30 Nov 2023

हंपी डायरी - भाग १

पाषाणशिल्पांच्या दुनियेत...
----------------------------------


हंपीला जायचं माझं स्वप्न अखेर पूर्ण झालं. साधारण २०१९ मध्ये आपल्याकडचे अनेक जण हंपीला जाऊन तिथले फोटो टाकताना पाहिले, तेव्हा मी फेसबुकवर ‘मी हंपीला अजून गेलेलो नाही, हा समाज मला माफ करणार का?’ अशा आशयाची पोस्टही टाकल्याचं आठवतं. त्यानंतरची दोन-तीन वर्षं ‘कोव्हिड’मध्येच गेली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हंपीला जायचं नक्की झालं. मी, धनश्री आणि सोबत माझा धाकटा आतेभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली असणार होती. अगदी तिकडचं बुकिंगही झालं. मात्र, तेव्हा बेळगावला सीमाप्रश्न पेटल्यानं वातावरण बिघडलं. आम्हाला आमची कार घेऊन जायचं असल्यानं आम्ही जरा घाबरून तिकडं जायचं रद्दच करून टाकलं आणि बरोबर उलट्या दिशेला म्हणजे, दमणला जाऊन आलो. मात्र, तेव्हाच पुढच्या वर्षी हंपी नक्की करायचं, हे ठरवून टाकलं. यंदा भावानं नवी नेक्सॉन कारही घेतली होती. त्यामुळं जाताना त्या कारनंच जायचं हेही आम्ही पक्कं ठरवलं होतं. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर असे चार दिवस ही ट्रिप केली. ट्रिप खूप छान झाली. मजा आली. हंपीत दोन दिवस कमीच पडले, असं वाटलं. शिवाय आम्हाला वेळेअभावी बदामी व पट्टदकल वगैरे काही बघता आलं नाही. त्यासाठी हंपीची आणखी एक ट्रिप नक्की करणार!
आम्ही शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याहून निघालो. आम्हाला ‘गुगल मॅप’वर सोलापूर, विजापूर (आता विजयपुरा) मार्गे रस्ता सुचवण्यात आला होता. मात्र, बेळगाववरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. मी बेळगावला शेवटचा १९९९ मध्ये साहित्य संमेलनाच्या कव्हरेजसाठी गेलो होतो. त्यानंतर अगदी याच वर्षी एप्रिलमध्ये गोव्याहून ट्रेननं येताना संध्याकाळी थोडा वेळ ट्रेनच्या दारातून बेळगावचं ओझरतं दर्शन झालं होतं. यंदाही आम्ही बेळगावात थांबणार नव्हतोच; पण तरी जाताना बेळगाव, हुबळी-धारवाडवरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. सकाळी दहा वाजता कऱ्हाडला पोचलो. ‘संगम’ला ब्रेकफास्ट केला. कऱ्हाडमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सध्या ट्रॅफिक जॅम होत असतो. मात्र, आम्ही सुदैवानं न अडकता बाहेर पडलो. कोल्हापूर, कागल ओलांडून आम्ही बाराच्या आसपास कर्नाटकात प्रवेश केला. कोगनोळी नाका ही दोन्ही राज्यांची सीमा. (खरं तर बेळगाव, निपाणी, संकेश्वर ही सगळी गावं आपलीच. त्यामुळं ही सीमा असं म्हणवत नाही. पण असो.) साधारण दीडच्या सुमारास आम्ही बेळगावात पोचलो. त्याआधी वंटमुरी हे गाव लागलं. मला एकदम ‘वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका’ आठवून हसायला आलं. बेळगावचं सगळं असोसिएशन ‘लंपन’मुळं आहे. इंदिरा संत हे आणखी एक कारण. शिवाय पुलंचे ‘रावसाहेब’ आहेतच. बेळगावात पोचताना आम्ही ‘रावसाहेब’ ऐकणार नाही, हे शक्यच नव्हतं. मनसोक्त हसतच आम्ही बेळगावात प्रवेश केला. खरं तर बायपासवरून आम्ही पुढं गेलो. हल्ली सर्व महामार्गांवर बायपास झाले आहेत. ते गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं सोयीचे असले, तरी त्यामुळं त्या त्या गावाचा फील घेता येत नाही. आमचंही तेच झालं. या वेळी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं बांधलेलं उंच टेकाडावरचं ते विधान सौध मात्र बघता आलं. मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून बांधलेलं असलं तरी आहे मात्र भव्य व देखणं! असो.
बेळगाव ओलांडलं. या भागात रस्त्याने मी प्रथमच जात होतो. हुबळी-धारवाडकडे निघालो होतो. हा एके काळी सगळा मुंबई इलाख्यातला भाग. तिकडं अजूनही याला ‘बॉम्बे कर्नाटक’ असंच म्हणतात. खरं तर माझं कुणीही नातेवाइक तिकडं नाही, ना माझा कुठला सांस्कृतिक-भावनिक धागा तिकडं जोडलेला आहे! पण का कोण जाणे, या भागाविषयी आपुलकी वाटते. आम्ही थोडं पुढं गेल्यावर रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जेवलो. साधंसं हॉटेल, पण स्वच्छ. जेवणही चांगलं होतं. भूक लागलीच होती. जेवून पुढं निघाल्यावर आता गाडी मी चालवायला घेतली. सकाळपासून साईनाथच ड्राइव्ह करत होता. आता त्याला जरा विश्रांती द्यायला हवी होती. आता आम्ही पुढं धारवाडकडं निघालो. या सगळ्या परिसराविषयी कितीदा काय काय वाचलेलं... धारवाडविषयीची आपुलकी जी. ए. कुलकर्णींमुळं असणार. बाकी पुलंच्या लेखनात इकडचे बरेच उल्लेख येतात. मग ते मल्लिकार्जुन मन्सूर असतील, भीमसेन जोशी असतील, गंगूबाई हनगल असतील... ही सर्व मंडळी याच भागातील. उत्तर कर्नाटक हा नैसर्गिकरीत्या तसा दुष्काळी भाग. मात्र, गुणवान कलाकार मंडळींचीही खाणच. धारवाड आधी लागलं. पण पुन्हा तेच. बायपासनं पुढं निघालो. गावाचा फील नाहीच लाभला. डावीकडं लांबवर दिसणाऱ्या त्या छोटेखानी शहराकडं बघत, मनातल्या मनात जीएंच्या स्मृतींना वंदन केलं. त्यात मी अलीकडं गिरीश कार्नाडांचं आत्मचरित्र वाचलं, त्यात धारवाडच्या फार सुंदर आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. सारस्वतांच्या त्या कॉलनीचं ते टेकाड बघायची फार इच्छा होती, पण नाइलाज होता. धारवाड ते हुबळी हा रस्ता अजूनही दोन लेनचाच आहे. आता तो चौपदरी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सतत कोंडी होत होती. आम्ही थोड्याच वेळात हुबळीला पोचलो. धारवाड-हुबळी ही तशी जोड-शहरंच. आपल्या पुणे व पिंपरी-चिंचवडसारखी. ही उत्तर कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रं. मला एकदा तिथं नीट राहून, शांतपणे चालत हिंडून ती गावं बघायची आहेत. पण या वेळेला निदान त्या गावांवरून जाता आलं, हेही नसे थोडके. हुबळी शहर डावीकडं ठेवून आम्ही पुढं निघालो. इथं आपण पुणे-बेंगळुरू महामार्ग सोडतो आणि डावीकडे गदग, कोप्पलकडे वळतो. हाच रस्ता पुढं होस्पेट, रायचूरकडे जातो. (पुढं आंध्रात...) इथं आमची थोडी गडबड झाली. आम्ही थोडं पुढं गेलो. मात्र, लगेच रस्ता सापडला आणि वळून आम्ही योग्य मार्गाला लागलो. हा रस्ता आता सिमेंटचा आणि चार पदरी, सुंदर झाला आहे. कर्नाटकातले बहुतेक महामार्ग, मोठे रस्ते आता चांगले, प्रशस्त आहेत. आम्ही थोड्याच वेळात गदगला पोचलो. इथेच भीमसेन जोशी जन्मले. गाव डावीकडे आणि आम्ही बायपासवरून पुढे. पुन्हा एकदा मनातल्या मनातच अण्णांच्या स्मृतींना वंदन केलं.
आता संध्याकाळ व्हायला लागली होती. आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो. कोप्पल ओलांडलं. खरं तर मी हंपीला निघालोय म्हटल्यावर आमचे मित्रवर्य किरण यज्ञोपवीत यांचा फोन आलाच होता. मागच्या वर्षीही आम्ही निघणार म्हटल्यावर किरणनं बऱ्याच टिप्स दिल्या होत्या. आताही त्यानं फोन करून कोप्पलला चांगली मंदिरं आहेत अशी माहिती दिली. मात्र, आमच्या वेळेत ते बसणार नव्हतं. कोप्पल सोडून आम्ही पुढं निघालो.आता होस्पेट जवळ आलं होतं. मात्र, पाच वाजल्यामुळं चहाचा ब्रेक गरजेचा होता. एक टपरी बघून थांबलो. तिथं एक जोडपं ते छोटेखानी हॉटेल चालवत होतं. त्यातल्या बाईला हिंदी कळत नव्हतं. मात्र, ती सफाईदार इंग्लिश बोलत होती. तिनं आम्हाला तिथली स्पेशालिटी असलेली ढोबळी मिरची घातलेली मसाला भजी घेण्याचा आग्रह केला. आम्ही एक प्लेट घेतली. ती गरमागरम आणि तिखट भजी भलतीच चवीष्ट, झणझणीत होती. मजा आली. नंतर मोठा कप भरून चहा घेणं आवश्यकच होतं. तिथून निघालो. पुढं एक फ्लायओव्हर लागला. डावीकडं जाणारा रस्ता विजापूरकडून येत असावा, असं मी साईनाथला म्हटलं. (नंतर परतीच्या प्रवासात माझा अंदाज बरोबर ठरला.) तिथं एक टोलनाका होता. तो पार केल्यावर होस्पेट आलंच. तोवर अंधार पडला होता. होस्पेट हे एक मध्यम आकाराचं शहर असल्याचं दिसलं. साधारण आपल्याकडच्या साताऱ्यासारखं! गुगल मॅप लावून दहा मिनिटांत आमचं हॉटेल शोधलं. हे हॉटेल साईनाथनं बुक केलं होतं. ते कसं असेल याची धाकधूक होती. मात्र, गावाच्या मध्यवर्ती रस्त्यावर आणि चार-पाच मजली हे प्रशस्त हॉटेल, खाली गजबजलेलं रेस्टॉरंट, पार्किंगमधल्या कारची विपुल संख्या (त्यात भरपूर ‘एमएच-१२’ होत्या, हे सांगणे न लगे...) बघून ‘हुश्श’ वाटलं. एखाद्या गावातलं, जुनं, प्रतिष्ठित असं एखादं हॉटेल असतं, तसं हे ‘प्रियदर्शिनी पार्क’ वाटलं. रिसेप्शनला बुकिंग दाखवून लगेच रूम ताब्यात घेतल्या. अत्याधुनिक सोयी असलेल्या, स्वच्छ रूम बघूनच फार बरं वाटलं. चौथ्या मजल्यावरच्या आमच्या रूमला गावाच्या दिशेनं उघडणारी बाल्कनी होती. तिथून सर्व शहराचा नजारा छान दिसत होता. लांबवर छोटेखानी टेकड्या दिसत होत्या. तेच हंपी असावं, असं मनातल्या मनात नोंदवून ठेवलं.
मागच्या वर्षी आमचं हंपीला जायचं ठरलं, तेव्हा गौरी लागूंच्या कन्येनं - मेघानं - मला तिथल्या मंजू नावाच्या गाइडचा नंबर दिला होता. तो माझ्याकडं होता. किरणनं आमच्यासाठी ज्या गाइडला फोन केला होता, तो बिझी होता. मग आमचं रात्रीचं जेवण झाल्यावर मी या मंजूला फोन केला. सुदैवानं तो दुसऱ्या दिवशी उपलब्ध होता. ‘आपण गाइड नसून, रिक्षाची सेवा देतो,’ हेही त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता भेटायचं ठरवलं. तो आमच्या हॉटेलवर येणार होता. आम्हीही दिवसभराच्या प्रवासानं दमलो होतोच.

विजयनगरच्या साम्राज्यात...

सकाळी आवरून खाली असलेल्या ‘नैवेद्यम्’ या आमच्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला गेलो. रविवार असल्यानं भरपूर गर्दी होती. निम्मे-अर्धे लोक मराठी होते. पहिल्या दिवशी टिपिकल इडली-वडा, उत्तप्पा, डोसा असा ठरलेला नाश्ता झाला. साडेसाठ वाजता मंजूबाबा आला. त्याच्याशी डील केलं. दोन दिवसांचे चौघांना रिक्षाने फिरवण्याचे पाच हजार रुपये ठरले. आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यानं आधी कमलापूर गाव ओलांडून अनेगुंदीच्या दिशेनं नेलं. जाताना उजव्या बाजूला कमलापूरचा सुंदर, मोठा तलाव दिसतो. डावीकडं थोडं खालच्या बाजूला केळीची शेती, नारळाची झाडं असं सुंदर दृश्य दिसतं. मंजू आम्हाला कमलापूरच्याही पुढं घेऊन गेला. तिथं माल्यवंत रघुनाथाचं मंदिर आहे. ते आधी पाहिलं. पहिल्याच मंदिराच्या दर्शनानं आम्ही अवाक झालो. छोट्याशा टेकडीवर असलेल्या त्या परिसरात सर्वत्र प्रचंड मोठ्या शिळा पडल्या होत्या. त्यातले काही महापाषाण तर कधीही पडतील, अशा बेतात एकमेकांवर रेलून बसले होते. गुरुत्वाकर्षणाला पराजित करणारं असं कोणतं आकर्षण त्या शिळांना एकमेकांशी धरून ठेवत असेल, असं वाटून फारच आश्चर्यचकित व्हायला झालं. त्या मंदिराच्या शेजारी असलेल्या एका मंडपात नाच-गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. तिथल्या खांबा-खांबांवर नृत्याच्या विविध पोझेस असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या होत्या. सध्या इथं अगदी मोठा समारंभ न परवडणाऱ्या लोकांचे विवाह समारंभही होतात, अशी माहिती मंजूबाबानं दिली. नंतर तो आम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथं एक प्रचंड पाषाण आडवा पडला होता. आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. ‘या ठिकाणी मी फक्त माझे ग्राहकच घेऊन येतो,’ असं मंजूबाबा अभिमानानं सांगत होता. त्या परिसरात पडलेल्या प्रचंड शिळा, त्यांचे वेगवेगळे आकार पाहून आपण वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होत होता. 

विजयनगरचं साम्राज्य आणि हंपीतलं त्यांचं वैभव याविषयी भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. ते आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. मलाही ही सगळी ऐकीव माहिती होती. मात्र, प्रत्यक्ष तिथं जाऊन हे सगळं अनुभवणं ही फारच निराळी गोष्ट होती. त्या हवेचा परिमळ, तिथल्या पाषाणाचा थंडगार स्पर्श, तिथल्या पाण्याची चव आणि तिथल्या आसमंतात ऐकू येत असलेल्या कित्येक थक्क करणाऱ्या लोककथा, दंतकथा यांच्या अजब मिश्रणातून जे अनुभवायला येतं, ते हंपी विलक्षण आहे. माल्यवंत रघुनाथाच्या मंदिरातून पूजापाठाचा घोष ऐकू येत होता. मंजूबाबानं सांगितलं, की १७-१८ वर्षांपासून काही साधूमंडळी इथं अखंड पूजापाठ करत आहेत. अजूनही त्यांचा तो कार्यक्रम संपलेला नाही. आपण सहस्रावर्तन करतो किंवा हरिनाम सप्ताहात जशी ती वीणा खाली न ठेवता अखंड वाजविली जाते, तसंच इथं काही साधू आलटून-पालटून हे मंत्रघोष सतत करत असतात. त्या तिथे जाण्यापूर्वी वर आणखी एक शिवाचं छोटंसं मंदिर होतं. तिथला तरुण पुजारी मला दोन-दोनदा हाक मारून बोलवत होता. कुणी तरी खेचून नेल्याप्रमाणं मी एकटाच तिथं गेलो. आपल्या शंकर या देवाला असंच कुठं कुठं उंचावर, कडेकपाऱ्यांत, दरीखोऱ्यात राहायला फार आवडतं. मला शान्ताबाईंचं ‘भस्मविलेपित रूप साजिरे’ हे अप्रतिम गाणं आठवायला लागलं. मी त्या छोटेखानी मंदिरात गेलो. त्या तरुण पुजारी पोरानं माझ्या हातून अभिषेक करविला, कपाळी भस्म लावलं. मीही मंत्रभारित झाल्यागत सगळं आपोआप केलं. पूजा झाल्यावर भानावर आलो. पुजारी मुलगा मोठ्या अपेक्षेनं पाहत होता. मलाही ते लक्षात आलं. मी अगदी सहज ‘जी-पे’ आहे का विचारलं. खरं तर तिथं जी-पेचा स्कॅनर होताही; पण तो बंद होता. त्यामुळं मी रोख पैसेच दक्षिणा म्हणून द्यावेत असं त्याचं म्हणणं पडलं. हल्ली माझ्या खिशात फार रोकड नसते. लागत नाही. खिशात एक पन्नासची नोट होती. बाकी पाचशेच्या होत्या. त्यामुळं नाइलाजानं मला शंभर रुपये द्यायचे असूनही मी ते पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघालो. तरुण पुजारी मुलगा तेवढ्यावरही समाधानी दिसला. ‘आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, लोक जे देतील ते’ असं काहीसं तो पुटपुटत होता. मला तेव्हा नक्की काय वाटलं ते सांगता येत नाही. मात्र, आपण निदान शंभर रुपये द्यायला हवे होते, असं वाटून गेलं. (हा असा अनुभव हंपीत एकदाच आला. पहिला आणि शेवटचा.)
धनश्री, साईनाथ व वृषाली केव्हाच खालच्या रघुनाथ मंदिरात गेले होते. मी जरा गडबडीतच ते टेकाड उतरून त्या मंदिरात गेलो. तिथंही शेजारी एक लक्ष्मीचं मंदिर होतं. तिथलाही पुजारी बोलवत होता. मात्र, आता मी तिकडं दुर्लक्ष करून मुख्य मंदिरात शिरलो. हे चांगलं, जितंजागतं, नांदतं मंदिर होतं. इथंच त्या सभामंडपात ते दोन साधू पूजापाठ करत होते. मी आपला तिथं जाऊन एक नमस्कार ठोकला. मला त्या बाबानं हातावर तीर्थ दिलं. ताटलीतल्या दक्षिणेच्या पैशांकडं हात दाखवला. मात्र, तो तोंडानं मंत्रजप करत असल्याचा फायदा घेऊन मी पुन्हा एक नमस्कार ठोकला आणि तिथून निघालो. या तिघांनीही तिथं पैसे आधीच दिले होते. बाहेर येऊन फोटो काढले. मंदिराच्या बाहेर दोन कार लागल्या होत्या. त्यातली एक महाराष्ट्रातील होती. आजूबाजूला माकडं उड्या मारत होती. हंपीत सर्वत्र विपुल संख्येनं माकडं आहेत. त्यांना सतत खायला लागतं. हातात खाण्याची कुठलीही वस्तू घेऊन तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाही. माकडांनी त्यावर डल्ला मारलाच म्हणून समजा. 
इथून आता मंजूनं त्याची रिक्षा हंपीतल्या दोन प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या विठ्ठल मंदिराच्या दिशेनं घेतली. इथं मुख्य मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंतच वाहनं नेता येतात. तिथं पार्किंगचा प्रशस्त तळ आहे. तिथून एक तर तुम्ही चालत जाऊ शकता किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनांतून जाऊ शकता. आम्हाला उन्हात चालायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या बॅटरी गाड्यांसाठीची रांग धरली. वीस रुपये तिकीट होतं. त्या रांगेत शिरण्याआधी वॉशरूमकडे धाव घेतली. तिथं पाणीच नव्हतं. बाहेर पिण्याच्या पाण्याचे नळ होते. तिथेही खडखडाट. बाहेर ज्यूस, फळं, उसाचा रस विकणाऱ्या गाड्या होत्या. आम्हाला तहान तहान होत होती. मग उसाचा रस प्यायलो. नंतर रांगेत उभे असतानाही सतत कलिंगडाच्या फोडी, अननसाच्या फोडी, ताक विकायला पोरं येत होती. त्या फोडी एवढ्या रसरशीत होत्या, की त्या घेऊन खायचा मोह आवरला नाही. साधारण २०-२५ मिनिटांनी आमचा नंबर लागला. या बॅटरी गाड्या कॉलेजमधल्या मुलींना चालवायला दिल्या आहेत. इथून पुढचा सगळा रस्ता मातीचा होता. त्यामुळं असेल, पण त्या मुलीनं तोंडाला रुमाल लावला होता. आम्ही दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दारात पोचलो. इथं पुन्हा तिकिटांची रांग होती. इथं घेतलेलं तिकीट आणखी दोन-तीन ठिकाणी चालतं. त्यामुळं ते जपून ठेवावं. साठ रुपये तिकीट आहे. इथं गाइड घ्यावा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मंजूच्या मते, गाइड विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवण्यास २०० ते ३०० रुपये घेतो. आम्ही ४०० रुपयेही द्यायला तयार होतो. मात्र, इथले गाइड ८०० रुपयांच्या खाली यायला तयार होईनात. गर्दीही प्रचंड होती. फारसे गाइड मुळात उपलब्धच नव्हते. आमच्याकडे अश्विनीनं (मित्र मंदार कुलकर्णीची पत्नी) दिलेलं आशुतोष बापट यांचं ‘सफर हंपी बदामीची’ हे उत्कृष्ट पुस्तक होतं. मग तेच गाइड म्हणून वापरायचं ठरवून आम्ही आत शिरलो. समोर विलक्षण, अद्भुत आणि थक्क करून टाकणारं, असामान्य असं काही तरी आमची वाट बघत होतं....



(क्रमश:)

----------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------

23 Nov 2023

पासवर्ड दिवाळी २३ - कुमारकथा

सेल्फी... सेल्फी(श)... सेल्फी...
----------------------------------

एक होतं जंगल... जंगलात नव्हतं काहीच मंगल...
झाडं दु:खी, प्राणी दु:खी, नदी दु:खी, नद्यांमधले मासेही दु:खी....
खरं तर एके काळी हे जंगल किती आनंदात असायचं! झाडं खूश असायची, प्राणी आनंदात उड्या मारत असायचे, नदी हसत-खळाळत वाहत असायची... मासेही मजेत पोहत असायचे. पाऊस पडला, की जंगल कसं हिरवंगार होऊन जायचं. उंचच उंच गवत उगवून यायचं. त्यातून हत्तीदादांचं कुटुंब मोठ्या डौलानं, दमदार पावलं टाकीत पाण्याकडं चालत जायचे. हरणांचे कळप उड्या मारत इकडून तिकडं हुंदडत असायचे... कोल्होबा, लांडगेभाऊ, तरसतात्या, अस्वलमामा, गेंडेदादा सगळेच एकदम मस्त खेळायचे अन् लोळायचेही.
पण अलीकडं काही वर्षांत हे चित्र बदललं की हो! जंगल पूर्वीसारखं राहिलं नाही. उदास उदास राहू लागलं. मनातल्या मनात कुढू लागलं. सगळेच झाले दु:खी... सगळेच झाले कष्टी...
का विचारा... अहो, या जंगलात माणसं येत असत रोज... भटकत असत इतस्तत: सतत... त्यांना ना काळ ना वेळ... सतत हसणं अन् खिदळणं... सोबत त्यांची ती रंगीत चौकोनी डबी... तो फोन... स्मार्टफोन म्हणे... प्रत्येकाच्या हातात फोन आणि प्रत्येकाचा वेगळाच टोन... सतत माणसं आपली सेल्फी काढताहेत... धबधबा म्हणू नका, पायवाटा म्हणू नका, दगड म्हणू नका की धोंडा म्हणू नका...! प्रत्येकावर यांच्या नावाचा शिक्का उमटलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणावर यांची सेल्फी निघालीच पाहिजे... जंगलातलं एक झाड यांनी सोडलं नाही, की एक वेल सोडली नाही! सगळीकडं सेल्फीचाच पूर आला... हल्ली तर कहरच झाला... माणसांच्या टोळ्या झाल्या... टोळ्यांमागून टोळ्या... सगळेच हातात बाटल्या घेऊन नाचत आहेत, सगळेच कसल्याशा धुंदीत लहरत आहेत... त्यांच्या त्या कर्णकर्कश आवाजांतील गाण्यांनी आणि धांगडधिंगाण्याने जंगलाचे कान किटले. अति झाले...

सारे जंगल वैतागले. प्राणी सगळे वैतागले.... हत्तीदादाकडे गेले... झाडे सगळी त्रस्त झाली... वडआजोबांकडे गेली. प्राणी म्हणाले, ‘हत्तीदादा, हत्तीदादा... या माणसांच्या टोळीचा बंदोबस्त करा. यांच्या फोटोंचा धुमाकूळ थांबवा.’ झाडे म्हणाली, ‘वडआजोबा, वडआजोबा... या माणसांच्या टोळ्या आवरा. तुमच्या पारंब्यांची बेडी अडकवून सगळ्यांना धरून बांधून टाका...’
हत्तीदादा विचारात पडले. वडआजोबांकडे गेले. दोघांनी मिळून विचार केला. माणसांच्या फोटोच्या कटकटीला कसे दूर करावे? कसे बरे? माणसांची गर्दी कशी हटवावी? कशी बरं कशी? त्यांनी प्राण्यांची आणि झाडांची बोलावली सभा... पौर्णिमेच्या रात्री सगळं जंगल सभेला जमलं. वडआजोबा अध्यक्षस्थानी होते, तर हत्तीदादा प्रमुख वक्ते. हत्तीदादा म्हणाले, ‘मित्र हो, आपलं हे जंगल, आता नाही राहिलं मंगल... याचं कारण माणूस आणि त्याच्या हातातली ती चौकोनी चमकती डबी. त्या डबड्यापायी आपल्या जंगलाची लागली वाट... आता करावाच लागेल उपाय खास!’
सगळे म्हणाले, ‘हो, हो... करा, करा. आम्हाला पण खूप त्रास होतो. माणसं घोळक्यानं येतात. आवाज करतात... त्यांच्या त्या चौकोनी डब्यातून सतत खटखट करत बसतात... नुसती कटकट! माणसांच्या या गोंधळाचा वैताग आलाय आम्हाला...’
सगळे वडआजोबांकडे बघायला लागले. त्यांच्या पारंब्या शालीसारख्या त्यांनी अंगावर लपेटून घेतल्या आणि जरासं खाकरून ते बोलू लागले, ‘तुमचं म्हणणं खरं आहे. मी गेली शंभर वर्षं तरी या जंगलात राहतोय. आधी इथं असं नव्हतं. माणसं फार कमी यायची इकडं... उलट सगळे प्राणी मस्त खेळायचे आजूबाजूला... झाडंही पावसात हिरवीगार होऊन छान डोलत असायची... पण गेल्या २०-२५ वर्षांत सगळं बदललं. माणसं एकाएकी मोठ्या संख्येनं जंगलात यायला लागली. त्यांच्या गाड्यांचे आवाज होऊ लागले. त्या गाड्या धूर सोडू लागल्या. काही माणसं तर बंदुका घेऊन यायला लागली. त्यांनी आपले प्राणी मारायला सुरुवात केली. अलीकडं तर ते सगळे ती चौकोनी चमकदार रंगीत डबी घेऊन येतात आणि त्यातच बघत बसतात... आपल्याला होणारा त्रास असह्य झाला आहे. यावर आता एकच उपाय - माणसं आपल्याकडं जातात, तसं आपण माणसांकडं फिरायला जायला सुरुवात करायची... मान्य आहे?’
सभेत एकच गदारोळ उडाला. हा उपाय आहे? असं कसं शक्य आहे? माणसं आपल्याला जिवंत सोडतील? किती भयानक, क्रूर असतात माणसं! कसं जमणार हे? सगळे प्राणी, झाडं एकदम गलका करू लागले. माणसांकडे जाण्याची कल्पना अनेकांना फार भारी वाटत होती, तर काहींना त्यात अतोनात धोका जाणवत होता. काय करावं? कसं करावं? सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. तितक्याच बिबटेराव पुढे झाले. म्हणाले, ‘वडआजोबा, तुमचं म्हणणं आम्हाला एकदम मान्य आहे. आम्ही जाऊ आधी माणसांच्या शहरांत फिरायला...’ यावर वानरकाका पुढं झाले आणि प्रौढपणानं म्हणाले, ‘तुमचं काय कौतुक हो? आम्ही तर आधीपासून जातोय माणसांकडं... त्यातली काही लोकं आमच्याहून अधिक आचरटपणा करतात ते सोडा...’
सगळे हसले. कोल्होबा पुढं आले. शहाजोगपणे म्हणाले, ‘मी या तरसतात्याला घेऊन जातो कसा माणसांच्या वस्तीत...’ हरणांचे टोळीप्रमुख आले आणि म्हणाले, ‘आम्ही सगळे एकदम जाऊ आणि त्यांच्या शेतात घुसू...’ हे ऐकून झाडांनी आपल्या फांद्या एकमेकांवर आपटून जोरजोरात टाळ्या वाजवल्या... ससोबा उड्या मारू लागले, अस्वलमामांनी जोरजोरात छाती पिटायला सुरुवात केली, हरणं कळपासह टणाटण उड्या मारू लागली.... सगळीकडं एकदम आनंदीआनंद झाला. अवघं जंगल खूश झालं!
वडआजोबांनी सगळा प्लॅन नीट समजावून सांगितला. सगळं ठरलं. माणसांच्या वस्तीवर हल्लाबोल करायचा...
माणसांनी आपल्याला आत्तापर्यंत बराच त्रास दिला. सगळ्या जंगलात येऊन ऊतमात केला. वाट्टेल तसं वागले. सगळ्यांची शांतता घालवून टाकली. झाडांना दु:ख दिलं, नदीला रडायला लावलं, प्राण्यांना वेदना दिल्या, पक्ष्यांना छळलं... आता या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची वेळ आली होती. आता जंगल माणसांना मुळीच माफ करणार नव्हतं. त्यांना चांगलाच धडा शिकवणार होतं... आता फार गंमत येणार होती!
सुरुवातीला आपले बिबटेराव आणि त्यांचे मित्र चालून गेले. आधी गावांबाहेरच्या वस्तीत, मग उसाच्या शेतात... मग गावातल्या घरांत, मग एकदम मोठ्या शहरांत, त्यांच्या सोसासट्यांत, बंगल्यांत... बिबटे सगळीकडं शिरले... मग हळूहळू धिप्पाड बांध्याचे गवेही त्यांच्यामागोमाग गेले. गव्यांना अडवणार कोण? ते सुखेनैव शहरांच्या रस्त्यांवरून फिरू लागले. मग हरणांचा कळप घुसला... टणाटण उड्या मारत गावागावांमधून फिरू लागला. शेतात घुसू लागला, वस्त्तीत शिरू लागला. सगळीकडं गोंधळ उडाला.... एकदम हलकल्लोळ उडाला. माणसं बावचळून गेली. घाबरून गेली. त्यांना काय करावं ते सुचेना. जंगल कसं आवरावं, ते कळेना. जंगलातील वडआजोबा लांबून हे सगळं बघत होते... आता माणसं चांगलाच धडा शिकतील, असं त्यांना वाटू लागलं. माणसांना बरी अद्दल घडली, असं सगळ्यांना वाटू लागलं...
तेवढ्यात एक अजब दृश्य त्यांना दिसलं... त्या चौकोनी डब्या घेऊन शेकडो माणसं पिंजऱ्यात बंद केलेल्या  बिबट्यांच्या मागे धावत होती. माणसं मोठी चतुर! त्यांनी कसल्याशा बंदुकीतून डार्ट मारून बिबटेमंडळींना पाडलं बेशुद्ध... आणि घातलं एका मोठ्या गाडीत! ती गाडी निघाली कुठं तरी... मग काय, सगळी माणसं आता त्या बिबट्यांच्या मागं मागं धावू लागली. सगळ्यांना त्या बिबट्यांसोबत सेल्फी काढायचा होता... ते बघून वडआजोबांनी कपाळाला हात लावला. करायला गेलो काय आणि झालं काय हे भलतंच, असं त्यांना होऊन गेलं.
तेवढ्यात एक कोल्होबा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आजोबा, हे बघा, मी काय आणलंय?’ वडआजोबांनी बघितलं, तर ती चमकदार चौकोनी डबी... ससोबा म्हणाले, ‘आजोबा, हा स्मार्टफोन आहे. मी माणसांकडून पळवून आणला आहे.... आता तुमच्याबरोबर मला सेल्फी काढायचा आहे...’ वडआजोबांना काय बोलेना, हेच समजेना. त्यांनी रागारागाने आपल्या पारंब्या आपटल्या. कोल्होबांना त्याचे काही नव्हते. त्यांनी ऐटीत सेल्फी काढला आणि ते तिथून निघाले.
हळूहळू सगळ्या जंगलात कोल्होबांनी सेल्फी काढायचा सपाटा लावला. तिकडं माणसं शहरांत बिबट्यांसोबत सेल्फी काढू लागली आणि कोल्होबा जंगलात झाडांसोबत सेल्फी काढू लागले... जंगल मंगल झाले! सेल्फीत दंग दंग झाले...

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड दिवाळी अंक (युनिक फीचर्स), २०२३)

---

मनशक्ती दिवाळी २३ लेख

‘आमच्या वेळी असं नव्हतं...’
----------------------------------

दोन पिढ्यांमधलं अंतर स्पष्ट करणारं आणि नेहमी ऐकू येणारं वाक्य म्हणजे - ‘आमच्या वेळी असं नव्हतं’... सतत हे वाक्य उच्चारणाऱ्यांना आपली पिढी काळाच्या स्पर्धेत मागं पडत चालल्याचा एक विचित्र अपराधगंड असतो बहुतेक! वास्तविक दोन पिढ्यांमध्ये काळाचं जसं स्वाभाविक अंतर असतं, तसंच ते इतर सर्व बाबतींत असणार, हे उघड आहे. तरीही आमच्या वेळी असं नव्हतं, हे सांगण्याचा अट्टाहास बहुतेक मंडळी का करतात देव जाणे. खरं तर नव्या पिढीशी दोस्ती करणं अवघड नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा मात्र हवा. मुलाला पित्याच्या चपला यायला लागल्या, की त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होतं किंवा व्हायला पाहिजे, असं एका संस्कृत श्लोकात सांगितलं आहे. मात्र, आपल्यापैकी किती जणांना आपल्याच मुलांशी असं मैत्रीचं नातं प्रस्थापित करता येतं?
यातही गंमत अशी असते, की आपण दर वेळी आपली दोन्ही पिढ्यांशी सतत तुलना करत असतो. एक आपल्या आई-वडिलांची पिढी आणि एक आपल्या मुलांची पिढी. दोन्ही पिढ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला; आपलं ‘सँडविच’ झालं, असं आत्ताच्या पिढीला मनोमन वाटत असतं. विशेष म्हणजे, प्रत्येक पिढीमध्ये ही भावना दिसते. म्हणजे आपल्या आई-वडिलांनाही त्यांच्या आई-वडिलांविषयी व आपल्याविषयी असंच वाटत असतं. आपल्या मुलांनाही नंतर आपल्याबद्दल आणि त्यांच्या अपत्यांबद्दल असंच वाटणार, हेही नक्की.
आपल्याला कायम आपल्या स्वत:विषयी सहानुभूती वाटत असते. हे अगदी स्वाभाविक आहे. आपलं इतर कुणाहीपेक्षा आपल्या स्वत:वरच प्रेम अधिक असतं. आपण स्वत:ला फार जपत असतो. त्यामुळं आपलं प्रेम, विरह, दु:ख, वेदना, उद्वेग हे जे काही असेल ते इतरांपेक्षा कांकणभर अधिक सरस असतं, असं आपल्याला कायम वाटत असतं. लग्न झालेल्या प्रत्येक बाईला ‘मी होते म्हणून टिकले, दुसरी कुणी असती तर...’ हे जसं वाटत असतं, तसंच आपल्याला ‘मी जो त्याग केला, ते केवळ मी होतो म्हणून; बाकी कुणी असतं तर...’ असंच वाटत असतं. आपण चांगल्या घरात जन्माला आलो, आई-वडील इतर चार लोकांसारखेच होते, आपलं बालपण तसं सुखात गेलं, आयुष्यात फार कटकटी किंवा त्रास न होता, आतापर्यंतचा प्रवास झाला, लग्न वेळेवर झालं, मुलं-बाळं वेळेवर झाली, नोकरीत फार काही जाच नव्हता, मुलंही नीट शिकली, पैसे खर्च होत असले तरी आवकही बऱ्यापैकी होती, कष्टाने पैसे कमावले व चार गाठीलाही बांधले... हे सहसा पटकन कबूल करायला कुणी तयार होत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे शंभरातील ८० ते ९० लोकांचं जीवन असंच गेलेलं असतं. मात्र, त्या आयुष्याला आपल्या कथित कष्टांचा, त्यागाचा तडका लावल्याशिवाय जीवनाची इतिकर्तव्यता झाली, असं आपल्याला वाटतच नाही. तसं बघायला गेलं, तर प्रत्येक पिढी त्या त्या काळानुसार जगत असते. त्या काळात जे जे उपलब्ध आहे, त्याचा आनंद घेत असते. जे नाही त्याचा त्या पिढीला खेद वा खंत असं काही नसतं. माणसाला साधारणपणे ८० वर्षांचं सरासरी आयुष्य मिळतं. म्हटलं तर हा काळ मोठा आहे. या काळात बरेच बदल घडून येऊ शकतात. अगदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं उदाहरण घेतलं, तर यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षं पूर्ण झाली. आपल्यापैकी अनेकांनी तो काळ बघितलेला नाही. मात्र, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य बघितलेले लोकही आज आहेत. तेव्हा ते अगदी लहान असतील, पण ती घटना त्यांना स्पष्ट आठवते आहे. आज साधारण ८५ ते ९० वय असलेले अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. या सर्वांना देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन नीट आठवत असणार. त्यानंतरच्या सर्व घटना-घडामोडीही आठवत असणार. आपल्याकडे एखाद्याच्या वयाचा उल्लेख करायचा, तर ‘मी अमुक पावसाळे पाहिले आहेत,’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. याचा अर्थ तेवढे ऋतू पाहिले; तेवढी वर्षं पाहिली. काळाशी निगडित या सगळ्या आठवणी सापेक्ष असतात. कुणाला ६० वर्षं म्हणजे खूप जुना काळ वाटतो, तर कुणाला २० वर्षं म्हणजेही खूप पूर्वीची गोष्ट झाली, असं वाटू शकतं.
मध्यंतरी माझ्याच बाबतीत झालेली एक गंमत सांगायला हवी. दुपारी जेवत असताना, सहज चॅनेल सर्फिंग करत होतो. ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘तराने पुराने’  कार्यक्रम सुरू होणार असल्याची पाटी दिसली. ‘व्वा’ असं म्हणून मी एखादं जुन्या काळचं कृष्णधवल गीत सुरू व्हायची वाट बघू लागलो. तर गाणं लागलं - अजनबी मुझ को इतना बता... हे तर ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातलं (१९९८) काजोल व अजय देवगण यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. मनात विचार आला, अरेच्चा! हा तर आपल्या डोळ्यांसमोर रीलीज झालेला आणि थिएटरला जाऊन पाहिलेला सिनेमा आहे राव! पण मग विचार केला, त्यांचंही बरोबरच आहे. झाली की २५ वर्षं आता! हे ‘तराने’ आता ‘पुराने’च म्हणायचे. तर काळाचं हे असं असतं. आपलं वय होत जातं; पण आपल्याला अनेकदा ते स्वीकारायचं नसतं. सगळं आपल्या काळात जसं चाललं होतं, तसंच पुढच्या सर्व काळात चालायला पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. यातली गंमत अशी, की काळानुरूप झालेले सर्व आधुनिक बदल, तंत्रज्ञानादी सोयी, सुखासीनता यांच्याबाबत आपल्याला काही आक्षेप नसतो. ते सगळं आपल्याला हवंच असतं. म्हणजे उदाहरणार्थ, आज चाळिशीत असलेल्या व्यक्तीच्या विशीत स्मार्टफोन नव्हते, म्हणून वीस वर्षांपूर्वीचा काळच कसा चांगला होता, म्हणत उसासे टाकणाऱ्या त्याच व्यक्तीला स्मार्टफोनचा विरह मात्र वीस सेकंदही सहन होत नाही.
‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या मनात नक्की कोणती भावना असते? खूप प्रामाणिकपणे उत्तर देता येईल का आपल्याला? आपल्याला आपल्या काळात नसलेल्या व आता उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपभोग आता वयपरत्वे घेता येत नाही, याची काहीशी असूया तर वाटत नसते ना? मागच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत आपलं ‘सँडविच’ झालं असं म्हणताना, खरं तर आपल्याला ‘आम्हाला दोन्ही पिढ्यांचे फायदे मिळाले नाहीत,’ असं काहीसं विषादानं वाटत असतं. आधीच्या पिढ्यांमधला कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक सौहार्द, व्यक्तिगत जिव्हाळा, शांत-संथ ग्रामीण जीवन किंवा चाळीतलं वा वाड्यातलं आपुलकीचं जीवन आपल्याला हवं असतं, तर नव्या पिढीच्या वाट्याला आलेली भौतिक संपन्नता, तंत्रज्ञानातील प्रगती, सढळ हाताने पैसे खर्च करण्याची ताकद, एसी घरांपासून ते विमानप्रवासापर्यंतच्या सर्व गोष्टी याही आपल्याला हव्या असतात. दोन्ही गोष्टी अर्थात एकाच वेळी मिळू शकत नाहीत. मग हा संघर्ष उभा राहतो आणि आपण काहीसं खंतावून, काहीसं वैतागून म्हणतो - ‘आमच्या वेळी असं नव्हतं...!’
खरं तर प्रत्येक पिढीसमोर काही ना काही तरी आव्हानं उभी असतातच. ती बरीचशी त्या काळानं उभी केलेली असतात. काही गोष्टी चांगल्या असणार, तर काही वाईट हे अगदी गृहीत आहे. आजच्या तरुणांबाबत, म्हणजे पुढच्या पिढीबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्यासमोरही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेतच. काळ वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होत असल्यानं या बदलांचाही वेग प्रचंड आहे. नव्या पिढीला या वेगाशी जमवून घेण्याचं मोठं आव्हान आहे. हल्ली ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप बोलबाला आहे. या ‘एआय’चं मोठं आव्हान आजच्या तरुण पिढीसमोर आहेच. स्मार्टफोनमुळं आपलं जगणंच कसं पूर्ण बदलून गेलं, हे आपल्या पिढीनं गेल्या १२-१५ वर्षांत नीट अनुभवलं आहे. आता कदाचित त्याहून अधिक वेगवान आणि स्तिमित करणारे बदल ‘एआय’मुळे घडू शकतील. किंबहुना आत्ताच घडत आहेत. यंत्र मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे आपल्याला आतापर्यंत वाटत होते. मात्र, आता तसे काही प्रमाणात का होईना, घडण्याची चिन्हे दिसत आहे. त्यातून निराळेच सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. नव्या पिढीलाच त्यांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणात प्रतिकूल बदल घडताना दिसत आहेत. त्यामुळेच वादळे, महापूर, भूस्खलन आदी भौगोलिक संकटे वाढताना दिसत आहेत. या संकटांचा सामना पुढच्या पिढीलाच करायचा आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढती धार्मिकता, वाढता कट्टरतावाद, वाढता उन्माद, वाढता हिंसाचार या सगळ्यांना तोंड देण्याची तयारी तरुण पिढीला करावी लागणार आहे.
अर्थात या तरुण पिढीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीही कमी नाहीत. एक तर ही तरुण पिढी अतिशय स्मार्ट आहे. हुशार आहे. हे सगळे तरुण अतिशय ‘सॉर्टेड’ आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, याचं नेमकं भानही आहे. त्या जोरावर ते ही नवी आव्हानं नक्कीच पार पाडतील. त्या तुलनेत आपल्या आधीची पिढी आणि अगदी आपली म्हणजे आत्ता चाळिशीत किंवा पन्नाशीत असलेली पिढी यांना खरोखरच याहून कमी आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे, हे मान्य करायला हवं. करोनाकाळ हा एक अपवाद. मात्र, ते संकट अवघ्या मानवजातीनंच पेललं. त्यात ही पिढी, पुढची पिढी असा काही भेद मुळातच नव्हता. त्या तुलनेत आता टीनएजमध्ये किंवा विशीत असलेल्या तरुणाईला अधिक व्यापक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, हे निश्चित. मात्र, ही तरुण पिढी या सर्व आव्हानांना पुरून उरेल आणि एक आदर्श, सुखवस्तू आणि समाधानी असा देश घडवू शकेल, यात अजिबात शंका बाळगायला नको. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीमहाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई ते स्वामी विवेकानंद अशा अनेक शूर स्त्री-पुरुषांनी अगदी कमी वयात फार मोठे पराक्रम गाजवले आणि काळाच्या पटावर आपली लखलखीत नाममुद्रा कोरून ठेवली. भारतातील तरुणांपुढे असे उत्तुंग आदर्श असल्याने त्यांनाही ही उंची गाठण्याची आस असणारच.
तेव्हा ‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे रडगाणं गायचं बंद करून, नव्या पिढीसाठी ‘कुठल्याच काळात कधीच नव्हतं, असं भव्य काही तरी निर्माण करा’ असा आशीर्वादाचा उद्गार आपल्या मुखातून बाहेर यावा, हीच सदिच्छा!


---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक २०२३)

---

7 Oct 2023

वहिदा रेहमान - मटा लेख

‘वहिदा’ नावाचं लोभस स्वप्न
---------------------------------

वहिदा रेहमान म्हणजे मूर्तिमंत भारतीय सौंदर्य. या वहिदाचं माझ्या पिढीतल्या कित्येकांच्या आयुष्यातलं आगमन टीव्हीच्या छोट्या पडद्यातूनच झालं. म्हणजे तेव्हा ‘चित्रहार’ किंवा ‘छायागीत’मध्ये ‘भँवरा बडा नादान’ किंवा ‘चौदहवी का चाँद’ वगैरे गाणी लागायची, तेव्हाच पाहिलं असणार. माझं वय १२ असताना आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. स्वाभाविकच तेव्हाच्या माझ्या ‘फेवरिट लिस्ट’मध्ये वहिदा नव्हती. ती जागा निर्विवादपणे मधुबालानं व्यापली होती. मधुबाला ते माधुरी दीक्षित अशी रेंज मी चार वर्षांतच गाठली. पण वहिदाचं सौंदर्य समजायला चाळिशी यावी लागली.
वहिदा रेहमान हे गुरुदत्तचं ‘फाइंड’. हैदराबादवरून तिला मुंबईला कसं आणलं याची सुरस कथा अबरार अल्वींनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. ती मुळातूनच वाचायला हवी. वहिदाला स्वतःच्या बलस्थानांचं नेमकं भान होतं. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका होतीच (म्हणजे आहे); पण त्याच जोडीला अत्यंत चोखंदळ भूमिका करून तिनं भारतीय पडद्यावर आपलं जे वेगळेपण निर्माण केलं ते तिच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवणारं आहे. ‘प्यासा’मधील गुलाबो असो, ‘रेश्मा और शेरा’मधली रेश्मा असो, ‘खामोशी’मधली राधा असो किंवा अर्थातच ‘गाइड’मधली तिची अजरामर रोझी असो... आपल्या मूर्तिमंत भारतीय सौंदर्यानं तिनं सर्वत्र आपली छाप उमटवली. अत्यंत बोलके व पाणीदार डोळे आणि तेवढाच सर्व भाव व्यक्त करणारा चेहरा हे वहिदाचं वैशिष्ट्य. नृत्यनिपुण तर ती होतीच, म्हणूनच तर अगदी १३-१४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘दिल्ली-६’मध्ये ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर तिला नव्या अभिनेत्रींसोबत थिरकावंसं वाटलं.
‘भंवरा बडा नादान है’ या गाण्यातली चंचलता, ‘चौदहवी का चांद’मधली अप्रतिम निरागसता, ‘उपरवाला जान कर अंजान है’ या गाण्यातले तिचे ते ‘आपण नाही बाबा, हा वरच्या देवाला गाणं म्हणतोय’ असं सांगणारे खट्याळ भाव, ‘ये श्याम कुछ अजीब है’ या गाण्यात, नदीतलं पाणी चेहऱ्यावर आल्याक्षणी झर्रकन बदलणारा चेहरा आणि जुन्या आठवणींनी दाटून येणारा ‘दर्द’ निमिषार्धात चेहऱ्यावर दाखवणारे तिचे ते डोळे, ‘पान खाए सैंया हमारो...’ म्हणतानाची तिची चुलबुली अदा, देवसोबत ‘आज फिर जीने की तमन्ना है...’ म्हणताना बिनधास्त रस्त्यावर फेकून दिलेला तो मटका, विश्वजितसारख्या ‘अभिनेत्या’सोबत ‘ये नयन डरे डरे...’ गाण्यात दाखवलेलं परिणितेचं साक्षात रूप... वहिदाच्या एकेका विभ्रमावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
‘पिया तोसे नैना लागे’ गाण्यात नाकापेक्षा किंचित जडच अशी ती मोठ्ठी नथ आणि लालभडक साडी नेसून तिनं उभी केलेली मराठी स्त्री अजूनही नजरेसमोरून हटत नाही. अंगप्रदर्शन तर सोडाच; पण कधी उघडा दंडही न दाखवणाऱ्या या अभिनेत्रीनं साठ अन् सत्तरच्या दशकात तमाम भारतीय पुरुषांच्या मनात अढळ स्थान का मिळवलं होतं, ते तिचे तेव्हाचे सिनेमे पाहिलं तरच थोडं फार कळू शकेल. मध्यमवर्गीय पुरुषांच्या फाटक्या बनियनसारख्या आयुष्यात सिनेमा नट्यांच्या रूपानं असंख्य झुळुका येत असतात. पण वहिदासारखी ‘वाइफ मटेरियल’ एखादीच! त्यामुळंच वपुंना ‘मीच तुमची वहिदा’सारखी (नावाबाबत चु. भू. दे. घे.) कथा लिहावीशी वाटते. पुलंच्या ‘पाळीव प्राणी’मध्येसुद्धा फोटो दाखवणाऱ्यांच्या कथेत ‘इश्श...! वहिदा रेहमान’ येते.

गुरुदत्तसारख्या द्रष्ट्या दिग्दर्शकानं तिला सर्वप्रथम अखिल भारतीय स्तरावर पेश केल्यानं असेल, व्ही. के. मूर्तींसारख्या अभिजात सिनेमॅटोग्राफरच्या नजरेचा लाभ झाल्यानं असेल, पण वहिदा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फारच वेगळी ठसत होती. (अशीच दुसरी अभिनेत्री होती नूतन!) वहिदाच्या सौंदर्यात, हिंदीतला शब्द वापरायचा तर, एक ‘सादगी’ होती. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी तिची प्रतिमा सहज तयार होऊ शकत होती. सावळेपणातलं तिचं अद्भुत सौंदर्य ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर आणखीनच खुलून दिसलं. तेव्हाच्या प्रेक्षकांसाठी वहिदा नक्की कोण होती अन् काय होती? साठच्या दशकात भारतात सर्वच क्षेत्रांत एक स्वप्नाळूपण होतं. नेहरूंचा करिष्मा अजून टिकून होता, राज कपूर आणि बी. आर. चोप्रांसारखे दिग्दर्शक त्यांच्या प्रभावाखाली डावीकडं झुकलेल्या समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे सिनेमे बनवत होते, भाक्रा-नानगलसारखी धरणं बांधली जात होती आणि सिनेमात सत्यजित राय यांच्यापासून गुरुदत्तपर्यंत अनेक जण आगळेवेगळे प्रयोग करीत होते. कलकत्ता, मुंबईसारखी शहरं आपला आब व रुबाब टिकवून होती. त्यांचं बकाल महानगरांत रूपांतर झालं नव्हतं. किंबहुना देशाची एकमेव स्वप्ननगरी, मायानगरी मुंबापुरीच होती. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अजून धगधगायचं होतं. या काळात म्हणजे १९५४ मध्ये वहिदा मुंबईत आली. या स्वप्नाळू दशकाचा चेहरा म्हणून अनेक पुरुषांचं नाव घेता येईल. किंबहुना नेहरूंपासून राज कपूरपर्यंत अनेकांचं घेतलंही जातं. मात्र, या नवभारताचा तरुण, सोज्वळ आणि सात्त्विक सौंदर्य ल्यायलेला स्त्री-चेहरा कुणाचा असेल तर तो वहिदाचाच होता. (अर्थात इथंही तिच्या जोडीला नूतनचं नाव घ्यावंच लागेल.) तमाम भारतीय पुरुषांना आकर्षित करून घेणाऱ्या या सौंदर्याचं विश्लेषण आत्तापर्यंत अनेक जणांनी केलंय. पण मला वाटतं, तिच्यात जे अंगभूत सौंदर्य होतं, त्याचा उल्लेख फार कमी जणांनी केला आहे. वहिदा अत्यंत आत्मविश्वासू आणि आत्मभान असलेली अभिनेत्री आहे. एक स्त्री म्हणून तिला आपल्या ताकदीचं योग्य ते भान होतं. तिचा आत्मसन्मान तिनं कायम जपला. म्हणूनच तर तिला सिनेमा क्षेत्रात नट्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी कधी कराव्या लागल्या नाहीत. अंगप्रदर्शन न करताही मादक दिसता येतं, हे तिनं केवळ बोलक्या डोळ्यांनी करून दाखवलं. वहिदाचं चित्रपटसृष्टीला काही योगदान असेल तर ते हे आहे. तिच्यामुळं काही भारतीय पुरुष तरी तेव्हा कदाचित स्त्रीचा सन्मान करायला शिकले असतील. मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं प्रतीक असलेल्या या महान अभिनेत्रीला आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचा जन्म १९३८ चा. आता ती जवळपास ८५ वर्षांची आहे. त्या मानानं तिला खूपच उशिरा हा पुरस्कार मिळाला. अर्थात वयाचे हिशेब वहिदासारख्या अजरामर सौंदर्याला लागू होत नाहीत. त्यामुळंच ती या वयातही आपली ‘ग्रेस’ राखून आहे. तिला शुभेच्छा देताना आजही डोळ्यांसमोर तरळतोय तो 'चौदहवी का चाँद'मधला तिचा अप्रतिम निरागस गोड चेहरा... त्या चेहऱ्याला पाहून शायर उगाच नाही म्हणत - चौदहवी का चाँद हो या आफताब हो... जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...!


---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; २७ सप्टेंबर २०२३)

---------------

3 Oct 2023

लंडनला जाताय? मग हे वाचा...

लंडन प्रवास मार्गदर्शिका 
------------------------------


लंडनवारीचे ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी लंडनला जायचे असल्यास काय काय करावे आणि काय करू नये, याची विचारणा केली. मी शेवटचा ब्लॉग याच विषयावर लिहिणार होतो. परंतु त्यापेक्षा थेट फेसबुकवर पोस्ट केल्यास अधिक जणांपर्यंत पोचेल असं वाटलं. त्यामुळे इथंच लिहितो आहे. (पण अखेर पुन्हा हा मजकूर आता ब्लॉगवर घेतो आहे; कारण फेसबुक पोस्ट शोधून लिंक देणं जरा कठीण आहे...) 
तर लंडनवारी... पूर्वतयारी आणि इतर उपयुक्त माहिती अशी : 

व्हिसा

१. ब्रिटन किंवा यूके हा देश तसा महागडा आहे. पौंड व रुपया यांचा विनिमय दर जवळपास १०७ रुपयांना एक पौंड असा (सध्या) आहे. हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र, कमी झाल्याचा इतिहास नाही. 

२. व्हिसा मिळताना ‘युनायटेड किंगडम’चा मिळतो. कमीत कमी सहा महिन्यांचा ते जास्तीत जास्त दहा वर्षांचा मिळू शकतो. पर्यटक म्हणून जात असल्यास सहा महिन्यांचा काढावा. यासाठी साधारण १४ हजार रुपये प्रतिव्यक्ती फी आहे. मात्र, ब्रिटनने अलीकडेच या व्हिसा फीमध्ये वाढ केल्याचे माझ्या वाचनात आले. ऑक्टोबरपासून ती वाढ लागू होणार आहे. त्यामुळे दीड ते दोन हजार रुपये वाढतील, असे गृहीत धरा.

३. पुण्यात व्हीएफएस या कंपनीकडे अनेक देशांच्या व्हिसाचे काम होते. ही कंपनी एजंटसारखे काम करते. पूर्वी विमाननगरला ऑफिस होतं. आता वानवडीत आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी फक्त मुंबईला जावे लागते आणि तिथं इंटरव्ह्यू असतो. ब्रिटनच्या व्हिसासाठी (किंवा अन्य कुठल्याही देशाच्या व्हिसासाठी) मुलाखत वगैरे काही नसते.

४. खासगी ट्रॅव्हल एजंटकडून व्हिसासाठी अर्ज केल्यास ते आणखी अडीच ते तीन हजार रुपये प्रति व्यक्ती घेतात. आपल्याला आत्मविश्वास असल्यास आपण स्वत: ऑनलाइन अर्ज करू शकतो. आम्ही या वेळी एजंटच्या माध्यमातून व्हिसा मिळविला. मात्र, पुढच्या वेळी स्वत: ऑनलाइन अर्ज करणार हे नक्की.

५. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसांत व्हिसा येईल, असे एजंट सांगतात. पुण्याहून आपले अर्ज मुंबईतील यूके कौन्सुलेटमध्ये जातात. तिकडून मंजूर होऊन आल्यावर व्हिसाचा शिक्का असलेले पासपोर्ट घरपोच येतात. त्यासाठीचे कुरिअर चार्जेस आपल्याला अर्ज करतानाच भरावे लागतात. आता व्हीएफएस किंवा कुठेही रोख रक्कम घेतली जात नाही. सर्व पेमेंट कार्डने किंवा ऑनलाइनच होते. त्याची रीतसर पावती आपल्याला मिळते. आमचा व्हिसा आठवड्यात आला. (यापूर्वी आम्हाला २०२० मध्ये मिळाला होता, मात्र, तेव्हा कोव्हिडमुळे जाता आले नव्हते. मात्र, त्यांच्याकडे तशी नोंद असणार. त्यामुळे व्हिसा मिळणे सोपे गेले.)

६. व्हिसासाठी भरपूर कागदपत्रे, प्रॉपर्टीचे तपशील मागतात. तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, बँक खात्यांची सहा महिन्यांची स्टेटमेंट, प्रॉपर्टी टॅक्स असं आपल्याकडं जे जे आहे ते सगळं द्यावं लागतं. विमानाची तिकिटे आधी काढलेली असण्याची आवश्यकता नाही. मात्र, काढलेली असल्यास ती जरूर जोडावीत. त्यांना तुम्ही परत येणार आहात, याची खात्री हवी असते. त्यामुळे रिटर्न तिकिटे असतील, तर व्हिसा मंजूर होणे सोपे जाते.

७. नोकरी करत असाल, तर रजेचा अर्ज व पुन्हा कुठल्या तारखेला जॉइन होणार हे सांगणारे वरिष्ठांच्या सहीचे पत्र लागते.

८. तुम्ही तिथे नातेवाइकांकडे जाणार असाल, तर त्यांची सगळी कागदपत्रे आणि आमंत्रणाचे पत्र लागते. त्यांचा पासपोर्ट, तिकडचा व्हिसा, घरच्या पत्त्याचा पुरावा असं सगळं जोडावं लागतं.

९. हॉटेलमध्ये राहणार असाल, तर त्या हॉटेलचे कन्फर्म बुकिंग, पत्ता, त्यांची मेल असं सगळं लागतं.


चलन, फॉरेक्स कार्ड

१. ब्रिटनचे चलन पौंड आहे. तिकडे आता बहुतांश व्यवहार कॅशलेस होतात. त्यामुळे पूर्वीसारखे इकडून नोटांच्या रूपात परकीय चलन न्यायची गरज नाही. नेलेच तर अगदी थोडे, म्हणजे अगदी १०० पौंड एवढेच नाममात्र न्यावे. खरं तर एवढ्याही रोख चलनाची तिथे गरज पडत नाही.

२. फॉरेक्स कार्ड प्रत्येकाकडे अत्यावश्यक आहे. तिथे बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनसाठी हे कार्ड अतिशय उपयुक्त आहे. हे कार्ड नसेल तर आपण सार्वजनिक वाहनाने प्रवास करूच शकत नाही. प्रत्येक वेळी तिथे हे कार्ड टॅप करावे लागते. ते कार्ड काँटॅक्टलेस असेल याची खात्री करून घ्यावी. आम्ही एचडीएफसीची फॉरेक्स कार्डं नेली होती. या कार्डासाठी बँक ५९० रुपये एकरकमी घेते. कार्ड मिळण्यासाठी आपले खाते त्या बँकेत असणे आवश्यक आहे. शिवाय पासपोर्ट, आधार, पॅन हे या कार्डासाठीच्या अर्जाला जोडावे लागते.

३. ऑयस्टर कार्ड - लंडन म्हटलं, की अनेकांना ऑयस्टर कार्ड आठवते. हे तिथल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीचे उपयुक्त कार्ड आहे. मात्र, आपण नेलेले फॉरेक्स कार्डही बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनला चालत असल्याने वेगळे ऑयस्टर कार्ड घेण्याची मुळीच गरज नाही. ऑयस्टर कार्ड फक्त बस किंवा ट्रेनला चालते. आपले कार्ड हॉटेल किंवा अन्यत्र कुठेही चालते. त्यामुळे ते एक कार्ड असले, की पुरेसे आहे.

४. किती चलन अपलोड करावे? - आपण आठ ते दहा दिवसांसाठी जाणार असू आणि आपल्या नातेवाइकांकडे राहण्याची सोय असेल, तर ५०० पौंड एका कार्डावर अपलोड केले तरी रग्गड होतात. 

५. महत्त्वाचे - एकदा लंडनमध्ये पाय टाकला, की दर वेळी एवढे पौंड गेले म्हणजे एवढे एवढे रुपये गेले, असा सतत विचार करू नये. पौंडातच विचार करावा व तसे खर्च करावेत. नाही तर फ्रस्टेशन येण्याची शक्यता असते.


सिम कार्ड

१. आम्हाला व्हिसाबरोबर तीन सिम कार्डं गिफ्ट मिळाली होती. ती लंडनमध्ये उतरल्याबरोबर activate झाली. याचा चांगला उपयोग झाला. शिवाय मी 'एअरटेल'चा दहा दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन घेतला होता. (२९९९ रु.) हे रोमिंग आम्ही जाताना कैरोला थांबलो होतो, तिथंही चाललं. (आधी त्यांच्या साइटवर इजिप्त व यूके वेगवेगळ्या यादीत दाखवले होते. प्रत्यक्षात यूकेसाठी घेतलेलं रोमिंग इजिप्तमध्येही चाललं...)

२. मला विचाराल, तर आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून रोमिंग activate करून घेतलेलं चांगलं. आपले नंबर आपल्या फॉरेक्स कार्डला जोडलेले असतात. त्याचे एसएमएस यायला हवे असतील (आणि ते यावेत अशी सोय असावी) तर आपल्याच नंबरवर इंटरनॅशनल रोमिंग घेणं इष्ट. आम्हाला मिळालेल्या तीन कार्डांचा डेटासाठी चांगला उपयोग झाला. शिवाय लंडनमध्ये काही ठिकाणी त्यांच्याच सिमला रेंज येत होती. तेव्हा दोन्ही सोयी करून ठेवलेल्या बऱ्या. महत्त्वाचं म्हणजे मी मेव्हण्याच्या घरी राहत होतो त्यांचं 'वायफाय' आम्हाला वापरायला मिळत होतं. त्यामुळे गिफ्ट सिमवरचा डेटा बराच वाचला. त्यामुळे आम्हाला तिकडे टॉपअप करायला लागलं नाही. पण एरवी तशी गरज भासू शकते. पण ते सहज कुठेही करता येतं. फार महागही नाही. 


इतर काही Do's & Don'ts

१. लंडनमध्ये गेल्यावर City Mapper नावाचे ॲप आहे ते जरूर डाउनलोड करावे. अतिशय उपयुक्त आहे. लंडनमध्ये इंग्लिश भाषेमुळे मुळात आपल्याला काही परके वाटतच नाही. त्यामुळे चुकायचे म्हटले तरी चुकू शकणार नाही. सर्वत्र नकाशे, दिशादर्शक फलक लावलेले असतात. शक्यतो कुणाला विचारायची वेळ येऊ नये, असेच सगळे नियोजन असते.

२. लंडन आय, मादाम तुस्साँ किंवा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी जायचे ऑनलाइन बुकिंग केल्यास फायदेशीर ठरते.

३. इकडे खासगी वाहने किंवा टॅक्सी महाग आहे. त्यामुळे सगळे जण अंडरग्राउंड ट्रेन किंवा बस वापरतात. इथल्या लाल डबल डेकर बस प्रसिद्ध आहेत. त्यातून जरूर फिरावे. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये शहर दिसत नाही. बसमध्ये आयते शहरदर्शनही होते. बसला काही विशिष्ट टप्प्यांपर्यंत सरसकट १.७५ पौंड तिकीट आहे. बसमध्ये कायम पुढच्याच दाराने चढावे लागते. कंडक्टर नसतो. ड्रायव्हरसमोर मशिन असते, तिथे कार्ड टॅप करावे लागते. 

४. अंडरग्राउंड ट्रेन हे एक वेगळेच, प्रचंड विश्व आहे. याची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती जरूर वाचावी. लंडनमधील भुयारी रेल्वे १८६३ मध्ये सुरू झाली आहे. अगदी अलीकडे नवी एलिझाबेथ लाइन सुरू झाली आहे.

५. हिथ्रो विमानतळावरून मध्यवर्ती शहरात येण्यासाठी हिथ्रो एक्स्प्रेस नावाची ट्रेन आहे. ती किंवा नवी एलिझाबेथ लाइन जरा महाग आहे. त्याऐवजी सरळ पिकॅडिली लाइन घेऊन शहरात यावे. ते स्वस्त पडते.

६. इकडे सार्वजनिक वाहनांत कुणीही कुणाच्या भानगडीत लक्ष घालत नाही. आपणही एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहणे किंवा फोटो काढणे असभ्यपणाचे मानले जाते. ते टाळावे. (अनेकदा निग्रहाने तसे करावे लागते. पण तसेच करावे.)

७. रस्ता ओलांडताना ‘पादचारी प्रथम’ असा नियम इथे आहे. प्रत्येक चौकात रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलचे बटण असते. ते दाबून वाट पाहावी. पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा झाल्यावर बिनधास्त रस्ता ओलांडावा. कितीही भरधाव गाडी, बस येत असेल तरी ती पांढऱ्या रेषेच्या आत थांबते म्हणजे थांबते. दोन गाड्यांमध्ये साधारणपणे आठ ते दहा फूट अंतर ठेवतात. बससाठी वेगळी लेन असते. बसवाले त्याच लेनमधून जातात. सायकलस्वार भरपूर आहेत. बसने त्यांना ओलांडू नये, अशी सूचना सर्वत्र बस ड्रायव्हरसाठी असते.

८. इथे भरपूर बागा आहेत. तिथं निवांत बसून तुम्ही काहीही खाऊ शकता, पिऊ शकता. जागोजागी डस्टबिन आहेत. त्यांचा वापर करावा लागतो.

९. इकडे सार्वजनिक स्वच्छतागृहे एकूण कमी दिसली. अंडरग्राउंड स्टेशन्सवर ती सोय नाही. त्यामुळे शक्यतो म्युझियम्स, हॉटेल आदी ठिकाणी मोकळे व्हावे व मगच मोठा प्रवास सुरू करावा.

१०. अंडरग्राउंडमध्ये अनेक ट्रेनमध्ये एसी नाही. जुन्या लाइन आहेत. व्हिक्टोरियासारख्या लाइनवर चक्क उकडते. इथले हवामान अत्यंत बेभरवशाचे आहे. त्यामुळे वॉटरप्रूफ शूज, जर्किन आणि छत्री जवळ बाळगणे आवश्यक ठरते.

----

लंडनवारीचे तपशीलवार वर्णन वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

19 Sept 2023

लंडनवारी - भाग १०

घरपरतीच्या वाटेवरती...
----------------------------


लंडन, गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३.

बघता बघता आठ दिवस सरलेही आणि आमचा पुन्हा मायदेशी परतण्याचा दिवस येऊन ठेपला. चांगली स्वप्नं लवकर संपतात, असं म्हणतात. माझ्यासाठी लंडनमधले हे आठ दिवस अशाच सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हते. आपलं रोजचं जगणं, भवताल, आपलं दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्य, घर, ऑफिस, नेहमीचा रस्ता, नेहमीची गाडी, नेहमीचा डबा, नेहमीचं बेड... हे सगळं आठ दिवस सोबत नव्हतं. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, कधीही न अनुभवलेल्या अशा - ७५०० किलोमीटर अंतरावरच्या - एका जगप्रसिद्ध अशा शहरात आम्ही वास्तव्य केलं होतं. जवळपास रोज पायाला भिंगरी लागल्यासारखं, उत्सुक नजरेनं ते सगळं बघितलं होतं. डोळ्यांत साठवलं होतं, मेंदूत नोंदवलं होतं, हृदयात जपलं होतं! 

आज, गुरुवारी रात्री ९.३० वाजता आमची परतीची फ्लाइट होती. येताना ‘इजिप्त एअर’ होती आणि कैरोला एक थांबा होता. जाताना मात्र मुद्दाम थेट जाणारी ‘एअर इंडिया’ची फ्लाइट बुक केली होती. घरी जाताना मध्ये कुठेही थांबायचा कंटाळा येतो आणि एकदा प्रवास सुरू झाला, की कधी घरी पोचतो असं होऊन जातं, हे मला अनुभवांती चांगलं माहिती होतं. प्रवासाचा दिवस म्हणून आम्ही या दिवशी कुठलाही नियोजित कार्यक्रम किंवा कुठेही भेट, फिरणं असं काही ठेवलं नव्हतं. सकाळी मोकळा वेळ होता, म्हणून आम्ही जवळच्या शॉपिंग मॉलमध्ये काही खरेदी करायला म्हणून बाहेर पडलो. या वेळी आम्ही बागेच्या उत्तर दिशेला गेलो. या भागात आम्ही आधी आलो नव्हतो. तिथं शेजारी शेजारी मोठे मॉल होते. शॉपिंग कॉम्प्लेक्सच होतं ते. मधोमध कार पार्किंगला मोकळी जागा होती. आम्ही आधी ‘पाउंडलँड’ नावाच्या दुकानात गेलो. पूर्वी आपल्याकडे ‘49 & 99’ अशी दुकानं असायची. त्यात बहुतेक वस्तू ४९ किंवा ९९ रुपयांना असायच्या. तसंच इथं होतं. इथं बहुतांश वस्तू एक पौंडाला मिळत होत्या. मग तिथं काही वस्तू घेतल्या. मग पुढं ‘सॅन्सबरीज’ हा मोठा मॉल होता, तिकडं गेलो. हे इथलं ‘डी-मार्ट’ म्हणायला हरकत नाही. कारण शहरात अनेक ठिकाणी याच्या शाखा बघितल्या. इथं दारात ट्रॉल्यांची जी लाइन होती, तिला कुलूप होतं. त्या ट्रॉलीच्या हँडलला एक नाणं सरकवायची खाच होती. तिथं एक पौंड टाकला, की ती कुलपासारखी साखळी निघते आणि मग ती ट्रॉली आपल्याला मिळते. परत जाताना ट्रॉली पुन्हा कुलूपबंद केली, की ती खाच उघडून आपला एक पौंड परत मिळतो. एका अर्थानं ते डिपॉझिट ठेवल्यासारखी व्यवस्था होती. मी असं आधी कुठं पाहिलं नव्हतं, म्हणून मला मजा वाटली.
मॉलमध्ये शिरताच मला सुरुवातीलाच एका शेल्फमध्ये रोजची वर्तमानपत्रं दिसली. टाइम्स, डेली मेल, डेली मिरर, डेली एक्स्प्रेस ही वृत्तपत्रं बघितली. इकडे आपल्यासारखी ब्रॉडशीट, म्हणजे मोठ्या आकाराची वृत्तपत्रं नाहीत. सगळी टॅब्लॉइड! मी गेल्या आठ दिवसांत रोजचा पेपर हाताळला नव्हता, त्यामुळं लगेच उत्सुकतेनं सगळे पेपर चाळले. भारताच्या चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगची बातमी सर्व वृत्तपत्रांनी चांगली दिली होती. आतील पानांत असली, तरी बहुतेकांनी पानभर वापरली होती. शीर्षकंही कौतुक करणारीच होती; अपवाद फक्त डेली एक्स्प्रेसचा! या वृत्तपत्रानं मात्र ‘चंद्रावर यान पाठविणाऱ्या या महासत्तेला यूके दर वर्षी अमुकतमुक मिलियन पौंडची मदत का करतोय?’ असं जरा खोचक शीर्षक दिलं होतं. ते अर्थात तिथल्या राज्यकर्त्यांना - विशेषत: आत्ताचे पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे आहेत हे लक्षात घेता - उद्देशून होतं, हे उघड होतं. मी ते पेपर वाचून तिथं ठेवून दिले आणि बाकी खरेदीकडं वळलो. इथली काही काही फळं वेगळी दिसली. केळी इथं पिकतच नाहीत, असं हर्षनं मागं सांगितलं होतं. इथं केळी येतात ती कोस्टारिकामधून. आलूबुखार, स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षं ही फळंही आपल्यापेक्षा दिसायला थोडी वेगळी दिसतात. इकडे शेतमाल आयात करताना बरेच नियम, निर्बंध आहेत. त्याचा परिणाम असावा. पण इथल्या लोकांना त्यामुळं उत्तम दर्जाची फळं मिळतात, हे नक्की. आम्ही द्राक्षं घेतली होती, ती अगदी गोल आकाराची होती आणि भन्नाट चवीची होती. याच दालनाच्या पुढं द्राक्षांचं जन्मांतर असलेले द्रवही दिसले. आपल्याकडे ते असे उघड मॉलमध्ये विकायची टूम मध्येच निघते आणि परत विरून जाते. इकडे तसला काही पेच नसल्याने त्या विभागात जगभरातील उंची मद्ये सुखाने शेजारी शेजारी नांदत होती. मी उत्सुकतेने त्या भागात चक्कर टाकून आलो. तिथल्या वेगवेगळ्या वाइन, बीअर, व्हिस्की, रम, जीन आणि इतर ‘जी जी रं जी जी रं जी जी जी’ मंडळी आणि त्यातली व्हरायटी बघून थक्क झालो. जगात माणसानं काय ही मदहोश गोष्ट शोधून काढली आहे, असं वाटून गेलं. मी त्या चिंतनात बुडालेलो असतानाच कुटुंबाची हाक आली आणि मी पुन्हा भेंडी, बटाटा, वांगी आदी ‘मंडई’त शिरलो.

खरेदी झाल्यावर आता आपलं आपण बिल करायचं, यात आम्ही तयार झालो होतो. नीलला ते करण्याची क्रेझ होती. मग त्यानेच ते बिल केलं आणि आम्ही बाहेर पडलो. इथून चालत घरी पोचलो. आता बॅगा भरणे, काही वस्तू पुन्हा काढणे, परत भरणे असला कार्यक्रम सुरू झाला. सुदैवानं आम्हा दोघांनाही फार भरमसाठ सामान घेऊन फिरायची सवय नसल्याने आमच्या चार आटोपशीर आकाराच्या बॅगा पटकन भरून झाल्या. बॅगा भरणे हे माझं डिपार्टमेंट. त्यातल्या सर्व वस्तू नीट घडी घालून, कमीत कमी जागा व्यापतील, अशा पद्धतीने भरायला मला आवडतं. तर त्या बॅगाही भरून झाल्या. आम्ही संध्याकाळी साधारण पाच वाजता हर्ष-अनुजा आणि काका-काकूंचा निरोप घेऊन निघालो. काका-काकू पुढच्या आठवड्यात परत येणार होते. हर्ष आणि अनुजानं आज ‘वर्क फ्रॉम होम’ करायचं ठरवलं होतं. त्यामुळं ते आम्हाला सोडायला फिन्सबरी पार्क स्टेशनपर्यंत आले. इथं पुन्हा एकदा सेल्फ्यांची आवर्तनं झाली. आम्ही स्टेशनच्या आत जाऊन दिसेनासे होईपर्यंत काका आमचे फोटो काढत होते. आमचाही पाय नक्कीच जड झाला होता. मगाशी ‘सिटी मॅपर’वर हिथ्रो टर्मिनलकडे जाणाऱ्या ट्रेनच दिसत नव्हत्या. काही अडचण तर उद्भवली नाही ना, असं वाटलं. मात्र, तसं काही नव्हतं. स्टेशनवरून लगेच हिथ्रो टर्मिनल २ कडे जाणारी अंडरग्राउंड ट्रेन आली. आमचा आजचा या ट्रिपमधला तरी ‘अंडरग्राउंड’चा हा शेवटचा प्रवास होता. आमच्या मोठमोठ्या बॅगा दाराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवल्याने मला उभ्यानेच प्रवास करावा लागला. सुमारे तासाभराचा हा प्रवास होता. आता आर्सेनल, हॉलोवे रोड, कॅलेडोनियन रोड, किंग्ज क्रॉस, रसेल स्क्वेअर, हॉलबर्न, कॉव्हेंट गार्डन, लिस्टर स्क्वेअर, पिकॅडिली सर्कस, ग्रीन पार्क, हाइड पार्क कॉर्नर, नाइटब्रिज, साउथ केन्सिंग्टन, ग्लॉसेस्टर रोड, अर्ल्स कोर्ट, बॅरन्स कोर्ट, ॲक्टन टाउन, ऑस्टरली, हन्सलो ईस्ट, हन्सलो सेंट्रल, हन्सलो वेस्ट ही स्टेशनं भराभर मागं पडत होती. आठ दिवसांच्या वास्तव्यात या स्टेशनांचा क्रम बऱ्यापैकी लक्षात राहिला होता. जवळपास तासा-सव्वा तासानंतर हिथ्रो टर्मिनल २ स्टेशन आलं. इथं उतरलो. बऱ्याच लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर करत करत एकदाचे टर्मिनल २, अर्थात क्वीन्स टर्मिनलला पोचलो. इथं जाताना फार काही कटकट नसते. इमिग्रेशनमधून आम्ही झटपट आत आलो. 
आम्हाला फ्लाइटमध्ये जेवण असणार होतं; पण पाच वाजल्यापासून रात्री दहा-सव्वादहापर्यंत काय खाल, म्हणून हर्षनं आम्हाला पराठे पार्सल करून दिले होते. मला तर खरं भरून आलं होतं. एवढं कोण करतं हो! आणि खरं सांगतो. आम्हाला तिथं पोचेपर्यंत भूक लागलीच होती. मग आम्ही वर तिथे बसून ते पराठे खाल्ले आणि खरंच बरं वाटलं. हर्षचा हा निर्णय किती बरोबर होता, हे आम्हाला नंतर कळणारच होतं.
आता ‘एअर इंडिया’च्या खिडकीत जाऊन सामान ‘चेक-इन’ करणं हा प्रकार राहिला होता. तिकडं भली-मोठी लाइन होती. आम्ही तिथल्या किऑस्कमध्ये ऑनलाइन (वेब) चेक-इन केलं. तिथून आलेल्या त्या पट्ट्याही ताब्यात घेतल्या. तरीही आम्हाला त्या लाइनीत उभं राहावं लागलं. अखेर बरंच पुढं गेल्यावर तिथल्या माणसांनी ऑनलाइन ‘चेक-इन’ केलेल्यांना वेगळ्या व छोट्या रांगेत उभं केलं. अखेर एकदाच्या बॅगा त्यांच्या ताब्यात गेल्या आणि आम्ही जरा मोकळे झालो. इकडून आता सिक्युरिटी. ते काम तसं लवकर झालं. फक्त इकडे सिक्युरिटी चेकिंग करताना बेल्ट काढायला लावला आणि आडवं उभं राहून, विशिष्ट पद्धतीने दोन्ही हात वर करून उभं राहायला लावलं. अर्थात सगळ्यांनाच तसं ते करत होते, पण मला जरा ते एम्बॅरसिंग वाटलं. अर्थात इलाज नव्हता. पण ते सगळं झटपट संपवून ‘ड्युटी फ्री’त रेंगाळलो. खरं तर आम्ही संपूर्ण ट्रिपमध्ये खरेदीचा मोह कटाक्षाने टाळला होता. इकडे सगळं पौंडाच्या हिशेबात महाग, हा महत्त्वाचा मुद्दा तर होताच; शिवाय भारतात जे मिळतं त्याच वस्तू इकडे घेण्यापेक्षा फिरण्यासाठी, खाण्यासाठी, तिकिटांसाठी ते पैसे वापरावेत, असं आम्हाला वाटत होतं. ‘ड्युटी फ्री’मध्येही खरेदीचा मोह आवरला आणि पुढं निघालो. 

आमच्या फ्लाइटचा गेट नंबर ३९ होता, हे तिथल्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर कळलं. मग आम्ही तिकडं निघालो. तिकडं पोचायला चालत १० ते १५ मिनिटं लागतील, असंही तिथल्या फलकांवर लिहिलं होतं. ही सोय चांगली होती, मात्र त्यामुळं आमची पायपीट टळणार नव्हतीच. हा हिथ्रो विमानतळ एवढा अवाढव्य आहे, की बस! आम्ही पुन्हा अनेक लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर अशी मजल-दरमजल करत त्या ३९ क्रमांकाच्या ‘एअर इंडिया’च्या गेटवर पोचलो. इकडे आपल्या लोकांची भरपूर गर्दी दिसली. खरं तर इथंच आपण भारतात असल्यासारखं वाटलं. ‘एअर इंडिया’च्या स्टाफमधले मराठी लोक एकमेकांत बोलताना ऐकू येत होतं. एकूण ‘मेरे देश की मिट्टी’चा सुगंध इकडेच यायला लागला होता. आमचं बोर्डिंग तसं वेळेत सुरू झालं आणि आम्ही विमानात जाऊनही बसलो. मात्र, आता खरी गंमत होती. आमच्या फ्लाइटला ‘टेक ऑफ’ करायला सिग्नलच मिळेना. बराच वेळ ते जागेवरच उभं होतं. हवाई सुंदऱ्यांनी लगबग करून लोकांना तेवढ्यात ती तसली पॅक्ड बिस्किटं वगैरे कोरडा खाऊ द्यायला सुरुवात केली. मात्र, लोकांची अस्वस्थता वाढत होती. अखेर पायलटने जाहीर केलं, की युरोपच्या आकाशात विमानांची प्रचंड गर्दी झाली असल्यानं आपल्याला उडायला परवानगी नाही. साधारण ११ वाजता आपण उड्डाण करू शकू. झालं! आता इथंच दीड तास बसणं आलं. अशा वेळी समोर चालणारा स्क्रीन व त्यावर एखादा सिनेमा बघणं ही करमणूक त्यातल्या त्यात घडू शकते. मात्र, आमच्या तिघांचेही समोरचे स्क्रीन धड नव्हते. एकही सुरू नव्हता. माझा तर शेवटपर्यंत झाला नाही. त्या सुंदरीला सांगून झालं. तिनं एकदा तिकडं जाऊन ती सिस्टीम रिसेटही केली. मात्र, स्क्रीन सुरू होण्यापलीकडे काहीही झालं नाही. मला बाकी काही नाही; पण तो ‘पाथ मोड’ तरी बघायचाच असतो. पण ते काही नशिबात नव्हतं. ‘एअर इंडिया’ आता ‘टाटां’कडं आली असली, तरी सेवा सुधारणेला अजून भरपूरच वाव आहे, असं वाटलं. प्रचंड कंटाळ्यानंतर अखेर ११ वाजून पाच मिनिटांनी ते विमान एकदाचं हललं. त्या प्रचंड विमानतळावर आमची ‘टॅक्सी’च १५ मिनिटं चालली. अखेर साडेअकराच्या सुमारास आमच्या त्या ‘बोइंग’नं अवकाशात झेप घेतली आणि आम्ही हुश्श केलं. खाली लंडन हिऱ्या-माणकांसारखं लखलखत होतं. मनातल्या मनात पुन्हा एकदा लंडनला ‘बाय बाय’ केलं. थोड्याच वेळात ढगांत खालचं दृश्य दिसेनासं झालं. आता रात्रही झाली होती. उशीर झाल्यानं हवाई सुंदरींनी भराभर जेवण आणून दिलं. इकडे ‘खान-पान’ व्यवस्था बरी होती. म्हणजे ‘पान’ बरं होतं; ‘खान’ ठीकठाकच होतं. एकूण पनीर हा प्रकार एवढ्या विविध तऱ्हेने तुमच्यावर मारला जातो की काही विचारू नका. काही पदार्थांबाबत केवळ ‘अतिपरिचया’ने ‘अवज्ञा’ होते, त्यातला हा एक! 

२५ ऑगस्ट २३, मुंबई

असो. आता ही फ्लाइट नॉनस्टॉप असल्यानं थेट मुंबईतच उतरायचं होतं. निर्धारित वेळ सकाळी ११ ची होती. मात्र, निघायलाच उशीर झाल्याने आता ही तास-सव्वा तास उशिरा पोचणार हे गृहीत धरलंच होतं. माझा ‘पाथ मोड’ बंद असल्याने विमान नक्की कुठे आहे, हे काही कळतच नव्हतं. आता सकाळचा नाश्ता, चहाही देण्यात आला होता. खिडकीतून अरबी समुद्र तरी दिसेल असं वाटत होतं. मात्र, ढगांची दाट चादर होती. ती हटली, तरी खाली काळपट असंच काही तरी दिसायचं. आता तो समुद्र आहे की ढगच आहेत हे काही कळत नव्हतं. शेवटी मी तो नाद सोडला. थोड्याच वेळात ‘डिसेंडिंग’ सुरू होणार, अशी घोषणा झाली. मुंबईत पहिल्या फटक्यात कधी विमान उतरत नाही, हे माहिती होतंच. मग दोन फेऱ्या झाल्या. मागे येऊन परत महाराष्ट्राच्या मुख्य भूमीवर आलो. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या दिसायला लागल्या. अखेर ‘एटीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला असावा. विमान झपाट्यानं खाली येऊ लागलं. खाडी ओलांडली आणि थोड्याच वेळात ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या एकुलत्या एक रन-वेला आमच्या विमानाची चाकं लागली. मनातल्या मनात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर केला. 
विमानातून टर्मिनलला आलो. विमानातच घोषणा झाली होती, की बॅगा ५ नंबरला येतील. आम्ही आपले त्या पट्ट्यापाशी जाऊन थांबलो. आमची आन्हिकंही उरकली. तरी त्या पट्ट्यावर काही हालचाल दिसेना. मग नीललाच शंका आली, म्हणून दहा नंबरच्या पट्ट्यापाशी गेलो. तिथं बॅगा येत होत्या. क्षणात आपण भारतात आल्याची जाणीव झाली. थोड्या वेळानं आलेल्या बॅगा गुपचूप उचलल्या. इकडे ‘ग्रीन चॅनेल’ला पहिल्यांदाच एक अधिकारी आडवा आला. कुठून आलात, बॅगेत काय वगैरे किरकोळ विचारल्यासारखं करून त्यानं (बहुदा आमच्या चेहऱ्यांकडं बघून) जाऊ दिलं. आम्ही जाताना जी कॅब पुण्यातून केली होती, त्यांनाच बोलावलं होतं. अखेर दीड वाजता आमची व त्यांची भेट झाली. फूड मॉलला एक ब्रेक घेऊन आम्ही जवळपास पाच -सव्वापाचला अखेर सुखरूप घरी पोचलो... लंडन ट्रिपचं स्वप्न अशा रीतीनं सुफळ संपूर्ण झालं होतं... मन समाधानानं शिगोशीग भरलं होतं...! 


-----------------------------

उपसंहार...

नंतरचे दोन दिवस आमची सुट्टीच होती. जेटलॅग थोडासा जाणवला. सकाळी उशिरा उठलो. जवळपास दहाच्या पुढं... मग लक्षात आलं, आत्ता लंडनला साडेपाच वाजले असतील पहाटेचे! आम्हाला तिकडं साधारण साडेपाच-सहालाच जाग यायची. मात्र, दोन दिवस संपले आणि सोमवारपासून म्हणजे २८ ऑगस्टपासून ऑफिसला जायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस लंडनला खरोखरच ‘मिस’ केलं. मग तिथं काढलेले फोटो, व्हिडिओ पुन:पुन्हा पाहिले. अंडरग्राउंड ट्रेनचे व्हिडिओ यू-ट्यूबवर बघितले. काका-काकू अजून तिकडंच असल्याने ते तिकडचे फोटो आमच्या ग्रुपवर टाकायचे आणि ‘आम्ही तुम्हाला मिस करतोय,’ असं लिहायचे. त्यामुळं तर हे आणखीनच जाणवायचं. मग फेसबुकवर एक ‘लंडन फोटोग्राफी क्लब’ नावाचा ग्रुप सापडला. तो जॉइन केला आणि तिथं फोटो टाकायला सुरुवात केली. संपूर्ण लंडन ट्रिपमध्ये सोशल मीडियावर एकही फोटो टाकायचा नाही, हे बंधन मी स्वत:वर घालून घेतलं होतं आणि ते परत येईपर्यंत पाळलं. आल्यावर शनिवारी सकाळी पहिल्या दिवसाचे, म्हणजे जातानाचे फोटो टाकले. त्यात ‘जाऊन आलो,’ असं स्पष्ट लिहिलेलं असूनही अनेकांना आम्ही त्याच दिवशी तिकडं गेलो आहोत, असं वाटलं, तो भाग निराळा! मग पुढचे काही दिवस रोजचे फोटो एकेका दिवशी आणि मग ३० ऑगस्टला ब्लॉगचा पहिला भाग लिहिला तेव्हा मलाच हुश्श वाटलं. हे लिखाण म्हणजे माझ्या स्वत:च्या आनंदासाठी केलेलं लिखाण आहे. अर्थात ते मी सोशल मीडियावर शेअर करतोच. त्यातून जे वाचतील ते वाचतील. मला स्वत:ला आणखी दहा-वीस वर्षांनी एवढे तपशील लक्षात राहणार नाहीत, म्हणून हे अगदी बारीक-सारीक वर्णन टिपून लिहून ठेवण्याचा घाट! शिवाय पुन्हा कधी जाणं होतंय, नाही होत कुणाला माहिती! अनेक गोष्टी करायच्या, बघायच्या राहिल्या हे तर उघडच आहे. मात्र, जे काही बघितलं तेही आयुष्यभर लक्षात राहील आणि त्या स्मृती आनंद देत राहतील, हे नक्की.
दोन दिवसांनंतर बाहेर पडलो, तर तिकडच्या सवयीप्रमाणे (झेब्रा क्रॉसिंगवरूनच) बिनधास्त रस्ता ओलांडायला लागलो, तर एक दुचाकीवाला जोरात आला आणि माझ्याकडे भयंकर लूक (‘दोन मिनिटं थांबता येत नाही का, ***’) देऊन पुढं निघून गेला. मी लंडनच्या नव्हे, तर पुण्याच्या रस्त्यावर आहे हे मग माझ्या डोक्यात आलं. 
नंतर मी एकदा दुचाकी घेऊन निघालो होतो. आमच्या घराजवळच एक शाळा आहे. तिथं मोठं झेब्रा क्रॉसिंग आहे. तिथून एक बाई लहान मुलाची प्रॅम घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी पुढं येत होत्या, पुन्हा थांबत होत्या. मी आपोआप माझी बाइक हळू केली. मग मागून येणारी एक कारही स्लो झाली. त्यांना ते लक्षात आलं. त्यांनी झटकन रस्ता ओलांडला. जाताना माझ्याकडे पाहून एक स्मितहास्य केलं...
अवघी लंडनवारी इथं सुफळ झाली!!


(विशेष उल्लेख - शीर्षक प्रेरणा : शान्ता शेळके यांची कविता... कौशल इनामदार यांनी फार सुरेख चाल दिली आहे या कवितेला!) 


(समाप्त)

-------------------

लंडन प्रवास मार्गदर्शिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------






16 Sept 2023

लंडनवारी - भाग ९

राजवाडा, गॅलरी अन् पोर्ट्रेट्स...
--------------------------------------------------------



लंडन, बुधवार, २३ ऑगस्ट २०२३.

लंडनला आलो आणि बकिंगहॅम पॅलेस पाहिला नाही असं कसं चालेल? हे म्हणजे दिल्लीला जाऊन इंडिया गेट, मुंबईला जाऊन गेट वे ऑफ इंडिया किंवा पुण्याला जाऊन शनिवारवाडा न पाहिल्यासारखंच झालं! वास्तविक मला इंग्लंडच्या राजघराण्याविषयी विशेष रुची अगदी अलीकडं निर्माण झाली. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘द क्राउन’ ही ब्रिटिश राजघराण्यावरची भव्य मालिका हे त्याचं प्रमुख कारण. ही मालिका पाहिली आणि त्या मालिकेतील अतिशय बारीकसारीक तपशिलांनी, जबरदस्त कास्टिंग आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्यांनी मी विलक्षण प्रभावित झालो. ही ‘नेटफ्लिक्स’वरील सर्वांत खर्चीक मालिका. या मालिकेसाठी तिच्या कर्त्या-करवित्यांनी केलेले प्रचंड कष्ट जाणवतात. तर सांगायचा मुद्दा, या मालिकेमुळं मला ब्रिटिश राजघराण्याविषयी अतिशय कुतूहल निर्माण झालं. यापूर्वी त्यांच्याविषयी वृत्तपत्रांतून आणि काही प्रासंगिक लेखांतून जेवढं थोडं फार वाचलं होतं, तेवढंच मला माहिती होतं. मात्र, ‘क्राउन’नं माहितीचा महाखजिनाच उघडला. त्यातही या मालिकेत क्लेअर फॉय या अभिनेत्रीनं रंगवलेलं तरुण राणी एलिझाबेथचं काम मला अतिशय आवडलं. एकूणच विसाव्या शतकातील जागतिक इतिहास (अर्थात राजघराण्याच्या संदर्भाने) या मालिकेतून उलगडत जातो. तेव्हा मला या कारणासाठी बकिंगहॅम पॅलेस बघायचाच होता. मी ‘सकाळ’मध्ये १ सप्टेंबर १९९७ रोजी रुजू झालो, तो दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात आहे. आदल्याच दिवशी प्रिन्सेस डायनाचं अपघाती निधन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या कचेरीत त्याचीच सगळीकडं चर्चा होती. नंतर अगदी अलीकडे एलिझाबेथच्या संदर्भाने मी ‘मटा’त काही लेख लिहिले होते. राणीचं निधन झाल्यावर ‘एक होती राणी’ या शीर्षकाचा लेख तर अगदी अलीकडे प्रसिद्ध झाला होता. या सर्व कारणांनी बकिंगहॅम पॅलेसची भेट चुकवून चालणार नव्हती. तिथं चालणारा ‘चेंजिंग ऑफ द गार्ड्स’ सोहळा पाहण्यासारखा असतो. त्यामुळे तो सोहळा असेल तेव्हाच राजवाड्याला भेट द्यावी असं ठरलं. लंडन मुक्कामी शनिवार-रविवारी अधिक माहिती घेता, असं कळलं, की या सोहळ्याचंही एक वेळापत्रक असतं आणि तो काही रोज होत नाही. मग आम्ही इंटरनेटवर त्या वेळा पाहिल्या तर कळलं, की येत्या आठवड्यात सोमवारी व बुधवारी हा सोहळा आहे. आम्ही गुरुवारी परत निघणार होतो आणि सोमवारी आम्ही ‘लंडन आय’ व ‘मादाम तुस्साँ’ची तिकिटं आधीच काढली होती. तेव्हा उरला बुधवार. मग बुधवारी सकाळी ११ वाजता होणारा हा सोहळा बघायला जायचं आम्ही ठरवलं.
नेहमीप्रमाणे आम्ही तिघं व काका सकाळी आवरून निघालो. बकिंगहॅम पॅलेससाठी ग्रीन पार्क स्टेशनला उतरावं लागतं, हे मी हिथ्रोवरून येताना पहिल्याच दिवशी बघून ठेवलं होतं. त्यामुळं आम्ही बागेतून चालत मेनर हाऊस स्टेशनला गेलो आणि ‘पिकॅडिली लाइन’ घेऊन ग्रीन पार्क स्टेशनला उतरलो. आम्ही इथं आल्यापासून आकाश चक्क रोज निरभ्र होतं. सुंदर ऊन पडत होतं. आम्ही ग्रीन पार्क स्टेशनला उतरून ते अवाढव्य पार्क पायी ओलांडून बकिंगहॅम पॅलेसच्या दिशेनं निघालो. या बागेत बसण्यासाठी भाड्यानं आरामखुर्च्या मिळतात. त्याचे दरही तिथं लावले होते. अनेक लोक त्या खुर्च्या घेऊन ऊन खात बसले होते. मला पुलंनी ‘अपूर्वाई’त लिहिलं होतं ते आठवलं. फक्त इथं झोपताना तोंडावर ‘टाइम्स’ दिसला नाही. मुळात सकाळची वेळ होती, त्यामुळं कुणी ‘पाच मिनिटं जरा पडतो...’ या मूडमध्ये नव्हतं. सगळे मस्तपैकी ते ऊन एंजॉय करत बसले होते. आम्ही दहा मिनिटं चालत बकिंगहॅम पॅलेसच्या प्रांगणात पोचलो. तेव्हा साधारण सव्वादहा वाजले होते. मात्र, तरीही तो सोहळा बघण्यासाठी त्या पॅलेसच्या गेटसमोर प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीत आम्हीही सामील झालो. अगदी समोरच्या बाजूला व्हिक्टोरिया राणीचं एक शिल्प आहे. त्या शिल्पाभोवती असलेल्या कट्ट्यावरही अनेक लोक बसले होते. आम्ही पॅलेसच्या कंपाउंडच्या बाजूने, पण समोरच्या मैदानाकडं तोंड करून उभे होतो. इथं आता चक्क ऊन लागायला लागलं होतं. काही लोक खाली बसकण मारून बसले होते. ते घोड्यांवरून फिरणारे इथले खास पोलिस गर्दीवर नजर ठेवून होते. त्यातला एखादा अचानक ‘डुगना लगान देना पडेगा,’ असं म्हणतो की काय, असं मला वाटायला लागलं. खरं तर वाट बघून पेशन्स संपायला लागला होता. पुन्हा एकदा तो पोलिस आला आणि पाकीटमारांपासून सावध राहा, तुमच्या सॅक पुढच्या बाजूला घ्या, वगैरे सांगून गेला. आम्ही जरा सावध होऊनच बसलो. अखेर एका कोपऱ्यातून त्या सैन्याची ती टिपिकल धून ऐकू येऊ लागली. एका बाजूने पोलिसांची एक तुकडी आली. त्यांच्यासमोर त्यांचं ते बँडपथक वाजत होतं. पॅलेसच्या एका कोपऱ्यातलं गेट उघडलं व ती तुकडी आत गेली. कंपाउंडच्या आत व पॅलेसच्या इमारतीसमोरही बरीच मोकळी जागा आहे. तिथं त्यांचा ड्युटी बदलण्याचा सोहळा सुरू झाला. मधोमध ते बँड पथक वेगवेगळ्या धून वाजवत होतं. एकेक तुकडी येत होती आणि आधीच्या तुकडीची जागा घेत होती. मग ती तुकडी दुसऱ्या गेटनं बाहेर जात होती. या इंग्रजांना प्रत्येक गोष्टीची रुढी करून ठेवायची फार सवय! अर्थात ते जे काही करत होते, ते शिस्तबद्ध आणि चांगलंच होतं. मात्र, एकूण या सगळ्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न मला पडला. अमृतसरजवळ त्या अटारी-वाघा बॉर्डरवरही मला हाच प्रश्न पडला होता. लोकांना आवडतंय म्हणून चाललंय की काय, असं वाटलं. त्या गार्ड्सचे ड्रेस लालभडक आणि त्यांची ती उंच पिसांची टोपी मात्र मजेदार होती. पायदळ आणि घोडदळ या सगळ्यांची परेड झाली. मग त्या धूनचं वादन झालं. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि सुमारे ४० मिनिटं चाललेला तो सोहळा एकदाचा संपला. 
बकिंगहॅम पॅलेस आतूनही बघता येतो. हर्ष-अनुजा आणि काका-काकूंनी तिथं खुल्या असलेल्या काही खोल्या बघितल्या आहेत. या वेळी मात्र आम्ही तिकीटही काढलं नव्हतं आणि आम्हाला तेवढा वेळही नव्हता. राणी एलिझाबेथ या आज्जीबाई आत्ता हयात असायला हव्या होत्या, असं मला वाटून गेलं. मी तीन वर्षांपूर्वी इकडं येण्याचा प्लॅन केला होता, मात्र तेव्हा कोव्हिडमुळं आणि लॉकडाउनमुळं तो रद्द झाला होता. तेव्हा आमची ही आज्जीबाई हयात होती. बिचारी माझी वाट बघून बघून गेली. (असं मनातल्या मनात म्हणून मीच माझं सांत्वन केलं.) खरं तर किंग चार्ल्सला रीतीप्रमाणे समाचाराचं भेटायला जायला हवं होतं. मात्र, त्याची फार काही इच्छा दिसली नाही. त्या लोकांनी पण लगेच गेट लावून घेतलं. आमच्यासारखे एवढे पाहुणे आले होते, तर निदान चहा तरी विचारायचा. मात्र, राजघराण्याला एकूण रीत कमीच, असं (मनातल्या मनात म्हणून) आम्ही शेजारच्या बागेची वाट धरली. बाकी हा बकिंगहॅम पॅलेस म्हणजे अगदीच ठोकळा आहे. त्या मानाने अगदी आपल्याकडंही इंग्रजांनी बऱ्या इमारती बांधल्या आहेत. अगदी आपलं राष्ट्रपती भवनच घ्या ना! उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे तो! मात्र, बकिंगहॅम पॅलेसची इमारत अगदी अनाकर्षक, ठोकळेबाज व सर्वसामान्य आहे. सामान्य इंग्लिश लोकांना मात्र या राजघराण्याचं कोण प्रेम! मीडियाचं तर लव्ह-हेट असं नातं आहे. एका बाजूला या राजघराण्यातल्या कुचाळक्या, गॉसिप बाहेर काढण्यात तिथली सायंदैनिकं आघाडीवर असतात, तर दुसरीकडं राजा किंवा राणी म्हटलं, की अति हळवेपणा पण हेच लोक करणार! असो.
त्या सोहळ्यापायी तास-दीड तास तळपत्या उन्हात उभं राहून आमचे पाय गेले होते. मग बागेत जरा टेकणं आलंच. तिथं बसलो असताना एक मराठी तरुण, त्याची बायको व त्यांची अगदी लहान मुलगी आमच्या अगदी जवळच बसले होते. त्यांच्या बोलण्यावरून ते पुण्या-मुंबईतले (त्यातही कोथरूड, एरंडवणे, पार्ले, दादर) होते, हे उघडच समजत होतं. क्षणभर वाटलं, की ‘काय पाव्हणं, कुणीकडे?’ असं विचारावं. मात्र, लंडनच्या ‘झू’मधल्या कावळ्याची पुलंनी सांगितलेली गोष्ट आठवली. मग गप्प बसून राहिलो. थोडं पुढं चालत गेल्यावर एक असंच मराठी कुटुंब दिसलं. ते मराठवाड्याकडं असावं, असं एकूण ‘बारदान्या’वरून वाटलं. इथंही ओळख दाखवण्याचा मोह टाळला. (कारण तेच... ‘झू’मधला कावळा...)
आता आम्हाला नॅशनल गॅलरीत, म्हणजेच ट्रॅफल्गार स्क्वेअरला जायचं होतं. तसं जवळच होतं. पण आम्हाला चालायचा कंटाळा आला होता. म्हणून बसनं जायचं ठरवलं. ग्रीन पार्क सोडून मुख्य रस्त्यावर आलो. रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला उभं राहिलो. इथं बसस्टॉपना इंग्रजी आद्याक्षरांची नावे आहेत. आम्हाला ‘जे’ नावाच्या स्टॉपवर जायचं होतं. ‘सिटी मॅपर’ मदतीला होतंच. नऊ नंबरची बस मिळणार असं दिसत होतं. आम्ही स्टॉपवर उभे होतो, पण लवकर बस येईना. त्या रस्त्यावर हळूहळू बरीच गर्दी वाढताना दिसली. तेवढ्यात बस आली. आम्ही बसमध्ये शिरलो. बसायला जागाही मिळाली. केवळ तीनच स्टॉपनंतर आम्हाला उतरायचं होतं. मात्र, त्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं होतं. लंडनमध्ये हीच गोष्ट बघायची राहिली होती, तीही झाली. नंतर काही वेळानं अग्निशामक दलाच्या गाड्या विरुद्ध दिशेनं जोरात आवाज करत गेल्या. कदाचित त्यामुळंच रस्त्यातली वाहतूक थांबविली असावी. आमची बस हळूहळू पुढं सरकत होती. अर्थात जॅम असला तरी जॅमला साजेशी गोष्टी - उदा. जोरजोरात हॉर्न वाजवणं, लेन तोडून गाडी घुसवणं, दुचाकी फूटपाथवर चढवणं आणि जोडीला जिभेवर भाषेला वैभव प्राप्त करून देणारे मधुर शब्द - यातलं काहीही नव्हतं. लंडनचं ट्रॅफिक जॅम अगदीच अळणी होतं. आम्ही मात्र बसमध्ये जास्त वेळ बसायला मिळणार, याच आनंदात होतो. शेजारच्या देखण्या इमारती आणि खालच्या फूटपाथवरून चालणारी देखणी माणसं बघत बसलो. एका इमारतीवर तर भलं मोठं मोराचं शिल्पही होतं. तिथल्या एकूण सौंदर्याचा आणि टापटिपीचा आपल्याला नंतर नंतर त्रास व्हायला लागतो हो! असं कुठं असतं का, असं वाटायला लागतं. ट्रॅफिक जॅम ही चिंतन करण्यासाठीची उत्तम जागा असते, एवढं खरं...
अखेर आम्ही त्या चार सिंहवाल्या चौकात पोचलो. चालत मागच्या बाजूला असलेल्या नॅशनल गॅलरीत गेलो. इथंही तिकीटवाल्यांची वेगळी लाइन आणि फुकट जाणाऱ्यांची (म्हणजे आमच्यासारख्यांची) लाइन वेगळी. अखेर आत जाण्याची परवानगी मिळाली. आत गेल्यावर त्या उंच, दगडी व गारेगार इमारतीनं माझं लक्ष वेधून घेतलं. लंडनमधलं वास्तुवैभव ही एक कमाल चीज आहे. प्रत्येक इमारत या लोकांनी काय अप्रतिम, देखणी बांधली आहे! त्यात ही तर चित्रकलेची श्रीमंती मिरवणारी वास्तू! ते भलेमोठे खांब, वरती अर्धगोलाकार घुमट, त्याच्या खाली काचेची नक्षी, प्रत्येक भिंतीवर सुंदर कमानी आणि त्यात लावलेली उंच-भली मोठी आणि केवळ अद्भुत अशी चित्रं! युरोपात मध्ययुगात जे सांस्कृतिक पुनरुत्थान (रेनेसान्स) झालं, त्याची साक्ष मिरवणारी, आश्चर्यानं डोळे विस्फारायला लावणारी किंवा इंग्रजीत ज्याला ‘जॉ ड्रॉपिंग’ म्हणतात, तसली अवस्था आणणारी ती विलक्षण देखणी चित्रं पाहत पुढचा काही काळ कसा गेला, हे मला कळलं नाही. नॅशनल गॅलरी हे प्रत्येकानं अनुभवावं असंच प्रकरण आहे. ते शब्दांत सांगणं कठीण. आपल्याकडच्या आधुनिक चित्रसंस्कृतीवर पाश्चात्त्य चित्रसंस्कृतीचा केवढा पगडा आहे, हे तिथं गेल्यावर कळलं. आपल्याकडच्या चित्रकारांनी ही आधुनिक चित्रकला आपल्या पद्धतीने वाढवली, मोठी केली तो निराळा भाग. मात्र, पहिला प्रभाव नि:संशय या प्रतिभावान युरोपीय चित्रकारांचा होता, असं मला तरी वाटलं. त्या दालनांत तिकडच्या राजे-रजवाड्यांची, ख्रिस्ताची व त्याच्या आयुष्याची, तसंच चर्चची चित्रं अधिक असणार हे स्पष्टच होतं. मात्र, त्या चित्रांसाठी वापरलेले रंग, पोत, एकूणच त्या चित्राचं स्केल हे सगळं फारच अचंबित करणारं होतं. याच गॅलरीत लिओनार्दो द विंची आणि मायकेलएंजेलोची मूळ चित्रंही पाहायला मिळाली. मायकेलएंजेलोचं चित्र अर्धवट सोडलेलं होतं. रेम्ब्रांट सोडला, तर इतर चित्रकारांची नावंही माझ्या लक्षात नाहीत. मात्र, त्यांचीही चित्रं अफलातून होती. त्यातलं एक घोड्याचं जवळपास आठ ते दहा फूट उंचीचं व तेवढ्याच रुंदीचं भव्य चित्र तर मी विसरूच शकत नाही. कमाल!
आम्ही याच नॅशनल गॅलरीत असताना आपल्या ‘चांद्रयाना’च्या सफल चंद्रावतरणाची बातमी व्हॉट्सअपवर समजली. सगळ्या देशभर जल्लोष सुरू झाला आणि तिकडे आम्हीही आनंदलो. क्षणभर वाटून गेलं, की आत्ता आपण भारतात, आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये असायला हवे होतो... मग त्या गॅलरीतील एका बाकावर बसून पुढचा काही वेळ चांद्रयानाच्या बातम्या, व्हिडिओ असं सगळं बघण्यात घालविला. आता दोन वाजून गेले होते. भूक लागली होती. त्यामुळं बाहेर पडलो. इथून जवळच एक सुपर मार्केट होतं. तिथं मिनी लंच पॅक मिळतो, असं आम्हाला अनुजानं सांगितलं होतं. मग आम्ही चालत तिकडं गेलो. तिथून वेगवेगळे चार पॅक घेतले आणि पुन्हा नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीसमोर येऊन एका कट्ट्यावर बसलो. इकडे ही एक चांगली सोय आहे. जागोजागी बसायला बाक असतात. पुरेशी झाडी असल्याने सावली असते. शिवाय कुणीही तुमच्याकडं (ढुंकूनही) बघत नाही. आपलं आपण खात बसायचं. शेजारी जवळच डस्टबिन असतेच कुठं तरी... तिथं कचरा टाकायचा, पाणी प्यायचं आणि पुढं चालू पडायचं. आम्ही ते पॅक घेऊन येत असताना, एका हॉटेलबाहेर बरीच गर्दी दिसली. फायर अलार्म वाजला होता. (दिवसभरातला हा दुसरा अनुभव...) तिथं तातडीनं एक अग्निशामक दलाची गाडी येऊन उभी राहिली होती. अगदी आपल्यासारखेच तिथंही लोक भोवती गोळा झाले होते आणि कुणी कुणी तर व्हिडिओही करत होते. त्या गर्दीतून आम्हाला फार काही दिसेना आणि आगही फार मोठी नसावी. मग आम्ही पुढं निघालो आणि कट्ट्यावर येऊन आमचं खाणं संपवलं.
इथं अगदी समोरच ती नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी होती. नावाप्रमाणेच इथं फक्त व्यक्तिचित्रांचंच प्रदर्शन होतं. आम्ही आत शिरल्यावर एका बाजूला तिकिटाचं काउंटर दिसलं. पुन्हा प्रश्न! तिकीट आहे की फुकट? नील चौकशी करून आला, तेव्हा कळलं, की कुठल्या तरी दोन दालनांत विशेष प्रदर्शनं भरली आहेत, ती बघायची असतील, तर फक्त तिकीट होतं. बाकी अन्य दालनं नेहमीप्रमाणे चकटफू होती. मग आम्ही लगेच एस्कलेटरनं पहिल्या मजल्यावर गेलो. हे संग्रहालयही बऱ्यापैकी मोठं होतं. अधिक चित्रं अर्थातच इथल्या राजघराण्यातल्या व्यक्तींची! ती उत्तमच होती हे खरं; पण साधारण एकाच साच्याची ती चित्रं बघून नंतर फार मजा येईना. अर्थात कीट्स, वर्डस्वर्थ अशा कवींची व्यक्तिचित्रंही होती. ती बघून छानच वाटलं.
याच दालनात बार्कर नावाच्या चित्रकाराचं ‘रिलीफ ऑफ लखनौ’ नावाचं एक चित्र होतं. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा विषय होता. हा विषय ब्रिटिश चित्रकाराने अर्थातच त्यांच्या बाजूने मांडला होता. लखनौत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना ताब्यात घेतल्याचे ते चित्र आहे. ते चित्र बघून मला अर्थातच वाईट वाटलं. शिवाय वर या चित्रकारानं त्या काळात हे चित्र इंग्लंडभर फिरवून इंग्रजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून मिरवलं आणि पैसे कमावले म्हणे. या चित्राच्या शेजारीच झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचं अगदी छोटंसं चित्र होतं. तिथं त्यांची माहितीही दिली होती. त्याशेजारीच ‘१८५७ च्या बंडा’ची थोडक्यात माहिती दिली होती. ‘आता त्या ‘शिपायांच्या बंडा’ला काही लोक स्वातंत्र्यसमर असेही म्हणतात,’ असेही तिथं लिहिलं होतं. या घटनेचा परिणाम असा झाला, की राणी व्हिक्टोरियानं ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार स्वत:च्या, पर्यायानं ब्रिटिश पार्लमेंटच्या थेट नियंत्रणाखाली आणला. या स्वातंत्र्यसमरात भारतभरात एकूण सहा हजार ब्रिटिश नागरिकांना ठार मारण्यात आलं, तर हे ‘बंड’ चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी जी दडपशाही केली, त्यात त्यांनी तब्बल आठ लाख भारतीयांना ठार केलं, हेही तिथंच लिहिलं होतं. याशिवाय ‘हे बंड दडपण्याचा खर्च म्हणून राणीने भारतात इथल्या लोकांवर १८५८ पासून इन्कम टॅक्स लादला,’ असंही तिथं लिहिलं होतं. लंडनमधील अंडरग्राउंड ट्रेन सुरू झाली १८६३ मध्ये. याशिवाय लंडनमध्ये त्या काळात अनेक विकासकामं सुरू झाली. नॅचरल हिस्टरी म्युझियमची ती भव्य इमारतही १८८१ मध्ये उभारण्यात आली. इंग्लंडच्या या विकासाचं इंगित मला वरच्या त्या माहितीवरून एकदम कळून आलं. बराचसा पैसा तर भारतातूनच आणला होता. अर्थात आता हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्या क्षणी मला तिथं जरा ते आतून लागलं, हे नक्की!
ही गॅलरी बघतानाही भरपूर पायपीट झाली होती. आता आणखी चालण्याची ऊर्जा आमच्यात शिल्लक नव्हती. बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती. गेले आठ दिवस आम्ही सतत फिरत होतो. सतत असा मारा झाल्यावर एका टप्प्यानंतर मेंदूची काही नवं ग्रहण करण्याची क्षमता काही काळ कुंठित होते. माझ्यासाठी तरी बुधवारी संध्याकाळी बहुतेक तो क्षण आला होता.
खरं तर हर्षनं आम्हाला ब्रिटिश म्युझियम आवर्जून बघायला सांगितलं होतं. त्यात ब्रिटनचा आणि लंडनचा इतिहास आणखी तपशीलवार पाहता आला असता. पण तसं तर या एकाच सहलीत आमचं सगळं काही बघून होणार नव्हतं, हे उघड होतं. तरीही आम्ही गेल्या आठ दिवसांत महत्त्वाची सर्व ठिकाणं बघितली होती; तिथं पाय लावले होते. तरीही अजून बरंच काही राहिलंच होतं. पाच वाजून गेले होते आणि आता आम्हाला घरी जायचे वेध लागले होते. जाताना बसने जाऊ या, असं ठरवलं. ट्रॅफल्गार स्क्वेअरवरून ‘वूड ग्रीन’ला जाणारी २९ नंबरची डबल डेकर बस फिन्सबरी पार्कमार्गे जात होती. आम्ही बस स्टॉपवर येताच २९ नंबर आली. आम्ही लगेच बसमध्ये चढून वर धाव घेतली. आणि अहो आश्चर्यम्! समोरच्या दोन्ही सीट मोकळ्या होत्या, याचं कारण ही बस याच स्टॉपवरून सुटत होती. मला तर कमालीचा आनंद झाला. आता पुढचा जवळपास तास-सव्वा तास लंडनच्या मध्यवर्ती भागातून, तेही संध्याकाळच्या मस्त वेळी ही बस मला फिरवणार होती. मी मोबाइल खिशात ठेवून दिला आणि अगदी रिलॅक्स होऊन ती शहरशोभा समोरच्या मोठ्या काचेतून बघू लागलो. (परवा मुंबईत डिझेलवरील शेवटच्या डबल डेकर बसला निरोप, ही बातमी वाचली आणि मुंबईतील डबल डेकर बसमध्ये बसायचे राहिलेच, याची परत एकदा दुखरी जाणीव झाली. आता मुंबईतही लंडनसारख्या एसी, इलेक्ट्रिक डबल डेकर बस येतील. पण त्यात समुद्रावरचा खारा वारा समोरच्या खुल्या खिडकीतून पिऊन घेण्याची मज्जा नसेल... असो.)
सुमारे सव्वा तास हा डबल डेकरचा टिबल-चौबल आनंद लुटल्यावर आमचं घर आलं. स्टॉपला उतरून पुन्हा बागेतून चालत हर्षचं घर गाठलं. आता आमच्या नियोजनातला आजचा हा शेवटचा दिवस होता... आता उद्या संध्याकाळी भारतात परतायचं होतं... त्यामुळं गुरुवारी काहीच कार्यक्रम ठेवला नव्हता...
दमून झोपताना पॅलेस आणि पोट्रेट्सचा कॅलिडोस्कोप डोळ्यांसमोर सिनेमासारखा सरकत होता!



(क्रमश:)

-----------------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

13 Sept 2023

लंडनवारी - भाग ८

लॉर्ड्स ते ‘माउसट्रॅप’ व्हाया डॉ. बाबासाहेब...
------------------------------------------------


लंडन, मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३.


लंडनला आल्यावर ‘मस्ट वॉच’च्या यादीत ‘लॉर्ड्स’ असणारच होतं. किती लहानपणापासून या मैदानाच्या दंतकथा ऐकल्या होत्या! आपण आपला पहिलावहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये याच मैदानात उंचावला. मी तेव्हा तिसरीत होतो. मात्र, मला तेव्हाची काहीच आठवण नाही. ती फाइल माझ्या मेंदूतून कायमची डिलीट झालीय आणि याची मला फार खंत आहे. मला १९८१, ८२ च्या घटना आठवतात. मात्र, १९८३ चा वर्ल्ड कप काही केल्या आठवत नाही. नुकत्याच आलेल्या ‘८३’ या सिनेमामुळं या सगळ्या गोष्टी (म्हणजे काही आठवत नाहीय असं) पुन्हा आठवल्या. त्यामुळं जखमेवर मीठच चोळलं गेलं. आता प्रत्यक्ष लॉर्ड्सवर जाऊनच या पापाचं क्षालन करणं गरजेचं होतं. मी लॉर्ड्सची डे टूर शुक्रवारीच बुक केली होती. काका आमच्यासोबत येणार होतेच. इथं डे टूर म्हणजे १०० मिनिटांची टूर! त्यासाठी ३० पौंड तिकीट होतं. ज्येष्ठ नागरिकांना २३.५० पौंड होतं. तिकीट काढल्याबरोबर मला एमसीसीकडून कन्फर्मेशनची मेल आली. एमसीसी म्हणजे मेरिलिबोन क्रिकेट क्लब. लॉर्ड्सचं मैदान या क्लबच्या मालकीचं आहे. (खरं म्हणजे होतं, असं म्हणायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष मैदानात गेलो तेव्हा जे. पी. मॉर्गन या अमेरिकी बँकेचा लोगो सर्वत्र दिसत होता. थोडक्यात, या मैदानाचे सर्वेसर्वा प्रायोजक आता ही बँक होती.) असो. एमसीसी म्हणजे टिपिकल ब्रिटिश क्लब. त्यांच्या मेलमधल्या (पुणेरी वाटतील अशा) सूचना वाचून त्याची खात्रीच पटली. अमुक वाजता गेटवर या, त्या अमक्या गेटनं न येता ‘ग्रेस गेट’नं (महान इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्यावरून दिलेलं नाव) या, आल्यावर अमुक करा, तमुक करा, अगदी वॉशरूमला कधी जाऊन या, पाण्याची बाटली ठेवा, संग्रहालय कधी पाहा अगदी अशा बारीक-सारीक सूचना वाचून आज लंडनमध्ये पहिल्यांदाच अस्सल इंग्लिश बाण्याचा अनुभव येणार, याची खात्री पटली. 
दहा वाजता पोचायचं म्हणून आम्ही भराभर आवरलं. मात्र, लॉर्ड्सला जाण्यासाठी सोयीची अंडरग्राउंड ट्रेन नाही. बसने बराच वेळ लागेल, असं दाखवत होते. मग अनुजाने आम्हाला टॅक्सी बुक करून दिली. इथं टॅक्सीत अजून बसलो नव्हतो, आता तोही अनुभव घेता आला. ‘उबर’ची टॅक्सी पाच मिनिटांत दारात आली. ड्रायव्हरकाका थोडे वयस्कर, गोरेपान होते. पन्नास ते साठच्या दरम्यान वय असावं. मात्र, ब्रिटिश वाटत नव्हते. मी पुढे त्यांच्याशेजारी बसलो होतो. हे ड्रायव्हरकाका मला इजिप्शियन किंवा तुर्की असावेत, असं वाटलं. त्यांचं नावही त्या मेसेजमध्ये आलं होतं. आता लक्षात नाही. काका चांगली जोरात टॅक्सी हाणत होते. एक-दोनदा त्यांनी जरासं चिडून हॉर्नही वाजवला. एकदा पिवळा दिवा लागल्यावर त्यांनी टॅक्सी जोरात दामटली, तेव्हा तर काका काही काळ भारतात राहून गेले असावेत, अशी शंका यायला लागली. लंडनमध्ये बघितलेला हा एकमेव ‘फॉल्ट’! असो. टॅक्सी केल्याचा एक फायदा असा झाला, की आम्ही फारच लवकर, म्हणजे साडेनऊ वाजताच त्या ‘ग्रेस गेट’वर पोचलो. तिथं अजून कुणी झाडायलाही आलं नव्हतं, असं म्हणायला नको, म्हणून एक कर्मचारी खरोखर ते गेट झाडत होता. आमच्या ड्रायव्हरकाकांचे पैसे अनुजानं आधीच दिले होते. १५ पौंड लागले. चौघांचा हिशेब केला तर ट्रेनएवढेच पैसे लागले. आम्ही भारतातून आलोय हे काकांनी कधीच ओळखलं होतं. त्यामुळं उतरताना आवर्जून ‘नमस्ते’ म्हणाले. (इकडे बऱ्याच लोकांना हिंदी किंवा भारतीय भाषा कळतात, असं मला नंतर कुणी तरी सांगितलं. ते खरंच असावं.) 
त्या ‘ग्रेस गेट’च्या समोरच्या रस्त्यावर ऐसपैस फूटपाथ होता, तिथं एका बाकावर आम्ही बसकण मारली. मला आणि काकांना बसवेना, म्हणून आम्ही जरा त्या रस्त्यानं पुढपर्यंत चालायला गेलो. लॉर्ड्सच्या समोरच कुठे तरी लता मंगेशकरांचा फ्लॅट आहे, हे मला माहिती होतं. समोरच्या बाजूला बऱ्याच रहिवासी इमारती होत्या. आपल्याकडच्या कर्वेनगर, आयडियल कॉलनी किंवा दादर, पार्ल्यात आलोय की काय, असं वाटायला लागलं. एकूण हा सेंट जॉन्स वूड रोडचा सगळा परिसर उच्चभ्रू वाटत होता. आम्ही त्या रस्त्याच्या टोकावर गेलो आणि परत आलो. येताना एका घरावर देवनागरीत ‘श्री गोपालकृष्ण’ की असंच काही तरी लिहिलेलं बघून गंमत वाटली. (फोटो काढला नाही, कारण इथं खासगी घरं, व्यक्ती यांचे फोटो काढायचे आम्ही टाळत होतो. लोकांना ते आपल्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण वाटूच शकतं.) परत ग्रेस गेटवर आलो, तो थोडे फार पर्यटक दारात येऊ लागले होते.
आम्ही बरोबर दहा वाजता आत शिरलो. आमचं तिकीट चेक करून झाल्यावर आत सोडलं. गळ्यात घालायला प्रत्येकाला एक पास दिला. उजव्या बाजूला वॉशरूम होती. बहुतेक लोक आल्यावर विचारत असावेत, म्हणून तिथला कर्मचारी आधीच ‘तिकडं आहे, जाऊन या’ असं सांगत असावा. जणू कार्यक्रमाचा एक भाग असावा, अशा पद्धतीने आम्ही तिकडं जाऊन आलो. मग दहा ते साडेदहा तिथलं म्युझियम बघा, असं सांगण्यात आलं. बरोबर साडेदहा वाजता आमची टूर सुरू होणार होती. आम्ही चालत त्या छोटेखानी संग्रहालयात गेलो. गेल्या गेल्या डिकी बर्डचा छोटासा अर्धपुतळा बघितला. बहुतेक भारतीय मुलांसारखा मीही लहानपणापासून क्रिकेटवेडा. आम्ही लहानपणी दुसरा कुठलाही खेळ खेळला नाही. आम्ही अहोरात्र आमच्या वाड्यात, शाळेच्या मैदानावर फक्त क्रिकेट खेळलो. नंतर प्रत्यक्ष खेळणं कमी झालं तरी खेळाविषयी बाकी माहिती भरपूर! अनेक सामने टीव्हीवर पाहिलेले बारीकसारीक तपशिलांसह लक्षात आहेत. गावातल्या ग्रंथालयात जाऊन षटकार, चौकार, क्रीडांगण, स्पोर्ट्सस्टार आवर्जून वाचायचो. दिलीप प्रभावळकर, शिरीष कणेकर यांचं लिखाण विशेष आवडायचं. वर्तमानपत्रांत अर्थात बाळ ज. पंडित आणि वि. वि. करमरकर हे आमचे आवडते लेखक, पत्रकार होते. रेडिओवरही त्यांचं मराठीतील ‘धावतं समालोचन’ लहानपणी अनेकदा ऐकलं होतं. त्यामुळं माझी अवस्था लॉर्ड्सवर पंढरपुरात पहिल्यांदा पाय ठेवलेल्या त्या भाबड्या भाविकासारखी झाली होती. जो दिसेल त्या कळसाला गहिवरून नमस्कार आणि जी दिसेल त्या व्यक्तीला ‘माऊली’ म्हणून हात जोडणं अशीच माझी स्थिती झाली होती. लॉर्ड्सवरच्या त्या भिंतींनी, त्या मैदानाने, तिथल्या गवताच्या पात्यांनी काय काय बघितलं असेल, या विचाराने मन भारावलं होतं. ते छोटेखानी संग्रहालय छानच होतं. तिथंच आपल्या कपिलनं जिंकलेल्या प्रुडेन्शिअल करंडकाची प्रतिकृती होती. कपिलची माहिती होती. गांगुलीनं २००२ मध्ये अंगातला जो शर्ट काढून गरागरा फिरवला होता, तो शर्टही होता. ॲशेसची प्रतिकृती होती. अनेक खेळाडूंच्या वस्तू - पॅड्स, ग्लोव्हज, शूज, स्टंप, बॉल आणि अर्थात बॅट तिथं ठेवल्या होत्या. मला सगळेच खेळाडू माहिती होते. एकेक वस्तू आणि तिथली माहिती वाचताना माझं मन भूतकाळात जात होतं. थोड्याच वेळात तो अर्धा तास संपला आणि आम्हाला बाहेर बोलावण्यात आलं. सर्व पर्यटकांचे दोन गट करण्यात आले आणि दोन गाइडनी त्या गटांना आपल्या ताब्यात घेतलं. आमचा गाइड माइक नावाचा एक दाढीवाला गृहस्थ होता. हाही बऱ्यापैकी वयस्कर असावा. पन्नाशीपारचा तर नक्कीच. हा टिपिकल इंग्रज होता. त्याच्या बोलण्यात तो सुप्रसिद्ध ‘ब्रिटिश ह्यूमर’ आला, तशी मला खात्री पटली, की पुढची १०० मिनिटं मस्त जाणार. आम्ही भारतातून आलो होतो, तसा एक जण मेलबर्नवरून आला होता. मग त्यानं त्या माणसाला आणि आम्हाला पुढच्या टूरमध्ये विशेष टोमणे मारले आणि चेष्टाही केली. अर्थात भारतीय क्रिकेट व क्रिकेटपटूंविषयी त्याला चांगलीच माहिती होती, यात शंका नाही. मीही त्याला तोडीस तोड उत्तरं देत होतो. नंतर मी त्याच्याबरोबर स्वतंत्रपणे गप्पाही मारल्या. 

लॉर्ड्सची ती प्रसिद्ध लाँगरूम, तिथं लावलेली आपल्या कपिल व वेंगसरकरची तैलचित्रं, जिन्यात लावलेली नामवंत खेळाडूंची पोर्ट्रेट्स, पाहुण्या संघाची ड्रेसिंग रूम, इंग्लिश टीमची ड्रेसिंग रूम हे सगळं बघून मी भारावून गेलो, यात वाद नाही. पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये, लॉर्ड्सवर शतकं केलेल्यांची आणि एका डावात पाचहून अधिक बळी घेतलेल्यांची नावे फलकावर लावली आहेत. आपल्या कर्नल वेंगसरकरनं लॉर्ड्सवर तीन शतकं ठोकली आहेत. गावसकरला भारताकडून खेळताना इथं शतक नाही काढता आलं, पण १९८७ मध्ये एमसीसीच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित एमसीसी विरुद्ध शेष विश्व या कसोटी सामन्यात गावसकरनं १८८ धावा चोपून ती कसर भरून काढली होती. विशेष म्हणजे या सामन्यात त्याला बाद केलं होतं ते शेष विश्व संघाकडून खेळणाऱ्या रवी शास्त्रीनं. ‘भारतीय लोकांनी गांगुली गॅलरी आवर्जून जाऊन पाहा,’ असं माइकनं सांगितलं, तेव्हा आम्ही ती गॅलरी जाऊन बघितली. कपिलला वर्ल्ड कप दिला ती मिडल गॅलरी. ती बरीच मोठी आहे. मात्र, ती आत्ता बंद होती व आम्हाला तिथं जाता आलं नाही. अर्थात ‘गांगुली गॅलरी’च्या ती अगदी शेजारीच आहे. मी माइकला आवर्जून सांगितलं, की गांगुलीची ती कृती म्हणजे फ्लिंटॉफनं मुंबईत केलेल्या तशाच कृतीचं प्रत्युत्तर होतं. त्यावर तो म्हणाला, ‘मी हे एरवी सांगतो लोकांना... आजच बोलायचं विसरलो. बाकी मला व्यक्तिश: फ्लिंटॉफ अजिबात आवडत नाही.’ आता तो मला हे तोंडदेखलं म्हणाला, की खरंच विसरला, हे ‘लॉर्ड’च जाणे! लॉर्ड्सचं मैदान त्या लाँगरूममधून अतिशय सुरेख दिसत होतं. आज सामना नव्हता, त्यामुळं मैदानात कुणीच नव्हतं. खरं तर इथं एखादा स्थानिक का होईना, सामना सुरू असताना यायला हवं होतं असं मला वाटून गेलं.
दोन्ही गटांना आलटून पालटून या ड्रेसिंग रूम व लाँग रूम दाखविण्यात येत असल्यानं आम्ही थोड्या वेळानं पुन्हा संग्रहालयात गेलो. तिथून मग समोरच्या बाजूला असलेल्या मीडिया सेंटरमध्ये आम्हाला (मैदानाच्या बाहेरून वळसा घालून) नेण्यात आलं. तिथं खरं तर लिफ्ट होती. पण आम्ही पायऱ्या चढून गेलो. बऱ्याच पायऱ्या होत्या. त्यामुळं त्या मीडिया सेंटरमध्ये पोचेपर्यंत बरीच दमछाक झाली. तिथल्या खुर्च्यांवर जाऊन टेकलो. अनेकदा थेट प्रक्षेपणात पाहिलेल्या या मीडिया सेंटरमध्ये आज प्रत्यक्ष हजेरी लावण्याचा, तिथं बसण्याचा योग आला होता. हे काचेचं, आडवं, लांबड्या कॅप्सूलसारखं मीडिया सेंटर इथं आधी नव्हतं. १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप भरला होता, त्यानिमित्ताने ते बांधण्यात आलं. मला हे बातम्यांत वाचल्याचं व्यवस्थित आठवत होतं. या मीडिया सेंटरच्या डिझाइनसाठी स्पर्धाही झाली होती. एका चेक आर्किटेक्ट दाम्पत्याने ती जिंकली, असं माइकने सांगितलं. लॉर्ड्सच्या मैदानाला उतार आहे. तो इथून नीट दिसत होता. मैदानाची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा तब्बल आठ फुटांनी उंच आहे. सचिन तेंडुलकरला या मैदानावर फारसं यश मिळालं नाही. त्याच्या इथल्या सर्वोच्च धावा आहेत ३७. या उतारामुळं त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळता यायचं नाही, असं तो बोलून दाखवायचा, असं माइकने सांगितलं. नशीब कसं असतं बघा. जे सचिनला जमलं नाही, ते आगरकरला जमलं. आगरकरचं लॉर्ड्सवर शतक आहे चक्क! त्यापूर्वी तो सात वेळा शून्यावर बाद झाला होता. माइकनं ड्रेसिंग रूममध्ये आम्हाला ही माहिती दिली, तेव्हा मी आता आगरकर भारताच्या निवड समितीचा अध्यक्ष झाल्याचं सांगितलं. माइकसाठी ही माहिती नवी होती. पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या शतकांची यादी आहे, तर यजमान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये इंग्लिश खेळाडूंची यादी आहे. या दोन्ही यादीत कॉमन नाव कुणाचं आहे, असं माइकनं विचारलं. मी दुलीपसिंहजींचं नाव घेतलं. कारण ते तिथं दिसतच होतं. मात्र, या प्रश्नाचं उत्तर होतं गॉर्डन ग्रिनीज. त्यानं वेस्ट इंडिजकडूनही शतक केलं होतं आणि १९८७ च्या त्या सामन्यात एमसीसीकडूनही शतक केलं होतं. त्यामुळं त्याचं नाव दोन्हीकडच्या यादीत शतकवीर म्हणून होतं. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे शतकवीर व पाच बळी या दोन्ही यादींत समाविष्ट असलेले एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे विनू मांकड. माइकनं त्यांचंही नाव घेतलं आणि ‘मांकडिंग’साठीच त्यांचं नाव घेतलं जातं, हे दुर्दैवी आहे, असंही तो म्हणाला. माइक हा पक्का क्रिकेटवेडा होता. त्यामुळं आमच्या अवांतर गप्पाही खूप झाल्या. मी पुण्याहून आलोय म्हटल्यावर ‘पुणे इज ए नाइस प्लेस’ म्हणाला. आता तो इंग्लंडच्या टीमबरोबर भारतात येणार आहे. त्यातही हैदराबाद आणि धरमशालाला तो जाणार होता. ‘पुणे वर्ल्ड कपच्या पाच मॅचेस होस्ट करतंय’ असं मी सांगितल्यावर ‘मग तर पुण्याला यायलाच पाहिजे,’ असं म्हणाला. संग्रहालयात भारताने जिंकलेल्या कपचा विषय निघाला. तेव्हा माइकनं लॉर्ड्सची प्रेक्षकक्षमता किती आहे, असा प्रश्न विचारला. मी ‘२७ हजार’ असे सांगितल्यावर त्यानं ‘३१ हजार’ असं सांगितलं. वर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता एक लाख ३२ हजार आहे, असं सांगून, एवढ्या प्रेक्षकांसमोर इंग्लंडचा संघ ट्रॉफी उंचावणार, ही अभिमानाची गोष्ट असेल ना, असा खास, ब्रिटिश खवचट विनोदही त्यानं केला. मी जोरात ओरडून, ‘नाही, नाही... भारतच वर्ल्ड कप उचलणार तिथं, पण तुम्ही बघायला नक्की या,’ असं सांगितल्यावर सगळे हसले. ऑस्ट्रेलियातून आलेल्या माणसालाही तो असंच चिडवत होता. मात्र, त्या माणसाला माझ्याइतकी क्रिकेटमध्ये गती नव्हती. त्यामुळं तो सामना फारसा रंगत नव्हता. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ‘ॲशेस’ असं नाव का पडलं, हेही तिथं लिहिलं आहे. १८८२ मध्ये ओव्हलवर झालेली कसोटी इंग्लंड हरलं. तेव्हा एका समीक्षकानं ‘आज इंग्लंड क्रिकेट ओव्हल येथे मरण पावलं. दहनविधी इंग्लंडमध्ये होणार असून, ॲशेस ऑस्ट्रेलियात नेल्या जातील,’ असं संतापून लिहिलं होतं. ते कात्रण तिथं काचेत ठेवलंय. त्यावरून नंतर या दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेला ॲशेस म्हणण्यात येऊ लागलं. ॲशेसची एक अगदी छोटी प्रतिकृती तिथं होती. (ओरिजनल ऑस्ट्रेलियाकडं आहे; आमच्याकडं कधी येणार, काय माहिती? असंही माइक विनोदानं म्हणाला.) नीलनं त्या ट्रॉफीसोबत फोटो काढून घेतला. एकूण इथं आम्ही क्रिकेटमय होऊन गेलो होतो.

एमसीसी पूर्वी जरा कर्मठ, रुढीवादी अशी संस्था होती. आता ती हळूहळू बदलत आहे. स्त्रियांना पूर्वी मेंबरशिप नसायची. नंतर ती मिळू लागली. एवढंच नव्हे, तर इंग्लंडच्या महिला टीमची कर्णधार एमसीसीची अध्यक्षही झाली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा हाही आत्ता या एमसीसीचा अध्यक्ष होता. त्यानं इथं बऱ्याच सुधारणा केल्या, असं माइक सांगत होता. या मीडिया सेंटरच्या वर कॉमेंटरी बॉक्स होता. तिथंच आपले गावसकर, हर्षा भोगले, रवी शास्त्री आदी मंडळी बसून कॉमेंटरी करतात. अर्थात, तिथं बरीच इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळं आम्हाला त्या मजल्यावर जायला परवानगी नव्हती. मला गावसकरचा एमसीसीचा किस्सा आठवला. एमसीसीनं गावसकरला मानद सदस्यत्व देऊ केलं होतं. मात्र, त्यांच्या ज्या काही रुढीवादी अटी-शर्ती होत्या (कोट-टाय घालून यायचं वगैरे) त्या गावसरकरला काही आवडल्या नाहीत आणि त्यानं हे सदस्यत्व चक्क नाकारलं. सचिन मात्र मानद सदस्य आहे आणि तो नेहमी इथं येतो. इथं त्याला आवडतं, असं माइक सांगत होता.
नंतर आम्ही खाली उतरून अगदी मैदानावर गेलो. मैदानाच्या अगदी लगत असलेल्या खालच्या खुर्च्यांवर बसता आलं. तिथं फोटोसेशन करणं प्राप्तच होतं. मैदानावरची ती हिरवळ मनाला मोहवत होती. एकदा तरी या मैदानावर खेळता यायला पाहिजे होतं, असं वाटलं. (मन कसं असतं पाहा. आधी हे लॉर्ड्स बघितलं नव्हतं, तेव्हा आयुष्यात निदान एकदा तरी तिथं जावं, एवढंच वाटत होतं. आता आलोय तर हिरवळीवर कधी खेळू असं वाटू लागलं. खेळायलाही मिळालं असतं तर नक्कीच शतक तरी व्हावं, असंच वाटलं असतं.) या मैदानात पूर्वी एक झाड होतं. आणि इंग्लंडमध्ये पर्यावरणाला अतोनात महत्त्व असल्यानं ते झाड तसंच ठेवण्यात आलं होतं. सीमारेषा त्या झाडाला ॲडजस्ट करून आखण्यात आली होती, असा किस्सा मी पूर्वी वाचला होता. आता मात्र ते झाडही मला तिथं दिसलं नाही आणि तिथल्या एका अधिकारी माणसाला (तो भारतीयच वाटत होता...) त्याबद्दल विचारलं, तर त्यालाही काही माहिती नव्हतं. त्यामुळं ती उत्सुकता तशीच राहिली. लॉर्ड्सवर प्रत्येक कसोटी सामना सुरू होताना बेल वाजविली जाते. ही बेल वाजवण्याचा मान मिळणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. ती घंटा आम्हाला दूरवरूनच दाखविण्यात आली. 
आता आम्ही बाहेर आलो. टूर इथंच संपली होती. बाहेर क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे झेंडे फडकत होते. आपला तिरंगाही तिथं होता. मग त्यासोबत फोटो काढले. माइक आम्हाला इथंच बाय करून निघून गेला. आम्ही दुसऱ्या बाजूच्या गेटनं बाहेर पडलो.

इथं जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, असं कळलं होतं. मग ‘सिटी मॅपर’वर बघून बसनं तिकडं गेलो. तीन स्टॉप गेल्यावर ‘लंडन झू’पाशी उतरलो. वास्तविक हे झू आम्हाला अचानकच लागलं होतं. ते बघायला जावं अशी अतोनात इच्छा झाली. पुलंनी ‘अपूर्वाई’त वर्णन केलेला ‘आपल्याकडं बघूनही न बघितल्यासारखं करणारा हिंदी कावळा’ बघायची फार इच्छा होती. मात्र, आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मग चालत तिकडं गेलो. प्राइमरोज हिल भागात किंग हेन्रीज रोड इथं हे स्मारक आहे. ही दुमजली वास्तू महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये विकत घेतली. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन तेव्हा झालं होतं. डॉ. बाबासाहेब इथं १९२० ते २१ असं एक वर्ष राहिले होते. इथं आत गेल्यावर आमच्यासारखीच आणखी एक मराठी फॅमिली संग्रहालय बघायला आलेली दिसली. (हिंदी कावळ्यासारखंच त्यांनीही आमच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं, तो भाग वेगळा!) तिथल्या रजिस्टरमध्ये आमची नावं नोंदविली. त्या फॅमिलीचं नाव आमच्या वरतीच होतं. ते लंडन परिसरातच राहत असावेत, असं कळलं. असो. हे स्मारक नीटनेटकं आहे. दोन मजले फिरून आम्ही सर्व पाहिलं. आंबेडकरांच्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू, त्यांचं बेड, त्यांचा टी-सेट असं सगळं तिथं व्यवस्थित जतन करून ठेवलं होतं. अर्थात त्यांची विपुल ग्रंथसंपदा आणि आपली राज्यघटना होतीच. या इमारतीला खाली उतरणारा टिपिकल ब्रिटिश घरांत दिसणारा गोल जिना होता. इथं येऊन हे स्मारक बघितलं, याचं बरं वाटलं. असंच इथलं सावरकरांचं घरही बघायचं होतं. मात्र, काकांनी ते पूर्वी पाहिलं होतं. तिथं अन्य कुणी तरी लोक राहतात आणि त्या वास्तूवर केवळ नीलफलक लावला आहे, असं काकांचं म्हणणं होतं. त्यामुळं तिथं जायचं राहिलं. महाराष्ट्र सरकारने तीही वास्तू विकत घेऊन सावरकरांचं असंच सुंदर स्मारक तिथं करायला काय हरकत आहे? असो. 

आम्ही इथून बाहेर पडलो. तिथल्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रेस्टॉरंट होती आणि रस्त्यावर टेबल-खुर्च्या टाकून लोक जेवत होते. आम्हालाही भूक लागली होती. मात्र, हवी तशी डिश कुठे मिळेना. शेवटी एका फळाच्या दुकानांत जाऊन भरपूर द्राक्षे घेतली आणि तीच खाल्ली. सोबत आमचं पार्सल होतंच. आता आम्हाला घरी जायचे वेध लागले होते. इथलं जवळचं स्टेशन होतं चॉक फार्म. मग तिथपर्यंत पायी निघालो. वाटेत आणखी एक सुपर मार्केट लागलं. तिथं काही खायला (तयार) मिळतंय का, हे पाहायला हे तिघे आत शिरले. तिथला विक्रेता एक गुजराती मुलगा होता. त्याला आम्हाला ‘व्हेज’ पाहिजे म्हणजे काय, हे नीट समजलं. तोही व्हेजिटेरियनच होता. त्यानं आम्हाला हवे ते सँडविच काढून दिले. तिथं समोसाही होता. मात्र, तो एकच होता व अति तेलकट होता. मग आम्ही सँडविच घेतली आणि बाहेर पडलो. चॉक फार्म स्टेशन हे नॉर्दर्न लाइनवर आहे. इथून आम्ही घरची वाट पकडली. 
आम्हाला आता संध्याकाळचे वेध लागले होते. आज ‘माउसट्रॅप’चा प्रयोग बघायला जायचं होतं. मला लंडनमध्ये नाटक बघायला मिळेल, असं मुळीच वाटलं नव्हतं. आमच्या मूळ प्लॅनमध्येही ते नव्हतं. मात्र, शनिवारी की रविवारी घरी सहज बोलताना हा विषय निघाला. हर्ष आणि अनुजानंही हे नाटक बघितलं नव्हतं. मी फार पूर्वी एकदा सहज चाळा म्हणून इंटरनेटवर या नाटकाची तिकिटं बुक करता येतात का, हे बघितलं होतं. तेव्हाही तीन-तीन, चार-चार महिने आधी या नाटकाची तिकिटं काढावी लागतात, असं वाचलं होतं. त्यामुळं इथं ऐन वेळी ते बघायला मिळेल, अशी आशाच नव्हती. मात्र, हर्ष व अनुजाने सहज चेक केलं, तर मंगळवारची तिकिटं उपलब्ध होती, तीही केवळ २५ पौंडात. ही थोडी बाजूची तिकिटं होती आणि त्यांना ‘रिस्ट्रिक्टेड व्ह्यू’ होता, म्हणून तिकीट कमी होतं. आम्हाला तरी चालणार होतं. मग लगेच दोघांनीही आमची सातही जणांची तिकिटं बुक केली. आम्ही पिकॅडिली लाइन पकडून कोव्हेंट गार्डन इथं उतरलो. हे कोव्हेंट गार्डन म्हणजे इथला पूर्वीचा फुलबाजार. जॉर्ज बर्नार्ड शॉला ‘पिग्मॅलियन’मधली त्याची ‘फुलराणी’ इथंच भेटली होती म्हणे. (नंतर पुलंनी याच नाटकावरून ‘ती फुलराणी’ हे  अजरामर रूपांतर केलं.) कोव्हेंट गार्डनमध्ये आता फुलबाजार भरत नाही. मात्र, त्या इमारतीवर सगळीकडं सुंदर फुलं-वेली होत्या, आत विविध दुकानं, रेस्टॉरंट होती. आपल्या मंडईसारखाच हा परिसर होता. मध्ये एका मोकळ्या जागी एक कलाकार ‘चार्ली चॅप्लिन’ सादर करत होता. तिथं भरपूर गर्दी होती. तो कलाकार सगळ्यांना हसवत होता. लंडन नावाच्या आनंदजत्रेचं हे आणखी एक हसरं, देखणं रूप आम्ही बघत होतो. आम्हाला अर्थात नाटकाला जायचं होतं. त्यामुळं तो खेळ थोडासा पाहून पुढं निघालो. आम्हाला सेंट मार्टिन थिएटर गाठायचं होतं. 

‘माउसट्रॅप’ हे अगाथा ख्रिस्तीचं अतिशय गाजलेलं नाटक. ‘हूडनइट’ म्हणजे खून कोणी केला, असं रहस्य असलेलं! एका आडबाजूच्या रिसॉर्टमध्ये एका हिमवादळी रात्री पाच पाहुणे येतात. यजमान मालक-मालकीण आणि हे पाच जण आणि नंतर येणारा सार्जंट अशा आठ लोकांत हे नाटक घडतं. नाटकाच्या शेवटी खून कोणी केला, या रहस्याची उकल होते. या नाटकाचा प्रयोग १९५२ साली पहिल्यांदा झाला. त्यानंतर हे नाटक इथं अखंड, रोज सुरू आहे. केवळ करोनाकाळात काही महिने ब्रेक झाला तेवढाच. इथं नाट्यगृहाच्या आत प्रयोग क्रमांक कितवा, याचा एक फलक असतो. तिथं आपण आपला सेल्फी काढायचा. आम्ही बघितला तो प्रयोग क्र. २९ हजार २६१ होता. नाट्यगृहाबाहेर येताच तिथं या नाटकाची महत्ता सांगणारा नीलफलक दिसला. नाटकाला ५० वर्षं झाली तेव्हा राणी एलिझाबेथच्या हस्ते २५ नोव्हेंबर २००२ रोजी हा फलक बसविण्यात आला होता. आम्ही ज्या वेस्टएंड परिसरात आलो होतो, तिथंच हे थिएटर आहे. इथं अशी अनेक थिएटर आहेत आणि रोज नाटकं सुरूच असतात. आम्ही जो प्रयोग पाहणार होतो, त्या प्रयोगातील सर्व कलाकारांची नावं लाकडी फलकावर दर्शनी भागात लावलेली होती. थिएटर अतिशय सुंदर, कलात्मक होते. आम्ही आत शिरलो. आमची तिकिटं ड्रेस सर्कलची होती. त्याही वर आणखी एक बाल्कनी होती. आमची तिकिटं स्कॅन करून आम्ही आत शिरलो. हे थिएटर फार भव्य नव्हतं. मला तर भरत नाट्य मंदिराचीच आठवण झाली. अर्थात या थिएटरची लांबी फार नसली, तरी उंची भरपूर होती. शिवाय ही वास्तू अतिशय आकर्षक होती. आतलं लाकडी फर्निचर, समोरचा लाल मखमली पडदा त्या थिएटरच्या अभिजाततेची साक्ष देत होता. आमची तिकिटं एकदम कोपऱ्यात होती. या खुर्च्या जवळपास रंगमंचाला काटकोनात होत्या. (त्यामुळंच त्यांची तिकिटं कमी होती.) आम्ही गेलो, तर तिथल्या आधी बसलेल्या सर्वांना उठावं लागलं, एवढी लेगस्पेस कमी होती. एकदा बसलं, की बसलं! पुन्हा नाटक संपेपर्यंत उठायची भानगड नाही. हर्ष, अनुजा व काका-काकूंची तिकिटं अगदी आमच्यासमोर होती. आपल्यासारख्याच तीन बेल झाल्या. एक अनाउन्समेंट झाली आणि नाटक सुरू झालं. रंगमंच फार मोठा नव्हता. मात्र, सर्व कलाकार कसलेले होते. यांचं इंग्लिश आपल्याला कळणार का, असं वाटलं होतं. मात्र, तशी फार अडचण आली नाही. काय चाललंय ते नीट कळत होतं. रंगमंचाच्या मधोमध एख खिडकी होती आणि तिच्यामागून बाहेरील हिमवादळाचा आभास निर्माण करण्यात आला होता. बाकी फार चमत्कृती या नाटकात नव्हत्या. सर्व भर संवादांवर आणि कलाकारांच्या मंचीय हालचालींवर होता. यातील एका अभिनेत्यावर विनोदनिर्मितीची जबाबदारी होती. तो तरुण अभिनेता भलताच काटक होता. त्याच्या संवादांना हशाही येत होता. बाकी नाटक गंभीर होतं. इंटरव्हलच्या आधीच्या प्रसंगात रंगमंचावरील दिवे एकदम गेले. दिवे लागले तेव्हा आपल्यासमोर (आणखी एक) खून झालेला दिसला. आम्ही प्रेक्षक एकदम हादरलो आणि टाळ्यांच्या गजरातच पडदा पडला.

नाटक बरोबर दोन तास वीस मिनिटांचं होतं. एक तास पहिला भाग, मग वीस मिनिटांचं मध्यंतर व नंतरचा भागही साधारण एक तास! इथं इंटरव्हलला आइस्क्रीम खायची पद्धत दिसली. आम्हाला हलायला जागाच नसल्यानं आम्ही उठलो नाही. इंटरव्हलनंतर पुन्हा एकदा अनाउन्समेंट झाली आणि नाटक सुरू झालं. पहिल्या भागापेक्षा हा भाग वेगवान होता. इथं सार्जंटकडून सगळ्यांची चौकशी सुरू होते. संशयाची सुई एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे फिरत राहते. शेवटी काहीसा धक्कादायक, पण बराचसा अपेक्षित असा खुलासा होतो. ‘हूडनइट’ ते कळतं आणि पडदा पडतो. नंतर इथं ‘कर्टन कॉल’ घेण्याची पद्धत आहेच. सगळे कलाकार समोर आले आणि बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला. मुख्य कलाकारानं सर्वांचे आभार मानले आणि आता हे रहस्य कुणाला सांगू नका, असं आवाहन करताना डोक्याला कुलूप लावल्याची ॲक्शन केली. त्यावरही टाळ्या पडल्या. आम्ही आनंदानं बाहेर आलो. पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. नाटकाच्या दरम्यान कुणाचाही फोन वाजला नाही की कुणी मधे बोललं नाही, हे महत्त्वाचं. लंडनमध्ये हे नाटक बघायला मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळं नाटक कसं होतं, त्यातलं रहस्य किती प्रभावी होतं, यातलं नाट्यमूल्य किती, धक्कातंत्र किती वगैरे सर्व मूल्यात्मक मुद्दे माझ्यासाठी आता गौण होते. एक जागतिक कीर्तीचं नाटक, त्याच्या जन्मगावी, मूळ थिएटरमध्ये अनुभवण्याचा एक वेगळाच व शब्दांत न सांगता येणारा अनुभव माझ्या खाती जमा झाला होता, हेच महत्त्वाचं होतं. या नाटकातले सगळे कलाकार अतिशय व्यावसायिक व आपली भूमिका चोख करणारे होते. यातल्या सार्जंटची भूमिका पूर्वी सर रिचर्ड ॲटनबरो यांनीही केली आहे, असं समजलं. 
नाटक बघून आम्ही सगळेच खूप खूश झालो होतो. त्या आनंदात जवळपास तरंगतच आम्ही घर गाठलं. आम्ही येताना अंडरग्राउंडनं आलो, की बसनं आलो, हे मला आज खरोखर अजिबात आठवत नाही. ते आठवून लिहिण्याची गरजही वाटत नाही. घरी येऊन झोपलो, तेव्हा लॉर्ड्सच्या हिरवळीपासून ते सेंट मार्टिन्सच्या लाल मखमली पडद्यापर्यंत आयुष्यात कधी घडतील असं वाटत नसलेल्या गोष्टी एकाच दिवशी घडल्या होत्या. त्यात बाबासाहेबांच्या स्मारकभेटीची अकल्पित गोष्टही घडली होती. एखादा दिवस आयुष्यभर काळीजकुपीत जपून ठेवावा, असा उगवतो. माझ्यासाठी असे काही दिवस नक्कीच आहेत. त्यातला आजचा एक, हे नक्की!

(क्रमश:)

-----------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-----------