26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
------------------------------------------------

भाग १
--------

नव्वदचं दशक उजाडलं, म्हणजेच १९९० हे वर्ष उजाडलं तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. नववीत होतो. नगरसारख्या महाराष्ट्रातल्या एका मध्यम मध्यम शहरात राहत होतो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत मोठं स्थलांतर घडून दोन वर्षं झाली होती. मी माझं जन्मगाव सोडलं होतं आणि कुटुंबासह जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन राहिलो होतो. एका अर्थानं मी छोट्या विहिरीतून तलावात आलो होतो. पुढच्याच वर्षी मी आणखी मोठ्या सरोवरात विहरायला जाणार होतो. माझं वय १४ होतं, म्हणजे मी सर्वार्थानं अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू होतो. 'अंगणात गमले मजला संपले बालपण माझे' असं ग्रेस म्हणतात, तसं नगर हे माझं अंगण होतं. जन्मगावातल्या गर्भाशयासारख्या सुरक्षित उबेतून मी एकदम बाहेर आलो होतो. मला बाहेरचं जग सोसेल की नाही, ऊन-वारा सहन होईल की नाही याचा कुठलाही विचार न करता मला एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असल्यासारखं बाहेर भिरकावून देण्यात आलं होतं. माझं गाव, माझं घर, माझी खोली, तिथली माझी झोपायची जागा, तिथलं अंथरूण-पांघरूण, आजीच्या कुशीतली ऊब हे सगळं सगळं ८० किलोमीटरवर सोडून मी एका अनोळखी, शहरी वासाच्या गावात आलो होतो. नगरला शहर म्हणणं कठीण होतं; पण आमचं गाव तेव्हा इतकं छोटं होतं, की मला नगर हे खूप मोठ्ठं शहर वाटत होतं. तिथं शहराचा वास येत होता. आमच्या गावी घराजवळ येणाऱ्या उकिरड्याचा, तिथं लोळणाऱ्या डुकरांचा वास इथं नव्हता. इथं सकाळी सहा वाजता पेपर येत होता. गवळी येऊन दूध घालून जात होता. इथं कॉन्व्हेंट शाळा होत्या आणि मुलं टाय लावून शाळेत जात होती. इथं रिक्षा होत्या, सिटीबस होत्या आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथं बेकऱ्या होत्या. इथं पाव मिळत होता. माझ्या गावी तोवर ताजा पाव मिळत नसे. त्यामुळं माझ्या लहानपणच्या आठवणीत शहरी मुलांसारख्या पाव-बिस्किटं या गोष्टीच नव्हत्या. त्या इथं आल्या. पहाटे क्लासला जाताना कुठल्या ना कुठल्या बेकरीतून ताजे खमंग पाव भाजल्याचा वास यायचा आणि आपण शहरात राहतो, या जाणिवेनं माझं मन हरखून जायचं. इथं एकच का होईना, पण बाग होती. आमच्या गावात बाग सोडाच, पण ओळीनं लावलेली तीन फुलझाडं मी कधी पाहिली नाहीत. जी काही होती, ती आमच्या अंगणातच होती. आमच्या आजोबांनी मोठ्या हौसेनं रातराणी, काटेकोरांटी आणि दोन कण्हेरीची झाडं लावली होती. मात्र, त्या झाडांचा डुकरांपासून बचाव करणं हे आमच्यापुढचं सगळ्यांत मोठं आव्हान असायचं. 
नगरमधली सर्वांत भारी शाळा माझ्या नशिबात नव्हती. मला मिळाली ती गरिबांची शाळा. शाळा गरीब मुलांची असली, तरी शिक्षक मनानं व ज्ञानानं अतिशय श्रीमंत होते. एका मंदिराच्या आजूबाजूला, जागा मिळेल तसे आमचे चिमुकले वर्ग बांधलेले होते. याउलट आमची गावची शाळा जास्त नीटनेटकी व भक्कम बांधलेली होती. पण मला या गरिबांच्या शाळेनं जे दिलं, ते एखाद्या भारी बिल्डिंगमधल्या शाळेनंही कधी दिलं नसतं. या शाळेनं मला माणसाकडं माणूस म्हणून पाहायला शिकवलं. सगळ्यांबरोबर समानतेनं वागायला, सहानुभूतीनं-प्रेमानं वागायला शिकवलं. आमच्या वर्गात अनेक मुलं डबा आणत नसत. मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होतो. पोळी, बटाटा किंवा कोबीची भाजी आणि लोणचं असा डबा मी नेत असे. आमच्या मंदिरात बसून मी एका मित्रासोबत तो खात असे. अनेक मुलं तेव्हा डबा न खाता नुसतीच खेळत असत. ती डबा का आणत नसतील, हा विचार तेव्हा कधीच मनाला शिवला नाही. आता विचार करून काळीज तुटतं. पण तेव्हा ती हसतमुख मुलं पाहून मला काहीही उमगलं नाही, हे खरं!
फार लहानपणीच, म्हणजे आठवीत असतानाच घरच्या जबाबदाऱ्या घ्यायची सवय त्या काळानं मला लावली. वडील नोकरीला जायचे आणि उशिरा घरी यायचे. कधी फिरतीवर जायचे. तेव्हा घरचा किराणा भरण्यापासून ते सिलिंडर आणण्यापर्यंतची सगळी कामं आठवीतला तो पोरगा करीत असे. सायकलच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या पिशव्या लावून, डुगडुगत हळूवारपणे दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या घरी तो सायकल पायी चालवत नेत असे. सिलिंडर आणणे हा एक दिव्य प्रकार असे. त्या लांबलचक रांगेत उभं राहून पावती घ्यायची, मग दुसरीकडं गोडाउन असलेल्या ठिकाणी जुनं सिलिंडर न्यायचं व नवं आणायचं हा एक सोहळा असे. सायकलच्या मधे तिरकं ठेवून ते सिलिंडर आणणं ही एक सर्कस होती. पण आठवीतल्या पोराला त्याचं काही वाटत नसे. त्याच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा. कधी ते सिलिंडर दाणकन पडे. तेव्हा त्या गावात काही भली माणसं राहत. त्यातलं कुणी तरी पुढं होऊन ते सिलिंडर पुन्हा पक्कं बसवून देई. शाळेची सहल निघाली, तेव्हा फुलपँट घ्यायचा आग्रह केला एकदा या मुलानं. गावातल्या बड्या दुकानात जाऊन नव्वद रुपयांची फुलपँट आणली मग त्यानं; कारण आईकडं फक्त शंभर रुपयेच होते. 
याचा अर्थ तेव्हाचं जगणं अगदी वाईट, रडूबाई होतं का? तर मुळीच नाही. आज मागं वळून बघताना या गोष्टी जाणवतात, पण तेव्हा त्या मुळीच जाणवत नव्हत्या किंवा त्याचा त्रासही होत नव्हता. पंधराव्या वर्षी वयात येऊ घातलेल्या मुलाचं सगळं जगणं मोरपंखीच असतं. प्रत्येक क्षण स्वप्नाळू असायचा. वास्तवाच्या कडक उन्हावर स्वप्नांच्या ढगांची सावली धरली जायची. आणि हा मुलगा तसा हुशार होता. गावाकडची हुशारी म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी' असं नव्हतं, हे त्यानं मोठ्या शहरात येऊन सिद्ध केलं. स्काउटमध्ये भाग घेतला, की त्यालाच प्लाटून कमांडर केलं जायचं. त्या वर्षी त्यानं कलेक्टरसमोर ऐटीत संचलन केलं होतं. चित्रकला परीक्षेला बसला आणि तेव्हा दुर्मीळ अशी 'ए' ग्रेड मिळवून दाखविली. विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला आणि त्याला त्याच्या आयुष्यातली पहिली परी गवसली. ती दुसऱ्या शाळेतून याच्या शाळेत आली होती. ती आजही त्याच्या डोळ्यांसमोर लख्ख उभी आहे. अगदी 'शाळा' कादंबरीच सुरू झाली म्हणा ना नंतर! घरापर्यंत चकरा झाल्या, पण तेवढंच. बोलायची हिंमत नव्हतीच. आणि लगेच दहावी आली...
तापात दोन-तीन दिवस काही सुचू नये आणि एकदम घाम येऊन ताप उतरावा तशी दहावी आयुष्यात आली आणि गेली. त्या काळात कानशिलं तापायची, पण परीक्षेच्या टेन्शननं! स्वप्नाळू अवस्था कुलूपबंद करून कपाटात टाकून दिली. सकाळी लवकर उठायचो आणि क्लासला जायचो. अर्थात एवढं होतं, तरी सतत अभ्यास, अभ्यास केलं नाही, हेही खरं. आजूबाजूला काय काय घडत होतं! मंडल प्रकरणावरून देश तापला होता. व्ही. पी. सिंहांचं सरकार कोसळलं होतं आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. आदल्याच वर्षी पं. नेहरूंची जन्मशताब्दी साजरी झाली होती आणि देशभर 'अपना उत्सव'मध्ये आम्ही नाचत होतो. टीव्हीवर बी. आर. चोप्रांचं 'महाभारत' सुरू होतं आणि बाहेर लालकृष्ण अडवाणींचं 'रामायण'! अडवाणींच्या अजेय वाटणाऱ्या रथयात्रेचा अश्वमेध बिहारमध्ये लालूप्रसादांनी अडविला होता आणि त्यांना अटकही केली होती. आमची दहावीची सहामाही संपली आणि लवकरच ऐतिहासिक असं १९९१ हे वर्ष उजाडलं. या वर्षाचं आपल्या देशाच्या आणि वैयक्तिक माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या आयुष्यात विसाव्या शतकातलं १९४७ व १९७७ नंतरचं तिसरं आणि महत्त्वाचं स्थलांतर घडणार होतं आणि माझ्याही आयुष्यातलं दुसरं आणि कदाचित कायमचं असं महत्त्वपूर्ण स्थलांतर घडणार होतं...

(क्रमश:)

---

31 May 2020

संवादसेतू दिवाळी अंक २०१९ लेख

सिनेमा : ‘तेव्हा’चा आणि ‘आता’चा...
-----------------------------------


कुठलीही कलाकृती ही त्या त्या काळाचं अपत्य असते, असं म्हणतात. म्हणजेच एखादी कलाकृती जन्म घेत असताना तिच्या सभोवतीच्या पर्यावरणाचा परिणाम तिच्यावर या ना त्या प्रकारे होतच असतो. हा काळाचा संदर्भ घट्ट असतो. रुढी, रिवाज, परंपरा, चालीरीती, समजुती, संस्कार, पालनपोषण या सगळ्यांचा आपल्यावर आधी एक समाज म्हणून आणि नंतर एक व्यक्ती म्हणून प्रभाव पडलेला असतो. आपल्या समजुतीतून साकारलेली कलाकृतीही त्यामुळं या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही. मात्र, काही वेळा काही कलाकृती ‘अजरामर’ आहेत, ‘कालातीत’ आहेत, असंही आपण म्हणतो. याचाच अर्थ, त्या कलाकृतीवर असलेला तात्कालिकतेचा शिक्का दूर करण्यात ती कलाकृती यशस्वी ठरलेली असते. हा तात्कालिकतेचा शिक्का किंवा पगडा दूर करण्यासाठी त्या कलाकृतीत काही तरी कालातीत, शाश्वत विचार असावा लागतो. साधारणत: वर्षानुवर्षे चालत आलेला ‘सत्’ आणि ‘असत्’ यांच्यातील झगडा किंवा मूलभूत मानवी प्रेरणांचा संघर्ष आणि मानवी मूल्यांची जपणूक अशा गोष्टी प्रभावीपणे मांडल्या गेल्या असतील, तर त्या काही प्रमाणात कालातीत ठरू शकतात. मात्र, काळाच्याही पुढचा, क्रांतिकारी विचार देणारी कलाकृती खऱ्या अर्थाने काळावर मात करणारी कलाकृती म्हणावी लागेल. यासाठी त्या कलाकृतीचा निर्माता द्रष्टा असावा लागतो. काळाची पावले ओळखणारा असावा लागतो. याखेरीज काही जणांमध्ये असामान्य गुण असतात. अशा व्यक्ती अनेक शतकांत क्वचित कधी तरी जन्माला येतात. अशा माणसांनी केलेलं कार्य किंवा त्यांनी निर्माण केलेली कोणतीही कलाकृती असामान्यच ठरते. 
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या शतकाहून अधिक काळ भारतीय जनमानसावर मोहिनी घालणाऱ्या चित्रपट नामक कलाप्रकाराकडे बघायला पाहिजे. आधी दृश्य आणि नंतर दृश्य व श्रुती या दोन्ही माध्यमांतून या यंत्राधिष्ठित कलेनं भारतीय प्रेक्षकांवर गारूड केलं. भारतीय प्रेक्षकांनी फार थोड्या काळात या कलेवर मन:पूत प्रेम केलं; ही कला आत्मसात केली आणि तिच्याद्वारे आपली अभिव्यक्तीही शोधली. भारतीय सिनेमाची प्रगती आणि देशाची त्या त्या वेळची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती यांचा मेळ लावता येतो. या प्रवासात काही अजरामर चित्रपट निर्माण झाले. सर्व सूर जुळून आलेल्या सुरेल गाण्याप्रमाणे लोक हे चित्रपट सतत गुणगुणत राहिले. त्यांचे गुण गात राहिले, त्यांच्याविषयी बोलत राहिले. पिढ्या बदलल्या, तरी यात खंड पडला नाही. मात्र, काही चित्रपटांबाबत काळानुरूप आस्वादन बदलू शकते. विशेषत: एका पिढीला आवडलेला चित्रपट पुढच्या पिढीला आवडेलच असं काही नाही. अशा काही चित्रपटांवर नव्या पिढीला लिहितं करण्याचा अभिनव प्रयोग या अंकाच्या संपादकांनी केला आहे. चित्रपट समीक्षेच्या अंगाने तर या प्रयोगाचं महत्त्व आहेच; शिवाय यात काळानुरूप बदललेल्या किंवा न बदललेल्या दृष्टिकोनाचाही अभ्यास करता येतो. त्या दृष्टीने या अंकात सुजाता, प्यासा, दस्तक, छोटी सी बात, अमर अकबर अँथनी, घरोंदा, अर्थ, इजाजत व वजूद या नऊ सिनेमांवर दहा लेख (‘प्यासा’वर दोन लेख) जुई कुलकर्णी, मृदुला बे‌ळ‌े, अदिती जोगळेकर-हर्डीकर, सानिया भालेराव, अतुल कुलकर्णी, विद्या पोळ-जगताप, विभव देशपांडे, नचिकेत खासनीस, पवन जोशी, आदित्य महाजन या नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी लिहिले आहेत. या चित्रपटांची निवडही या लेखकांनीच केली आहे. हे चित्रपट त्यांना कसे वाटतात याबद्दल त्यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. ‘प्यासा’ चित्रपटावर विद्या पोळ-जगताप व अदिती जोगळेकर-हर्डीकर यांनी लिहिलं आहे. अदिती जोगळेकर यांनी ‘प्यासा’च्या दृश्यात्मकतेवर भर देणारा लेख लिहिलाय, तर विद्या पोळ-जगताप यांनी या चित्रपटाच्या आशयाबाबत लिहिलं आहे. ‘सुजाता’ हा चित्रपट जुई कुलकर्णी यांना नायिकेचा ‘को ‌‌ऽ हं ऽ’ प्रश्न वाटतो. नुकत्याच आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातही हेच वास्तव दिसतं, असं निरीक्षण त्या नोंदवतात. ‘वजूद’ हा नाना पाटेकरच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका असलेला चित्रपट १९९८ मध्ये आला होता. आज वीस वर्षांनी त्यातली काव्यात्मकता आजच्या पिढीच्या विभव देशपांडेला भावते. ‘घरोंदा’ हा गुलजार यांचा चित्रपट पाहताना आदित्य महाजनला तो केवळ त्या काळाचा चित्रपट वाटत नाही. अलीकडच्या ‘वेक अप सिद’ किंवा ‘डबल सीट’ या मराठी चित्रपटातही त्याला ‘घरोंदा’चे अंश आढळतात. ‘घरोंदा’तली गाणीही नव्या पिढीच्या आदित्यला आकर्षित करतात. तेव्हाच्या आयुष्यात असलेला साधेपणा, संथपणा यांच्याकडे काहीशा अलिप्तपणे पाहताना आदित्यला त्या काळातला हलकाफुलका रोमान्स विशेष भावतो. 
बासू चटर्जींच्या ‘छोटी सी बात’ या हलक्याफुलक्या सिनेमाकडे आजच्या पिढीचा पवन जोशी कौतुकानं पाहतो. तेव्हाच्या शांत, निवांत मुंबईतल्या निरागस प्रेमाचा कॅलिडोस्कोप या चित्रपटातून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो, तेव्हा आपल्याला त्यातली जी सौंदर्यस्थळं जाणवतात, तीच पवन जोशीलाही भावतात. महेश भट यांचा १९८२ मध्ये आलेला ‘अर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीच्या सानिया भालेरावला ‘पाथब्रेकिंग’ चित्रपट वाटतो. मित्र, प्रियकर यांच्यापैकी एक हवा, किंवा दोघंही नकोत हे ठरविण्याचा अधिकार यात बाईला होता, ही गोष्ट सानियाला महत्त्वाची वाटते. तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, या चित्रपटातील नायिकेचं असं चित्रण ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती, असं तिला वाटतं. राजेंद्रसिंग बेदींच्या ‘दस्तक’विषयी, त्यातल्या गाण्यांविषयी लिहिताना अतुल कुलकर्णी भारावून जातात. गुलजारांचाच ‘इजाजत’ पाहताना मृदुला बेळेंना शरदबाबूंचा ‘देवदास’ आठवतो. ‘इजाजत’मधील स्त्री-पुरुष संबंधांचे गहिरे रूप उलगडताना पाहणं कुठल्याही पिढीच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळी जाणीव करून देणारा प्रवास असतो. मनमोहन देसाईंचा ‘एव्हरग्रीन’ असा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट पाहताना गेल्या चाळीस वर्षांत किती तरी पिढ्यांना तेवढीच मजा आली. आजच्या पिढीच्या नचिकेत खासनीसचा अनुभवही काही वेगळा नाही. हा सिनेमा त्याचा अगदी फेवरिट आहे. या सिनेमातली सिनेमॅटिक लिबर्टी या शब्दालाही लाजवणारी सिनेमॅटिक लिबर्टी, पटकथा लेखकाची अफाट कल्पनाशक्ती यांना सलाम करीत नचिकेत आजही या चित्रपटाचा निखळ आनंद घेताना दिसतो.
‘जुना सिनेमा’ या सर्वांच्या लेखणीतून व ‘आताच्या चष्म्यातून’ सविस्तर वाचायला मिळणारच आहे. त्यामुळं त्यातल्या तपशिलात फार न जाता, या प्रयोगाविषयी सांगायला हवं. या प्रयोगात लेखकांनी निवडलेले चित्रपट १९५७ ते १९९८ या चार दशकांतले आहेत. गुरुदत्तचा ‘प्यासा’ ते एन. चंद्राचा ‘वजूद’ अशी ही दोन टोकं आहेत. यातले बहुतेक सिनेमे माइलस्टोन म्हणूनच गणले गेले आहेत. त्यामुळं मुळ‌ात आधी या चित्रपटांनी आपली गुणवत्ता त्या त्या काळात सिद्ध केलेलीच आहे. ‘प्यासा’सारखा चित्रपट तर केवळ भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही सार्वकालिक अभिजात चित्रपट म्हणून नोंदला गेला आहे. ‘छोटी सी बात’, ‘अमर, अकबर, अँथनी’, ‘अर्थ’ आणि ‘वजूद’ यासारखे चित्रपट संबंधित दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन म्हणून पूर्वीच ओळखले जात आहेत. अशा स्थितीत २०१९ मध्ये (म्हणजे यातला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊनही २१ वर्षे झाल्यावर) नव्या पिढीला, म्हणजे साधारण विशीपासून ते चाळिशीपर्यंत असलेल्या पिढीला ते कसे वाटतात, हे पाहणे औत्सुक्याचे होते. यातील बहुतेक लेखकांनी त्यांच्या जन्माच्या साधारणत: वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या नजरेतून या चित्रपटांकडे नव्याने बघणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अपेक्षेप्रमाणे हे सर्वच चित्रपट नव्या पिढीलाही तितकेच आवडलेले दिसतात. त्यांचं या चित्रपटांकडे पाहणं कुतूहलाचं, औत्सुक्याचं, तर काहीसं कौतुकाचंही आहे. 
या चित्रपटांचा काळ लक्षात घेतला, तरी या चाळीस वर्षांत आपल्या देशात झालेलं स्थित्यंतर आपल्या सहज लक्षात येईल. ‘प्यासा’ प्रदर्शित झाला, तेव्हा पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते, तर ‘वजूद’ प्रदर्शित झाला, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. या ४० वर्षांत मिश्र समाजवादी अर्थव्यवस्थेकडून जागतिकीकरण स्वीकारल्यानंतरच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास देशानं पूर्ण केला होता. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘छोटी सी बात’, ‘घरोंदा’ आदी चित्रपटांनी त्या त्या वेळची सामाजिक परिस्थिती चपखलपणे मांडली होती. याच दशकातल्या ‘अमर अकबर अँथनी’नं सर्वाधिक करमणुकीची नाममुद्रा आपल्या नावावर केली होती. ‘अर्थ’ आणि ‘इजाजत’मध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचं आणि आधुनिक स्त्रीच्या आत्मभानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. यातले काही सिनेमे सुप्त आशयातून, काही थेट कथानकातून, तर काही गीत-संगीताच्या माध्यमातून आपला वेगळेपणा सिद्ध करीत होते. अशा चित्रपटांविषयीचं कुतूहल सार्वकालिक असू शकतं. नव्या पिढीच्या चष्म्यातून या सिनेमांकडं पाहताना त्यांच्या आशयातला हा कालातीतपणा तपासणं हाही एक उद्देश असतोच. याशिवाय पूर्वी न जाणवणारी काही नवी वैशिष्ट्यं, काही वेगळेपणा, नवी सौंदर्यस्थळं नव्या पिढीला जाणवतात काय हेही पाहता येतं. या सर्व सिनेमांबाबत असं काही ना काही तरी गवसल्याचं या सर्व लेखांमधून प्रत्ययाला येतं.
चित्रपटासारख्या कलाप्रकाराला नाटकाप्रमाणे ‘पुढील प्रयोगात दुरुस्ती’ची संधी नसते. त्यामुळं चित्रपटात राहिलेली एखादी चूक कायमची तशीच राहू शकते. (क्वचितप्रसंगी तो भाग एडिट केला जातोही.) मात्र, अशी एखादी चूक, एखादी विसंगती, कथाप्रवाहातील किंवा संकलनातील दोष नंतरच्या काळात अभ्यासकांना नक्कीच आढळू शकतो. त्यावर चर्चाही होऊ शकते. विशिष्ट कलाकारांची निवड, त्यांची अभिनय पद्धती याविषयीही नव्या पिढीची काही तरी गमतीदार निरीक्षणं असू शकतात. त्या काळात लिहिले गेलेले संवाद, त्यातून प्रकटणारी त्या काळातील समाजाची मानसिकता यातही आजच्या पिढीला विसंगती आढळूच शकते. अशा सगळ्या गमतीजमतींसह या जुन्या सिनेमांकडं नव्या पिढीच्या चष्म्यातून पाहणं हा वाचकांसाठीही एक वेगळा, समृद्ध करणारा अनुभव ठरू शकतो.
चित्रपटांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रदीर्घ काळ जतन करता येणं शक्य आहे. आता तर अत्याधुनिक, डिटिजल माध्यमामुळं चित्रपट अक्षरश: ‘अमर’ झाले आहेत. आपल्याकडं चित्रपटसृष्टी सुरू झाली, तेव्हा तयार झालेला पहिला मूकपट आपण आजही पाहू शकतो. आता तर तंत्रज्ञान पुष्कळ पुढं गेल्यानं तयार झालेले सगळेच्या सगळे चित्रपट आपल्याला जतन करून किती तरी वर्षं जपून ठेवता येणं शक्य आहे. त्या त्या काळाचा आरसा किंवा त्या काळाचा तुकडाच या चित्रपटांच्या रूपानं पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा आणखी शंभर वर्षांनी कुणी आजच्या चित्रपटांबाबत असा प्रयोग करून पाहू शकेल, ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. हे चक्र पुढं कित्येक काळ चालूच राहील, यात शंकाच नाही. 
अर्थात आपण आजच्या काळात असल्यानं आजची मजा लुटू या. या उत्तम सिनेमांकडं नव्या पिढीनं कसं पाहिलंय ते त्यांच्या लेखांतून अनुभवू या. हे सिनेमे पुन्हा पाहताना आपल्यालाही नवं काही गवसलं तर हा खटाटोप सार्थकी लागेल. 

---

(पूर्वप्रसिद्धी : संवादसेतू दिवाळी अंक, २०१९)

---

23 May 2020

मनशक्ती युवा दिवाळी अंक २०१८ लेख

फुलपाखरू
---------------


शाळेत सहलीची घोषणा झाली आणि सायलीच्या मनात फुलपाखरं उडू लागली. तिला भटकायला आवडे. सायलीचे बाबा उत्तम ट्रेकर होते. बाबांसोबत ती अनेकदा ट्रेकला जाई. मात्र, शाळेच्या ग्रुपबरोबर सहलीला जायची मजा काही औरच होती. या वर्षी आठवीत असलेल्या सायलीची सहल देवबन इथं जाणार होती. यंदा शाळेची ही कदाचित शेवटचीच सहल, कारण नववी आणि दहावीच्या मुलांना सहलीला नेत नाहीत. त्यामुळं या सहलीला जायचंच असं सायलीनं ठरवलं. 
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरांच्या सांदीत ही देवराई होती. तिथूनच नंदिनी नदीचा खळाळता प्रवाह जात होता आणि खाली पठारावर उतरून विशाल रूप धारण करत होता. देवबनला एका खासगी उद्योजकानं सुंदर रिसॉर्ट बांधलं होतं. त्या रिसॉर्टमध्येच सायलीचा वर्ग उतरणार होता. सायलीच्या सगळ्या मैत्रिणीही सहलीला येणारच होत्या. पण तिची लाडकी मैत्रीण इरा नेमकी त्याच काळात तिच्या मावसबहिणीच्या लग्नाला दिल्लीला जाणार होती, त्यामुळं सायली जरा हिरमुसलीच. इराची सोबत नसेल तर सहलीत मज्जा येणार नाही, असं तिला वाटत होतं. पण अखेर इरानंच तिची समजूत काढली आणि अखेर सायली इराशिवाय सहलीला जायला तयार झाली. खूप लहानपणी सायली बाबांसोबत त्या देवराईच्या जवळच असलेल्या माधवगड किल्ल्यावर गेली होती. मात्र, त्या वेळी ही देवराई पाहायचं राहून गेलं होतं. सायलीच्या दुसऱ्या दोन मैत्रिणी राधा आणि अनुष्काही येणार होत्या. त्यामुळं सायलीला जरा बरं वाटलं. सहल शुक्रवारी रात्री पुण्यातून निघणार होती आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परत पुण्यात येणार होती.
सहलीला चार दिवस राहिले, तशी सायलीची लगबग सुरू झाली. सायलीच्या आईनं तिच्या इतर मैत्रिणींच्या आयांबरोबर पुन्हा एक वेगळा 'देवबन ट्रिप' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्यावर सहलीच्या तयारीचं नियोजन सुरू केलं. आईच्या या अतिउत्साहाचा सायलीला कधी कधी वैताग येतो. आता आपण काही लहान बाळ नाही आहोत, असं तिला वाटतं. पण तिच्या आईला ते काही पटत नाही. सायलीचे खास ट्रिपचे कपडे, शॉर्ट, शूज, गरम कपडे, थर्मास, चाकू, दुर्बिण, दोरी, छत्री इ. सारा जामानिमा तिच्या बॅकपॅकमध्ये गेला. मोबाइल, हेडफोन्स, इअरफोन्स, पॉवर बँक, कोरडा खाऊ, पाण्याची बाटली या सगळ्या जीवनाश्यक वस्तू हँडबॅगमध्ये गेल्या. सायलीचे बाबा तिला शाळेपर्यंत सोडायला आले. रात्री अकराची वेळ होती आणि जानेवारीतली पुण्यातली थंडी होती. सगळे जण कुडकुडत होते. शाळेच्या बाहेर चहाची एक टपरी अजून चालू होती. सगळ्यांनी तिथं जाऊन आधी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला... अजून मुलं येत होती. सायलीचे बाबा थांबणार होते, पण सायलीच त्यांना जा म्हणाली. बाबांनी आता हे आपल्याला असं लहान बाळासारखं वागवणं थांबवावं, असं तिला मनोमन वाटे. कधी कधी बाबांचाही राग येई. शेवटी सायलीचे बाबा आणि तिच्या इतर मैत्रिणींचेही बाबा त्यांना 'टाटा, काळजी घ्या सगळे, पाण्यात जाऊ नका' असं सांगून घरी परतले... आता सायलीला एकदम 'हुश्श' झालं... आता खऱ्या अर्थानं ट्रिप सुरू झाल्यासारखं वाटू लागलं. 
हळूहळू सगळी मुलं जमली. सायलीच्या मैत्रिणींनी बसमध्ये एकाच बाकावर जागा पटकावली. रात्री बाराच्या सुमारास बस निघाली. 'गणपतीबाप्पा मोरया'चा गजर झाला आणि प्रवास सुरू झाला. मुलं सुरुवातीला दंगा करीत होती. गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. पण शेवटी दोन वाजून गेले तशी एकेकाला झोप यायला लागली. गाडी अजून मारुतीच्या घाटातच होती. अजून बराच वेळ होता. पौर्णिमा जवळ आली होती. बाहेर लख्खं चांदणं पसरलं होतं. चंद्राचा पांढुरका दुधी प्रकाश सर्व आसमंतावर पडला होता. सगळीकडं चांदीचा महासागर पसरलाय असं वाटत होतं. सायलीला झोप येत नव्हती. राधा आणि अनुष्का तिच्या खांद्यावर मान टाकून झोपल्या होत्या. सायलीला इराची आठवण येऊ लागली. त्या दोघी एकच इयरफोन दोघींच्या कानाला लावून नेहमी गाणी ऐकत. सायलीनं मोबाइलला इयरफोन लावला. फेवरिट प्ले-लिस्टमधली तिची आवडती गाणी ऐकायला सुरुवात केली. अरिजित, राहत फते अली आणि श्रेयाची गाणी ऐकता ऐकता हळूहळू तिलाही शांत झोप लागली. अचानक धक्क्यानं जाग आली तेव्हा कळलं, की राधा आणि अनुष्का तिला हलवून उठवतायत. गाडी देवबनला पोचली होती. म्हणजे खरं तर देवबनच्या फाट्याला... तिथं एक तिठा होता. एक रस्ता सरळ पुढं कोकणात उतरत होता, तर देवबनला डावीकडं वाट होती. त्या तिठ्यावरच्या चहाच्या टपरीत सगळ्यांनी पुन्हा एकदा चहा घेतला. चहाच्या घोटानं सायलीला एकदम तरतरी आली. आता सगळे पाठीवर सॅक टाकून देवबनच्या वाटेकडं निघाले. पहाटेचे पाच वाजले होते. अजून अंधार होता. चंद्रप्रकाशात तो अरुंद डांबरी रस्ता एखाद्या सुस्त पडलेल्या अजगरासारखा दिसत होता. पहाटेच्या उत्साहात सगळ्यांनी भराभरा चालायला सुरुवात केली. सायलीनं आता त्या स्वच्छ हवेतला वास छातीत आतपर्यंत भरून घेतला. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. भातशेतीचा आणि हिरव्या झुडपांचा असा तो मिश्र वास तिच्या नाकात शिरला आणि तिला वेडावल्यासारखं झालं. पुढं एक ओढा लागला. त्यावर एक साकव होता. सगळ्यांनी तिथं ओढ्यात दंगा करायला सुरुवात केली. सायलीच्या लाडक्या रानडे बाई सगळ्यांना लटकेच रागावल्या. मग मुलं जराशी खट्टू होऊनच तिथून पुढं निघाली. 
आता थोडं थोडं उजाडू लागलं होतं. ओढा संपल्यावर डाव्या बाजूला एक निमुळती पायवाट फुटली होती. त्या पायवाटेच्या तोंडावर एक रानफुलांचं झाड होतं. त्यावर एक मोठ्ठं फुलपाखरू बसलं होतं. ब्लू मॉरमॉन... सायलीनं लगेच ओळखलं. तिला फुलपाखरांचा खूप छंद होता. एकूणच कीटकांविषयी तिला अतिशय कुतूहल होतं. पुढं मोठं झाल्यावर कीटकशास्त्रज्ञ व्हायचं, असंच तिनं मनोमनी ठरवलं होतं. ते ब्लू मॉरमॉन पाहताच सायलीला खुळावल्यागत झालं. ती हळूच त्या फुलपाखराच्या दिशेनं पुढं झाली. तिला त्याचा फोटो काढायचा होता. सायली जवळ येताच फुलपाखराला चाहूल लागली आणि ते उडालं. सायलीला हसू आलं. 'अरे थांब सोन्या, मी काही करणार नाहीय तुला' असं म्हणत ती पुढं गेली. फुलपाखरू आणखीनच उडत उडत पुढं निघालं. सायली त्याच्या मागे धावली. ती निमुळती पायवाट पुढं आणखीनच अरुंद होत एका ठिकाणी नाहीशीच झाली होती. फुलपाखरू स्वच्छंदपणे उडत पुढं निघालं होतं. सायली भान हरपून त्याच्या मागं धावत होती. आता वाट बरीच मागं राहिली. ते फुलपाखरूही एका मोठ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसलं. सायली दबक्या पावलांनी तिथं गेली. तिथं कॅमेरा झूम केला आणि क्लिक केलं. फोटो पाहिला. ते फुलपाखरू आता नीटच कॅमेऱ्यात कैद झालं होतं. सायलीनं मागं पाहिलं आणि तिच्या एकदम लक्षात आलं - ती त्या जंगलात एकटीच उभी आहे. फुलपाखराच्या मागं धावताना ती बरीच आत आली होती आणि आता ती नेमकी कुठं आहे हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. तिनं मोबाइल पाहिला. रेंज पूर्णपणे गेली होती. सायलीला एक क्षण एकदम खूप भीती वाटली. तिनं आता नीट लक्ष देऊन आजूबाजूला पाहिलं. उंच उंच झाडं होती खूप तिथं. पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. जंगलाची म्हणून एक शांतता असते. ती सगळीकडं पसरली होती. सायलीनं शांतपणे विचार केला. आल्या वाटेनं परत जाऊ म्हणून ती परत फिरली. आपल्या शूजच्या खुणा कुठं कुठं दिसताहेत हे ती पाहू लागली. पण खाली सगळीकडं गवत आणि पानं होती. त्यावर बुटांच्या खुणा दिसत नव्हत्या. आत्ता पावसाळा नव्हता. त्यामुळं चिखलही नव्हता. सगळी जमीन कोरडी होती. तिनं काही अंतर मागे जाऊन पाहिलं. पण तिला काही समजेना. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि सगळीकडं नीट दिसत होतं, एवढाच काय तो दिलासा होता. तिला परतीचा रस्ता सापडेना, तसं तिनं जोर लावून 'राधा...', 'अनू...' अशा हाका मारायला सुरुवात केली. पण कुठूनही काही प्रतिसाद आला नाही. आपण बरोबर नाही, हे लक्षात आल्यावर राधा आणि अनू रानडे बाईंना नक्की सांगतील, असं तिला वाटत होतं. तिच्या सॅकमध्ये बिस्किटांचा पुडा होता आणि पाण्याची बाटलीही होती. तिला एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. तिनं पटकन तो पुडा फोडला आणि दोन बिस्किटं भराभरा खाल्ली. पाणी प्यायली. पुन्हा तिनं चारही दिशांना थोडं थोडं अंतर जाऊन पाहिलं. पण आपण नक्की कुठून इथं आलो हे काही तिला कळेना. एका वडाच्या झाडाखाली एक मोठा दगड होता. शिळेसारखा... वर थोडी सपाट जागा होती. सायली तिथं जाऊन बसली. तिला एकदम रडायला यायला लागलं. आईची, बाबांची खूप आठवण आली. पण ती लगेच सावरली. 'एवढं काही नाही झालेलं... आपण हरवलो आहोत आणि आपल्याला कुणी तरी शोधेलच, नाही तर आपण रस्ता शोधू,' असं तिनं स्वतःला बजावलं. सायलीचं वय अवघं तेरा वर्षं... या एवढ्याशा आयुष्यात तिनं किती तरी स्वप्नं पाहिली होती. हल्ली तिला आई-बाबांचा जरा राग येत असला, तरी तेच तिचं सगळं विश्व होतं. आणि हो, इरा... इरा ही तिची अत्यंत लाडकी मैत्रीण म्हणजे तिचा जीव की प्राण होती. 
सायलीनं शांतपणे विचार केला. आता जास्तीत जास्त काय होऊ शकतं? आपल्याला न घेता तर हे लोक नक्की जाणार नाहीत. एव्हाना त्यांना कळलंही असेल, की मी हरवलेय म्हणून... सगळे शोधत असतील. शिवाय मोबाइलला इथं रेंज नाही. पण थोडं फार इकडं तिकडं गेलं तर, विशेषतः उंचावर गेलं तर रेंज येईल... हे लक्षात आल्यावर तिला एकदम हुशारी वाटली. तिनं पुन्हा आजूबाजूला पाहिलं. तसा उंच भाग कुठं जवळ दिसत नव्हता. सगळी सपाटीच होती. पुन्हा तिचं मन हिरमुसलं. या जंगलात कुठले हिंस्र प्राणी नसतील ना? सायलीच्या मनात अचानक हा विचार आला आणि ती एकदम धास्तावली. तसा कुठला प्राणी समोर आला - म्हणजे बिबट्या किंवा तरस किंवा रानगवा तर जाऊच द्या - अगदी कोल्हा किंवा लांडगा जरी समोर आला, तरी आपली काही धडगत नाही, असं तिला वाटून गेलं. तिच्याकडं एक छोटी सुरी सोडली, तर कुठलंही हत्यार नव्हतं. शिवाय सरपटणारे प्राणीही धोकादायकच असतात. सायली दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून छातीजवळ घेऊन बसली. गुडघ्यांवर हनुवटी टेकवून ती समोर पाहत बसली. आणि पाहते तो काय... समोरच्या एका दगडावर खाली तेच फुलपाखरू बसलेलं... ब्लू मॉरमॉन... आता मात्र तिला त्या फुलपाखराचा खूप राग आला. त्याच्या नादापायीच ती रस्ता चुकली होती. मग एकदम तिच्या लक्षात आलं, या जंगलात तिनं अद्याप दुसरा कुठलाही जिवंत प्राणीच पाहिला नव्हता. ते फुलपाखरू सोडून... खरं तर ते फुलपाखरू म्हणजे तिच्या सोबतीला असलेला एकमेव जीव होता. सायलीला एकदम भरून आलं. तिला ती रोज रात्री आईच्या कुशीत शिरून कशी बिनधास्त झोपायची, याची आठवण आली. त्या फुलपाखराला आपल्याला काही तरी सांगायचंय असं तिला वाटू लागलं. तिच्या एवढ्याशा आयुष्याचा ती परत विचार करू लागली. आपणही त्या फुलपाखरासारखेच स्वच्छंदी आहोत आणि ते आत्ता एकदम कसं एकटं आहे, तसेच आपणही एकटेच आहोत, हे तिच्या एकदम लक्षात आलं. आपले आई-वडील, इरा, राधा, अनुष्का, रानडे बाई असं कोणी कोणी आत्ता आपल्याजवळ नाहीय आणि तरीही आपण आहोत. जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. आपल्या पुढच्या आयुष्यातही असंच असेल कदाचित! सोबत कुणी नसेलही, पण तरीही हे फुलपाखरू कसं एकटंच मस्त उडतंय, छान जगतंय तसं आपल्याला जगायला हवं, असं काही तरी तिला वाटून गेलं. ती अगदी हळूच त्या फुलपाखराजवळ गेली... पण ते परत उडालं... एका दिशेला उडत राहिलं... सायली त्याच्या मागे धावत राहिली... खूप वेळ गेला... फुलपाखरू पुढं आणि सायली मागं.... अखेर पाण्याचा आवाज येऊ लागला. सायलीच्या एकदम लक्षात आलं, की आपण ओढ्याच्या जवळ आलो आहोत. तिनं फुलपाखरावरची नजर एक मिनिट हटविली आणि डावीकडं पाहिलं... तिला ओढा व तो पूल दिसला. तिनं पुन्हा समोर पाहिलं तर फुलपाखरू नव्हतंच. एकदम गायब... 
सायली थक्क झाली. ते ब्लू मॉरमॉन कुठं गेलं असेल, याचा ती विचार करीत राहिली. तेवढ्यात तिला एकदम तीन फुलपाखरं उडताना दिसली. त्यात तिचं फुलपाखरू होतं... म्हणजे ते त्या फुलपाखराचे आई-बाबा होते? होय, होय! त्या बाळाला त्याचे आई-बाबा सापडले होते. सायलीला खूप आनंद झाला. तिनं जागेवरच उंच उडी मारली. आता तिला खरोखरच तिच्या आई-बाबांची आठवण आली. आपण आपल्या आई-वडिलांना किती गृहीत धरतो ना, की ते आहेतच सदैव म्हणून... उद्या ते नसतीलच तर... आपण आत्ता हरवलो, तसे ते हरवले तर? सायली या विचारानं एकदम दचकली. तिनं मनोमन निश्चय केला, की आता आई-बाबांचं सगळं ऐकायचं. ते म्हणतील तसं वागायचं... एकदम शहाण्या मुलीसारखं! 
तेवढ्यात तिचा मोबाइल खणखणला. सायली 'रेंज'मध्ये आली होती. तिच्या आईचाच फोन होता. पलीकडून आई व बाबा दोघंही बोलत होते - 'बेटा, कशी सुरू आहे ट्रिप? नीट पोचलीस ना? वेळेवर जेव... नीट जा, नीट ये... दंगा करू नकोस...'
इकडं सायलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा सुरू होत्या.... ती नुसती 'हो, हो' म्हणत होती... हसत होती...
अन् वर आकाशात तीन फुलपाखरं मस्त विहरत होती!!

---
 
(पूर्वप्रसिद्धी ः मनशक्ती युवा दिवाळी अंक, २०१८)

30 Apr 2020

महाराष्ट्र हीरकमहोत्सव विशेष

बहु असोत सुंदर, संपन्न....
-----------------------------


आजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण! आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.
महाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे!) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.
साठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.
मात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.
नंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं ‌फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.
हे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल?

----

9 Apr 2020

अनंत दीक्षित स्मरण लेख

दीक्षितसाहेब...
------------------



आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना विसरू शकत नाही. आपल्या आयुष्याला आकार देण्यात, आपलं ‘कच्चं मडकं’ घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. दीक्षितसाहेबांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व असंच आहे. मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये ट्रेनी पत्रकार म्हणून रुजू झालो, तेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू घेणाऱ्या चौघांत दीक्षितसाहेब होते. मी त्यांना प्रथम पाहिलं ते तेव्हाच.
ते तेव्हा कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते. त्यामुळे रोज भेट व्हायची नाही. मात्र, १९९९ मध्ये मला अकल्पितपणे बेळगावचं साहित्य संमेलन कव्हर करायला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा दीक्षितसाहेब पुन्हा भेटले. ते सहकुटुंब कोल्हापूरहून आले होते. अंजली मॅडम व त्यांच्या दोन्ही मुली यांना मी तेव्हाच प्रथम पाहिलं. त्या मुली तर अगदी लहान होत्या. बेळगावची प्रसिद्ध साडी खरेदी करायला त्यांच्यासोबत गेलो होतो. पुढच्याच वर्षी दीक्षितसाहेब पुण्यात संपादक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संपादक म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांची ओळख आम्हाला हळूहळू पटत गेली. मी आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांना दीक्षितसाहेबांनी कायम प्रोत्साहन दिलं. अनेक संधी दिल्या. जसपाल भट्टींची मुलाखत घेण्याची संधी त्यांनीच मला दिली. यामुळंच पुढं माझा भट्टींसोबत दीर्घकाळ स्नेह निर्माण झाला. नंतर भट्टींचा एक कॉलमही आम्ही सुरू केला. तो मराठीत भाषांतरित करायची जबाबदारी माझी होती. दीक्षितसाहेबांनी तेव्हा गुलजार यांचंही एक सदर पुरवणीत सुरू केलं होतं. दोन्ही मजकूर अनेकदा शेजारीशेजारी प्रसिद्ध व्हायचे. माझ्या मजकुरावर नाव भट्टींचं असलं, तरी तो मीच लिहिलेला आहे या जाणिवेनं सुख वाटायचं. दीक्षितसाहेबांचं आमच्यावर बारकाईनं लक्ष होतं. अनेकांना त्यांनी दौऱ्यावर पाठवलं, लिहायला प्रोत्साहित केलं. २००१ च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे व सिद्धार्थ खांडेकर यांच्यासह मला या राज्यांच्या दौऱ्यावर पाठवलं. वयाच्या पंचविशीत मिळालेला हा अनुभव मोलाचा होता.
त्याच वर्षी जानेवारीत नगर जिल्ह्यात कोठेवाडीचं प्रकरण घडलं होतं. या बातमीचं तर संपूर्ण श्रेय दीक्षितसाहेबांना जातं. आमचे पाथर्डीचे बातमीदार अविनाश मंत्री यांना ही घटना घडल्यावर दोन-तीन दिवसांनी त्यातले भयानक तपशील समजले होते. त्यांनाही या बातमीचं गांभीर्य उमगलं. त्यांनी संपादकांना फोन केल्यावर त्यांनी मंत्रींना पुण्यातच बोलवून घेतलं. सर्व तपशील जाणून घेतले व स्वत: ती बातमी लिहिली. मी तेव्हा नेमका मित्राच्या लग्नाला लातूरला गेलो होतो. तिथल्या अंकात दुसऱ्या दिवशी ही आठकॉलमी बातमी बघितली आणि हादरलो. नंतर पुण्यात आल्यावर रीतसर या बातमीचा फॉलोअप साहेब घेताना मी बघितलंय. काही काळानंतर मीही कोठेवाडीला जाऊन आलो.
२००२ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या वेळी दीक्षितसाहेबांनी मला दिल्लीला जाऊन या हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस जवानांच्या नातेवाइकांच्या मुलाखती करायला सांगितलं. ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असाइनमेंट होती. मी दिल्लीत राहून हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या लोकांच्या नातेवाइकांना भेटून ‘सप्तरंग’मध्ये दोन भागांत ती स्टोरी केली. या संपूर्ण असाइनमेंटनं मला खूप काही शिकवलं. त्याचं संपूर्ण श्रेय सरांनाच!
मी दिल्लीहून आलो आणि माझं लग्न ठरलं. ती बातमी सांगायला मी साहेबांकडं गेलो. माझ्या सासुरवाडीच्या सर्व लोकांना साहेब दीर्घकाळ ओळखत होते. ‘जतकर’ म्हटल्यावरच ‘श्यामची मुलगी का?’ असं त्यांनी विचारताच मी खरं तर आश्चर्यचकित झालो होतो. मी ‘हो’ म्हटल्यावर सरांनी सर्वांची नावं सांगितली. बार्शीच्या ओळखी सांगितल्या. माझ्या लग्नाला साहेब आले होते आणि माझ्या सासुरवाडीच्या मंडळींसोबत बराच वेळ गप्पागोष्टींमध्ये रमले होते.
पुढे २००४ मध्येही लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला ओडिशात पाठवलं. तिथला अनुभवही कायम लक्षात राहणारा होता. त्या काळात मी नगर आवृत्तीचं काम काही काळ बघत होतो. नगर जिल्ह्यात त्यांच्यासोबत केलेला दौराही असाच संस्मरणीय ठरला. राजस्थानमध्ये प्रिन्स चार्ल्स आले होते, तेव्हा त्यांनी सुभाष खुटवडला तिकडं पाठवलं. वीरप्पन मारला गेला, तेव्हा सुनील मानेला तिकडचं वार्तांकन करण्याची संधी साहेबांनी दिली. त्सुनामी आली होती, तेव्हा अरविंद तेलकरांना अंदमानला जाण्याची संधीही त्यांनीच दिली.
मांढरदेवीची दुर्घटना घडली त्या दिवशी मी डेस्कवर होतो. साहेब डेस्कवर आले व मला म्हणाले, काय करतोयस? मी डेस्कवर मी तेव्हा करीत असलेलं काम सांगितलं. मला म्हणाले, चल लगेच. आपल्याला साताऱ्याला जायचंय. मग साहेबांच्या गाडीतून ते, मी आणि त्यांचे पीए चंद्रकांत आणि ड्रायव्हर असे चौघे लगेच सातारा ऑफिसमध्ये दाखल झालो. आमचे सातारा प्रतिनिधी श्रीकांत कात्रे मांढरदेवीला गेले होते. पुण्याहून पराग करंदीकर, मिलिंद वाडेकर हेही थेट मांढरदेवीला पोचले होते. अशा वेळी त्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून सर्व सूत्रं हलवायला साहेब निघाले होते. रात्री आठच्या आत सर्व आवृत्त्यांना आपली मुख्य बातमी गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कात्रेंकडून त्यांनी स्वत: बातमी घेतली आणि स्वत: डिक्टेट करून, मला एकदा वाचायला सांगितली. आठच्या ठोक्याला आमची बातमी सगळीकडे पोचली होती. नंतर मग आम्ही निवांत ‘राधिका पॅलेस’मध्ये जेवून पुण्याला परतलो. तोवर पुण्याच्या मुख्य आवृत्तीची वेळ झाली होती. मग ती सगळी पानं बघूनच आम्ही ऑफिस सोडलं.
बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत. याशिवाय त्यांचं पुस्तकप्रेमही अफाट होतं. मात्र, ते खरे रंगायचे ते गप्पांच्या फडात आणि जाहीर भाषणांत. त्यांचं ओघवतं वक्तृत्व ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असायचा. पुण्यात नवीन आले, तेव्हा पुण्यावर व पुणेकरांवर ते खूप टीका करायचे, टोमणे  मारायचे; पण त्यांनी आम्हा सगळ्यांना जिव्हाळाही तितकाच दिला. माझ्या लग्नात आलेल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी साहेबांचं आणि आमच्या सासुरवाडीच्या लोकांचं जमलेलं मेतकूट बघितलं आणि मला ‘साहेबांचा जावई’ अशी पदवी देऊन टाकली. मी ती गमतीत घेतली; कारण साहेबांनी कधीही मला विनाकारण झुकतं माप दिलं नाही. सर्वच नवीन मुलांवर त्यांचा लोभ होता. २००४ नंतर मात्र ऑफिसमधलं वातावरण बदलू लागलं. साहेबांना त्याचा त्रास होऊ लागला. साहेबांनी राजीनामा देण्याच्या काही दिवस आधी मंदारचं (कुलकर्णी) साताऱ्यात लग्न होतं. नीलचा पहिला वाढदिवसही त्याच दिवशी होता. सरांनी तोवर त्याला पाहिलं नव्हतं. नंतर माझ्या हातातल्या नीलला बघून म्हणाले, ‘त्याला सांग, मोठा होऊन काहीही हो, पण संपादक होऊ नकोस!’ साहेबांचं ते बोलणं ऐकून आम्ही तिथे उपस्थित असलेले सगळेच वरकरणी हसलो, पण मनातून चरकलो.
अखेर जे व्हायचं तेच झालं. काही दिवसांतच साहेब राजीनामा देऊन संस्थेतून बाहेर पडले. माझ्या पत्नीच्या आजोबांवर, दादांवर त्यांचा विशेष लोभ होता. काही काळानंतर दादा गेले, तेव्हा मी साहेबांना फोनवर कळवलं. त्या वेळी त्यांच्या मुलीचं आजारपण सुरू झालं होतं. त्यामुळं ते अस्वस्थ होते. पण तरीही त्यांनी समाचाराचा फोन केला.... मधल्या काळात अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं आणि कधी तरी त्यांचं टीव्हीतील चर्चेत दर्शन घडायचं. अस्मिता गेली त्या दिवशी ‘वैकुंठ’मध्ये साहेबांना पाहिलं. हातात डायलिसिसच्या सुया होत्या. दोन जणांनी आधार देऊनच साहेबांना तिथं बसवलं. साहेबांकडं बघवत नव्हतं. भडभडून आलं... मी निघताना गाडीत त्यांचा हात हातात घेतला. ते सर्वांनाच शून्यवत नजरेनं ‘थँक्यू थँक्यू’ म्हणत होते... मला फार वेळ तिथं उभं राहता आलं नाही...साहेब आठवतात ते दिलखुलास हसणारे, मोठ्यांदा गप्पांचा फड रंगवणारे, एकही शब्द न बोलता आमच्यावर माया करणारे... आमच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी होता होईल ते सगळं करणारे... असे संपादक होणे आता दुर्मीळच...त्यांचं ऐहिक अस्तित्व संपलं, त्याला आज बरोबर एक महिना झाला... होळीच्या दिवशी सर गेले... त्या वेळी खूप जणांनी खूप काही लिहिलं... मग मी मुद्दामच मागं थांबलो... आज मात्र लिहिल्याशिवाय राहवलं नाही.साहेब, तुम्ही कायम स्मरणात राहाल... मनातल्या कृतज्ञभावासह!


---



27 Mar 2020

मटा लेख - करोना कसोटीचा काळ

कसोटीचा काळ
--------------------

मानवी जीवनाच्या अस्तित्वापासून आतापर्यंत प्रत्येक विशिष्ट टप्प्यानंतर एक कसोटीचा काळ मानवी जमातीच्या वाट्याला आला आहे. नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, महायुद्धे यात हजारो, लाखो माणसे जिवानिशी गेली आहेत. अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धातही आपल्या राज्यात, देशात प्लेगच्या साथीने हजारो माणसे मरण पावली. महाराष्ट्र व कर्नाटकात इ. स. १३९६ ते १४०७ या बारा वर्षांत सलग पडलेला व हजारो लोकांचा प्राण घेणारा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ही कुख्यात आहे. पानिपतची तिन्ही युद्धं आणि एकूण मध्ययुगात झालेली सगळीच युद्धं कित्येक हजार माणसांचे जीव घेऊनच संपली. विसाव्या शतकात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष नसली, तर अप्रत्यक्ष झळ आपल्याला बसलीच होती. फाळणीच्या वेळी तर पंजाब व बंगाल या प्रांतांना सर्वाधिक झळ बसली व हजारोंचं रक्त सांडलं. याशिवाय भारतात त्सुनामी, भूकंप, महापूर अशा नैसर्गिक संकटांनी ठरावीक काळानंतर शेकडो-हजारो माणसं हे जग सोडून जातात. एकविसाव्या शतकात सर्वांत स्मार्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे आपल्याला अगदी सुरक्षित समजून चाललो होतो. एखाद्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन स्वैरपणे दौडत निघावं, तसे आपण सगळेच जण पत्ता माहिती नसलेल्या सुखाच्या शोधात बेफाम दौडत होतो. अचानक घोड्याच्या पायात ‘करोना विषाणू’चा अडथळा येऊन आपण धाडकन आपटलो आहोत. पुरते जखमी झालो आहोत. त्यामुळे गती थांबली आहे व मती गुंग झाली आहे!
सध्याचा काळ कसोटीचा आहे. आपल्यातल्या ‘माणसा’ची ही कसोटी आहे. माणसं म्हटली, की वेगवेगळे स्वभाव आले. प्रत्येक जण या संकटाला वेगळ्या पद्धतीने सामोरा जातो आहे. या संकटाला तोंड देण्याची प्रत्येकाची रीत वेगळी आहे. कुणी खूप घाबरलंय, तर कुणी खूप बेफिकिरी दाखवतंय. कुणी मनातून घाबरलंय, पण उसनं अवसान आणतंय; तर कुणी खरोखर खंबीरपणे उभे आहेत. अशा वेळी आपल्यातल्या मनोधैर्य, संयम, चिकाटी, निग्रह आदी गुणांची कसोटी लागणार आहे. हे शब्द कधी तरी विशेषणं म्हणून शिकलो असू, पण आज आपल्यात त्या विशेषणांची रुजवण करणं आवश्यक झालंय. संकटकाळात सर्वाधिक कसोटी लागते ती माणुसकीची. जीव वाचविण्यासाठी आपल्या पिलाला पायाखाली धरून पाण्याबाहेर येणाऱ्या माकडिणीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आजूबाजूला जरादेखील सामाजिक संकटांची चाहूल लागली, की आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावणारे या माकडिणीच्या कुळातले अनेक जण आता दिसतील. आपल्या घरी अन्नधान्याचा गरज नसताना भरपूर साठा करून ठेवणारे, रांगा मोडून मॉलमधल्या वस्तू हडप करणारे, क्वचित दुसऱ्याच्या हातातल्या वस्तू ओरबाडणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतातच. दुसऱ्या बाजूला स्वत:चं घरदार विसरून आजारी रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक सेवांचे ड्रायव्हर-कंडक्टर, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, मेडिकल दुकानदार असे किती तरी लोक या संकटाचा निर्धाराने सामना करतानाही दिसत आहेत. आपण कुठल्या बाजूला असावं हे ठरविण्याची, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याची हीच ती वेळ!
एखाद्या आपत्तीतून चांगलं काही तरी निघतं, असं म्हणतात. आत्ताच्या या आपत्तीची एकूण व्याप्ती व भयावहता अजून तरी आपल्याला पूर्णपणे समजली आहे का, हा प्रश्नच आहे. मात्र, अगदी नजीकच्या काळात तरी ती संपुष्टात येईल अशी चिन्हे आत्ता तरी दिसत नाहीत. तेव्हा आता या आपत्तीला इष्टापत्ती मानून आपल्याला आपल्या सगळ्या जगण्याचाच फेरविचार करण्याची ही उत्तम संधी आहे. आपल्या भयंकर वेगाने निघालेल्या महानगरी जगण्याला सक्तीने मिळालेली ही विश्रांती आहे. हा ‘पॉज’, हा अल्पविराम समजून घ्यायला हवा. आपण आपल्या जगण्यात केवळ ‘पीअर प्रेशर’नं कित्येक गोष्टी करीत आलो आहोत का, याचाही पुन्हा एकदा आढावा घ्यायची गरज आहे. भौतिक सुखांच्या मागे अनावर ओढीनं तुफान धावत सुटलेलो आपण... गेल्या किमान दहा वर्षांत किती वेळा हा वेग स्वत:हून कमी केला आहे, हे तपासून पाहायला हवं. अधिक हवे, अजून अधिक हवे या हव्यासापोटी आपण बेभान झालो. आपली महानगरं वाढत्या लोकसंख्येमुळं रोगटपणे सुजली, फुगली. रस्त्यांवरच्या चारचाकी वाढल्या, प्रदूषण वाढलं. वाहतूक कोंडी तर रोजचीच डोकेदुखी झाली.
महानगरांत रोजगार मिळाला, हातात पैसा आला. मग तो खर्च करण्याची वेगवेगळी ठिकाणं आली. मॉल, मल्टिप्लेक्स, स्पा, रिसॉर्ट, परदेश प्रवास अशा एक ना दोन मार्गांनी खर्चाचा ओघ वाढू लागला. पैशाची पाकिटं जाडजूड होती. त्यामुळं हे खर्चही काहीच वाटेनासे झाले. मग सोशल आउटिंग, मग त्या नावाखाली मद्यपान, महागड्या गाड्या, सुपर हाय-वे... अशी सगळी मस्त धुंदी चढली डोळ्यांवर! याच काळात आजूबाजूला सगळेच एवढे भाग्यवान नाहीत, याचंही भान सुटलं. पूर्वीच्या काळी सगळ्यांमध्येच एक प्रखर सामाजिक जाणीव असायची. आता ती धूसर होत चालली. कुटुंबातलाच संवाद संपत चालला, तिथं बाकी समाजाची काय कथा! आपण अधिकाधिक स्वकेंद्रित, आत्ममग्न होत चाललो. मी, माझं, मला यापलीकडे काही सुचेनासं झालं. आपलं वर्तुळ आपण आकसत आकसत स्वत:च्या केंद्रबिंदूपुरतं छोटं करून टाकलं. तिथं अन्य कुणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळं अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती आल्या, तरी त्याला आपण दिलेला प्रतिसाद बघण्यासारखा होता. मागच्याच वर्षी पुण्यात दोन वेळा प्रचंड पूर आला होता. त्या वेळी पहिल्यांदाच अशी भीती वाटली होती. दहा-बारा वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्लू’चं संकट आपण झेललं. तेव्हाच्या आणि आताच्या प्रतिसादात निश्चितच फरक पडला होता. आता आपल्याला स्वत:पलीकडं पाहायला फुरसतच नाही, अशी स्थिती आहे.
‘करोना’नं जे जागतिक संकट आणलंय, त्यामुळं या सगळ्या सुखासीनतेला खाडकन शॉक बसावा तसा जोरदार धक्का बसला आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा, आपल्याला वाटेल तशा होणार नाहीत, याची जळजळीत जाणीव या संसर्गजन्य विषाणूनं करून दिली आहे. आपल्याला निसर्गाचे नियम पाळावेच लागतील आणि माणूस म्हणून, समाज म्हणून जगण्यासाठी जे सर्वमान्य नियम केले आहेत, तेही कसोशीनं पाळावे लागतील, हे या संकटानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. संगणकाच्या भाषेत सांगायचं तर जगणं कदाचित पुन्हा ‘रिसेट’ केलं गेलंय. आता सगळ्याच धारणा पुन्हा तपासून पाहायची वेळ आली आहे. वैयक्तिक आयुष्यात आपल्यावर अचानक एखादं संकट कोसळलं, तर आपण भांबावून जातो, घाबरून जातो, खचतो. इथं संपूर्ण मानवजातीवरच हे संकट घोंघावतं आहे. त्यामुळं जी काही भीती आहे ती जागतिक आहे. आपल्या जिवाची काळजी प्रत्येकालाच आहे. उद्या या विषाणूवरही लस नक्कीच निघेल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. पण आपण त्यानिमित्ताने आपल्या या भयावह वेगवान जीवनशैलीत बदल केला तर ते सगळ्यांच्याच फायद्याचं होईल, यात शंका नाही. मृत्यू समोर दिसला, की भलेभले गारठतात. माणसाला आपला जीव सर्वांत प्यारा असतो. आता आपलाच नाही तर सगळ्यांचाच जीव वाचविण्याची वेळ आहे. हा एक इशारा आहे, असं समजून आपल्या सगळ्या जगण्यालाच वेगळं वळण देता येतं का पाहूया. कमीत कमी वस्तूंमध्ये भागविण्याची ‘मिनिमलिस्ट’ जीवनशैली अंगिकारता येईल का? पुन्हा खेड्याकडे जाता येईल का? सर्वत्र धान्य किंवा भाजीपाला नैसर्गिक पद्धतीनेच पिकविता येईल का? किमान शहरांतील प्रदूषण कमी करता येईल का? थुंकण्यासारख्या अनारोग्यकारक विकारांतून कायमची सुटका करून घेता येईल का? रोजच्या जगण्याला आवश्यक तेवढी किमान कामं आपण करू शकतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता येतील.
देव करो आणि हे संकट लवकर टळो. पण त्यानिमित्तानं हे काही बदल आपण केले आणि नंतर काही काळानंतर पाहिलं, तर कदाचित आपलं जगणं अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी झालेलं दिसेल!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, २२ मार्च २०२०)

---

16 Mar 2020

मटा - करोना लेख

सकारात्मक, तत्पर...
-------------------------


करोना विषाणूनं सध्या आपल्या जगण्यात ‘जंतुप्रवेश’ करून हलकल्लोळ उडवून दिलाय. जग कितीही प्रगत, पुढारलेलं झालं असलं, तरी एक साध्या डोळ्यांनीही दिसू न शकणारा विषाणू आपल्या सगळ्या मानवजातीला कसा मुळापासून हादरवून सोडू शकतो, याचा करुण अनुभव आपण घेत आहोत. माणसाचं जगणं किती ‘व्हल्नरेबल’ आहे, याची पदोपदी जाणीव होते आहे. आपल्या देशात आधीच कमी समस्या होत्या जणू, म्हणून या नव्या साथरोगाची भर त्यात पडली! असं काही झालं, की आपल्याकडं स्वाभाविकच त्याच गोष्टीवर सगळीकडं चर्चा सुरू होते. हल्ली सोशल मीडियामुळं सल्ला आणि शहाणपण यांचं मोफत वितरण सगळीकडं सुरू असतं. त्यातून अफवा नावाचा एक नवाच व्हायरस धुमाकूळ घालायला लागतो. अशा वेळी खरोखरच या ‘करोना’नं आपल्या देशात जास्त प्रमाणात शिरकाव केला तर काय होईल, या विचारानं झोप उडते. आपल्या देशातील खूप जास्त लोकसंख्या, गर्दीची ठिकाणं, लोकांच्या अनारोग्यकारक सवयी, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधांची वानवा आणि एकूणच प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता यामुळं साथरोगासारख्या एखाद्या मोठ्या संकटाला तोंड देण्यात आपण कमी पडू की काय, असं सतत वाटत राहतं.
आताचं चित्र मात्र सुदैवानं तसं नाही. आपल्या देशाला कुणी कितीही नावं ठेवली, तरी इथं काही-एक व्यवस्था आहे आणि ती कुठल्याही संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकते, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल, एवढं चांगलं काम आपल्या सरकारकडून आणि प्रशासनाकडून होतंय. अशा आपत्तीच्या काळात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ठोस निर्णय घेणारं सरकार आणि त्याची कार्यक्षमतेनं अंमलबजावणी करणारी नोकरशाही! या दोघांनाही अर्थातच देशभरातल्या सर्वच सामान्य नागरिकांची मनापासून साथ असणंही तितकंच महत्त्वाचं आणि आवश्यक असतं. या वेळी आपल्याकडं या तिन्ही गोष्टींचा चांगला मिलाफ झालेला दिसतो. त्यामुळं ‘करोना’चा मुकाबला आपण आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे करू शकू, असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य, औषधनिर्माण व प्रशासन या क्षेत्रांत काम करणाऱ्या काही तज्ज्ञांशी याविषयी चर्चा केल्यानंतर तर याची खात्रीच पटली!
अशा जागतिक संकटाच्या वेळी कुठल्याही प्रसंगाला त्वरित प्रतिसाद देणं गरजेचं असतं. या वेळी सरकारनं तशी पावलं उचलली. ‘करोना’कडं दुर्लक्ष केल्यास काय होतं, याचं उदाहरण इटली आणि इराणच्या रूपानं आपल्या समोर आहे. ‘करोना’ची बाधा झालेल्या लोकांचं तातडीनं विलगीकरण करणं आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणं या गोष्टी तिथं त्वरेनं झाल्या नाहीत. त्यामुळं आपल्यापेक्षा किती तरी आधुनिक आरोग्य सुविधा असूनही त्या देशातील मृतांची संख्या किती तरी पटींनी जास्त आहे. तीच गोष्ट इराणची. आपल्याकडं आपल्याला असं दुर्लक्ष करणं परवडणार नाही. मुळात हा विषाणू किती लोकांच्या अंगात भिनलाय आणि ते लोक आणखी किती लोकांना संसर्ग पोचवू शकतात, हे लक्षात यायला किमान १४ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं अशा रुग्णांना तातडीनं शोधणं, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणं व त्वरित उपचार सुरू करणं हे अत्यावश्यक असतं. आपल्याकडं पहिल्या टप्प्यात या गोष्टी झाल्या नसल्या, तरी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून मात्र केंद्र सरकार व संबंधित राज्य सरकारांनी त्वरित हालचाली केल्या. मार्च उजाडल्यानंतर महाराष्ट्रात पहिले रुग्ण नोंदविले गेले. लवकरच ही संख्या ८० च्या घरात गेली. तुलनेनं हे प्रमाण कमी असलं तरी प्रसार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज होती. ते उपाय सरकारनं त्वरित केले. एक तर आपण इतर देशांच्या नागरिकांचा व्हिसा स्थगित केला. त्यामुळे बाहेरचे नागरिक आपल्या देशात येणं बंद झालं. हे करणं आवश्यक होतं. कारण भारतात आत्तापर्यंत झालेला संसर्ग हा परदेशातून इथे आलेल्या लोकांनाच झालेला दिसतो. याशिवाय विमानतळांवर स्क्रीनिंगची व्यवस्था उभारण्यात आली. परदेशांतून आलेल्या ज्या लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे किंवा ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशा सर्व रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची व्यापक शोधमोहीम प्रशासनाच्या पातळीवर सुरू करण्यात आली. ही कार्यतत्परता अभूतपूर्व होती. या जोडीनं रुग्णांची संख्या वाढीला लागल्याबरोबर विविध राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणांवरील माणसांचा वावर कमी करण्यासाठी सक्तीच्या ‘बंदी’च्या घोषणा केल्या. त्या योग्यच होत्या. या उपाययोजनांमुळं नागरिकांत काहीशी घबराट पसरल्यासारखी वाटली, तरी अंतिमत: हे उपाय सर्वांच्या हिताचेच आहेत, यात शंका नाही.
परदेशांत राहणाऱ्या आपल्या नागरिकांची काळजी घेणारा भारत हा जगातील सर्वांत अग्रणी देश आहे, यात दुमत नसावं. चीनमधल्या वुहान या शहरातून आणि इतरही ठिकाणांहून भारताने सर्वाधिक विमानफेऱ्या करून आपली माणसं परत देशात आणली. केवळ भारतीयच नव्हेत, तर बांगलादेशच्या नागरिकांनाही भारताने तेथून परत आणले. इराणमध्येही आपण लष्करी विमान पाठवून तेथील भारतीय नागरिकांना आणण्याची तत्परता दाखवलीय. एवढेच नव्हे, तर इराणमध्येच मेडिकल सेटअप उभारून तपासणीची सोय करण्याचीही तयारी भारताने दर्शविली होती. मात्र, इराणच्या आडमुठेपणामुळे ते काही होऊ शकलं नाही.
आपल्याकडच्या विषाणू शास्त्रज्ञांचं आणि डॉक्टरांचंही कौतुक करायला हवं. त्यांनी ‘करोना’च्या तपासणीसाठी लागणारा वेळ प्रयत्नपूर्वक कमी केला आहे. विकसित देशांपेक्षाही वेगाने ही तपासणी आपल्याकडे होते आहे. याखेरीज देशभरात अल्पावधीत आणखी मोठ्या प्रमाणात या प्रयोगशाळा उभारण्याचा निर्धार केंद्र सरकारनं केला आहे. त्यामुळं इतर विकसनशील देश अशा प्रयोगशाळा उभारून देण्याची मागणी आपल्या देशाकडे करू लागले आहेत. मालदीवसारख्या छोट्या देशात तर आपण मदतीसाठी वैद्यकीय पथकही पुरेशा तयारीनं पाठवलं आहे. मास्क आदी वस्तूंचा पुरवठा करण्यात चीन आघाडीवर असतो. मात्र, तेथे आता या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागल्यावर भारतानेच या वस्तूंचा पुरवठा त्या देशाला सुरू केला आहे. आपल्याकडे औषधांच्या किमतीही तुलनेनं स्वस्त आहेत. आपल्याकडे अनेक सेवाभावी डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्था अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला पुढं येतात, हेही आपण कायम अनुभवत असतो.
आपल्या देशात काहीएक व्यवस्था आहे आणि प्रसंग पडला, की ती खंबीरपणे काम करून आपलं कर्तव्य निभावत असते. लोकांच्या प्रश्नांचं भान असलेले लोकप्रतिनिधी, प्रशासनातील मेहनती अधिकारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लाखो कर्मचारी-अधिकारी व डॉक्टर यांच्या कार्यतत्परतेचं कौतुक करायलाच हवं. अशा वेळी मला आपला देश गावाकडच्या जुन्या-जाणत्या, अनुभवी शहाणपण असलेल्या समजूतदार वडीलधाऱ्यासारखा भासतो. विकसित देश म्हणजे ‘शहरं’ म्हटलं, तर आपला देश म्हणजे ‘गाव’च आहे, यात दुमत नसावं. आपल्या देशात अनेक त्रुटी आहेत, कमतरता आहे, बेशिस्त आहे.... हे सगळं मान्य करूनही इथले बहुसंख्य कष्टाळू, ‘जुगाडू’ आणि शहाणपण असलेले लोक जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘करोना’चं आव्हानही असंच परतवून लावू, यात काहीच शंका नाही.

---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १५ मार्च २०२०)

---

15 Feb 2020

मटा मैफल लेख

चाळिशीतला ‘व्हॅलेंटाइन’
------------------------------



आमचा एक मित्र आहे. कथनाच्या सोयीसाठी आपण त्याला कान्हा म्हणू या. तर हा कान्हा आता चाळिशीच्या पार पोचला आहे. तरीही फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडला, की त्याला छातीत उगाचच धडधड वगैरे व्हायला लागते. वास्तविक ही धडधड हाय बीपी किंवा ॲसिडिटीची असू शकेल, असा पोक्त सल्ला आम्ही मित्र त्याला कायमच देत असतो. मात्र, तो आमच्या या जुलमाच्या फुकटच्या सल्ल्याकडे मुळीच लक्ष देत नाही. ही नाजूक धडधड ‘व्हॅलेंटाइन डे’च्या चाहुलीमुळेच निर्माण झालेली आहे, यावर त्याची नितांत श्रद्धा आहे.
अशा वेळी मग कान्हाला भेटणं क्रमप्राप्त ठरतं. चोवीस तास तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यावरचं एक स्त्रीलिंगी नाव असलेलं रेस्टॉरंट कान्हा निवडतो, हे सांगायला नकोच. इथं आल्यावर आमच्यासारख्यांचं वयही दहा वर्षांनी कमी होतं, तिथं कान्हाला सोळाव्या वर्षाचा उत्साह यावा, यात नवल नाही. इथं कान्हाचं ठरलेलं कोपऱ्यातलं टेबल आहे. त्याला कधीच वेटिंग करावं लागत नाही. इथं बसल्यानंतर कान्हा ज्या नजरेनं त्या रेस्टॉरंटमधील यच्चयावत बायका स्कॅन करतो, ती नजर केवळ देवलोकीच्या गंधर्वांनाच लाभलेली असू शकते. ती इहलोकीची नजर नव्हे. आम्ही कधी चुकून नजरानजर करायला गेलो, तर संबंधित पात्रासोबत आलेलं थोराड पुरुषपात्र आमच्याकडं विनाहेल्मेटवाल्याकडं ट्रॅफिकवाला पाहतो तशा नजरेनं पाहतं. आमची पात्रता, अर्थात लायकी लगेच सिद्ध होते. कान्हाच्या राशीत मात्र टॉम क्रूझ किंवा मिलिंद सोमण आदी ग्रह उच्चस्थानी असावेत. कारण तो त्या कोपऱ्यात बसलाय आणि आसमंतातून एकही ओळखीची स्त्री येऊन त्याला भेटून गेली नाही, असं एकदाही झालेलं नाही. तर अशा रीतीनं हा सगळा सोहळा साग्रसंगीत पार पडल्यानंतर कान्हा माझ्याकडं वळाला.
‘हं, बोल... काय म्हणतोय तुमचा व्हॅलेंटाइन डे?’
‘आमचा व्हॅलेंटाइन डे संपला कधीच... दहा वर्षं झाली त्याला... तुमचं घोडं फुरफुरतंय पण अजून...’ मी वैतागानं म्हणालो.
‘मला तुझ्यासारख्या पुरुषांचं हेच आवडत नाही,’ कान्हा म्हणाला. ‘तुम्हाला व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे अजूनही ती गुलाबाची फुलं, ते एकाच स्ट्रॉनं कोका-कोला पिणं, अर्धं अर्धं चॉकलेट खाणं, गुडघ्यावर बसून प्रपोज मारणं हेच वाटतं ना?’
‘मग अजून काय वाटायचंय? आणि हे सगळे प्रकार करण्याचं काही एक वय असतं. आपलं ते वय उलटून गेलंय महाराज. वेळेत लग्न केलं असतंस तर आज मुलगा कॉलेजात असता... आणि त्यानं व्हॅलेंटाइन डे साजरा केला असता... आपण नव्हे...’
‘अरे, मुलगा असता तर त्याच्यासोबत मीही व्हॅलेंटाइन डे साजरा केलाच असता. कारण प्रेमाला फक्त ‘प्रेम’ माहिती असतं, वय नाही...’
‘हे डायलॉग सिनेमात ठीक आहेत रे कान्हा... प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही आता १५-१५, २०-२० वर्षं संसार झालेले काका लोक झालो आहोत. आम्हाला कसला आलाय व्हॅलेंटाइन डे?’
‘तेच म्हणतोय मी! तुम्हाला ‘व्हॅलेंटाइन डे’चा फारच मर्यादित अर्थ दिसतो आणि जाणवतो ना, म्हणून हा सगळा घोटाळा आहे. आणि काय रे, आता तुम्ही ‘काका’ झाला आहात, तर तुमच्या बायकाही काकवा झाल्याच आहेत की...’
कान्हाचं हे वाक्य ऐकून मी दचकलो. याला चारचौघांत काय बोलावं आणि काय उच्चारावं याचं काही भानच नाही. विशेषत: ‘तुमच्या बायका’ हा बहुवचनी उल्लेख अस्मादिकांना किंचित सुखावून, पण बराचसा दुखवून गेला होता. वर हा आमच्या बायकांना काकूबाई म्हणत होता. मुळात असली वाक्यं मोठ्यानं कशाला बोलावीत? मार खाण्याची लक्षणं... पण कान्होबाचं अजिबात तिकडं लक्ष नव्हतं.
‘कामिनी...’ कान्हा थंडपणे उच्चारता झाला. तेवढ्यात शेजारून एक स्वयंघोषित रूपगर्विता जाता जाता ठेचकाळली.
‘कामिनी’त काना जास्त पडला की काय, असा एक भयंकर व्याकरणी विचार मनात येऊन गेला. पण बाई इंग्लिशमधून दोन-तीन उच्चविद्याविभूषित शिव्या हासडून पुढं गेल्या, तेव्हा दोष कान्हाच्या उच्चाराचा नसावा, हे कळलं. कान्हा स्थितप्रज्ञ होता.
‘अरे, हळू बोल. कोण कामिनी?’
‘समोरून तिसरं टेबल. डावा कोपरा... थर्ड इयरला सेकंड सेमिस्टरला भेटली होती.... गोव्याच्या सहलीत हिनं पम्याचा पाय आणि पापड एकदमच मोडला होता...’
एखाद्या ज्ञानकोशानं स्वत:हून माहिती सांगावी तसा कान्हा त्या कोणा कामिनीची कुंडली माझ्यासमोर उलगडता झाला. कान्हाच्या एकूण आयुष्यात आलेल्या, गेलेल्या, टिकून राहिलेल्या, मधल्याच स्टेशनवर चढलेल्या, स्प्रेसारख्या काही काळ सुगंध पसरवून विरून गेलेल्या, मुरलेल्या लोणच्यासारख्या, सर्दीसारख्या सात दिवस टिकलेल्या अशा समस्त बायकांची यादी त्यानंच केली असती, तर महाराष्ट्राला वेगळा स्त्रीकोश करायची गरजच भासली नसती. एवढा अनुभव गाठीशी असलेला कान्हा पाहून मला त्याच्याच नावाने एक मराठमोळा ‘कान्हा डे’ सुरू करावा, अशी कल्पना चाटून गेली.
कान्हा बोलतच होता, ‘आता ही कामिनीच बघ. तेव्हा हजार जण हिच्या मागे असावेत. तेव्हा हिनं भाव दिला नाही. आता ही किमान हजार जणांच्या मागे असेल. पण हिला कुणी भाव देत नाही... त्यामुळं आपला व्हॅलेंटाइन योग्य वयातच पार पडला पाहिजे...’
हे वर्णन खरं तर कान्हालाही लागू होत होतं. पण मी त्याला ऐकवायचं धैर्य करू शकलो नाही. (आमचं बिल नेहमी तोच देतो.) मात्र, दांडग्या अनुभवाच्या जोरावर कान्हा मला वाट्टेल ते ऐकवू शकत होता. माझं काम फक्त ऐकून घेण्याचं होतं.
कान्होबा महाराज प्रवचन देते जाहले, ‘प्रेम करण्यासाठी वयाची गरज नसते. उलट आता चाळिशीत आपल्या जोडीदाराची जास्त गरज असते. करिअरमध्ये विशिष्ट टप्पा आलेला असतो. मुलं मोठी झालेली असतात. आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. अशा वेळी एकच गोष्ट आपल्याजवळ नसते, ती म्हणजे एकमेकांना द्यायचा वेळ. तेव्हा व्हॅलेंटाइन डेची गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमचा वेळ दिला पाहिजे. या वयात तुम्ही समाजात काही-एक स्थान मिळवलेलं असतं. काही वेळा तुमचं नावही होतं. अनेक लोक तुम्हाला ओळखू लागतात. तुमच्या पदाला, प्रतिष्ठेला समाजात किंमत असते, मान असतो, प्रतिष्ठा असते. मग त्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी अनेक जण तुमच्याशी ओळख वाढवू लागतात. त्यात अनेक जणीही आल्याच. मग गुंते होण्याची शक्यता वाढते. तेव्हा हे सगळं मायाजाल नक्की काय आहे, हे समजून घ्यावं लागतं. आकर्षण नक्की कोणाचं आहे? तुमचं की तुमच्या वलयाचं, हे कळून घ्यावं लागतं.’
कान्हा फारच विलक्षण काही तरी बोलत होता. मला चक्क त्याच्याविषयी आदर वाटू लागला. एवढ्या बायका त्याच्या ओळखीच्या कशा, याचं कोडं सुटतंय असं वाटू लागलं. तेवढ्यात एक ‘सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी’ येऊन कान्हाला कॅडबरी देऊन गेली. अजून एक काकूसदृश महिला येऊन कान्हाचा चक्क गालगुच्चा घेऊन गेल्या. पण मला आता त्याचं विशेष काही वाटेनासं झालं होतं.
‘मुळात प्रेम ही संकल्पना किती व्यापक आहे! चराचरांत व्यापून प्रेम दशांगुळे उरतंच...’ कान्हा आता छताकडे पाहून बोलत होता. तेव्हा त्यानं बोलण्यातली आध्यात्मिक पातळी गाठली, हे मी ओळ‌खलं. कान्होमहाराज वदले, ‘अशा प्रेमाला कुठल्या तरी ‘डे’ किंवा आठवड्यात अडकवणं मला हास्यास्पद वाटतं. मात्र, प्रतीकात्मक म्हणून तुम्हाला हा सण साजरा करायचाच असेल, तर त्याचं मर्म आधी समजावून घ्या. उगाच फुलं, कॅडबऱ्या आणि सेंटच्या बाटल्या यांच्यावर खर्च करू नका. आता तसंही तुमच्याकडून जरा जास्तीची अपेक्षा असते. तेव्हा जरा हिरे, प्लॅटिनमचं बघा... गमतीचा भाग सोड, पण अरे, खरंच, जरा वेगळा विचार करून पाहा. आता या वयातल्या प्रेमाला घेण्यापेक्षा देण्याची जास्त गरज असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्यायचा असतो तो वेळ, विश्वास आणि कुठल्याही अडचणीत पाठीशी उभं राहण्याचा खंबीर पाठिंबा... मग बघ... प्रेम कसं मुरंब्यासारखं मुरत मुरत गोड होत जातं ते...’
कान्हाच्या या व्याख्यानानंतर मी वेळ, विश्वास आणि पाठिंबा घेऊन घरी निघालो, तर कान्हानं रस्त्यात आल्या आल्या समोरच्या एका देखण्या अंगाकडं बघून जोरात शिट्टी मारली. मी पळायच्या बेतात होतो तोच मला पकडून कान्हा म्हणाला, ‘नीट बघ हिच्याकडं... रश्मी आठवतेय का अकरावी सायन्सची?’
मी कान्हाच्या पाया पडलो आणि त्या तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यातून, जरा अधिक तरुण होऊन वाहत निघालो...

---

(पूर्वप्रसिद्धी : मटा मैफल पुरवणी, पुणे आवृत्ती; १५ फेब्रुवारी २०२०)

---

13 Feb 2020

सुषमा स्वराज लेख - समतोल दिवाळी अंक १९

सुभाषिणी, रणरागिणी...
-----------------------------




राजकारणी लोकांकडं बघण्याचा आपला भारतीय लोकांचा दृष्टिकोन जरा तिरकस आणि तुच्छतेचाच. आदर वाटावा असे फार कमी चेहरे आता राजकारणात उरले आहेत, हेही खरंच. पण सुषमा स्वराज यांच्याकडं पाहिलं की, कसं प्रसन्न वाटायचं! अत्यंत शालीन, सोज्ज्वळ आणि तेजस्वी असा त्यांचा चेहरा पाहिला, की एखाद्या देवीचंच मूर्त रूप आपण पाहतो आहोत, असं वाटायचं. कधी कधी आपल्या आईचा, मावशीचा किंवा प्रेमळ आत्याचाही भास त्यांच्यात व्हायचा. त्यांचं हे असं थेट लोकांशी जोडलं जाणं खूप गोड होतं. त्यामुळंच पक्षाची मर्यादा ओलांडून सर्व जनतेला त्या आपल्याशा वाटायच्या. सुंदर गोल चेहरा, त्यावरचं ठसठशीत कुंकू, आदबशीर पद्धतीनं शरीर झाकून घेतलं जाईल अशी नेसलेली साडी, त्यावर स्वेटर अशा रूपातल्या सुषमा स्वराज प्रथमदर्शनी राजकारणी व्यक्ती वाटायच्याच नाहीत. त्यांचं हे 'अस्सल भारतीय नारी'चं रूप अनेकांना मोहवून टाकणारं आणि त्यांच्याकडं सहज आकर्षून घेणारं होतं. विशेष म्हणजे हे आकर्षण आदरयुक्त असे. त्यात असलाच तर भक्तिभावाचा अंश असे. स्त्रीकडं एरवी बघितलं जातं, तशा आकर्षणाचा त्यात लवलेशही नसे. याचं कारणही पुन्हा सुषमा स्वराज यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना कायमच पाळलेली एक सभ्यतेची मर्यादा! त्यामुळं त्यांचा कथित शत्रूदेखील त्यांच्याकडं वावग्या भावनेनं बघू शकायचा नाही. राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपल्या ऋजू, पण कणखर स्वभावाच्या आधारे सुषमा स्वराज यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व उभं राहिलं होतं. या सर्व व्यक्तिमत्त्वाच्या वर दशांगुळे उरेल असं होतं ते त्यांचं वक्तृत्व! 'सुहासिनी, सुमधुरभाषिणी' या 'वंदे मातरम्'मधल्या ओळी जणू ज्यांच्यासाठी लिहिल्या असाव्यात असं वाटावं, अशा सुषमा स्वराज होत्या.
भारतीय राजकारणात महिलांनी एवढं उत्तुंग स्थान गाठणं तसं नवं नव्हतं. याचं कारण इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेल्या होत्या. मात्र, इंदिरा गांधींचा वारसा वेगळा होता. त्या जवाहरलाल नेहरूंची कन्या होत्या. सुषमा स्वराज यांच्यामागे एवढा उत्तुंग वारसा नव्हता. मात्र, तरीही त्यांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारणात मोठं स्थान मिळवलं. परराष्ट्रमंत्रिपदापर्यंत मजल मारली. या पदावर काम करताना केवळ राजकारणात नव्हे, तर देश-परदेशांतील भारतीयांच्या मनात त्यांनी खास स्थान मिळवलं. म्हणून तर त्यांचं निधन झालं, तेव्हा अवघ्या देशातच आपल्या घरातलं कुणी तरी गेलंय, अशी भावना निर्माण झाली होती.
सुषमा स्वराज यांच्या जीवनपटाकडं एक दृष्टिक्षेप टाकला असता, त्यांच्या यशोगाथेची काहीशी कल्पना येऊ शकेल. त्यांचा जन्म व्हॅलेंटाइन डेचा. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश देणाऱ्या संत व्हॅलेंटाइनच्या जन्मदिनीच सुषमा स्वराज यांचा जन्म व्हावा, हा आगळा योगायोग म्हणावा लागेल. याचं कारण पुढील सर्व आयुष्यात सुषमा यांनी जनतेचं भरपूर प्रेम मिळवलं आणि आपल्या देशावर, धर्मावर, पक्षावर मनःपूत प्रेम केलं. हरियाणातल्या अंबाला कँटोन्मेंट या शहरात १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी या दाम्पत्याच्या पोटी सुषमांचा जन्म झाला. हे शर्मा कुटुंब मूळचं लाहोरमधील धरमपुरा परिसरातलं. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात स्थलांतरित झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण पाच वर्षांनी सुषमांचा जन्म झाला. अंबाला कँटोन्मेंट येथील सनातन धर्म कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. संस्कृत आणि राज्यशास्त्र हे मुख्य विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढील आयुष्यात सुषमा यांनी अतिशय शुद्ध, तुपात घोळलेल्या संस्कृतप्रचुर हिंदी भाषेवर जी पकड मिळविली, तिचं मूळ त्यांच्या या संस्कृतच्या अभ्यासात असावं. चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात त्यांनी पुढचं, कायद्याचं शिक्षण घेतलं. याच काळात सुषमा यांच्यामधला वक्ता बहरू लागला होता. कॉलेजात असताना सलग तीन वर्षं उत्कृष्ट हिंदी वक्ता हा पुरस्कार त्यांनी पटकावला होता.
मुळात अत्यंत बुद्धिमान असलेल्या या मुलीनं कायद्याची पदवी संपादन केल्यावर थेट दिल्लीत सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. याच काळात तिची भेट झाली ती स्वराज कौशल या भावी जोडीदाराशी. तत्पूर्वी सुषमा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत झाल्याच होत्या. स्वराज कौशल यांचे तेव्हाचे फायरब्रँड समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. स्वराज यांच्यामुळे सुषमाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या वकिलांच्या टीममध्ये काम करू लागल्या. इंदिरा गांधी यांच्या सरकारविरुद्ध तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 'संपूर्ण क्रांती' आंदोलन सुरू होतं. जॉर्ज या आंदोलनात सक्रिय होते. भूमिगत राहून ते अनेक कारवाया करीत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांचा देशातला सर्वांत मोठा संप याच काळात त्यांनी घडवून आणला होता. इंदिरा गांधी यांचं सरकार हात धुऊन फर्नांडिस यांच्या मागे लागलं होतं. फर्नांडिस यांनी सगळ्या सरकारी यंत्रणांना सळो की पळो करून सोडलं होतं. देशभर त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व काळात सुषमा जॉर्ज यांच्या लीगल टीमच्या सभासद म्हणून सक्रिय कामगिरी बजावत होत्या. त्यांचा स्वतःचा स्वभावही स्वस्थ बसणारा नव्हता. त्यांनीही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उडी घेतली. देशाची पंतप्रधान एक महिला होती. तिच्या 'हुकूमशाही'विरुद्ध अनेक जण एकवटले होते. अवघ्या पंचविशीची सुषमा हे सगळं बघत होती. तिच्या राजकीय कारकिर्दीची दिशा अगदी स्पष्ट होती. तिचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे कार्यकर्ते होते. घरात काँग्रेस विरोधाची परंपराच होती. देशाच्या राजकारणात हे ऐंशीचं दशक अत्यंत धगधगतं आणि अस्वस्थ दशक मानलं जातं. सुषमा स्वराज यांच्या ऐन तरुणाईची वर्षं याच दशकात गेली. आणीबाणीचा स्फोटक काळही त्यांनी अनुभवला. देशाच्या प्रमुखांची देशातील जनतेशी नाळ तुटली की काय होतं, याचं दर्शन त्या जवळून घेत होत्या. पुढील काळात सुषमा यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली आणि देशातील सामान्य जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
अखेर आणीबाणी संपली आणि निवडणुकांची घोषणा झाली. सुषमा यांनी अवघ्या पंचविशीत अंबाल्यातून निवडणूक लढविली आणि त्या हरियाणा विधानसभेत आमदारही झाल्या. हरियाणात देवीलाल यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. या तरुण, तडफदार मुलीचं कर्तृत्व आणि वक्तृत्व पाहून देवीलाल यांनी तिला लगेच आपल्या मंत्रिमंडळात घेतलं. अशा रीतीनं सुषमा केवळ पंचविशीत मंत्री झाल्या. जुलै १९७७ मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पुढं जनता पक्ष विखुरला. केंद्रातील सत्ताही गेली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळ जनसंघाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. सुषमा स्वराज यांचा निर्णय ठरलेला होता. त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. सुरुवातीचा समाजवादी धागा आता गळून पडला आणि त्यांना आपली नेमकी दिशा ठरविता आली. भाजपची सगळी सूत्रं आता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघा धुरिणांकडं आली होती. पक्षात नकळत वाजपेयींचा नेमस्त, तर अडवाणींचा जहाल असे दोन गट असल्यासारखे होते. सुषमा प्रथमपासून अडवाणी गटाच्या म्हणून ओळखल्या जात. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली आणि त्यानंतर चारच वर्षांत इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. ही त्या पक्षाची सर्वांत वाईट कामगिरी. त्यानंतर मात्र पक्षाची कामगिरी दर निवडणुकीगणीक सुधारत गेली. सुषमा स्वराज या सर्व प्रवासात पक्षासोबत होत्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडली. राजीव गांधींचं सरकार १९८९ च्या निवडणुकीत पराभूत झालं आणि देशात पुन्हा एक अस्वस्थतेचं, अशांततेचं पर्व सुरू झालं. सुषमा १९८७ ते १९९० या काळात हरियाणात भाजप-लोकदल युतीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होत्या. मात्र, १९९० मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रीय राजकारणात आणलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, अनंतकुमार, वेंकय्या नायडू ही तेव्हाची भाजपची दुसरी फळी तयार होत होती. अडवाणींनी राममंदिरासाठी १९९० मध्ये रथयात्रा काढली. तेव्हा अडवाणी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. देशभर त्यांना प्रचंड पाठिंबा व लोकप्रियता लाभत होती. या आंदोलनाची परिणती पुढं बाबरी मशीद पाडण्यात झाली आणि देशाच्या राजकारणाची चौकट कायमची बदलून गेली. सुषमा स्वराज हे सगळं पाहत होत्या. देशात अस्थिरता होतीच, पण आर्थित सुधारणांचंही पर्व सुरू झालं होतं. नरसिंह राव सरकारनं १९९६ मध्ये आपली पाच वर्षं पूर्ण केली आणि देशात पुन्हा निवडणुका आल्या. या वेळी सुषमा दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आणि वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद लाभलं. सुषमा स्वराज लोकसभेत आल्या आणि त्याच काळात लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण 'दूरदर्शन'वरून दाखवायला सुरुवात झाली. सुषमा यांच्यातील वक्त्याला ही मोठीच संधी मिळाली. त्यांनी या संधीचं पुरेपूर सोनं केलं आणि आपल्या बुलंद आवाजात, आत्मविश्वासानं त्या पक्षाची भूमिका संसदेत मांडू लागल्या. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या भाषणांना 'टीआरपी' मिळू लागला. लोकसभेत त्या बोलणार म्हटल्यावर घरोघरी लोक, विशेषतः स्वयंपाकघरातील महिलाही, काम बाजूला ठेवून टीव्हीपुढं बसू लागल्या. 'वाजपेयी हा भला माणूस आहे, त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याची एक संधी तरी मिळाली पाहिजे,' अशी जी सामूहिक जनभावना त्या काळात देशात तयार झाली, त्यात सुषमा स्वराज यांच्या तळमळीनं केलेल्या अनेक भाषणांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे.
पक्ष आदेश देईल ती भूमिका पार पाडायची, हे तत्त्व सुषमा स्वराज यांनी कायम पाळलं. त्यामुळं १९९८ मध्ये त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार अगदी अल्पकाळ दिल्लीचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं. तेव्हा दिल्लीत कांद्याच्या भावानं उच्चांक गाठला होता. त्याचा फटका भाजपला बसला आणि त्यांना हे राज्य गमवावं लागलं. पुढं शीला दीक्षितांनी पुढची १५ वर्षं दिल्लीवर आपली पकड कायम ठेवली. या पराभवामुळं एकच झालं. सुषमा परत केंद्रीय राजकारणात आल्या. त्यांची क्षमता, वकूब, आवाका बघता त्यांनी राष्ट्रीय राजकारणातच असायला हवं होतं. यानंतर त्या कायम केंद्रातच राहिल्या. वाजपेयींना १३ दिवसांनंतर सत्ता गमवावी लागली, त्यानंतर आलेल्या देवेगौडा सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात सुषमांनी केलेलं घणाघाती भाषण आजही लोकांच्या लक्षात आहे. विरोधकांच्या दुटप्पीपणाचा, दांभिकपणाचा त्यांना आलेला सात्त्विक संताप त्यांच्या वाक्यावाक्यातून एखाद्या अंगारासारखा बाहेर पडत होता. शरद पवारांना त्यांनी 'ललिता पवारां'ची दिलेली उपमा ऐकून सभागृहात एकच हशा पिकला होता. पुढं देवेगौडा व गुजराल ही दोन्ही सरकारं पडली आणि वाजपेयींचं तेरा महिन्यांचं सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्येही त्यांना माहिती व प्रसारण खातं मिळालं. जोडीला दूरसंचार खात्याचा अतिरिक्त भारही त्यांनी काही महिने सांभाळला. या काळात त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे चित्रपटसृष्टीचा त्यांनी दिलेला उद्योगाचा दर्जा. त्यामुळं वित्तीय कंपन्यांकडून चित्रपट निर्माता कंपनीला कर्ज घेणं शक्य झालं. चित्रपटसृष्टीतील काळ्या पैशाचं प्रमाण कमी झालं आणि बरेचसे व्यवहार लेखापरीक्षणाच्या देखरेखीखाली आले. यामुळं छोट्या निर्मात्यांनाही फायदा झाला आणि उत्तम आशय असलेले, पण छोट्या बजेटचे अनेक चित्रपट पुढं येऊ लागले. स्वराज यांची ही कामगिरी आपल्या चित्रपटसृष्टीनं कधीही विसरता कामा नये. याच काळात स्वराज यांनी विद्यापीठं आणि इतर बड्या शैक्षणिक संस्थांमध्ये कम्युनिटी रेडिओ केंद्रं सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाजपेयी यांचं तेरा महिन्यांचं सरकार पडलं आणि १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक जाहीर झाली. या वेळेपर्यंत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सूत्रं हाती घेतली होती. सोनियांनी रायबरेलीसोबतच कर्नाटकातील बळ्ळारीमधूनही निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं, तेव्हा भाजपनं त्यांच्याविरुद्ध सुषमा स्वराज यांना बळ्ळारीतून लढायला सांगितलं. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून सुषमांनी बळ्ळारीत तळ ठोकला. अगदी थोड्या काळात त्यांनी कन्नड भाषा शिकून घेतली आणि सोनियांना जोरदार लढत दिली. ही निवडणूक त्या हरणार होत्या, हे त्यांनाही माहिती होतं. मात्र, त्यांच्या झंझावाती प्रचार सभांनी काही काळ विरोधकांनाही स्तिमित केलं होतं. याच काळात बळ्ळारीतील खाणसम्राट व कुख्यात रेड्डीबंधूंबाबत बोलताना सुषमा स्वराज 'ते आपल्या भावासारखे आहेत,' असं बोलून गेल्या. पुढं या रेड्डी बंधूंचे एकेक प्रताप उघडकीस आल्यावर त्यांच्याबरोबरचे जवळिकीचे संबंध सुषमा स्वराज यांना त्रासदायक ठरले. अर्थात त्या त्यातून लवकरच बाहेर पडल्या. लोकसभा निवडणुकीत हरल्यावर पक्षानं त्यांना तेव्हा नव्यानं निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर आणलं. वाजपेयींनी त्यांच्याकडे पुन्हा त्यांचं आवडतं माहिती व प्रसारण खातं सोपवलं. हे खातं त्यांनी जवळपास अडीच वर्षं पाहिलं. जानेवारी २००३ मध्ये वाजपेयींनी त्यांना आरोग्य, कुटुंबकल्याण व संसदीय कामकाज या खात्यांची जबाबदारी सोपविली. आरोग्यमंत्री असताना त्यांनी देशात सहा ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारल्या. तोवर ही संस्था केवळ दिल्लीतच होती.
वाजपेयींच्या सरकारला 'शायनिंग इंडिया' मोहिमेचा फटका बसला आणि हे सरकार २००४ च्या निवडणुकीत पराभूत झालं. काँग्रेसला मित्रपक्षांच्या मदतीने बहुमत मिळालं, तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं, अशी मागणी काँग्रेसजनांनी सुरू केली. तेव्हा त्यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत होता. सुषमा स्वराज यांनी तेव्हा अचानक, त्यांच्या संयमित स्वभावाच्या विरुद्ध भूमिका घेऊन, 'सोनिया पंतप्रधान झाल्या, तर मुंडण करीन,' अशी घोर प्रतिज्ञा जाहीररीत्या करून सर्वांनाच धक्का दिला. पुढं सोनिया गांधींनी 'आतला आवाज' ऐकून पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. स्वराज यांच्यावर मुंडण करण्याची वेळ काही आली नाही. पुढं कालांतरानं सोनिया आणि त्यांच्यातला दुरावा कमी होत गेला आणि नंतर त्या चांगल्या मैत्रिणीही झाल्या. पुढं २००६ मध्ये त्या तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या आणि पुढची लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्या राज्यसभेत विरोधी उपनेत्या म्हणून कार्यरत राहिल्या.
सन २००९ ची लोकसभा निवडणूक आली, तेव्हा वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळं राजकीय जीवनातून बाहेर पडले होते. ही निवडणूक पक्षानं लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढविली. मात्र, भाजपला अपयश आलं आणि पुन्हा काँग्रेस पक्षच सत्तेवर आला. मनमोहनसिंग पुन्हा पंतप्रधान झाले. या निवडणुकीत सुषमा स्वराज वाजपेयींच्या मध्य प्रदेशातील विदिशा या मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि मोठ्या मताधिक्यानं निवडूनही आल्या. लोकसभेत अडवाणींच्या जागी सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या हे अत्यंत महत्त्वाचं पद पक्षानं दिलं. ती पाच वर्षं त्यांनी 'यूपीए-२' सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी सळो की पळो करून सोडलं. कॉमनवेल्थ, टूजी स्पेक्ट्रम असे अनेक घोटाळे याच काळात उघडकीस येत होते आणि सुषमा स्वराज एखाद्या रणरागिणीच्या थाटात आपली मुलूखमैदान तोफ विरोधकांवर सतत डागत होत्या. या सरकारला आपल्या तीव्र टीकास्त्रांनी त्यांनी सर्वाधिक घायाळ केलं.
तोवर पुढची निवडणूक येऊन ठेपली होती. भाजपकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी आता नरेंद्र मोदींना मिळाली होती. मोदींच्या झंझावातामुळं २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला आणि भाजप स्वबळावर सत्तेवर आला. मोदींच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांना परराष्ट्रमंत्री म्हणून महत्त्वाचं स्थान मिळालं. इंदिरा गांधींनंतर हे पद भूषविणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या. सुषमा स्वराज यांनी पाच वर्षं अतिशय उत्तम पद्धतीनं हे पद सांभाळलं. सामान्य जनतेपासून दूर असणारं हे खातं त्यांनी सामान्यांना आपलंसं वाटेल, असं बदलवून टाकलं. ट्विटरसारख्या सोशल मीडियमचा उत्कृष्ट वापर करून घेत, त्यांनी जनतेशी संवाद सुरू केला. आपल्या प्रश्नाला परराष्ट्रमंत्र्यांकडून तातडीनं प्रतिसाद मिळतो हे पाहून परदेशात अडीअडचणीत सापडलेल्या अनेक लोकांनी थेट ट्विटरवर सुषमांशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुषमा स्वराज स्वतः त्यांना उत्तरं देत आणि त्यांच्या अडचणींचं तातडीनं निराकरण करीत. यामुळं अनिवासी किंवा सदैव परदेशांत प्रवास करणाऱ्या भारतीयांत त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. पाकिस्तानात अडकलेल्या २३ वर्षीय गीता या मूकबधीर तरुणीला भारतात परत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक लोकांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले. युनोपासून ते अमेरिका, युरोप आदी सर्व देशांत, खंडांत त्या फिरल्या. भारताची बाजू कायम खणखणीत, सुस्पष्ट आणि संयमित भाषेत मांडण्याचं त्यांचं कसब सर्वांची मनं जिंकून घेत असे.
अशा रीतीनं कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना आजारपणानं गाठलं. त्यांना मधुमेह होताच. सन २०१६ मध्ये त्यांची किडनी बदलण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. मोदी सरकारनं २०१९ मध्ये पुन्हा प्रचंड विजय मिळविला. मात्र, सुषमांनी मोदींना पत्र लिहून आपल्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळं मंत्रिपद नको असल्याचं कळवलं. मंत्रिपद सोडताच त्यांनी सरकारी बंगला सोडला व त्या आपल्या खासगी निवासस्थानी राहायला गेल्या. आयुष्यभर पाळलेली नीतिमत्ता, तत्त्वे त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाहीत. ऑगस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि ते मंजूरही झालं. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ट्विट करून मोदी व शहांचे अभिनंदन केलं. 'मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहिली,' असं भावपूर्ण निवेदन त्यांनी केलं होतं. कदाचित त्यांचे प्राण यासाठीच थांबले असावेत. कारण थोड्याच वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला व काही तासांतच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. अगदी अकाली त्या हे जग सोडून गेल्या.
त्यांच्या निधनानंतर सर्व देश हळहळला. आपल्या घरातील जवळची मावशी, आई, काकू, आत्या असं कुणी तरी गेल्याचं दुःख सगळ्यांना झालं. सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं आपण काय गमावलं? सुसंस्कृत पद्धतीनं राजकारण करता येतं, हे सप्रमाण सिद्ध करणारे लोक फार थोडे उरले आहेत. त्यापैकी सुषमा एक होत्या. अत्यंत अभ्यासपूर्ण, संयमित रीतीनं वक्तृत्व गाजवून लोकशाहीत विरोधकांना नामोहरम करता येतं, हे दाखवणारी हे रणरागिणी आपल्यातून निघून गेली. आपण राजकारणात जावं, कर्तृत्व गाजवावं, असं जिच्याकडून बघून आजच्या तरुणाईला वाटू शकतं, अशी एक व्यक्ती गेली. एका व्यक्तीच्या जाण्यानं एवढा फरक पडू शकतो. सुदैवानं सुषमा स्वराज यांची बरीचशी भाषणं आता इंटरनेटच्या साह्यानं बघता येतात. ती भाषणं पाहताना कधी तरी डोळे ओलावले, तर राजकारणापलीकडं पोचलेल्या त्यांच्या उत्तुंग, शालीन व्यक्तिमत्त्वाला आपल्यातल्या माणुसकीनं केलेला तो सलाम असेल...

----

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक, २०१९)

---

4 Feb 2020

रिव्ह्यू - १९१७

युद्धाकडून बुद्धाकडे...
---------------------------



युद्ध म्हणजे हिंसा, युद्ध म्हणजे अविश्वास, युद्ध म्हणजे दुसऱ्याला अंकित करण्याची भावना, युद्ध म्हणजे माणसातलं माणूसपण संपविणारी विखारी गोष्ट! माणसाच्या अस्तित्वापासून युद्ध त्याच्या राशीला बसलंच आहे. स्वरूप बदलत गेलं असेल, पण प्रत्येक पिढीला युद्धाचा भोग अटळ आहे. सिनेमाची कला अस्तित्वात आली तेव्हापासून माणसाला युद्धाचा, युद्धामागच्या मानसिकतेचा, युद्धातील थराराचा आणि त्यातल्या विद्धतेचा अनुभव शोधावासा वाटतो आहे. त्यामुळेच गेल्या शंभर वर्षांत अनेक युद्धपट आले, आजही येत आहेत आणि पुढंही येत राहतील. मात्र, यातले फारच थोडे आपल्या मन:पटलावर कोरले गेले आहेत. सॅम मेंडिसचा ‘१९१७’ हा आत्ता प्रदर्शित झालेला युद्धपट निर्विवादपणे या मोजक्या चित्रपटांच्या यादीत जाऊन बसतो.

SPOILER ALERT

नावावरूनच आपल्याला समजतं, की पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे ६ एप्रिल १९१७ रोजी घडलेली ही कथा आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांचे जर्मनांबरोबर युद्ध सुरू आहे. ब्रिटिशांच्या एका तुकडीत असलेल्या टॉम ब्लेक आणि विल्यम श्कोफिल्ड या दोघा लान्स नाईक असलेल्या सैनिकांवर एक कामगिरी सोपविली जाते. टेलिफोनच्या वायर तुटलेल्या असल्याने काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या ब्रिटिश पलटणीला हल्ला थांबविण्यासाठीचा हा निरोप असतो. जर्मन सैन्याच्या जाळ्यात ब्रिटिशांची पलटण फसू नये आणि १६०० सैनिकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत म्हणून तातडीने हा निरोप तिकडे पोचवणं गरजेचं असतं. टॉम आणि विलचे वरिष्ठ अधिकारी या दोघांवर ही जबाबदारी सोपवतात. ‘नो मॅन्स लँड’ ओलांडून जर्मनांनी कब्जा केलेल्या फ्रान्सच्या भागातून त्यांना हा प्रवास करायचा असतो. या प्रवासाची कथा म्हणजे हा सिनेमा....
सॅम मेंडिस पहिल्या फ्रेमपासून आपल्याला १९१७ च्या त्या युद्धकाळात नेतो. एक सेकंदही फ्रेमवरून नजर ढळत नाही, एवढी पकड हा सिनेमा घेतो. हा प्रवास म्हणजे केवळ त्या दोन सैनिकांचा प्रवास उरत नाही, तर त्यांच्यासोबत आपणही तो प्रवास करू लागतो. यासाठी ‘वन शॉट’मध्ये हा सिनेमा चित्रित केल्याचा आभास दिग्दर्शकानं तयार केला आहे. त्यामुळं पडद्यावरच्या प्रवासाची सलगता आपल्या मनातही कायम राहते. याला सोबत आहे ती अत्यंत प्रभावी अशा पार्श्वसंगीताची. थॉमस न्यूमनचं संगीत आपल्याला त्या प्रत्येक क्षणामध्ये ‘‌फ्रीज’ करून ठेवतं. त्या प्रवासातली संकटं, समोर पावलापावलावर उभा असलेला साक्षात मृत्यू, आसपास पडलेले सैनिकांचे, घोड्यांचे मृतदेह या सगळ्या भयावह दृश्यांचा परिणाम त्या पार्श्वसंगीताच्या अफाट जोडीमुळं अक्षरश: मेंदूत घुसतो.
या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत. जे आहेत ते अगदी मोजके. त्याउलट युद्धभूमीचं अक्राळविक्राळ रूप दाखविणाऱ्या दृश्यांची अगदी रेलचेल! खंदक, बंकर, भूसुरुंग, ठिकठिकाणी उद्ध्वस्त झालेली घरं वा इमारती, खचलेले रस्ते, पडलेले पूल आणि यातून आपला जीव वाचवत चाललेले हे दोन ताठ कण्याचे ब्रिटिश सैनिक... दिग्दर्शक एकेका दृश्यातून आपल्या मनावर अशी पकड बसवत जातो, की नंतर पडदा आणि आपला सभोवताल यातलं अद्वैत नष्ट होऊन जावं. पहिल्या बंकरमध्ये झालेला स्फोट आणि नंतर एक जर्मन विमान या दोघांच्या अगदी शेजारी येऊन आदळतं, ती दोन्ही दृश्यं म्हणजे सिनेमॅटोग्राफीची कमाल आहे.
इतर युद्धपटांतला आणि या चित्रपटातला फरक म्हणजे दिग्दर्शकानं या कथेला दिलेला मानवी चेहरा. युद्धाची निरर्थकता सतत ठसवत, माणसातल्या माणूसपणाचा गजर यात दिसत राहतो. यातले सगळे सैनिक मानवी चेहरा असलेले आहेत. समोर शत्रू दिसला, की फक्त गोळी घालून त्याला ठार करणारे नाहीत. म्हणून तर आपल्या दोन नायकांपैकी एक त्या जर्मन पायलटला वाचवायला जातो. त्याचा परिणाम भयंकर होतो तो भाग निराळा. नंतर विलला ही लढाई एकट्यानं लढावी लागते, तेव्हाही त्या फ्रेंच गावात तो पोचल्यावर तिथल्या एका बंकरमध्ये लपलेली ती एक स्त्री आणि ती सांभाळत असलेली आणखीनच कुणाची तरी अगदी छोटी तान्हुली यांच्यातलं दृश्य कमालीचं ठसतं. विशेषत: वर जमिनीवर युद्ध सुरू असताना, जमिनीच्या खाली, बंकरमध्ये मिणमिणत्या प्रकाशात का होईना, माणसाचं माणूसपण रुजून आलं आहे, हे सांगणारं ते दृश्य मोहक आहे! अगदी सुरुवातीला पहिल्या बंकरमध्ये हे दोघं जातात तेव्हाही तिथल्या रिकाम्या बेडवर कुणा अनाम सैनिकानं ठेवलेला त्याच्या पत्नीचा व मुलीचा फोटो असाच लक्ष वेधून घेतो आणि काळीज हलवून जातो.
या सर्व चित्रपटभर दिग्दर्शकानं करडी छटा वापरली आहे. निरर्थकतेचा भकास रंग सगळीकडं भरून राहिला आहे. क्वचित कुठे युरोपातली ती सुंदर हिरवाई, झाडं, पानं-फुलं दिसतात. आजूबाजूला रक्ताचा लाल आणि हिंसेचा काळाकरडा रंग सांडलेला असताना त्या चेरीफुलांचं ते नैसर्गिक फुलणं अगदी मनावर ठसतं. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेममध्येही तो फ्रेश हिरवा, पिवळा रंग आहे आणि शेवटच्या दृश्यातही एका भक्कम झाडाखाली विल बसतो, तेव्हाही सकारात्मकतेचा हा हिरवा रंग सभोवती दिसतो. मुळात आपल्या कुटुंबासाठी त्या झाडाच्या भक्कम खोडासारखा आधार असलेला विल खिशातून आपल्या पत्नीचा व दोन मुलीचा फोटो काढून पाहतो, तेव्हा त्यामागं लिहिलेला ‘कम बॅक टु अस’ हा संदेश अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो.
याच फ्रेमवर चित्रपट संपतो आणि ‘युद्धाकडून बुद्धाकडे’ जाण्याचा आपलाही प्रवास पूर्ण झाल्याची एक संवेदनशील जाणीव मनाला होते. जॉर्ज मॅके या अभिनेत्यानं यातली विलची, तर डीन चार्ल्स चॅपमन या अभिनेत्यानं टॉमची भूमिका केली आहे. दोघेही आपापल्या भूमिका जगले आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. अन्य अभिनेत्यांनीही या दोघांना पूरक साथ दिली आहे. (ब्रिटिश सैनिकांच्या तुकडीत एक शीख सैनिकही दिसतो. त्याचे मोजके संवादही यात आहेत.)
हल्ली जगात सदैव युद्धाची, हिंसेची, एकमेकांचे प्राण घेण्याची भाषा केली जाते. विशेषत: युद्धाचा मुळीच अनुभव नसलेल्यांनाच ही खुमखुमी फार असते. एकदा तरी अशा महाभयंकर महायुद्धाचा अनुभव घेतलेला माणूस पुन्हा हिंसेची भाषा आयुष्यात करील, याची शक्यता नाही. अशा युद्धाचा जवळपास थेट, पण आभासी अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या विवेकी बुद्धीवरचा आणि ‘बुद्धा’वरचा विश्वास दृढ करण्यासाठी ‘१९१७’ पाहायलाच हवा.

----

दर्जा - साडेचार स्टार
---