस्तेमाल करोगी?' म्हणतानाचा तिचा ॲटिट्यूड... इतर सगळं काही खल्लास करून टाकते ती!
लीला झालेल्या आहना कुमरानंही तिची तडफड फार प्रभावीपणे दाखविली आहे. काही स्त्रियांचा 'सेक्स ड्राइव्ह' खूपच जास्त असतो. लीला अशांपैकी एक. तिचं प्रेमप्रकरण कुणी समजून घ्यायला तयार नाही, तर ही भावना समजून घेणं दूरच. एरवी संधी मिळेल तिथं तिला 'घेणारा' तिचा मित्रही शेवटी तिच्या या पवित्र्यापुढं वैतागतो. मग होणाऱ्या नवऱ्यासोबत लीलाला ते हवं असताना तो हनीमूनची वाट पाहायला सांगतो, तेव्हा लीलाला त्याला काय सांगावं, हे उमगत नाही.
रेहाना वयानं अद्याप लहान आहे. पण तिला आपल्याला काय आवडतं, काय हवं हे नक्की माहिती आहे. मॉलमधून लिपस्टिकपासून ते शूजपर्यंत अनेक वस्तू चोरून नेताना तिच्या मनातल्या अभिलाषेनं तिच्या सारासार विवेकबुद्धीवर मात केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. रेहानासारख्या अनेक मुली आज मध्यम आकाराच्या शहरांमध्ये अस्वस्थपणे आपल्याला हवा तो आनंद शोधण्यासाठी तडफड करीत आहेत.
या चारही स्त्रिया शेवटी एका मेळ्याच्या निमित्तानं एकत्र येतात. प्रत्येकीच्या गोष्टीचा (बहुतांश लॉजिकल) शेवट होतो. आपण तो शेवट गृहीतच धरलेला असतो. पण आपल्या अपेक्षेपेक्षा या बायका अधिक समजूतदार निघतात. 'रोझी' शेवटी स्वप्नातच भेटणार, हे प्रत्येकीला उमगतं... पण तरीही आपल्या इच्छा मारायच्या नाहीत, आपण स्वप्नं पाहायचं सोडायचं नाही, असा दिलासा त्या एकमेकींना देतात.
अलंकृता श्रीवास्तव हिचा हा पहिलाच सिनेमा. अनेक अडचणींनंतर तो पडदा पाहतो आहे. सिनेमाचं 'मधलं बोट'रूपी लिपस्टिक दाखवणारं पोस्टरही अर्थपूर्ण आहे. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी आणि मुळातच एक व्यक्ती म्हणून स्त्रीच्या भावभावनांविषयी आपण जरा अधिक संवेदनशील झालो, तर या सिनेमाचं सार्थक होईल.
मग एकदम विचार आला, या सिनेमाविषयी आपण विचार करतोय तोही एका पुरुषाच्या अँगलनं... मुळात तिचं तिला ठरवू देत काय ते... हे चूक हे बरोबर हे सांगणारे आपण कोण?
या भावनांचं दमन होतंय, त्या भावनांचा उद्रेक होतोय, तमक्या भावनांना वाट मिळाली पाहिजे... हे सांगणारा मी कोण?
हा विचार मनात आला आणि मी 'ऑफ'च झालो...
----
दर्जा - साडेतीन स्टार
---

20 Jun 2017

जत्रा - योग दिवस लेख

काही नवी योगासने...
-------------------

मोदी सत्तेवर आले आणि २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर झाला, हा काही योगायोग नव्हे! अनेक वर्षांची तपश्चर्या त्यामागं असणार, यात मला तरी काही शंका नाही. हल्लीच्या जगात आपण चारचौघांसारखे राहायचे, त्यांच्यासोबत टिकायचे, तर प्रत्येक गोष्ट चारचौघांसारखी केली पाहिजे, यावर माझा दृढ विश्वास आहे. किंबहुना आपण चारचौघांत राहण्यासाठी जे प्रयत्न करतो, तेही चारचौघांसारखेच असले पाहिजेत; त्यात उगाच काही वेगळेपणा असता कामा नये, यावर माझा कटाक्ष असतो. असं केल्यानंच माझं (हळूहळू उच्च होत जाणारं) मध्यमवर्गीयपण शाबूत राहील, याची मला खात्री वाटते. केवळ याच एका कारणासाठी मी योगासनं करायचा घाट घातला. व्यायाम या प्रकाराशी आमचे पूर्वज पूर्वापार फटकून राहिले आहेत आणि याचे पुरावे त्यांच्या जुन्या फोटोंवरून अगदी जाहीर दिसतात. पूर्वजांची परंपरा मोडण्याची परंपरा आमच्या घराण्यात नसल्यानं मीही व्यायामाशी फटकूनच राहत होतो. मध्यमवर्गीयाला रोजचं जगणं जगताना जी कसरत करावी लागते, ती त्याच्या टीचभर आयुष्यासाठी पुरेसा व्यायाम असते, असं आपलं माझं पारंपरिक मत होतं. मात्र, योग दिवस जाहीर झाला आणि मी माझ्या वैचारिक शवासनातून खडबडून जागा झालो. व्यायामाच्या कल्पनेनं माझं मन मयुरासन केल्याप्रमाणं फुलून आलं. त्या आनंदाच्या भरात माझ्याकडून कुक्कुटासन केलं गेलं आणि हात-पाय सोडवून घेण्यासाठी शेवटी कोंबडीप्रमाणंच फडफड करावी लागली. सुरुवातीला वज्रासन, पद्मासन आदी सोपी आसनं करून मगच उत्तानपादासन, धनुरासन वगैरे बड्या मंडळींकडं वळावं, असं मला वाटू लागलं. (बाय द वे, अंगाची कशीही मुटकुळी केली, तरी ती अल्लाद सोडवून दाखवणाऱ्या आसनाला 'श्रीनिवा-सन' का म्हणू नये?) प्रारंभी घरातल्या घरातच सराव करा, या अर्धांगाच्या आज्ञेला नेहमीप्रमाणं मान तुकवून (हे आमचं फेवरिट आसन आहे. 'वामांगपरोक्षनतमस्तकासन' असं त्याचं नाव आहे!) आम्ही चटई ओढली. टीव्हीवर पहाटे साक्षात रामदेवबाबांची योगासनं सुरू असतात, अशी वार्ता कानी आली होती. कारण एवढ्या पहाटे मी गेल्या कित्येक वर्षांत उठलो नसल्यानं, मला हे काहीच ठाऊक नव्हतं. आपल्या बेडवर देहरूपी होडीची अर्धवर्तुळाकृती गुंडाळी करून 'आंतर्रजईगुडुप्पासन' करण्याची माझी सवय होती. पण हे शवासनाच्या बरंच जवळ जाणारं आसन करण्याची सवय मोडून मला भल्या पहाटे उठावं लागलं. समोर रामदेवबाबा कपालभांती आणि भस्रिका की कायसंसं करीत होते. त्यांचं ते लोहाराच्या भात्याप्रमाणे सटासट आत-बाहेर करणारं पोट पाहून मला तर आकडी आली. मी पोट होता होईल तेवढं आत ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच चटईवर कोलमडासन केलं. माझ्या लत्ताप्रहारानं कोपऱ्यातला एक फ्लॉवरपॉट शहीद झाला. तो हिच्या माहेरून खास गिफ्ट मिळालेला फ्लॉवरपॉट असल्यानं पुढचा अर्धा तास फक्त 'कर्णरंध्रआघातासन' सहन करावं लागलं. कान हा अवयव देवानं माणसाला ऐच्छिक का नाही ठेवला, हा एकच विचार त्या वेळी मनात आला. हिचे संतापाने फुललेले डोळे पाहून माझी आसनं करायची इच्छा तिथंच मटकन खाली बसली. तो दिवस तसाच गेला. मात्र, आंतरराष्ट्रीय योग दिनी आपण एक तरी योगासन यशस्वीपणे करायचं आणि पूर्वजांच्या कीर्तीला बट्टा लावायचा हा माझा निर्धार कायम होता. धीर धरून एका योगा क्लासमध्ये चौकशीला गेलो. रिसेप्शनिस्ट सुदैवानं फक्त 'खुर्चीउबवासन' करीत होत्या. त्यामुळं काम सोपं झालं. त्यांनी मला आत जायला सांगितलं. मुख्य गुरुजी आत होते, असं कळलं. आत गेलो, तर तिथं कुणीच नव्हतं. मग एकदम समोर एका कोपऱ्यात गुरुजी दिसले. ते कुठलं तरी आसनच करीत होते, बहुतेक. त्यांची लांबलचक दाढी लोंबत होती. चेहरा कुठं आहे, याचा साधारण अंदाज घेऊन मी जवळ उभा राहिलो. गुरुजींची दाढी फारच लांब होती. तिला हात लावण्याचा मला अनावर मोह झाला. त्याच वेळी 'बसा...' असा आवाज एकदम जमिनीच्या लगत आला. अरेच्चा! म्हणजे मी जे वर पाहत होतो, ते गुरुजींचं डोकं नव्हतंच तर... जमिनीलगत जवळपास झोपून मी त्या चेहऱ्याजवळ चेहरा नेला, तर मला दुसरा धक्का बसला. ते गुरुजी नव्हते, तर बाई होत्या. ते लांबलचक केस म्हणजे त्यांची वेणी होती. बाईंनी कुठलं तरी असं आसन केलं होतं, की त्यात त्यांचा चेहरा जमिनीवर आणि वेणी अवकाशात पायांवर गेली होती. (की मागं आणखी कुणी दुसरी शिष्याबिष्या होती, देव जाणे.) या आकाराला मनुष्य का म्हणायचं, एवढाच प्रश्न मला पडला. बाई काही काळानंतर मलाही हेच आसन करायला लावतील, या भीतीनं मी तिथून जो पळ काढला, तसा जर मी ऑलिंपिकमध्ये धावलो असतो, तर देशाच्या खात्यात अगदी सुवर्ण नाही, पण किमान ब्राँझ मेडलची भर निश्चित पडली असती! 
एवढं होऊनही मी हटलो नव्हतो. 'हटयोगी'च झालो होतो म्हणा ना! आता मी योगावरची पुस्तकं आणली. त्यात विविध आसनांची चित्रं दाखवली होती. याशिवाय रोजच्या वर्तमानपत्रांतसुद्धा रोज योगासनांवर काही ना काही माहिती येऊ लागली होती. त्यात नवनव्या आसनांचाही समावेश होता. ते पाहून मला आपल्या आजूबाजूला रोज काही नवी योगासनं दिसू लागली. यातली काही अशी -

१. अधोमुखासन - हे आसन हल्ली बरीच मंडळी करताना दिसतात. विशेषतः ज्यांच्या हाती स्मार्टफोन आहे त्या लोकांना तर या आसनाचं व्यसनच जडलं आहे, यात शंका नाही. कायम ही मंडळी आपलं तोंड खाली घालून, मोबाइलमध्ये काही ना काही तरी बघत असतात. 
यामुळं आपला समाज एकाएकी भयंकर नम्र वगैरे झाला आहे, असा भास होतो. हे आसन आपल्याला कुठेही करता येते. मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसलो असताना, घरी पत्नीसोबत गप्पा मारीत असताना, मंगल कार्यालयात, ऑफिसात, रस्त्यावर चालता चालता, बसमध्ये, ट्रेनमध्ये, विमानात, एवढंच काय स्वच्छतागृहातही हे आसन केले जाते. हे आसन करणारा आनंदी असतो, तर त्याकडे पाहणारा त्याला खाऊ की गिळू अशा पवित्र्यात असतो. मात्र, हे आसन आवडणारी लोकं त्याकडं फार लक्ष देत नाहीत. लवकरच या आसनाला आपले राष्ट्रीय आसन जाहीर केले जाईल, अशी आशा आहे.

२. अंगुलीनर्तनासन - हे आसन दोन प्रकारांत केले जाते. एक सर्वसामान्य माणसे करतात. त्यासाठी पुन्हा स्मार्टफोनची गरज असते. हा टचस्क्रीनवाला मोबाइल असल्यानं आपला अंगठा त्यावर सतत वर-खाली नाचत राहतो. काही मंडळींना हे आसन एवढे आवडते, की त्यात त्यांचा अंगठा झिजून झिजून शेवटी फक्त नख राहिल्याचं नंतर त्यांच्या लक्षात येतं. पण मग ही मंडळी नखानं स्क्रीन खाली-वर करायला सुरुवात करतात. अंगठा काय, एक गेला, दुसरा लावता येईल; पण स्मार्टफोनवरची अपडेट्स एकदा गेली की परत कशी पाहायला मिळणार, हाच उदात्त विचार त्यामागं असतो. या आसनाचा दुसरा प्रकार विवाहित पुरुषांनाच अनुभवता येतो. यात आपल्या धर्मपत्नीच्या बोटांच्या खाली-वर होणाऱ्या हालचालींवर नृत्य करीत असल्याचा अप्रतिम आभास या मंडळींना होतो आणि ते व त्यांची पत्नी दोघेही खूश राहतात.

३. खुर्चीबूडघट्टचिकटासन - हे नाव विचित्र असलं, तरी आसन फारच लोकप्रिय आहे. विशेषतः राजकारणी आणि खेळांपासून ते शिक्षण संस्थांपर्यंत प्रत्येक खाऊवाल्या ठिकाणी आपापल्या पदांवर घट्ट चिकटून राहणाऱ्या नरपुंगवांमध्ये हे आसन खासच प्रिय आहे. यात आपल्याला मिळालेली खुर्ची सोडायची नसते. उलट वर्षानुवर्षे त्यावर आपले बूड घट्ट रोवून बसायचे असते. असे केल्याने शारीरिक फायदे काही होत नसले, तरी आर्थिक फायदे मजबूत होतात. हे आसन क्लासमध्ये शिकता येत नाही. त्यासाठी पूर्वी या खुर्चीवर बसलेल्यांच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो.

४. चलनप्रियासन - हे आसन आवडणाऱ्या लोकांना कागदी नोटा खाव्याशा वाटतात. काही जण खातात, तर काही जण त्या अंथरून त्यावर झोपून हे आसन करून पाहतात. विविध सरकारी कार्यालये, विशेषतः महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांमध्ये खालच्या कारकुनापासून ते वरच्या अवर सचिवापर्यंत सर्वांनाच हे आसन अतिप्रिय आहे. या आसनात नोटा स्नानगृहात, बेडरूममध्ये, शॉवर बाथच्या वरच्या बाजूला किंवा फरशी खणून आतमध्ये अशा कुठेही लपवाव्या लागतात. त्यामुळं व्यायाम भरपूर होतो. फक्त हे आसन फॉलो करणाऱ्यांना रात्रीची झोप लागत नाही, एवढीच एक त्रुटी आहे.

५. गलितगात्रासन - हे आसन अजिबात लोकप्रिय नाही. पण या देशात अनेक नागरिकांवर ते लादलं गेलं आहे. आजूबाजूला रोज दिसणारा भ्रष्टाचार, लोकांची गैरवागणूक, बेशिस्त वाहतूक, बेकायदेशीर धंदे, शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात चालू असलेली अनागोंदी, महागाईचा राक्षस, रोजचं अवघड झालेलं जगणं हे सगळं पाहून तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला रोजच हे आसन नाइलाजानं करावं लागतं. यात आपल्याला अतोनात नैराश्य येतं आणि आता काही चांगलं होणे नाही, अशी भावना मनात दाटून येते.

...ही सर्व आसनं दूर करून प्रेमानं खरीखुरी योगासनं करायला मिळतील, तो दिवस माझ्या दृष्टीनं खराखुरा आंतरराष्ट्रीय योग दिवस असेल. हा दिवस पाहण्याचा 'योग' कधी येतो, ते पाहू!

---
(पूर्वप्रसिद्धी : जत्रा, जून २०१५)

13 Jun 2017

किरण राव लेख

ई-धोबीघाट...
-------------

(किरण राव स्वतःचा ब्लॉग लिहिते आहे, असे कल्पून) 
------

मी किरण राव. एक स्वतंत्र आणि आझाद स्त्री. हां, अगदी आमीर स्त्री म्हटलं तरी चालेल. पण आमीरची स्त्री म्हणू नका. माझं मन दुखावेल. तसंही आम्हा बायकांचं मन ही मोठी नाजूक गोष्ट आहे. एवढ्यातेवढ्या कारणानंही आमचं बिनसतं आणि आमचं हळवं मन दुखावतं. अर्थात मी फक्त माझाच विचार करते. दुसऱ्या स्त्रीचा विचार केला असता, तर माझं लग्नच झालं नसतं. पण ते जाऊ द्या. दुसऱ्याचं लग्न ही चर्चेची अन् आनंदानं गॉसिप करायची गोष्ट असली, तरी स्वतःचं लग्न ही तशी नक्कीच नव्हे. त्यातून आम्ही दोघंही पुरोगामी विचारसरणीचे असल्यामुळं आम्हाला मुळात लग्नच करायचं नव्हतं. पण एकाच घरात दोन बायका नांदणं कठीण. म्हणून मग शेवटी यांनीच काडी मोडली. मला काडीचाही फरक पडत नाही. शिवाय आपल्याकडं 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या लोकांकडं सोसायटी अजूनही त्यांना जणू पाठी एक शेपटी असावी, अशा पद्धतीनं पाहते. शेपटी सोडा, पण मला कधी केसांचा शेपटाही नव्हता. कारण... तेच. मी पुरोगामी आहे. बायकांनी अधोवदनी राहून सदैव केस विंचरत बसावं याला माझा एक स्त्री म्हणून कायमच विरोध आहे. लहानपणी आई माझी वेणी घालायची, तेव्हाही मी तिला विरोध केला होता. पण पाठीत एक धपाटा मिळायचा आणि गुपचूप वेणी घालून घ्यावी लागायची. मी घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदा काय केलं असेल, तर हे केस कापून टाकले. केस धुण्याचा आणि वाळवण्याचा मला कंटाळा असला, तरी कपडे धुण्याचा, किंवा फॉर दॅट मॅटर, काहीही धुण्याचा मला विलक्षण छंद आहे. नादच आहे म्हणा ना. जमल्यास मला हा सगळा बुरसटलेला समाज धुवून स्वच्छ करायचा आहे. मला पुरुषांच्या डोक्यातली ती बायकांविषयीची वाईट नजर धुवून काढायची आहे. मला जाति-धर्मांत तेढ पसरवणारी कुठलीही विचारसरणी धोपटून काढायची आहे. मला आमीरच्या प्रत्येक सिनेमातल्या नायिकेलाही तेवढीच धुवून-पिळून काढायची आहे. (अगं बाई, आमीरच्या या ढीगभर शॉर्ट आठवड्यापासून तशाच पडल्या आहेत. त्या मशिनला लावायच्या आहेत. शांताबाई...) हे अस्सं होतं. सामाजिक अभिसरणाची माझी प्रक्रियाच ही अशी कौटुंबिक कामं खुंटित करून टाकतात. समाजात चाललेला दांभिकपणा पाहून मी आतल्या आत उकळायला लागते आणि त्या तंद्रीत गॅसवरचं दूध उतू जातं. आमीरचे सत्यमेव जयतेचे पायलट एपिसोड माझ्याकडं प्रीव्ह्यूला यायचे तेव्हा तर मी दूध तापवायचंच बंद केलं होतं. आमचं घर पुरोगामी असल्यानं तशी स्वयंपाकाची बरीचशी कामं आमीरच करतो म्हणा. खरं तर तो स्वतः काही करत नाही. घरात ढीगभर नोकर आहेत. कुक आहेत. हा फक्त त्यांना वाफ देत असतो. मी तर त्याला अनेकदा म्हणतेही, अरे, तुझ्या तोंडच्या वाफेवर आझादच्या गुरगुट्या भाताचा कुकर सहज होईल. पण काही असलं, तरी आमीर सगळं हसून घेतो. रागावत नाही. अस्सा नवरा नशिबानंच मिळतो, असं कुणी म्हणू नये. (मिळवताही येतो, हा स्वानुभव आहे!) मुळात आम्ही पुरोगामी असल्यानं आमचा नशीब वगैरे फालतू गोष्टींवर विश्वासच नाही. अगदी परवाचीच गोष्ट. पीकेच्या रिलीजच्या वेळी राजूनं (हिरानी) त्याच्या प्रॉडक्शन हाउसमधल्या लोकांच्या आग्रहास्तव सत्यनारायण घातला. आता ही गोष्ट आम्हा आतल्या गोटातल्या लोकांनाच माहिती आहे. मी विधूला हे सांगितलं, तर त्यानं डोक्याला हात लावला. आमीरचा प्रश्नच नव्हता. त्याला त्या दिवशी मॉडर्न आर्ट गॅलरीत कुठल्याशा तरुण मुलीच्या चित्रप्रदर्शनाला जायचं होतं. ही कामं तो निव्वळ सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करतो. तर त्याचा प्रश्नच नव्हता तिकडं येण्याचा. पण मला जावं लागलं. एका पुरोगामी अन् नास्तिक स्त्रीसाठी सत्यनारायणाची पूजा पाहणं हा केवढा सांस्कृतिक शॉक असतो, हे तुम्हाला नाही कळायचं. अगदीच भेस्ट ऑफ टाइम... पण राजूसाठी गेले. आझादनं प्रसाद मटकावला. पण ते गोड दही देतात ना, ते हाताला चिकटतं आणि मग मला फार इरिटेटिंग होतं. असो. सांगायची गोष्ट, ही पीके चालला तो केवळ सत्यनारायणामुळं असं आता राजूच्या ऑफिसमधले काही लोक बोलताहेत. ही म्हणजे हाइट झाली. मला अशा अनेक गोष्टी सोशल नेटवर्किंग साइटवरच्या घाटावर धुवाव्याशा, बडवाव्याशा वाटतात. म्हणूनच मी सुरू केला ना हा ई-धोबीघाट ब्लॉग... यहाँ दाग भी सफेद होते है... (कशी वाटली टॅगलाइन? छान आहे ना! खरं सांगू, मीच लिहिलीय.) मी तशी बरी लिहिते. पण आमीर मला कधीच त्याच्या सिनेमात लिहायला देत नाही. अर्थात, मीही त्याच्याविना अडले आहे, असं मुळीच नाही. उलट मी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सिनेमातही त्याला घ्यायलाच पाहिजे, असा काही माझा हट्ट नव्हता. शेवटी रीतसर ऑडिशन वगैरे घेऊन मी त्याला रोल दिला. कारण आमच्याकडं नवरा म्हणून झुकतं माप वगैरे असलं काही चालत नाही. शक्यतो आपल्या जोडीदाराला पुरेसं फाट्यावर मारल्यावरच आम्हाला समाधान लाभतं. पुरोगामित्वाचं ते एक लक्षणच आहे म्हणा ना! हल्ली तर ते मुहूर्त वगैरे कार्यक्रमांना जायलाही मला नको वाटतं. पार्ट्या आणि प्रीमिअरला, किंवा त्या पुरस्कार वितरण सोहळ्यांना जायला आम्हा दोघांनाही आवडत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यापेक्षा चार गरीब माणसांना मदत केल्याचं आम्हाला अधिक समाधान मिळतं. शिवाय मुलांकडंही लक्ष द्यावं लागतं. लोकांना वाटतं, हे काय सेलिब्रिटी! यांना काय सगळं आयतं मिळतं. ते पैसा वगैरे खूप आहे, मान्य आहे. पण आम्हा दोघांनाही फार छानछोकीत राहावं, उगाच चमक-धमक करावी असं कधीच वाटलं नाही. सुदैवानं दोघांच्या घरचे संस्कारही तसेच आहेत. अर्थात चांगले संस्कार असले, तरी माणूस पुरोगामी होऊ शकतो म्हणा. पण या देशात आमीरसारख्याला पुरोगामीच राहावं लागतं. असो. तो फारच गंभीर आणि धोबीघाटाचा विषय आहे. नवरा म्हणून तो कसा अगदी लहान बाळासारखा आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, आझाद लहान आहे की आमीर? मी आझादला झोपवत असले, तरी हे महाशय माझ्या मांडीत येऊन, तोंडात अंगठा घालून बसणार. मग मला दोघांनाही थापटत झोपवावं लागतं. आमीर प्रेमळ आहे. त्याला त्याच्या थोरल्या मुलाचाही खूप अभिमान आहे. जुनैद आता खूपच मोठा आहे. तो परदेशात असतो. पण दिवसातला एकही क्षण असा जात नाही, की आमीर त्याच्याविषयी बोलत नाही. रीनाविषयीही तो कधीच कडवट बोललेला मला आठवत नाही. 'लगान'च्या काळातले ते दिवस खरंच खूप अवघड होते. रीना प्रोड्यूसर होती. ती आमीरचीही बॉस होती. पण हे महाराज माझ्या प्रेमात पडले. (अर्थात मीही...) पण लगान ते लगीन हा प्रवास फारच टफ होता. मला तर कसं निभावलं याचंच आज आश्चर्य वाटतंय. पण माझ्या धोबीघाट स्टाइलमुळं असेल... मी जी जी वाईट परिस्थिती समोर आली, तिला धोपटून, पिळून, झटकून दांडीवर वाळत घातलंय. 
दहा वर्षं होतील आता आमच्या लग्नाला... पण सगळं कसं काल-परवाच घडल्यासारखं वाटतंय. मुळात मी आई-बाबांकडं राहत होते, तेव्हा स्वप्नातसुद्धा कधी मुंबईत येईन आणि आमीरसारख्या सुपरस्टारबरोबर लग्न करीन, असं वाटलं नव्हतं. पण नंतर आम्ही कलकत्त्याला शिफ्ट झालो. मी सगळं शिक्षण वगैरे तिथलंच. नंतर आई-बाबांनी कलकत्ता सोडलं आणि मग मी मुंबईत आले. परत दिल्लीत गेले शिकायला. नंतर लगानच्या वेळी मी आशुतोष सरांकडं एडी होते. तिथूनच हे सगळं सुरू झालं. असो. तो आमचा सगळा इतिहास तुम्हाला गॉसिप मॅगेझिनमधून केव्हाच माहिती झाला असेल. पण मला ना, खरंच, आमीरसारखा नवरा मिळाला याचं अजूनही कधी कधी आश्चर्य वाटतं. तो माझ्यापेक्षा आठ-नऊ नर्षांनी मोठा आहे. स्टारडम वगैरे बाबतीत तर फारच मोठा. पण आमच्या नात्यात त्यानं ते कधी आणलं नाही. इन फॅक्ट, त्यामुळंच आमचं जुळलं. कारण मी तशी फटकळ आहे आणि ज्याला त्याला त्याची जागा दाखवून द्यायला मला आवडतं. पण आमीरलाही हाच स्वभाव आवडला असावा. लगाननंतर आमीरची पुढची फिल्म यायला चार वर्षं लागली, याचं कारण मधल्या काळात त्याचा हा सगळा फॅमिली ड्रामा सुरू होता. शेवटी आम्ही लग्न केलं आणि मग आमीरनं पुढच्या फिल्म करायला घेतल्या. तो फक्त एक नट नाही. त्यानं स्वतःला खूप इव्हॉल्व्ह केलंय माणूस म्हणून. नवनव्या गोष्टी शिकायला त्याला आवडतात. मराठी शिकायचं त्यानं मध्यंतरीच्या काळात मनावर घेतलं आणि खरंच सुहास लिमये सरांचा क्लास लावून तो रीतसर ती भाषा शिकला. आता तो उत्तम मराठी बोलतो. तीच गोष्ट उर्दू वाचनाची. सत्यमेव जयतेसारखा प्रयोग करायला त्याच्यासारखी विचारसरणी असलेला माणूसच हवा. आमच्या मुलालाही आम्ही हेच संस्कार दिले आहेत. त्याचं नाव त्याच्या खापर की खापरखापर पणजोबांवरून, म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावरून आम्ही आझाद ठेवलं आहे. आमीर आणि माझ्या नात्यात कधी आमचा धर्म, जात आली नाही. मुलालाही आम्ही तसंच वाढवणार आहोत. जो काही भांडणांचा धोबीघाट आमच्यात आहे, तो तर कुठल्याही नवरा-बायकोत असतोच. पण हल्ली आमीर बऱ्यापैकी शांत असतो.
मला अनेक गोष्टी करायच्या असतात. लिखाण करायचं असतं. वाचन करायचं असतं. आमीर बऱ्यापैकी वाचतो आणि मीही. मग आम्ही एकमेकांना पुस्तकं सुचवत असतो. कधी तरी एकत्रही वाचन होतं. पण शक्यतो ते प्रसंग फार कमी. आमीर कायम त्याच्या शेड्यूलमध्ये बिझी असतो. पण आझादसाठी तो वेळ काढतोच. आमीरचे काही खास निवडक मित्र आहेत. त्यांच्यावर धमाल करायला त्याला आवडते. त्या वेळी त्याला पाहायचं. अगदी जो जिता वही सिकंदरच्या काळातला आमीर पुन्हा अवतरलाय असं वाटतं. आमीरचे सुरुवातीचे सिनेमे पाहताना मला हसूच येतं. अगदीच शामळू ध्यान होतं हे. अगदी 'राजा हिंदुस्थानी' आणि 'गुलाम'पर्यंत त्याचा प्रवास तसा सर्वसामान्य नटासारखाच होता. पण 'लगान'नं आमीरच्या आयुष्यात उलटापालट केली. आणि अर्थात माझ्याही. त्यामुळं या सिनेमाला आमच्या आयुष्यात खास स्थान आहे. 'लगान'चे ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. आमीर त्याच्या आयुष्यात दुसऱ्यांदा सीरियसली प्रेमात पडला होता. त्याच्याआधी अनेक नट्यांनी त्याच्यावर 'ममता' केली, पण त्यांच्यासोबत तो कधीच सीरियस नसायचा. असो. आता त्यानंही वयाची पन्नाशी गाठली आहे आणि मीही चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळं आम्हा दोघांतही मुळातच असलेला एक प्रगल्भपणा, मॅच्युरिटी आता आणखी वाढली आहे. कुठलाही फालतूपणा मला नको वाटतो. पैशांचंही आम्हाला फार कौतुक नाही. माणूस म्हणून स्वतःला आणखी आणखी उन्नत करीत जावं, असं दोघांनाही प्रामाणिकपणे वाटतं. धोबीघाट गरजेचा असतो तो त्यासाठी. कपड्यांसोबत कधी कधी मनाचीही सफाई करावी लागते. ब्लॉगचं हे माध्यम मला त्यासाठी एकदम परफेक्ट वाटतं. सगळीच धुणी सार्वजनिक नळावर धुवायची नसतात, हे मला कळतं. पण काही गोष्टी अशा असतात, की त्यासाठी हा सार्वजनिक उपक्रमच बरा वाटतो. मला इथं माझ्या स्वतःविषयी जास्त लिहायचं आहे. मी सुरुवातीला म्हटलं, तशी मी एक स्वतंत्र, आझाद बाई आहे. पण आमीर हाही आता माझाच एक हिस्सा असल्यामुळं त्याच्या वाट्याचं तेवढं सगळं यात येणारच आहे. तुम्हा लोकांना आमच्या वैयक्तिक गोष्टींत इंटरेस्ट नसावा, असं मला वाटतं. पण इतर चार जोडप्यांसारखं आमच्याकडं पाहा, एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही कलाकार आहोत. आमची अभिव्यक्ती त्या कलेच्या माध्यमातून होत असते. यापलीकडं आमच्या सेलिब्रिटी स्टेटसला काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही. पण आमीरसारखा उत्कृष्ट कलावंत तुमच्या आयुष्यात जोडीदार म्हणून असणं, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच 'स्पेशल समवन' बनवते यात शंका नाही. 
चला, आता हा ब्लॉग वाळत घालते. सॉरी, अपडेट करते. आमच्या या स्पेशल माणसाचा ब्रेकफास्ट राहिला आहे अजून. बाईला ही कामं चुकली आहे का सांगा... बाई... आपलं... बाय... गुड बाय...

---
 
(पूर्वप्रसिद्धी - जत्रा, मार्च २०१५)