21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १३

पुस्तकांच्या गावा जावे...
----------------------------

आम्ही स्वतःला एक किंचित लेखकू म्हणवून घेत असल्यानं त्याच्यासंबंधानं आमची अशी काही कर्तव्ये आहेत. साहित्यविषयक कुठेही काही घडत असल्यास तिथं जाऊन हजेरी नोंदवून येणं हेही त्यापैकीच एक कर्तव्य होय. आमच्या या आग्रहामुळं एकदा 'येथे अंत्यविधीचे साहित्य मिळेल' या पाटीतील केवळ 'साहित्य' शब्द पाहून आम्ही आत जाऊन पुस्तकांची चौकशी केली होती आणि तो शेवटला विधी तिथेच आमच्यावर शेकण्याची वेळ आली होती. एकदा स्त्री-साहित्य संमेलनातही केवळ 'साहित्य' शब्दाच्या आधारे घुसण्याचा आमचा प्रयत्न असाच अंगलट आला होता आणि पुढील कित्येक दिवस घरच्या स्त्रीकडून अस्मादिकांची यथेच्छ धुलाई झाली होती. तेव्हा आमचे साहित्यप्रेम हे तसे धोकादायक आहे. अनेकदा ते आमच्या जीवावर बेतते. तरीही साहित्यसेवा करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी आमची नम्र धारणा असल्यानं आम्ही ते प्रसंग कसेबसे निभावून नेतो आणि पुढल्या सेवेला उभे राहतो. तर ते असो. मुद्दा आमच्या अविचल साहित्यनिष्ठेचा आहे आणि यंदाही आम्ही तो निभावून नेला आहे. त्याचे झाले असे...
महाराष्ट्रदेशी सत्तापालट होऊन काहीच्या काही थोर साहित्यिक नेते सत्तेवर आल्याचे चित्र आम्ही गेली दोन-तीन वर्षे पाहत आहोत. यातील मराठी भाषेच्या मंत्र्यांचे नावच 'विनोद' असल्याने आम्ही पहिल्यापासून त्यांच्या एकतर्फी प्रेमातच पडलो आहो. विनोद हा आमचा स्थायीभाव आहे, विनोद हा आमच्या लेखनाचा प्राणवायू आहे, विनोद हाच आमच्या साहित्याचा स्वभाव आहे. तेव्हा मराठी भाषेचे मंत्रिपदच 'विनोदा'कडे गेले, तेव्हा आम्हास अत्यंत हर्ष होऊन गुदगुल्या इ. झाल्या. वास्तविक मराठी साहित्यात मुख्यमंत्रिपदाचा मान विनोदाला मिळायला हवा. मात्र, विनोदाला कोणीही गंभीरपणे घेत नसल्याने त्याचा हा मान हुकला आहे, हे आमचे पहिल्यापासूनचे मत्त आहे. गंभीर, जडबंबाळ कादंबऱ्या किंवा आत्मलेखनाला गृह, महसूल आदी खाती मिळत असताना विनोदाला मात्र शालेय शिक्षण किंवा भाषा आदी दुय्यम खाती दिली जातात, हे चित्र साहित्य मंत्रिमंडळाला अगदीच शोभत नाही. तरीही आम्ही विनोदप्रिय असल्यानं केवळ हसून या गोष्टी दुर्लक्षित केल्या आहेत, हे इतरांनी समजून असलेले बरे. तरी मराठी भाषेच्या प्रेमात पडलेल्या आमच्या विनोदनामे मंत्र्यांनी महाराष्ट्रदेशी पुस्तकांचा गाव उभारण्याची घोषणा केली, हे वाचून तर आम्ही आनंदाने वेडेपिसे झालो. त्याच रात्री आम्ही पुस्तकांच्या गावाचे स्वप्न आम्हास पाडून घेतले. कुठल्याही गोष्टीत विलंब आम्हाला खपत नाही. त्याच दिवशी दुपारी आम्ही 'हे ऑन वे' या ब्रिटनमधल्या पुस्तकांच्या गावाविषयी वाचले होते. तिथं प्रत्यक्षात जाण्याएवढे आम्ही 'हे' नसल्यानं स्वप्नातच जाणे इष्ट होते. शिवाय ते 'हे' 'ऑन द वे'च असल्याचेही कळले होते. तेव्हा जाता जाता तिथे जाणे सहजशक्य होते. स्वप्नात ते भारी गाव पाहिल्यानंतर आता महाराष्ट्रातही तसेच गाव उभे राहणार, या कल्पनेनं जीव फारच आनंदित झाला.
अखेर तो दिवस उजाडला. महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन स्वर्गीय ठिकाणांच्या मधोमध असलेल्या भिलार या गावी पुस्तकांचे गाव उभे राहणार असल्याची मंत्रिमहोदयांची घोषणा आम्ही ऐकली आणि आम्हाला आनंदाने गगन ठेंगणे झाले. महाबळेश्वर हा आमचा सुरुवातीपासून वीक पॉइंट. (आम्ही आमच्या एका मित्राला हे सांगितल्यानंतर तो पहिल्यांदा महाबळेश्वरास गेला, तेव्हा हा पॉइंट शोधत फिरला होता म्हणे. नंतर तो शासकीय कोशात गेला, हे सांगणे न लगे!) महाबळेश्वर म्हणजे मध्यमवर्गीय हनीमूनीयांची काशी! खऱ्या काशीच्या मोक्षाला पोचण्यासाठीचे 'काम' या पर्यटनस्थळापासून सुरू होते. महाबळेश्वर रंभा असेल, तर पाचगणी ऊर्वशी आहे; महाबळेश्वर नरेंद्र असेल, तर पाचगणी देवेंद्र आहे. (आणि भिलार अर्थातच विनोद!) महाबळेश्वर स्वित्झर्लंड असेल, तर पाचगणी माँटे कार्लो आहे. महाबळेश्वर 'हे' असेल तर पाचगणी 'ते' आहे. (आणि भिलार हे ते 'हे ऑन (द) वे' आहे!) असो. अत्यंत आनंदित झालेला आणि काही विशिष्ट पेये प्राशून उंचीवर गेलेला माणूस साधारण असेच बाष्कळ बडबडतो. भिलारला पुस्तकांचे गाव होणार, या कल्पनेनंच आम्हाला एवढा आनंद होत असेल, तर प्रत्यक्ष तिथं गेल्यावर काय होईल या विचारानं आम्ही लगेचच त्या गावाला जायचं टाळलं. पण साहित्यविषयक कर्तव्य अपूर्ण राहिल्याची बोच मनाला लागून राहिली होती.
अखेर तो योग आला. भिलारला पुस्तकांचं गाव सुरू झाल्या झाल्या तेथे जाऊ नये, असे आमचे मत होते. त्यामुळं आम्ही काही दिवस कळ सोसली. पण फार दिवस दम धरवेना. अखेर एके दिवशी आम्ही पुस्तकांच्या गावाकडं निघालो. पुस्तकांच्या गावी गेल्यावर होणारा अतीव आनंद आपल्याला सोसवेल का, अशा शंकेनं आम्ही बीपीच्या गोळ्या जवळ ठेवल्या. वाई फाट्याला 'पुस्तकांच्या गावात स्वागत' वगैरे बोर्ड वाचून मन आनंदाच्या अंतराळात तरंगू लागले. मराठी सारस्वताच्या दरबारातील एक फार मोठी उणीव आता दूर झाली आहे, या कल्पनेनं मन वाईच हरखून गेलं. वाईला गणपतीला नमस्कार करून आणि तिथल्या विश्वकोश कार्यालयाला अन् प्राज्ञपाठशाळेला दुरूनच वंदन करून आम्ही पसरणीचा घाट चढायला सुरुवात केली. मराठी साहित्यविश्वात पसरलेल्या अगणित थोर्थोर साहित्यिकांची याद येऊन आमचे मन हळवे झाले. त्यात महाबळेश्वरच्या बिनअध्यक्षांच्या संमेलनाची आठवण येऊन मन घाबरे झाले. गाभाऱ्यात देव नसताना पुजाऱ्यांनी बडवलेल्या घंटा ऐकू आल्या. अत्रे-फडके वादापासूनचे सगळे वाद-प्रतिवाद आठवले. आणीबाणीतली मुस्कटदाबी आणि त्यानंतरचा 'दुर्गावतार' आठवला. उधळलेली संमेलनं, पडद्याआडची कारस्थानं, मंडपातली उणी-दुणी, साहित्यघाटावरची बेशरम धुणी... सगळं सगळं आठवलं. विद्रोहाची वेगळी चूल आठवली, ग्रामीण हुंकाराची भूल आठवली, स्त्री-साहित्याची वेदना आठवली, बालांसाठीची संवेदना आठवली... केशवसुतांची 'तुतारी' आठवली, कोलटकरांची 'भिजकी वही' आठवली... पाडगावकरांची बोलगाणी आठवली... ढसाळांची XX वाणी आठवली... दया पवारांचं बलुतं आठवलं अन् बोकिलांची 'शाळा'ही मनात हुरहुरती घंटा वाजवून गेली.
या सगळ्या साहित्याला आता कायमचं, हक्काचं छप्पर मिळालंय या जाणिवेनं मन भरून आलं. आमची गाडी पाचगणीतली गर्दी सोडून पुढं निघाली. आम्ही आता एका वेगळ्याच उंचीवर पोचल्याची जाणीव भर्रार वाहणारा वारा कानाला करून देत होता. डाव्या बाजूला टेबललँडचं पठार आणि उजव्या बाजूच्या खोल खोल दऱ्या पाहून आम्ही पुन्हा साहित्यस्मरणरंजनात शिरलो. टेबललँडचं पठार म्हणजे लोकप्रिय कथा-कादंबऱ्याच जणू! टेबललँडच्या पठारावर पर्यटकांची गर्दी असते, तशीच या कथा-कादंबऱ्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी सर्वत्र असते. या कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक अर्थातच लोकप्रिय असतात. त्यांचं जवळपास दैवतीकरण झालेलं असतं. त्या टेबललँडच्या पठारावर माणसं फक्त मजा करायला येतात. तिथं असलेल्या मज्जेच्या साधनांचा कुणी भाव करत बसत नाही. 'मूँह माँगी' किंमत मिळते. तसंच या लोकप्रिय कथा-कादंबऱ्यांचं असतं. दुसरीकडं उजव्या बाजूला असलेल्या खोल खोल दऱ्यांसारखं सखोल अर्थ वगैरे सामावणारं, पण गूढगर्भ साहित्य त्या दऱ्यांइतकंच निर्जन राहतं. त्या अवघड वाटेनं खाली उतरायचं धैर्य फारच कमी जणांकडं असतं. पण या दऱ्यांच्या पाठीवरच पठारं वसलेली असतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही.
आम्ही पाचगणीच्या उंचीवर आल्यानं आणि तिथला उंची वारा कानात शिरल्यानं सैराटलो होतो आणि काहीच्या काही विचार मनात येऊ लागले होते, हे एकदम आमच्या लक्षात आलं. आमच्या बौद्धिक वकुबाच्या हिशेबानं हा डोस जास्त झाला होता. अजून तर आख्खं पुस्तकांचं गाव पाहायचं होतं. त्यामुळं आम्ही हे पठारी चिंतन तत्काळ आवरतं घेतलं आणि आजूबाजूच्या मौजेच्या चिजा न्याहाळू लागलो. घटकेत आमची गाडी भिलार फाट्याला आली. डाव्या बाजूला गेलं, की एक-दीड किलोमीटरवर लगेच आमचं पुस्तकांचं गाव येणार होतं. पाचच मिनिटांत आम्ही तिथं पोचलो. वास्तविक इतर चार गावांसारखंच हे गाव दिसत होतं. मग त्याला 'पुस्तकांचं गाव' का म्हणायचं, हा प्रश्न आम्हाला पडला. पण पुढं गेल्यावर लगेच उत्तर मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा 'कथा', 'स्त्री-साहित्य', 'बाल-साहित्य' अशा पाट्या होत्या. इथल्या लोकांच्या घरातच सरकारनं पुस्तकं वाचायची सोय केली होती. बाहेरून त्या खोलीत जाता यावं, अशी रचना केली होती. पुस्तकांच्या नावाखाली कुणीही कुठल्याही घरात शिरू नये, यासाठी सगळीकडं पाट्या लावल्या होत्या, याचा आम्हाला आनंद झाला. शिवाय पुस्तकं तिथं बसूनच वाचायची होती. पुस्तक वाचत वाचत रस्त्यानं फिरायला परवानगी नव्हती. नाही तर स्त्री-साहित्यवाले आणि पुरुष साहित्यवाले कधी बाल-साहित्याच्या घरात घुसले असते, सांगता आलं नसतं. थोडक्यात, सगळीकडं बसून वाचण्याची नीटच व्यवस्था होती. आम्ही स्वतः सरपंच म्याडमच्या घरात बसून एक कथा व्यवस्थित वाचली. (त्यांच्याकडं 'कथा' विभाग होता.) ती कथा वाचल्यावर कुठं आम्हाला 'पुस्तकांच्या गावी' आल्याचा फील आला.
आता आम्हाला गावची सहल करायचा उत्साह आला. शाळेत गेलो. लहान लहान लेकरं गोष्टींची पुस्तकं घेऊन वाचत बसलेली बघून ऊर भरून आला. समोरच सानेगुरुजींचा फोटो दिसला. आता रडूच फुटणार होतं. तेवढ्यात एका सरांनी हाक मारली आणि आम्ही भानावर आलो. मग मुलांसमोर कथाकथनाचा कार्यक्रम करून झाला. आमच्यापेक्षा मुलांनीच छान गोष्टी वाचल्या, हे सांगायला नकोच. मात्र, 'मुलांमध्ये मूल' इ. होता आल्यानं एक बालिश आनंद झाला. फळ्यावर साहित्यिकांची नावं लिहिली होती. त्यात 'पांडुरंग सदाशिव साने'मधला 'सदाशिव' हा शब्द 'सदाशीव' असा लिहिलेला बघून 'शीव शीव' म्हणावंसं वाटलं. 'केशवसुतां'मधला 'सु' दीर्घ लिहिल्यानं मराठीच्या नाकासमोरच सूत धरायची वेळ येते की काय, असं वाटून गेलं. तिथल्या गुर्जींना कानात योग्य तो संदेश दिला आणि निघालो.
तिथून मग साहित्यप्रकारांतली अन्य दालने बघितली. आमच्यासारखेच काही उत्साही पर्यटक इकडं-तिकडं हिंडत होते. सगळे काही मराठी नव्हते. काही परप्रांतीयही होते. त्यांच्या आवडीची पुस्तकं तिथं नव्हती आणि स्ट्रॉबेरीचा सीझनही संपला होता. त्यामुळं त्यांना भिलभिलारल्यासारखं झालं. आम्ही भिलारे गुरुजींची भेट घ्यायला गेलो, पण ते नव्हते. मग इतर काही दालनं बघून आलो. सगळीकडं बसायला उत्तम व्यवस्था, पुस्तकांच्या भरपूर रॅक आणि नवीकोरी पुस्तकं सरकारनं स्वतः विकत घेऊन इथं आणून ठेवलेली दिसली. नंतर प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. तिथल्या मंडळींचा उत्साह पाहून बरं वाटलं.
एकूणच भिलारच्या त्या उंचीवर थंडगार वाऱ्यात प्रसन्न वाटत होतं. आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन, तंगड्या पसरून जगाच्या अंतापर्यंत आपण इथं वाचत बसू शकतो, असं वाटलं. पुस्तकांच्या गावात जाऊन यापेक्षा दुसरं काय वाटायला हवं? ज्यांनी आयुष्यात कधी हाती पुस्तकच धरलं नाही, ते लोक पर्यटक म्हणून आले आणि यानिमित्तानं त्यांना हा गोड छंद जडला, तर त्याहून चांगली गोष्ट काय असेल?
भिलारहून परतताना मन आत्मिक आनंदानं भरून आलं. पुस्तकांच्या गावाचा हा प्रयोग अद्याप बाल्यावस्थेतच असला, तरी त्याला अजून सरकारीपणाची तुसडी किनार नाही, हे बघून बरंच वाटलं. आपल्याकडं कुठल्याही सरकारी प्रयोगाला, यंत्रणेला नावं ठेवायची फॅशन आहे. आम्हाला तरी लगेच तसं काही करावंसं वाटलं नाही. कारण यातून झालं, तर काही तरी चांगलंच होईल; नाही तर सध्या आहे ते आहेच...
घाट उतरताना मन नव्या कोऱ्या पुस्तकांच्या त्या वेडावून टाकणाऱ्या वासात अडकलं होतं... आणि हा खरंच 'विनोद' नव्हता!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जुलै २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग १२

पत्तनीय अन् उत्तरीय...
---------------------------

मे महिन्याच्या ऐन उकाड्यात आम्ही प्रतिभासाधनेचा यत्न करीत आहोत. वास्तविक आमरस-पुरी खाऊन, एसी २० वर ठेवून किंवा पंखा पाचवर ठेवून गारेगार झोपायचे हे दिवस! परंतु आम्ही स्वतःस 'आम' लेखक समजत नसल्यानं आमचं काही तरी वेगळंच सुरू असतं. मागल्या महिन्यात लेख 'बनविण्या'च्या संकटातून आमची सुटका झाली खरी; तोवर हे प्रमाण आणि बोलीचं भांडण समोर येऊन ठाकलं. आमच्यासारख्या लेखकूची जी काही उरलीसुरली प्रतिभा आहे, ती या भांडणात मातीमोल होईल आणि वाचकांना अस्सल मातीतला लेख वाचायला मिळेल, अशा आशेनं आम्ही याही विषयाला हात घातला. 'हात घालीन तिथं माती' हा आमचा लौकिक असल्यानं प्रमाण आणि बोलीच्या भांडणात आपली स्वतःचीच माती होणार, याविषयी आमची पूर्ण खातरी झाली होती. तरी लेखकू म्हणून अंगी आडमाप उत्साह असल्यानं आम्ही या दोन्ही बोल्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
वास्तविक प्रमाण मराठीला 'बोली' म्हणणं हा तिचा अपमान आहे. हे म्हणजे पुण्याला पिंपळवंडी बुद्रुक म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे महावस्त्राला गमछा म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे आमरसाला गुळवणी म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे... (जाऊ द्या. उपम्यातच लेख संपायचा!) तर सांगायचा मुद्दा हा, की प्रमाण मराठी हे एक वेगळेच प्रकर्ण असून, ऋषीच्या कुळाप्रमाणे व नदीच्या मुळाप्रमाणे त्याचे कूळ व मूळ सापडणे कठीण होय. तरीदेखील 'तैत्तरीय उपनिषदा'प्रमाणे एक 'पत्तनीय उपनिषद' मुठेच्या तीरी उत्खननाअंती सापडल्याची चर्चा इतिहास संशोधक मंडळात दुपारच्या चहाच्या वेळी सुरू असल्याचे अस्मादिकांच्या कानी आले आहे. इतिहास संशोधक मंडळात दुपारी चहा मिळतो, या (तुलनेनं दुय्यम अशा) गोष्टीकडंच सर्वांचं लक्ष गेल्यानं ही अफवा असावी, अशी खातरी वाटून मंडळींनी संबंधित संशोधनाकडं दुर्लक्ष केलं. वास्तविक 'पत्तनीय' या नावातच हे उपनिषद पुण्यपत्तनाचे असावे, हे स्पष्ट होते. त्यातील 'पत्तनीय' या शब्दाविषयी इतिहास संशोधक मंडळातल्या विवाहित आणि अविवाहित मेंबरांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाल्याचे कळले. 'पत्तनीय' हा शब्द 'पत्नीय' या शब्दाचा अपभ्रंश असावा, यावर विवाहित मंडळी ठाम होती; तर विवाह झाल्यानंतर विवाहित मंडळी स्वतःच 'पत्तनीय' होत असल्यानं ती उपनिषदच काय, पण चार ओळींचा श्लोकदेखील लिहिण्याच्या योग्यतेची उरत नाहीत, असा अविवाहित मंडळींचा दावा होता, म्हणे. या दाव्या-प्रतिदाव्यांमध्ये दुपारच्या चहापासून ते संध्याकाळच्या वड्यापर्यंत वेळ गेला. अखेर या विषयाचा निर्णय घेण्यासाठी एक द्विसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला आणि मंडळाची सभा संपली, असे समजले. पूर्वी वाचनालयात चोरून प्रौढांची मासिके वाचण्याचा छंद आम्ही जोपासला असल्यानं मंडळात सायंसमयी गुपचूप प्रवेश करणे आम्हास कठीण गेले नाही. आम्ही 'पत्तनीय उपनिषद' अलगद उलगडून चाळण्यास सुरुवात केली. चारशे भूर्जपत्राच्या त्या ग्रंथावर सुरुवातीलाच एवढ्या सूचना आणि उपसूचना होत्या, की हा ग्रंथ पुण्यनगरीतील प्रमाण मराठीतला आद्य ग्रंथ असावा, याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. 'आपण ज्या पानांवर हा ग्रंथ वाचता आहात, ते भूर्जपत्र आहे, केळीचे पान नव्हे; सबब अन्नग्रहण करताना ग्रंथ पाहून त्याची वाट लावू नये,' ही पहिलीच सूचना वाचून तर ग्रंथाची जन्मदात्री पेठ कोणती असावी, हेही आम्हास कळून चुकले. मंडळाच्या परिसरातच या प्रमाणग्रंथाचा जन्म झाला असावा, हे ताडून आम्ही तातडीनं एक नीलफलक बनवायची ऑर्डर देऊन टाकण्याचा निर्धार मनातल्या मनात करून टाकला. अर्थात एवढ्या सूचना ज्या अर्थी आहेत, त्या अर्थी हे 'पत्नीय उपनिषद'ही असूच शकते, या विचारानं पुन्हा मनात शंकासुराने थैमान घातले. जसजसा ग्रंथ वाचीत गेलो, तसतसे हे 'पत्नीय' आणि 'पत्तनीय' असे दोन्ही उपनिषदांचे प्याकेज असल्याचे आमच्या ध्यानात आले. हे एवढे जीवघेणे मिश्रण सहन न झाल्यानेच तत्कालीन वाचकांनी हा ग्रंथराज प्रकाशित होण्यापूर्वीच मुठेच्या तीरी पुरला असावा, यात आता कोणतीही शंका राहिली नाही. घरोघरी (आपापल्या) धर्मपत्नींच्या मुखात असते, तीच 'प्रमाण मराठी' असा उलगडा आम्हाला अखेर झाला आणि ब्रह्मज्ञान झाल्याप्रमाणे आमच्यामागे झगमगीत वर्तुळ चमकू लागले. जिचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अन् प्रत्येक अक्षर आपल्याला प्रमाण मानावंच लागतं, तिची भाषा ती प्रमाण भाषा! एवढी साधी-सोपी व्याख्या आमच्या जाणत्या पूर्वजांनी कित्येकशे वर्षांपूर्वी करून ठेवली होती, अं? आम्ही आदरानं हातच जोडले. तत्कालीन पुणेरी मराठीत तत्कालीन पत्नी आंब्याचा टोप आदळत आपल्या पत्तनीय पतीस म्हणाली असेल, 'ग्रंथ कसले खरडता? आम्रफलाची रसनिष्पत्ती कोण करणार? आमचे श्वशुरश्री? नुसता रस हवा प्राशायला...' त्यानंतर संबंधित पत्तनीय पतिराजांचा साहित्यातलाच नव्हे, तर एकूणच जगण्यातला रस कमी झाला असेल, यात काय नवल! आंब्याच्या दिवसात केळी खायची वेळ यावी, तसे आयुष्य झाले असणार. त्यातूनच या ग्रंथराजाला मुठेकाठी मोक्ष मिळाला असणार... नक्कीच!
पत्तनीय उपनिषदांतील काही कलमे खरोखर भयावह होती. तत्कालीन पत्नीसत्ताक पद्धतीचा प्रत्यय त्यातून येत होता. पतीने स्वयंपाक करावा, भांडी घासावीत, (गृहस्थ)आश्रमाची झाडलोट करावी, केरवारे करावे, एवढेच नव्हे, तर सायंकाळी तिला मोगऱ्याचा गजरा आणून देऊन तिची वेणी घालावी आदी नियम वाचून आम्ही जागीच पत्तनस्थ व्हायची वेळ आली. एका अर्थाने ही केवळ श्रवण करायची भाषा होती. बोलणारी केवळ पुण्यपत्तनस्थ पेठीय पत्नीच होती. मेरा वचन ही है मेरा शासन! बरोब्बर!! या भाषेचे हे उगमस्थान समजल्यानंतर अनेक कोड्यांचा एकदम उलगडा झाला... पत्तनीय उपनिषदाने फार मोठे काम केले होते.
आता मुद्दा बोलीचा होता. बोली भाषा ही मुळात बोलीच असल्यानं त्यात कुणी ग्रंथ लिहिला असण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यातही मरहट्ट देशी बोलींचे अनेक प्रकार. खान्देशी बोली, वऱ्हाडी बोली, दखनी, कोकणी, आगरी, मराठवाडी अशा किती तरी... मग वाटलं, या प्रत्येक बोलीत तेव्हा कसं बोलत असतील? आणि काय आश्चर्य...! 'पत्तनीय उपनिषदा'च्या शेवटच्या पानावर आम्हाला एक खूण सापडली. तोंडावर पट्टी बांधलेला एक स्मायली असतो ना, तशी ती खूण दिसत होती. आम्ही हल्लीच काही रहस्यकथा वाचलेल्या असल्यानं हा 'क्लू' पकडून आम्ही एवढ्या रात्री त्वरेनं मुठेकाठी धाव घेतली. (रहस्यकथा वाचल्यानंतर काही काळ रात्री एकट्यानं गाव बोकाळणं अपरिहार्य असतं...) तिथं गेल्यावर आधी कॉफीपान करणे मस्ट असते. ते केले आणि मग सावकाशीनं 'क्लू'ची जागा शोधू लागलो. फार वेळ लागला नाही. 'पत्तनीय उपनिषद' सापडले होते, त्याच्याशेजारीच आम्हाला हा दुसरा ग्रंथ मिळाला - 'उत्तरीय उपनिषद'! उत्तरीय उपनिषदात तरी बोलीची उत्तरं मिळतील, अशी आशा होती. हा ग्रंथ अगदीच चिमखडा होता. अवघ्या ६०-७० पानांचा... आम्ही तो सहजीच बगलेत मारून मंडळात नेला. तेथील कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात (इतिहास संशोधन हे असेच करावे लागते. त्यामुळं आम्ही तेथील लाइटी घालवून कंदील पेटविला...) आम्ही 'उत्तरीय' तपासणी करू लागलो. इथं सूचना वगैरे काही नव्हत्या. थेट मजकूर होता. लेखकाच्या नावाच्या जागी 'पत्तनीय' एवढेच लिहिले होते. पुढं तत्कालीन च्यायला, मायला आदी शब्दांनी सुरुवात होती. नंतर 'भ'ची बाराखडी सुरू झाली. पुढं पुढं एवंगुणविशिष्ट मातृकुलाचा उद्धार करण्यात आला होता. तत्कालीन मराठी भाषा चांगलीच जोरकस होती, असे आमच्या लक्षात आले. तेव्हाच्या लोकांनी केवळ शिव्या देऊन एखाद्या सैन्याचा पाडाव केला, असे एखाद्या शुभ्रदाढीधारी संशोधकाने आत्ता आम्हाला सांगितले असते, तरी आम्ही त्यावर सहजी विश्वास ठेवला असता.

नंतर नंतर तर त्या ग्रंथात केवळ हो - हो, बरं, ठीक आहे, चालेल, अच्छा... जसं तू म्हणशील तसं, तुझी मर्जी एवढ्याच अर्थाचे तत्कालीन शब्द (ते शब्द इथं लिहिणं कठीण आहे...) दिसू लागले. आम्हाला कळेचना, हे असं का आहे ते? शेजारीच पडलेल्या 'पत्तनीय उपनिषदा'ची भूर्जपत्रं तेवढ्यात फडफडली. त्या आवाजानं दोन कबुतरं उडाली आणि दोन दिशांना पांगली. आम्ही एकदा 'पत्तनीय'कडं, तर एकदा 'उत्तरीय'कडं बघू लागलो. एव्हाना 'उत्तरीय'चं उत्तरीय घसरून आम्हाला आतल्या नग्न सत्याचं दर्शन घडलंच होतं. पण आता 'पत्तनीय'ची पानंही काही सांगू पाहत होती. आम्ही एकदा डावीकडं, तर एकदा उजवीकडं पाहू लागलो. आणि अचानक साक्षात्कार झाला. डोक्यात पूर्णच प्रकाश पडला. कंदिलाची वात मोठी झाली आणि आमचा चेहरा उजळला. 'पत्तनीय'मध्ये लिहिलेल्या आदेशवजा सूचनांचे पालन केल्याची माहिती तेवढी फक्त 'उत्तरीय'मध्ये दिली होती. याचा अर्थ हा ग्रंथ तत्कालीन 'पतीं'नी लिहिला होता... डावीकडे प्रश्न, उजवीकडं उत्तरं... खाली मान घालून दिलेली! सुरुवातीला कोड लँग्वेजमध्ये लिहिलेली अक्षरं म्हणजे शिव्या होत्या. त्या पत्नी विभागाला कळू नयेत, म्हणून खास वेगळ्या भाषेत लिहिल्या होत्या. पत्नीच्या आज्ञेसमोर आपलं काही चालत नसल्याची हताशा त्यातून जाणवत होती. भाषा आणि संताप जोरकस असला, तरी त्यातून करुणेचा एक झरा झुळूझुळू वाहत होता. आम्हाला 'उत्तरीया'ची दया आली. जी बोलू दिली जात नाही ती बोली! अच्छा, अशी भानगड आहे तर! तत्क्षणी तत्कालीन बोलीचा अभ्यास करण्याची आमची इच्छाच मरून गेली.
गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे हे भांडण... फक्त तिचं ऐकायचं... आपण काही बोलायचं नाही. तिनं आदेश द्यायचा आणि आपण ऐकायचं. हेच सुरू आहे! ती आपली पत्नी आहे हे मान्य; पण एवढा धाक असतो का कुठं? पत्तनीय पतीला बोलूच द्यायचं नाही? हा हन्त हन्त... केवढी ही खन्त!
प्रमाण आणि बोलीचं लग्न लावून ज्या सोयऱ्यांनी दोघांच्याही आयुष्याची वाट लावली, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. आधी दोघंही किती सुखात होते. ती तिच्या प्रमाणात, मापात बोलत होती आणि तोही मुक्तछंदात तिच्यावर शब्दफुलं उधळत होता. ती नाजूक, प्रमाणबद्ध होती, तर तो मजबूत अन् रांगडा होता. ती त्याच्यावर अनुरक्त होती, तर तोही तिच्यावर लट्टू होता. ती महालातली राणी होती, तर तो माळरानाचा राजा होता. ती हळवी होती, तो कठोर होता. दोघांचीही जोडी छान होती. एकमेकांना शोभत होते. ते एकमेकांना पूरक आहेत हे ओळखून आमच्या पूर्वसूरींनी त्यांना वेळप्रसंगी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू दिलं; पण लग्न टाळलं. आता मात्र गोंधळ झाला. दोघांचंही लग्न लावण्याचा दुर्बोध हट्ट काही मंडळींनी धरला आणि पाट लावला. पाट लावला अन् तिथंच वाटही लागलीच! फार पूर्वीच्या काळी पुनवडी गावाच्या काठी असंच घडलं होतं आणि त्यातून 'पत्तनीय' आणि 'उत्तरीय'चा जन्म झाला होता.
आताही पुण्यनगरीच्या काठी, फेबु अन् व्हॉट्सअपच्या बांधावर हाच वेडा खेळ पुनश्च काही दुर्बोध मंडळी करीत आहेत, असं समजलं. अरेरे... काय हा वेडेपणा! या राक्षसविवाहातून ना तिला सुख, ना त्याला मज्जा! त्यातून जन्माला येणार फक्त विषम संकर, नकोशी संतती!
'नको, नको... नगं नगं, नकोय हे,  न्हाय पायजेल... सोडा मला... वंगाळ हाय हे...' आम्ही प्रमाण अन् बोलीत मिक्स किंचाळू लागलो. एकदम जाग आली. आम्ही घरातच होतो.
निद्रोपनिषद संपले होते... प्रमाण आयुष्य सुरू जाहले होते... पर ते बी 'बोली'वाणी लई झ्याक व्हतं...!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जून २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

फिरकीचा ठोंब्या - भाग ११

लेख : एक बनविणे
-----------------------

गेल्या महिन्यात बालसाहित्याच्या प्रांतात लुडबूड केल्यानं आम्ही स्वतःस अंमळ निरागस समजू लागलो होतो. नव्हे, आम्ही स्वतःचे मतच तसे बनवून घेतले होते. पण आमच्यातला हा कथित निरागसपणा अवघा महिनाभर टिकला. त्याला कारणही तसंच घडलं. मराठी साहित्यविश्वात काही तरी नव्यानं ‘बनत’ होतं... काही तरी बिघडत होतं... सगळं सविस्तरच सांगायला हवं...
साधारणतः साहित्य संमेलन संपलं, की आमच्या चिमुकल्या मराठी साहित्यविश्वाला गाढ झोप येते. अगदी मे महिन्यातल्या करकरीत दुपारी हापूसचा रस ओरपल्यावर येते तश्शीच! मग आम्ही लेखकमंडळी पुढील संमेलन येईपर्यंत बेडकासारखे शीतनिद्रेत जातो. रसपानानंतर एसी फुल्ल सोडून जी काही निद्रा येते ना, तिची तुलना फक्त एकाच गोष्टीशी करता येईल. ती गोष्ट अथवा क्रिया येथे सांगणे बरे नव्हे. परंतु जाणकार सुज्ञांस त्याचा अवश्य उलगडा होईल. तर मुद्दा साहित्यविश्वाच्या गाढ निद्रेचा होता. दुपारच्या वेळी गाढ झोपल्यानंतर अचानक कोणी येऊन आपल्याला गदागदा हलवू लागले, तर संबंधित व्यक्तीच्या मातृकुलाची आठवण त्वरेने येणे अगदी साहजिकच असते. तशाच पद्धतीनं गेल्या महिन्यात मराठीतल्या एका विदुषीनं आपल्या भाषेविषयीची खंत प्रकट करून गाढ झोपलेल्या साहित्यविश्वाच्या अंगावर शुद्ध भाषेच्या पाण्याचे चार सपकारे मारण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषा नव्यानं 'बनविण्याचा' प्रयत्न सांप्रतकाळी जोमानं सुरू असल्याचं त्यावरून आमच्या ध्यानीमनी आलं. साहित्यविश्व गाढ निद्रेत असताना बाईंनी त्याच्या पार्श्वभागी हे चार रट्टे मारल्यानं त्या आता 'चावू आनंदे' किंवा 'द्यावे फटके' नावाचे नवे पुस्तक लिहिण्याच्या, नव्हे, बनविण्याच्या बेतात असाव्यात अशी दाट शंका आम्हास आली. वास्तविक मराठी साहित्याच्या त्या हेडबाईच असल्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी परमआदर आहे. किंबहुना त्यांनीच आम्हाला नेटके कसे लिहावे आणि आनंदाने कसे वाचावे हे शिकविले. मधल्या काळात आम्ही नसलो, तरी आमची भाषा मात्र नव्याने 'बनत' चालली आहे, याची आम्हाला खबरबात नव्हती. मात्र, बाईंनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले. त्यामुळे चिमुकल्या मराठी साहित्यविश्वात एकच खळबळ 'बनून' राहिली. बनविण्यावरून खूप काही बनले-बिनसले. पत्रकारांनी अग्रलेख लिहिले, फेसबुक्यांनी पोस्टी टाकल्या, भाषाप्रेमींनी संताप व्यक्त केला आणि बाकीच्यांनी नुसतेच सुतकी चेहरे 'बनविले'. आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याने चार लोक करतील तेच करण्यात अर्थ नव्हता. पण आपण होतकरू का होईना लेखकू आहोत, याची विनम्र जाणीव आमच्या मनात ‘बनून’ राहिली होती. तेव्हा 'बनेल'पणा करून काही तरी बनवायला हवे होते; अन्यथा बात 'बनली' नसती! बाकी काही का असेना, बिघडविण्यापेक्षा बनविण्याला महत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर एक लेखच 'बनवून' टाकावा, असे आमच्या मनाने घेतले.
एकदा आम्ही मनावर घेतले, की मग आमचे सगळे छान 'बनून' येते. वास्तविक लेख लिहिणे हे आमच्यासारख्या लेखकूला अगदी सहज जमते. पण लेख लिहिणे वेगळे आणि लेख ‘बनविणे’ वेगळे. हा जरा नवा प्रयोग होता. म्हणून सुरुवातीला कुतूहल म्हणून आम्ही 'बनविणे' या क्रियापदाचाच अभ्यास सुरू केला. 'बन' हे त्याचे मूळ रूप असावे, अशी आम्हास शंका आली. आता हे शेवंतीचे 'बन' आहे की 'बन'मस्क्यातले 'बन', हे काही लक्षात येईना. पण एकाच वेळी हा शब्द मराठी आणि इंग्रजीतले नाम असू शकतो, एवढे उमगले. 'माझ्या मना बन दगड' असं विंदांनी सांगून ठेवल्याचं तेवढ्यात ध्यानीबनी, आपलं, ध्यानीमनी आलं. मग 'बन' हे आज्ञार्थी क्रियापदही होऊ शकते, असा विचार आम्ही मनाच्या बनात ठेवून दिला. काही काळापूर्वी मराठी साहित्यात 'बनी' नावाच्या आगाऊ मुलीने धुमाकूळ घातला होता. या बनीचा या क्रियापदाशी काही संबंध आहे का, हे आम्ही चाचपू लागलो. ही बनी एक नंबरची बावळट मुलगी असावी; कारण प्रत्येक लेखात संबंधित लेखक तिला 'बने, बने, अगं असं काय करतेस? इकडं बघ, तिकडं लक्ष दे, वेडी आहेस का, कसं समजत नाही तुला,' अशाच प्रकारे संबोधताना आम्ही वाचले आहे. तेव्हा काही साहित्यिकांनी या गरीब मुलीला ठरवून 'बनविले' असावे, अशी रास्त शंका आमच्या मनीबनी वस्तीला येऊन राहिली आहे. अर्थात बनीचा बनविण्याशी संबंध असला, तरी त्यात तिलाच 'बनविण्यात' आले असेल, तर सोडून दिले पाहिजे, असे म्हणून आम्ही बनीचा नाद सोडला.
खुद्द 'बनविणे' या क्रियापदाने आम्हाला किती बनविले आहे, याचा हळूहळू अंदाज येऊ लागला. हिंदीत लग्न करण्याला 'शादी बनाना' असे का म्हणतात, हे मराठीत लग्न 'बनविल्यास' तातडीने कळून येते. किंबहुना एकमेकांना 'बनविण्या'चीच ती स्पर्धा असते, असंही म्हणायला हरकत नाही. हिंदीतलं हे 'बनाना' क्रियापद इंग्रजीत एक निसरडं फळ देऊन जातं. त्याचा मराठी अर्थ सांगायलाच हवा का? तेव्हा कुणी आपल्याला बनविले आहे, याचा अर्थच त्याने आपल्याला हे फळ दिले आहे, असे समजून चालायचे. तेव्हा 'बनविणे' या क्रियापदाचा वापर मराठीत नाही नाही त्या ठिकाणी होऊ लागला, याचा अर्थ ही फसवणूकही व्यापक होत चालली आहे, असे समजायचे का? 'मी स्वयंपाक करते,' असे म्हणण्याऐवजी आमचे खटले 'मी स्वयंपाक बनविते' असे म्हणत असेल, तर ते वास्तवाच्या अधिक जवळ जाणारेच ठरत नाही काय! स्वयंपाक या नावाखाली ती त्या सर्व पदार्थांना आणि नंतर आम्हाला 'बनवत'च नसते काय! टीव्हीवर कार्यक्रम 'सादर करतो' याऐवजी 'कार्यक्रम बनवतो' असे कुणी म्हणत असेल, तर तोही अधिक प्रामाणिकच म्हणायला हवा. याचे कारण तो केवळ कार्यक्रमच नव्हे, तर प्रेक्षकांनाही 'बनवत' असतोच की... सिनेमा ‘बनवतो’, म्हणणारा तरी काय वेगळं करतो? तोही 'बनवतो'च...! आणि असे करताना अनावधानाने का होईना, पण प्रामाणिक वाक्यरचना केल्याबद्दल आपण त्यांचे 'धन्यवाद करायला' नकोत का? खरं तर धन्यवादसुद्धा 'बनवायला' काही हरकत नसावी. या कामी कुणी 'आमची' मदत करू शकेल काय? करणार असाल तर नक्की बघा. आम्ही त्यांचेही धन्यवाद 'करू'...
'बनविणे' या एका क्रियापदावर एक छानसा बनेल लेख कम् कथा होऊ शकते, हे एव्हाना आमच्या बनचुक्या मनाने नीटच हेरले होते. या कथेसाठी काय काय मुद्दे बनवता येतील, याचा आम्ही अंदाज घेऊ लागलो. शाब्दिक कोट्या बनविणे हा आमचा हातचा मळ होता. तेव्हा 'बनविणे' या शब्दावर जास्तीत जास्त कोट्या करण्याचे काम निश्चितच 'बनणार' होते. 'बनवारीलाल'पासून ते 'बनहट्टी'पर्यंत आणि 'बन का पंछी'पासून ते 'बनावट'पर्यंत एकही 'बन'शब्द आम्ही सोडला नाही. प्रत्येक वाक्यात आम्ही या 'बन'च्या लाद्या पसरल्या. त्या वाक्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता. पण आम्हाला काहीही करून लेख 'बनवायचा’च असल्यानं आम्ही शब्दांच्या या दाट 'बना'त शिरलो. त्यातून पुढीलप्रमाणे काही वाक्ये तयार झाली : 'बनगरवाडीत राहणाऱ्या बनकरांच्या बनवारीलालने बनसोडेंच्या बनीला काहीही करून आज बनमस्का खाऊ घालण्याची अत्यंत बनचुकी आणि बनावट योजना बनविली होती. त्याच्या कल्पनेप्रमाणे सर्व योजना बनवून झाली. बनशंकरीच्या मंदिरामागच्या बनात भेटून तिला बनमस्का द्यायचा होता. पण बनीच्या बापानं त्या दिवशी तिला कामावर जाऊच दिलं नाही. मग बनवारीनं मोठ्या मिनतवारीनं बनीला काही-बाही सांगून घराबाहेर काढलं. बनशंकरीच्या बनात गेल्यावर बनमस्काच काय, पण साधा पावही न मिळाल्यानं आपण बनवलो गेल्याचं बनीच्या लक्षात आलं...'
पुढं वाचवेना. डोकं अगदी ‘बनबनून’ - आपलं - भणभणून गेलं! हे असे लेख बनविणे म्हणजे बनमस्का खाण्याइतकी सोपी गोष्ट नव्हे, हे आमच्या लक्षात आले. तेव्हा या बनावट लेखाला आम्ही सत्वर काडी लावली. मन मात्र उदासच बनून राह्यलं मग...! शून्यातच गेलो...
...या एका ‘बनविणे’नं आमच्या साहित्यविश्वात केवढी खळबळ उडविली आहे, याची आता कुठं अंधुकशी कल्पना येऊ लागली. मग आम्ही आमच्या आजूबाजूला मराठी बोलणाऱ्या विविध माध्यमांकडं सहज पाहिलं. टीव्हीवरचे कार्यक्रम, वर्तमानपत्रं, मासिकं, नियतकालिकं, फेसबुक, व्हॉट्सअप सगळी-सगळीकडं अशी अनेक ‘बनावटगिरी’ भरून राहिली होती. शब्दांनी ताळतंत्र सोडला होता. महानगरांत सिग्नल बंद पडल्यावर चौकात जशी अवस्था होते, तशी बिचाऱ्या शब्दांची झाली होती. लिहिणाऱ्या किंवा तसा दावा करणाऱ्या बहुतेक सगळ्यांनी नियमांचं बोट सोडलं होतं. त्यामुळं शब्द बिचारे लज्जित होऊन, खालमानेनं रस्त्यावर उभे होते. त्यांना वापरून घेणारे बेदरकारपणे त्यांच्या अंगावरची वसनं फेडत होते. त्यांचे दागिने ओरबाडत होते. उच्चारांचे, लेखनाचे सगळे नियम कोपऱ्यात लोळागोळा होऊन पडले होते... शब्द मार खात होते, धक्के सोसत होते, शब्द बिचारे मुके मुके सगळं सोसत होते... शब्दांच्या अब्रूची किंमत नसणारे त्यांना ‘बनवून’ वापरत होते. अशा वेळी आपण मूकपणानेच शब्दांचे सांत्वन करायचे असते... कारण शब्दांचे सांत्वन करायला अजून कुठलेच शब्द नाहीत... 


मग शब्दांना भरून आले... ते उसासू लागले... मूकपणानेच काही सांगू लागले! त्यांना काय म्हणायचंय ते नीटच ऐकू येऊ लागलं. मग आम्हाला हवेतून अचानक तुकोबांची गाथा ऐकू येऊ लागली... त्या गाथेतले साधे-सोपे शब्द कानी पडताच मन आनंदले. शब्दांनाही आपले सगेसोबती भेटल्याचा आनंद झाला. तिथं मग आमच्या मायबोलीच्या शब्दांचं संमेलनच भरलं. अवघा रंग एक झाला! ज्ञानियांचा राजा आला, नाथांचं भारूड आलं, जनीचे अभंग आले, रामदासांचा दासबोध आला, बहिणाबाईंची कविता आली... अत्र्यांची चौफेर टोलेबाजी आली, शान्ताबाईंचे सालस-सहज शब्द आले, इंदिरा संतांचे शब्द बेळगावचा ‘मृद्-गंध’ घेऊन आले... दि. बा. मोकाशी आणि प्रकाश नारायण संतांचे साधी-सोपे शब्द आले, पुलं नावाचं शब्दांचं गारूड आलं, राम गणेश गडकरी नावाचा लखलखता रत्नहार दिसला, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते चिं. विं. जोशींपर्यंत गडगडाटी हास्य करीत शब्द आले... ढसाळ-दया पवार वेदनेचा शब्द घेऊन आले... किती नावं घ्यावीत... पुढं पुढं तर सगळे शब्द एकमेकांत मिसळून गेले... पंढरपुरात आषाढीच्या यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात अबीर-बुक्का उधळावा तसे सगळे शब्द आमच्या भोवतीच्या आसमंतात उधळले गेले... ‘मराठी मराठी’चा गगनभेदी गजर कानी पडला... आमच्या वऱ्हाडी, माणदेशी, कोकणी, मराठवाडी, खानदेशी, अहिराणी, मावळी, कोल्हापुरी अशा सगळ्या बोली पालखीला आल्या... शब्द तर नाचूननाचून बेभान झाले.... एवढे सुंदर दिसत होते नाचताना... प्रत्येकाचा वेष वेगळा, प्रत्येकाचा तोरा वेगळा, प्रत्येकाचा नाद वेगळा, प्रत्येकाचा साज वेगळा... तरीही सगळे आमच्या ‘माय’च्या मायेच्या बंधनानं बांधलेले... धन्य धन्य झालो... अन् अचानक उद्गार बाहेर पडला - काय सुंदर ‘शोभायात्रा’ ‘बनवलीये’ रे तुम्ही सगळ्यांनी!
...अन् रप्पकन पाठीवर रट्टा बसला. आम्ही खाडकन डोळे उघडले. समोर विदुषी हेडबाई हातात छडी घेऊन उभ्या होत्या... त्यांच्या भेदक नजरेमुळं आमचे सगळे बनचुके शब्द एकदम आटले... लेख ‘बनवायचा’ होता, तो राहूनच गेला!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

29 Aug 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १०

बाळ(साहित्य)लीला...
--------------------------

आम्ही तसे हंगामी स्वरूपाचे गृहस्थ आहो. म्हणजे हिवाळ्यात आम्हाला थंडी वाजते, उन्हाळ्यात आइस्क्रीम खावेसे वाटते अन् पावसाळ्यात सर्दी होते... आपण चारचौघांपेक्षा वेगळे आहोत, असं दाखवून लब्धप्रतिष्ठित होता येतं, पण माणूस म्हणून जगायचं राहून जातं! आम्हाला वाटतं, आधी चारचौघांसारखं तरी जगून बघू; मग आपल्याला काय वेगळं जमतंय का ते बघू. तर ते असो. मुद्दा असा, की आम्ही ऋतुपालटाप्रमाणे बदलत जाणारे एक सामान्य संसारी सूक्ष्म जीव आहोत. त्यातही लेखकू आहोत. त्यामुळं आमच्याप्रमाणेच आमच्या झरणीलाही (हल्ली कळफलकाला) ऋतुपालटाचे वेध लागतात. आता उन्हाळा असल्यामुळं आम्हाला सुट्टीचा आनंद लुटावासा वाटतो. वास्तविक शाळा सुटून कित्येक वर्षं झाली. पण अजूनही शाळांना सुट्ट्या लागल्याच्या बातम्या वाचून पोटात कसल्याशा गुदगुल्या होतात. वाळ्याचे, कैरीचे, 'बरफ का गोला'चे वास येऊ लागतात. मन लहानपणीच्या निरागस आठवणींशी आट्यापाट्या खेळू लागतं...
लहानपणी या सगळ्या आठवणींसोबतच असायचा तो गोष्टींच्या पुस्तकांचा वास. माडीवरच्या खोलीत एका कोपऱ्यात बसून, वाटीत कुठला ना कुठला खाऊ घेऊन खात खात; अधूनमधून सांडगे, पापड, कुरडया इ. उन्हाळी वाळवणं तोंडात टाकत केलेली पुस्तकांची पारायणं आठवतात. या पुस्तकांतून एक वेगळीच प्रतिसृष्टी भेटायला यायची. अगदी लहानपणी परिराज्याची सफर घडली. 'पोपटात जीव असणारा राक्षस' नंतर बऱ्याच वेगवेगळ्या रूपात भेटला. (ते एक असो.) 'सिंड्रेला'पासून ते 'सिंदबाद'पर्यंत सगळ्यांच्या अद्भुत जगात फेरफटका मारता आला. आमच्या लहानपणी टीव्ही होता, पण कार्टूनच्या वाहिन्यांची रेलचेल नव्हती. त्यामुळं 'दूरदर्शन'वर लागणारा मिकी माउस आणि ही-मॅन, स्पायडरमॅन सोडल्यास टीव्हीवरच्या कार्टूनची फार नवलाई नव्हती. त्याउलट पुस्तकांतून भेटणाऱ्या कित्येक अद्भुत व्यक्तिरेखांनी कायमचं मनावर गारूड केलं. मनातल्या पडद्यावर वेगळंच कार्टून नेटवर्क सुरू व्हायचं. मग सुरस अन् चमत्कारिक अरेबियन नाइट्सच्या कथा असोत, किंवा 'चांदोबा'मधले विक्रम-वेताळ असोत... हे सगळे आमच्या चिमुकल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनले होते. नंतर भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' भेटला... त्याच्याशी अगदी 'ट्टॉक' जमून गेलं. सुधाकर प्रभूंचा 'डिटेक्टिव्ह डीटी' आणि त्याची गँग पण फार आवडायची... ना. धों. ताम्हनकरांचा 'गोट्या', सानेगुरुजींची 'श्यामची आई' ही पुस्तकं वाचली नाहीत असा आमच्या पिढीतला एकही विद्यार्थी नसेल... याशिवाय थोरा-मोठ्यांची चरित्रं (विशेषतः राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेली), शान्ताबाई शेळक्यांच्या सुंदर परदेशी अनुवादित कथा, नीलम प्रभूंची (दिल्लीतल्या) 'मांजराची गोष्ट' आणि अशाच किती तरी सुंदर पुस्तकांच्या आठवणी... या सगळ्या पुस्तकांनी आमचं बालपण समृद्ध केलं. ओल्या मडक्याला सुंदर घाट दिला, हे जग फार चांगल्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि त्या सगळ्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे अशी उत्तम जगण्यासाठी आवश्यक असणारी मूलमंत्रासारखी गोष्ट या बालसाहित्यानं दिली...
पण पुढं जरा गडबड झाली... आम्ही मोठे झालो! लहानपणीचा निरागसपणा हरवला अन् हिशेबीपणा, बनचुकेपणा अंगी आला. वयानं वाढल्याची जाणीव ठायी ठायी त्रास देऊ लागली. मग आमच्या आयुष्यातून बालसाहित्य हद्दपार झालं. नीलम प्रभूंकडून विठ्ठल प्रभूंकडं प्रवास सुरू झाला. त्याचा इष्ट तो परिणाम झाला अन् विवाहोत्तर पराक्रमाचं फळ म्हणून आमचे चिरंजीव जन्मास आले. ('करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या वाक्यामागचं इंगित अचानक आम्हाला कळलं!) हा बाळजीव जरासा मोठा होताच बालसाहित्य आमच्या आयुष्यात पुन्हा परतुनी आले. पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आणि तेव्हाचं साहित्य आमच्या डोक्यात अजूनही फिट्ट बसलं होतं. पण आता मुलासाठी म्हणून पुस्तकं घ्यायला गेलो अन् ती नवी-नवेली, रंगबिरंगी पुस्तकांची दुनिया बघून हरखून अन् हरवून जायला झालं. अप्रतिम छपाई, रंगीत-गुळगुळीत कागद आणि त्यावर साकारलेली ती आंग्लभाषी परिकथा पाहून मला पुन्हा बाळपणात शिरलं. पण आता चिरंजीवांचा मान होता. आम्हाला पुन्हा लहान होण्याची परवानगी नव्हती. तरीही त्याच्या जोडीनं जेवढं लहान होता येईल तेवढं होऊन बघितलं. त्याच्या नजरेनं ही सगळी दुनिया पुन्हा अनुभवली. आता कार्टून नेटवर्कचा खजिना होता, जिंगल टून होतं, हॅरी पॉटर होता, वेगवेगळ्या सीडी-डीव्हीडी होत्या, नंतर तर यू-ट्यूब अन् इंटरनेट नावाची 'अलिबाबाची गुहा'च उघडली... हल्ली तर स्मार्टफोनमुळं सगळं काही खरोखर हाताच्या मुठीत आलंय... बालसाहित्य सोडून! त्यामुळं सगळं काही आहे, पण तरीही लहानपणच्या काही गोष्टी आपण मिस करतोय, असं सारखं वाटत होतं...
हल्लीच्या मुलांना पूर्वीसारखं दर्जेदार बालसाहित्य वाचायला मिळत नाही, याची अपार खंत मनात दाटून आली होती. यावर उपाय म्हणून आपणच बालसाहित्य प्रसवायचं, असा निर्णय आम्ही ऐन होळीच्या दिवशी घेऊन टाकला. (पुढं हाताची मूठ अनेकदा तोंडावर पालथी करायचा प्रसंग येणार आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती.) प्रसवणे हा शब्द साहित्यनिर्मितीसाठी का वापरतात, याची कायमची आठवण करून देणाऱ्या वेदना पुढं सोसायच्या होत्या, ते वेगळंच!
आपला पहिला वाचक आपले चिरंजीवच असणार आहेत, हे आम्ही ठरवून टाकलं. त्यानुसार आम्ही सोप्यातली सोपी गोष्ट म्हणून कृष्णजन्माची कथा चिरंजीवांना सांगायला सुरुवात केली. देवकी आणि वसुदेवाचं आठवं अपत्य आपला नाश करणार आहे, वगैरे कथाभाग सांगून झाल्यावर चिरंजीव (वय वर्ष आठ) उद्गारले, 'बाबा, कंस वेडाबिडा होता का रे?' चिरंजीवांना कथेत रुची निर्माण झालीय हे पाहून आम्हाला स्फुरण चढले. 'अरे, वेडा नाही काही... दुष्ट होता अतिशय...' असं सांगून आम्ही कंसाच्या दुष्टपणाची वर्णनं करू लागलो. चिरंजीवांनी खास पुणेरी तुच्छतादर्शक हसू एवढ्या बालवयातही कमावलं होतं. ते चेहऱ्यावर आणून त्यांनी पुन्हा ठाम स्वरात सांगितलं, 'नाही बाबा. कंस वेडाच!' आता मात्र आम्ही खचलो आणि हताश होत म्हटलं, 'अरे बाबा, कसा काय वेडा?' तर चिरंजीव चिरंतन सत्य सांगत असल्याच्या आविर्भावात उद्गारले, 'अरे, देवकी आणि वसुदेवाचा मुलगा आपल्याला मारणार आहे, हे त्याला माहिती होतं, तर त्यानं त्या दोघांना वेगवेगळ्या तुरुंगांत का नाही ठेवलं?'....
आम्ही जागेवरच खल्लास... वारलो... दीर्घ शांतता...
मग बराच काळ आम्ही बालसाहित्याचं नाव काढलंच नाही. बालसाहित्य लिहिण्याचं सोडा, पण वाचण्याचंही आपलं वय अद्याप झालेलं नाही, याची खात्रीच पटली होती. मग आम्ही हळूहळू बालजगतातल्या लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी चिरंजीवांकडं शिकवणीच लावली. बाल आणि प्रौढ या दोन्ही जगांतलं चिरंजीवांचं ज्ञान पाहून दिसामाजी माझी बालबुद्धी प्रगल्भ होत चालली होती. चिरंजीव आता टीनएजमध्ये प्रविष्ट करते झाले होते. त्यामुळं इंटरनेटवरचा त्यांचा व्यासंग अगदी व्यासाच्या नसला, तरी त्रिज्येच्या कक्षेएवढा नक्कीच विस्तारला होता. आम्ही अद्याप परिघावरच होतो आणि ही 'जीव-भौतिक' 'रसायना'ची नवी 'भूमिती' समजावून घेत होतो. ती जाणून घेतल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याएवढे आपण अजून मोठे झालो नसल्याची खात्री पटली. मग आम्ही पुन्हा शिशुगटाकडे आमचा मोर्चा वळवला. तीन-चार वर्षांच्या मुलांसाठी परीची आणि राक्षसाची गोष्ट लिहिणं हा आमच्या डाव्या हातचा मळ होता. झर्रकन एक गोष्ट उतरवून काढली. ती गोष्ट अगदीच 'चिमखडी, ऑच्ची ऑच्ची, काहीच्च्या काहीच्च गोडुली' वगैरे झाली होती, असं आमचं स्वतःचंच मत झालं. याचं कारण आमच्या गोष्टीतला 'लाक्षस'ही 'पली'शी 'बोबले' बोलच बोलत होता. पण ही चिमुकली बालकथुली प्रसिद्ध करण्यापूर्वी कुणाला तरी दाखवावी, म्हणून शेजारच्याच इमारतीत राहणाऱ्या आमच्या कौटुंबिक मैत्रिणीकडं गेलो. तिची कन्युकली तीन ते चार वर्षांचीच आहे. तर गेल्या गेल्या तिनं आपल्या लेकुकलीचं आजचं महत्त्वाचं वक्तव्य ऐकवलं... टीव्हीवरील एक थोर मराठी मालिका बघून लेकीनं तातडीनं तिच्या आईकडं काळजीनं चौकशी केली होती - 'आई, तू अन् बाबा एकमेकांवर नीट प्रेम करता ना?'
हे ऐकून मी बसल्या जागी कोलमडलो. मैत्रिणीनं दिलेली कॉफी अंगावर सांडली. तिची ती थोर विदुषी लेकुकली शेजारी उभी राहून आपल्या वेड्या काकाला खो खो हसत होती. आता काही वेळानं माझी ही अवस्था पाहून ती कन्या काही तरी मानसशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी एखादी प्रश्नावली सादर करील, या भीतीनं मी तिथून पळ काढला.
एवढं झालं, तरी बालसाहित्य प्रसवण्याची आणि त्यानिमित्तानं 'बालसाहित्यिक' होण्याची आमची हौस काही कमी होत नव्हती. कुठला वयोगट धरावा, हे काही निश्चित होत नव्हतं. अखेर काही तरी सर्व्हे करावा म्हणून एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. तिथं एक काकूसदृश महिला बालसाहित्याच्या विभागात बरीच खरेदी करीत होत्या. आनंदाचा भाग म्हणजे त्या बऱ्याच मराठी पुस्तकांची खरेदी करीत होत्या. अगदी पाच-दहा, पंधरा रुपयांच्या परिकथांची पुस्तकं त्यांनी मोठ्या संख्येनं उचललेली पाहून आम्हाला बालआनंद झाला. बिल वगैरे करून त्या बाहेर आल्याबरोबर आम्ही त्यांना गाठलं. तुमची मुलं केवढी आहेत, ती मराठी गोष्टीची पुस्तकं वाचतात हे किती छान वगैरे प्रश्न विचारल्यानंतर बाईंनी त्रासिक चेहरा करून सांगितलं, 'नाही हो... आमची मुलं त्या अमुक-तमुक पब्लिक स्कूलमध्ये आहेत. ती नाही वाचत असलं काही... आमच्या भिशी मंडळातर्फे एका अनाथालयातल्या मुलांना पुस्तकं देणगी द्यायचा कार्यक्रम आहे. त्यासाठी नेतेय ही पुस्तकं...' असं म्हणून म्याडम त्यांच्या शोफर-ड्रिव्हन 'स्कोडा'त शिरल्या. आमचा चेहरा अगदी 'स्कोडा-मोरा' झाला. आता काय करावं कळेना. (या बाईंवर एक ललित कथा तर नक्की झाली, पण बालसाहित्य कसं लिहिणार!) एके काळी गोष्टी लिहिणाऱ्या काही बालसाहित्यकारांचे पत्ते घेतले, तर ते अमेरिकेत त्यांच्या नातवांचे लंगोट बदलायच्या कामगिरीवर रवाना झाल्याचं कळलं. काही का असेना, अजूनही 'शिशु'संबंधी गोष्टीच ते करीत आहेत, याचा एक फुसकट आनंद आम्हाला झाला!
याखेरीज आम्ही बालसाहित्य संमेलनाला कधी हजेरी लावली नव्हती. पण ज्या काही बातम्या वाचल्या/ऐकल्या, त्यावरून तिथंही काही बालिश वा बालसुलभ गोष्टीच घडत असल्याची खात्री पटली. वृत्तपत्रांत लहान मुलांच्या पानावर येणारं साहित्य आम्हीच काय, पण आमच्या घरच्या बालांनीही कधीच वाचलं नव्हतं. एकूणच बालसाहित्याची निर्मिती करण्यास आपण अगदीच नालायक आहोत, अशी खात्री दिवसेंदिवस पटत चालली होती. मोठ्यांच्या साहित्य संमेलनात एकदा बालसाहित्यावरचा परिसंवाद ऐकला होता. शेजारीच प्रौढांसाठीचा गंभीर परिसंवाद होता. पण वक्त्यांचं बोलणं ऐकून वक्त्यांची आणि विषयांची उलटापालट झाली की काय, असा दाट संशय मनी आला होता.
...अखेर आम्ही बालसाहित्यनिर्मितीचा नाद सोडला. पुन्हा प्रौढांच्या लिखाणाकडं वळलो. आमच्या वकुबानुसार एक अत्यंत रोमँटिक अशी प्रेमकथा लिहून काढली. ती लिहिताना दोन दिवस आम्ही आमच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाकळ्या सोडल्या होत्या. शिवाय रोज गुलकंद खात होतो. तिखट-खारट पूर्ण वर्ज्य केलं. (आंबट चालूच ठेवलं... ते लागतं...) खेरीज हाताला गजरा बांधूनच ऑफिसला जायचं मनात होतं; पण तो मोह आवरला. एवढं सगळं करून अत्यंत कष्टानं लिहिलेली, 'साखरांबा' ही आमची प्रेमकथा तयार झाली. आमच्या नेहमीच्या प्रकाशकांकडं पाठविली. अत्यंत उत्सुकतेनं उत्तराची वाट पाहत राहिलो. एक दिवस त्यांचा मेसेज आला - 'कथा आवडली. आपला पुढील महिन्याचा बालकथा विशेषांकच आहे... त्यात वापरू... मुलं खूश होतील!'
...अन् आम्हाला बालसाहित्यिक होण्याचं कोडं एकदम उलगडलं. त्या दिवसापासूनच आम्हाला 'ठोंब्या बालसाहित्यिक' म्हणून साहित्यशारदेच्या चरणी रुजू करून घेण्यात आलं!

---

(ता. क. : काही लोकप्रिय किस्से स्वतःचेच आहेत, असं दाखवून आपल्या लिखाणात घुसडण्याचं आमचं कौशल्य जाणकार वाचकांच्या लक्षात आलं असेलच. आम्ही लेखक म्हणून हळूहळू 'उत्क्रांत' होत असल्याची ती खूण धरून चालावी! इति विज्ञापना...)

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, एप्रिल २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----

फिरकीचा ठोंब्या - भाग ९

संमेलन : उत्तरपूजा...
-------------------------


आयुष्यात काही गोष्टी घडायचे योग यावे लागतात. त्यामुळंच डोंबिवली हे गाव आपल्याला अद्याप का घडलं नसावं, याचा आम्हाला विलक्षण खेद होत होता. वायव्य (म्हणजे नॉर्थ-वेस्ट) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा किताब मिरवणारं, मुंबईत कोटात चाकरीला जाणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसांचं संध्याकाळी परतायचं घरटं असलेलं, पु. भा. भाव्यांपासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत किती तरी मराठी साहित्यिकांचं निवासस्थान असलेलं आणि या साहित्यिकांना नको त्या ठिकाणी चावून नकोसं करणाऱ्या डासांचं वसतिस्थान असलेलं असं हे अलौकिक गाव आपण पाहिलं नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात एक फार मोठी उणीव राहून गेली आहे, असंच आम्हाला गेल्या वर्षअखेरीपर्यंत वाटत होतं. मात्र, मराठी सारस्वताचा सर्वोच्च सोहळा असलेलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन डोंबिवली नगरीत (पूर्व) होणार, हे वृत्त कळल्यानंतर ही उणीव दूर करण्याची मोठीच संधी चालून आली. आम्ही ठोंब्या असलो, तरी अशी संधी सोडण्याइतकेही ठोंबे नाही, याची विनम्र आठवण स्वतःलाच करून देत संमेलनाचा धावता दौरा करायच्या तयारीला लागलो. आम्ही आयोजकांच्या आवडीचे लेखक (किंवा खरं तर लेखिका!) आणि सेलिब्रिटी दोन्ही नसल्यानं संमेलनात आम्हाला कुणी फुकट नेण्याचा प्रश्नच नव्हता. स्वतःच्या खिशाला खार लावून संमेलनाला जाण्याइतपत आमचं साहित्यप्रेम शाबूत असल्यानं आम्ही फारसा विचार न करता गाडी काढली. वास्तविक संमेलनातील परिसंवादातील वक्ता, सूत्रसंचालक किंवा गेला बाजार समन्वयक म्हणून कसे स्थान मिळवावे याचे जाणकारांनी क्लासेस काढल्यास पहिल्या बॅचमध्ये सर्वांत पहिल्या बेंचवर आम्ही दिसू. कारण गेली वीस वर्षं दहा-बारा संमेलनांना जाऊनही ही युगत काही आम्हाला वश झालेली नाही. कुठलीही गोष्ट फुकट करताना आमच्या साहित्यप्रेमी मनास जो आनंद मिळतो, तो स्वतःच्या खिशातले पैसे उडवून होत नाही, ही वस्तुस्थिती होय. मात्र, आम्हाला आत्तापर्यंत कुणीही हिंग लावून न विचारल्यानं आम्हीच दर वेळी स्वखर्चानं संमेलनयात्रा करीत आलो आहोत.
आता संमेलनाचं धावतं वर्णन ऐकवायला हरकत नाही. कारण आम्ही स्वतःच्या चारचाकीतून तिथं पोचल्यानं हे शब्दशः 'धावतं' वर्णन होतं.
तर मंडळी, हा आहे शीळफाटा. खोपोलीजवळही एक शीळफाटा आहे. पण तो वेगळा! हा कल्याण शीळफाटा... (इथं येईपर्यंत रस्ता बरा असल्यानं आपण शीळ घालत गाडी चालवू शकतो.) इथं पनवेलकडून मुंब्र्याला जाणारा रस्ता मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाला छेदतो. (ही सर्वांत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत आम्हाला कुणी दिली नाही.) इथं उजवीकडं वळायचं... समोर जे जांभळट डोंगर दिसतात, तेच शाळा कादंबरीतले सोनारपाड्याचे की जांभूळपाड्याचे डोंगर अशी आम्ही स्वतःची समजूत घालून घेतली. या रस्त्यानं अनाकलनीय संख्येनं मालट्रक जात असतात. त्यांच्या शर्यतीतून वाट काढत पुढं जिथं डोंबिवलीकडं डावीकडं वळा, अशी कुठलीही पाटी वगैरे नाही, तिथं डावीकडं वळायचं. पुढं सरळ गेलात तर तुमचं कल्याणच! तर आम्ही योग्य वेळी 'वाममार्गा'ला लागलो. आता अधूनमधून साहित्य संमेलनाचे बोर्ड दिसू लागले. डोंबिवली गाव सुरू झालं. गाव जसं असेल असं वाटत होतं, तसंच ते निघालं. अपेक्षेपेक्षा थोडं मोठं आणि आडवं पसरलेलं वाटलं. सुरुवातीला 'यज्ञेश देशी दारू बार' ही पाटी वाचली आणि पुलंच्या भाषेत सांगायचं तर गावाची 'प्राज्ञ पातळी' झटकन आमच्या लक्षात आली. पुढं एका अरुंद अशा रस्त्यानं दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर अखेर संमेलनाचं स्थळ आलं.
बहुतेक साहित्य संमेलनांच्या परिसरात गेलं, की साहित्य संमेलनाचा एक खास वास येऊ लागतो. नव्या मंडपाच्या कापडाचा, धूळ बसावी म्हणून पाणी मारल्यानंतर बसलेल्या मातीचा, खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा, ग्रंथदालनातून येणाऱ्या नव्या पुस्तकांचा आणि तिथं ये-जा करणाऱ्या हजारो माणसांचा असा तो संमिश्र वास असतो. डोंबिवलीत अगदी प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही हा वास येईना, तसं थोडं अस्वस्थ व्हायला झालं. मुंबईच्या खाऱ्या वाऱ्याच्या हवेत हा वास लुप्त झाला असेल, अशी समजूत करून घेतली. मुंबईपासून हे गाव लांब असलं, तरी सगळा संपर्क, संदर्भ मुंबईचाच असतो. अकराच्या सुमारासच वाढलेला उकाडा हे संदर्भ आणखीच कर्कशपणे सांगू लागला. मुंबई म्हटलं, की लोकल स्टेशनांपासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडं प्रचंड गर्दी असणार हे एक डोक्यात असतं. ती गर्दी इथं दिसेना, तेव्हाही काही तरी चुकल्यासारखं वाटू लागलं. डोंबिवली फास्ट सिनेमातल्या माधव आपटेसारखी बॅट फिरवून गर्दी गोळा करावी, असं काही वेळ वाटून गेलं. आगरी यूथ फोरमनं संमेलनाची तयारी आणि एकूण मंडप आदी व्यवस्था तर चोख केली होती. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच डाव्या बाजूला खाद्यदालन पाहिलं आणि महत्त्वाची चिंता मिटली. आत गेल्यावर समोरच दोन कारंजी आणि संतांचे पुतळे वगैरे होते. नंतर पुलं, कुसुमाग्रज, शांताबाई आदी लोकप्रिय लेखकांचेही पुतळे उभे केले होते. अनेक शाळकरी मुलं पुलंच्या (पुतळ्याच्या) गळ्यात हात घालून फोटो काढून घेत होती. एक मुलगा शांताबाईंच्या शेजारी उभा राहून फोटो काढत होता. तेव्हा तीन-चार शाळा मास्तरणी तिथं आल्या आणि 'ज्यांच्याबरोबर फोटो काढताय त्या कोण आहेत माहिताय का?' असं त्या मुलावर खेकसून गेल्या. वास्तविक पुतळा काढणाऱ्यानं त्या जेमतेम शांताबाई दिसतील असा पुतळा घडवला होता. तेव्हा तो त्या मुलाचा दोष नव्हता. मात्र, ही तर केवळ झलक होती. पुढं तर शाळेचं आणि ज्युनिअर कॉलेजचं आख्खं गॅदरिंग घडायचं होतं. त्या वेळी खरं तर जयंत नारळीकरांचा सत्कार वगैरे कार्यक्रम मुख्य मंडपात व्हायचा होता. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा त्याची काही हालचाल दिसेना, तेव्हा आम्ही आमचा मोर्चा ग्रंथदालनाकडं वळवला. ग्रंथग्रामास रा. चिं. ढेरेंचं नाव दिलेलं पाहून बरं वाटलं. संमेलननगरीला पु. भा. भाव्यांचं, तर मुख्य मंडपाला शं. ना. नवरे यांचं नाव दिलं होतं, तेही अगदी योग्यच! ग्रंथग्रामात शिरलो, तर सगळीकडं शुकशुकाटच दिसला. आपण फारच लवकर आलो की काय, असं वाटू लागलं. मात्र, पुढं संपूर्ण शनिवारचा दिवस गेला, तरी या परिस्थितीत फारसा फरक पडल्याचं दिसलं नाही.
ग्रंथदालनांत आमचे अनेक प्रकाशक मित्र आपापली नामवंत पुस्तकं घेऊन सज्ज बसले होते. रसिकांनी यावं आणि या पुस्तकांवर उड्या टाकाव्यात अशीच त्यांची इच्छा होती. अनेक मोठमोठे लेखक त्या पुस्तकांच्या रूपानं आपल्या चाहत्यांची वाट पाहत होते. मात्र, गर्दी फिरकलीच नाही. लोक आलेच नाहीत. म्हणजे फारच थोडे आले; जेवढे यायला हवे होते तेवढे अजिबात आले नाहीत! काही शाळकरी मुलं आली होती. एका स्टॉलमध्ये लेखकाबरोबर त्यांना गप्पा मारताना, फोटो काढताना बघून छान वाटलं. मात्र, असे क्षण फार थोडे... दुर्मिळ पुस्तकं होती, लहान मुलांची पुस्तकं होती... मोठ्यांची होती, शहाण्यांची होती, वेड्यांची होती... सगळी पुस्तकं होती. पण वाचकस्पर्शासाठी आसुसलेली ही पुस्तकं बहुतांश अस्पर्शच राहिली...
वैतागून संमेलनाच्या मुख्य मंडपात गेलो. तिथं बालमेळावा की काय सुरू होता. एकूण शाळेचं गॅदरिंग सुरू असल्याची कळा त्या कार्यक्रमाला होती. नंतर परत जेव्हा आलो, तेव्हा काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी भाषणं देत होते. ते पाहून कॉलेजचं गॅदरिंग सुरू आहे, असं वाटायला लागलं. एका स्कॉलर इ. मुलीनं मंचावरून बोलताना इंटरनेटचं महत्त्व एवढ्या ठसक्यात सांगितलं, की आम्हीही आमच्या भ्रमणयंत्रातील नेट प्याक चालू करून चॅटिंगचं महत्त्वाचं कार्य चालू केलं. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मंडपात शेकड्यानं खुर्च्या मांडल्या होत्या, पण त्या रिकाम्याच होत्या. उकाडा वाढला होता. त्यामुळं जो तो खाली मांडलेल्या मोठ्या पंख्याच्या तोंडासमोरची खुर्ची पकडून बसत होता. हे दृश्य गमतीदार होतं. 'पण या उन्हाच्या झळांपेक्षा रसिकांच्या दुष्काळाच्या झळा मनाला जास्त पोळत होत्या,' असं एक साहित्यिक वाक्य तत्क्षणीच सुचलं. आम्ही ते त्वरेनं डायरीत नोंदवून ठेवलं. अशी वाक्यं पुढं लेख वगैरे लिहिताना कामी येतात. त्या तरुणांच्या आवेशपूर्ण भाषणांनी आमची भोजनोत्तर पेंग उतरली आणि आम्ही तडक मंडप सोडला. अन्य मंडपी काय चालले हे पाहण्यासाठी डोकवावं, असं ठरवलं. तिसऱ्या मंडपात दुसऱ्या परिसंवादाच्या वेळी पहिलाच परिसंवाद चालू होता. अल्प श्रोते आणि अगम्य वक्ते यांचा सामना करण्यासाठी आम्हाला पुन्हा एक पंखा गाठणं भाग होतं. मागल्या बाजूनं छान झुळूक यायला लागली आणि आम्ही पुन्हा पेंगू लागलो. चहाच्या आठवणीनं जाग आली, तोवर मंडप ओस पडला होता. यानंतर दुसऱ्या मंडपाकडं आणि नाट्यगृहाकडं फिरकण्याचं धाडसच झालं नाही. तिथले कार्यक्रम आम्ही मनःचक्षूंचा प्रोजेक्टर ऑन करून जागच्या जागी पाहिले आणि संबंधित वक्त्यांना दाद देऊन टाकली. खाद्यदालनाच्या स्टॉलांवर गेलो, तर तिथं मात्र गर्दी उसळलेली दिसली. मंडप मोकळे आणि बाहेर गर्दी याचं कोडं उकलेना. मुख्य मंडपासमोर एक मोठी लेखणी मनोऱ्यासारखी उभी केली होती आणि दोन्ही बाजूला पायऱ्या करून या पेनात शिरण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्या पेनापेक्षा मंडपात गर्दी कशी शिरेल याची काही तरी व्यवस्था व्हायला हवी होती, असं राहून राहून वाटायला लागलं. लेखणीचा मनोरा हा एक सेल्फी पॉइंट होता, याचा आम्हाला अंमळ उशिराच उलगडा झाला. मात्र, तो झाल्याक्षणी आम्ही तातडीनं तेथे जाऊन सेल्फी काढला आणि सोबतच्या डायरीत एक आयटेम पूर्ण केल्याची 'टिक्' करून टाकली. ग्रंथग्रामात वारंवार जाणं झालं. तिथल्या मंडपाचा वरचा पडदा फारच पातळ असल्यानं सूर्यमहाराज डायरेक्ट अंगावर येत होते. त्यात स्थानिक हवेतला उकाडा... अशा वातावरणातही तिथं चहा विकणाऱ्या पोऱ्याचं आणि तो विकत घेणाऱ्यांचं कौतुक वाटल्यावाचून राहिलं नाही. चहावाल्याला अच्छे दिन आले आहेत, हे खरं; पण पुस्तकांना कधी येणार, याचा विचार करीत आम्ही आणखी अर्धा-एक तास पंख्याशेजारी घालविला. नंतर घर्मबिंदू टिपून, उरलेल्या स्नेह्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. वर्षानुवर्षं संमेलनाला हजेरी लावणारे काही उत्साही चेहरेही या वेळी दिसले नाहीत, तेव्हा खरंच खट्टू वाटलं. परिस्थितीचा जरा कानोसा घेतला असता, आणखी काही स्थानिक राजकीय कारणंही सापडली. ती ऐकून हसावं की रडावं, ते कळेना. अखेर दोन्ही करू नये, असा निर्णय घेतला आणि चेहरा निर्विकार ठेवला.
आवडते कवी द. भा. धामणस्कर हे डोंबिवलीचे. आदल्याच दिवशी संमेलनात त्यांचा सत्कार झाला होता. त्यांच्या घरी जावं आणि भेटावं असं फार वाटत होतं. पण तो योग नव्हताच. अखेर डोंबिवलीतल्या त्या प्रसिद्ध गणेश मंदिरात मात्र जायचं असं नक्की ठरवलं. डोंबिवलीतल्या बारीकशा रस्त्यांतून वाट काढत अखेर त्या मंदिरात पोचलो आणि त्या गजाननालाच प्रश्न गेला, हे बुद्धिदात्या, तुझे इथले सगळे भक्त का बरं रुसले संमेलनावर? बाप्पा काही बोलले नाहीत. बाहेर आलो आणि फेसबुकवर विनोद वाचला. एक जण डोंबिवलीतल्या माणसाला विचारतो, अरे, तुझ्या गावात संमेलन भरलंय आणि तू का गेला नाहीस? त्यावर तो म्हणतो, की अरे, ते संमेलन डोंबिवली पूर्वमध्ये आहे. मी पश्चिमेला राहतो....
हा विनोद वाचला आणि बाप्पांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं... आम्ही थोड्याच वेळात दक्षिण दिशेची, अर्थात पुण्यनगरीची वाट धरली. इति डोंबिवली संमेलनाच्या अपूर्ण उत्तरांची कहाणी उत्तरपूजेसह समाप्त!


---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मार्च २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग ८

लेखकराव संमेलनात...
---------------------------


साहित्य संमेलनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे आम्ही आधी उत्सुक, मग उत्साही, मग उल्हसित, मग उतावळे आणि शेवटी शेवटी उन्मनी होऊ लागलो. आमचे चित्त स्थिर नाहीसे बघून सौं.नी आठवडाभराची रजा टाकून आमच्या सभोवती स्वतःचाच पहारा ठेविला. मागल्याच्या मागल्या वेळी आम्ही असेच महिनाभर आधीच स्टेशनवर जाऊन 'घुमान घुमान' असं ओरडत अनवस्था प्रसंग ओढवून घेतला होता. तेव्हापासून आमचे इस हा एक मोठा घोरच लागून गेला आहे. तरी गेल्या वेळी 'पिंपरी पिंपरी' ओरडण्यानं फार नुकसान झालं नाही. फक्त बसस्टॉपवरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आम्हास हात धरून निगडीच्या बसमध्ये बसवून दिलं होतं, एवढंच! पौड फाट्यास उतरून आम्ही वेळीच स्वगृही परतलो तो भाग निराळा. तर आमचे हे असे होते... संमेलन सुरू होण्याच्या आधी साधारण महिनाभर आमचे मनपाखरू सैरभैर होऊन जाते. यंदाही तेच झाले आहे. आमचे 'अचपळ मन' केव्हाच डोंबिवली नगरीत जाऊन पोचले आहे. उठता बसता मन 'डोंबोली डोंबोली' गात्ये आहे.... आमच्या मनकवड्या अर्धांगिनीनं 'डोंबलं तुमचं...' असं हिणवूनही झालं आहे. त्यावर 'डोंबलं नाही गं, डोंबोली तुमची म्हण...' असा एक अतिकरुण पीजेही करून झाला आहे. त्यावर धर्मपत्नीनं अन्य शस्त्रे हाती धरली आणि आम्ही डासाच्या चपळाईनं तिचा मार चुकवीत घराबाहेर पडलो. पण बाहेर पडतानाही रस्त्यावर त्या कमानी लागल्या आहेत, ग्रंथदिंडी निघाली आहे, त्यात साहित्यिक कमी आणि गावातले चमको कार्यकर्ते जास्त असे नेहमीचे चित्र दिसते आहे, संमेलनाध्यक्ष अवघडून बसले आहेत, फडके रोडवर या निमित्ताने गुढीपाडव्याचाच रिपीट शो सादर होत आहे, संमेलनस्थळी हजारो जणांची पायधूळ उठल्यानं वातावरण धुळकट झालेलं आहे, ग्रंथप्रदर्शनाच्या दिशेनं कोऱ्या पुस्तकांचा करकरीत वास हवेवरून आमच्या नासिकाग्रास गुदगुल्या करितो आहे... असलीच काहीबाही दृश्यं आम्हास दिसू लागली...
आम्ही गेली कित्येक वर्षं संमेलनाची वारी करतो आहोत... मात्र, दर वेळी संमेलन जवळ आलं, की अस्मादिकांस नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. हा आपला घरचाच उत्सव आहे, असं वाटत राहतं. त्या संमेलनाच्या ठिकाणी खरं तर आम्हाला कोणी किंमत देत नाही. मात्र, तरीही तिथं आपलेपण वाटतं. उगाचच घरचं कार्य असल्याचा फील येतो. बाकी हा उत्सव मजेदारच असतो म्हणा. ज्यांनी तिथं यावंसं आपल्याला वाटतं, त्यांना काही ते आवडत नाही. आणि ज्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसते असे लोक एलईडी स्क्रीनवर सगळीकडं अगदी मोठमोठ्या क्लोजअपमध्ये दिसत राहतात. पण ते काही असलं, तरी संमेलनाच्या नादानं आम्ही सारंच चुपचाप सहन करतो. खरं तर संमेलन जिथं भरेल तिथं जाऊन त्या गावची संस्कृती अनुभवावी, असं आम्हास वाटत असतं. एखाद्या जत्रेला जावं तसंच हे असतं. जत्रेतलं सगळं आकर्षण तिथल्या मज्जेच्या गोष्टींमध्येच तर असतं. पण संमेलनाला जायचं तर ते आपल्या मित्रांसोबत! एकट्यानं संमेलनाला जाणं हे एकट्यानं हनीमूनला जाण्याइतकंच खुळचटपणाचं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. चार आपल्यासारखेच वाया गेलेले मित्र जमवावेत, गाडी काढावी आणि संमेलननगरीच्या दिशेनं कूच करावं, हा आता आमचा एक प्रघातच पडून गेल्यासारखा झाला आहे. वाटेत मनमौजेची ठिकाणं पाहावीत, हसत-खिदळत प्रवास करावा आणि इष्टस्थळी पोचून स्वर्गप्राप्तीचा आनंद घ्यावा, असा हा साहित्यप्रेमाचा मामला आहे.
संमेलनस्थळी आम्हास सर्वांत अधिक आकर्षण कशाचे वाटत असेल तर ते पुस्तकांच्या प्रदर्शनाचे. अस्मादिकही किंचित लेखकू असल्यानं अक्षरं लिहिणारे आणि त्याचं मोल जाणून ते छापणारे असे सगळेच आम्हास 'आपुल्या जातीचे' वाटतात. एरवी एवढे मोठे पुस्तकांचे स्टॉल एका ठिकाणी दिसणं कठीण. या गर्दीत घुसावं, आनंदात विहरावं, पाहिजे ती पुस्तकं बघावीत, हाताळावीत, वाचावीत, विकत घेऊन झोळीत टाकावीत आणि पुढला स्टॉल गाठावा यात आम्हास वेगळाच आनंद लाभतो. अशा या गर्दीत कुणी कवी भेटतात, कुणी लेखक भेटतात, कुणी प्रकाशक भेटतात. कवी प्रेमाचे असतील, तर तिथंच कविता ऐकवतात. आधी आम्ही, आमचे मित्र आणि कवी एवढेच उभे असतो. मग कवी कविता गाऊ लागतात... हळूहळू कोंडाळे मोठे होते. भोवती गर्दी जमते. लोक कवीला ओळखतात. खूश होऊन टाळ्या वाजवतात. कवीला कविता लिहिल्याचे समाधान, आम्हाला ती फुकटात ऐकता आल्याचे दुप्पट समाधान! असा हा राजीखुशीचा मामला असतो. कवी मस्त तंद्रीत मान डोलवत, झोळी सांभाळत निघून जातात. पुढच्या स्टॉलवर कुणी होतकरू लेखक भेटतात. नव्या कथांबाबत भरभरून बोलतात. आम्हीही होतकरूच असल्यानं त्याच्या 'हो'मध्ये 'हो' मिसळतो... होतकरू लेखकही समाधान पावतो. शेजारून जाणाऱ्या पोऱ्यास थांबवून कटिंग चहा पाजतो. होतकरू लेखकाकडं सुट्टे पैसे नसतात. आम्ही खिशातून पैसे काढून चहाचे पैसे देतो. होतकरू लेखक 'भेटू एकदा' हे अत्यंत पोचट वाक्य फेकत, ओशट हसत तिथून निघून जातो. आमची पुस्तकं पाहायची राहूनच जातात. पुढल्या पुस्तक गल्लीत प्रकाशकच भेटतात. वर्षानुवर्षं प्रकाशकांना भेटत असल्यानं आम्ही स्वतःच चहावाल्या पोरास हाक मारून प्रकाशकरावांना चहा पाजतो. प्रकाशकही शुगरचं कारण सांगत आधी नाही म्हणतात, पण मग हळूच अर्ध्यातला अर्धा कप चहा आमच्या चहात ओतत बाकीचा चहा भुर्रकन पिऊन टाकतात. मग 'अरे, ही संमेलनाची गडबड संपली, की निवांत पुण्यात भेट... तुझ्या पुस्तकाचं नक्की करून टाकू,' हे - गेली चार संमेलनं नित्यनियमानं ऐकवत असलेलं वाक्यच पाचव्यांदा आम्हास ऐकवतात आणि त्यांच्या स्टॉलवर उभ्या असलेल्या 'सुबक ठेंगणी'कडं मोर्चा वळवतात. या नवोदित लेखिका.... यांना आम्ही चांगलेच ओळखून आहो. लेखिका नवोदित असल्या, तरी चतुर आहेत. पापण्यांची पिटपिट पिटपिट न करताही चार प्रकाशक पर्समध्ये ठेवून आहेत. आत्ताच त्यांनी पलीकडच्या मंडपात 'विशुद्ध साहित्य व्यवहारातील स्त्रीवादाची बीजे' या की असल्याच काहीशा विषयावर जोरदार भाषण ठोकलंय. गेल्या वर्षी त्या कवयित्री म्हणून आल्या होत्या. यंदा लेखिका झाल्या आहेत. पुढल्या वर्षी समीक्षिका होतील आणि दोन-तीन वर्षांत कदाचित अध्यक्षाही होतील... त्या विदुषीला लांबूनच हात जोडून आम्ही दालनातून सटकतो...
ग्रंथदालनाच्या बाहेर एक मीडियावाला दादा हातात त्याचं ते बाजरीच्या कणसासारखं बोंडूक घेऊन एका महनीय प्रकाशकांची मुलाखत घेताना दिसतो. यंदा ग्रंथविक्री कशी कमी आहे, याची दर वर्षीचीच टेप त्यांनी लावली आहे. वास्तविक गेल्याच महिन्यात यांच्या चौथ्या दालनाचं आमच्या गावात उद्-घाटन झालंय. पण 'ग्रंथविक्रीतून आपल्याला पैसे मिळतात' हे जाहीरपणे सांगितल्यास बाकीचे प्रकाशक आपल्याला बहिष्कृत करतील, असं त्यांना वाटत असावं. तिथं काही वेळ ती करमणूक ऐकली आणि पुढं निघालो. एकूणच अशी मनमज्जेची बरीच ठिकाणं या परिसरात बघायला व ऐकायला मिळतात. पुढं मनोरंजनाची खाण म्हणावी असा कार्यक्रम सुरू होता. नवोदित कवींचा हा कट्टा. या कट्ट्याच्या भोवती तुडुंब गर्दी दिसतेय. या कट्ट्यात भाग घेणारे सगळे कवीच प्रेक्षक म्हणून उपस्थित असतात. सहज त्या गर्दीत घुसून डोकावून पाहिलं, तर फेसबुकवर स्त्रीवादी कवितांचा पाणलोट काढणाऱ्या भगिनी साक्षात समोर... फेसबुकवरच्या प्रोफाइल पिक्चरांचा आमचा दांडगा अभ्यास असल्यानं ५० मीटर अंतरावरूनही आम्ही त्यांना शार्पच ओळखले. स्त्री-पुरुष आदिम नात्याविषयी त्या काही भाष्य करू पाहत होत्या. त्या चिवट नात्यातल्या काही नाजूक प्रसंगांची वळकटी ताईंनी तिथं जवळपास संपूर्ण उलगडून दाखविली. त्यातल्या काही शब्दांच्या उच्चारणाचीही आम्हाला भीती वाटते, त्यामुळं ते इथं लिहिणं तर दूरच. पण बाईंच्या तीव्र भावनांनी त्या वीस-तीस ओळींमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या नराचं किंवा नराधमाचं एवढं रक्त काढलं होतं, की आम्हाला त्या कल्पनेनंच गरगरायला लागलं. आम्ही मनातल्या मनात कवितेला डिसलाइक करून पुढं निघालो. बाईंना पुढल्या वर्षी साहित्य अकादमी किंवा गेला बाजार राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार लाभल्याशिवाय राहत नाही, हे आम्ही मनातल्या वहीची खूण दुमडून नोंदवून ठेवलं. (आम्ही कुडमुडे लेखकराव असल्यामुळं दुसऱ्याला काहीही सन्मान वा पुरस्कार मिळाला, तर इकडं अशक्य पोटदुखी सुरू होते, हे नम्रपणे नमूद केलेलं बरं!)
आता मुख्य मंडपात जाण्याशिवाय उपाय नव्हता. तिथं ही गर्दी होती. आत पाहिलं तर सगळीकडं कार्यकर्ते दिसत होते. भगव्या, निळ्या, हिरव्या इ. रंगांची 'वादळं' म्हणे घोंघावत होती. पाऊल टाकायला जागा नव्हती. शेजारच्या चार माणसांच्या डोक्यातून, कानांतून, बगलांतून जे काही समोर मोठ्या स्क्रीनवर दिसत होतं, ते पाहू लागलो. राज्याचे भाग्यविधाते असे मोठे नेते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री, अर्धं मंत्रिमंडळ, राज्याचं केंद्रात प्रतिनिधित्व करणारे दोन वजनदार, एक मध्यम आणि एक हलके केंद्रीय मंत्री आदी विराजमान होते. भाग्यविधाते सांगत होते, की साहित्यिकांनी राजकारण करू नये. एकोप्यानं, न भांडता राहावं... वादग्रस्त काही लिहू नये, जुनी मढी उकरू नयेत, स्वतःचे पुतळे उभारू नयेत, उभारले तर कधी तरी ते गटारात जातील याची खात्री बाळगावी, काहीही लिहिण्यापूर्वी शक्यतो आमच्याकडूनच तपासून नेलं तर बरं इ. इ.
साहेब अजून खूप काय काय सुंदर विचारधन उधळत होते... छानच वाटलं ते ऐकून. पण समोरच्यांच्या घामाचा वास असह्य व्हायला लागला, तसं आम्ही डोकं बाहेर काढलं. जरा मंडपापासून दूर कोपऱ्यात गेलो. तिथं गार वार वाहत होतं. तिथं फारशी गर्दी नव्हती. बरं वाटलं. पलीकडं एक गॉगलवाले गृहस्थ इयरफोनवर काही तरी ऐकत होते... माणूस कुठं तरी पाहिल्यासारखा वाटला. एकदम आठवलं, अरेच्चा, हे तर संमेलनाध्यक्षांसारखेच दिसताहेत. आम्ही मग जरा धाडस करून त्यांच्या जवळ जाऊन हे सांगितलं... तर ते म्हणाले, कुठं बोलू नका. तो मीच आहे. संमेलनाध्यक्ष! हे ऐकून आम्ही तीन ताड उडालो. म्हणालो, अहो, मग तिकडं कोण आहे व्यासपीठावर? तर त्यावर ते म्हणाले, 'खुर्च्या कमी पडल्या मंत्र्यांना. मग मीच म्हटलं, अहो, तुमचं चालू द्या. मी आहेच की तीन दिवस. तसाही आत्ता माझा आवडता कार्यक्रम असतो रेडिओवर. तो ऐकायला आलोय बाहेर....'
आम्ही म्हटलं, कोणता कार्यक्रम? तर त्यावर ते भले गृहस्थ म्हणाले, 'मन की बात'!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, फेब्रुवारी २०१७)

---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

फिरकीचा ठोंब्या - भाग ७

डोंबिवली फास्ट
--------------------

तब्बल ५० दिवाळी अंकांत लेख पाडून पाडून आमचा गरीब, लेखकू जीव अगदी शिणून गेला होता. हलवायाला बुंदीच्या लाडवांचा ढीग पाहूनही त्याविषयी किंचितही आसक्ती वाटत नाही, तीच स्थिती आमची झाली होती. हे सगळे अंक पाहण्याचेसुद्धा कष्ट झाले नाहीत. अशा अगदी गलितगात्र, म्लान स्थितीत आम्ही बसलो असतानाच सुखद वाऱ्याची झुळूक यावी तशी ती खबर टीव्हीच्या पडद्यावर झळकली - 'आगामी साहित्य संमेलन डोंबिवलीत भरणार... 'अहाहा! वाहव्वा, वाहव्वा! कुस्तीचा फड लागल्यावर पहिलवानाला आणि तमाशाचा फड लागल्यावर 'बाइल'वानाला जो आनंद होईल, त्याच दर्जाचा आनंद आमच्या ठोंब्या मनाला झाला. पण हे सार्वजनिकरीत्या सांगणं बरं दिसत नाही, म्हणून आम्ही नेहमी आमच्या संमेलन दौऱ्याला पंढरीच्या वारीची उपमा देतो. 'बारी'ची 'वारी' झाली, की आमच्या लुच्च्या-लुब्र्या मनाला आध्यात्मिक आनंद होतो. तर सांगायचा मुद्दा असा, की एक (कसा का असेना) लेखकू असल्यानं आम्ही डोंबिवलीला जाणार हे आता निश्चित झालं आहे... डोंबिवली म्हटलं, की आम्हाला 'डोंबिवली फास्ट' हा सिनेमाच आठवतो. त्यातला तो माधव आपटे नावाचा संत्रस्त नायक आठवतो. हातात बॅट घेऊन त्यानं गावभर घातलेला धिंगाणा आठवतो. गेल्या अकरा वर्षांत आमच्या आजूबाजूच्या जगात भलताच फरक पडला आहे. विशेषतः सोशल मीडिया आल्यापासून तर आम्ही गप्पगार झालो आहोत. आमचा जो काही उद्रेक व्हायचा तो एक तर फेसबुकीच्या पोस्टवर नाही तर व्हॉट्सअपच्या फॉरवर्डवर होतो. (निशिकांत कामतलाही आज 'डोंबिवली फास्ट' काढायचा झाला असता, तर माधव आपटे फेसबुक अन् व्हॉट्सअपवर सगळी चिडचिड व्यक्त करतो, असं दाखवावं लागलं असतं आणि सिनेमाचं नाव कदाचित 'डोंबिवली पोस्ट' असं ठेवावं लागलं असतं. तर ते एक असो.)
डोंबिवली अजून एका कारणासाठी आम्हाला ठाऊक आहे. डोंबिवलीचे डास ख्यातनाम आहेत म्हणे. आम्ही कधी अनुभव घेतला नाही; पण मराठी सारस्वताचं बरंचसं रक्त याच नगरीतून शोषलं गेल्याच्या शोषितांच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. याचं नेमकं कारण शोधू गेलं असता, असं दिसून आलं, की मराठी साहित्यिकांना संध्याकाळच्या वेळी भोकाभोकांच्या बनियनवर आपल्या दीड बाय अडीच फुटाच्या ग्यालरीत (याला स्थानिक भाषेत गच्ची हा अधिक नेमका शब्द आहे...) बसून 'प्रतिभासाधन' करण्याची घाणेरडी सवय आहे. (तरी इथं 'बसून' या शब्दाला 'कोट' घातलेला नाही. तो घातला असता, तर डास चावले नसते, पण कोटीक्रम पूर्ण झाला असता. तर ते असोच.) आता नेमकी हीच वेळ डासांच्याही रुधिरशोषणाची असल्यानं मराठी साहित्यिकांच्या बनियनच्या भोकाभोकांमधून साहित्यनिर्मितीच्या सर्व केंद्रांवर डास संप्रदायाकडून तीव्र दहशतवादी हल्ले चढवण्यात येतात. खरं तर ही बाब खचितच शोचनीय आहे. पण डोंबवलीचे साहित्यिकही गच्चीत बसणं सोडत नाहीत आणि डोंबवलीचे डासही त्याच साहित्यिकांचं रक्त शोषून मोठे झालेले असल्यानं त्यांनी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा डोंबिवलीचं हे एक पुरातनकालीन सत्य होय. ते आताही कायम आहे की नाही, याची कल्पना नाही. पण डोंबवलीच्या महापालिकेनं तेथील डास नष्ट केले असतील, तर तिनं त्या शहराचा सांस्कृतिक ऐवजच नष्ट केलाय, असं म्हणायला हरकत नाही.
डोंबिवली म्हटलं आम्हाला आणखी आठवते ती 'शाळा' ही बोकिलांची कादंबरी. या कादंबरीतलं गाव म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचं डोंबवली गावच! तेव्हा इंग्लंडात गेलं, की आमची साहित्यिक माणसं जसं शेक्सपिअरचं घर शोधायला धाव घेतात, तद्वत आम्हीही डोंबिवलीत गेलो, की म्हात्रेशेठच्या 'चाली' आणि शिरोडकरचं घर शोधणार आहोत. आणि हो, ते गणपतीचं मंदिर पाहण्याचीही आम्हाला एक चावट उत्सुकता लागून राहिली आहे. आमची साहित्यिक यत्ता 'नववी' हीच असल्यानं ते योग्यही ठरेल...
आणखी डोंबिवली म्हटलं, की आम्हाला आठवते ती तिथली गुढीपाडव्याची 'शोभायात्रा'. मराठी नववर्षाला निघणाऱ्या मिरवणुकीला 'शोभायात्रा' हा नवा शब्द बहाल करून मायमराठीची सेवा केल्याबद्दल डोंबिवलीच्या अभिनंदनाचा विशेष ठराव या संमेलनात मंजूर झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी आम्ही करीत आहोत. डोंबवलीतल्या फडके रोडवर भगवे फेटे घालून, नथबिथ घालून, नववाऱ्या नेसून सर्व मराठी पेपरांत झळकणाऱ्या डोंबवलीच्या सुंदरी तिथल्या संमेलनातही दीपप्रज्वलन वा सत्कार प्रसंगी स्टेजवर मिरवताना दिसतील, अशी आमची आपली एक 'छोटी सी आशा' आहे. बाकी या 'शोभायात्रा' शब्दावरून मुंबई आणि पुण्याच्या मराठी पेपरांत भांडणं लागली होती हो एके काळी... 'शोभा होणे' याचा अर्थ कळतो का, असा कुचकट, पेठीय सवाल पुण्यातल्या वृत्तपत्रांतले मोठमोठे लोक करताना ऐकलं होतं. पण डोंबवलीकरांना त्याची फिकीर नव्हती. त्यांनी तो शब्दही सोडला नाही आणि ती यात्राही सोडली नाही. मराठमोळ्या मिरवणुकीला एक हिंदी शब्द लाभला, यातच आम्हीही आनंद मानून टाकला. बाकी डोंबिवली म्हटल्यावर आणखी काय आठवणार? हां, ते एक शं. ना. नवरे नावाचे लेखक इथंच राहायचे म्हणे. बरं लिहायचे असं ऐकतो. असतील असेच कुठले तरी मध्यमवर्गीय, पापभिरू लेखक! असं 'आनंदाचं झाड' आता उगवत नाही, असं कुणीसं म्हणालं. लोक काय, कशासाठीही गळे काढतात... जाऊ द्या... आपण आपलं डोंबवली पुराण सोडू नये...
...तर अशा ऐतिहासिक गावी जायचं म्हटल्यावर आमच्या मनाला काव्यमय आनंद झाला. संमेलनाध्यक्षपदी कुणी डॉ. काळे निवडून आले म्हणे. 'मतपत्रिकेमाजी काळे-दवणे, काय निवडावे निवडणारे?' असला काही प्रश्न मतदारांना पडलेला दिसत नाही. मराठी भाषा जणू मृत्युशय्येवर पहुडली असून, तिला अनास्थेचे डास चावून दुरवस्थेचा डेंगी झाला असावा, असं मतदारांना वाटलं की काय, कोण जाणे! आणि रोगी आजारी म्हटल्यावर उपचाराला डॉक्टर हवेतच. म्हणून काळे डॉक्टरांना पाचारण केलेलं दिसतंय. शिवाय 'अक्षयकुमार' या नावाची जादू महिला मतदारांवर पडलीच नसेल, असं काही ठामपणे म्हणता येत नाही. अर्थात अध्यक्ष कुणी का होईना! आपल्याला काय करायचं आहे! आपली 'साहित्यिक सैर' व्यवस्थित झाली म्हणजे झालं. सवाई गंधर्व महोत्सवात नाही का, समोर कोण गातंय यापेक्षा आपण ते कुणाबरोबर ऐकतो आहोत, यालाच अधिक महत्त्व असतं! तसंच आहे हे... सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये राष्ट्रपतींना आणि सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये दिग्दर्शकाला जेवढं महत्त्व असतं, त्याहून अधिक महत्त्व संमेलनाध्यक्षाला असतं, असं वाटत नाही. थोडक्यात, डोंबिवलीच्या 'शोभायात्रे'त संमेलनाध्यक्ष म्हणजे फक्त रेशमी जरीची साडी नेसवलेली गुढी फक्त! आता या यात्रेत 'मज्जा' गुढीला येते की सहभागी नगरजनांना, तुम्हीच सांगा! अशा या ऐतिहासिक, मराठमोळ्या सारस्वतनगरीत जावयाचे म्हणजे आमच्यासारख्या ठोंब्या लेखकांना केवढे प्रयास पडतात, हे काय सांगावयाचे! एक तर एरवीच मराठी लेखकाकडं नोटांचा अभाव... त्यात नोटाबंदी आल्यानंतरचे प्रसंग काय सांगायचे! 'झाकली मूठ सव्वा हजाराची' ठेवायची झालं... (म्हणीपुरतेही 'लाख' नसतात हो आमच्याकडं!) तरी आमची 'ही' पुष्कळ व्यवहारी आहे. आपला नवरा लेखक, म्हणजे त्याच्या खिशात छदाम नसणार, हे तीस ठाऊक असते. त्यामुळंच आमच्या मुदपाकखान्यातली पितळी भांडी अशा वेळी ब्यांक म्हणून उपयुक्त ठरतात. अशाच एका 'ब्यांके'तले सव्वाशे रुपये हिनं परवा काढून मजकडे दिले. त्यातून भाजी आणायची होती. मात्र, आम्ही चतुर लेखक असल्यानं भाजीचे पैसे वाचवून बसनं साहित्याच्या हेडक्वार्टरी गेलो. टिळक रस्त्यावरच्या त्या महन्मंगल वास्तूत पाऊल टाकताना, छाती भरून येते. (आम्ही ज्या बसनं उतरतो, ती पुढं जाताना हमखास काळाकुट्ट धूर सोडते, त्यामुळं छातीबरोबरच डोळे, कान इ. पंचेंद्रियेही भरून येतात. तर तेही असोच.) मुद्दा असा, की तूर्त साहित्याचे हेडक्वार्टर संत्रानगरीत गेल्यामुळं आम्हास इथं फक्त केळी मिळणार, हे आधीच ठाऊक होते. तरीही कुठे काही सेटिंग होते का हे पाहण्याची खोड काही जात नाही. आम्हाला किमान एक परिसंवाद मिळणं गरजेचं होतं. तसं झाल्यासच 'डोंबिवली फास्ट (आणि फुकट)' ही फिलिम सत्यात उतरणार होती. 'परिसंवाद' या शब्दावर एक अत्यंत जुना आणि पचपचीत पीजे करून आम्ही कार्याध्यक्षांना हसवण्याचा प्रयत्न केला. पण हा माणूस मुलखाचा सभ्य आणि सरळ हो! (सध्याच्या संमेलनाध्यक्षांच्या सहवासात राहूनही हे टिकवणं म्हणजे खायचं काम नव्हे. पण असो, असो, असोच...) तर कार्याध्यक्षांकडं लग्गा लावूनही काही होत नाही, म्हटल्यावर आम्ही निराश होत्साते हेडक्वार्टरीच्या पायऱ्या उतरलो. परिसंवाद नाही तर नाही, किमान एक सूत्रसंचालन, किंवा गेला बाजार एक कविकट्टा मिळाला असता, तरी आमचे भागले असते. ठोंब्याची अपेक्षा फार नसते. इतर लेखकांसारखी आम्हास इतर काही प्रतिभाप्रेरके लागत नाहीत. म्हणजे मिळाली तर नको असतात, असे नाही; पण त्याचा सोस नसतो. वेळ पडल्यास (आणि ती बहुतेकदा पडतेच...) आम्ही दीड केळ्याच्या शिकरणावर दीड हजार शब्दांचा लेख पाडू शकतो. त्यामुळं आमचा सौदा वास्तविक यजमान मंडळींना स्वस्तात पडतो. पण त्यांना ते कळकट शबनमवाले आणि दाढीवाले अनेकोनेक कवीच आवडतात, याला काय म्हणावे! आमचे रूपडे म्हणाल, तर काही राजबिंडे नव्हे, पण 'कवडा' म्हणावे इतके भिकारही नव्हे. आम्ही रोज दाढी-बिढी करतो. कदाचित हीच गोष्ट आमच्या विरोधात जात असावी. यापुढं फेब्रुवारीपर्यंत दाढी राखून पाहावे. नाही तरी सुट्ट्यांच्या वांध्यामुळे कटिंग करणे ही गोष्ट 'कटकटी'चीच झाली आहे. तोपर्यंत कवीचं खपडं रूपडं आलं तर बरंच आहे. यावरून मंडळी, तुमच्या लक्षात एक आलं असेल. संमेलनास फुकटात जाण्यासाठी आम्ही कितीही वेळ खर्च करू शकतो. कारण तो आमच्याकडं भरपूर आहे. आणि टाइम इज मनी... त्यामुळं 'मनी'ही विपुल आहे...! आता तो काळा आहे की पांढरा हे माहिती नाही. कदाचित आम्ही काळ्यावर पांढरे करणारे लेखकू असल्यानं दोन्ही असावा! झाकली मूठ सव्वा हजाराची... आणि झाकली डोंबिवली सव्वा लाखाची! हाय काय अन् नाय काय!! चला, 'डोंबिवली फास्ट' आली... पटकन घुसा...

 ---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जानेवारी २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

28 Jul 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ६

साहित्यिक सर्जिकल अट्याक...
--------------------------------------

साहित्याशी आपली जन्माची गाठ बांधली गेली आहे, याची खूणगाठ आम्ही बालवयातच बांधून ठेवली आहे. लहानपणी फटाक्यांच्या खोक्यापेक्षा आम्हाला दिवाळी अंकांतल्या चौकटी आणि खिडक्या आवडू लागल्या होत्या, तेव्हाच घरच्यांनीही 'ठोंब्याचे अवलक्षण' ओळखले होते. कालांतराने आम्ही वयात इ. आल्यानंतर फटाक्यांतल्या लवंगी आणि ॲटमबॉम्बपेक्षा दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या 'लवंगी' आणि 'आयटेमबॉम्ब'मधली आमची रुची जगजाहीर झाली होती. दिवाळी अंकांचे आणि आमचे असे प्रेम जडले ते तेव्हापासून... मग काही चोरट्या-किरट्या आठवणी... अर्थात् काही अंक चोरून वाचण्यात जी मजा असायची ती आता खुलेपणाने गोष्टी करूनही नाही मिळत! तर ते असो. दिवाळी अंकांच्या वाचनातील 'मौज' पूर्वीच ओळखल्यामुळं आम्ही पुढं लेखकू होणार, यात 'नवल' नव्हते. आपणच साहित्यसृष्टीतले 'हंस', असा एक आमचा समज होता. पण भल्याभल्यांनी 'आवाज' टाकल्यानं आमच्या भवितव्याचं 'अक्षर' स्पष्टच दिसून आलं होतं. त्या वाटेवर अनेक 'मेनका', 'मोहिनी' असल्या, तरी फुकाची 'चपराक' खायला लागेल, म्हणून आम्हीच आमचं साहित्यविषयक ज्ञान गुंडाळून ठेवलं होतं. कितीही 'साधना' केली, अगदी 'सत्याग्रही' झालो, तरी साहित्य क्षेत्रातील यशाचे 'ऋतुरंग' दिसतीलच, याची शाश्वती नव्हती. इथं शेवटी लोकांची इच्छा, 'लोकसत्ता' महत्त्वाची; उगाच 'लोकमत' आपल्या मागे आहे, असा खोटा समज करून समाधानाचा 'दीपोत्सव' साजरा करण्यात काहीच मतलब नव्हता. 'कालनिर्णय' अगदी स्पष्ट होता. आमचं लेखक म्हणून भवितव्य अगदी धूसर दिसू लागलं होतं. 'ग्रहांकित' मंडळींनीही पाठ फिरविली होती. आता फार ताणण्यात अर्थ नव्हता...
शेवटी आम्ही निर्णय घेतला. साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा... काट्यानं काटा काढायचा. लेखक म्हणून यशस्वी व्हायचं असेल, तर आधी दिवाळी अंकांतच लेख लिहून प्रसिद्ध व्हायचं. मग आपोआपच लोक आपल्याला मोठा लेखक म्हणू लागतील. आम्ही 'फास्टर फेणे' नसतानाही आनंदानं 'ट्टॉक' केलं. काही लोकप्रिय लेखकांचा अदमास घेतला. काही ठरावीक अंकांत तेच तेच लेखक वर्षानुवर्षं एकाच साच्यातून लेखरूपी पीठ पाडत होते, असं लक्षात आलं. हे अंक फार नामवंत होते, प्रख्यात होते. तिथं आमच्यासारख्यांना प्रवेश मिळणं अशक्यच होतं. 'साभार परत'चं सौजन्यही हल्ली कुणी दाखवत नाही, हे गुपित आमच्या एका कविमित्रानं आमच्याबरोबर एका 'कवि'स्थळी रात्रीच्या उत्तरकाळात, जमिनीपासून अदमासे दहा हजार फुटांवरून त्याचं फ्लाइट उडत असताना शेअरलं होतं. तेव्हा आम्ही त्या नामवंत अंकांचा नाद सोडला. 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' असं त्या नतद्रष्ट मित्रानं आम्हाला तिथल्या तिथं ऐकवल्यावर त्याचं बिल न भरण्याचा बाणेदारपणा दाखवून आम्ही कोल्ह्याइतकाच धूर्तपणा दाखवून डाव साधला होता. तर ते असो.
एकाच वेळी पन्नास दिवाळी अंकांत लेख लिहायचा महासंकल्प आम्ही ऐन एप्रिलच्या उकाड्यात, एका संकष्टीचा उपास सोडताना, म्हैसूरपाकाचा तुकडा मोडताना मनातल्या मनात सोडून टाकला. दिवाळीला अजून सहा महिने होते. एका महिन्यात आठ ते नऊ लेख पाडावे लागणार होते. आमच्या बेनसन-जानसन टाइप कंपनीत अगदी सरकारी नोकरीएवढा नव्हता, तरी पुष्कळच आराम होता. त्यामुळं त्या आघाडीवरून काही धोका नव्हता. रोजच्या रोज तिथं हजेरी लावणं एवढाच काय तो कटकटीचा भाग होता; पण तेवढा नाइलाज होता. तर या दिवाळी अंक लेख मोहिमेत आम्हास आमच्या परममित्राची फार मदत झाली. (हा कवी नव्हे. हा एलआयशीवाला...) त्यानं त्याच्या लायब्ररीतून गेल्या वर्षीच्या पन्नासेक दिवाळी अंकांचा गठ्ठा आमच्यासमोर आणून आदळला. या बदल्यात त्याला एकदा तीर्थप्राशनास न्यावयाचे, हे परवडण्याजोगे होते. (बाकी हा मित्र त्या आमिषापायी हिमालयसुद्धा उचलून आणू शकतो. वर 'बर्फाची कायमची सोय झाली,' हेही ऐकवायला कमी करणार नाही. तर ते असोच.) तर ते अंक बघून आमचे डोळे लकाकू लागले. विशेषतः ज्योतिषविषयक, पाककृतीविषयक आणि सिनेमाविषयक विशेषांक बघून तर हर्षवायू व्हायला बाकी राहिला. आम्ही तसे हातखंडा लेखक आहोत. सांगाल त्या विषयावर आणि सांगाल तितक्या शब्दांत लेख लिहून देणं हा आमच्या डाव्या हातच्या बोटांचा खेळ आहे. (पूर्वी डाव्या हातचा मळ म्हणत असत; पण आता कळफलक असल्यानं डाव्या हातची 'कळ' म्हणायचा पाहिजे खरं तर... तर पुन्हा असो.) त्यामुळं या अशा विशेषांकात आपण सहज पंधरा-वीस लेख उडवू, असं एक विलक्षण स्फुरण आम्हास चढलं. आमचे बाहू अचानक फुरफुरू लागले. समोरचं कुरकुऱ्यांचं पाकीट फोडून आम्ही संगणकावर 'एंटर' मारला आणि आमचा साहित्ययाग सुरू जाहला...
बसल्या बैठकीला आम्ही एक पाककृतीविषयक लेख लिहून काढला. पाककृतीविषयक लेख लिहायला आपल्याला स्वतःला स्वयंपाक करता यावा लागतो, हा अज्ञ लोकांचा भ्रम आहे. आमच्यासारखे साहित्यिक असे भ्रम बाळगू लागले, तर लिहावे कसे? हे म्हणजे नदीवर लेख लिहायचा असेल, तर पोहायला येणे आवश्यक आहे, असे म्हणण्यासारखेच वेडपटपणाचे होय. हल्ली भटकंतीला गेलं, की कुठं ना कुठं तरी एक लोकप्रिय खाद्यपदार्थांचा स्पॉट असतोच असतो. आमच्या पायाला अगदी भिंगरी लागलेली नसली, तरी आम्हीही बऱ्यापैकी फिरतो. तेव्हा चार खादाडीची ठिकाणं ठाऊक आहेत. तेथील अनुभवांची जंत्री गोळा केली, तर सुमारे सोळा ठिकाणं निघाली. मग एका लेखात चार ठिकाणं घालून चार लेख तयार केले आणि चार दिवाळी अंकांच्या मेल आयडीवर टिच्चून सेंड करून टाकले. चार लेख तयार करताना एक टेम्प्लेटच तयार करून घेतलं. असले लेख लिहिताना रिपोर्ताज पद्धती उपयोगाला पडते. त्या खाद्याच्या स्पॉटवर पोचेपर्यंतचं प्रवासवर्णन करीत राहायचं. तिथंच निम्मा लेख भरतो. उदा. 'कार्तिकाचे दिवस. थंडी मी म्हणत होती. भल्या पहाटे बाइक काढून तीन मित्र निघालो. पुण्यातून बाहेर पडताना वेळ कमी लागला, पण झोंबता वारा अंगाशी खेळू लागल्यानं जठराग्नी भडकला. उत्तर दिशेला निघालेला हा हायवे आपल्याला सह्याद्रीच्या कुशीची सैर घडवतो. डाव्या बाजूला भगीरथगडाचे सुळके दिसू लागले होते. सोनटाक्यांचं पाणी दूरूनही लकाकताना दिसत होतं. त्याच वेळी भय्याच्या मिसळीच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटत होतं...' अशी एक प्रस्तावना लिहून टाकायची. दुसऱ्या लेखाच्या वेळी कार्तिकाच्या जागी अश्विन, बाइकच्या जागी कार, तीनच्या जागी दोन मित्र, उत्तरेच्या ऐवजी दक्षिणेचा हायवे, 'डाव्या'ऐवजी उजव्या, भगीरथगडाऐवजी भरतगड, भय्याच्या जागी अप्पा आणि मिसळीच्या जागी कांदाभजी टाकून द्यायची... हाय काय अन् नाय काय!
थोडक्यात काय, साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा, हे नुस्तं 'खळ्ळं खट्याक' करण्याइतकं सोपं काम नाही. त्याला फार दांडगा उत्साह, अफाट पूर्वतयारी आणि कॉपीचा (म्हणजे मजकुराचा) अचाट सराव लागतो. रात्री-बेरात्री मजकूर टंकताना कॉफी ढोसून रात्री काढण्याचाही सराव आवश्यक असतो. बसल्या बैठकीला चार ते पाच मध्यम आकाराचे लेख उडवण्याचा आम्हाला आता अगदी सराव झाला आहे. पाककृतीविषयक दिवाळी अंकांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले, की या अंकांमध्ये येणाऱ्या मजकुराचाही एक साचा झाला आहे. उकडीच्या मोदकाप्रमाणे या साच्यातूनही अनेक लेख बाहेर काढता येतात. अगदी वर दिलेल्या नमुन्यासारखे! पाककृतीविषयीचे आमचे लेख फारच चविष्ट झाले आहेत, असं आमचं मत झालं. नमुन्यादाखल एक लेख कुटुंबाला वाचायला दिला असता, झरझर नजर फिरवून तिनं तो आमच्याकडं पुन्हा भिरकावला. 'हा लेख गेल्या वर्षीच वाचलाय,' या तिच्या टिप्पणीनं तर आम्हाला उकळत्या काहिलीत फेकल्यासारखं झालं. यापुढं आपलं दिवाळी अंकाचं साहित्य हे गोपनीय ठेवायचं आणि अंकात छापल्यानंतरच ते लोकांना वाचायला द्यायचं ही खूणगाठ मनात बांधून ठेवली. (अंकात छापून आल्यानंतरही काही लेख अंकासकट गोपनीय राहतात, हा भाग वेगळा!) आपल्या साहित्यसेवेची आणि लेखांची कदर आज ना उद्या कुटुंबाला, मग आमच्या सोसायटीला, मग समाजाला आणि मग समस्त देशाला होईल, या आशेवर आम्ही तगून आहोत. आशा बाकी भारी चिवट!
पाककृतीवरच्या लेखांचा फडशा पाडल्यानंतर आम्ही ज्योतिषविषयक लेखनाकडं वळलो. वास्तविक आम्हाला आमचा भूतकाळ फारसा लक्षात राहत नाही, वर्तमानाविषयी तर आम्ही कायमच दुग्ध्यात पडलेलो असतो, तर भविष्याविषयी काय सांगणार वा लिहिणार, डोंबलं! पण दिवाळी अंक साहित्ययाग सुरू झालेला असल्यानं त्यात केवळ आमच्या प्रतिभेचीच नव्हे, तर अशा तर्कदुष्ट, विवेकी इ. प्रश्नांचीही समिधा पडत होती, हे आमच्या लक्षात आलं. मग फार विचार न करता, आम्ही ज्योतिषविषयक लेखन करायला सुरुवात केली. वास्तविक, पेपरांत उपसंपादकी करीत असताना रोजचं बारा राशींचं भवितव्य ठरवण्याचा अनुभव पाठीशी होता. मात्र, आम्ही थेट ज्योतिषाविषयी लेखच लिहू, हा होरा काही कुणीही वर्तवलेला नव्हता, हे खरं. आम्ही 'चालू' वर्तमानकाळ या कॅटॅगरीतले इसम असल्यानं (फक्त 'चालू'ला अवतरण टाकलंय का? ते 'वर्तमानकाळ'पर्यंत आहे हो!) लेखन करतानाही कधी भविष्यकालवाचक क्रियापदं हातून लिहिली जात नाहीत. त्यामुळं सुरुवातीला गडबड उडाली. पुढच्या वर्षीचं, अर्थात २०१७ सालचं भविष्य लिहितानाही 'होईल'ऐवजी 'झाले आहे' असंच लिहिलं जाऊ लागलं, तेव्हा आम्ही 'छोटा सा ब्रेक' घेतला. डोळे बंद करून स्वतःचं भविष्य डोळ्यांसमोर आणलं. फार काही आशादायक दिसेना, तसा आणखी त्रास व्हायला लागला. तेव्हा पाककृतीप्रमाणेच बसल्या बैठकीत याही चार-पाच लेखांचा फन्ना उडवायचा, असा वज्र की कायसा म्हणतात, तो निर्धार करून आम्ही कळ दाबली. भविष्यविषयक लेखन करणे फार सोपे आहे, असे आमच्या लक्षात आले. पहिली रास घेतली. आपल्या परिचयातली त्या राशीची व्यक्ती समोर आणली. त्या व्यक्तीचं पुढल्या वर्षात काय व्हायला पाहिजे, याचा एक आराखडा मनातल्या मनात तयार केला आणि सरळ 'एंटर' मारला. पण प्रत्येकाचं भविष्य फारच निगेटिव्ह यायला लागलं. तेव्हा आम्ही चतुर भविष्यवेत्त्याप्रमाणे, पण... परंतु... किंतु आदी शब्दांचा भडीमार करून सर्व ग्रहांना नीट शिस्तीत उभं केलं आणि सगळ्या राशींना खूश करून टाकलं. आमच्या राशीतही आम्हाला सहा महिन्यांनी मोठी धनराशी दिसू लागली. पण आम्ही मराठी दिवाळी अंकांत लिहीत असल्याचं वास्तव लक्षात आल्यानं आमची राशी आम्ही राईची करून टाकली.
बघता बघता आम्ही सात-आठ खादडीचे, तर आठ-दहा ज्योतिषविषयक लेख लिहून हातावेगळे केले. पटापटा मेल करून टाकले. आणखी दहा लेख आम्ही विनोदी ढंगाचे लिहिले होते. (आमच्या त्या नतद्रष्ट मित्राने आमच्या आधीच्या १८-२० लेखांची जिम्माही याच कॅटॅगरीत करून टाकली.) हो, विनोदी लिहिण्याचा आम्हास भारी छंद! रामप्रहरी उठावे आणि दोन्ही हातांच्या बोटांनी स्वअंगास गुदगुल्या करून खुदुखुदू हसत राहावे, हा आमचा प्रातःकालीचा व्यायाम होय. त्यानंतर आम्ही हा हा म्हणता (किंवा करता) दहा-बारा विनोदी लेख हसत हसत बडवतो. आमचे विनोदी लेख वाचताना आम्हासच भारी हसू येत्ये. कित्येकदा तर कम्प्युटरसमोरची खुर्ची ढकलून आम्ही जमिनीवर गडाबडा लोळलो आहोत. या दर्जाचा विनोद सांप्रतकाळी मराठीत मिळणं कठीण; पण त्याची किंमत किती जणांस आहे? तर ते असोच. 
नंतर नंतर तर आम्हाला दिवाळी अंकाचे लेख लिहिण्याचे व्यसनच जडले. कुठली फाइल उघडतो आहोत, किती मजकूर बडवतो आहोत, कुठं एंटर मारतोय, कुठं डिलीट मारतोय, कुठं सेव्ह करतोय... कश्शाकश्शाचे भान उरले नाही. बोटे अखंड कळफलकावर नाचत राहिली. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी...' असं म्हणून नामदेवमहाराज 'नामा'निराळे झाले असले, तरी आम्ही ते ब्रीद सोडलेले नाही. 'नाच की-बोर्डाचे टंकी, अक्षरदीप लावू अंकी' हेच ते आमचे ब्रीद...
तर लेख लिहून झाले. टिच्चुक्कन मेल केले... मेल्या मेलबॉक्सनं चक्क ढेकरही दिला... आता आमची खरी कसोटी सुरू जाहली होती... पन्नासएक अंकांत कुठं काय लिहिलं, हे लक्षात राहिना, म्हणून त्याची एक यादीच खिशात घेऊन फिरू लागलो... आता प्रतीक्षा होती ती आधी संपादकांच्या आणि मग वाचकांच्या प्रतिसादाची...
आणि मंडळी, इथे पूर्वरंग संपलेला आहे... उत्तररंग पुढील अंकी...


----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, डिसेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग ५

मेहुणचार
-----------

लेखक म्हणून काही कुठं लवकर बस्तान बसण्याची शक्यता दिसेना, तसे आम्ही अस्वस्थ झालो. आता वेगळ्या मार्गानं प्रसिद्ध व्हावं, असं आम्ही ठरवून टाकलं. आणि एकदा का आम्ही एखादी गोष्ट ठरवली, की ती आम्ही करतोच! मोठमोठ्या लोकांचं अनुकरण करावं, असं वाटू लागलं. मोठ्या लोकांनी अभ्यास केला होता, ग्रंथ वाचले होते आणि बरंच लिहून ठेवलं होतं. यातलं काहीही करायचं तर खूप वेळ गेला असता आणि ती गोष्ट अगदीच त्रासदायक होती. इथं फेसबुकावर पोस्ट केल्यानंतर तासाभरात किमान शंभर लाइक नाही आले, तर ती पोस्ट फेल गेली, असं समजण्याचा काळ हा! तिथं अभ्यास आदी करण्यासाठी ग्रंथ इ. वाचणं हा प्रकार फारच 'ई' होता. हल्लीच्या ई-बुकांच्या जमान्यात असले 'ईई' प्रकार करायला आम्ही काही अगदी 'हे' नव्हतो. आता काय करावे बरे, या विचारात सचिंत की कायसे होऊन आम्ही बसलो होतो. हातात चाळा म्हणून पेपर धरला होता. सहज म्हणून आमचं लक्ष एका बातमीकडं गेलं आणि आम्ही हरखलो. आनंदाच्या झोक्यावर बसून उंच उंच आभाळी गेलो. मग आम्हाला गगन ठेंगणे झाले. नंतर आनंद गगनात मावेनासा झाला आणि आभाळमाया दाटून आली. असे बरेच प्रकार झाल्यावर आम्ही पुनश्च जमिनीवर आलो. त्या बातमीकडं वारंवार पाहू लागलो. अतिआनंदानं डोळे झरू लागले. साक्षात संमेलनाध्यक्ष बोलले होते. कित्ती कित्ती दिवसांनी बोलले होते...
ते बोलत नव्हते, गप्प गप्प होते म्हणून महाराष्ट्राचं साडेतीन पेठांत पसरलेलं सांस्कृतिक विश्व गाढ झोपी गेलं होतं. झोप कसली; काळनिद्राच ती! श्रावणात फुकटचं मेहुण म्हणून, पुरणपोळीचं जेवण हाणून, तुपकट चेहऱ्याचं समाधान चेहऱ्यावर आणून, पंखा चारवर फिरवून गारेगार झोपणं म्हणजे दुसरं काय! काळनिद्राच! या पापाला क्षमा नाही... नाही, नाही! अशा या तुप्पाळ, मध्यमवर्गी सांस्कृतिक पुरुषाला गदागदा धरून, पेकाटात लाथ घालून हलवलं ते संमेलनाध्यक्षांनी... माजी संमेलनाध्यक्षांच्या पाठीत त्यांनी जाता जाता चार रट्टे घातले आणि 'केवळ मेहुण म्हणून मिरवण्यात त्यांनी धन्यता मानली,' अशी सिंहगर्जनाच त्यांनी करून टाकली. हा प्रकार घडल्यानंतर एका माजी संमेलनाध्यक्षांनी हे सगळं प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं आणि एक स्पष्टीकरण देऊन टाकलं. मग माजायची ती खळबळ माजलीच आणि माध्यमांत नेहमीप्रमाणं हे प्रकरण गाजवण्यात आलं.
एवढं सगळं झाल्यावर संमेलनाध्यक्षांच्या घरी जाऊन चहा घेणं आलंच. चहासोबत त्यांची एक फर्मास मुलाखतच घेऊन टाकू, असा विचार करून आम्ही कुमठेकर रस्त्याच्या दिशेनं कूच केलं. संमेलनाध्यक्षांच्या घरी जाणं हे कुमठेकर रस्त्यावर वाहन पार्क करण्यापेक्षा कमी धार्ष्ट्याचं आहे, असं आमच्या लक्षात आलं. आम्ही घरात पाऊल टाकताक्षणीच, 'लले, दोन कप चहा टाक' ही चिरपरिचित गर्जना कानी आली आणि आम्हास गुदगुल्या झाल्या. मागं म्हटल्याप्रमाणं एक कप चहावर एक तास व्याख्यान ऐकायची आमची तयारी असते. त्यानंतर मात्र आम्हास दुसरा कप लागतो. चहा होईपर्यंत आम्ही संमेलनाध्यक्षांचा अंदाज घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरून ते आनंदात आहेत की दुःखात, चिडले आहेत की रागावले आहेत याचा काही थांगच लागत नाही. पण चहा घेतल्यावरही ते शांत होते तेव्हा ते आनंदात असावेत, असा निष्कर्ष काढून आम्ही प्रश्नोत्तरास हात घातला. 

ठोंब्या : माजी संमेलनाध्यक्षांत सगळ्यांत चांगलं मेहुण कोण होतं?

संमेलनाध्यक्ष : कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे. कारण हे नवरा-बायको दोघंही अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांना डबल मान मिळाला. विश्राम बेडेकर आणि मालतीबाई बेडेकर यांचंही नाव घातलं असतं. पण मालतीबाईंचं समांतर संमेलन होतं. समांतर मेहुणाची पद्धत आपल्यात नाही.

ठोंब्या : संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून काय काय तयारी करावी?

सं. अ. : त्यांनी लग्न करावं. हो, हे अगदी आवश्यक आहे. त्याशिवाय मेहुण नसतं. बिनलग्नाचे अनेक पार्टनर साहित्यिकांना असतात. ते चालणार नाही. रीतसर लग्नच व्हायला हवं.

ठोंब्या : आणि दोन कप च्या?

सं. अ. : हो, हा महत्त्वाचा निकष आहे. आल्या-गेल्याला आल्याचा चहा देता आला पाहिजे. त्यासाठी आपलं खटलं चहात तरबेज हवं. खरं तर ही प्रथा आम्ही सुरू केली आहे. आमच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची प्राज्ञा अजून कुणाची झालेली नाही. कारण हिच्या हातचा आल्याचा चहा... 

ठोंब्या : समजा, आलं नसेल तर कुणी काय करावं?

सं. अ. : मराठी साहित्यिकाच्या घरी आलंही नसेल, तर तो गेल्यातच जमा आहे. आलं नसणं हा मराठी सारस्वताचा अपमान आहे. आलं असलंच पाहिजे. आलं नसेल, तर वेलदोडा घाला. पण हे म्हणजे बायको नाही म्हणून सुपारी ठेवून सत्यनारायणाची पूजा करण्यापैकी आहे. सुपारी ही अर्धांगाला पर्याय असू शकत नाही. सुपारीची कामं निराळी; बायकोची निराळी... ती मी निराळ्या व्याख्यानात सांगीन.

ठोंब्या : सांगून टाका ना... तसाही विषय भरकटलाय... एक फरक दिसतोय. सुपारी उचलता येते; बायको...

सं. अ. : गप्प बसा. विषय मी भरकटवलेला नाही. तुम्ही याला जबाबदार आहात. तुम्हीही माजी संमेलनाध्यक्षांसारखेच अगदीच हे दिसता...

ठोंब्या : 'हे' म्हणजे?

सं. अ. : मोठा विषय आहे. व्याकरणदृष्ट्या पाह्यला गेलं तर 'हा' म्हणजे पुल्लिंगी, 'ही' म्हणजे स्त्रीलिंगी आणि...

ठोंब्या : राहू द्या, राहू द्या. 'हे' आपलं इथंच राहू द्या. मी पुढचा प्रश्न विचारतो. संमेलनाध्यक्षानं मेहुण म्हणून प्रत्यक्ष कार्यस्थळी मिरवण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी?

सं. अ. : एक तर त्यांनी घरातल्या घरात मिरवण्याची प्रॅक्टिस करावी. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून सदैव एक पोझिशन घेऊन बसावं. अगदी सकाळच्या त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळीही तुम्ही एक विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वैचारिक पोझ घेऊन बसलं पाहिजे. त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळेपासून ते निशासमयीच्या अतिमहत्त्वाच्या कृत्यापर्यंत सदैव तुम्ही ही पोझ घेऊन बसलं पाहिजे. रात्री तुम्ही नैमित्तिक वैषयिक पोझ पण घेऊ शकता. साहित्यिक हा संत नव्हे. या कृत्यापासून त्या कृत्यापर्यंत पोझ घेतली असेल, तरच तुम्हाला कृतकृत्य झाल्यागत वाटेल.

ठोंब्या : एक मिनिट, एक मिनिट... त्या सकाळच्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळी सगळी माणसं एकच पोझ घेतात. ही अशी...

(आम्ही सोफ्यावर ती कृती करायला आणि वैनींनी दुसरा कप आणून ठेवायला एकच गाठ पडली. आम्ही सोफ्यावरून कोलमडलो.)

सं. अ. (भिजलेल्या बकरीकडं पाहावं तशा कारुण्यपूर्ण नजरेनं पाहत) : हूं: अशी कुणालाही पोझ घेता येत नसते. हे वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि उन्नत माणसाचं काम आहे.

ठोंब्या : तुम्ही करून दाखवता का मग?

सं. अ. (अतीव संतापानं आणि पाय वर घेत) : मी ऑलरेडी पोझिशन घेतली आहे, घेतली आहे. 

ठोंब्या : बरं, बरं. रागावू नका. अजून काय तयारी करायची पोझ सुटली की?

सं. अ. : येईल ती गावभरातली कार्यक्रमाची आमंत्रणं स्वीकारायची. एखाद्या फुटकळ कवीच्या पुस्तक प्रकाशनापासून (इथं त्यांनी टी-पॉयवर पडलेल्या 'नव्हाळीच्या कविता'ची कॉपी उचलली... हाय रे कर्मा!) ते 'हिप्पेटायटिस- बीवर युनानी उपचार' या विषयावरच्या परिसंवादापर्यंत कोणताही कार्यक्रम सोडायचा नाही. कार्यक्रमाला आलो तर दोघंही येऊ असं सांगायचं. जेवायची आणि नेण्या-आण्याची सोय करायला सांगायची. मानधन मजबूत सांगायचं. कमी मानधन घेणारा पुढल्या जन्मी 'नव्हाळीचा लेखक' होतो... (पॉझ घेत) तुमच्यासारखा...! हॅ हॅ हॅ... 

ठोंब्या (लाजत) : हो, हो... तसं आम्हाला सगळे ल्हानपणापासूनच ठोंब्या म्हणतात, ते त्यासाठीच. प्रकाशक तर हा हा म्हणता आम्हाला गुंडाळतात आणि खिशात ठेवतात. तर ते असो. तुम्ही बोला... 

सं. अ. : हां, तर आधी आपण मेहुण म्हणून गावभर मिरवून घ्यायचं. प्रत्यक्ष संमेलनात तर आपण आणि आपली लली - आय मीन - पत्नी या दोन व्यक्ती नसून, एकच व्यक्ती आहेत असाच भास सगळ्यांना झाला पाहिजे एवढं चिकटून राहायचं. लग्नाला तीस वर्षं झालीयत, की तीस मिनिटं असा संभ्रम पडेल, असं नवविवाहित जोडप्यागत वागायचं. खेटत राहायचं. खेटायचं सोडायचं नाही. हे पाहून काही काही लोक तर आहेराची पाकिटंही देतात. ती घालायची खिशात गपचूप...

ठोंब्या (डोळे विस्फारून) : काय सांगता? लेखकालाही पाकीट मिळतं? आम्ही तर फक्त पत्रकारांनाच मिळतं, असं ऐकून होतो.

सं. अ. (हसत) : म्हणूनच तुम्ही अगदी ठोंब्या आहात, एक नंबरचा ठोंब्या... 

(इथं सं. अ. प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतील की काय, असे भय उत्पन्न झाले. आम्ही लगेच दूर पळालो.)

ठोंब्या : ते तर आहेच हो. पण एकूण संमेलनाध्यक्षांनी नुसतं मेहुण म्हणून मिरवलं असा तुमचा आरोप नाहीच्चे तर...

सं. अ. : नाही ना... तेच तर. अहो मला म्हणायचं होतं, की माजी संमेलनाध्यक्षांनी नुसतंच मेहुण मिरवलं. माझ्यासारखं 'नीट' नाही मिरवलं... कारण त्यांना शिकवायला मी नव्हतो ना तेव्हा!

ठोंब्या : अच्छा, अच्छा. आलं लक्षात. म्हणजे यापुढच्या संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून कसं मिरवावं हे तुमच्याकडूनच शिकावं असं म्हणता?

सं. अ. : अगदी. हे संमेलनाध्यक्षपद संपलं, की आम्ही तसा क्लासच काढणार आहोत. 'येथे उत्कृष्ट मेहुण कसे मिरवावे हे शिकवले जाईल,' असा बोर्डच टांगणार आहे खाली...

ठोंब्या : वा.. वा... क्लासला एक नाव सुचवू? मेहुणचार! कसं आहे?

सं. अ. : झक्कास... द्या टाळी...

इथं आम्ही टाळी द्यायला हात पुढं केला, तो हात कुणी तरी खस्सकन ओढला. सं. अं.नी असं का केलं, म्हणून पाहतो तो साक्षात आमचं अर्धांग समोर उभं! 'अहो, उठा. पुरणपोळ्या हादडून झोपलाय कधीचे. दोन तास झाले आता. उठा. आणि झोपेत टाळ्या कसल्या देताय हवेतल्या हवेत?..' हिचा चिरपरिचित वरचा 'सा' ऐकून आम्ही नीटच जागे झालो. काय झालं ते एकदम लक्षात आलं.
...आणि मग आम्ही हसून तिला म्हटलं, 'ठोंबे, दोन कप चहा टाक'!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, सप्टेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

फिरकीचा ठोंब्या - भाग ४

लेखक ग्रंथांच्या घरी...
--------------------------

सध्या दिवस कठीण आहेत. लेखकासाठी तर ते आणखीनच कठीण. आधी काही तरी लिहा, मग ते छापा, मग ते खपवा, मग साहित्याच्या हेडक्वार्टरी सभासद व्हा, मग पदाधिकारी व्हा, मग पुरस्कारासाठी सेटिंग करा, मग साहित्य संमेलन भरवा किंवा संमेलनाचे अध्यक्ष व्हा... केवढे व्याप अन् केवढे ताप! या सगळ्या गोंधळात हातून लेखन होतच नाही, हा परत वेगळा मुद्दा!
चांगलं दर्जाचं वगैरे सोडा, पण किमान वाचनीय, बरं असं काही लिहिण्यासाठीही प्रतिभेची भरपूर हॉर्सपॉवर लागते म्हणे. कुणास ठाऊक! मात्र, लेखनासाठी लेखकाला निरनिराळ्या कल्पना सुचाव्या लागतात, वगैरे जुना काळ झाला, हे नक्की! तसंही चार आण्याची भांग घेतली, की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात असं साक्षात लोकमान्यांनीच म्हणून ठेवल्यानं आम्ही त्या वाटेला फारसे जातच नाही. हल्ली आम्हास टीआरपीची चिंता असते. सुळावरच्या पोळीचे दिव्य करूनही पुस्तक खपेना, तसं आम्हाला टीआरपीच्या इतर काहीबाही कल्पना सुचू लागल्या. हल्ली आम्ही सोशल मीडियावर बराच काळ टीपी करीत असल्यानं तिथं तर या कल्पनांची अलिबाबाची गुहाच उघडलेली दिसत होती. एकदा वाटले, फेसबुकवरच पुस्तकाची वारेमाप जाहिरात करावी. पण आमचा चेहराच असा आहे, की तिथं फार काही लाइक्स वगैरे येण्याची शक्यता नव्हती. बाकी रेडिओ-टीव्ही वगैरे गोष्टी तर आमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या नव्हत्याच. मग एकदम ग्रंथालयाची आठवण झाली. ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी हा एक मोठा आधार होता यात वाद नव्हता. काही मोजक्या ग्रंथालयांत आपले पुस्तक ठेवावे; किमान ते अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल, अशी आशा होती.
लेखक असल्यानं बऱ्याच दिवसांत ग्रंथालयात गेलो नव्हतो. वर आपण लेखक असल्याची जाहिरात आम्ही गावभर केलेली असल्यानं कुणाला ग्रंथालयाचा पत्ता विचारणं बरं दिसलं नसतं. अखेर एके दिवशी मंडईत भाजी आणायला गेलो असता, एका बोळात ग्रंथालयाचा बोर्ड दिसला. हे शासकीय अनुदानित ग्रंथालय दिसत होतं. आत गेलो. ग्रंथपाल महोदयांना भेटलो. पुस्तक दिलं. आधी त्यांनी खूप कामात आहोत, असं दाखवलं. मग आम्हीही 'केवढं काम पडतंय ना तुम्हाला?' असं म्हणून ग्रंथपालदादांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं. त्यानंतर सुमारे एक तास अर्ध्या कप चहावर आम्ही 'ग्रंथालय सेवकांच्या समस्या' या विषयावरचं एक मोफत व्याख्यान ऐकलं. एक नवं पुस्तक लिहिता येईल, एवढा ऐवज त्यात मिळाला. सरकारी अनुदानं लाटण्यासाठी ग्रंथालयांच्या या जगात काय काय चालतं हे कळलं. काही काही ठिकाणी तर स्वतःच्या छोट्या घरातच अनेकांनी कथित ग्रंथालय सुरू केलंय म्हणे. आपल्याच नातेवाइकांची संचालक म्हणून वर्णी लावायची. कमी किमतीत पुस्तकं घ्यायची, मग रद्दीत विल्हेवाट लावायची... असले अनेक प्रकार ऐकायला मिळाले. ही चुरस आणि चमत्कारिक बाजू आम्हास ठाऊक नव्हती. आता ग्रंथपाल महोदय आपलं पुस्तक तिथं ठेवण्यासाठी उलट आमच्याकडूनच भाडं वगैरे घेतात की काय असं वाटू लागलं. पण तसं काही झालं नाही. ग्रंथपाल महाशयांनी आमचं पुस्तक ठेवून घेतलं. किती लोक घेतील आणि वाचतील, हे मात्र विचारू नका, असं म्हणाले. मग सरकार ग्रंथालयांना भरपूर अनुदान देतं, तर लेखकांना का देत नाही, असा भाबडा प्रश्न आमच्या मनास तरळून गेला. लेखकांना अनुदान मिळू लागलं तर, या कल्पनेनं आमच्या प्रतिभेचा अश्व चौखूर उधळू लागला. पण सध्या अनुदान मिळत नाहीय या वास्तवाची जाणीव झाल्यावर तो पुन्हा तबेल्यात जाऊन चूपचाप उभा राहिला.
पायऱ्या उतरून खाली आलो. ग्रंथालयांमधल्या कित्येक पुस्तकांवरची धूळही कधी झटकली जात नाही. ज्ञानाचा, विद्वत्तेचा सागर आपल्या पानापानांत भरून घेणाऱ्या त्या मूक सोबत्यांना वाचा फुटली तर किती गुपिते उलगडतील नाही का! आम्हाला आता इतर ग्रंथालयांत काय चालते, हे पाहण्याची फारच ओढ वाटू लागली. दुसऱ्या एका ग्रंथालयात गेलो. हे अनुदानित ग्रंथालय नसावे, हे तिथली टापटीप आणि शिस्तशीरपणा पाहून लगेच कळले. आमच्या शहरात हौसेपोटी खिशातले पैसे खर्चून करून लोकांची ज्ञानार्जनाची भूक भागविणारे काही वेडे लोक होऊन गेले. त्यातल्याच काहींनी ग्रंथालये उभारली, काहींनी सामाजिक संस्था उभारल्या, तर काहींनी इतर अनेक विधायक कामं उभी केली. हे खासगी संस्थेनं चालवलेलं शिस्तशीर ग्रंथालय पाहून इथं आपलं पुस्तक असावं, अशी तीव्र इच्छा मनी दाटून आली. संस्था शिस्तशीर असल्याचं तिथं जागोजागी लिहिलेल्या सूचनांवरून स्पष्ट दिसत होतं. नेलेलं पुस्तक धड परत आणून देण्याबाबत तर एवढ्या कडक सूचना होत्या, की बहुतेक लोक ते पुस्तक न उघडताच आहे तसं परत आणून देत असावेत, असं वाटलं. पण तरी आम्हाला हे ग्रंथालय आवडलं. इथंही आमच्या पुस्तकाची एक प्रत दिली आणि निघालो.
ग्रंथालय म्हटलं, की आमच्या मनात फारच उदात्त भावना दाटून येतात. आमच्या कॉलेजचं ग्रंथालय आठवलं, की अनेक गोड गोड आठवणीही जाग्या होतात. तिथं आम्ही पुस्तकं कमी वाचली; पण माणसं जास्त वाचली! घरात नको असलेल्या मांजराला जसं वारंवार बाहेर काढतात, तसं तिथल्या काकांनी आम्हाला कित्येकदा बखोट धरून बाहेर काढलं आहे. मात्र, मांजरापेक्षाही अधिक चिवटपणानं आम्ही पुन्हा आमचा तिथला कोपरा गाठला आहे. आमच्या गावी असलेल्या ग्रंथालयाच्या आठवणीही फारच रम्य आहेत. आपणही लेखक व्हावं, हा किडा आमच्या डोक्यात घुसला तो तिथंच. अनेक नामवंत लेखकांची मोठमोठी पुस्तकं तिथं वाचली. ही पुस्तकं अनेकदा फारच मळकी, पानं दुमडलेली, कोपरे दुमडलेली, फाटलेली अशी असत. अनेकदा पुस्तकांतल्या ओळींखाली रेघा मारलेल्या असत. शेजारी मोकळ्या जागेत मनमोकळी कॉमेंटरी लिहिलेली असे. 'हे पुस्तक वाचू नका,' या बाळबोध सल्ल्यापासून सांगता येणार नाही अशा भाषेत लेखकाला व्यवसाय बदलण्याबाबत केलेल्या रोखठोक सूचना याच पुस्तकांमध्ये पाहायला मिळत. पण याचाच अर्थ तेव्हा ही पुस्तकं वाचली जात होती, अनेक लोक ती हाताळत होते, पाहत होते. कुठल्याही ग्रंथालयातल्या पुस्तकाला यापेक्षा भाग्याची गोष्ट कुठली वाटू शकेल? लेखकाप्रमाणंच त्याच्या पुस्तकालाही बोलता आलं असतं, तर त्यानंही कदाचित हेच सांगितलं असतं. आपल्या राज्यातल्या ग्रंथालयांनाही वाचा फुटली, तर त्यातल्या बहुतेकांचं मनोगतही अश्रूंसोबतच व्यक्त होईल असं वाटायला लागलं. आम्हा लेखकांसाठी पंढरीचं माहात्म्य असलेली ही ग्रंथालयं खरोखर आत्ता काय बिकट अवस्थेत आहेत, हे कळलं तर पुस्तकांबद्दल संवेदनशील असलेले समस्त रसिकजन हळवे झाल्याशिवाय राहणार नाहीत. अनेक ग्रंथालयांची अवस्था भयंकर आहे. ग्रंथालये चालवणारे लोक काय जिकिरीनं ती चालवत आहेत, हे अनेकांना माहिती नाही. फारच थोडकी ग्रंथालये उत्तम दर्जा टिकवून आहेत. पण बहुसंख्य ठिकाणी आनंदीआनंदच आहे. भ्रष्टाचारापासून ते सरकारी अनास्थेपर्यंत अनेक वाईट गोष्टींनी त्यांना खिंडीत गाठलंय. यावर उपाय कोण करणार? मन एकदम चिंताक्रांत झालं.
अशाच हळव्या अवस्थेत आम्ही आमच्या परमप्रिय पुण्यनगरीतल्या खाशा पेठेतल्या खाशा ग्रंथालयात शिरलो. 'कोण पाहिजे?' अशी केवळ या पेठेतच केली जाणारी तुच्छतादर्शक विचारणा समोरचे काका कानकोरण्यानं कान कोरत करते जाहले. त्यांच्या त्या आविर्भावानंच आम्ही गर्भगळीत झालो. 'पु.. पु... पुस्तक द्यायचंय,' हे शब्द कसेबसे फुटले. 'नव्हाळीच्या कविता' हे आमच्या पुस्तकाचं शीर्षक वाचून ते काका खेकसले, 'कविता नाही ठेवत... एक काम करा. शेजारी भेळवाला आहे. त्याला लागतात खूप कागद... तिकडं देऊन या...'
आम्ही क्षणार्धात हळव्याचे रडवे झालो. ग्रंथालयांना, त्यातही आमच्या पुण्यनगरीतल्या ग्रंथालयांना पुढील शेकडो वर्षं मरण नाही, हे सत्य उमजले. खाली येऊन पुस्तक शबनममध्ये कोंबलं आणि ओल्या भेळेची ऑर्डर दिली...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, ऑगस्ट २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...