12 Mar 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१८ लेख

जगाची 'खिडकी'
----------------

(विषय : माझे छंद)



छंद हा शब्दच किती नादमधुर आहे! हा शब्द उच्चारताच मनात आनंदाच्या लहरी उसळतात. आयुष्यात माणसाला काही तरी चांगला छंद असेल, तर त्याचं सगळं आयुष्य अगदी छान जातं. अनेक छंद असतील तर फारच बहर! वाईट छंद असतील, तर लोक 'छंदीफंदी' म्हणतात, ते वेगळं... पण चांगले छंद माणसाला जगण्याचं प्रयोजन शिकवतात. चांगला छंद कशाला म्हणावं? एक तर अर्थातच त्या छंदातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. छंद आणि आनंद या गोष्टी एकमेकांना जोडलेल्याच आहेत. आनंद येत नसेल, तर तो छंदच नव्हे! दुसरं म्हणजे त्यातून लोकांना उपद्रव होता कामा नये. कारण उद्या कुणी म्हणेल, की मला रस्त्यातून जाताना हवेत गोळ्या झाडण्याचा छंद आहे...! असला 'छंद' केला तर फाशीचा फंदा गळ्यात पडेल, हे नक्की. तेव्हा दुसऱ्याला उपद्रव न होणारा छंद हवा. या छंदाला उपयुक्तता असलीच पाहिजे, असा काही नियम नाही. पण समजा असेल, तर फारच चांगलं! उदाहरणार्थ, काही लोकांना जुनी माहिती, छायाचित्रं गोळा करण्याचा छंद असतो. त्यांच्या या संग्रहाचा समाजाला फायदाच होतो. पण अशी उपयुक्तता नसलेला छंद असेल तरी काही बिघडत नाही. त्या छंदातून तो छंद जोपासणाऱ्या माणसाला आनंद प्राप्त झाला पाहिजे, एवढीच किमान अपेक्षा असते. 
माझं लहानपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं. त्या छोट्या गावात लहान मुलांसाठी बागा किंवा खेळणी वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळं आमच्या मनोरंजनाची साधनं आम्हीच शोधून काढली. माझा मित्र आणि मी खेळण्यांतले छोटे ट्रक घेऊन आमच्या अंगणात पडलेल्या कसल्या तरी बिया गोळा करत असू. आम्ही त्या बियांना 'धमुके' म्हणायचो. कुणाच्या ट्रकमध्ये जास्त बिया याचीच स्पर्धा चालायची. त्यानंतर काडेपेटीवरची कव्हर जमवायचा छंद लागला. सनफ्लॉवरचं चित्र असलेली काडेपेटी सर्रास मिळायची. आमच्या या कव्हरची किंमत असायची. सनफ्लॉवरवालं चित्र खूप उपलब्ध असल्यानं त्याला कमी भाव असायचा. 'बालक टिक्का' नावाचं एक चित्र तेव्हा दुर्मीळ होतं. त्यामुळं ते सापडलं, की कोट्यधीश असल्याचा फील यायचा. अशी किती तरी कव्हर मी जमवून ठेवली होती. नंतर नंतर ही चित्रं जमवायला आम्ही जवळच्या पानटपऱ्यांवर घिरट्या घालत असल्याच्या वार्ता घरच्यांच्या कानावर गेल्या आणि हा छंद बंदच पडला. आम्ही लहानपणी सगळे मित्र क्रिकेट खेळायचो. दुसरा मैदानी खेळच आम्हाला माहिती नव्हता. वाडा क्रिकेट, गल्ली क्रिकेट ते ग्राउंडवरचं क्रिकेट अशा एकेक पायऱ्या वर चढत क्रिकेट खेळत गेलो. यातूनच क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवायचा छंद जडला. तेव्हा घरी येणारं वृत्तपत्रं हा अशा छायाचित्रांचा एकमेव स्रोत होता. तेव्हा वृत्तपत्रं सगळी कृष्णधवल असायची. तेव्हा क्रिकेट सामन्यांचे मैदानावरचे फोटो चार चार कॉलम आकारात प्रसिद्ध व्हायचे. पण ते कापण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो पेपर रद्दी व्हायची वाट पाहावी लागायची. मग दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवून हे फोटो कापून ठेवायचे. सुनील गावसकर, कपिल देव, शास्त्री, वेंगसरकर हे आमचे हिरो होते. इतर देशांतल्या क्रिकेटपटूंमध्ये डेव्हिड गॉवर, व्हिवियन रिचर्डस, रिचर्ड हॅडली, अॅलन बोर्डर आदी मंडळी आवडायची. या सगळ्यांचे फोटो माझ्या वहीत होते. गावसकरनं १०,००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडल्याचा मोठा पाच-सहा कॉलम फोटो आला होता. तोही माझ्याकडं होता. अगदी अलीकडंपर्यंत ही वही माझ्याकडं होती. आता मात्र ती सापडत नाहीय. त्यामुळं एक मौल्यवान खजिना गमावला की काय, अशी भीती वाटतेय. 
वाचनाचा छंद तर खूप लहानपणापासून होता. आमच्या गावी खूप जुनं, म्हणजे १८८७ मध्ये स्थापन झालेलं मोठं वाचनालय होतं. या वाचनालयामुळं मला वाचनाची गोडी लागली. अगदी तिसरी-चौथीत असल्यापासून मोठमोठी पुस्तकं वाचण्याची आवड उत्पन्न झाली. लहान मुलांच्या विभागात तर नेहमीच जायचो. ग्रंथपाल आमच्या ओळखीचे होते. त्यामुळं ते मुद्दाम चांगली पुस्तकं माझ्यासाठी राखून ठेवायचे. नीलम प्रभू यांचं 'मांजराची गोष्ट' या की अशाच नावाचं एक पुस्तक वाचल्याचं आठवतं. ती गोष्ट दिल्लीत घडते आणि ते मांजर चुकून शहादऱ्याला जातं अशी काही तरी ती गोष्ट होती. हे पुस्तक मोठ्या आकाराचं होतं व त्यात छान रंगीत चित्रं होती. याशिवाय भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' लाडका होताच. पण मला विशेष आवडायची ती सुधाकर प्रभू यांनी लिहिलेली 'डिटेक्टिव्ह डीटी'ची पुस्तकं. या पुस्तकांची मी पारायणं केली. याशिवाय बाबासाहेब पुरंदऱ्यांची 'राजा शिवछत्रपती' व 'शेलारखिंड' ही दोन मोठ्ठी पुस्तकं मी तेव्हाच वाचून काढली होती. 'शेलारखिंड' वाचताना गौरा व कस्तुराच्या धाडसानं मन थरारून गेल्याचं आठवतं. याशिवाय अर्थातच चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं वाचायला मिळाली. या लेखकांच्या विनोदी लेखनाच्या मी प्रेमातच पडलो. 'असं लिहिता आलं पाहिजे' असं वाटलं ती ही पुस्तकं वाचूनच! अर्थात पुढं पत्रकारितेत गेल्यावर वाचन हा केवळ छंद न राहता, तो रोजच्या कामाचा एक भागच झाला आहे. पण तरीही मनाला विरंगुळा मिळावा म्हणून केलं जाणारं वाचन छंदासारखंच आनंद देतं.
जी गोष्ट वाचनाची तीच सिनेमाची... इतर मुलांप्रमाणेच मी लहानपणी सिनेमे पाहत होतो. गावात तंबूच्या थिएटरमध्ये अनेक सिनेमे पाहिले. सिनेमा या माध्यमाचं आकर्षण तसं जबरदस्त असतं. मलाही या माध्यमानं फार तीव्रतेनं आपल्याकडं ओढून घेतलं. पुढं या छंदाचं रूपांतर आवड आणि मग अभ्यासात झालं. पत्रकारितेत आल्यावर सिनेमा परीक्षणं लिहायला मिळाली आणि सुमारे ११ वर्षांत तीनशेहून अधिक सिनेमांची परीक्षणं लिहून झाली. आताही ब्लॉगवर परीक्षणं लिहिली जातात ती केवळ आवड, छंद आहे म्हणूनच! या आवडीतूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना हजेरी लावणं घडलं. 'वर्ल्ड सिनेमा' पाहता आला. याचा फायदा असा झाला, की सगळ्या गोष्टींकडं पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळाला. हे सगळं जग, सगळी माणसं एकसारखीच आहेत; माणसाच्या मूलभूत प्रेरणा, प्रवृत्ती सगळीकडं सारख्याच आहेत हे समजलं आणि लहानपणापासून वेगवेगळ्या माध्यमांतून मनावर चढलेल्या अनेक समज-गैरसमजांची पुटं गळून पडली. पत्रकारिता करताना डोळे उघडे ठेवून समाजात वावरण्याची सवय लागली आणि त्यातूनच विचार करायची अन् प्रश्न विचारायचीही! एकदा विचार सुरू झाला, की विवेकाचं भान येतं. विवेक असला, की बुद्धिप्रामाण्याचं पारडं वरचढ होतं आणि बुद्धिप्रामाण्यातून निष्पक्ष विश्लेषणाची कुवत अंगी येते. वाचन आणि सिनेमा या दोन छंदांनी मला जर काही दिलं असेल तर ती ही कुवत, असं नम्रपणे सांगावंसं वाटतं.
हे झालं आयुष्यात आत्तापर्यंत जोपासलेल्या लहान-मोठ्या छंदांबाबत. यातले काही छंद लहानपणीचे आणि त्या वयाला शोभणारे असेच होते व ते स्वाभाविकच वाढत्या वयानुसार बंद झाले. काही छंद हे केवळ छंद न राहता, व्यवसायाचा किंवा पेशाचा भाग झाले, तर काही छंदांचं रूपांतर अभ्यासात झालं. त्यामुळं अगदी आजच्या घडीला मला कुणी 'तुझा छंद सांग' असं म्हटलं तर यातल्या एकाचंही नाव घेता येणार नाही. मग आत्ता आपल्याला नक्की कशाचा छंद आहे, याचा विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, की आहे! आपल्याला एक छंद आहे. फावल्या वेळेत आपण तो जोपासतो आणि त्यातून एक निर्भेळ आनंद आपल्याला लाभतो. हा आनंद आहे 'जगाच्या खिडकी'त डोकावण्याचा... होय, आणि या 'खिडकी'ला आपण ओळखतो 'यूट्यूब' म्हणून...! 
इंटरनेट नावाच्या प्रकारानं आपल्या दैनंदिन आयुष्यात क्रांती आणली, त्याला आता तीन दशकं उलटून गेली. स्मार्टफोन नामक आयुध आपल्या हातात आलं, त्यालाही आता एक दशक उलटून गेलं. या तंत्रज्ञानातील क्रांतीनं आपलं आयुष्य बदलून गेलं आहे. आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या किती तरी गोष्टी आता सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसं करू लागली आहेत. अगदी विमानप्रवासापासून ते परदेशात सेटल होण्यापर्यंत अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातही सहज घडत आहेत. सहलीसाठी परदेशांत जाणं नियमित होऊ लागलं आहे. जगाकडं खुल्या नजरेनं पाहण्याचा एका नवा दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो आहे. जगात पाहण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्याला एका आयुष्यात ते मुळीच शक्य नाही, हे लक्षात यायला लागलं आहे. अशा वेळी मदतीनं येते ती ही 'खिडकी'! बघा ना, अगदी घरबसल्या या माध्यमातून तुम्ही अक्षरशः सगळं जग पाहू शकता. 
या जगात अनेक खंड आहेत, देश आहेत, प्रांत आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं, महत्त्व वेगळं! युरोपचं सौंदर्य वेगळं, आशियाचं वेगळं... आफ्रिकेतील घनदाट जंगलांपासून ते वाळवंटापर्यंतचं भौगोलिक वैविध्य थक्क करणारं आहे. केवळ नैसर्गिक चमत्कार म्हटले, तरी किती गोष्टी आहेत. उंच उंच धबधबे आहेत, प्रचंड अवाढव्य नद्या आहेत, दरी-खोरी आहेत, महासागर आहेत, अंटार्क्टिकासारखा अफाट खंड आहे, नॉर्वेसारखा 'मध्यरात्रीच्या सूर्याचा' देश आहे, ज्वालामुखी आहेत, हिमालयासारखी उत्तुंग पर्वतराजी आहे... या सर्व ठिकाणी माणसाला जाणं एका आयुष्यात तरी शक्य नाही. पण काळजीचं कारण नाही. आपली 'खिडकी' आहे ना! याशिवाय मानवनिर्मित चमत्कार किती आहेत! चीनची भिंत आहे, सुएझचा कालवा आहे, पिसाचा मनोरा आहे, पनामा कालवा आहे, कॅलिफोर्नियाचा गोल्डन ब्रिज आहे, इजिप्तमधले पिरॅमिड आहेत... हे सगळं घरबसल्या बघता येतं आपल्या 'खिडकी'तून... अटी दोनच. उत्तम दर्जाचा स्मार्टफोन हवा आणि वेगवान इंटरनेट हवं. मग अक्षरशः सगळं जग आपल्या त्या छोट्याशा 'खिडकी'त खुलं होतं... 
मला मुळात माणसाच्या जगण्याबद्दल कुतूहल आहे. वैचित्र्यपूर्ण गोष्टी करणारे अनेक लोक असतात. मध्यंतरी एकानं पृथ्वीच्या कक्षेपर्यंत बलून नेलं आणि तिथून पृथ्वीवर उडी मारली. सुमारे ३९ हजार मीटर एवढ्या उंच अंतरावरून हा माणूस खाली आला. त्याच्या अंगावरच एक कॅमेरा लावला होता. त्यातून त्याची ही उडी चित्रित झाली. या अचाट पराक्रमाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहायला मिळतो. तो बघताना मी अनेकदा थक्क झालोय. परवाच आणखी एक व्हिडिओ पाहिला. आता अनेक उपग्रह रॉकेटद्वारे सहज अंतराळात सोडले जातात. आपल्याला काही हे उड्डाण होताना थेट पाहायला मिळत नाही. टीव्हीवरच पाहायला मिळतं. पण या रॉकेटवरच कॅमेरा लावून त्या उड्डाणाचं चित्रिकरण केलेला एक व्हिडिओ मी पाहिला. यात आपण जणू त्या रॉकेटच्या पाठीवर बसून अंतराळात उंच उंच उडत निघालो आहोत, असं भासत होतं. हे दृश्य एकाच वेळी अत्यंत मनोरम आणि कल्पना केली तर थोडं भयावहही होतं. ते रॉकेट एवढ्या वेगात अंतराळात झेपावत होतं, की अवघ्या दोन मिनिटांत पृथ्वीची कडा दिसायला लागली. हे अफाट दृश्य केवळ यू-ट्यूबमुळंच अनुभवता आलं. 
याशिवाय आपण सहज जाऊ शकत नाही, अशी ठिकाणं पाहायला मिळण्याचं हे हक्काचं स्थान आहे. पाकिस्तानबद्दल मला कुतूहल आहे. मी यू-ट्यूबवर आता तिथली शहरं, तिथली माणसं, तिथले कार्यक्रम सहज पाहू शकतो. मग लक्षात येतं, की आपल्यासारखंच तर आहे तिथं सगळं! आपल्यासारखीच भाषा, वेष, खाणं-पिणं... फक्त धर्म वेगळा... गंमत म्हणजे तिथल्या लोकांनाही आपल्याबद्दल असंच वाटत असतं. मग आपला या दोन्ही देशांच्या संबंधांकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. 
मला जगभरातल्या शहरांबाबत आकर्षण आहे. लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पॅरिस, टोकियो, सिडनी, मेलबर्न, लॉस एंजेलिस, बर्लिन, मॉस्को अशी किती तरी शहरं मला प्रत्यक्ष जाऊन अनुभवायची आहेत. ते कधी होईल, ते माहिती नाही. पण आज यू-ट्यूबच्या मदतीनं मी या शहरांमधून फेरफटका मारू शकतो. किती तरी हौशी लोकांनी उच्च दर्जाचं शूटिंग करून ते इथं अपलोड केलंय. ते पाहताना मस्त वाटतं. आपण त्या शहरांमधूनच फिरतोय असं वाटतं. तिथं जाण्याची ओढ आणखी वाढते. जगातल्या या शहरांप्रमाणेच मला भारतातलीही विविध शहरं पाहायला आवडतात. जयपूर, लखनौ, कोलकता, हैदराबाद, नागपूर, इंदूर, पाटणा, गुवाहाटी, मदुराई, बेंगळुरू, पणजी अशा किती तरी शहरांमधून माझा 'फेरफटका' अधूनमधून सुरू असतो. 
शहरांप्रमाणेच मला आकर्षण आहे ते जगभरातल्या विमानतळांचं आणि विमानांचं... हे एक वेगळंच आणि विलक्षण जग आहे. एकदा त्यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला लागलो, की मला कधीच कंटाळा येत नाही. विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग पाहणं हाही माझा आवडीचा छंद आहे. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये बसण्याची संधी आपल्याला मिळण्याची शक्यता फारच कमी! पण यू-ट्यूबवर कॉकपिटमधून चित्रित केलेले हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातून जगभरातल्या नामवंत विमानतळांवरची टेकऑफ आणि लँडिंगची अप्रतिम दृश्यं पाहायला मिळतात. टेकऑफ करताना रात्र असेल, तर ते झगमगणारं शहर आणि वर अनंताच्या पोकळीत झेपावणारं ते महाकाय विमान पाहताना काही तरी विलक्षण अनुभूती येते. माणसाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीपुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं. जगभरातल्या अनेक विमानतळांवर मी अशा रीतीनं 'लँडिंग' केलंय आणि तिथून उड्डाणही केलंय. काही विमानतळांवर लँडिंग करणं अवघड असतं. भूतानमधला पारोचा विमानतळ हा असाच एक अवघड विमानतळ आहे. तिथं उतरणाऱ्या विमानांचा कॉकपिटमधून चित्रित केलेला व्हिडिओ पाहणं थरारक असतं. 
विमानांप्रमाणंच मला आवडतात ते जगभरातले रस्ते आणि त्यावरून धावताना केलेले व्हिडिओ. मला स्वतःला फिरायची प्रचंड आवड आहे. पण कामामुळं हवं तितकं फिरता येतंच असं नाही. पण 'दुधाची तहान ताकावर' या न्यायानं मी जगभरातले उत्तमोत्तम रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या वेगवान कारमधून केलेलं चित्रिकरण 'यू-ट्यूब'वर पाहत बसतो. हे मी कितीही वेळ पाहू शकतो. मला कंटाळा येत नाही. युरोपातले रस्ते, विशेषतः स्वित्झर्लंडमधले, भान हरपतं. ग्रामीण इंग्लंडही असंच कमालीचं देखणं आहे. तिथल्या रस्त्यांचे व्हिडिओ पाहत बसायला मजा येते. अमेरिकेतले भव्य एक्स्प्रेस-वे पाहताना छाती दडपते. आपल्याकडे पण आता यमुना एक्स्प्रेस-वेसारखे जबरदस्त रस्ते झाले आहेत. अगदी आपला नेहमीचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे यूट्यूबवर कुणीकुणी केलेल्या चित्रिकरणातून पाहताना वेगळाच आणि सुंदर भासतो. अगदी आपलंच पुणे शहर एखाद्या परदेशी माणसाच्या नजरेतून पाहायला गंमत येते.
याशिवाय जगातल्या किती तरी आश्चर्यपूर्ण, अद्भुत गोष्टी आपल्याला 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळतात. यू-ट्यूबचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यावर जे व्हिडिओ शोधतो, त्याचा आधार घेऊन आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडिओ पाहण्याची शिफारस केली जाते. यातून आणखी नवनव्या गोष्टी कळत जातात. त्यामुळं मला कधीही थोडा जरी रिकामा वेळ मिळाला, की मी या 'खिडकी'त येऊन बसतो. 
हा छंद मला सदैव अपडेट राहण्यास मदत करतो. हे जग, विश्व, ब्रह्मांड हा पसारा किती तरी मोठा आहे! त्या तुलनेत आपण किती लहान... पण आपल्या छोट्याशा जगण्यात असतात केवढे ब्रह्मांडाएवढे अहंकार...! पण हे सारं पाहताना ही फुकाच्या अहंगंडांची पुटं गळून पडतात आणि मन स्वच्छ, ताजंतवानं होऊन जातं. आपण प्रवासाला निघालो, की आपल्याला खिडकीत बसायला फार आवडतं. का? कारण आपल्याला त्यातून बाहेरचं भलं मोठं जग दिसत असतं. हा सभोवताल, ही सृष्टी, हा निसर्ग आणि त्यात नानाविध करामती करणारा 'माणूस' नावाचा अचाट बुद्धिमत्तेचा प्राणी हे सगळे आपल्याला नम्र ठेवण्यात मदत करतात. त्यांच्याकडं पाहायला मिळण्याची संधी ही 'खिडकी' देते. त्यामुळं तिच्यात सदैव डोकावत राहणं हा माझा लाडका छंद आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१८)
---

18 Feb 2019

रिव्ह्यू - आनंदी गोपाळ

केवळ नतमस्तक...
------------------------



‘आनंदी गोपाळ‌’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट म्हणजे माणसाच्या जिद्दीचा अफाट प्रवास आहे. डॉ. आनंदी गोपाळ जोशी या अवघं २२ वर्षांचं जीवन लाभलेल्या मराठी मुलीची ही प्रेरणादायी, थक्क करणारी, डोळे पाणावणारी, हृदय उचंबळून टाकणारी कहाणी आहे. हातातल्या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि तातडीने या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, एवढा सुंदर चित्रपट समीर विद्वांस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यासमोर सादर केला आहे. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या नामावलीपर्यंत नजरेला खिळवून ठेवणारी ही अप्रतिम कलाकृती आहे. अशा कलाकृतींना प्रेक्षकांनी उदार आश्रय द्यायला हवा.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, तेव्हाच्या कडव्या, सनातनी, पुरुषप्रधान समाजाचा रोष पत्करून; हट्टी, दुराग्रही, विक्षिप्त वाटणाऱ्या, पण अत्यंत बुद्धिमान, द्रष्ट्या, विचारी पतीच्या खंबीर पाठिंब्यावर आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकल्या व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आनंदीबाईंचं आयुष्य व त्यांचा हा सगळा प्रवास मुळातच एवढा स्तिमित करणारा आहे, की अनेक लेखक-कलावंतांना त्यानं भुरळ घातली आहे. माझ्या माहितीप्रमाणे, सर्वप्रथम श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी लिहून (बहुधा १९६७) आनंदीबाईंची सर्व जीवनगाथा मराठी वाचकांसमोर आणली. त्यानंतर ‘दूरदर्शन’वरही ९० च्या दशकात ‘आनंदी-गोपाळ’ याच नावाची एक मालिका आली होती. त्यात आनंदीबाई कुणी साकारल्या होत्या, हे मला आठवत नाही; पण गोपाळरावांची भूमिका अजित भुरे यांनी केली होती, हे स्पष्ट आठवतंय. त्यानंतर अंजली कीर्तने यांनीही खूप मेहनत घेऊन आनंदीबाईंवर एक लघुपट तयार केला आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. (हा लघुपट मात्र मी अद्याप पाहिलेला नाही.) आणि आता, समीर विद्वांस यांनी ‘आनंदी गोपा‌ळ’ हा पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार करून, आनंदीबाईंच्या स्फूर्तिदायी जीवनाला रूपेरी पडद्यावर अजरामर करून टाकलंय.
हा चित्रपट आपल्याला एवढा का आवडतो? एवढा का हृदयाला भिडतो? मला वाटतं, चित्रपटाच्या टॅगलाइनमध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. ‘सामान्य जोडप्याची असामान्य गोष्ट’ अशी ही टॅगलाइन आहे. एरवी त्या काळातल्या इतर चार जोडप्यांसारखंच या जोडप्याचंही जीवन व्यतीत झालं असतं. मात्र, इंग्रजांच्या टपाल खात्यात नोकरी करीत असलेल्या गोपाळरावांची विचारसरणी त्या काळाच्या किती तरी पुढची होती. पत्नीनं शिकलं पाहिजे, यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आनंदी ही त्यांची दुसरी बायको. वयानं किती तरी लहान. तिला शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. तेव्हाच्या कर्मठ, रूढीवादी समाजातून या गोष्टीला किती विरोध झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो! सावित्री आणि जोतिबांच्या नशिबी जे आलं, तेच नंतर ३५-४० वर्षं उलटली तरी आनंदी व गोपाळ यांच्याही नशिबात आलं. हेटाळणी, अवहेलना सहन करीत त्यांनी आणि आनंदीबाईंनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. हा प्रवास सोपा नव्हता. प्रसंगी गोपाळरावांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची तयारी दाखविली. मिशनरी शाळेत आनंदीला गोऱ्या मुलींकडून पदोपदी अपमान सहन करावा लागला. मात्र, कोवळ्या वयातील बाळंतपणात मुलगा जन्मताच गेल्यावर आनंदीच्या स्वप्नांना दिशा मिळाली. डॉक्टर व्हायचं! ज्या काळात भारतीय पुरुषांनाही डॉक्टर होणे अवघड होते, त्या काळात आनंदीनं हे भव्य, उदात्त स्वप्न उरी  बाळ‌गलं. गोपाळरावांच्या खटपट्या स्वभावामुळं थेट अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. तीही एकटीला... समुद्र ओलांडणं धर्मशास्त्रात निषिद्ध मानलं जायचा काळ तो! अशा त्या काळात कलकत्त्यावरून बोटीनं आनंदी एकटीच सातासमुद्रापार निघाली. मिसेस कारपेंटर नावाची एक देवदूत स्त्री तिला भेटली. तिच्या मदतीनं आनंदी पेनसिल्व्हानिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकली. मांसाहार करीत नसल्याने उकडलेले बटाटे खाऊन दिवस काढले. तिकडची प्रचंड थंडी सोसवत नसल्यानं तिला अखेर क्षयानं ग्रासलं. पण तरीही अफाट जिद्दीच्या बळावर तिनं एम. डी. पदवी मिळविलीच.
हा प्रवास जेवढा आनंदीचा आहे, तेवढाच तो गोपाळरावांचाही आहे. म्हणूनच तर या चित्रपटाचं नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी’ असं नसून, ‘आनंदी गोपाळ’ असं आहे. आज एकविसाव्या शतकातही पत्नीला समानतेची वागणूक देण्यास काचकूच करणारे समकालीन पुरुष पाहिले, की गोपाळरावांची महती कळते. पत्नीला अभ्यासाला वेळ मिळावा, म्हणून झाडलोट करण्यापासून सोवळ्यातला स्वयंपाक करण्यापर्यंत आणि नंतर टपाल खात्यातील नोकरी करण्यापासून लोकांच्या अवहेलनेला तोंड देण्यापर्यंत सगळी कामं एकहाती करणारा गोपाळरावांसारखा पुरुष तेव्हा किती दुर्मीळ होता, हे सांगायला नको. अर्थात नवरा खंबीर असला, तरी अत्यंत हट्टी, विक्षिप्त व पराकोटीचा संतापी असला, तर त्याच्या पत्नीला काय काय सोसावे लागते, हेही आपल्याला आजूबाजूला पाहिले तरी कळेल. आनंदीचा मोठेपणा हा, की तिला या वरकरणी हटवादी, चिडक्या पतीमागचा माणूस कळला. तो इतर पुरुषांसारखा नसून, वेगळा आहे, हे कळलं. त्यामुळं ती अगदी पूर्ण विश्वासानं त्याला साथ देत गेली. त्यामुळंच ‘आनंदी गोपाळ’ ही एका आदर्श जोडप्याचीही गाथा आहे. आजकाल एवढ्या-तेवढ्या कारणावरून ‘इगो’शीच संसार करणाऱ्यांनी तर जरूर पाहावी अशीच ही कथा आहे.
समीर विद्वांस या दिग्दर्शकाला या विलक्षण दाम्पत्यातील ही अजोड प्रीती अचूक कळली आहे. कुठलंही महान कार्य जेव्हा उभं राहतं, तेव्हा त्याला आधार असतो तो अशा भक्कम नात्यांचा! रूढ नातेसंबंधांपलीकडं जाणारं हे गहिरं नातं बारकाईनं टिपायला, त्यातल्या हळव्या जागा शोधायला संवेदनशील कलाकाराचं मन हवं. ते या दिग्दर्शकाकडं आहे. त्यामुळंच ‘आनंदी गोप‌ाळ’मधले या दोघांचे सर्वच प्रसंग विशेष जमले आहेत. आनंदी पहिल्यांदा ऋतुमती होते तेव्हाच्या प्रसंगापासून अगदी शेवटी दोघे समुद्रावर बसले आहेत त्या प्रसंगापर्यंत सर्व दृश्यांत दिग्दर्शकानं या उभयतांमधलं हे अत्यंत तरल, आश्वासक, ऊबदार नातं फार सुंदर रेखाटलं आहे.
या चित्रपटाचा बहुतांश भाग आनंदी अमेरिकेला जाईपर्यंतच्या प्रवासात खर्च होतो. आनंदी अमेरिकेला गेल्यानंतरचं तिचं आयुष्य फार थोडक्यात येतं. तेही जास्त करून पत्रांच्या रूपानेच. आनंदीचं अमेरिकेतील जगणं अगदी खडतर होतं. मात्र, चित्रपटाचा फोकस त्यावर नाही. हे काहीसं खटकतं. मात्र, एकूण आस्वादनात त्यानं फार उणेपणा येत नाही.
ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या दोघांनी यात अनुक्रमे गोपाळराव व आनंदीबाईंच्या भूमिका केल्या आहेत. दोघांनीही छान कामं केली आहेत. विशेषत: ललित प्रभाकर हा ‘सरप्राइझ पॅकेज’ म्हणायला हवा. त्यानं गोपाळरावांचा तिरसटपणा, दुराग्रहीपणा, हट्टीपणा आणि पत्नीला शिकवण्याची जिद्द आपल्या देहबोलीतून नेमकी साकारली आहे. भाग्यश्री मिलिंद ही ‘बालक-पालक’मध्ये दिसलेली बालकलाकार. तिनंही यात आनंदी खूप मेहनतीनं आणि विश्वासार्ह सादर केली आहे. महत्त्वाचा उल्लेख करायचा तो गीतांजली कुलकर्णी यांचा. गोपाळरावाच्या पहिल्या पत्नीच्या आईची भूमिका त्यांनी फारच जबरदस्त केली आहे.
या चित्रपटाचं महत्त्वाचं अंग आहे ती म्हणजे यातली गाणी. हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिलेली यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. वैभव जोशींसारख्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली यातली गाणी आधीपासूनच रसिकप्रिय झाली आहेत. ‘वाटा वाटा वाटा गं’, ‘आनंदघना’, ‘तू आहेस ना...’ ही गाणी विशेष उल्लेखनीय. चित्रपटात शेवटी नामावलीसोबत येणाऱ्या कोलाजची कल्पना खासच!

तेव्हा, अजिबात चुकवू नये असा हा प्रेरणापट आहे. तो पाहिल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस आनंदीबाईंसमोर आपोआप नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

----

दर्जा : चार स्टार
---

11 Feb 2019

मटा संवाद - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त लेख

‘प्रेमळ’ आठवणींचा गुलकंद...
----------------------------


‘व्हॅलेंटाइन डे’ हे शब्द उच्चारल्यावर अंगावर गोड शिरशिरी वगैरे येण्याच्या कुठल्याही क्वालिफाइड वयात आत्ता चाळिशीत असलेले किंवा चाळिशी ओलांडलेले आम्ही कुणीच नाही. पण तरीही चाळिशीतल्या आम्हा चोरांना आमचं वय जणू काही विशीतच ‘अजुनी रुतुनी आहे’ असं वाटत असतं. वास्तविक ज्या वयात हे ‘डे’ वगैरे साजरे करायचे त्याच वयात ते रीतीनुसार साजरे केले असते, तर पुढं असे पोक‌ळ‌ आठवणींचे दिवस घालायची वेळ आली नसती. तर ते असो. मात्र, दर वर्षी १४ फेब्रुवारी जवळ यायला लागला, की आमच्या आठवणींच्या डब्यातून दिवंगत प्रेम इ. भावनांचा गुलकंद बाहेर निघतोच निघतो. आता कुणी म्हणेल, की या आठवणी काय चाटायच्या आहेत? मात्र, वाढत्या वयानुसार, अशा आठवणींचा गुलकंद चघळला असता, सद्यस्थितीतील आपली दारूण अवस्था पाहून उफाळणारे पित्त किंचितसे शांत होते, असा अनुभव आहे.
आमच्या त्या वयातील दिवसांचे वर्णन काय करावे! अहाहा!! भारत व पाकिस्तान ही शत्रुराष्ट्रे बरी, अशी फाळणी मुलगे आणि मुली या दोन मूलभूत मानवी वर्गांत झाली होती. त्यातून शाळेचे वर्ग, तुकड्या वगैरे सामान्य वर्गवारी वेगळीच! मुलांनी मुलींशी किंवा मुलींनी मुलांशी बोलणे म्हणजे अबब! त्या त्या वयातल्या नैसर्गिक भावना रूढी-रिवाजांच्या कडी-कुलपांत अशी काही बंदिस्त करून टाकल्या होत्या, की आपल्याला जे काही वाटतंय, जे काही करावंसं वाटतंय ते म्हणजे एक महाभयंकर आजार आहे, अशीच समजूत घट्ट होत गेली. अशा रोगट वातावरणात वाढलेली आमची पिढी पुढं ना मुलींशी निखळ मैत्री करू शकली, ना त्यांच्या भावभावनांना नीट साद देऊ शकली... तीच गोष्ट मुलींचीही झाली असणार, यात शंका नाही. त्यामुळेच एक मुलगा आणि मुलगी चुकून एकमेकांशी बोलले, तरी त्यांची नावं शाळेच्या चतु:सीमांवरील भिंतीवर हृदयात बाण कोरून लिहिली जायची. इतकंच काय, शिक्षक व शिक्षिकांचीही जोडी लावून त्यांना याच बदामात बंदिस्त केलं जायचं. समान वयाचे मुलगा आणि मुलगी यांच्यात एक तर बहीण-भाऊ, नाही तर थेट नवरा-बायको एवढी दोनच नाती असू शकतात, असा सार्वत्रिक आणि दीर्घकालीन समज आमच्या पिढीच्या मनावर एखाद्या शिलालेखासारखा कोरून ठेवण्यात आला होता. याच्या अधले मधले कुठलेही नाते ‘लफडे’ या एकाच कॅटॅगरीत मोजले जायचे. 
आमच्या वेळी पालक व शिक्षक या दोन्ही महान संस्थांचा एवढा जबरदस्त धाक होता, की त्यातून आमची पिढी अजूनही बाहेर आलेली नाही. मुला-मुलींना एकत्र शिक्षण देण्याची पद्धत होती; पण चुकून-माकून ते बोलले, तर काही तरी महाभयंकर अनर्थ होईल, असं वातावरण सभोवती होतं. आता विचार करता, त्यामागचा त्या पिढीचा काय हेतू असेल, हे उमगू शकतं. मात्र, तरीही एवढ्या कडेकोट बंदोबस्तात त्या नात्याला कुलपं ठोकायची गरज नव्हती. 
जिथं बंधनं आली तिथं ती तोडण्याचीही ऊर्मी आलीच. त्यामुळं आमच्या पिढीतून काही अफलातून प्रेमवीर निपजले. रूपेरी पडद्यावरून आचरट चाळे करून, असल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मार्गदर्शन करायला गोविंदापासून ते मिथुनपर्यंत आणि नंतर सलमानपासून ते शाहरुखपर्यंत समस्त नटमंडळी हजर होतीच. त्यातून मग हाताच्या नसा कापून घेण्यापासून ते रक्तानं प्रेमपत्रं लिहिण्यापर्यंत बऱ्याच रक्तरंजित ‘व्हॅलेंटाइन डें’चं साक्षीदार आम्हाला व्हावं लागलं. शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना कसं सामोरं जायचं, याचं कुठलंही मार्गदर्शन आमच्या पिढीतल्या मुलग्यांना कुणी केलं नाही. त्यामुळं ती ऊर्जा भलत्या मार्गानं बाहेर पडायची ती पडली. निकोप नात्याचं शिक्षण न मिळाल्यानं मग ओरबाडून घेण्याची सवय जन्माला आली. त्यातूनच रिंकू पाटीलपासून ते अमृता देशपांडेपर्यंत अनेक मुली हकनाक बळी गेल्या. आज विचार करताना वाटतं, की खरंच, गंमत म्हणून एखाद्या मुलीला गुलाब देण्याइतपत निकोप वातावरण आजूबाजूला असतं, तर काय झालं असतं? त्यातून वाईट नक्कीच काही झालं नसतं. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल एवढ्या संवेदनशील वयात एक तर टोकाचं आकर्षण किंवा तिरस्कार या दोनच भावनांचं पोषण का झालं असावं? अर्धवट वयातही ‘अगर तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नहीं’ वगैरे विकृत विचार का जन्माला आले असावेत?
अस्मादिकांच्या बालमनावर एवढे ‘सुसंस्कार’ झाले होते, की लग्न होईपर्यंत कुठल्याही मुलीला काहीही ‘तसलं’ विचारायची किंवा बोलायची हिंमतच झाली नाही. मीच नव्हे, तर माझ्या संपूर्ण पिढीची जवळपास हीच कथा होती. अशा वातावरणात वाढल्यानंतर कुठला ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि कसला ‘रोझ डे’? त्यातून आमच्या वेळी संस्कृतीरक्षणाची उबळ नव्यानंच जन्माला आली होती. आधीच मनात भयाचे हजार सर्प वळवळत असताना, हा संस्कृतीरक्षणाचा अजगर कोण गळ्यात घालून घेणार? त्यामुळं आम्ही जे काही गुलाब दिले (वा घेतले) ते फक्त मनातल्या मनातच! तिथं मात्र असल्या कुठल्याही जुलमी संस्कारांची मर्यादा आड आली नाही. त्यामुळं तिथं केवळ एका गुलाबानं भागायचं नाही, तर आख्खी नर्सरीच मनात वस्तीला यायची. 
आदल्या दिवसापासूनच मग ‘तिचे’ वेध लागायचे. हा ग्रहणाच्या आधी असतो, तसलाच काळ असायचा. ती येईल का, आली तर आपल्याला दिसेल का, भेटेल का, निदान स्माइल तरी देईल का, तिला दुसरा कोणी तर आज गुलाब देणार नाही ना अशा शंकांनी आमचं अल्लड मन पोखरायचं. स्वत: गुलाब देण्याची प्राज्ञा नव्हतीच. त्यामुळं तो विकत घेण्याचा खर्च तेवढा वाचत असे. त्या दिवशी धडधडत्या हृदयानं उगाच इकडून तिकडं शाळेत व नंतर कॉलेजात अस्मादिक हिंडत असत. ‘ती’ दिसली तरी धन्य वाटायचं. मनातल्या गुलाबाचा राजमार्ग व्हायचा आणि त्यावरून मन सुसाट दौडत कुठल्या कुठं हिंडून यायचं. तो दिवस तसाच संपून जायचा. मनातल्या मनातच सगळे आनंद मिळायचा तो काळ! त्यात हेही आलंच...
आयुष्यात कुणावर तरी मनसोक्त प्रेम करता यावं आणि ते प्रेम एवढं नि:स्वार्थी, त्यागमय वगैरे असावं असले विचारही डोक्यात येत नसत. मात्र, असं खरंच तेव्हा कुणी शिकवलं असतं तर? आमच्या सगळ्या पिढीचंच आयुष्य कदाचित वेगळंच झालं असतं. शहरी आणि ग्रामीण फरक म्हणावा तर दोन्हीकडच्या मुलग्यांना सारखेच अनुभव आल्याचं लक्षात येतं. तेव्हा प्रश्न हा नव्हताच. प्रश्न तेव्हाच्या पालक पिढीच्या मानसिकतेचा होता. सुदैवानं आजचे पालक तसे नाहीत. मुलांच्या मानसिकतेचा वगैरे हल्ली विचार केला जातो, ही चांगलीच गोष्ट आहे.
आमच्या पिढीचं तारुण्य ‘प्रेमबिम थेरं केलीत तर याद राखा’ अशा धमक्यांना तोंड देण्यातच सरलं. आता ‘जगाला प्रेम अर्पावे,’ या सानेगुरुजींच्या वचनाचा फारच आध्यात्मिक अर्थ आम्ही घेतो. पण त्या कोवळ्या वयाला जी एका प्रेमाच्या हाकेची गरज होती, ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही. त्या कथित संस्कारांच्या, रुढी-परंपरांच्या अनाम बंधनानं आम्ही पार जखडून गेलो होतो. त्यामुळं मनात आलं, ते कधीच ओठावर येऊ शकलं नाही. दर वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ आला, की आम्हाला आमचं व्यर्थ गेलेलं तारुण्य आठवतं आणि आठवणींचा गुलकंदही कडवट लागायला लागतो...
पण, अशा वेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आठवतात. ‘प्रेम कुणावरही करावं’ हे त्यांचे शब्द आठवतात. मग आम्ही नव्यानं गुलाब शोधायला बाहेर पडतो... दहा रुपये देऊन गुलाब आणतो. डझनाहून अधिक वर्षं आमचा संसार करीत असलेल्या अर्धांगाला तो गुलाब देतो. मग ऐन फेब्रुवारीतही वातावरण जरा हिरवं झालेलं जाणवतं...


----
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, संवाद पुरवणी; १० फेब्रुवारी २०१९)
----

8 Feb 2019

रिव्ह्यू : भाई - व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

आहे मनोहर तरी...
-----------------------

‘भाई : व्यक्ती की वल्ली (पूर्वार्ध)’ हा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र सांगणारा, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट मला जेवढा आवडला होता, तेवढा आज (शुक्रवार, ८ फेब्रुवारी) प्रदर्शित झालेला याच सिनेमाचा उत्तरार्ध काही तेवढा भावला नाही. हे दोन्ही भाग ज्या पुस्तकावर प्रामुख्याने आधारलेले आहेत, त्या पुस्तकाच्या लेखिकेचे - सुनीताबाईंचेच - शब्द उसने घ्यायचे तर ‘आहे मनोहर तरी...’ असेच या भागाविषयी मला म्हणावेसे वाटले.
सर्वप्रथम सकारात्मक बाबींविषयी. हा चित्रपट पु. लं.च्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो. पुलंच्या आयुष्यात आलेल्या दोन-तीन ‘व्यक्ती व वल्ली’ (यात गटणे व बबडू) मागच्या भागाप्रमाणेच झलक स्वरूपात दाखवतो. प्रयाग हॉस्पिटलमध्ये पु. ल. अॅडमिट आहेत व त्यांना एकेक जण भेटायला येताहेत, या मागील भागातील फ्लॅशबॅक पद्धतीने याही भागात कथा पुढं सरकत राहते. पुलंच्या आयुष्यातील काही ठळक घटनांना ओझरता स्पर्श करून, तर काही घटना थोड्याफार विस्तृत स्वरूपात दाखवून कथा पुढे जाते. मात्र, हे सगळं पाहताना काही तरी ‘मिसिंग’ आहे, असं मला वाटत राहिलं.
याच्या कारणांचा विचार करताना वाटलं, की पहिल्या भागात सर्व व्यक्तिरेखांच्या आगमनाचं एक औत्सुक्य होतं. शिवाय मुळातच फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळं तो भाग एकदम जमून आल्यासारखा आवडून गेला होता. या भागात पु. ल. व सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखांचं; तसंच याही भागात दिसणाऱ्या वसंतराव, भीमसेन, हिराबाई, कुमार गंधर्व याही व्यक्तिरेखांचं अप्रूप वाटायचं कारण नव्हतं. नवीन येणाऱ्या पात्रांबद्दल औत्सुक्य होतं. त्यात सखाराम गटणे व बबडू ही दोन पात्रं येतात. पैकी गटणे हे पात्र यात अर्धं-कच्चं असंच समोर येतं. बबडू हे पात्र गिरीश कुलकर्णीनं उभं केलंय. गिरीशच्या अभिनय कौशल्याबद्दल वाद नसला, तरी संपूर्ण सिनेमात हा बबडूचा प्रसंग अगदी ठिगळ लावल्यासारखा येतो. या उत्तरार्धाला एक सीरियस टोन लाभला आहे, त्यात तो अगदीच विसंगत वाटतो. बाकी मग अत्रे एका प्रसंगापुरते येतात, पं. नेहरूही दर्शन देऊन जातात, विजया मेहता दिसतात, बाबा आमटे येतात, बाळासाहेब ठाकरे येतात, भक्ती बर्वे येतात, अनिल अवचट दिसतात... अशी पुलंच्या आयुष्यातली त्या त्या वेळी महत्त्वाची असलेली पात्रं येतात आणि जातात. हे सगळं दर्शन ‘टिकिंग ऑल बॉक्सेस’ अशा स्वरूपाचं वाटतं. यातून पुलंच्या त्या त्या वेळच्या उत्तुंगतेची, मोठेपणाची कल्पना पूर्णांशानं येऊ शकत नाही.
शिवाय नुसतं ‘टिकिंग ऑल द बॉक्सेस’ तरी कुठं आहे? दिग्दर्शकानं जे दाखवलं आहे, त्यावरच टिप्पणी करावी; त्यानं हे का नाही दाखवलं, ते काही दाखवलं असं म्हणू नये, असा संकेत आहे. मात्र, पुलंच्या सिनेमाच्या बाबतीत प्रेक्षकाला किमान काय अपेक्षित असणार, हे सांगायला हरकत नसावी. यात पुलंनी ‘दूरदर्शन’ची नोकरी नोकरशहांच्या जाचाला कंटाळून सोडली, असं दर्शवणारं एक दृश्य आहे. यानंतर पु. ल. मित्रमंडळींना जमवून एक मैफल करतात. त्यानंतर मग त्यांच्या बहुरूपी प्रयोगांचा जोरदार कालखंड सुरू होतो. आता त्यापूर्वी पु. ल. दूरदर्शनची नोकरी दिल्लीत करीत होते आणि ती करताना ते सपत्नीक लंडनला गेले होते, हे या चित्रपटात कुठंच येत नाही. कारण त्यांच्या या दौऱ्यानंतर त्यांनी ‘अपूर्वाई’सारखं प्रवासवर्णन लिहिलं, जे आजही पुलंच्या उत्कृष्ट लेखनापैकी एक मानलं जातं. अगदी लंडन नव्हे, पण किमान ते तिकडं जाऊन आले, याचाही उल्लेख यात नसावा, हे खटकणारंच! १९६१ ते १९८५ हा पुलंच्या कारकिर्दीतला बहराचा काळ. त्यापैकी १९६२ ते १९७४ या काळात त्यांनी बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात आणि वटवट असे चार बहुरूपी प्रयोग केले. त्यांची इतर नाटकेही जोरात सुरू होती. यापैकी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रारंभी व ‘ती फुलराणी’चा शेवटी उल्लेख येतो. भक्तीबरोबर पुलंच्या तालमी फार जोरदार झाल्या, असं तेव्हाची मंडळी सांगतात. त्याची झलक या चित्रपटात जरूर दिसते. मात्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेखही होत नाही, ही गोष्ट खटकलीच.
तीच गोष्ट भाईंच्या बंगालीप्रेमाची. पु. ल. वयाच्या ५० व्या वर्षी बंगाली शिकायला शांतिनिकेतनात गेले व काही महिने तिथं राहिले. या गोष्टीचा साधा उल्लेखही या सिनेमात येत नाही. माझ्या मते, इतर मराठी साहित्यिक  व पु. ल. यांच्यातला फरक अधोरेखित करणारी ही गोष्ट होती. ती यात अजिबात आली नाही. खेरीज पु. ल. नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले, नंतर १९७४ मध्ये इचलकरंजीत भरलेल्या सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले... यापैकी कशाचीच नोंद हा सिनेमा घेत नाही. मात्र, एका संगीत नाटकाच्या वेळी विजय तेंडुलकरांसोबतचा त्यांचा संवाद पुलंची एकूण कलात्मक दृष्टी दाखवण्यासाठी उपयोजिला आहे, तो प्रसंग जमला आहे.
या चित्रपटात कुमार गंधर्व आजारी असताना रामूभय्या दाते पुलंना फोन करतात व पु. ल. पुन्हा वसंतराव, भीमसेन, चंपूताई (हिराबाई बडोदेकर), माणिक वर्मा यांना घेऊन त्यांच्याकडे जातात, असा प्रसंग आहे. तिथं पुन्हा या सगळ्यांचं गाणं-बजावणं होतं व त्यानंतर कुमार पुन्हा गायला लागतात, असा तो घटनाक्रम आहे. तो ठीकच; मात्र नंतर सिनेमात उल्लेख येतो तो थेट कुमार गंधर्वांच्या निधनाचा. कुमार गेले १९९२ मध्ये. मात्र, त्यापूर्वी जवळपास नऊ वर्षं आधी पुलंचे अगदी घट्ट मित्र असलेले (व या सिनेमात ज्यांचा भरपूर वावर आहे असे) वसंतराव देशपांडे गेले, त्याचा उल्लेखही यात नाही. वसंतराव गेल्याचा पुलंना खूप जोरदार मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमाची किमान एक झलक तरी यात पाहायला मिळायला हवी होती. असो. (अर्थात हे हवं होतं, ते हवं होतं, या यादीला अंत नाही हेही खरंच.)
आणीबाणीच्या काळात पुलंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेली जोरदार भाषणे आणि नंतर सत्तावर्तुळापासून स्वत:ला विरक्तपणे दूर करणे, युतीच्या काळात त्यांना मिळालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार व नंतर बाळासाहेब ठाकऱ्यांसोबत झालेला वाद आदी प्रसंगही सिनेमा यथास्थित दाखवतो. (बाय द वे, मनोहर जोशींचं पात्र विनोदी दाखवून मांजरेकरांनी कुठला तरी मागचा वचपा काढलाय हे नक्की!)
पुलंचा दानशूरपणा, त्यांची समाजाप्रती असलेली सद्भावना यात चांगली दिसलीय हेही सांगायला हवं. फक्त पुलंनी रक्त गोळा करणाऱ्या ज्या बाईंना ते यंत्र देण्यास मदत केली, त्या बाईंचं नावच सिनेमात समजत नाही. (माझ्या माहितीनुसार त्या बाईंचं नाव मुळगावकर असं होतं. पु. ल. गमतीनं त्यांना ‘ही काय रक्तपिपासू बाई आहे!’ असं म्हणत असत.)
पुलंच्या निधनाच्या आधी काही रात्री मी स्वत: प्रयाग हॉस्पिटलमध्ये जात होतो. तेव्हा माध्यमांच्या प्रतिक्रिया मागण्याच्या घाईचा एक प्रसंग या चित्रपटात आलाय. त्या प्रसंगाचा मी स्वत: साक्षीदार आहे. गंमत म्हणजे चित्रपटात त्या माध्यमाचे नाव ‘म्यूट’ करण्यात आले आहे. हा खरोखर कहर आहे. पुलंना यावर एक विनोदी स्फुट सुचलं असतं, यात वाद नाही.
तेव्हा ‘भाई’चा पूर्वार्ध पाहणाऱ्यांना उत्तरार्ध पाहणं मस्टच आहे, हे खरं. फक्त फार अपेक्षा ठेवून जाऊ नका. अन्यथा अपेक्षाभंगाचं दु:ख वाट्याला येईल.
.....

दर्जा : तीन स्टार
----
(पहिल्या भागाच्या परीक्षणाची लिंक )

28 Jan 2019

थ्री चीअर्स : मनोगत, प्रस्तावना, परीक्षण

अर्पणपत्रिका
-----------------------



विनोदाचं अस्तर असलं, की आयुष्य दुस्तर होत नाही, हे ज्यांच्यामुळं कळलं, त्या...

पु. ल. देशपांडे यांना

सविनय समर्पित...

------

१. मनोगत 
--------------------


थ्री चीअर्स’ हे माझं एकुणात सहावं आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून प्रकाशित होत असलेलं तिसरं पुस्तक. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य काही नियतकालिकांत गेल्या तीन वर्षांत मी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. या सर्व लेखांमध्ये विनोद हा समान धागा आहे. हे असे विनोदी स्वभाव असलेले लेख लिहिण्याची प्रेरणा ज्यांच्यापासून मला मिळाली, त्या ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीत हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. 
पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून मी पु. लं.चं लेखन वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. दहावीत असताना मी प्रथम कुठल्या साहित्यिकाला पत्र लिहिलं असेल तर ते पुलंना! एका महिन्यानं मला त्यांचं उत्तर आलं आणि मी हरखून गेलो. मला अक्षरश: गगन ठेंगणे झाले. त्यानंतर त्यांना मी आणखी पत्रं लिहिली. त्यांची आणखी तीन उत्तरं आली. हा सर्व १९९१-९४ चा काळ. या काळात ते तसे बऱ्यापैकी थकले होते. मात्र, त्यांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या पत्राला वेळात वेळ काढून लिहिलेलं उत्तर ही आता माझ्यासाठी कायमची मर्मबंधातली ठेव झाली आहे. पुलंनी जगभरातल्या लोकांशी असं नातं जोडलं. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. 
पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही.
पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नाही. उलट तो निर्विष असा विनोद आहे आणि तो आपल्याला स्वतःवर हसायला शिकवतो. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. 
पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही.
स्वतःवर हसू शकणारा समाज प्रगत समजला जातो. ब्रिटिशांचं उदाहरण याबाबत देता येईल. पुलंनी त्यांच्या प्रवासवर्णनांतूनही ते सांगितलं आहेच. मराठी समाजही स्वतःवर विनोद करून हसू शकतो. ते एक प्रकारचं आत्मपरीक्षण असतं. स्वतःकडं स्वच्छ मोकळ्या नजरेनं पाहता येणं असतं. आपल्याला ही निखळ दृष्टी पुलंच्या साहित्यानं दिली. 
या पुस्तकातले लेख याच दृष्टीनं लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ते वाचून वाचकांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले, तरी हा खटाटोप सार्थकी लागला असं म्हणता येईल.
आता कृतज्ञतेचे दोन शब्द...
माझ्या लेखनप्रपंचाला समजून घेणारी, सदैव माझ्यामागे आधार म्हणून उभी असलेली माझी पत्नी सौ. धनश्री, माझ्यासाठी आता जणू प्रेरणाच असलेला माझा मुलगा नील, माझे आई-वडील, इतर जिव्हाळ्याचे आप्त-कुटुंबीय, माझ्या प्रत्येक लेखनाची वाट पाहणारा माझा मित्रपरिवार, 'मटा'तील माझे सहकारी व इतर सर्व पत्रकारमित्र, माझे सर्व वाचक आणि 'लास्ट बट नॉट द लीस्ट' म्हणता येतील अशा माझ्या प्रकाशिका, 'कॉन्टिनेंटल'च्या देवयानी अभ्यंकर व तेथील सर्व कर्मचारी परिवार यांच्याविषयी मी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांचं प्रेम मला नवनव्या लिखाणासाठी सदैव प्रेरित करीत असतं... 
विशेष उल्लेख करायचा आहे तो ज्येष्ठ लेखिका मंगलाताई गोडबोले यांचा. विनोद आणि पुलंवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा अधिकार असलेल्या मंगलाताईंची प्रस्तावना या पुस्तकाला लाभावी, यासारखा दुग्धशर्करा योग दुसरा नाही. मंगलाताईंचं आश्वासक बोलणं सदैव आशीर्वचन उच्चारल्यासारखं भासतं. मी त्याचा एक लाभार्थी आहे, हे सांगण्यास फार आनंद वाटतो.
दुसरा उल्लेख करायचा तो रेश्मा बर्वे हिचा. या पुस्तकाचं देखणं कव्हर आणि आतील सुंदर रेखाचित्रं तिनं फार कमी वेळात करून दिली आहेत. लेखकाच्या मनात असलेलं चित्र जाणून रेखाटण्याची क्षमता असलेली रेश्मा ही एक उत्तम कलाकार आहे, यात शंकाच नाही.
आनंदाच्या प्रसंगी जल्लोष करताना, पार्टी करताना आपण 'थ्री चीअर्स' म्हणतो.
तसं आपलं जगणं सेलिब्रेट करणाऱ्या प्रत्येकाला 'थ्री चीअर्स' म्हणून मी हे माझं पुस्तक विनम्रतेनं सादर करतो आहे.
आनंद घ्या, आनंद वाटा, आनंद लुटा... थ्री चीअर्स!

---- 

२. प्रस्तावना
-------------

कॉफी, चहा, सरबत आणि बरंच काही...
-----------------------------------------------------------------------------------


श्री. श्रीपाद ब्रह्मे ह्यांनी २०१५ साली ‘कॉफीशॉप’ उघडलं, नंतर ‘टी-टाइम’चं स्मरण केलं आणि आता ‘थ्री चीअर्स’ म्हणत गारेगार सरबताचा पेला वाचकांना सादर केला आहे. (शौकिनांनी पेल्यातल्या पेयाचा ब्रँड आपापल्या पसंतीचा ठेवावा. आमची मजल सरबतापर्यंतच!) अवघ्या चार वर्षांमध्ये सहावं पुस्तक हे काही खायचं (इथं, प्यायचं) काम नाही. लिहिणारी व्यक्ती स्त्री असती तर पाळण्याच्या वेगाचं कौतुक करावं लागलं असतं. पुरुष आहे म्हणून पळण्याच्या वेगाला दाद देते. ‘वेगे वेगे धावू’ म्हणून आपला स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवणाऱ्या लेखकाची ही कामगिरी आहे. 
मुळामध्ये वाचनाची प्रचंड आवड, पत्रकारितेचा व्यवसाय, माणसं जोडण्याचं व्यसन आणि चौफेर निरीक्षण अशा ‘चार उंगल्या शक्कर’मध्ये असणाऱ्याला लेखक होण्याशिवाय पर्याय नसतो. ‘मौका भी है, दस्तूर भी है’ छापाच्या या परिस्थितीचा ब्रह्मेंनी पुरेपूर फायदा घेतला नसता तरच नवल. ह्यामुळेच एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला, पार्टीला ‘थ्री चीअर्स’ म्हणावं तसं जगणं सेलिब्रेट करणाऱ्या प्रत्येकाला ‘थ्री चीअर्स’ करण्यासाठी त्यांनी ह्या पुस्तकाचा घाट घातलाय.
यंदा पुलंचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने हे पुस्तक पुलंना अर्पण केलंय. पण तसं ते नसतं तरीही कदाचित लेखकाने अर्पणपत्रिका हीच ठेवली असती. कारण मराठीमध्ये विनोदात काही मुलूखगिरी करू बघणाऱ्याला ‘पयलं नमन गनद्येवाला’ करावंसं वाटणं अगदीच सहज स्वाभाविक आहे. पण इथे लेखकाने फक्त दुरून हे नमन केलेलं नाही तर पुलंच्या लेखनाला बरंचसं आत्मसातही केलं आहे. कसं ते सांगण्यासाठी, मला नमनावर तेल खर्च करणं थांबवून सरळ पुस्तकाकडे वळावं लागेल.
थ्री चीअर्स’च्या अनुक्रमणिकेत दाखवल्याप्रमाणे ह्या पुस्तकातले लेख तीन गटांमध्ये विभागलेले आहेत. पहिल्या भागात गणू गणपुलेच्या गोष्टी आहेत जो लेखकाचा मानसपुत्र आहे. दुसरा भाग सोशल हास्याचा आणि तिसरा पोलिटिकल हास्याचा आहे.
हा गणू गणपुले नावापासूनच सामान्य आहे. मध्यमवर्गीय आहे. दर वर्षी हिवाळा आला, की त्याला टूरवर जाण्याचे वेध लागतात. हिवाळ्यातल्या पौष्टिक खाण्याने त्याच्या देहाची तिजोरी प्रसरण पावू लागते. पुणं ‘स्मार्ट सिटी’ झाल्याची दिवास्वप्नं त्याला बघावीशी वाटतात. जुनी दिवाळीची मजा हरवत चालल्याचं जाणवून त्याला खेद होतो आणि ‘दिवाळी पहाट’मध्ये नव्या दिवाळीचा आनंद शोधावासा वाटतो. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं कर्मकांड झाल्याचं जाणवतं तरी पाय तिकडं नकळत वळतातच. विद्यार्थीदशेत स्वत: तो परीक्षांना घाबरत असतोच; पण पुढे बाप झाल्यावर मुलाचा अभ्यास घेणं हीच मोठी परीक्षा असल्याचा साक्षात्कार त्याला होतो. असं सर्वसाधारण पुणेरी-मध्यमवर्गीय - ‘पेठ’कर माणसाच्या जीवनात होऊ शकेल ते सगळं त्याच्या जीवनात होतं, अनुभवाला येतं. त्याच्या अनुभवांमधल्या गमतीजमतीत वाचकही ओढले जातात. 
दुसऱ्या, सोशल हास्याच्या विभागामध्ये अनेक सामाजिक दु:खांची गंमतशीर हाताळणी आहे. तरुण मुली किंचित प्रौढ बाप्यांना अचानक ‘काका’ म्हणून रस्त्यात हाक मारतात, साहित्य संमेलनांमध्ये भलतीच संमेलनं भरतात, वृत्तपत्रं गंभीर विषय हाताळताना अनावधानाने नसते विनोद करतात इथपासून ते पुरुषांना दररोज दाढी घोटावी लागते इथपर्यंत नाना दु:खं झेलत आपण जगत असतो. त्या वेळी त्या त्या प्रसंगातून जाणाऱ्यांना काय यातना होत असतील ह्याबाबत इथे लेखक आपला कल्पनाविलास व्यक्त करतात. काही वेळा काही तात्कालिक कारणंही सामाजिक दु:खात भर घालतात. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन येतो तेव्हा आपल्याला रूढ योगासनं जमत नसल्याची आणि काही सक्तीची योगासनं करावी लागत असल्याची बोच लागून राहते. साहजिकच ‘काही नवी योगासने’ ह्या लेखाचा उतारा दिला जातो. ह्या सगळ्याशी जोडून घेताना वाचकाला कुठलीच अडचण येत नाही, कारण हे सगळं तोही बघत-जगत-भोगत असतोच.
पोलिटिकल हास्य ह्या विभागात पुण्याची मेट्रो, देशातली नोटबंदी, विजय मल्ल्यांसारख्याच्या ‘अनर्थलीला’, केजरीवाल ब्लॉग वगैरेंची मिश्कील उलटतपासणी केली जाते. अचानक नोटबंदी जाहीर झाल्यावर मध्यमवर्गीय आयुष्यात दिवाळीनंतर अचानक शिमगा कसा साजरा झाला, घराघरातल्या पिगी बँका कशा हळूच चाचपल्या गेल्या, गृहिणीवर्गाची ‘समांतर’ अर्थव्यवस्था कशी ढवळून निघाली याचं प्रत्ययकारी वर्णन येतं. एकदा एखादा विषय हाताळायला घेतला, की ब्रह्मे त्याचे लहानात लहान धागेदोरेही हातून सुटू देत नाहीत. त्यामुळं ‘समग्र’ म्हणतात तसं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं.
पुल परंपरेचा वारसा घेतल्याने पुलंच्या पठडीतले विषयही येतात आणि शब्दखेळही येतात. ‘काही अनिष्ट ग्रहयोग’ ह्या पुलंच्या लेखाच्या धाटणीचे नवे योग इथे ब्रह्मे देतात. थंडीमधलं ‘आंतर्रजईगुडुप्पासन’ किंवा पत्नीबाबतचं ‘वामांगपरोक्षनतमस्तकासन’ वाचताना पुलंचे ‘द्वारघंटिकायोग’ किंवा ‘थप्पभंगिकायोग’ आठवले नाहीत तरच आश्चर्य. प्राणिजीवनावर पुलंनी लिहिलेल्या लेखाच्या जवळपास जाणारा ‘पोपट, मैना, मोती, कावळेकाका’ हा लेखही आढळतोच. आजच्या माणसाचं वर्णन ‘सोशल मीडियाच्या वृक्षाच्या फांदीवर बसलेले स्वच्छंद पक्षी’ असं होतं. पुण्याच्या झेड ब्रिजचं वर्णन ‘जो रात्री एक्स ब्रिज बनतो’ असं येतं. फावल्या वेळच्या गप्पांमध्ये आदल्या दिवशी पाहिलेल्या मालिकांबद्दल बोलणाऱ्या बायकांच्या संवादांना ‘सीरियल किलर’ संवाद असं बिरुद चिकटतं. सेल्समन हा ‘विक्रीपुरुष’ होतो, तर मुद्राराक्षसाच्या कचाट्या सापडल्यावर कोणी ‘मुरलीधर जोशी’ हा ‘मुलगीधर जोशी’ बनतो किंवा चतुर मंत्री ‘त’च्या जागी ‘च’ला उकार जोडून उल्लेखला जातो. बँकेतला काउंटर हा ‘काउंटर ॲटॅक’ करतो. असे एकूण भाषिक किंवा मिश्रभाषिक विनोद ठिकठिकाणी सापडतात.
त्यामानानाने मानसपुत्र प्रकरण ब्रह्मेंनी विशेष खुलवल्याचं मला जाणवलं नाही. एक तर तो प्रकार पेलायला अवघडच असतो. एक पुत्र आला, की ओघाओघाने त्याचा परिसर, त्याचं वातावरण, त्याच्या सवयी-लकबी, त्याच्या ताकद आणि मर्यादा या सगळ्यांची बंधनं यायला लागतात. बरं ती नकोत म्हणून या गोष्टी विचारात घेणंच टाळलं तर मग त्या व्यक्तिरेखेत पुरेसा प्राणही फुंकला जात नाही. अशा दोन्ही बाजूंनी कुचंबणा होते. साक्षात पुलंनीही ‘सोन्या बागलाणकर’ ही मानसपुत्रसदृश व्यक्तिरेखा रंगवायला घेतली होती, पण पुढे निम्म्यातच तिचं बोट सोडावं लागलं, हा इतिहास इथं सहजच स्मरण्याजोगा आहे. तेव्हा जे परात्पर गुरूंना जमलं नाही तिथे ब्रह्मे अंमळ चाचपडत असले, तर ते नक्कीच ‘काणाडोळाकरणीय’ आहे.
एवढी एक मला जाणवलेली उणीव वगळता, एरवी पुस्तक अनेक दृष्टींनी उल्लेखनीय आहे. निरीक्षण, सहज-संवादी भाषा, बारकावे टिपण्याकडे कल यामुळे पुस्तक पटकन वाचून संपतं. ‘सवडीनं कधी तरी बघू’ म्हणावं लागत नाही. आळशी नवरा, भ्रष्ट राजकारणी, लठ्ठपणा, संपादकीय कोडगेपणा असे अतिपरिचित विषय टाळले तरी चालतील. तसंच वारंवार पुणं, त्याचा इतिहास, भूगोल, त्यातल्या पेठांचं-मठांचं माहात्म्य ह्यात रमणंही फार काळ पुरणार नाही, असे काही इशारे द्यावेसे वाटतात. जमाना ‘ग्लोबल’चा आहे. आपण ‘लोकल’संदर्भात किती काळ किती अडकायचं याचा विचार प्रत्येक लेखकाला कधी ना कधी करावाच लागतो, हा अनुभवही आहे. तो घेण्याच्या टप्प्यापर्यंत आता ब्रह्मे आलेच असतील. 
हिरीरीने, सातत्याने लिहिणाऱ्या लेखकाच्या जीवनात सहसा तीन टप्पे येतात. पहिला टप्पा स्वागताचा. ब्रह्मेंच्या पहिल्याच पुस्तकाचं चांगलं स्वागत झालंय. दुसरा टप्पा स्वीकाराचा. आतापर्यंत वाचकांनी त्यांना लेखक म्हणून स्वीकारलंय. तिसरा टप्पा येतो सत्काराचा. आवड-प्रेम मिळवत मिळवत लेखक मान-सन्मानाचाही धनी व्हायला लागतो. ह्या टप्प्यावर श्रीपाद ब्रह्मे लवकर पोचोत, अशी शुभेच्छा देऊन थांबते. त्या वेळी बरेच लोक त्यांना ‘थ्री चीअर्स’ म्हणतील, त्यात एक आवाज माझाही असेल. आमेन! 

- मंगला गोडबोले

१२ डिसेंबर २०१८, पुणे

---

३. परीक्षण
------------

आनंदाची ऊर्जा देणारा निखळ विनोद
------------------------------------------------------------------------------


श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘थ्री चीअर्स’ हे कॉन्टिनेंटल प्रकाशनाने केलेले पुस्तक हातात आले आणि वाचता वाचता वाळवंटात ‘ओॲसिस’ दिसल्याचा भास झाला. सध्या वाचन, वाचन संस्कृतीविषयी तापलेल्या चर्चा वाचत-ऐकत असताना अचानक एक सुरेखसा हिरवळीचा कोपरा दिसला. त्या हिरव्याशार जमिनीच्या तुकड्यावर, त्या बेटावर बसून त्यांनी हसत हसत पुढे केलेला विनोदाचा आल्हाददायक पेला ‘थ्री चीअर्स’ म्हणून स्वीकारावा असेही वाटले. आजकाल आजूबाजूच्या तापलेल्या वास्तवामध्ये आपण ‘आपल्याला हसायलाही येते’ ही गोष्टच आपण विसरत चाललो आहोत की काय, असेही वाटून जाते. अशा वेळी हे पुस्तक वाचकांना सांगून जाते - ‘थ्री चीअर्स’ म्हणजे हसत जगणं, आनंदानं हसणं, समाधानी असणं, हवं ते सगळं साधणं...’ कधी कधी आपण हटवादी होतो आणि रोजच्या जगण्यातून हरवत चाललेल्या निखळ विनोदाला मुकतो; पण साध्यासुध्या आनंदातही ऊर्जेचा झरा लाभत असतो. हा आनंद कसा शोधावा, हे ‘थ्री चीअर्स’ वाचल्यावर नक्की कळून येईल. हे पुस्तक हाती घ्या, वाद-विवादांना अंमळ बाजूला सारा आणि त्यांना सांगा, ‘थांबा हो जरा! काही क्षण मस्त हसण्याची संधी प्राप्त होऊ द्यात मला. मग बघतो तुमच्याकडे! मग तुम्हीही मी हसत तुमच्यापुढे ठेवलेल्या पेल्याचा स्वीकार कराल आणि म्हणाल मला, थ्री चीअर्स!’
हो! विनोदी लेखनात इतकी ताकद आहेच, असते आणि असावी. श्रीपाद ब्रह्मे यांचे हे लेखन आपल्याला क्षणभर का होईना हा आनंद आपल्या हातात ठेवते. याचा अनुभव घ्याच तुम्ही. आणि तो घेण्यासाठी हे पुस्तकही हाती घ्या. मुळातच या पुस्तकाचे लेखक पत्रकार आहेत. त्यांना व्यसन आहे माणसं जोडण्याचं, माणसं वाचण्याचं! पुन्हा पत्रकार असल्याने सूक्ष्मशी निरीक्षणशक्ती त्यांच्या ठायी आहे. ही निरीक्षणशक्ती त्यांना समाजात, राजकीय वर्तुळात वावरताना उपयोगी पडतेच आहे. त्याचा उपयोग त्यांना या पुस्तकाच्या लेखनाला झालेला आहेच. पण आता त्यांची पावले अधिक कलात्मक, ‘स्व’तंत्र, आणि कल्पनाशक्तीची मदत घेत पुढे टाकली जात आहेत, ही अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. या पुस्तकात त्यांची निर्मिती असलेला त्यांचा मानसपुत्र ‘गणू गणपुले’ भेटतो. मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचे तो प्रतिनिधित्व करतो. हिवाळ्यात सहलींना जातो, सवाई गंधर्व महोत्सवाला जातो, पुण्याची खास ‘पेठ संस्कृती’ जगतो, हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ खाण्याचे योजतो, ‘दिवाळी पहाट’ला जाण्याचा आनंद घेतो, लहानपणी परीक्षांना घाबरणारा मोठेपणी मुलांना परीक्षांना न घाबरण्याचे धडे देतो. स्वत:ला फसवत जगण्यासाठीच्या सर्व गोष्टींना सामोरा जातो. लेखक त्याचे वर्णन फार छान करतात - ‘नाकासमोर चालणं आणि छापखान्यातल्या नोकरीसह घर-दार सांभाळणे, ही त्याची सर्वोच्च आकांक्षा! गणूनं मुळा-मुठेच्या काठी जन्मून, जन्मजात कमावलेला कुचकटपणा आणि वंशपरंपरेनं आलेली तैलबुद्धी याच दोन गोष्टी त्याच्या भाल्यातली प्रमुख अस्त्रं!’ असा हा गणू सर्वसामान्य वाचकांना आपलासा न वाटेल तरच नवल! पुस्तक वाचता वाचता आपण आपल्याला या गणूच्या ठिकाणी आपल्या नकळत ठेवायला लागतो. आणि ही भावना निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो, हेच या लेखनाचे यश! लेखक या यशासाठी आटापिटा करत नाही. रोजचेच अनुभव, त्यातले प्रसंग आपल्या सरळ-साध्या शब्दांत वाचकांच्या समोर ठेवतो. ही शैली अकृत्रिम असते आणि म्हणूनच ती आपल्याला भावते. आपण त्या अनुभवांशी तादात्म्य पावताना गालातल्या गालात हसू फुटावे, आपलेच चित्र आपण या गणूत बघत आहोत, असे वाटावे असा आपल्या जगण्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला मिळतो. या लेखनात बोचरेपणा नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आपल्या जगण्याची गोची, आपली रसिकता (?), आपल्या मनातली स्वप्नं, आपले हौसेचे सण-समारंभ, महोत्सव हे सगळं हा गणू गणपुले नामक ‘सात्त्विक पुणेकर’ आपल्यासमोर ठेवतो. ‘पुणेकर’ तोसुद्धा ‘सात्त्विक’ ही लेखकाने मारलेली कोपरखळी आपली कळी खुलवते आणि एका बैठकीत ‘गणू गणपुलेच्या गोष्टी’ वाचूनच पुस्तक बाजूला ठेवावेसे वाटते. 
पुस्तकातला दुसरा भाग आहे ‘सोशल हास्या’वर आधारित. यातल्या ‘पोपट, मैना आणि कावळेकाकांची गोष्ट...’, ‘नस्ती कटकट’, ‘काही नवी योगासने’, ‘ओ काका...’, ‘संमेलन : एक घेणे’, ‘वृत्तपत्रीय विनोद’ आणि ‘ई-धोबीघाट’ या सर्व लेखांमधून हे ‘सोशल हास्य’ प्रकटते. हे सर्व लेखक स्वत: पत्रकार असल्याने त्याचे ‘होमपिच’च आहे, असे म्हणावेसे वाटते. ‘काही नवी योगासने’मध्ये लेखक कालोचित आणि समयोचित नवी आसने वाचकांना सुचवू बघतो. उदा. ‘अधोमुखासन’, ‘अंगुलीनर्तनासन’ ही मोबाइलच्या वापरासंबंधाने अस्तित्वात आलेली आहेत. ‘खुर्चीबूडघट्टचिकटासन’ हे लोकप्रिय आणि आजच्या काळात जास्त प्रचलित असे आसन! ‘चलनप्रियासन’ हे आसन आवडणाऱ्या लोकांना कागदी नोटा खाव्याशा वाटतात. ‘गलितगात्रासन’ हे आसन आजकाल ‘नावडते’, पण अनेकांवर लादले गेलेले आसन आहे. या सर्व आसनांचे खुमासदार वर्णन करून लेखक एक टिप्पणी जोडतो - ‘ही सर्व आसनं दूर करून प्रेमानं खरीखुरी योगासनं करायला मिळतील, तो दिवस माझ्या दृष्टीनं खराखुरा आंतरराष्ट्रीय योग दिवसअलेल. हा दिवस पाहण्याचा ‘योग’ कधी येतो, ते पाहू!’ एकंदरीत काय, पुस्तकाच्या या भागात एका पत्रकाराची ‘काकदृष्टी’ सर्व समाजावर सावधपणे फिरत समाजपिंडाला हलक्याशा टोची मारते आहे, हे जाणवून जातेच!
या पुस्तकात तिसरा भाग आहे ‘पोलिटिकल हास्या’वर आधारित. ‘तारीख पे तारीख’ देणारा मेट्रो प्रकल्प, नोटाबंदीचे आख्यान, केजरीवाल स्वत: ब्लॉग लिहीत आहेत असे कल्पून लिहिलेला ब्लॉग, विजय मल्ल्यावरचा ‘किंग ऑफ गुड होप’ हा लेख या सर्व लेखांतून लेखकाने त्या त्या राजकीय परिस्थितीवर, राजकीय हेतूने जाहीर होणाऱ्या योजनांवर आणि राजकीय नेत्यांवर भाष्य केले आहे. ‘मेट्रो आली रे अंगणी’ या लेखात लेखक म्हणतो, ‘पाच वर्षांनंतरचं चित्र आम्हाला लख्ख दिसतंय. एक जानेवारी २०२२... आम्ही शिवाजीनगर मेट्रो जंक्शनला उभे आहोत... महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. (त्याचा लाइव्ह वृत्तान्त आमच्या मोबाइलवर आम्ही बघत आहोत!) पालिकेत आता नवीन प्रस्ताव आला आहे... आत्ता बांधलेले दोन्ही मेट्रोचे मार्ग काढून बीआरटी मेट्रो करायची... सध्या नदीकाठानं मेट्रो जाते, पण नदीच्या पृष्ठभागावरची बरीचशी जागा वाया जाते... तेव्ही तिथं मेट्रोची बीआरटी करा... दोन्ही बाजूंनी मेट्रो जातील, मध्ये पीएमपीचा बसचा ट्रॅक टाका... आणि खाली नदीत फास्ट क्रूझ सर्व्हिस द्या... क्रूझमधला माणूस ‘रोप वे’नं बसमध्ये बसेल... बसमधून उतरला, की त्याचं मेट्रोत पाऊल पडेल... तेवढ्यात दुसरे महाशय उठले आणि म्हणाले, ‘अहो, पण क्रूझ चालवण्याएवढं नदीत पाणी नाही, त्याचं काय करायचं?’ त्यावर पहिले महाशय म्हणाले, ‘माझी मिनरल वॉटरची फॅक्टरी आहे. टेंडर काढा... पाहिजे तेवढं मिनरल वॉटर नदीत ओतू...’ आणि अचानक पालिका सभेत पूर आला... सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं...’ या टिप्पणीवरून लेखकानं साधलेलं सर्व राजकीय परिस्थितीवरचं ‘शरसंधान’ किती अचूक आहे, याची कल्पना येईलच! सुज्ञांस सांगणे न लगे! तर असे हे ‘थ्री चीअर्स’.... वरवर विनोदी, पण त्याला वास्तवावर हलक्याशा केलेल्या कोपरखळ्यांचे अस्तर. दिवाळीतल्या लवंगी फटाक्याच्या लडीसारखे! कोणालाही चटका बसू द्यायचा नाही, पण फटाके फोडण्यातला आनंद तर निर्विवादपणे मिळू देणारी लवंगी फटाक्यांची लड! 
याआधी ब्रह्मे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘कॉफीशॉप’, ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, ‘यक्षनगरी’, ‘एम. एस. धोनी : जिद्दीचा षटकार’, ‘टी-टाइम’ ही सर्वच पुस्तके चांगली आहेत. पण शेवटी ‘थ्री चीअर्स’ म्हणण्यातली मौज काही औरच! आणि काळाशी सुसंगत! ही जगण्यातली मौज कॉन्टिनेंटल प्रकाशनाने आपल्या हाती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. या पुस्तकाला लाभलेली समर्थ लेखिका मंगला गोडबोले यांची प्रस्तावनाही महत्त्वाची आहे. आणि एक विनोदी पुस्तक वाचण्यासाठी, दुसऱ्याने गुदगुल्या करून हसविण्याचे काहीच कारण नाही. ते आपले आपल्याला वाचून आपले आपल्यालाच हसायला येते. आपले आपणच हसू शकतो, असे ‘इनोदी लेखन’ केल्याबद्दल ‘लेखकाय नमो नम:’ आणि ‘थ्री चीअर्स’!

- डॉ. माधवी वैद्य

---

(महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत २० जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित परीक्षणाचा मूळ तर्जुमा)

----

25 Jan 2019

ठाकरे - रिव्ह्यू

आहेत ‘साहेब’ तरीही...
----------------------


मला अभिजित पानसे या दिग्दर्शकाचं काम आवडतं. त्यामुळं ‘ठाकरे’ या चरित्रपटाचं दिग्दर्शन तो करणार म्हटल्यावर बऱ्यापैकी आशा तयार झाल्या. नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांचं काम करणार, म्हटल्यावर तर हा सिनेमा पाहणं अगदी ‘मस्ट’ झालं. त्यानुसार खूप उत्सुकतेनं आज पहिल्याच दिवशी (२५ जानेवारी) हा सिनेमा (मराठी आवृत्ती) पाहिला. सिनेमा पाहिल्यावर माझ्या मनात संमिश्र भावना तयार झाल्या. सिनेमात काही गोष्टी उत्तम जमल्या आहेत, तर काही गोष्टींबाबत भ्रमनिरास झाला. 
आधी जमलेल्या गोष्टींबाबत. या चित्रपटानं ‘ठाकरे’ नावाच्या व्यक्तिरेखेची जडणघडण अगदी बारकाईनं, सर्व तपशिलात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना महाराष्ट्राचा, मुंबईचा इतिहास माहिती आहे, ज्यांनी हा काळ बघितला आहे, त्यांना हा चित्रपट स्मरणरंजनाच्या दुनियेत घेऊन जाईल. मुंबईत मराठी माणसांवर होणारा अन्याय ‘कार्टून’च्या रूपात दाखविण्याची कल्पना फारच आवडली. त्यानंतर बाळासाहेबांकडं कामं घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या वाढते, हे दाखविण्यासाठी केलेला दृश्यांचा कोलाजही आवडला. चित्रपटाचा स्वभाव गंभीर आहे. तो आशयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. चरित्रनायकाच्या वैयक्तिक आयुष्यातील हळवे क्षणही टिपण्यावर भर देतो. सिनेमाचा पूर्वार्ध संथपणे, वेळ घेत, ‘बाळ ठाकरे’ ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब’ हा प्रवास दाखवतो. नवाजुद्दीनचा अभिनय, त्यानं बाळासाहेब साकारण्यासाठी घेतलेली मेहनत, अंगिकारलेली देहबोली स्तुत्य आहे. (पण बाळासाहेब वर्णानं गोरे होते. यात ते काळे दिसतात.) प्रबोधनकार, श्रीकांत ठाकरे, प्रमोद नवलकर, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई या व्यक्तिरेखा जमल्या आहेत. विशेषत: प्रबोधनकारांचे काम करणारा कलाकार हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो. पूर्वार्धातील अनेक प्रसंग मुंबईतील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासाची उजळणी करणारे आहेत. ते प्रसंग व तेव्हाचे कलादिग्दर्शन प्रशंसनीय.
आता त्रुटींबाबत. हा चित्रपट युतीच्या १९९५ मधील विजयापर्यंत येऊन थांबतो व शेवटी  ‘टू बी कंटिन्यूड’ अशी पाटी येते. हा सिनेमाचा पूर्वार्ध आहे, हे चित्रकर्त्यांनी आधी स्पष्ट केलेले नाही. ‘भाई’ चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांना विश्वासात घेऊन हा पहिला भाग आहे, हे सांगायला हवे होते. याशिवाय चित्रपटाच्या संकलनात काही त्रुटी जाणवतात. लखनौच्या कोर्टात बाळासाहेब अयोध्या खटल्यात साक्षीला जातात, त्या प्रसंगापासून चित्रपटाची सुरुवात होते व तिथेच शेवट होतो. त्यांच्या निवेदनाच्या मध्ये पेरलेल्या प्रसंगांतून, फ्लॅशबॅक तंत्राने कथा पुढे जाते. मात्र, १९६९ ची घटना आधी येते व नंतर १९६६ ची येते. घटना कालक्रमानुसार येत नाहीत. युती सरकारमध्ये मनोहर जोशींचा शपथविधी १९९५ मध्ये झाला. जर बाळासाहेबांची साक्ष १९९४ मध्ये चालली आहे, तर त्या काळाच्या मागील घटनाच फ्लॅशबॅकमध्ये यायला हव्यात. त्याऐवजी १९९५ ची घटनाही सिनेमात दाखविली जाते. आणखी खटकणारी बाब म्हणजे अमृता रावनं साकारलेल्या मीनाताई. मराठी आवृत्तीतील संवादांचे डबिंगही अमृतानंच केलं असावं. मात्र, तिचे कृत्रिम मराठी उच्चार खूप खटकतात. माँसाहेबांची ही व्यक्तिरेखा ठसत नाही. तीच गोष्ट संदीप खरेंनी साकारलेल्या मनोहर जोशींची. प्रवीण तरडे यांनी साकारलेले दत्ताजी साळवीही अनेकदा ‘ओव्हर द बोर्ड’ जातात. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, मुंबईच्या आयुष्यातील गिरणी संपासारखी महत्त्वाची गोष्ट हा चित्रपट बायपास करून पुढं जातो. त्याऐवजी कृष्णा देसाईंची हत्या, आणीबाणी व ठाकरे-इंदिरा भेट अशा गोष्टी जास्त तपशिलात दाखविल्या जातात. बाळासाहेब जातिधर्म मानणारे नव्हते, ही बाब खरीच. पण तरीही त्यांच्या घरात एक मुस्लिम नमाज पढतो आहे, हे दृश्य आवर्जून दाखवण्यामागचा उद्देश लपत नाही. 
‘ठाकरे’ या चित्रपटाबाबत सर्वांत चर्चा झाली ती बाळासाहेबांच्या आवाजाची. सचिन खेडेकर यांचा आवाज बदलून निर्मात्यांनी चेतन सशीतल यांचा आवाज वापरला, ते फार बरे झाले. प्रेक्षकांना बाळासाहेब ही व्यक्तिरेखा विश्वसनीय वाटण्यात या आवाजाचा फार मोठा वाटा आहे. 
अर्थात, हा चित्रपट पाहताना या चित्रपटाची ‘कथा’ संजय राऊत यांची आहे, हे लक्षात ठेवलेले बरे. ठाकरे यांचे उत्तरार्धातील आयुष्य खूप जवळून पाहिलेले ते पत्रकार व नंतर त्यांचे विश्वासू सैनिक असल्यानं चित्रपट अधिकाधिक ‘ऑथेंटिक’ करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत, हे जाणवतं.
पण तरीही हा चित्रपट एक उत्तम चरित्रपट पाहिल्याचं समाधान देत नाही. काही तरी राहून गेल्यासारखं वाटतं. मी सिनेमा पाहताना संपूर्ण भरलेल्या थिएटरमधून एकदाही टाळी, शिट्टी आली नाही, हे जरा जास्तच जाणवलं. (‘उरी’च्या तुलनेत तर ते फारच जाणवलं.) अर्थात, हा बाळासाहेबांचा संपूर्ण चरित्रपट नाहीच, हे शेवटी समजलंच. त्यामुळं काहीसं असमाधान घेऊन पुढच्या भागाची वाट पाहायची.
बाळासाहेबांनी स्वत: हा चित्रपट पाहिला असता, तर ते कदाचित चेतन सशीतल यांना म्हणाले होते, तसंच संजय राऊत यांना म्हणाले असते का? - ‘चांगलंय. परत काढू नकोस!’

दर्जा : तीन स्टार

---

24 Jan 2019

उरी - द सर्जिकल स्ट्राइक - रिव्ह्यू

‘उरी’ अभिमानच, पण...
-----------------------

‘उरी - द सर्जिकल स्ट्राइक’ हा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासून खूप चर्चेत आहे. अनेकांना तो अफाट आवडलाय, तर अनेकांना त्याचं या वेळी प्रदर्शित होणं फार सूचक वाटतंय. हा सिनेमा पाहायला मला दोन आठवडे जमलंच नाही. अखेर आज, गुरुवारी (२४ जानेवारी) मी तो पाहिला. मला सिनेमा आवडला. युद्धपट पाहायला मला आवडतात. ‘उरी’ हा भारतीय लष्कराच्या अतुलनीय कामगिरीवर आधारित सिनेमा असल्यानं तो पाहताना अजूनच जास्त छान वाटतं. आपल्या लष्करी अधिकाऱ्यांबद्दल, जवानांबद्दल विलक्षण अभिमान आपल्या उरी दाटून येतो. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना शिकवलेला मोठाच धडा आहे, यात वाद नाही. अशी मोहीम राबविताना पंतप्रधानांपासून सर्वच उच्चपदस्थ सहभागी असतात. अशी धाडसी मोहीम कशी राबविली जाते, ती प्रत्यक्षात कशी आणली जाते, हे सगळं पाहणं आपल्याला आवडतं. ‘उरी’ आपल्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करतो. 
अनुराग कश्यपनं त्याच्या गाजलेल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमाची रचना ‘चॅप्टर १’, ‘चॅप्टर २’ अशी पुस्तकासारखी केली होती. ‘उरी’ही तशीच रचना सादर करतो. पहिल्या चॅप्टरमध्ये मणिपूर, नागालँड येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, अनेक जवानांचं वीरमरण आणि नंतर आपल्या जवानांनी म्यानमारच्या सीमेत घुसून घेतलेला त्याचा बदला हा भाग येतो. खऱ्या अर्थाने आत्ताच्या सरकारच्या काळातला हा पहिला सर्जिकल स्ट्राइक होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या बाजूने होणारी घुसखोरी आणि दहशतवाद्यांकडून आपल्या तळांवर होणारे हल्ले थांबले नाहीत. उरी येथे झालेला हल्ला असाच भीषण आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी लज्जास्पद होता. आपल्याच लष्कराचा गणवेश घालून चार पाकिस्तानी दहशतवादी थेट उरी येथील लष्करी तळात शिरतात आणि झोपलेल्या नि:शस्त्र जवानांना क्रूरपणे गोळ्या घालून संपवतात, ही घटनाच अत्यंत संतापजनक होती. पडद्यावरही ती दृश्ये पाहताना कानशिले गरम झाली होती. अशा या मानहानीकारक हल्ल्यात आपले अनेक जवान मारले गेले. याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करायचा आणि तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे, अशी योजना ठरली. 
चित्रपटात पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार गोविंद भारद्वाज (परेश रावल) (अजित डोवल यांच्यावर बेतलेले पात्र) ही योजना आखतात आणि तडीस नेतात. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) हा धाडसी व शूर अधिकारी ही योजना प्रामुख्याने प्रत्यक्ष राबवतो आणि यशस्वी करतो. चित्रपटात हा सगळा भाग थरारकपणे समोर येतो. सुमारे दोन तास २० मिनिटांच्या या चित्रपटात आपण बहुतांश काळ खुर्चीला खिळून राहतो.
चित्रपटात विहानची अल्झायमरने त्रस्त आई, त्याची बहीण, लष्करातच अधिकारी असलेला त्याचा मेव्हणा अशी सगळी कथाही समांतरपणे येते. विहानचा मेव्हणा उरी हल्ल्यात बळी पडतो. त्यामुळं या सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपण सहभागी व्हायचंच याबद्दलचा विहानचा निश्चय पक्का होतो. त्यानंतर तो या योजनेत कसा सहभागी होतो, आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने ही योजना कशी आखतो आणि प्रत्यक्षात कशी पार पाडतो, हा सगळा थरारक भाग उत्तरार्धात येतो. 
‘हाऊ इज द जोश?’ असं विचारणारा विकी कौशलचा नायक आपल्याला आवडतो. या सिनेमातला त्याचा वावर अत्यंत उमदा, जोशपूर्ण असाच आहे. त्यानं घेतलेली मेहनत जाणवते. तुलनेनं यामी गौतम व कीर्ती कुलहारी यांना फार स्थान नाही. परेश रावल यांनी अजित डोवाल यांच्यावर बेतलेल्या गोविंद भारद्वाज या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिका केली आहे. रजित कपूर यांनी मोदींची भूमिका केली आहे, मात्र ते अजिबात ‘मोदी’ वाटत नाहीत. मनोहर पर्रीकरांच्या भूमिकेत योगेश सोमण चपखल बसले आहेत. मात्र, त्यांनाही फार वाव नाही. 
या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स सगळं उच्च प्रतीचं आहे. एलओसी व पाकव्याप्त काश्मीरमधील गावं हे सगळं चित्रिकरण युरोपातील सर्बिया देशात झालेलं आहे. त्यामुळं तिथली चकचकीत खेडी लगेच ओळखू येतात. ती पाकव्याप्त काश्मीरमधील वाटत नाहीत. गरूड पक्ष्याच्या ड्रोनची कल्पना भारी आहे. प्रत्यक्षात असं काही झालं होतं का, माहिती नाही. चकमकीचे प्रसंग खरे वाटतात. गोळीबाराचे आवाज आणि साहसदृश्ये जमून आली आहेत. मात्र, शेवटी विकी कौशल आणि दहशतवाद्यांचा कमांडर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात, हे जरा अती वाटतं. लष्करी मोहिमा कशा राबविल्या जातात, याची सखोल माहिती असलेल्यांना कदाचित हा सिनेमा भाबडा व हास्यास्पद वाटू शकेल. पण सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी शत्रूच्या घरात घुसून मारणारा आपला लष्करी जवान व अधिकारी टाळ्या-शिट्ट्यांचेच धनी आहेत, यात वाद नाही.
अर्थात, हे सगळं चांगलं असलं, तरी हा सिनेमा आत्ता प्रदर्शित करण्यामागची सूचक वेळ लक्षात येते आणि आपल्या लष्कराच्या कामगिरीचा सत्ताधारी पक्ष आपल्या प्रचारासाठी वापर करून घेत नाहीय ना, अशी शंकाही येते. या सिनेमात काही वेळा ‘यह नया हिंदुस्थान है’ असा जरा मुद्दाम होत असलेला उल्लेख पाहिला, की या शंकेला पुष्टी मिळते. काय वाट्टेल ते झालं, तरी लष्कराच्या कामगिरीचा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये. भारतीय लष्कर पूर्वीपासूनच चांगली कामगिरी करीत आलेलं आहे. सध्या सत्तेवर कोण आहे, याच्याशी त्याच्या कर्तृत्वाचा संबंध जोडता कामा नये.
हा सिनेमा पाहावा तो आपल्या लष्करासाठीच! कारण सिनेमा संपताना वाटतं, की आपण इकडं किती सुरक्षित आयुष्य जगतो! आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण व प्रशिक्षण सक्तीचं करायला पाहिजे. तेव्हाच या लष्कराच्या बलिदानाची किंमत आपल्याला कळेल. तोवर ‘उरी’ जखमा होतच राहतील.... 

दर्जा : साडेतीन स्टार

----

4 Jan 2019

रिव्ह्यू - भाई : व्यक्ती की वल्ली

पुतळा चैतन्याचा...
----------------------

सध्या मराठीत बायोपिकची चलती आहे. बालगंधर्वांपासून ते डॉ. काशिनाथ घाणेकरापर्यंत अनेकांवरचे चित्रपट निघाले आहेत. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ असलेले पु. ल. देशपांडे तरी याला कसे अपवाद ठरतील? त्यात सध्या पुलंची जन्मशताब्दी सुरू आहे. त्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी पुलंवरील बायोपिक ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ तयार केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, त्यातील पूर्वार्ध आज, ४ जानेवारीला सर्वत्र झळकला आहे.
पुलंच्या लेखनावर (उदा. म्हैस) चित्रपट काढण्याचे आधीचे प्रयत्न वाईट फसले होते. स्वत: पु. ल. उत्तम परफॉर्मर असल्याने त्यांच्या कलाकृतींना बाकी कुणी हातच लावू नये, असं वाटायचं. पण इथं त्यांच्या कुठल्या पुस्तकावर वा व्यक्तिरेखेवर हा चित्रपट नसून, त्यांचा जीवनपटच आहे. त्यामुळं कशाशी तुलना होण्याचा प्रश्न आधीच निकालात निघाला. आता प्रश्न, की हा जीवनपट कसा झाला आहे? तर याचं उत्तर ‘उत्तम’, ‘अप्रतिम’ असं असून, पुलंवर, मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट ताबडतोब जाऊन पाहिला पाहिजे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं एवढा मोठा लेखक व माणूस होऊन गेला, याची माहिती आज चाळिशीत वा त्यापुढे असलेल्या पिढीला असली, तरी नव्या पिढीला ती होणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि सिनेमा हे माध्यम नव्या पिढीपासून ते सर्वांपर्यंत सहज पोचत असल्यानं या सिनेमाद्वारे पु. ल. नावाचं रसायन नक्की काय होतं, याची माहिती आता खूप जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. महेश मांजरेकर यांनी हे फार महत्त्वाचं काम केलं असल्यामुळं त्यांचं आणि पटकथा लेखक गणेश मतकरी यांचं अभिनंदन करायला हवं.
पुलंचं एक (व कदाचित एकमेव) चरित्र प्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांनी ‘पुलं : चांदणे स्मरणाचे’ या नावानं लिहिलं आहे व ते नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की हे पुस्तक वाचून हा सिनेमा बघितला तर दुधात साखर! याचं कारण सिनेमा त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना, सगळा कालक्रम दाखवू शकत नाही. मात्र, पुस्तकातून तो आपल्याला नीट कळतो. तो माहिती असेल, तर या सिनेमातल्या लहानसहान जागांचा, संदर्भांचा, पुलंच्या व इतर पात्रांच्या बोलण्याचा आनंद अधिक लुटता येईल.
आता या सिनेमाविषयी! हा सिनेमा अगदी पहिल्या फ्रेमपासून आपल्या मनाची पकड घेतो. पुलंचं आयुष्य एवढं विविधरंगी, विविधढंगी होतं, की ते रूपेरी पडद्यावर अगदी दोन भागांत बसवायचं म्हटलं, तरी ते ‘घागरीत सागर’ सामावण्याएवढं कठीण. त्यामुळं लेखक व दिग्दर्शकासमोर त्यांच्या आयुष्यातल्या निवडक घटनाच घेण्याचं व दाखवण्याचं आव्हान होतं. इथं ती गोष्ट जमून गेल्यानं प्रेक्षक पुलंच्या या चरित्रपटात सुरुवातीपासून रमून जातो.
पु. ल. पुण्यात ‘प्रयाग’ला शेवटी ॲडमिट होते, तिथून या फ्लॅशबॅकनं ही चरित्रकथा सुरू होते. त्याहीआधी पुलंच्या वल्लीपणाची झलक दाखवणारा, न. चिं. केळकर यांना मुंबईतील व्याख्यानानंतर विचारलेल्या ‘पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे हो?’ या प्रश्नाचा प्रसंग सुरुवातीला येतो. मात्र, चित्रपटाच्या उपशीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे ‘व्यक्ती की वल्ली’ यापैकी पुलंच्या ‘व्यक्ती’ या अंगाचं अधिक दर्शन या चित्रपटात होतं आणि ते अगदी मनोज्ञ आहे.
पुलंच्या व्यक्तिगत आयुष्यातले, पण कदाचित लोकांना फारसे माहिती नसलेले अनेक प्रसंग या चित्रपटात तपशीलवार पद्धतीनं येतात. त्यात त्यांच्या आईची - लक्ष्मीबाईंची - व्यक्तिरेखा, आबांचं (वडील) पुलंच्या कलागुणांवरील प्रेम व प्रोत्साहन, त्यांचं अकाली जाणं, पुण्यातील दिवाडकर कुटुंबातील सुंदर या मुलीसोबत पुलंचा झालेला विवाह व अवघ्या आठवड्यात त्या नववधूचं टायफॉइडमुळं झालेलं निधन, सुनीताबाईंची व पुलंची पहिली भेट, प्रेम, रत्नागिरीत अगदी साधेपणानं झालेलं लग्न, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी यांच्याशी असलेलं मैत्र आदी गोष्टी येतात. आता या गोष्टी सांगताना दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे यातली पात्रं आणि दुसरी म्हणजे त्या प्रसंगांची मांडणी.... ‘भाई’ दोन्ही बाबींमध्ये उजवा ठरतो. यातली पात्रनिवड चांगली जमली आहे. पुलंचे वडील लक्ष्मणराव (मांजरेकरांचे लाडके) सचिन खेडेकर यांनी साकारले आहेत, तर आईची भूमिका अश्विनी गिरी यांनी केली आहे. अजय पूरकर भीमसेन जोशी, पद्मनाभ बिंड वसंतराव देशपांडे, तर स्वानंद किरकिरे कुमार गंधर्वांच्या भूमिकेत आहेत. अर्थात सिनेमात या सगळ्यांच्या भूमिकेची लांबी फार नाही. मात्र, त्यांचं दिसणं कन्व्हिन्सिंग असणं प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचं होतं. या कसोटीवर हा सिनेमा अगदी पूर्ण उतरतो. (अर्थात जब्बार पटेलांच्या छोटेखानी भूमिकेत सुनील बर्वे शोभत नाही, पण ती भूमिका अगदी काही मिनिटांचीच आहे. त्यामुळं दुर्लक्ष करण्याजोगी!) बाकी महत्त्वाच्या पात्रांची निवड अचूक असल्यानं हा सिनेमा पहिल्या फ्रेमपासून आपल्याला त्या काळात घेऊन जातो. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. रत्नाकर मतकरींनी तो सगळा काळ पाहिलेला असल्यानं त्यांच्या संवादलेखनात आपोआप ती ‘ऑथेंटिसिटी’ आली आहे. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला दिसतो.
आता यातली सर्वांत महत्त्वाची दोन पात्रं म्हणजे सुनीताबाई व खुद्द पु. ल.! पैकी सुनीताबाईंच्या तरुणपणीच्या भूमिकेत इरावती हर्षे आहे आणि वयस्कर भूमिकेत शुभांगीताई दामले आहेत. शुभांगीताईंनी चांगलं काम केलं आहे आणि सुनीताबाईंच्या नजरेतला करारीपणा नेमका दाखवला आहे. इरावती हर्षेनंही सुनीताबाई चांगल्या उभ्या केल्या आहेत. मात्र, काही वेळा मेकअप जाणवतो. सगळ्यांत बाजी मारून गेला आहे तो पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख. सागरवर या सर्व सिनेमाचा डोलारा उभा होता. मात्र, त्यानं उभे केलेले ‘भाई’ अगदी शंभर टक्के नसले, तरी खूपसे कन्व्हिन्सिंग वाटतात. (कितीही मोठा कलाकार असला, तरी ज्यांनी पुलंना लाइव्ह बघितलं आहे, त्यांच्यासाठी कुणीच ही भूमिका शंभर टक्के अचूक साकारू शकेल, असं वाटत नाही.) सागरनं तरुण वयातले पु. ल. नेमके उभे केले आहेत. पुलंचे सशासारखे पुढचे दात त्यांच्या चेहऱ्याला व एकूणच व्यक्तिमत्त्वाला एक मिश्कीलपणा, भाबडेपणा व निरागसपणा मिळवून देतात. सागरच्या चेहऱ्यावर मुळातच तो निरागस व भाबडा भाव आहे. त्यामुळं त्याला फक्त कृत्रिम दात बसविले, की काम होऊन गेलं... चित्रपट सुरू होताना पुलंचं पात्र ज्या ज्या प्रसंगात येतं, तेथे तेथे शाब्दिक विनोद, कोट्या करतानाच दिसतं. त्यामुळं पुलंचं पात्र एकदम ‘कॅरिकेचर’कडं झुकतंय की काय, अशी भीती वाटायला लागली. मात्र, सुदैवानं दिग्दर्शक, लेखक व अभिनेत्यानं हा सोस वेळीच कमी केला व भूमिका संतुलित झाली. विशेषत: सुनीताबाईंकडं ‘गुड न्यूज’ असताना आपल्याच धुंदीत रमलेले पु. ल. आणि त्यांचा हा अवतार पाहून नंतर सुनीताबाईंनी घेतलेला ‘तो’ निर्णय व त्यावर पुलंची व त्यांच्या आईची झालेली हळवी प्रतिक्रिया हा सगळा काहीसा गंभीर भाग खूप संयतपणे आणि नेमकेपणानं येतो. पुलंचं साधं ‘माणूस’ असणंच त्यातून अधोरेखित होतं. त्या दृष्टीनं हा प्रसंग महत्त्वाचा ठरतो.
या चित्रपटात पुलंच्या अजरामर पात्रांपैकी नाथा कामत व अंतू बर्वा वेगळ्या नावांनी येतात. मात्र, पुलंच्या पात्रांचं नाट्यीकरण झालं, की (म्हणजे पुलंव्यक्तिरिक्त अन्य कोणी ते केलं की) जो अनुभव येतो, तोच इथंही येतो. इथला नाथा कामत फारसा आवडत नाही, की इथला अण्णा कर्वे फारसा भिडत नाही. (विद्याधर जोशींनी काम मात्र चांगलं केलंय.) अगदी शेवटी राम गबाले, माडगूळकर व रावसाहेब ही पात्रंही अवतीर्ण होतात. यापैकी रावसाहेबांचं पात्र हृषीकेश जोशीनं धमाल रंगवलं आहे. (अर्थात पुन्हा, यात हृषीकेशनं त्या पात्राला अर्कचित्राचा जो टोन दिलाय, तो मूळ व्यक्तीवर अन्याय करणारा आहे. पण तरी सिनेमात हे पात्र थोडाच वेळ येत असल्यानं तेवढं खपून जातं, असं म्हणायला हरकत नाही.)
या सिनेमातला सर्वांत रंगलेला व टाळ्या घेणारा प्रसंग म्हणजे अर्थातच पु. ल., भीमसेन व वसंतराव हिराबाई बडोदेकरांकडं (सिनेमात चंपूताई असा घरचा उल्लेख आहे...) जातात व तिथं आधीच उपस्थित असलेल्या कुमार गंधर्वांसह मैफल रंगवतात तो! यातलं ‘सावरे ऐजैयो’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ ही गाणी ऑलरेडी सुपरहिट झाली आहेत. मला वाटतं, पुल या माणसाचं व या सिनेमाचंही सगळं सार या मैफलीत दडलेलं आहे. गाण्यात रमलेला, उत्तम कलागुण असलेला, सुंदर पेटी वाजवणारा, उत्कृष्ट आस्वादक असलेला आणि दाद देणारा असा एक खेळिया, कलंदर माणूस पुलंच्या रूपानं यात दिसतो. तेव्हाच्या महाराष्ट्राची संस्कृतीही दिसते. आपण त्या काळी का नव्हतो, आपण त्या मैफलीत का नव्हतो याची खंत वाटावी असं सादरीकरण म्हणजे त्या काळाला, त्या माणसांना व अर्थातच त्या कलाकृतीला दिलेली दाद असते. त्यामुळंच या गाण्यानंतर थिएटरमध्ये कडाडून टाळी पडते. हा सिनेमा आवडल्याचीही ती पावती असते. त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणं ‘पुतळा चैतन्याचा’ हे वर्णन विठ्ठलाचं असलं, तरी ते पुलंनाही चपखल लागू होतं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा तो विठ्ठलच होता... त्यानं सुरू केलेल्या आनंदयात्रेत आपण सगळे वारकरी अजूनही न्हाऊन निघत आहोत... ‘भाई’ हा सिनेमा हेच सत्य पुन्हा अधोरेखित करताना डोळ्यांच्या कडाही ओलावतो...
दोन तासांत सिनेमाचा पूर्वार्ध संपल्यावर वाटतं, की अरे, पुढचे दोन तासही आपण सहज बसलो असतो! पण आता पुढच्या भागाची ८ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करणं आलं...
(पुढच्या भागात पुलंची दूरदर्शनमधील कामगिरी, बटाट्याची चाळ व इतर एकपात्री प्रयोगांचा धमाल काळ, बाबा आमटेंशी स्नेह आदी गोष्टी असणार आहेत व त्याची झलक या सिनेमाच्या शेवटी पाहायला मिळते.)
तेव्हा पुलप्रेमींनी व अन्य रसिकांनीही चुकवू नये, असाच हा चित्रपट आहे!
---
दर्जा : चार स्टार
----