31 Oct 2019

मनशक्ती दिवाळी २०१९ - कथा

स्वप्न
------

डोंगर. उंचच उंच डोंगरांची रांग... हिरवागार निसर्ग आणि जणू हिरवाईचा शालू नेसलेली धरती... मधूनच आपलं विमान उडतंय. खरं तर ते विमान पण नाहीय. आपल्यालाच पंख फुटलेयत. खालचा भव्य पसारा डोळ्यांत मावत नाहीय. शेतं, त्यातून पळणाऱ्या चिमुकल्या नद्या, छोटी छोटी गावं, त्यातून जाणारे लहानशा रेषेसारखे रस्ते... मेंदूतून एकापाठोपाठ एक घोषणा होताहेत - समुद्रसपाटीपासून आपण आत्ता २५ हजार फुटांवर आहोत. बाहेरचं तापमान उणे १२ अंश सेल्सिअस आहे... वगैरे. पण या घोषणा नुसत्याच ऐकू येताहेत. शरीराला कसलीच जाण नाही. हां, थोडीशी थंडी वाजतेय जरूर; पण अंगावरचं पांघरूण ओढलं, की मस्त ऊबदार वाटतं. हलकीशी गुंगीही येतेय... एरवी रोजच्या जगण्यातले असह्य ताण पाठीवर घेऊन-वाहून अक्षरशः बाक आलाय अंगाला... आता हे ओझं वाटत नाहीय. एकदम हलकं हलकं वाटतंय... या उंचीचं एक अनाम आकर्षण वाटत आलेलं आहे. भीती नाही वाटत कधी. उलट अजून उंच उंच जावंसं वाटतं. इतकं उंच, की तिथून पृथ्वीची ती निळीशार सुंदर कडा दिसली पाहिजे. मग असंच अजून थोडं वर... अजून थोडं... पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदून एकदम पार निघून जावं... ते 'व्हॉयेजर' की असंच कुठलं तरी यान सोडलं होतं ना, तसं! दूर दूर निघून जावं सगळ्या गुरुत्वाकर्षणांच्या कक्षा ओलांडून... चंद्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून... सगळ्यांना टाटा-बाय बाय करत, अजून दूर... आपल्या आकाशगंगेच्याही पार... काय असेल तिथं? कुठलं विश्व नांदत असेल? आपलं वय काय असेल तिथं? तिथून चुकूनमाकून परत आलोच पृथ्वीवर, तर काय दिसेल? शतकं ओलांडली असतील का पृथ्वीनं? की सगळं आहे तसंच असेल? लेक ओळखेल का आपल्याला??

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

कानाचे पडदे भेदून जाणारा तो कर्णकर्णश आवाज आला आणि प्रियंवदा खाडकन जागी झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं. बेडरूममध्ये एसीचा हलका आवाज येत होता. खिडकीतून उन्हाची तिरीप येत होती. तिनं घड्याळात पाहिलं. सव्वासात वाजले होते. ती स्वप्नातून आता मात्र पूर्ण जागी झाली. इतका वेळ त्या उंचच उंच डोंगरांवरून विहरताना तिचं भान हरपलं होतं. पण आता ती वास्तव जगात आली होती. तिला सकाळी करायच्या शंभर गोष्टींची यादी डोळ्यांसमोर आली. दूध तापवायचं, सगळ्यांचा चहा करायचा, मुलीचा-नवऱ्याचा आणि स्वतःचा डबा करायचा... पळत कॅब गाठायची. दीड तास प्रवास करून ऑफिस गाठायचं... तिथं मान मोडेपर्यंत काम करायचं, दीड-दोनला कसं तरी घाईत सँडविच-कॉफी नामक लंच संपवायचं, पुन्हा मीटिंग, मग प्रेझेंटेशन्स, मग मीटिंग... पुन्हा कॅब, पुन्हा दीड-दोन तास प्रवास... घरी यायचं. यंत्रवत जेवण करायचं. मुलीशी थोडं-फार बोलायचं! नवऱ्याशी दोन ठरलेली वाक्यं बोलायची आणि पुन्हा आपल्या बेडरूममधल्या ऊबदार दुलईत शिरून झोपायचं... दिवसभर एवढा शीण झालेला असतो, की मग कधी झोप लागते ते कळतच नाही.

...


समुद्र. निळाशार अथांग समुद्र. वर मोठमोठी जहाजं संथगतीनं मार्गक्रमण करताहेत. आपण त्या स्कुबा डायव्हरसारखा पोशाख करून आपल्या जहाजाच्या डेकवरून थेट समुद्रात उडी मारतोय... खोल खोल समुद्रात शिरतोय... वर अफाट, अथांग पाण्याचा पसारा आणि त्याखालच्या अलौकिक दुनियेत आपण! किती तरी प्रकारचे मासे... रंगीबिरंगी... याशिवाय बाकी किती तरी चित्र-विचित्र प्राणी. आत्तापर्यंत डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरच बघितलेले. पाणसर्प, ऑक्टोपस, कासवं आणि नावं माहिती नसलेले किती तरी! याशिवाय प्रवाळांची ती अद्भुत सृष्टी. केवढे त्यांचे रंग आणि केवढे त्यांचे आकार! आपण संथपणे पाण्यात विहरतोय. इथं कुणीही कुणाला त्रास देत नाहीय. जो तो आपल्या विश्वात मग्न. इथली शांतताही एकदम अजब. त्या शांततेचाही आवाज ऐकू येतो. तो आवाज स्वर्गीय असतो. आपल्या रोजच्या जगण्यातले सगळे कर्कश कोलाहल इथं पूर्णपणे विसरायला होतं. या शांततेचा डोह विलक्षण आकर्षक आहे. पण हे 'फेटल अॅट्रॅक्शन' आहे. या डोहाला थांग नाही. त्यात उडी मारली, की गडप व्हायचं. कुठं, कसं माहिती नाही. पण त्या अज्ञाताची भीती वाटते. एकीकडं विलक्षण ओढही वाटते. पूर्वी उंचीवर गेलं, की आपल्याला असं व्हायचं. एकदम त्या कड्यावरून खाली झोकून द्यावंसं वाटायचं. का, ते माहिती नाही. कुठं तरी खोलवर आत दडून बसलेली त्या अज्ञाताची ओढ त्या क्षणी एकदम अनावर व्हायची. कितीदा तरी पाय मागं घेतले. पण पुढच्या वेळी पाऊल मागं पडेलच याची शाश्वती नाही. आताही त्या समुद्रात सात-आठ किलोमीटर खोल उतरल्यावर तिथंही एक आणखी खोल दरी दिसतेय. गर्ता म्हणतात हिला! आता हिची ओढ का लागावी? माणूस खूप दुःखात असला, की दुःखाच्या गर्तेत लोटला असं म्हणतो आपण... ती हीच का? पण ही तर विलक्षण देखणी आहे. तिथं आत आत काय असेल, याची ओढ लागलीय केव्हाची. समुद्राच्या प्रचंड पाण्याचा दाब डोक्यावर आणि त्यात ही मनाची आणखी खोल खोल जाण्याची वेडी घालमेल... काय करावं? मारावीच का उडी? मागं सरकून अंदाज घ्यावा... एक-दोन-तीन म्हणावं आणि घ्यावी सरळ उडी. काय होईल ते होईल. बघू या... एक... दोन...

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

प्रियंवदाला पुन्हा खाडकन जाग आली. कुठून तरी उंचावरून आपण दाणकन गादीवर आपटलो आहोत, असं तिला वाटून गेलं. बेडरूममध्ये सगळीकडं निळा प्रकाश पसरला होता. आपण अजूनही समुद्राच्या तळाशी आहोत की काय, असं प्रियंवदाला क्षणभर वाटलं. पण तो बेडरूममधल्या निळ्या एलईडीचा प्रकाश होता. उन्हाची तिरीप डोकावतच होती. घड्याळात सात वीस झाले होते. कालच्यापेक्षा पाच मिनिटं उशीर. पुन्हा कालचाच सगळा क्रम... फक्त आज नवरा सकाळीच टूरला निघून गेला होता, म्हणून त्याचा डबा नव्हता, इतकंच! मुलीला शाळेत निघायला उशीर झाला. तिची खूपच पळापळ झाली. कसंबसं आवरलं. कालच्या मीटिंगच्या नोट्स काढायच्या होत्या. कॅबमध्ये ते काम करू म्हणून ती तशीच निघाली. ब्रेकफास्ट राहिलाच. पुन्हा ऑफिस, चहा, प्रचंड काम, काम, क्लाएंटस्, फोन, आरडाओरडा, काहींची बेशिस्त, मग चिडचिड... तसाच घाईत दुपारचा बर्गर-कॉफीचा लंचब्रेक, पुन्हा मीटिंग, काम, क्लाएंट्स, मीटिंग, काम... कधी तरी ऑफिस संपलं. पुन्हा कॅबचा दीड-दोन प्रवास. ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत थोडा टीपी, थोडं गॉसिप. गालावर हलकेच उमटलेली स्मितरेषा... आज नवरा घरी नव्हता. लेकीचा अभ्यास घ्यायचा, काही तरी खायचं आणि झोपायचं. तासाभरात संपणारं काम... ती पुन्हा बेडरूममधल्या त्या निळाईत शिरली... हलकेच डोळे कधी मिटले कळलं नाही.

...

मग एके दिवशी ती हिमालयात विहरून आली. तिथल्या पांढऱ्याशुभ्र रंगानं तिला वेड लावलं. फार पूर्वी कधी तरी ती आई-वडिलांसोबत मसुरीला आली होती; पण मनसोक्त बर्फ खेळायला मिळालाच नव्हता. किती तरी चित्रपटांतून तिनं नायक-नायिका ते बर्फाचे गोळे एकमेकांना मारतात, ते बघितलं होतं. तिला एकदा तरी तसं करायचं होतं. बाकी हिमालयाची भव्यता पाहून तिला पुन्हा एकदा ते सर्वस्व झोकून देऊन समर्पित व्हायचं फीलिंग आलं. लोकांना हिमालयाची पुनःपुन्हा ओढ का लागते, हे तिला समजावून घ्यायचं होतं. तिला चालत, ट्रेक करत तो सगळा भूभाग पालथा घालायचा होता. तिला त्या शुभ्र वर्णात हरवून जायचं होतं. सांताक्लॉजसारखी पांढरी दाढी असणारे किंवा आपल्या ऋषी-मुनींसारखे दिसणारे एखादे प्रेमळ आजोबा त्यांच्या मांडीवर खेळायला बोलवत आहेत, असं तिला वाटे. तिला त्या डोंगरांवरून घसरत यायचं होतं, स्कीइंग करायचं होतं. गोंडोलात बसायचं होतं. तिनं बेडरूममधल्या एसीचं टेंपरेचर दहावर खाली आणलं. एकदम हुडहुडी भरून आली. तिनं दोन जाड रजया अंगावर घेतल्या आणि ती ‘हिमालयाच्या सफरी’वर निघाली. इथंही तिला पंख फुटले. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से अशा सर्व शिखरांच्या वरून ती उडत निघाली. मानसरोवरापर्यंत पोचली. तिथल्या थंडगार पाण्याचा हलकासा शिपका तिनं तोंडावर मारला... आणि....

... 

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

तिला जाग आली!

....

असे खूप दिवस गेले, खूप रात्री गेल्या. प्रियंवदाची स्वप्नं अफाट होती, अचाट होती. जवळपास रोज रात्री तिनं स्वप्नात तिच्या जवळपास सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कधी तरी तिच्या आईच्या कुशीत शिरावंसं वाटायचं. तेव्हा ती पाय पोटाजवळ घेऊन गर्भावस्थेतल्या बाळासारखी झोपून राहायची. पण तिच्या आईचा गर्भ आपोआप तिच्या सभोवती साकारायचा आणि तिला ऊब द्यायचा. हजारो रक्तपेशींचा रक्तवर्ण तिच्या सभोवती तयार व्हायचा. कधी तिला तिचं गाव आठवायचं. गावातलं शेत, तिथली विहीर आठवायची. फ्रॉकमध्ये वेचलेल्या चिंचा, बोरं आठवायची. कधी तिला कॉलेजात असताना सह्याद्रीत तुफान पावसात केलेली भटकंती आठवायची. हे सगळं ती पुनःपुन्हा जगायची. रोज रात्री...

आणि एक दिवस...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

गजर झाला. वाजतच राहिला. तिला जाग आलीच नाही...

...

आणि लांब तिकडं, आकाशगंगेच्या पलीकडं, कुणी तरी दोन्ही हातांची ओंजळ करून कुणाला तरी अलगद हातात घेत होतं...
हे मात्र स्वप्न होतं की नव्हतं, याचं रहस्य त्या गूढगर्भ ब्रह्मांडालाच ठाऊक होतं!

---

14 Oct 2019

वाचन प्रेरणा दिन - मटा लेख

वाचन आणि ‘प्रज्वलित मन’
--------------------------


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून १५ ऑक्टोबर हा आता ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्की काय मिळू शकतं आणि वाचन केलं नाही तर आपण काय गमावू शकतो याचा यानिमित्त घेतलेला वेध...

----

आपण दूर कुठं तरी डोंगराच्या माथ्यावर, गर्द जंगलाच्या मध्यावर, नितळ पाण्याच्या लाटेवर, अनाघ्रात-अनवट वाटेवर, विलक्षण शांततेच्या कुशीत असावं; स्वत:च स्वत:मध्ये असण्याच्या या आगळ्या प्रवासाची अनुभूती घेत स्वत:मधल्या अजूनही न सापडलेल्या गोष्टींचा शोध घेत राहावं; एकाच वेळी बाह्य जगाशी हळूहळू संपर्क तोडत असताना, आतल्या संवादाची ऊर्मी वाढवत जावं... कुठे तरी ती तार झंकारावी आणि एका अलौकिक आनंदानं अंतर्मन लख्ख उजळून निघावं...
खरं सांगू का? हे एक स्वप्न आहे, स्वप्न! हे असलं स्वप्न आपण कित्येकदा पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण प्रत्यक्षात आपल्या बाबतीत यातली एकही गोष्ट घडत नाही, हीच वस्तुस्थिती! रोजच्या ट्रॅफिक जॅममधून, प्रचाराच्या कर्ण्यांच्या कर्णकर्कश आवाजातून, सततच्या कलहाच्या उच्चरवातून जिथं आपला बाह्य आवाज आपल्याला ऐकू येत नाही, तिथं अंतर्मनाचा वगैरे आवाज कुठून ऐकू यायला! तेव्हा जवळपास अप्राप्य अशा या स्वप्नाची भरपाई करणार तरी कोण? अशा वेळी एकच करावं. आपल्या उशाशी असलेलं आपलं आवडतं पुस्तक घ्यावं आणि त्यात डोकं घालून हरवून जावं... वाचनानं मला काय दिलं, असा प्रश्न कुणी विचारला, तर हेच उत्तर आपोआप समोर येईल. केवळ स्वप्नांमध्येच आपण जगू शकतो, अशा अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला वाचन देतं. 
वाचन म्हणजे पुस्तकाचं वाचन. छापील शब्दांचं वाचन. हे वाचन आपल्याला आयुष्यभराचं मैत्र देतं. ते शब्द लिहिणाऱ्या व्यक्तीच्या एकूण जगण्याच्या आकलनाचा काही वाटाही आपल्याला देतं. लेखकाच्या भावविश्वाचा भाग होण्याची संधी देतं. आपल्या स्वत:च्या भावविश्वाची निर्मिती करण्याची प्रेरणा देतं. या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या जगण्यावर निश्चित परिणाम घडवतं.... आणि हा परिणाम सकारात्मकच असतो, हे नक्की! खूप लहानपणापासून वाचनाची आवड असलेली व्यक्ती आणि अजिबात वाचनाची आवड नसलेली व्यक्ती यांची जडणघडण सरळच वेगळ्या पद्धतीनं होते. अर्थात आपण काय वाचतो, हेही यासाठी महत्त्वाचं आहे. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातल्या आशयाचा, विचारांचा मुद्दा येतो. आपण ज्या पद्धतीचा आशय वाचतो, जो विचार वाचतो त्याचाच पगडा पुढंही आपल्या आयुष्यावर दीर्घकाळ राहतो. पुस्तकं वाचणं आणि सतत वाचत राहणं ही पुस्तकप्रेमी माणसासाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असल्यानं आपण काय वाचत राहिलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे याविषयी त्याची समजही वाढत जाते. विशेष म्हणजे पुस्तकं वाचूनच त्याची ही समज वाढते. पुस्तक वाचन आपल्याला समृद्ध करतं ते अशा रीतीने! 
लहानपणीच या वाचनाची गोडी लागली, की आपोआप काही गुण आपल्या अंगी येऊ लागतात. एका जागी शांतपणे एखादी गोष्ट मन लावून करीत बसणे हाही आजच्या काळात तसा मोठाच गुण म्हणायचा. पुस्तकं वाचणाऱ्या माणसात सहजच हा गुण रुजतो. फार तर तो वाचनाच्या जागा बदलेल; पण त्यापलीकडे त्याच्या हातून वावगे काही घडायचे नाही. वाचन करणाऱ्या माणसाची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वर्धिष्णू होऊ लागते. वाचनातील एखादी गोष्ट समजली नाही, तर ती समजेपर्यंत चैन पडत नाही. त्यामुळं नव्या गोष्टी समजतात, हे ओघानं आलंच. वाचनातून नवरसांचा परिपोष होत असल्यानं आपलं भावनिक कुपोषण होत नाही. जगात किती प्रकारचे लोक किती वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या जगण्यातल्या भावभावना व्यक्त करतात, हे पाहूनच आपण थक्क होतो. आपल्या परिघापलीकडचं जग पाहण्याची दिव्य दृष्टी केवळ वाचनातूनच आपल्याला लाभू शकते. वाचनामुळं लक्ष एकाग्र करण्याची सवय अंगी जडते. पुस्तकात संपूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण त्या लेखनाचा आनंद घेऊ शकत नाही, हे स्पष्टच आहे. आजच्या काळात आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दिवसेंदिवस चिंताजनकरीत्या कमी होत चालली असताना, पुस्तक वाचनातून आपण ती क्षमता इतरांपेक्षा अधिक राखू शकतो, हा मोठाच फायदा आहे. भाषेच्या दृष्टीने पुस्तक वाचनाचा फायदा तर फारच मोठा आहे. छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक, प्रमाण अशी अक्षरे! आपण सतत उत्तम दर्जाची छापील अक्षरे पाहत राहिलो, त्या अक्षरांपासून तयार झालेले अचूक शब्द वाचत राहिलो, त्या शब्दांच्या समूहाद्वारे तयार झालेले अर्थपूर्ण वाक्य समजून घेत राहिलो, त्या वाक्यांच्या समुच्चयातून तयार झालेला लेख पाहत, मेंदूत मुरवत वाचत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण, अचूक शब्दांची ‘छायास्मृती’ (फोटो मेमरी) तयार होते. त्यामुळं नंतर कधीही चुकीचे किंवा अप्रमाणित शब्द वाचले, की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषाज्ञानाकडं घेऊन जातो. प्रत्येकानं त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करायला पाहिजे, असं नाही. केवळ उत्तम दर्जाची पुस्तकं वाचली, तरी पुष्कळ काम होऊ शकेल. पुस्तकं राहिली, तर भाषा राहील आणि भाषा टिकली तर त्या भाषेतली पुस्तकं येतील, असं हे गणित आहे. त्यामुळं वाचनाची आवड आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. छापील शब्दांचं हे प्रेम आपल्याला माणूस म्हणून उन्नत करीत राहतं; जगभरात आपल्याहून किती तरी थोर माणसं होऊन गेली आहेत आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायचंय या भावनेतून आपल्याला विनम्र ठेवतं. आजच्या सभोवतालात हे विशेषच महत्त्वाचं!
वाचनाचे हे फायदे तर झालेच; पण वाचनाच्या या सवयीचा सर्वांत मोठा व महत्त्वाचा परिणाम होतो तो आपल्या मनावर. जन्मल्यापासून आपला पिंड संस्कृती, परंपरा, रुढी, प्रथा, रिवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून घडत असतो. आपल्याला कसं घडवायचं याचे निर्णय आपल्याला पुरेशी समज यायच्या आधी आपल्या वतीनं दुसरंच कोणी तरी घेत असतं. आपले आई-वडील हे त्यातले प्रमुख; पण बहुतांश वेळा किमान त्यांचा हेतू तरी स्वच्छ असतो किंवा भाबडा तरी असतो. मात्र, समाज नावाचा मोठा गाडा चालविणारे वेगळेच कुणी असतात. त्यांची इथे वा तिथे सत्ता असते. ती दर वेळी राजकीय असतेच असं नाही. ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक असू शकते; नव्हे, असतेच! ही सत्ता राखणारे आपल्या सोयीने आपल्याला घडवत असतात. त्यासाठी त्यांच्या सोयीच्या गोष्टींची बाळगुटी आपल्याला लहानपणापासून चाटविली जाते. आपण पुस्तकं वाचली नाहीत किंवा जगात कोणी काय म्हणून ठेवलंय, काय विचार केला आहे हे जाणून घेतलं नाही, तर याच बाळगुटीचं बाळसं आपल्या अंगावर चढतं आणि आपण या सत्ताधीशांना हवे तसे नागरिक म्हणून आपसूक घडत राहतो. वाचनामुळं आपल्या मेंदूला विचार करायची शिस्त लागू शकते आणि हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळं करणारी ताकदही असू शकते. विचार करणाऱ्या मेंदूला प्रश्न पडू लागतात; विचारायला अवघड असे प्रश्न पडू शकतात. प्रश्न विचारणारे मेंदू जास्त संख्येनं तयार होणं ही कोणत्याही सत्ताधीशासाठी धोक्याची घंटा असते. अर्थात, हे ज्ञानही आपल्याला पुस्तकं वाचूनच मिळू शकतं. 
मेंढ्यांचा कळप असतो आणि वाघ जंगलात एकटा, सार्वभौम सत्ताधीश म्हणून राज्य करतो. आपल्याला कळप म्हणून जगायचंय की प्रश्न विचारणारा सार्वभौम, विचारी माणूस व्हायचंय हे आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीवरून ठरू शकतं. निर्णय आपल्याच हाती!
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती; १३ ऑक्टोबर २०१९)

28 Sept 2019

रिव्ह्यू - छिछोरे

थ्री चीअर्स फॉर ‘लूजर्स’
---------------------------



यश म्हणजे नक्की काय? एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे? दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे? जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे? यशस्वी होणं कशाला म्हणायचं? आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून? आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय? आयुष्यच नसेल तर या सगळ्याला काय अर्थ?
अशा काही मूलभूत प्रश्नांना हात घालणारा, आजच्या पिढीसोबत पालक पिढीच्याही संघर्षाचं दर्शन घडविणारा ‘छिछोरे’ (शब्दश: अर्थ पोकळ, अर्थहीन) हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात धाव धाव धावणाऱ्या सगळ्या पालकांच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजनच म्हणावं लागेल. नीतेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आवडतो, याचं कारण आज चाळिशीत असलेल्या पिढीच्या तारुण्याचंही तो दर्शन घडवतो आणि आज या पिढीला त्यांच्या मुलांच्या पिढीबाबत पडत असलेल्या प्रश्नांनाही तो हात घालतो.

SPOILER ALERT

या चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. एक आहे तो आजच्या काळातला आणि दुसरा आहे तो फ्लॅशबॅकमधला. आपला नायक अनिरुद्ध पाठक (सुशांतसिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा राघव जेईईमध्ये नंबर येईल की नाही, या चिंतेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि राघव वडिलांकडे राहतो आहे. प्रचंड ताणात असलेल्या राघवची मन:स्थिती वडिलांच्या लक्षात येत नाही. जीईईत नंबर न आल्यानं अत्यंत घाबरलेला राघव आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला आपण सदैव ‘लूजर’ होण्याचा ताण देत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. राघव रुग्णालयात मृत्युशय्येवर पडलेला असतो आणि त्याच्या वडिलांना त्यांचं तरुणपण आठवतं. त्या कॉलेजमधले एकेक अवली मित्र आठवतात आणि ही सगळी गोष्ट मुलाला सांगण्याचं ते ठरवतात. तिथून फ्लॅशबॅक सुरू होतो. अनिरुद्ध ऊर्फ अनीच्या कॉलेजच्या दिवसांची धमाल गोष्ट सुरू होते. इथले त्याचे ‘सेक्सा’, ‘ॲसिड’, ‘मम्मी’, ‘बेवडा’ अशा अत्रंगी नावाचे मित्र आणि डेरेक हा आणखी एक मित्र त्याला आठवतात. त्याच्या सांगण्यावरून ते थेट हॉस्पिटलमध्येच येतात आणि मित्राच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांच्या कॉलेज दिवसांच्या धमाल आठवणींत रमतात. या आठवणी सांगण्याचा मुख्य उद्देश काय असतो, हे आपल्या लक्षात येतंच.
अनी आणि त्याचे हे मित्र कॉलेजमध्ये ‘लूजर्स’ म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांच्या ‘एच - ४’ या बदनाम होस्टेलची आणि तिथल्या एक से एक मित्रांची ओळख आपल्याला व्हायला लागते. दिग्दर्शकानं या फ्लॅशबॅकमध्ये टिपलेलं ‘नाइन्टीज’चं वातावरण आज चाळिशीत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नॉस्टॅल्जिक करणारं आहे. हाच सिनेमातला सगळ्यांत धमाल आणि हास्यस्फोटक भाग आहे. होस्टेलवरचं रॅगिंग, एकेका मित्राची होत जाणारी ‘ओळख’, इतर होस्टेलबरोबर असलेली दुश्मनी आणि सगळ्यांत शेवटी स्पोर्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी केलेली प्रचंड धडपड... हा सगळाच भाग जमून आला आहे. या सर्व ‘लूजर्स’ची होणारी मैत्री आणि त्यातून त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी प्राणपणाने केलेली मेहनत, त्यांच्या आवडत्या गोष्टींचा त्याग या सगळ्या गोष्टी पाहायला मजा येते. हा भाग पाहताना अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा यात ऐकायला मिळतेच; पण सेन्सॉरमुळे आता काही ठिकाणी, काही शिव्यांचा ‘बीप’चं जे बूच बसलंय ते आता हास्यास्पद वाटतं. वेबसीरीज पाहायला चटावलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्या शिव्या सहजी ओळखी येतातच. पण इथं त्यांचं ‘म्यूट’ होणं रसभंग करणारं वाटतं. अर्थात चित्रपटाचं हे एवढंच आकर्षण नाहीय.
चिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल यासारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नीतेश तिवारीला, आपल्याला या सिनेमातून काय सांगायचंय हे नेमकं ठाऊक आहे. आजच्या पिढीवरचे ताण आणि त्यातून येणारी एकारलेली मानसिकता या सगळ्यांवर दिग्दर्शक भाष्य करू इच्छितो. आता कॉलेजवयीन मुलाचा पालक झालेला अनिरुद्ध एकदा म्हणतो, ‘जीईईला दहा लाख मुलं बसतात. त्यातले दहा हजार यशस्वी होतात. उरलेल्या नऊ लाख नव्वद हजार मुलांचं काय? आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार?’ अनिरुद्धच्या या सवालावर या चित्रपटाचा सग‌ळा फोकस आहे. खुद्द अनिरुद्धनं त्याच्या कॉलेजमधल्या दिवसांत त्यांनी नक्की काय केलं होतं, हे मुलाला आधी कधी सांगितलेलं नसतं. मुलगा जेव्हा रुग्णालयात मृत्युशय्येवर पडतो तेव्हाच त्याला मुलाला हे सांगावंसं वाटतं. त्याचं आणि मायाचं नातं का तुटलं, हे चित्रपटात नीटसं समजत नाही. मात्र, त्याचं सतत कामात असणं दिग्दर्शकानं सूचित केलंंय.
आपण आयुष्यात नक्की काय करायचंय, आपले प्राधान्यक्रम कोणते, पैसा किती आणि कसा मिळवायचा, कुटुंबाचं स्थान/महत्त्व किती या सगळ्यांचाच पुन्हा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतनं अनिरुद्धची मुख्य भूमिका केली आहे. प्रौढ पालक झालेला अनिरुद्ध आणि कॉलेजमधला टपोरी अनी ही दोन्ही रूपं त्यानं चांगली दाखविली. श्रद्धा कपूर ही एकमेव अभिनेत्री या चित्रपटात आहे. (अगदी कॉलेजमध्येही तिला एकही मैत्रीण वगैरे दाखववलेली नाही. इंजिनीअरिंग कॉलेजमधला मुलींचा तुटवडा हा संदर्भ एकदा येतो.) तिनंही मायाचं काम व्यवस्थित केलंय. मात्र, ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची आई वाटत नाही, हेही खरं. सगळ्यांत धमाल आणली आहे, ती अनीच्या अवली मित्रांची कामं करणाऱ्या कलाकारांनी. वरुण शर्मा (सेक्सा), तुषार पांडे (मम्मी), नवीन पोलिशेट्टी (ॲसिड), सहर्षकुमार शुक्ला (बेवडा), ताहीर राज भसीन (डेरेक) हे सगळे कलाकार धमाल काम करतात. व्हिलन रॅगीचं काम प्रतीक बब्बरनं केलंय.
इतर छोट्या-मोठ्या भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. उदा. होस्टेलच्या क्लार्कची भूमिका करणारा सानंद वर्मा.
उत्तरार्धात चित्रपट ठरावीक वळणं घेत अपेक्षित शेवट गाठतो. शिवाय लांबी थोडी कमी असती, तरी चाललं असतं, असं वाटतं. नव्वदच्या दशकातले इतर काही रेफरन्स (उदा. क्रिकेट, गाणी, सिनेमे) पटकथेत आली असती तरी अजून मजा आली असती, असंही वाटून गेलं. पण तरीही हा सिनेमा मनोरंजनाची एक विशिष्ट पातळी कायम राखतो. कंटाळा येत नाही, हे महत्त्वाचं. चित्रपटाला संगीत प्रीतमचं आहे. गाणी सिनेमात ऐकायला बरी वाटली, पण नंतर लक्षात राहिली नाहीत. एंड स्क्रोलला येणारं गाणं व त्यात दोन्ही पिढ्यांतली पात्रं एकत्र नाचतात, ही कल्पना छान होती.
तेव्हा आजच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांबाबत नक्की कोणते निर्णय घ्यायचे, लादायचे हे ठरविण्यापूर्वी मुलांसह एकदा हा चित्रपट जरूर पाहा. कदाचित आपल्यात बदल झालेला असेल.

---

दर्जा - साडेतीन स्टार
---






2 Sept 2019

अनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख

मस्त कलंदर
-----------


अनिल अवचट ऊर्फ बाबा या माणसाचं वर्णन करण्यासाठी कलंदर किंवा अवलिया हेच शब्द वापरावे लागतात. लेखक, पत्रकार, संपादक, (प्रॅक्टिस न करणारा) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, गायक, ओरिगामी तज्ज्ञ, बासरीवादक, नवनव्या गोष्टी शिकण्याची मनस्वी आवड असणारा विद्यार्थी, दोन मुलींचा उत्तम पालक... एका माणसात किती गोष्टी असाव्यात! अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला! मात्र, अवचट कशात अडकून पडले नाहीत. पुढं चालत राहिले. एका वयात सामाजिक क्रांती करण्याचं वेड त्यांच्या अंगात होतं. मात्र, ते प्रकृतीला झेपत नाही असं लक्षात आल्यावर शांतपणे बाजूला झाले. हा काही तरी आयुष्यात मोठा पराभव झाला आहे, असा भाव कधी ठेवला नाही. नंतर बराच काळ शोधपत्रकारितेत रमले. जे काम करायचं, ते व्यवस्थितच अशी वृत्ती असल्यानं आणि मूळ स्वभाव सर्व गोष्टींविषयी जात्याच कुतूहल बाळगणारा असल्यानं ही शोधपत्रकारिताही त्यांनी गाजविली. महाराष्ट्राला तोवर फारसा माहिती नसलेला ‘रिपोर्ताज’ प्रकार त्यांनी हाताळला. नंतर लोक त्यालाच ‘अवचट शैली’ म्हणू लागले. ‘मी मुद्दाम असं काही लिहिलं नाही, जे भिडलं, आतून लिहावंसं वाटलं ते लिहीत गेलो,’ असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींतून सांगितलं. मात्र, काही विशिष्ट गुण किंवा प्रतिभा असल्याशिवाय कुणालाही असं लिखाण करता येत नाही. अवचटांच्या ‘मनोहर’ किंवा ‘साधने’तल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी मुंबई किंवा पुण्याच्या बाहेर पसरलेला विस्तृत, पण बेदखल असा महाराष्ट्र आपल्या लेखणीतून सगळ्या समाजासमोर आणला. ‘संभ्रम’ किंवा ‘कोंडमारा’मधले त्यांचे लेख वाचले, की याची प्रचिती येते. अवचटांना समाजातल्या शेवटच्या घटकाविषयी ममत्व आहे. कथित कनिष्ठ जातींतले, कथित अस्पृश्य आणि नाडलेले, गांजलेले असे अनेक व्यक्तिसमूह त्यांच्या लेखनाचा विषय झाले. ‘माणसं’ हे त्यांचं पुस्तक आलं, तेव्हा ते वाचून महाराष्ट्र हादरून गेला. आपल्याभोवती छोट्याशा सुखाचा कोष विणून आत्मरत असलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी आपल्या लेखणीतून दाहक सामाजिक वास्तवाचे चटके दिले. तत्कालीन मध्यमवर्गीयांत संस्कारांमधली संवेदनशीलता टिकून असल्यानं त्यांनीही हे लिखाण वाचलं आणि स्वीकारलं. महाराष्ट्रात गेली शंभर-दीडशे वर्षं कथित पुरोगामी आणि कथित सनातनी असे दोन वर्ग कायमचे पडलेले आहेत. कुणी कुठल्या वर्गात असायचं, याचे संकेतही ठरलेले आहेत. अवचट यांच्या लेखणीची जादू अशी, की तिने हे संकेत मोडून काढले. अवचट दोन्ही वर्गांना आपलेसे वाटले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक म्हणून असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा! 
आपल्याकडं अनेकदा प्रामाणिकपणा हा जणू कमावलेला गुण असल्यासारखा मिरवला जातो. काहींचा साधेपणा हा भाबडेपणाकडं, तर क्वचित बावळटपणाकडं झुकतो. याचं कारण आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली दांभिक वृत्ती. अवचट मात्र याला अपवाद ठरले. याचं कारण त्यांच्यातला लेखक आणि त्यांच्यातला माणूस हे वेगळे कधीच नव्हते. ते जसं जगले, तसं लिहीत गेले. त्यांच्या अनेक लेखांची नावे ‘घडले तसे’, ‘दिसले तसे’ अशी आहेत. त्यामुळं अवचटांमधला प्रामाणिकपणा वाचकांना पटला, भावला. त्यांच्यातला साधेपणा अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सगळ्यांना सांगितला. त्यामुळंच कथा-कादंबरी, कविता किंवा विनोदी साहित्य अशा कुठल्याही पठडीत त्यांचं साहित्य रूढार्थानं बसत नसतानाही ते लेखक म्हणून अमाप लोकप्रिय झाले. त्यांची सुरुवातीच्या काळातली सगळीच पुस्तकं ‘नॉन-फिक्शन’ प्रकारातली होती आणि तत्कालीन इतर लेखकांच्या मानानं निराळी होती. तरीही तेव्हाच्या वाचकांनी ती उचलून धरली. अवचटांच्या व्यक्तिमत्त्वातल्या पारदर्शकतेचाचा हा परिणाम होता. त्यांनी घेतलेले काही अनुभव केवळ सर्वसाधारण वाचकांच्याच नव्हे, तर सर्वसाधारण लेखकांच्याही परिघाच्या बाहेरचे होते. अवचट ओतूरसारख्या छोट्या गावातून आले. त्यांचा जन्म १९४४ चा. स्वातंत्र्यानंतरचा बदलता देश आणि बदलता महाराष्ट्र बघत त्यांची पिढी मोठी झाली. सत्तरच्या दशकातला स्वप्नाळूपणा आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टी या पिढीनं अनुभवल्या. अवचट यांचे वडील डॉक्टर व घराणं गावातलं प्रतिष्ठित. त्यामुळं तत्कालीन परंपरेप्रमाणं त्यांनाही डॉक्टर होणं भागच होतं. त्याप्रमाणे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेही. मात्र, त्यांचा कल पहिल्यापासूनच डॉक्टरकी न करण्याकडंच राहिला. एकच एक गोष्ट आयुष्यभर करत बसणं त्यांच्यातल्या कलंदर माणसाला आवडणं शक्यच नव्हतं. मात्र, या कॉलेजात अवचटांना ‘सुनंदा’ भेटली. सुनंदा ऊर्फ अनिता अवचट यांच्या आयुष्यात येण्यानं अवचटांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘तुला हवं ते कर, मी घर सांभाळते’ असं बिनधास्त सांगणारी जीवनसाथी मिळणं हे अवचटांचं भाग्य होतं. सुनंदाताईंच्या पाठबळावर अवचटांनी पुढं आयुष्यात पुष्कळ ‘उद्योग’ केले. बहुसंख्य मराठी माणसासाठी चौकटीतलं जगणं हेच प्राक्तन असताना अवचटांना निराळं आयुष्य जगायची संधी मिळाली. त्यांच्या अंगातल्या कलंदरपणामुळं त्यांनी ती पुरेपूर उपभोगली. त्यांचे अनुभव ऐकून, वाचून चौकटबद्ध मराठी वाचकांना एका वेगळ्याच ‘फँटसी’ची अनुभूती मिळाली. आपण सहसा करू शकत नाही त्या गोष्टी सहजी करणाऱ्या लेखकांचं, व्यक्तिश्रेष्ठांचं वाचकांना आकर्षण असतंच. गौरी देशपांडेंचं लेखन वाचताना त्या आकर्षणाची प्रचिती येते. अवचटांच्या लेखनातूनही वेगळ्या पद्धतीची ‘फँटसी’ मराठी वाचकांचं समाधान करून गेली. अवचट लेखक म्हणून लोकप्रिय होण्यात या घटकाचा वाटा दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. 
काळ बदलला तसे अवचटही बदलत गेले. त्यांनी कधी स्वत:ला ‘स्टीरिओटाइप’ केलं नाही. ‘गर्द’च्या व्यसनाचा अभ्यास करताना त्यांना या महाभयंकर समस्येचं अक्राळविक्राळ स्वरूप समजलं. या व्यसनाधीन लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी व अनिता अवचट यांनी ठरवलं. त्यातून पु. ल. देशपांडे दाम्पत्याच्या मदतीतून ‘मुक्तांगण’ची सुरुवात झाली. काळाच्या पुढचा विचार त्यामागं होता. आज मोबाइलपासून सुटका होण्यासाठी या केंद्रात उपचारांची सोय झाली आहे, याला द्रष्टेपणच म्हणायचं नाही तर काय! नव्वदमध्ये अवचटांनी लिहिलेलं ‘स्वत:विषयी’ हे एक आगळं-वेगळं पुस्तक आलं आणि अवचटांच्या चाहत्यांत मोठी भर पडली. हा अवलिया बाबा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून, पालक म्हणून कसा होता; त्याची जडणघडण कशी झाली हे मराठी वाचकांना या पुस्तकातून कळलं. पु. ल. आणि सुनीताबाईंना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ म्हटलं जातं. त्यांचा तो मान अबाधित ठेवून अनिल व सुनंदा या दाम्पत्याला ‘महाराष्ट्राचं दुसरं लाडकं दाम्पत्य’ म्हणता येईल, एवढी लोकप्रियता या पुस्तकाला आणि पर्यायानं अवचट दाम्पत्याला लाभली. मात्र, पुढच्या काही वर्षांतच, १९९७ मध्ये सुनंदा यांचं कर्करोगानं आकस्मिक निधन झालं. हा धक्का मोठा होता. अवचट पूर्वीचे राहिले नाहीत. मात्र, मुक्ता व यशोदा या अवचटांच्या दोन गुणी मुलींनी ‘बाबा’ला हळुहळू पुन्हा पूर्वपदावर आणलं. यानंतरच्या काळातले लेखक अवचट वेगळे होते. त्यांना आता ‘मस्त मस्त उतार’ सापडला होता. आता हा बाबा मुलाबाळांत अधिक रमू लागला. ओरिगामी, बासरी, काष्ठशिल्पं यात जीव रमवू लागला. लेखांचेही विषय बदलले. लेखनातला आक्रमकपणा लुप्त झाला. माया, जिव्हाळा, वात्सल्य या भावना वरचढ झाल्या. लहान मुलासारखी निरागसता आणि कुतूहल हे मात्र सदैव कायम राहिलं. 
सध्या बुवाबाजीचं थोतांड पुन्हा वाढलंय. अवचटांनी आयुष्यभर त्याचा विरोध केला. मात्र, ज्याच्या लेखनाबाबत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणावं, असा हा आवडता लेखक आहे.  
लौकिकार्थानं बाबाला अनेक पुरस्कार मिळाले. मान-सन्मान मिळाले. मात्र, त्यानं पुस्तकातून जोडलेले वाचक आणि प्रत्यक्ष जीवनात जोडलेली अक्षरश: शेकडो लहान-थोर माणसं हाच त्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. बाबानं मागच्या सोमवारी (२६ ऑगस्ट) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मात्र, त्याच्या नजरेतलं मूलपण आजही कायम आहे आणि हे निरागस मूलपण हाच आजच्या ‘बाबा’चा सर्वांत सुंदर दागिना आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, १ सप्टेंबर २०१९)

---

3 Aug 2019

मराठी व्याकरण - भाग ७ ते १२

मराठी व्याकरण
---------------
भाग ७
---------

आज एकेका सुट्या शब्दांऐवजी नेहमी घोळ होणाऱ्या शब्दांचे, अचूक लिहिण्यासाठीचे साधे-सोपे नियम पाहू या. हे नियम लक्षात राहिले, की मग ते शब्द कधीच चुकणार नाहीत.

१. जाऊन, खाऊन, जेवून, ठेवून...
या शब्दांमध्ये मधले अक्षर ऊ लिहायचे, की वू लिहायचे याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. त्यामुळे जावून, खावून, जेऊन, ठेऊन, देवून, घेवून अशी चुकीची रूपे लिहिलेली आढळतात.
कुठल्या शब्दात ‘ऊ’ लिहायचे आणि कुठल्या शब्दात 'वू’ याबाबत सोपा नियम असा, की त्या शब्दाचे मूळ क्रियापद पाहायचे. त्यात व असेल तरच वू लिहायचे. व नसेल तर ऊ लिहायचे. जाऊन या शब्दामध्ये मूळ क्रियापद जाणे असे आहे. त्यात व नाही. त्यामुळे हा शब्द ‘जाऊन’ असा लिहिला जाईल. ठेवून या शब्दात मूळ क्रियापद ठेवणे असे आहे. त्यात ‘व’ असल्याचे तो शब्द ‘ठेवून’ असा लिहिला जाईल. त्याचप्रमाणे जेवणे - जेवून, खाणे - खाऊन, जाणे - जाऊन, घेणे - घेऊन असे शब्द योग्य पद्धतीने लिहावेत.
२. खानावळ नव्हे; खाणावळ
जसे जेवण - जेवणावळ तसेच खाणे - खाणावळ. त्यामुळे हा शब्द ‘खानाव‌‌ळ’ असा लिहिणे अयोग्य. चित्रपटसृष्टीतील खान मंडळींच्या चलतीला उद्देशून कुणी तरी गमतीने ‘खानावळ’ शब्द वापरला तर तो योग्य; अन्यथा जेवण्याच्या ठिकाणासाठी ‘खाणावळ’ असेच लिहायला हवे. तोच प्रकार 'काणाडोळा' या शब्दाचा. हा शब्द 'कानाडोळा' असा चुकीचा लिहिला जातो. एखाद्या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे म्हणजे तिकडे डोळा 'काणा' (तिरका) करणे. इथे 'काना'चा काहीही संबंध नाही. मात्र, कुणी हा शब्द 'कानाडोळा' असा लिहिल्यास तिकडे 'काणाडोळा' करू नये. ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून द्यावी.
३. ‘द’ कुठे आणि ‘दी’ कुठे?
आपण अनेकदा इंग्रजी शब्द देवनागरी लिपीतून लिहितो. उदा. अनेक संस्थांची नावे इंग्लिशमध्ये असतात. ती देवनागरीतून लिहिताना ‘The’ हा शब्द कधी ‘द’, तर कधी ‘दी’ असा लिहिला जातो. याबाबत सोपा नियम असा, की इंग्लिशमध्ये जो शब्द किंवा शब्दसमूह स्वरांनी (A, E, I, O, U) सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ ‘दी’ असा लिहावा, तर जे शब्द किंवा शब्दसमूह व्यंजनांनी सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ हा ‘द’ असा लिहावा. ‘द सन’ आणि ‘दी अर्थ’ हे याचे लक्षात ठेवायला सोपे उदाहरण आहे. ‘द पूना मर्चंट्स चेंबर’ आणि ‘दी असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स’ असे लिहिणे योग्य.
४. इंग्रजी अक्षरे दीर्घच
इंग्रजीमधील सर्व वर्णमाला देवनागरीतून लिहिताना सर्व अक्षरे दीर्घ लिहावीत. म्हणजे बी, सी, डी, ई, यू अशीच लिहावीत. बि, सि, डि, इ, यु अशी लिहू नयेत. जेव्हा ही अक्षरे जशी आहेत तशी म्हणूनच लिहायची असतात तेव्हासाठीच हा नियम आहे. उदा. लघुरूप असेल तेव्हा. U B Kulkarni हे यू. बी. कुलकर्णी असेच लिहावे. मात्र, कधी कधी मराठी लघुरूप असेल तर ते मूळ शब्दाप्रमाणेच लिहावे. उदा. यु. म. पठाण. यांचे नाव मराठीत लिहिताना ‘युसूफ’ असल्याने ‘यु.’ असेच लिहिले जाईल. तेच हे नाव इंग्रजीत U M Pathan असे होत असल्याने ते इंग्रजी अक्षराच्या नियमाप्रमाणे यू. एम. पठाण असेच लिहावे. त्याचप्रमाणे ही अक्षरे इंग्रजी नावांत येतात तेव्हाही त्यांचे लिखाण वेगळे होईल. उदा. United हा शब्द लिहिताना ‘युनायटेड’ (यु ऱ्हस्व) लिहिला जाईल. तिथे ‘इंग्रजी अक्षरे कायम दीर्घ’ हा नियम लागू होणार नाही.
५. कायम पहिली वेलांटी
इंग्रजीत ing प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द मराठीत लिहिताना पहिली वेलांटी देऊनच लिहावा. उदा. coming - कमिंग, going - गोइंग, Building - बिल्डिंग, Marking - मार्किंग इ.
---
----
भाग ८
--------

१. द्ध आणि ध्द, द्व आणि व्द
प्रसिद्ध, श्रद्धा, बुद्धी अशा शब्दांमध्ये येणारे ‘द्ध’ हे जोडाक्षर ‘ध्द’ असे लिहिणे अयोग्य. मराठीत आपल्या उच्चारणाचा आणि लेखनाचा क्रम सारखाच असतो. हे जोडाक्षर जेव्हा ‘द्ध’ असे लिहिले जाते, तेव्हा त्याची फोड ‘द् + ध’ अशी असते. हे अक्षर उच्चारतानाही आपण आधी ‘द्’ आणि मग ‘ध’ अशाच योग्य क्रमाने उच्चारतो. त्यामुळे त्याचे लेखन कायम ‘द्ध’ असेच करावे. ‘ध्द’ हा उच्चार मराठीत बहुतेक कुठेच वापरला जात नाही, हे आपल्या लक्षात येईल. तीच गोष्ट द्वार, द्वादशी या शब्दांची. यातही आधी ‘द्’ आणि मग ‘व’ ही अक्षरे येतात, हे उच्चार केल्यास लक्षात येते. त्यामुळे हे शब्दही ‘व्दार’, ‘व्दादशी’ असे न लिहिता द्वार, द्वादशी असेच लिहावेत. ‘व्द’ हे अक्षरही मराठीत फारसे उच्चारले जातच नाही.
२. किंमत-किमतीला, रक्कम-रकमेला
किंमत या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘कि’वरचा अनुस्वार जातो आणि तो शब्द ‘किमतीला’ असा लिहिला जातो. ‘किंमतीला’ असे लिहिणे अयोग्य. ‘हिंमत’चेही याचप्रमाणे ‘हिमतीला’ असे सामान्यरूप होईल. अन्य उदाहरण : गंमत - गमतीने.
‘रक्कम’ या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘क’चे द्वित्व जाते आणि तो शब्द ‘रकमेला’ असा लिहिला जातो. बाकी उदाहरणे : अक्कल - अकलेची, मुद्दल - मुदलात, जिन्नस - जिनसांची, शिल्लक - शिलकेची, डुक्कर - डुकरांची, थप्पड - थपडेची, टक्कर - टकरेची, चप्पल - चपलेची, नक्कल - नकलेची, पक्कड - पकडेची, बक्कल - बकलाची, छप्पर - छपरावर इ.
३. पाऊस-पावसात, देऊळ-देवळात...
पाऊस, देऊळ अशा शब्दांचे सामान्यरूप होताना ती ‘पावसात’, ‘देवळात’ अशी होतात. थोडक्यात ‘ऊ’ची जागा ‘व’ हे अक्षर घेते. ‘पाऊसात’, ‘देऊळात’ असे लिहिणे चूक. ‘पाऊल’चे सामान्यरूपही ‘पावलात’ असेच होते. अराकान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूपे होताना, खाटीक - खाटकाचा, कापूस - कापसाला, चाबूक - चाबकाची, ढेकूण - ढेकणाची, तांदूळ - तांदळाची, बेडूक - बेडकाची, माणूस - माणसाची अशी रूपे होतात.
अकारान्त स्त्रीलिंगी नामांची सामान्यरूपे पुढीलप्रमाणे : खारीक : खारकेची, तारीख - तारखेची, बाभूळ - बाभळीची, बेरीज - बेरजेची.
४. आरसा - आरशाने, ससा - सशाने
आकारान्ती शब्दांचे सामान्यरूप होताना ‘सा’चा ‘शा’ होतो. उदा. आरसा - आरशाने, ससा - सशाने, पैसा - पैशाने, घसा - घशाने, मासा - माशाने.
(मासा आणि माशी यांचे अनेकवचन किंवा सामान्यरूप होताना वेगवेगळे होते, याचे कारण मुळात हे दोन वेगळे शब्द आहेत. ‘मासा’चे माशाने असे होते, तर ‘माशी’ या शब्दात मुळातच ‘श’ असल्याने त्याचे सामान्यरूप ‘माश्यांनी’ असे होते. ‘जाळ्यात पकडल्यावर माशांची तडफड सुरू होती’ आणि ‘हलवायाच्या दुकानात माश्या घोंघावत होत्या’ ही वाक्यरचना बरोबर. या दोन शब्दांत नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे मूळ शब्द लक्षात ठेवावा.)
५. राजकीय पक्ष व उडणारे पक्षी
राजकीय पक्ष असतात त्यांच्याबाबत जेव्हा उल्लेख असेल, तेव्हा ‘पक्षांनी’ असेच सामान्यरूप होईल. मात्र, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबाबत उल्लेख असेल, तेव्हा ‘क्ष’ला ‘य’ जोडून ‘पक्ष्यांनी’ असेच सामान्यरूप होईल. या दोन्हींमध्ये अनेकदा गल्लत होते. ‘राजकीय पक्ष्यांनी’ असे लिहिणे चूक, तसेच ‘पक्षांचा थवा उडत होता’ असे लिहिणेही चूकच.
---
---

भाग ९
--------

१. रफार कुठे द्यायचा?
आपल्याकडे एखाद्या शब्दात रफार नेमका कुठे द्यायचा, याबाबत अनेकांचा गोंधळ असल्याचे जाणवते. त्यामुळेच ‘पुनर्रचना’ हा शब्द ‘पुर्नरचना’ असा चुकीचा लिहिलेला आढळतो. मराठीत आपण जसे अक्षरांचे उच्चार करतो, तसेच म्हणजे त्याच क्रमाने लिहितो. पुनर्रचना हा शब्द उच्चारताना आपण पु-न-र-र-च-ना असा उच्चारतो.
पाय मोडलेला म्हणजेच ज्यात स्वर मिसळलेला नाही अशा र् च्या नंतर व्यंजन आल्याने त्याचा रफार होतो. त्यामुळे रफार कुठे द्यावा, याची शंका असल्यास तो शब्द सावकाश उच्चारून पाहावा. ‘र’चा उच्चार जेथे संपतो, त्यानंतर येणाऱ्या अक्षरावर रफार द्यावा. अन्य उदाहरणे : पुनर्जन्म, पुनर्स्थापना, पुनर्विचार, पुनर्विवाह, पुनर्भेट, इ.
(येथे मुळात पुन: + पुढील व्यंजन अशी रचना आहे. संधी होताना विसर्ग जाऊन त्या जागी ‘र’ येतो. या ‘र’साठी पुढील रफार येतो, हे लक्षात असू द्यावे. काही काही शब्द ‘पुन:’ हा उपसर्ग जसा आहे तसाच ठेवून लिहिले जातात. उदा. पुन:प्रत्यय. हा शब्द पुनर्प्रत्यय असा लिहिला जात नाही. तसा लिहिला तरी तो चूक मात्र नाही. मात्र, रूढ नाही.)
२. आणखी रफार...
संधी नसलेल्या अनेक तत्सम शब्दांत आपण रफार देतोच. उदा. समर्पण, अर्पण, दर्पण इ. हे शब्द इथे दिले आहेत तसेच लिहिणे योग्य. (मराठीतील सरपण हा शब्द मात्र ‘सर्पण’ असा लिहू नये. कारण त्यातील र स्वरासहित आहे )
३. गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर...
हा नियम मराठी साहित्य महामंडळाच्या नियमावलीत आहे. एखाद्या गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर ‘पू’ला दुसरा उकार द्यावा. उदा. कोल्हापूर, सोलापूर, श्रीरामपूर. मात्र, ‘कोल्हापुरात’ लिहिताना ‘पु’ला पहिला उकार द्यावा. कोल्हापूर - कोल्हापूरला - कोल्हापूरमध्ये - कोल्हापुरात हे योग्य. ‘कोल्हापूरात’, ‘सोलापूरात’ असे लिहिणे चुकीचे, हे लक्षात ठेवावे.
४. देशातील काही प्रमुख शहरांची नावे
तिरुअनंतपुरम - केरळची राजधानी. या शहराचे इंग्रजांच्या काळात रूढ झालेले ‘त्रिवेंद्रम’ हे नाव बदलून ‘तिरुअनंतपुरम’ करण्यात आले आहे. ते अनेक लोक थिरुअनंतपूरम, थिरूअनंतपूरम, तिरुवअनंतपुरम अशा वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचं लिहितात. दाक्षिणात्य भाषांत ‘तिरु’ याचा अर्थ ‘श्री’. तिरुपती याचा अर्थ श्रीपती. श्रीअनंतपूर अशा अर्थाचे हे गावाचे नाव. दक्षिणेत तिरुअनंतपुरम असे लिहिले जाते. शेवटी ‘पूर’चे संस्कृत ‘पुरम’ झाल्यामुळे ‘पु’ला पहिला उकार येतो, हे लक्षात ठेवावे.
चंडीगड - उत्तरेकडे हिंदीत ‘गड’ हा शब्द ‘गढ’ असा लिहिला जातो. त्यामुळे तेथे ज्या ज्या शहरांच्या शेवटी ‘गढ’ आहे ते सर्व शब्द मराठीत ‘गड’ असे लिहिण्याचा वृत्तपत्रीय संकेत आहे. त्यामुळे चंडीगड असे लिहिणे योग्य. त्याचप्रमाणे अलिगड, चित्तोडगड, राजगड अशी नावे लिहिणे योग्य.
लखनौ - हे नाव हिंदीत ‘लखनऊ’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘लखनौ’ असे लिहिण्याचा प्रघात आहे.
आग्रा - हे नाव हिंदीत ‘आगरा’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘आग्रा’ असेच लिहिण्याचा प्रघात आहे.
(जाता जाता... चेन्नई, कोलकाता व मुंबई या शहरांची नावे आता बदलली असली, तरी तेथील उच्च न्यायालयांची नावे अद्याप बदललेली नाहीत. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय असेच लिहावे. मात्र, मुंबईपुरता मराठी वृत्तपत्रांनी अपवाद केला आहे. आपण मराठीत बॉम्बे उच्च न्यायालय न म्हणता, मुंबई उच्च न्यायालयच म्हणतो.)
५. महाराष्ट्रातील गावे....
पूर - पुरात हा उल्लेख वर आलाच आहे. पूर्वी ज्या गावांच्या नावात ‘गाव’ आहे ते लिहिताना ‘गांव’ असं ‘गा’वर अनुस्वार देऊन लिहिण्याची पद्धत होती. मात्र, महामंडळाने बदललेल्या नियमांनुसार आता हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ‘जळगांव’, ‘चाळीसगांव’, ‘कोपरगांव’, ‘तळेगांव’ असे न लिहिता ‘जळगाव’, ‘चाळीसगाव’, ‘कोपरगाव’, ‘तळेगाव’ असेच लिहावे. पूर्वी छोट्या गावांमध्ये खुर्द व बुद्रुक असत. एकाच नावाच्या दोन गावांमधले मोठे गाव म्हणजे बुद्रुक, तर (शक्यतो नदीपलीकडले) छोटे गाव म्हणजे खुर्द. अजूनही अनेक गावांसमोर खुर्द व बुद्रुक लिहिलेले असते. पूर्वी ‘खु।।‘ अशा पद्धतीने दोन दंड देऊन लिहिण्याची पद्धत होती. आता शक्यतो पूर्ण खुर्द व बुद्रुक लिहावे, असा संकेत आहे.
---
---

भाग १०
----------

१. ‘ऋ’ या स्वराबद्दल...
व्यंजनात हा स्वर मिसळून झालेले व्यंजनाचे रूप आपण अनेक शब्दांत वापरत असतो.
उदा. क् + ऋ = कृ (कृपा, कृती इ.)
ग् + ऋ = गृ (गृह, जागृती इ.)
स्वर मिसळून तयार झालेली अक्षरे -
क् + ऋ = कृपा
त् +ऋ = तृप्ती
स् + ऋ = सृष्टी
ब् + ऋ = बृहस्पती
व्यंजन जोडून तयार झालेली अक्षरे -
क् + रू = क्रूर
त् + रू = त्रुटी
श् + रू = अश्रू
‘ऋ’ आणि ‘ऊ’ या स्वरांच्या उच्चारांमध्ये फरक आहे. ‘उ/ऊ’चा उच्चार स्वच्छ, खणखणीत होतो. ‘ऋ’चा उच्चार मात्र ‘उ’ आणि ‘इ’ यांच्या मध्ये कुठे तरी असतो. किंबहुना तो ‘इ’च्या दिशेलाच अधिक झुकलेला असतो. बोलीभाषांमध्ये त्याचे जे रूप होते, त्यावरून हे स्पष्ट होते. तिथे ‘शृंग’चे ‘शिंग’ असे होते; ‘शुंग’ होत नाही. ‘शृंगार’चे ‘शिणगार’ किंवा ‘शिंगार’ होते; ‘शुणगार’ होत नाही. ‘कृपा’चे किरपा होते; ‘कुरपा’ होत नाही.

२. ऐ आणि औ : मराठी उच्चार आणि हिंदी उच्चार
‘ऐ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + इ अशी होते.
उदा. ‘बैल’ हा शब्द मराठीत आपण ब + इ + ल असा उच्चारतो.
‘औ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + उ अशी होते.
उदा. ‘गौरी’ हा शब्द आपण मराठीत ग + उ + री असा उच्चारतो.
त्यामुळे हिंदीप्रमाणे बॅल, गॉरी असे उच्चार करू नयेत. लेखन योग्य केले आणि त्या शब्दांची फोड नीट लक्षात घेतली, की उच्चारही चुकत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

३. माझी मदत कर... मी तुझे धन्यवाद करतो
मराठीवर हिंदीचा प्रभाव वाढत चालल्याचे मालिकांमधील संवादांमधून स्पष्टपणे लक्षात येते. ‘तू माझी मदत करशील का?’ असे वाक्य अनेकदा कानावर येते. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य सपशेल चुकीचे आहे. मराठीत ‘तू मला मदत कर’ असे म्हणतात. ‘माझी मदत कर’ हे ‘मेरी मदद करो’ या हिंदी वाक्याचे सरळसरळ रूपांतर आहे. हिंदी वाक्य बरोबर असले, तरी त्याचे हे शब्दश: भाषांतर मात्र बरोबर नाही. तिथे ‘तू मला मदत कर’ असेच म्हणायला हवे. त्याचप्रमाणे ‘तू माझी मदत केल्याबद्दल तुझे धन्यवाद’ हेही चूकच. ‘मला मदत केल्याबद्दल तुला धन्यवाद’ असे ते वाक्य हवे. खरं तर नुसते ‘धन्यवाद’ही पुरेसे आहेत.
याबरोबरच ‘कार्यक्रम संपन्न झाला’ अशी वाक्यरचना अनेकदा आढळते. मराठीत ‘संपन्न’ याचा अर्थ ‘समृद्ध’ असा होतो. त्यामुळे ‘कार्यक्रम झाला’ किंवा पार पडला एवढेचे पुरेसे आहे.

४. हिंदी/इंग्रजी शब्दांना पर्याय
इतर भाषांमधून आलेले शब्द घेत घेतच कुठलीही भाषा वाढत असते. म्हणूनच भाषेला नेहमी नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. असे असले, तरी आपल्या भाषेत योग्य शब्द असतानाही केवळ ते माहिती नाहीत, म्हणून इतर भाषांमधले शब्द उसने घेऊन वापरणे हे म्हणजे आपले घर धनधान्याने भरलेले असतानाही शेजारच्यांकडे जाऊन जेवण्यासारखे आहे.
हिंदी किंवा इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून नेहमी वापरता येण्यासारखे मराठी शब्द -
मौका - संधी, आयाम/ डायमेन्शन - मिती, टेन्शन - तणाव, मौसम - हवामान, हमेशा - नेहमी, बोअर - कंटाळा, समारोह - सोहळा किंवा समारंभ, विमोचन - प्रकाशन इ.

५. नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
शीला व कोनशिला - पहिला शब्द शीला हे एक विशेषनाम आहे व ते शील या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे.
‘कोनशिला बसविली’ असे आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो. यात ‘शिला’ हा वेगळा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ शिळा (मोठा दगड) असा होतो. त्यामुळे ‘कोनशिला’ या शब्दात ‘श’ला पहिली वेलांटी देणे योग्य, हे लक्षात ठेवावे.
शीर व शिर -
पहिला शब्द ‘शीर’ याचा अर्थ नस किंवा शरीरातील रक्तवाहिनी. ‘त्याला शिरेतून इंजेक्शन दिले’ असे वाक्य आपण वाचले असेल. यातल्या ‘श’ला कायम दुसरी वेलांटी असते.
‘शिर’ या शब्दाचा अर्थ मस्तक, डोके असा होतो. ‘खून झालेल्या व्यक्तीचे शिर जागेवर नव्हते’ असा उल्लेख बातम्यांत आपण वाचतो. तेथे ‘शिर’ असाच शब्द लिहिणे अपेक्षित आहे. यात ‘श’ला कायम पहिली वेलांटी असते हे लक्षात ठेवावे.
‘ईश’ प्रत्यय लागून तयार होणारी विशेषनामे
उदा. गिरीश, रमेश, हरीश, सुरेश इ.
यात शेवटचे अक्षर कायम शहामृगामधला ‘श’ असते, हे लक्षात ठेवावे. गिरीश हे शंकराचे नाव. गिरी + ईश = गिरीश. रमेश हे विष्णूचे नाव. रमा + ईश = रमेश. यात ‘ईश’ हा शब्द असल्याने व त्यात ‘श’ शहामृगाचा असल्याने या सर्व शब्दांच्या शेवटी ‘श’ येते; ‘ष’ नव्हे, हे लक्षात ठेवावे.
विशेष नोंद - शिरीष या शब्दात शेवटी षटकोनातील ‘ष’ येतो. याचे कारण तो शब्द ‘ईश’ प्रत्यय लागून तयार झालेला शब्द नसून, स्वतंत्र शब्द आहे. शिरीष हे एका वृक्षाचे नाव आहे. ते स्त्री व पुरुष अशा दोघांनाही ठेवले जाते.
उदा. शिरीष पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या) व शिरीष कणेकर (प्रसिद्ध लेखक).
सुहास, किरण ही अशीच आणखी काही उदाहरणे.
---
---

भाग ११
----------

विरामचिन्हे

मराठीत किंवा कुठल्याही भाषेत वाक्यांमधील विविध भाव, अर्थ, ठेहराव आदी दर्शविण्यासाठी विरामचिन्हे वापरतात. विरामचिन्हांना व्याकरणकर्त्यांनी भाषेचे दागिने म्हटलं आहे. अंगावर दागिने नसलेल्या स्त्रीपेक्षा सालंकृत स्त्री सुंदर दिसते. त्याचप्रमाणे योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेला मजकूर केवळ नीटनेटका दिसतो, असं नाही, तर तो वाचकाला त्या मजकुराचा अर्थ समजण्यासाठी मदत करतो.
विरामचिन्हे नसलेले वाक्य पाहा -
आवडले का तुला हे पुस्तक हो जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे नील म्हणाला वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक
विरामचिन्हे असलेले वाक्य पाहा -
“आवडले का तुला हे पुस्तक?“
“हो! जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” नील म्हणाला.
वडील म्हणाले, “रामायण कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक?”
वरील दोन्ही वाक्ये वाचल्यानंतर विरामचिन्हांचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
मराठीत आपण एकूण नऊ विरामचिन्हे वापरतो.
१. पूर्णविराम (.) - अ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरण - तो घरी गेला.
आ) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी. उदाहरण - य. गो. जोशी
२. अर्धविराम { ; } - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असतील, तेव्हा हे चिन्ह वापरतात. हल्ली या चिन्हाचा वापर फार कमी होताना दिसतो. मात्र, वाक्यांतून नेमका अर्थ पोचविण्यासाठी हे चिन्ह जरूर वापरावे.
उदाहरण - ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडला नाही.
३. स्वल्पविराम (,) - अ) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात.
आ) संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - नील, इकडे ये.
स्वल्पविराम चुकीच्या ठिकाणी देण्याने भलते गोंधळ होऊ शकतात. याबाबतचे विनोदही प्रसिद्ध आहेत. जिज्ञासूंनी ’गुगल’ करून पाहावेत.
४. अपूर्ण विराम किंवा उपपूर्णविराम { : } - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : १, ८, १४, २७, ४०.
{ : } हे चिन्ह विसर्गाचेही चिन्ह आहे. दोन्ही चिन्हे एकच आहेत. मात्र, अपूर्ण विराम म्हणून या चिन्हाचा वापर केवळ वरील उदाहरणात दिली तशी माहिती द्यायची असेल, तरच करावा.
५. प्रश्नचिन्ह (?) - प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरण - तू केव्हा आलास?
महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्नचिन्ह अक्षराला जोडूनच देतात. मध्ये स्पेस देऊन पुढे प्रश्नचिन्ह देऊ नये.
बातमी लिहिताना अनेकदा ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार? असा सवाल करून...’ अशी वाक्यरचना दिसते. ती चुकीची आहे. पुढे ‘असा सवाल करून’ असे म्हटले असेल, तर त्याआधी प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविराम द्यायला हवा. त्यामुळे हे वाक्य ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार, असा सवाल करून...’ असे लिहिणे योग्य. कधी कधी वाक्यात एकापाठोपाठ एक प्रश्न असतात. त्यात शेवटी पुन्हा ‘असे प्रश्न उपस्थित करून...’ असे लिहिले असेल, तरीही त्या प्रत्येक प्रश्नासमोर प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविरामच देणे योग्य. मात्र, शेवटी ‘असा सवाल करून’ किंवा ‘असे प्रश्न उपस्थित करून’ अशा शब्दांत वर्णन नसेल व वाक्य प्रश्नार्थक संपत असेल, तर तिथे प्रश्नचिन्ह द्यायला हवे.
उदाहरण - ‘शहरात सगळीकडे खड्डे पडले आहेत,’ अशी टीका करून ते म्हणाले, ‘यावर दाद मागण्यासाठी नागरिकांनी जायचे कुठे?’
इथे ‘कुठे’च्या समोर प्रश्नचिन्ह देणे योग्य होय.
बातमीव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या लेखनालाही हेच नियम लागू होतात.
६. उद्गारचिन्ह (!) - उत्कट भावना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह देण्याची पद्धत आहे. उदाहरण -
अ) अरेरे! तो नापास झाला. आ) शाब्बास! छान खेळलास. इ) वाहव्वा‌! काय तान घेतलीय!
हल्ली उठसूठ उद्गारचिन्ह टाकून मजकूर लिहिण्याची सवय अनेकांना असते. आपले वैयक्तिक लेखन करताना किती उत्कटपणा दाखवावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी बातमी किंवा अन्य माहितीपर प्रमाणलेखन करताना नियमानुसारच हे चिन्ह वापरावे. हा ‘दागिना’ मोजक्याच ठिकाणी खुलून दिसतो, हे लक्षात ठेवावे. प्रश्नचिन्हाप्रमाणेच उद्गारचिन्हही अक्षराला जोडूनच लिहावे. मध्ये स्पेस देऊन लिहू नये.
७. अवतरणचिन्हे (“ ”) - अ) दुहेरी अवतरणचिन्ह - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी त्या वाक्याच्या दोन्ही बाजूस दुहेरी अवतरण देतात. उदाहरण - तो म्हणाला, “मी गाण्याच्या कार्यक्रमाला येईन.”
महत्त्वाचे - एखादे वाक्य अपूर्ण असेल, तर आधी स्वल्पविराम येतो व मग दुहेरी अवतरणचिन्ह येते, हे लक्षात ठेवावे.
उदाहरण - “देव वरून पाहतोय,” असे म्हणून संदेश त्राग्याने म्हणाला, “सगळ्याचा हिशेब देवाकडे द्यावा लागेल.”
आ) एकेरी अवतरणचिन्ह - एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण वापरतात. एखाद्या शब्दातून वेगळा अर्थ ध्वनित करायचा असेल, तरीही एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.
उदाहरण - अ) पुणे ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. आ) ‘भारतीयांची परदेशांतील वागणूक लज्जास्पद असते,’ असे मत मध्यंतरी टीव्हीवरील चर्चेत ऐकायला मिळाले होते. इ) संध्याकाळी वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीचालकांची ‘सर्कस’ चालू असते.
८. संयोगचिन्ह (-) - अ) दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात. उदाहरण - विद्यार्थि-मंडळ, वधू-वर, आदान-प्रदान इ.
आ) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह देतात. उदाहरण - आजचा कार्यक्रम शाळे-
पुढील पटांगणावर होईल.
(विशेष नोंद - पूर्वी खिळेजुळणीच्या काळी हे चिन्ह देण्याची गरज भासत असे. आता संगणकावर टंकलेखन होत असल्याने या चिन्हाची आवश्यकता पडत नाही. इथे केवळ माहितीस्तव उदाहरण दिले आहे.)
९. अपसारणचिन्ह (-) (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह) - अ) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - मी तेथे गेलो, पण -
आ) वाक्यादरम्यान स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - तो मुलगा - ज्याने बक्षीस मिळविले - आपल्या शाळेत आहे.
---
(माहितीस्रोत : मो. रा. वाळंबे लिखित ‘सुगम मराठी व्याकरण लेखन’, नितीन प्रकाशन, पुणे)
---

भाग १२
----------

१. अनुस्वार
अ) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
थोडक्यात, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ : आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, निबंध, अलंकार
आ) संस्कृतमध्ये मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार पर-सवर्णाने (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने *) लिहायला हरकत नाही.
उदाहरणार्थ : कुंज - कुञ्ज, घंटा - घण्टा, अंत - अन्त, चंपक - चम्पक, शंख - शंङ्ख, पंचम - पञ्चम, चंड - चण्ड, छंद - छन्द, अंबुज - अम्बुज
(* पंचमवर्ण -
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
वरील पाच गटांत ‘क ख ग घ’ या व्यंजन गटासाठी ङ हा पंचमवर्ण आहे व याप्रमाणे अन्य)
इ) य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृतातल्याप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ -
संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, संसार, सिंंह, अंश, संस्कार, मांस, संस्था, संहार, संयुक्त, कंस इ.
ई) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
एकवचन - मुलास, घरात, त्याचा, देशासाठी
अनेकवचन - मुलांस, घरांत, त्यांचा, देशांसाठी
उ) वरील नियमांव्यक्तिरिक्त आता कुठेही अनुस्वार देऊ नयेत. अनुच्चारित अनुस्वार पूर्वीच्या प्रमाणात देत असत, हे आता देऊ नयेत.
उदा. पहांट, केंस, झोंप, लांकूड, नांव, पांच, कांटा, सांवळा, केंळे, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां असे लिहू नये. त्याऐवजी पहाट, केस, झोप, लाकूड, नाव, पाच, काटा, सावळा, केळे, तिने, घरात, जेथे, तेव्हा असे लिहिणे योग्य.

२) इतर नियम
अ) एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे.
उदा. करणे - करण्यासाठी, पाहणे - पाहण्यास, भावे - भाव्यांचा, फडके - फडक्यांना
(करणेसाठी, पाहणेस, भावेंचा, फडकेंना अशी रूपे लिहू नयेत.)
बातमी लिहिताना काही गावांबाबत असे चुकीचे लेखन केले जाते. अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे अशी एकारान्त गावे चुकीच्या सामान्यरूपाला बळी पडली आहेत. त्यामुळे अनेकदा ‘अकोलेत जोरदार पाऊस’, ‘शिवणेत उद्या मोर्चा’, ‘बांबवडेत रस्ता खचला’, ‘नेवासेत दर्शनाला गर्दी’ अशी शीर्षके पाहायला मिळतात. ती चूक आहेत. आपण ‘पुणेत जोरदार पाऊस’, ‘ठाणेत वाहतूक कोंडी’ असं लिहितो का? नाही ना! ‘पुण्यात जोरदार पाऊस’, ‘ठाण्यात वाहतूक कोंडी’ असेच लिहितो ना! मग तोच न्याय अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे या गावांनाही लावावा. ‘अकोल्यात जोरदार पाऊस’, ‘शिवण्यात उद्या मोर्चा’, ‘बांबवड्यात रस्ता खचला’, ‘नेवाशात दर्शनाला गर्दी’ अशा पद्धतीनेच ही शीर्षके दिली पाहिजेत.
आ) एखादा, कोणता अशी रूपे वापरावीत. एकादा, कोणचा असे लिहू नये.
इ) राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावीत. रहाणे-राहाणे, पहाणे-पाहाणे, वहाणे-वाहाणे अशी रूपे लिहू नयेत.
मात्र, आज्ञार्थी रूपे लिहिताना ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ ही रूपे लिहिण्यास हरकत नाही.
ई) ‘ही’ हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. ‘आणि’ हे शब्दयोगी अव्यय ऱ्हस्वान्त लिहावे.

३) नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
आधी चुकीचे लेखन व समोर अचूक लेखन या क्रमाने वाचावे.
मंदीर - मंदिर,
रविंद्र - रवींद्र,
सुशिला सुशीला,
नाविन्य - नावीन्य,
प्राविण्य - प्रावीण्य,
प्रतिक्षा - प्रतीक्षा,
उहापोह - ऊहापोह,
उर्मी - ऊर्मी,
अंध:कार - अंधकार,
घन:श्याम - घनश्याम,
धि:कार - धिक्कार,
निस्पृह - नि:स्पृह,
पृथ:करण - पृथक्करण,
मातोश्री - मातु:श्री,
मनस्थिती - मन:स्थिती,
हाहा:कार - हाहाकार,
विषद - विशद,
सुश्रुषा - शुश्रूषा,
विशिष्ठ - विशिष्ट,
अलिकडे - अलीकडे,
औद्योगीकरण - उद्योगीकरण,
अश्या - अशा,
सहाय्यक - सहायक,
आधीन - अधीन,
ईयत्ता - इयत्ता,
ऊग्र - उग्र,
दुर्वा - दूर्वा

४) हिंदीच्या प्रभावाने वापरले जाणारे शब्द
‘व्यस्त’ हा हिंदी शब्द आपल्याकडे एखादा माणूस बिझी आहे, अशा अर्थानं वापरला जातो. ते चूक आहे. त्यासाठी ‘व्यग्र’ असा शब्द आहे. ‘मी कामात व्यस्त आहे,’ असे लिहिण्याऐवजी ‘मी कामात व्यग्र आहे,’ असेच लिहावे. ‘व्यस्त’ या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे उलट प्रमाण. व्यस्त गुणोत्तर असा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल.
---
---

1 Aug 2019

मटा लेख - १ ऑगस्ट १९

धोक्याची घंटा
-----------------

आपण छान मूडमध्ये नाटक बघायला आलेले असतो. बाकी सर्व चिंता, विवंचना बाजूला ठेवून आता दोन-अडीच तास समोर घडणाऱ्या नाट्यात हरवून जायचं अशी खूणगाठ आपण मनाशी बांधलेली असते. पहिली घंटा होते, मग आपण जरा सावरून बसतो. दुसरी घंटा होते. आता आपलं मन पूर्णत: त्या नाट्यगृहाच्या आत निर्माण झालेल्या वातावरणाशी एकरूप झालेलं असतं. अधीरता अगदी शिगेला पोचलेली असते. आणि मग, तिसरी घंटा होते आणि नाटक सुरू होतं... या प्रक्रियेतसुद्धा किती नाट्य आहे! पण हल्ली तेवढं बहुदा पुरत नसावं. म्हणून तिसरी घंटा होऊन नाटक सुरू झालं, तरी नाट्यगृहात वेगवेगळ्या घंटा वाजू लागतात. या घंटा असतात मोबाइलच्या... काही किणकिणत्या, काही गुणगुणत्या; पण बहुसंख्य ठणठणत्या अशा अनेकविध घंटा... त्या कधी वाजतात, तर कधी बंद होतात. आपल्या डोक्यात मात्र एक धोक्याची घंटा लगेच सुरू होते - आणि ती असते, नाटकाचा बेरंग होण्याची घंटा!
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. केवळ नाट्यगृहांतच नव्हे, तर चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही. आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. याचं कारण आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. हल्ली सुमीत राघवन आणि सुबोध भावे यांच्यासारख्या स्टार कलाकारांनी या मोबाइल उपद्रवाबद्दल सोशल मीडियातून आवाज उठवल्यामुळं तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्या या भूमिकेवर समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी फैरी झडत आहेत. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावे. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही.  आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच! 
जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल स्विच ऑफ करणे किंवा सायलेंट मोडवर टाकणे हे फारच सोपे काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!
काही नाटकं अगदी टाइमपास स्वरूपाची, विनोदी असतात; तर काही गंभीर, रहस्यमय, गूढ अशी असतात. पहिल्या प्रकारच्या नाटकांच्या वेळी एखादा मोबाइल वाजला, तर कलाकारही फारशी हरकत घेत नाहीत. (खरं तर कुठल्याही वेळी मोबाइल वाजणं हे चुकीचंच...) मात्र, दुसऱ्या प्रकारची नाटकं सुरू असताना कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एकतानता निर्माण व्हावी लागते. प्रेक्षक कलाकारांच्या जोडीनं त्या कथाभागामध्ये स्वत:ला गुंतवून घेत असतात. रंगमंचावर एक वातावरण तयार होत असतं. अशा वेळी नाटककारानं (‘ब्लॅक-आउट’व्यतिरिक्त) काही शांततेचे क्षण, काही विराम पेरलेले असतात. ती शांतता, ते विराम हे त्या नाटकाचेच, त्या कथानकाचेच भाग असतात. प्रेक्षकांनी त्या शांततेचा, त्या विरामांचाही आस्वाद घ्यायचा असतो. त्या क्षणापूर्वी घडलेलं नाट्य मेंदूत मुरवून घ्यायला जी थोडी उसंत हवी असते, ती मिळवून देण्याचं अतिरिक्त कामही हे विराम करीत असतात. अशा वेळी त्या शांततेचा गळा घोटत, कर्कशपणे मोबाइलची रिंग वाजते, तेव्हा काय उच्च प्रतीचा रसभंग होत असेल, याची कल्पना खरा नाटकवेडा करू शकतो.
असे रसभंगाचे प्रकार वारंवार का होत असावेत? जरा विचार करता, असं लक्षात येतं, की अलीकडे मोबाइलच्या अतिवापरामुळं आपल्या सगळ्यांचीच लक्ष एकाग्र करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे आपण सलग एका जागी बसून, एकच एक गोष्ट करत बसण्याचे प्रसंग कमी झाले आहेत. मोबाइलवर आपल्याला हवा तसा, हवा त्या वेळी सिनेमा पाहण्याची सोय झाल्याने आपण थिएटरमध्येही तसाच सिनेमा बघण्याचा प्रयत्न करतो. ते शक्य न झाल्यास अस्वस्थ होऊन मोबाइल बाहेर काढतो. अनेकांना सतत आपल्याला कुणाचा फोन तर नाही ना आला, मेसेज तर नाही ना आला, हे अधूनमधून तपासण्याची सवय असते. नाटक सुरू असतानाही मग ही सवय अचानक सुटत नाही. केवळ फोनच्या आवाजानेच नाही, तर फोन बाहेर काढल्यावर त्याच्या स्क्रीनचा जो लाइट येतो, त्यानेही अनेकांना डिस्टर्ब होतं. पण काही काही निरागस जनांच्या हे अजिबातच लक्षात येत नाही. आता नाट्यगृहाच्या परिसरात जॅमर बसवा किंवा नाट्यगृहाबाहेर मोबाइलसाठी लॉकर सुरू करा, असे अनेक उपाय सुचविले जात आहेत. ते व्यवहार्य नाहीत. सुबोध आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाट्यगृहाच्या दरवाजावर उभं राहून सगळ्यांचे फोन तपासण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आता या सगळ्यांचीच तळमळ समजण्यासारखी असली, तरी हे तात्कालिक उपाय झाले. यामुळे तेवढ्यापुरता परिणाम होईल. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! हे दुर्दैवी असलं, तरी हेच खरं आहे. यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे. आपल्याला नाटकाचा आस्वाद सगळ्यांसोबत घ्यायचा असेल, तर मोबाइल पूर्णपणे स्विच ऑफ करून ठेवणे हा आणि हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तसं झालं नाही, तर कलाकार असाच उद्वेग व्यक्त करत राहतील आणि आपण पुन्हा मोबाइलचे आवाज करीत नाटक पाहत बसू. खरी धोक्याची घंटा आहे ती हीच!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ ऑगस्ट २०१९)

---

31 Jul 2019

मन-मितवा - भाग ४ ते ६

मन-मितवा

--------------------

माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग पूर्वी ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. आता भाग ४ ते ६ देत आहे. आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे.

-----

४. सहेला रे...
--------------------

मनाच्या ‘सीसीटीव्ही’ची गंमत कळताच गणूला मजा वाटली. आता मनाच्या सीसीटीव्हीत अधूनमधून पाहायचं त्यानं ठरवून टाकलं. आपल्या मनाच्या गमतीशीर लीला पाहताना त्याला आता नव्यानं काही काही गोष्टी कळू लागल्या. एक तर या सीसीटीव्हीतून काहीच सुटत नाही, हे एक! त्यामुळं आता मनाशी लपाछपी खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळं आपल्याला जे जे वाटतं, ते मनाला सांगावं आणि त्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतं, हे त्याच्याकडून ऐकावं हेच योग्य, असं गणूनं ठरवून टाकलं. ‘मन क्यूं बहका रे बहका...’ हे गाणं त्यानं आपल्या मेमरीकडून कायमचं डिलीट करून टाकलं. आयुष्यात पुन्हा एकदा शहाण्या, सरळ, पापभीरू माणसासारखं वागायचं, असंही त्यानं पक्कं ठरवलं. काही दिवस आनंदात गेले. मनही खूश होतं. ते स्वत:हून कधी गणूशी बोलत नसे; पण गणूला त्याच्या मूडचा अंदाज येत असे. ‘सीसीटीव्ही’च्या परिणामामुळं आपल्यात हा बदल झालाय, हे गणोबाला कळत होतं. त्यामुळंच त्याच्या मनाचंही बरं चाललं होतं. अधूनमधून फिरकी घेणारं त्याचं मनही अगदी शहाण्या मनासारखं वागू लागलं होतं. विमान एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकतात आणि मग वैमानिक अगदी झोपूही शकतो, तसं गणूनं स्वत:ला व स्वत:च्या मनाला ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकून दिलं. पण गंमत अशी, की एखाद्या हायवेवरून कार चालवताना अगदी सरळसोट रस्ता असेल, तर ड्रायव्हरला झोप लागू शकते. कंटाळा येऊ शकतो. त्यामुळं रस्ता कसा ‘वळणदार’ हवा! गणूला ‘ऑटो-पायलट’ मोडवाला सरळसोट रस्ता कालांतरानं बोअर व्हायला लागला होता. आपल्या मनाला हे असलं मिळमिळीत जगणं कंटाळवाणं वाटत नाही का, असा प्रश्न गणूला पडला. फार दिवस मनाशी गप्पा झाल्या नव्हत्या. मग एके दिवशी गणोबांनी बाइक काढली आणि शहराच्या बाहेर हायवेलगत असलेल्या त्या तळ्यापाशी येऊन ते बसले. इथं थोडीफार बाग केली होती; बाक टाकले होते. इथं पर्यटकांची लगबग असतेच. पण तुलनेनं हा भाग जरा शांत होता. त्यात दुपारची वेळ होती. गणूनं आपला नेहमीचा कोपऱ्यातला बाक पकडला आणि तो ‘चिंतन मोड’मध्ये गेला. अशा वेळी त्याला आधी हेडफोनवर किशोरी किंवा कुमार गंधर्व ऐकायची सवय होती. किशोरीताईंचा एखादा राग किंवा कुमारांचं एखादं निर्गुणी भजन ऐकलं, की त्याला शांत शांत वाटत असे. तसं आत्ताही त्यानं मोबाइलमधून कुमारांचं ‘शून्य गढ शहर’ लावलं आणि तो डोळे मिटून ते ऐकायला लागला. कुमारांच्या त्या आवाजातून योग्य तो परिणाम साधला जाऊ लागला. त्याला एकदम शांत शांत वाटू लागलं. आपलं शरीर एकदम हलकं झालं असून, आपण ढगांवरून तरंगत चाललो आहोत, असाही भास त्याला झाला. अशी ‘झीरो ग्रॅव्हिटी’ची अवस्था कायम लाभायला हवी, असं त्याला वाटू लागलं...
मनाशी गप्पा मारायला हीच योग्य वेळ होती. गणूनं डोळे न उघडता, ढगांवरून उडत असल्याचा फील कायम ठेवून मनाला विचारलं, ‘काय मनोबा, बरंय का?’
गणूचं मन गाणं ऐकण्यात गुंगलं होतं. ते जरा दचकलं. म्हणालं, ‘श्शू... शांत बस... ऐकू दे हे...’ 
मग गणू एकदम शांत बसला. पण गाणं संपल्यावर त्याला राहवेना.
‘ऐक ना, ए मन्या,’ गणू मनाला हाक मारत म्हणाला.
‘हं, बोल आता... तुला आली म्हणायची माझी आठवण...’ गणूचं मन उत्तरलं.
‘घ्या... तुमचं हे असं आहे. बोललो तरी तुला प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम... माझ्यासारख्या गरीब माणसानं करावं तरी काय?’ गणू चिडचिडला.
‘हा हा हा... गणोबा, गंमत केली. एवढं कळतं ना...’ मन खदखदा हसत म्हणालं. गणू आणखी चिडचिडा झाला.
आता संध्याकाळचं ऊन थेट तोंडावर यायला लागलं. त्यामुळं त्याच्या त्रासात भरच पडली. तो एक हात डोळ्यांवर ठेवून म्हणाला, ‘कळते हो, सगळी गंमत कळते. गेली काही वर्षं तुम्ही आमची जी गंमत चालविली आहे ना, ती केवळ थोर आहे हो!’
यावर गणूचं मन म्हणालं, ‘मी कुणाचीही गंमत करायला जात नाही. पण माझ्यापासून लपवून गोष्टी करणाऱ्यांची गंमत मात्र मी बघत बसतो हे नक्की.’
गणू म्हणाला, ‘माहिती आहे. गेले काही दिवस आपण त्यावरच बोलतोय आणि आता माझ्या मते, तो प्रश्न मिटला आहे. आता आपली गाडी फारच सरळ निघाली आहे. मी इकडं-तिकडं कुठंही पाहत नाहीये... मी आणि तू... आपण दोघे एकमेकांना बरे... एवढाच विचार मी केलाय. पण खरं सांग मनोबा, कंटाळा आला की नाही?’
‘सरळसोट जगणं कंटाळवाणं वाटतं, हाच तुमच्या जगण्याचा पेच आहे,’ गणूचं मन गंभीर होत म्हणालं. ‘तुम्हाला सदैव थ्रिल पाहिजे. साध्या गोष्टींना तुम्ही भुलत नाही, तुमचं पोट भरत नाही. तुम्हाला सदैव काही तरी वेगळं पाहिजे. सतत नवं पाहिजे. तुमच्या या घाटदार जगण्याच्या अपेक्षांनी मी केवळ स्तिमित झालो आहे...’ मन चिंतनशील होऊन बोलत राहिलं...
गणू ऐकत राहिला. सरळ जगणं हा पेच वाटतोय का आपल्याला? काय घडलं म्हणजे आपल्याला ‘मज्जा’ येईल? 
गणूला ठरवता येईना. अशा वेळी मनाला शरण जाणं हाच एक उपाय असतो. गणूनं तेच केलं.
‘मग काय करायचं म्हणता महाराजा? हा सरळ जगण्याचा आडवळणी पेच सुटायचा कसा?’
मन म्हणालं, ’सोपं आहे. साधं-सरळ जगून पाहणं हेच एक थ्रिल आहे, असं समजायचं...’
गणू काय ते समजला. त्यानं शांतपणे डोळे मिटले. ‘सहेला रे...’ सुरू झालं... तो आणि त्याचं मन किशोरीच्या स्वरात डुंबून गेलं... समोर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आसमंत शांत शांत होत होता....

(क्रमश:)

----

५. पर्जन्यसूक्त
-------------------

गणूला पाऊस आवडतो. धुवाँधार कोसळणारा पाऊस सुरू झाला, की हातातली सगळी कामं बाजूला ठेवून त्या अविरत कोसळणाऱ्या जलधारांकडं पाहत बसायला त्याला आवडतं. उन्हाळा हा त्याचा अत्यंत नावडता ऋतू होता. तेव्हा कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पाऊस येतो असं त्याला होऊन जातं. माणसं शब्दाला जागत नाहीत, वचनं विसरतात, शपथा मोडतात; पण निसर्ग असं कधीही करत नाही. तो त्याच्या ठरलेल्या वेळेला येतोच. कधी तरी प्रतीक्षा करायला लावतो हेही खरं. पण अजिबातच यायचं नाही, असं तो कधीही करत नाही. त्यामुळं मे महिना संपला आणि जून उजाडला, की गणूला पर्जन्यऋतूचे वेध लागतात. अशा धुवाँधार पावसात बाइक काढायची आणि डोंगर-दऱ्यांत हिंडायला जायचं ही गणूची आवडती सवय. हल्ली पावसाळ्यात त्याच्या शहराजवळचं एकही ठिकाण निर्मनुष्य उरत नाही. निसर्गाला कडकडून भेटायला सगळेच आतुर! पण मग शांतता नसेल, तर संवाद व्हायचा कसा? मग गणूनं शोधून शोधून काही ठिकाणं वेचून काढली होती. ती अजून तरी फार कुणाला माहिती नव्हती. आषाढातल्या संततधारेची छान अशी झड लागली, की गणू बाहेर पडायचाच. सचैल भिजत तो गाडीवरून दूर दूर जात राहायचा. मग त्याचं आवडतं ठिकाण आलं, की गाडी उभी करून, तिथल्या एका आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर तो बसायचा. समोर भाताची शेतं आणि त्यापलीकडं डोंगर... त्यावरून येणारे शुभ्रफेसाळ धबधबे. गणूला समाधी अवस्था प्राप्त व्हायची अशा वेळी! 
....आणि, ‘हीच ती वेळ गणूशी बोलायची,’ असं म्हणून गणूचं मन त्याच्याशी संवाद साधू लागायचं. त्या दिवशीही असंच झालं...
‘काय गणोबा, बरं वाटतंय का?’ मनानं विचारलं.
‘हं...’ गणू उत्तरला. 
‘लागली का समाधी?’
‘हं...’ गणू अशा वेळी एकाक्षरी उत्तरं द्यायचा.
‘का आवडतं रे तुला इथं यायला?’ मन प्रश्न विचारायचं सोडत नव्हतं.
‘हे बघ, मला जरा शांत बसू दे आणि तूही शांत हो बरं...’ गणू वैतागून मनावर ओरडला.
‘हो रे बाबा, बसतो बापडा शांत... पण कधी तरी मला हे सांग. मला तुझ्याकडून ऐकायचंच आहे...’ मनानं आपला हट्ट चालू ठेवला.
‘बरं ऐक...’ गणू शेवटी कंटाळून म्हणाला, ‘मला ना निसर्ग आवडतो. याचं कारण म्हणजे तो आपल्याला देण्यात कधीच कुचराई करत नाही. तो कधीही आपल्याला फसवत नाही. आपल्याला काही मागत नाही. सदैव दात्याच्या भूमिकेत असतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निसर्ग म्हणजे या पृथ्वीतलावरची प्युअरेस्ट, सर्वांत शुद्ध गोष्ट आहे. आता हे पावसाचं पाणीच बघ. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे, की जमिनीवर पडण्यापूर्वीचं पावसाचं पाणी हे पाण्याचं सर्वांत शुद्ध रूप असतं. माहितीय का? तर मला हे निसर्गाचं प्युअर असणं, शुद्ध असणं फार आवडतं.’
‘व्वा...’ मन कौतुकानं म्हणालं, ‘म्हणजे जे आपल्याला होता येत नाही, ते आपल्याला आवडतं तसंच ना रे हे!’
गणू एक मिनिट विचारात पडला. त्यानं मनाला विचारलं, ‘म्हणजे काय म्हणायचंय तुला?’
‘अरे, साधी गोष्ट आहे. निसर्ग शुद्ध आहे आणि आपण तितके शुद्ध, तितके प्युअर कधीच नसतो. हां, फार तर जन्मल्या जन्मल्या पहिली तीन-चार वर्षं आपण तसे असू. पण नंतर आपण नाना विकारांनी ग्रस्त होतो. आपल्यातली शुद्धता लोप पावते आणि आपण हळूहळू सर्व बाबतींत करप्ट व्हायला लागतो.’
‘हं... खरंय तुझं. म्हणूनच या शुद्धतेची ओढ लागत असावी,’ गणू म्हणाला.  
गणूचं मन म्हणालं, ‘पण आपण लबाड असतो रे. आपल्याला ही शुद्धता आपल्या अंगी बाणवायला नकोच असते. फक्त मनातला अपराधभाव फार वाढला, की असे पावसाचे चार थेंब अंगावर घेतल्यासारखी ती आपल्याला थोडा वेळ हवी असते. मग आपण आपलं समाधान झालं, की अंग खसखसा पुसून कोरडं करतो, तशीही ही शुद्धताही पुन्हा झटकून टाकतो आणि आपल्या मूळच्या मलीन जगण्याकडं वळतो.’
‘पण याला कुणीच अपवाद नाहीय. मीही इतरांसारखाच माणूस आहे. मग माझंही तसंच झालं तर त्यात वेगळं काय घडलं?’ गणू मनाला विचारता झाला.
‘वेगळं काहीच घडत नाही, हेच तर दुखणं आहे ना माझं,’ मन वैतागून म्हणालं. 
‘काय म्हणायचंय काय तुला?’ गणूनं शंकेनं विचारलं.
‘अरे, सगळे जण असाच विचार करतात ना, त्याची गंमत वाटली. मी सर्वसामान्य आहे, इतरांसारखाच आहे असाच विचार सगळ्यांनी केला, तर त्यातून वेगळा विचार करणारा कुणी निपजणारच नाही,’ मन आपला मुद्दा स्पष्ट करीत म्हणालं.
‘अरे, एवढा सुंदर निसर्ग आहे... सुंदर धबधबा कोसळतोय समोर आणि तू हे काय तत्त्वज्ञानाचं व्याख्यान लावलं आहेस?’ गणू त्रस्त होऊन विचारता झाला.
त्यावर मन शांतपणे म्हणालं, ‘नाही, नाही... तू आनंद लूट... तुला ही संधी फार कमी वेळा मिळते, हे मी अनेकदा पाहिलंय. माझं मात्र तसं नाही. तुझ्या भल्यासाठी मला सतत काही तरी विचार करणं भागच आहे.’
गणू थोडासा विचारात पडला अन् म्हणाला, ‘एवढा माझा विचार करतोस? मी मात्र तुझा विचार करत नाही....’
‘असं नाहीय. तू इथं आलास हेही खूप आहे माझ्यासाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू स्वत:साठी म्हणून जो खास वेळ काढतोस ना, तो माझ्यासाठीही असतोच. तेव्हा मी सदैव तुझ्याच सोबत असतो,’ मन हसत बोललं...
‘हं...’ गणू शांतावत उत्तरला.
‘आता एकच गोष्ट कर,’ मन म्हणालं.
‘काय करू सांग,’ गणू म्हणाला.
‘या पावसानं ही जमीन कशी स्वच्छ धुतली गेलीय ना, तसा तूही आतून-बाहेरून शुद्ध हो, निर्मळ हो... बघ जमतंय का?’ मनानं गणूला सुचवलं.
गणू समजून शांतपणे हसला. समाधानानं हसला.
आता समोर पाऊस आणखीन आवेगानं कोसळत होता. धबधबा बेफामपणे खाली झेपावत होता... 
...आणि गणू व त्याचं मन एकाच वेळी समाधी अवस्थेत पोचले होते!

(क्रमश:)

---

६. स्वातंत्र्य *
----------------


ऑगस्ट महिना उजाडला, की गणूला स्वातंत्र्यदिनाचे, तर त्याच्या मनाला श्रावणाचे वेध लागतात. स्वातंत्र्यदिनाचं आणि अर्थातच स्वातंत्र्याचं महत्त्व गणू जाणतो. त्याच्या जन्माच्या वेळी देश स्वतंत्रच होता. त्यामुळं पारतंत्र्य म्हणजे काय, हे त्याला खरं तर माहिती नाही. पण आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तरी तालावर आपल्याला नाचावं लागेल ही कल्पनाच गणूला सहन होत नव्हती. यथावकाश गणूचं लग्न झालं आणि... मग सगळंच बदललं! गणूला स्वातंत्र्य, पारतंत्र्य आदी सगळ्या संकल्पनांचे अर्थ नीटच समजू लागले. गणूला विवाहोत्तर आयुष्यात जे काही कथित स्वातंत्र्य मिळालं होतं, ते म्हणजे एखाद्या वाघाला प्राणिसंग्रहालयातील मोठ्या पिंजऱ्यात फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, हे त्याला खूप उशिरा कळलं. गणूचं मन त्याला याबाबतीत नेहमी हसत असे. गणूला त्याच्या विवाहपूर्व काळाची आठवण करून देत चिडवणं हा गणूच्या मनाचा आवडता छंद होता. 
नागपंचमीच्या दिवशी अर्धांगानं केलेली पुरणाची दिंडं रेटून गणू एखाद्या अजगरासारखा दुपारी लोळत होता. बाहेर पावसाची संथ, बारीक धार आणि पुरण खाऊन डोळ्यांवर आलेली सुस्ती अशा वातावरणात गणूचं मन नेहमीच त्याला बेसावध गाठत असे. 
आताही तेच झालं. मन म्हणालं, ‘झालं का मनसोक्त गोडधोडाचं जेवण? माझाही जरा विचार करा...’
गणू म्हणाला, ‘पूर्वी मी तुझाच विचार करून खायचो. तुला जे आवडेल ते आणि तेवढं. मला आता मला दुसरं कुणी तरी सांगतं, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. गोड कमी खा, वजन कमी करा इत्यादी इत्यादी...’
मन म्हणालं, ‘अरेरे, हे तर पारतंत्र्य झालं. आणि गणोबा, तुमचं पारतंत्र्य म्हणजे आमचं मरणच की!’
गणू उत्तरला, ‘आधी मी मनसोक्त जगलो. त्यामुळं आता निर्बंध सोसावे लागताहेत... आधी तुझा विचार केला, आता मला माझ्या शरीराचा विचार करू दे.’
मन खट्टू होत म्हणालं, ‘तेव्हाही मी तुला म्हटलं नव्हतं, की शरीराला अपाय होईल, असं वाग म्हणून... आता उगाच माझं नाव का घेतोस?‘
गणू म्हणाला, ‘असंच असतं. स्वातंत्र्याची किंमत म्हण हवं तर... वाल्या कोळ्याच्या पापात सहभागी व्हायला त्याचं कुटुंबही तयार झालं नाही. इथंही तसंच आहे. तुला खूश ठेवून मला तोटा होणार असेल, तर तुला खूश ठेवणं अवघड आहे.’
मन विचारात पडलं आणि बोललं, ‘पण मला खूश ठेवून तुला तुझ्या शरीरालाही खूश ठेवता येईलच की.’
गणू म्हणाला, ‘ते कसं काय?’
मन उत्तरलं, ‘तू स्पायडरमॅन सिनेमा पाहिलायेस का? त्यात एक वाक्य आहे बघ. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी!’
गणू वैतागला, ‘हो माहितीय की! त्याचं काय इथं?’
गणूचं मन हसत म्हणालं, ‘अरे? संबंध नाही कसा? स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारची सत्ताच असते की नाही, तुमच्या हाती आलेली? मग स्वातंत्र्य मिळालं, की ते नीट उपभोगण्याची जबाबदारीही येतेच ना... त्यामुळं तुला शरीरासोबत मनालाही खूश ठेवावंच लागणार... आम्ही दोघंही तुझाच भाग आहोत ना!’
गणू हताश होत म्हणाला, ‘हे कुणाला जमेल असं वाटत नाही. शरीराला खूश केलं, की मन नाराज आणि मनाला खूश केलं, की शरीर कुरकुर करणार... अवघड आहे.’
मन म्हणालं, ‘अवघड आहेच. जगात काहीच सोपं नाही. स्वातंत्र्य मिळवणं सोपं नाही आणि मिळवलेलं टिकवणं तर त्याहून नाही.’
गणू म्हणाला, ‘मग यावर उपाय काय? तूच सांग बाबा. पुनश्च शरण येतो.’
मन हसून म्हणालं, ‘मी म्हणजे तूच आहेस. मला शरण येऊ नकोस. स्वत: विचार कर. तुला मिळालेलं स्वातंत्र्य नीट वापरतो आहेस ना? स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो आहेस ना?’
गणू म्हणाला, ‘खरंय तुझं. आम्हाला स्वातंत्र्य हवं असतं आणि ते कसं वापरायचं याचंही परत स्वातंत्र्य हवं असतं. स्वातंत्र्याच्याही ‘अटी व शर्ती’ असतात हे आम्हाला माहितीच नाही.’
मन सांगू लागलं, ‘अटी व शर्ती असतात, हे बरोबर. पण त्या तुझ्याच चांगल्यासाठी असतात, हे लक्षात ठेव.’
गणू म्हणाला, ‘शब्दांचे फुलोरे खूप छान फुलवता येतात तुला. प्रत्यक्ष जगणं तुझ्या आदर्शवादी शब्दांपेक्षा खूप अवघड आहे, एवढंच लक्षात ठेव. तिथं मला लढावं लागतं.’
मन म्हणालं, ‘तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे, हे कायम लक्षात असू दे. फक्त माझ्यापासून लपवून काही करू नकोस. तुझं स्वातंत्र्य हे माझंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुझ्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मलाच आहे.’
गणू म्हणाला, ‘हं, आलं लक्षात. स्वातंत्र्य मला मिळालं असलं, तरी मी त्याचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. माझ्या स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याचं स्वातंत्र्य, उदा. तुझंच - धोक्यात येत नाहीये हेही मी पाहायला पाहिजे.’
मन म्हणालं, ‘बरोब्बर. गणू, तुझं कसं आहे, माहितीय का! तुला सगळं कळतं... पण वळत नाही काहीच.’
गणू हसत म्हणाला, ‘मग तू कशाला आहेस?’
मन म्हणालं, ‘मी आहेच कायम. आत्ताही सांगितलंच की तुला. तुला स्वातंत्र्यदिन आवडतो ना, तसा मला श्रावण आवडतो. हा श्रावण म्हणजे निसर्गाचा फार सुंदर आविष्कार आहे. मस्त पाऊस पडत असतो, सगळी सृष्टी हिरवीगार झालेली असते, आपल्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित झालेल्या असतात. सगळीकडं सर्जनाचं मोहक वातावरण असतं. मला असं आवडतं. हे सगळं खूप नैसर्गिक आणि म्हणूनच खूप खरं आहे. इथं माणसाच्या जगातल्या फसवणुकीला, दांभिकतेला, छक्क्या-पंजांना जागा नाही.’
गणू वैषम्यानं म्हणाला, ‘माणसाचं आयुष्यही एवढं निर्मळ असतं, तर अजून काय हवं होतं?’
मन हसत म्हणालं, ‘पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्याला थेट त्या निर्झराच्या पाण्यासारखं व्हायचंय, नितळ अन् पारदर्शक!’
गणू म्हणाला, ‘माझं स्वातंत्र्य आणि तुझा नैसर्गिक सच्चेपणा एकत्र आला तर काय बहार येईल!’
मन म्हणालं, ‘अगदी... कसं बोललास! चल, आता स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थानं साजरा करू. बोला, भारतमाता की जय...’

(क्रमश:)

---

(सहावा भाग काही कारणाने अंकात प्रसिद्ध झालेला नाही. तो इथेच वाचायला मिळेल.)

---